वाडीत देवी आईचे खूप जागृत असे देवस्थान आहे. हे देवस्थान मंदोशी हुरसाळेवाडी टोकावडे रस्त्यावर हुरसाळेवाडी जवळ रस्त्याच्या बाजूला पिंपरीच्या झाडाखाली होते. तेथे फक्त देवी होती. परंतु मंदिर नव्हते.
पूर्वी गावात अनेक साथीचे रोग यायचे. लहान मुले आजारी पडायची. त्यावेळी लोक या देवीला नवस करायचे. सबंध गाव वर्षातून एकदा या देवीचा उत्सव साजरा करायचे. सबंध गावातील स्त्री पुरुष लहान मुले या उत्सवात सहभागी व्हायचे. मोठा कार्यक्रम व्हायचा. त्यानिमित्ताने लोक एकत्र यायचे. हुरसाळे वस्तीला यात्रेचे स्वरूप यायचे.
देआई:
त्यानिमित्ताने लोकांच्या भेटीगाठी व्हायच्या. लोक चार सुखदुःखाच्या गोष्टी एकमेकांना सांगून दुःख हलके करायचे. एकमेकांना मदत व्हायची.
परंतु पुढे काळ बदलला. साथीचे आजार कमी झाले. लोक देवीकडे यायचे कमी झाले. गावाने ही नंतर देवीकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली.
अचानक दत्ता आंबेकर यांच्या मनात विचार आला. देवीला मागचे गत वैभव दोन दिले तर? त्या निमित्ताने लोक पुन्हा एकत्र येतील. एक दिवसाचे का होईना वाडीला यात्रेचे स्वरूप येईल. वाडी लोकांच्या आगमनाने गजबज होऊन जाईल. यासाठी काय केले पाहिजे? वेगाने विचारचक्र फिरू लागले.
त्यांच्या मनात विचार आला. हे आपले एकट्याचे काम नाही. यासाठी अजून काही लोकांची मदत मिळाली तर आणि तरच हे काम तडीस जाईल. चांगल्या कामाला सुरुवात केली तर लगेच केली पाहिजे. नाहीतर उगाचच फाटे फुटत राहतात असा विचार करून त्यांनी लगेचच त्यांची कल्पना त्यांचे बालमित्र श्री भगवान हुरसाळे यांना बोलवून दाखवली. त्यांना ही कल्पना फारच आवडली.
त्यानंतर त्यांनी वस्तीतील नामांकित पहिलवान श्री अंकुश हुरसाळे यांना ही कल्पना सांगितली. विचारविनिमय झाला. यासाठी पिंपरीच्या झाडाखाली असलेले देवी आईच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला तर?
मंदिर बांधायचे म्हणजे सोपे काम नाही. पैशाचा प्रश्न तर होताच परंतु गावातील लोकांमध्ये त्यावेळेस मोठ्या प्रमाणात हेवेदावे होते. त्यांची परवानगी आवश्यक होती. चांगल्या कामाला विरोध करणारी माणसे गावात खूप असायची.
त्याचप्रमाणे देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा म्हणजे त्यासाठी ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाचा कौल घेणे आवश्यक होते. लोक एकत्र करायची होती. अशी अनेक आव्हाने त्यांच्या समोर उभी होती.
यासाठी त्यांनी वस्तीतील सर्व तरुण एकत्र केले. मीटिंग आयोजित केली. मीटिंगमध्ये हा विषय चर्चेला आला. विशेष म्हणजे सर्व तरुण मित्रांनी यासाठी होकार दर्शविला.
दत्ता आंबेकर म्हणाले
मित्रांनो ! हे काम करायचे असेल तर आपापसातील हेवेदावे, भांडण तंटे याला लगाम लावावा लागेल.
कोणत्याही मोठेपणासाठी काम न करता एक दिलाने काम केले पुढे नेता येईल. आपण सर्व आपल्या आई वडिलांना सांगायला पाहिजे. वस्तीमध्ये एक भव्य चांगले काम आम्ही करायला घेतले आहे. यासाठी जेणेकरून मंदिर बांधकामास खीळ बसेल असे होता कामा नये.
सर्वांना हा विचार पटला. आणि सर्वजण पुढील कामासाठी लागले.
गावातील देवादिकाची जाण असलेले व्यक्तिमत्व म्हणजे गोविंदराव हुरसाळे. त्यांच्याकडे सर्वजण गेले.
देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. यासाठी पुढे काय करावे लागेल हे त्यांना विचारले.
त्यांनी सांगितले. आपले ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवस्थान यांस कडे कौल लावावा लागेल. देवाने कौल दिला तर आपल्याला करता येईल अन्यथा नाही.
देवाने जर कौल नाही दिला तर? ही भीती मनात आली. तरीही गोविंदराव हुरसाळे यांना घेऊन दत्ता आंबेकर व अजून एक दोन जण एका रविवारी काळभैरवनाथ मंदिराकडे गेले. पुजाऱ्याने देवाला कौल लावला आणि आश्चर्य म्हणजे मंदिर जीर्णोद्धार करायचा कौल मिळाला.
सर्वांना खूप आनंद झाला. मंदिराचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पुढचे आव्हान होते. गावकऱ्यांची संमती यासाठी गावात मीटिंग घेतली. सबंध गाववाडे वस्तीतील लोक मिटींगला उपस्थित होते. देआई मंदिर जिर्णोदराचा दत्ता आंबेकर विषय मांडला. अनेक चर्चा झाल्या. काही लोकांनी या कामासाठी खुप विरोध केला.
तर काही लोकांनी तरुण पोरं करतात ही अतिशय चांगली बाब आहे. असा निष्कर्ष नोंदवला. काहीही झाले आणि कितीही विरोध झाला तरी मंदिर बांधायचे. कारण देवाने कौल दिला होता. तेव्हा मागे हटून चालणार नव्हते.
परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मंदिर बांधकामासाठी लागणारा पैसा. आमच्याकडे तर साधे शंभर रुपये सुद्धा नव्हते. आणि आम्ही मंदिर बांधकाम करायला निघालो होतो. आजही विचार केला तर हे आठवून अंगावर रोमांच उभे राहतात.
मंदिर बांधकामासाठी त्यांनी वाडीत मिटींग घेऊन प्रत्येक तरुणामागे दरमहा रुपये दहा वर्गणी ठरवली. दर महिन्याला दहा रुपये वर्गणी जमा व्हायची.
मंदिर बांधकामासाठी वस्तीतील प्रत्येक घरटी वर्गणी जमा केली.
हातात पैसा आला. दत्ता आंबेकर, अंकुश हुरसाळे,व श्री भगवान हुरसाळे यांनी सुट्टीच्या दिवशी मंदिर कसे बांधायचे. यासाठी मुंबईतील छोटी छोटी मंदिरे पाहून घेतली. बरेच दिवसानंतर त्यांना हवे तसे मंदिर मिळाले.
लगेच दत्ता आंबेकर गावाला आले. वस्तीतील लोकांची मीटिंग घेतली. आणि मंदिर बांधकाम करण्यासाठी कारागिराची चाचपणी केली.
नंतर असे लक्षात आले की आपल्याच गावातील श्री दूंदाजी बांगर यांना काम दिले तर? त्यांनी मंदिराची यापूर्वी कामे केली होती. लगेचच त्यांना बोलवून घेतले. आणि त्यांना मंदिराचे काम देण्यात आले.
सर्व विधिवत पूजा करून मंदिर बांध कामासाठी सुरुवात झाली. दर आठवड्या ला सुट्टीच्या दिवशी मुंबईवरून येऊन मंदिरासाठी काय हवे काय नको ते पाहू लागले. अल्पावधीतच सुंदर असे देखणे छोटे खाणी मंदिर पाहून सर्वाना विशेष आनंद झाला.
वस्तीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सर्व तरुणांचा उत्साह द्विगुणीत होत होता. विरोध करणारे लोकही आता सहभागी होऊन खांद्याला खांदा लावून काम करत होते.
वस्तीतील रुसवे फुगवे, किरकोळ भांडणे कधीच बंद पडली होती. त्याचेही समाधान वाटत होते. शेवटी एकदा मंदिर तयार झाल्यावर जीर्णोद्धाराचा छानसा कार्यक्रम करावा असे ठरले.
सर्वजण कामाला लागले. पहिल्याच वर्षी मंदिराचा जीर्णोद्धार व महापूजा ठेवण्यात आली.
सन 2010 साली अनेक तरुण कार्यकर्ते यांना येऊन मिळाले. आणि आपण अजून काहीतरी भव्यदिव्य केले पाहिजे असा विचार पुढे आला.
यासाठी अधिकृत असे मंडळ रजिस्टर करणे आवश्यक आहे. अशी भूमिका काही लोकांनी मांडली.
आणि अल्पवधीत देआई प्रतिष्ठान मंडळाची स्थापना झाली. शासन दरबारी त्यांचे रजिस्ट्रेशन झाले. सर्व तरुण मंडळांनी दत्ता आंबेकर यांची अध्यक्ष पदावर बिनविरोध निवड केली. अशाप्रकारे सामाजिक कार्य करण्यास एक प्रकारे चालना मिळाली.
सन 2013 साली देवीचा भव्य दिव्य कार्यक्रम करायचा असे सर्वानुमते ठरले. यासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या जमा झाल्या.
गावच्या यात्रेच्या धरतीवर कार्यक्रम करण्याचे निश्चित झाले. अनेक तरुणांच्या संकल्पनेतून देवीस हारतुरे, मोफत सर्व रोग निदान, मोफत चष्मे वाटप शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शब्दकोश वाटप, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम इत्यादींचे आयोजन करण्याचे एकमताने ठरले.
असा भव्य दिव्य कार्यक्रम यापूर्वी कधी झाला नव्हता. या कार्यक्रमाचे नियोजन करण्याची कसरत सर्वांना करायला लागणार होती.
श्री बंडूशेठ सिताराम हुरसाळे यांनी महाप्रसादाची जबाबदारी उचलली. श्री एकनाथ आंबेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना शब्दकोश वाटप करण्याची जबाबदारी उचलली. थोडाफार भार हलका झाला. श्री गणेश हुरसाळे सर, श्री अंकुश हुरसाळे श्री भगवान हुरसाळे आणि दत्ता आंबेकर यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी उचलली.
मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2013 रोजी भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
गावातील विघ्नसंतोषी लोकांनी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. गावात चुकीच्या पद्धतीने प्रचार केला. मंडळातील काही मुलांना चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु एकानेही दाद दिली नाही. एकी भक्कमपनाने उभी राहिली.
मोठ्या प्रमाणात लोक कार्यक्रमासाठी हजर होते. "न भूतो न भविष्यती" अशी लोकांची गर्दी झाली. उत्तम प्रकारे कार्यक्रम यशस्वी झाला. नवा हुरूप आला.
त्यानंतर भविष्यात मंडळाने विविध प्रकारे सामाजिक कामे कार्यक्रमाच्या माध्यमातून हाती घेतली.
मोफत रोग निदान, मोफत फळझाडांचे वाटप, मोफत चष्मे वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी संगणकाचे वाटप, 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी गावातील सर्व शाळेतील मुलांना खाऊचे वाटप, मोफत वह्या व गणवेश वाटप, किर्तन, प्रवचन व भजनांचे आयोजन केले गेले.
सन 1998 पासून आज अखेर पर्यंत त्यांचे हे काम अविरतपणे चालू आहे.
वाडीतील लग्नकार्य, पूजा व इतर धार्मिक कार्यक्रमासाठी अन्नदानाचे कार्य केले जाते. यासाठी वस्तीमध्ये भांडी नव्हती. इकडून तिकडून कार्यक्रमासाठी भांडी गोळा करावी लागायची. हे त्यांच्या लक्षात आल्यावर वस्तीसाठी सर्व प्रकारचे भांडी विकत घ्यायचे असे ठरले.
मुंबईमधील भांड्यांची विविध दुकाने श्री मनीष हुरसाळे आणि दत्ता आंबेकर यांनी पायाखाली घातली. आणि एक दिवस जेवणासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी विकत घेतली.
दत्ता आंबेकर हे सामाजिक कार्यात नेहमीच पुढे आहेत. गावातील किंवा भागातील अनेक लोकांचे सुखदुःखासाठी ते सतत धावून येतात.
दत्ता आंबेकर हे माझ्यापेक्षा तीन-चार वर्ष वयाने मोठे.
त्यावेळी डेहणे येथे शालेय मुलांच्या बीट पातळीवर स्पर्धा होत्या. पश्चिम भागातील सर्व विद्यार्थी डेहणे येथे क्रीडा स्पर्धांना गेले होते. त्यामध्ये मी पण होतो.
क्रीडा स्पर्धा संपल्यावर घरी येताना रस्त्यामध्ये मी पडलो. माझ्या पायाला बरेच खरचटले होते, थोडेफार रक्तही येत होते. त्यावेळी साधारण मी दुसरीला असेल.
दत्ता आंबेकर यांनी मला वांजळ्यापासून मंदोशी पर्यंत उचलून आणले होते. इतका हा प्रेमळ माणूस. लहानपणापासूनच त्यांच्या अंगी सामाजिक बांधिलकी, प्रेम, जिव्हाळा,आपुलकी इत्यादी गुण असल्यामुळे मुंबईसारख्या मायावी नगरीत ते तरुण गेले.
मुंबईसारख्या नगरीत सुरुवातीला त्यांनी अनेक छोटी मोठी कामे केली. ही कामे करूनही कपडे घेण्यासाठी ही त्यांच्याकडे पैसे नसत.
परंतु परमेश्वर कृपेमुळे त्यांना भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये नोकरी मिळाली आणि त्यांच्या आयुष्याचे सोने झाले.
एकदा आम्ही गावकरी आमच्या गावच्या मंदिराच्या जिर्णोदरासाठी देणग्या गोळा करण्यासाठी मुंबईला गेलो होतो. तेथे सर्वांची श्रेयस गार्डनमध्ये मीटिंग झाली.
मीटिंग साधारण सायंकाळी सात वाजता संपली. त्यानंतर सर्व ग्रामस्थांना दत्ता आंबेकर यांच्या घरी जेवणाची व्यवस्था करण्यात आली.
तेथे जेवायला बसल्यावर त्यांच्या पत्नीने मला म्हटले.
रामदास ! अरे, कसं काय बरा आहेस ना? असे विचारले.
दत्ता आंबेकर व माझ्यासकट जेवायला बसलेले सर्व आश्चर्यचकित झाले. कारण मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेलो होतो. ओळख पण नव्हती.
परंतु त्यांच्या पत्नीने नंतर खुलासा केला. की शाळेमध्ये आम्ही एकाच वर्गात होतो. नंतर लक्षात आले की आम्ही पाचवी ते सातवी पर्यंत एकाच वर्गात होतो. आणि योगायोगाने त्या आमच्या पत्नीच्या नातेवाईकही लागत होत्या.
तर... असे हे दत्ता आंबेकर यांचे कुटुंब. सामाजिक बांधिलकी जपणारे..
लेखक:- रामदास तळपे