फार पूर्वीचा काळ
फार पुर्वीचा काळ. गावातील कुणीतरी एखाद दुसरा माणुस पुण्या- मुंबईला असायचा. आमच्या गावातील बरेच लोक तेव्हा भिवंडी येथे कामधंद्यासाठी होते.
काही लोक शेतीची कामे उरकुन भिवंडी येथे कामासाठी जात असत. त्यामळे त्यांचे गावी सतत येणे जाणे असायचे. त्यावेळी संदेश वाहनाच्या सुविधा नव्हत्या.
संदेश वाहनांमध्ये झालेले बदल
ज्यांचे कुणी मुंबई,भिवंडीला असे त्यांच्यासाठी त्यांचे लोक विविध रानभाज्या आळवडीची पाने, करटुली, चाव्याचा बार,चाव्याची भाजी,हारब-याची भाजी, हरभरा किंवा गव्हाचा हुळा,तांदुळ व खोब-याची वाफोळी,काकडीची पिसोळी तांदुळ वगैरे गावाहुन पाठवत असत. त्याबरोबरच एखादी चिठ्ठी लिहुन दिलेली असे.
चिट्ठी आई हे वतन से
त्याच बरोबर मुंबई किंवा भिवंडीहुन एखादा माणुस गावी जाणार आहे असे समजताच तिकडे राहणारे लोक आपापल्या गावी राहणाऱ्या नातेवाईक,आई वडील,भाऊ वगैरे लोकांना थोडेफार पैसे देण्यासाठी आदल्या दिवशी गर्दी करत.सोबत एखादी चिठ्ठीही पाठवत.
दसरा,दिवाळी,यात्रा किंवा घरात कुणाचे लग्न असेल तर पुणे,मुंबई व भिवंडीकर यांची लोक अतुरतेने वाट पहात असत.प्रवासात मुंबईकरांचे प्रचंड हाल होत.खंडाळा घाटात ट्रँफिक जाम मुळे एक ते दिड दिवस घाटातच मुक्काम करावा लागे.
मुंबईचा हलवा
मुंबईकरांनी आणलेला हालवा काय अप्रतिम होता.चवच न्यारी.मुंबईकर,पुणेकर व भिवंडीकरांचा थाटच न्यारा असायचा. मुंबईकर जेव्हा गावावरून मुंबईला जायला निघत तेव्हा सारा गाव त्यांना पोहचवायला एस.टी.स्टँड पर्यंत जात असत.
आम्ही शाळेत असताना गावातील लोक पोष्टकार्ड आणायला सांगत. त्यावेळी साधे पोष्टकार्ड १५ पैशाला होते. तर अंतरदेशीय निळे ४५ पैशाला. गावात कुणाला पत्र लिहायचे असेल तर सर्वजन माझ्याकडे येत असत.
साधे पोस्ट कार्ड
पत्राचा मायना ही ठरलेलाला असे तो लिहावाच लागे.
चि..........यांस पत्र लिहीणार........ यांचे अपनास अनेक अशिर्वाद...
पत्र लिहिण्यास कारण की आम्ही इकडे सर्व लहानथोर खुशाल आहोत.तुम्ही तिकडे सुखरूप असशाल अशीआम्ही देवाजवळ प्रार्थना करतो.हे लिहिल्यावर दुसरे काही लिहायला जागाच शिल्लक राहत नसे.
आंतरदेशीय निळे कार्ड

लोक पोष्टमनची अतुरतेने वाट पहायचे. पत्र आल्यावर ते वाचुन दाखवायचेही काम करावे लागे. आपल्याला आलेले पत्र चार-चार वेळा वाचुनही परत परत वाचावेसे वाटे.
मी काँलेजला असताना गावाकडील मित्रांनी विशेषतः दत्ता तिटकारे, दगडू जढर, राघुजी आंबवणे यांनी लिहिलेली पत्र अद्यापही माझ्याकडे आहेत. तो एक अनमोल ठेवाच म्हणावा लागेल.
पत्र आल्यावर होणारा आनंद किंवा दुःख
काही लोक मुंबईहुन गावातील त्यांच्या आई,वडील किंवा भावाला मनीआँर्डर करत.पोष्टमन गावात येऊन मनीआँर्डरचे पैसे द्यायचा.
काही दुःखद प्रसंग घडला किंवा एखाद्याला सरकारी नोकरीचे बोलावने आलेतर तार यायची. तार ही पत्राच्या मानाने खुपच लवकर पोहचत असे. तारेच्या कागदावर अतिशय छोटा व असंदिग्ध मजकूर असे.
तार वाचायाला तज्ञ माणसाची मदत घ्यावी लागे. अनेक वेळा तार वाचण्याचे दिव्य मला पार पाडावे लागत असे.
लोक तासनतास माझी तारेवरचा मजकूर वाचण्यासाठी वाट पहात असत. आमची स्वारी दुर कोठेतरी रानारूनात,ओढ्यावर किंवा विहिरीवर पोहायला गेलेली असे. कधीकधी लोक मला तेथे शोधायला येत असत.
कधीकधी गावातील लोकांना महत्त्वाचा निरोप द्यायचा असेल तर वाडा येथे पोष्टआँफिसमध्ये जाऊन फोन करावा लागे.
टेलिफोन
त्या काळात टेलिफोनच्या सुविधा तालुक्याच्या गावापर्यंत किंवा त्यापुढील मोठ्या गावांमध्ये होत्या.
श्रीमंत माणसाकडेच तेव्हा फोन सुविधा उपलब्ध असायची. आताचे बीएसएनएल व पूर्वीचे भारत संचार निगम कडे अर्ज दाखल केल्यावर वर्षा दोन वर्षांनी टेलिफोन सुविधा उपलब्ध व्हायची.
काही लोक आमदार खासदारांचे उंबरे झिजवून वशिला लावून सहा महिन्यात सुविधा उपलब्ध करून घ्यायचे.
पूर्वीचे टेलिफोन
S. T. D. बुथ
त्यानंतर मात्र मोठ्या गावात.तालुक्याच्या ठिकाणी S.T.D. काँल सेंटर सुरू झाले.लाकडाच्या पिवळ्या बुधमध्ये जाऊन बोलायचे.
ज्याला नंबर डायल करता येत नसे. त्यास बुथमालक बाहेरुन फोन लावुन देत असे. आपण फक्त आतमध्ये जाऊन फोन उचलायचा आणि बोलणे सुरू करायचे.
आतमध्ये प्रायव्हसी असल्यामुळे निवांत बोलता यायचे.बाहेर रांग लावुन लोक थांबलेले असत.एखाद्याचे बोलणे खुपवेळ चालल्यावर बाहेरच्यांना प्रचंड वैताग यायचा.लोक कधी एकदा यांचे बोलणे संपतेय याची वाट पहात असत.
लाल डब्बा कॉइनवाला फोन P. C. O.

नोकिया हँडसेट
सर्वसामान्य लोकांकडे नोकिया,रिलायंस,मटरोलोचे Black & White हँडसेट येव्हांना यायला लागले होते.सुरूवातीला ३५०/- चा रिचार्ज केल्यावर फक्त ५०/-रू.चा टाँकटाइम मिळे.१ मिनीटाला ३.रू ५० पैसे आकारले जात.शिवाय Incomining लाही बील आकारले जाई.दोन,चार फोन केल्यावर लगेच पैसे संपत असत. त्यानंतर मात्र फोन रिचार्ज स्वस्त झाले.
पुढील एकदोन वर्षात अनेक रंगीत हँडसेट आले.त्यात रेडिओ व एफ एम ची गाणी यांची सोय होती.शिवाय या मोबाईलमध्ये s/d कार्ड (काळी छोटी चीप) होती. ही चीप १ जी.बी.,२ जी.बी ची असायची.यामध्ये आवडीची गाणी भरून मिळत असत. त्यामुळे मोबाईलवर हवे ते गाणे ऐकायला मिळत असे.त्यानंतर Toush screen चा जमाना आलो.
अनेक प्रकारचे मोबाईल आले.Whats up, Face book, insta gram, यु ट्युब, अशी अनेक माध्यमे आली.त्यामुळे जग अधिकच जवळ आले.मोबाईल प्रत्येकाचा एक अविभाज्य घटक झाला.
लोक तासंतास मोबाईलवर टाईमपास करू लागले. आपल्या नातेवाईकांना मित्र-मैत्रिणींना लग्नाच्या पत्रिका किंवा ठराविक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका प्रत्यक्ष भेटण्याऐवजी किंवा फोन करण्या ऐवजी Whats up वर पाठवू लागले.
मोबाईल मुळे जग जवळ आले परंतु माणसे दूर गेली.
घरातल्या घरातच माणसे एकमेकांपासून दूर गेली. मोबाईल मुळे कोणी कोणाशी बोलायची सोय राहिली नसल्यामुळे . परदेस जाके परदेस पिया, भूल न जाना किया या गाण्याला काहीही अर्थ राहिला नाही. चिट्ठी आई है, आई है, हे तर केव्हाच हद्दपार झाले.
लेखक - रामदास तळपे









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा