१९७८ साली चासकमान धरणाचे भुमीपूजन झाले आणि १९९३ साली धरणाचे बांधकाम पुर्ण झाले.१९९४ साली प्रत्यक्ष धरणात पाणी आडवायला सुरूवात झाली.आणि बघता बघता बीबी गाव, कहू. कोयाळी, साकुर्डी आणि खेड तालुक्यातील प्रसिद्ध असलेली तांदळाची बाजारपेठ म्हणजेच वाडा गाव चासकमान धरणाच्या पाण्यात बघता बघता लुप्त झाले.
वाडा गाव संपुर्ण पाण्याखाली गेलेले पाहुन,वाडा गावात ज्यांच्या पिढयान पिढ्या गेल्या,जे लोक तेथे लहानाचे मोठे झाले.खेळले बागडले,शाळा शिकले,असे वाडा गावचे नागरिक,दैनंदिन व बाजाराच्या निमित्ताने सतत संपर्क असलेल्या पश्चिम भागातील लोकांची हृदये पिळवटून गेली.मनाला.प्रचंड वेदना झाल्या. लोक टाहो फोडून,धाय मोकलुन व हांबरडा फोडुन रडू लागले. त्याच्या वेदना अतिशय तीव्र होत्या.
वाडा गावच्या आठवणी काय वर्णाव्यात.कितीही आठवणी काढल्या तरी त्या कमीच असतील.वाडा ही खेड तालुक्यातील पश्चिम भागातील अत्यंत मोठी व श्रीमंत अशी बाजारपेठ होती.ही बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनअस्तित्वात होती.असे इतिहासात पुरावे आढळतात.
वाडा गावात आठरा पगड जातीचे लोक गुण्या गोविंदाने राहत होते. शिवाय सुतार, लोहार, सोनार ,कुंभार, चांभार, तेली, तांबोळी, साळी,कोळी,कोष्टी,वाणी,कुळवाडी,असे कितीतरी बलुतेदार,वाडा गावात राहत होते.शिवाय शिक्षक,अधिकारी व सरकारी कर्मचारी देखील या गावात रहात होते.
खेड तालुक्यातील आंबोली ,पाईट पासुनचा संपुर्ण भाग (भाम न्याहार) व भोरगीरी पासुनचा संपुर्ण भाग (भिमन्याहार) असा संपुर्ण पश्चिम भाग वाडा गावाला जोडलेला होता.
वाडा गावची धर्मरायाची यात्रा फार प्रसिद्ध होती ही यात्रा साधारण जानेवारी महिन्यात असायची..या यात्रेला जाण्यासाठी पश्चिम भागातील तरूण /तरूणी व लहान थोरांपर्यंत महिनाभर अधीपासुन तयारी चालायची.स्वच्छ कपडे घालुन व पिशवीत शाल,चादर घेऊन पश्चिम भागातुन लोंढेच्या लोंढे वाडा गावाकडे यात्रेला जाण्यासाठी मार्गस्थ व्हायचे.एस.टी.महामंडळाला खास यात्रे निमित्ताने यात्रा स्पेशल गाड्या सोडायला लागायच्या. शिवाय ट्रक मधुन प्रवासी वाहतुक व्हायची..
दिवसभर उंचच उंच पाळणे विविध खेळ, खेळण्यांची दुकाने,खाऊची दुकाने ,बैलगाडयांच्या शर्यती असायच्या.अनेक तालुके व जिल्ह्यातुन लोक बैलगाडे घेऊन यायचे.कै.बाजीराव मोरे यांचा बैलगाडा त्यावेळी फार प्रसिध्द होता.
रात्री नामांकित तमाशाचा कार्यक्रम असायचा तमाशामध्ये गण,गवळण,बतावणी,सवाल, जबाब,रंगबाजी त्यानंतर सामाजीक/धार्मिक वगनाट्य असायचे. पहाटे साडेपाच वाजता तमाशा संपायचा.खुप थंडी असायची.लोक शेकोट्या करून शेकायचे व उजाडायची वाट पहायचे.
दुस-या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरायचा. महाराष्ट्रातील अनेक मल्ल आखाड्याला उपस्थितीत रहायचे.चितपट कुस्त्या व्हायच्या.
वाड्याला दहावीची बोर्डाची परिक्षा असायची.पश्चिम भागातील सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा देण्यासाठी वाड्याला जावे लागायचे.त्या पैकी मी एक होतो.
तेव्हा गाडयांची सोय नव्हती.त्यामुळे परिक्षेच्या काळात अभ्यास व राहण्यासाठी चार-पाच जनांचा ग्रूप करून वाड्याला खोली भाड्याने घ्यायची.व तेथे राहायचे. परीक्षेचा अभ्यास करायचा.परिक्षेची तयारी करायची.दोन वेळचा डबा सकाळीच डेहणे आदिवासी संस्थेच्या दुधगाडीमथ्ये आईवडील पाठवुन द्यायचे.काही उत्साही विद्यार्थी स्टोव्ह,राँकेल सह तांदुळ पातेले आदी वस्तू घेऊन मसालेभात करायचे.
वाडा गावात कै. अंतु केदारी,भानुदास जैद,नथु माळी व सावंत यांच्या कडे मोठे ट्रक (लाँरी) होते. डाँ.कुलकर्णी यांचेकडे जिपगाडी होती.चार पाच राजदुत होत्या.त्याला लोक फटफटी म्हणायचे.
ट्रकांचा उपयोग प्रवासी व माल वाहुन नेणे.साखरपुडा/लग्न यासाठी होत असे. पश्चिम भागातील सर्व लग्नाचे बस्ते वाड्यालाच व्हायचे.अनेक महिला व पुरूष बस्त्याला यायचे.बस्ता झाल्यावर दुकानदार पाच दहा किलो बेसनाचे लाडू त्याच्या तर्फे द्यावचा.पश्चिम भागातील आंबोली व भोरगीरी पासुन बस्त्यासाठी व बाजार करण्यासाठी सुरूवातीला लोक पायीच यायचे. नंतर रस्ते झाले एस.टी.व ट्रकची सुवीधा आली.
वाड्याच्या बाजारासाठी लोक भल्या पहाटे पायी निघत. सकाळी नऊ वाजेपर्यंत वाडा गावात दाखल होत.
पूर्वी रस्ते नव्हते तेव्हा आंबोली पासून लोक दूध घेऊन पायी पायी वाड्याला दररोज येत असत. हे ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात.
वाडा गावात ब्राम्हणांचे मारवाड्यांचे मोठे मोठे वाडे व घरे होती.प्रत्येक वाड्यांमध्ये व घरांमध्ये *आड* होते.(आड म्हणजे अतिशय छोटी विहिर)
प्रत्येकाकडे दुधासाठी गायी होत्या.पंचक्रोशीतील लोकांकडुन ते गवताच्या पेंढ्या विकत घेत असत.
वाडा गावचा बाजार हा शनिवारीअसायचा.संपुर्ण बाजार माणसांच्या गर्दीने अगदी फुलुन जायचा.बाजार करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळायची.
वाडयात सर्व प्रकारचा माल खपायचा.शेतकरी तांदूळ, गहू, नाचणी,ज्वारी,बाजरी,भुईमुग शेंग,खुरासणी,कोंबडया आंडी,बकरे.मध,डिंक भाजीपाला तरकारी इत्यादी माल आणायचे.
वाडयातील तांदळाचा बाजार हा संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असा बाजार होता.खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सुपीक प्रदेशात जीर.रायभोग,खडक्या,कोलम,कमोद,तांबडा रायभोग अशा प्रकारच्या भाताच्या गावरान जाती प्रसिद्ध होत्या.या तांदळांना महाराष्ट्रात प्रचंड मागणी असायची.उभ्या महाराष्ट्रातुन व्पापारी तांदुळ खरेदीसाठी वाडा गावात येत असत.
पश्चिम भागातील त्या काळातील सर्वांचे लग्नाचे बस्ते हे वाडयातील कादरभाई व नवनीतशेठ यांचे दुकानात व्हायचे.लेंगा व नेहरू शर्ट किंवा पैरण ही दामु आण्णाने शिवलेली आहे.दामू अण्णा टेलर संपूर्ण भागात फेमस होते.
वाड्याला बाजाराला जाताना तिफणवाडीच्या पुढे गेले की उंचच उंच मेंदीची झाडे लागायची.पुढे खुप गर्दी असल्याने आम्ही मागेच उतरायचो.उतरून पुढे गेलो की लगेचच भुईमुगाच्या शेंगाचे उंचच उंच ढिग दिसायचे.तेथे व्यापारी शेतक-याकडून शेंगा विकत घ्यायचे.मोठमोठे तराजू,शेंगांची पोती,हमाल,मापाडी,व्यापारी,लोकांची खुप गर्दी असायची.पैशाची देवाण घेवाण चालायची. लोक शेंगा विकून आले पैसे घेऊन बाजाराच्या दिशेने चालायचे.
गर्दीतुन वाट काढत पुढे गेलो की वाकट, बोंबील. ढोमेली, खारामासा.(बांगडा) सुकट,शेतक-यांनी आणलेल्या कोंबड्या व आंडी यांचा बाजार भरलेला असायचा.तेथेही लोकांची फुल्ल गर्दी असायची. तेथे मोठा घमघमाट सुटायचा.व्यापारी कापडी तंबू ठोकून आपला माल विकायचे. माल घेताना लोकांची खूप गर्दी व्हायची.
तेथून पुढे गेल्यावर चौक होता.चौकाच्या डाव्या बाजुला पुढे चालत गेल्यावर प्रसिद्ध असा तांदळाचा बाजार भरायचा. महाराष्ट्रातुन अनेक व्यापारी शेतक-यांचा माल खरेदी करायचे. किरकोळ विक्रीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी व्हायची. विविध जातींचा तांदळांचा सुगंध नाकात शिरायचा.जीर व रायभोग आणि खडक्या या तांदळाना खूप मागणी असायची. हातोहात तांदूळ विकला जायचा. सगळीकडे नुसती धांदल असायची. तांदूळ विकल्यावर दहा,वीस,पन्नास व शंभराच्या नोटा मोजताना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील समाधान शब्धात करणे अवघड. लगेचच ट्रक मध्ये तांदळाची पोती भरायची हमालांची लगबग चालायची. एकच गलका चालू असायचा.
तांदळाच्या बाजाराच्या डाव्या बाजुला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या थोडे पुढे धर्मरायाचे मंदिर होते.ते गावचे ग्रामदेवत असुन त्या निमित्त मोठी यात्रा भरायची. ही यात्रा जवळजवळ आठ दिवस भरायची.
यात्रेला नामाकित तमाशाच्या बा-या ,कै.दत्ता महाडिक. चंद्रकांत ढवळपुरीकर,काळूबाळू,विठाबाई, तुकाराम खेडकर, मंगला बनसोडे,शंकरराव कोकाटे इत्यादी तमाशे असत. कुस्त्यांचा जंगी आखाडा होत असे.
मंदिराच्या समोरच पुर्वेला रस्त्याच्या पलीकडे प्राथमिक आरोग्य केद्र होते. तेव्हा पश्चिम भागातील स्रियांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया याच ठिकाणी होत असे. "तांबी बसवा पाळणा लांबवा ", छोटे कुटुंब सुखी कुटुंब,असे भिंतीवर गेरूने लिहिलेले असायचे.
दवाखान्या समोरच घिसाड्यांची दोन तीन दुकाने होती.तेथे विळे,कोयते.शेतीची लोखंडी औजारे बनवणे व दुरूस्तीची कामे चालत. खटार गाडीच्या चाकाच्या धावा व कुण्या बनवल्या जात असत.तेथेही शेतकऱ्याची नेहमीच वर्दळ असे.
त्या शेजारीच लाकडाची वखार होती..बाभळीचे व इतर लाकडांचे ओंडके तेथे पडलेले असत. लोक सरपनासाठी किलो वर लाकडे घेऊन जात असत.
वखारी पासून परत मागे चौकात आल्यावर व पुढे राजगुरूनगर कडे जाणा-या रस्त्याने पुढे गेल्यावर डाव्या बाजुला श्री.बाळासाहेब शेटे यांची पिठाची चक्की होती. त्याच्याच थोडे पुढे गेल्यावर दगडाबाईचे प्रसिद्ध इस्रीचे दुकान होते. तेथे तीन चार जण सतत कपड्यांना इस्त्री करत असत. दगडाबाईच्या शेजारी दोन तीन किराणा मालाची दुकाने होती. त्या शेजारी सावंत यांचे हाँटेल होते.त्याच्या शेजारी बांगड्यांचे दुकान होते. त्या लगतच उसाचे गु-हाळ होते. गुऱ्हाळा शेजारी बाळासाहेब उबाळे यांचे सायकलचे दुकान होते. त्या शेजारी मोठे मैदान ( मोकळी जागा ) होती.येथेच यात्रेला तमाशे व नाटकांचे कार्यक्रम होत असत. तेथे मी कथा अकलेच्या कांद्याची हे नाटक व विविध तमाशे पाहिले आहेत.
पुढे गेल्यावर एक मंदिर होते.व रस्ता पुढे राजगुरूनगर कडे जायचा. छोट्या पुलावरून एसटी माळ्याच्या पडाळीवर थांबायाची. पुढचा स्टॉप बीबीगाव असायचा. बीबी गावातून जाताना रस्त्याच्या दुतर्फा दुमजली इमारती होत्या. मधून रस्ता होता.
वाडा गावाच्या स्टँड कडून परत मागे (भोरगीरीकडे) फिरल्यावर रस्त्याच्या बाजूलाच कै.अंतुशेठ केदारी यांची प्रसिध्द अशी भव्य पत्र्याचे छप्पर असलेली राईस मिल व तेलाची मिल होती.तेथे पश्चिम भागातील सर्व भात भरडले जात असत. तेथून जाताना सुवासिक तांदळाचा घमघमाट सुटायचा.
तेथेच त्यांची शेंगदाणे ,खुरासणी,सुर्यफुल यांची तेल गिरणी होती.या ठिकाणी प्रचंड गर्दी व्हायची.भात भरडण्यासाठी व तेलाचे घाणे काढण्यासाठी पहाटे पासुन नंबर लागायचे.लोक भाताची पोती खटारगाडीत किंवा ट्रकमध्ये भरून भात भरडण्यासाठी साठी मुक्कामाच्या तयारीने यायचे.
कै.अंतुशेठ हे कायम खाकी हापचड्डी व बाँडी (दोन्ही बाजुला खिसे असणारा बनियन) घालायचे.ते खुप वर्षे वाडा गावचे सरपंच होते.व जिल्हा परिषद सदस्य देखील होते.
पुढे एस.टी.स्टँड होता.तेथे एसटी थांबायच्या.स्टँडच्या मागुन कुडे,घोटवडी मार्गे जाणारा रस्ता होता.काही एसटी तिकडुन तर काही भोरगीरी मार्गे जायच्या.
एसटी सटँडवर असलेली गुरखा समाजातील म्हतारी ब-याच जणांना आठवत असेल.
शनिवारी बाजाराच्या दिवशी एसटी महामंडळाने स्पेशल एसटी ची सोय केलेली असायची.लोक त्याला बाजार पेशल म्हणायचे. एसटी स्टँडच्या जवळच "ममता क्लिनिक" हा डाँ.कुलकर्णी यांचा दवाखाना होता.तेथेही आजारी लोकांची खुप गर्दी असायची.बाहेर डॉक्टरांची जीप उभी असायची.
डॉ.कुलकर्णी दवाखान्याच्या शेजारीच श्री.रावळ यांचे हाँटेल होते. त्याच्या शेजारी दोन - चार किराणा मालाची दुकाणे होती. त्या शेजारी वाडा ग्रामपंचायतची सुंदरअशी दुमजली इमारत होती.इमारतीच्या समोर पंडित नेहरू यांचा पुतळा होता.व मोठे पिंपळाचे झाड होते. हा परिसर नेहरू चौक या नावाने प्रसिद्ध होता.
ग्रामपंचायतीच्या लगतच पावडे यांचे भव्य हाँटेल होते.त्यापुढे दक्षिणेकडे मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता होता.त्या रस्त्याने जाताना बापू केदारी यांचे मोठे स्टेशनरी दुकान होते.चौकातच डाँक्टर काजळे यांचा दवाखाना होता.शेजारीच कहाणे टेलर्स यांची दोन तीन दुकाने होती.लगतच शशी कहाणे यांचे वडापावचे हॉटेल होते.शेजारीच चार पाच किराणा दुकाने होती.पुढे एक चौक होता.
चौकातून पुर्वेला जो रस्ता जायचा तो मराठी शाळेकडे जायचा.मराठी शाळेच्या पाठीमागे गुप्ता कुल्फी प्रसिद्ध होती.त्याच्या जवळच प्रसिद्ध बेकरी होती.त्याकाळात पाव व बटर डेहणे,बीबी,आंबोली,पाईट व वाडा येथील हाँटेलांना पुरवले जायचे.
मराठी शाळेजवळ परत एक चौक होता.चौकाच्या उत्तरेला एसटी.स्टँडकडे जाणारा रस्ता होता.
चौकातुन पुर्वेकडुन दक्षिणेकडे जो रस्ता जायचा तो दुध शितकरण केंद्र (चिलींग सेंटर) कडे जायचा. तेथेच दुधाची डेअरी सुद्धा होती.
चौकाच्या पश्चिमेस मुंडे डोकोरेटर्स यांचे लाईट,लाउड स्पिकर व मंडप यांचे दुकान होते.
आता आपण परत बाजारपेठेच्या मुख्य चौकात आल्यावर पश्चिमेकडे एकरस्ता जायचा तो रस्ता माजगावकडे जात होता.त्या रस्त्यावर खताचे दुकान,हसन सायकल मार्ट,कै. नाईक यांचे घड्याळ दुरूस्तीचे दुकान व कुंभार आळी होती.
पुढे रस्ता माजगावकडे जायचा.तेथेच पुलाच्या आलीकडे नदीला लागुन शंकराचे पुरातन दगडाचे मंदिर आहे आजही पाणी कमी झाल्यावर आपल्याला ते दिसते.
मुख्य रस्त्याच्या दक्षिणेकडे जो रस्ता जायचा त्या रस्त्याच्या डाव्या बाजुला एक हाँटेल होते. शेजारीच जवळेकर सराफ,डाँक्टर दिक्षित यांचा दवाखाना,फोटो स्टुडिओ,शिंप्यांची कपडे शिलाईची चार-पाच दुकाने होती. त्यात दामु आण्णा फेमस होते.
त्या शेजारीच नवनीत यांचे प्रसिद्ध कपड्यांचे दुकान होते.
पुढे गेल्यावर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होती. त्या शेजारी पोष्टऑफिस होते.पोष्ट आँफिसपासुन एकरस्ता गावात लोकवस्ती (R Zone) कडे जाणारा होता. तेथेच डाँ.काजळे यांचे वसतीगृह ( बोर्डींग) होते. ह्याच रस्त्याने पुढे पुर्वेकडे गेल्यावर प्रसिद्ध अशी शांताबाईची दोनमजली इमारत असलेली बोर्डींग होती.(बोर्डिंंगच्या आठवणी अजुही कित्येकांच्या स्मरणात असतील)
शांताबाईच्या बोर्डिंंगच्या पुढे रयत शिक्षण संस्थेचे बारावी पर्यत असलेले हायस्कुल होते.हायस्कुलच्या पुढे गेल्यावर बैलगाडा घाट होता. तेथे प्रसिद्ध अशा बैलगाड्याच्या शर्यती होत असत. खेड,आंबेगाव,हवेली व मावळ वरुन बैलगाडे आणले जात असत. शर्यती पाहायला तोबा गर्दी होत असे. सगळीकडे एकच कोलाहल होई.
पुढे नदी लागायची. थोड पुढे गेल्यावर आरळा व भिमा या दोन नद्यांचा संगम होतो. गावकरी दर वर्षी पावसाळ्यात नदीला पुरं आल्यावर नदीची यथासांग पूजा करुन नदीला साडीचोळी अर्पण करत असत.
हायस्कुल पासुन इशान्येला एक रस्ता जायचा तो दुध शितकरण केंद्र (चिलिंग सेंटर ) कडे जायचा. त्याच्या आलीकडेच जनावरांचा दवाखाना होता.तेथे जरशी गाया,म्हशी यांच्यावर उपचार केले जात.
बाजारपेठेतुन जाणारा जो मुख्य रस्ता होता त्याच्या दुसऱ्या बाजुला शनीमंदीर,महाराष्ट्र बँक.पोलीस चौकी,कादरभाई यांचे भव्य कपडयांचे दुमजली दुकान प्रसिद्ध होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक सधन अशा पेठा होत्या त्या पैकी वाडा, कडुस, खेड, पाबळ. आंबेगाव, शिरूर,तळेगाव,मलठण इत्यादी गावांची नावे घेता येतील.
चासकमान धरणात वाडा व डिंभे धरणामध्ये आंबेगांव या दोनही पेठा लुप्त झाल्या.
चासकमान धरणाचे १९७८ साली मा.पाटबंधारे मंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब यांनी भुमीपुजन केले. १९९३ साली धरणाचे काम पुर्ण झाले.१९९४ पासुन पाणी आडवायला सुरूवात झाली.
वाडा गावचे अनेक लोक विस्थापित झाले.तत्पुर्वी शासनाने विवीध ठिकाणी त्यांचे पुनर्वसन केले.
तत्कालीन पंचायत समिती सभापती श्री. बाळासाहेब शेटे व आमदार कै.नारायणराव पवार यांचे अखंड प्रयत्नातुन जुन्या वाड्यापासून तीन कि.मी,उत्तरेला माळावर नविन वाडा गाव पुनर्वसीत केले.याचे संपुर्ण श्रेय हे बाळासाहेब शेटे यांचेकडे जाते.
१९९४ साली मा.ना.शरदरावजी पवार साहेब तत्कालीन मुख्यमंत्री यांचे शुभहस्ते नविन पुनर्वावसीत वाडा गावचे उद्घाटन केले. त्यावेळी मा.ना.मधुकरराव पिचड,आदिवासी विकास मंत्री, मा.ना.पुष्पाताई हिरे, कै.नारायणराव पवार आमदार कै.बाळासाहेब शेटे सभापती हे उपस्थित होते.
वाडागाव ज्या वेळी विस्तपित झाले तेव्हा अनेक घरे,वाडे पाडण्यात आले. तेव्हा जमिनीत,भिंतीत सोने सापडले असे बोलले जाते. काय खरे हे त्यानाच माहीत.
वाडा गावात भरेकरी यांच्या भात खाचराच्या बांधणी खूप प्रसिध्द होत्या. त्या मध्ये खूप भात पिकायचे. अंतुशेठ,सुदाम पवार,बाळासाहेब शेटे,मोरे,पावडे भरेकरी असे अनेक पुढारी, सामाजिक कार्यकर्ते होते.
गाव एकोप्याने नांदत होता.सन उत्सव मोठ्या आनंदात व उत्सहात पार पडत होते.
वाडागावाच्या प्रत्येक राजकीय,सामाजिक कार्यात खालील मान्यवरांचे खूप योगदान होते.
देविचन्द प्रभाकर
शांतीलाल शहा
रेवा शंकर रावळ
महादेव शेटे
हुंडारे पाटील
कृष्णा वाडेकर - सरपंच
दीनबंधू शेटे - सामाजिक
सखाराम माळी - हे कारभारी होते.
हे सर्वजण तेव्हा गावगाडा हाकायचे.
कै.सुदामराव पवार हे सुद्धा त्या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते. त्याचप्रमाणे ते सामाजिक कार्य शुद्ध करायचे. ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.
कृष्णा वाडेकर हे सरपंच असताना सन 1959 साली वाडा येथे रयत शिक्षण संस्थेचे हायस्कूलची स्थापना झाली.
शांतीलाल शहा यांनी गावागावात दूध डेअ-या काढल्या. वाडा ग्रूप डेअरीची स्थापना केली.माजगावकडे जाणारा पूल हा वाडा ग्रुप डेअरीच्या खर्चाने बांधला होता.
कै.माणिक नाईक (गवंडी) यांचे वाडा गावासाठी खूपच योगदान राहिले आहे हे नाकारून चालणार नाही. माणिकरावानी भीमा नदीवरील माजगावकडे जाणारा पूल बांधला. मराठी शाळा व हायस्कूल हे सुध्दा माणिकराव यांनी बांधले होते. शिवाय ग्रामपंचायतच्या समोर जो पंडित नेहरूंचा पुतळा होता तो माणिकरावानी घडवला होता.त्यांनी टोकावडे व धुवोली येथील इंग्रजांच्या काळातील पोलीसचौक्या व कच्चे कैदी ठेवन्यासाठी कोठड्या बांधल्या होत्या. किती जबत्दस्त प्रतिभाशक्ती माणिकराव गवंडी यांच्याकडे होती हे यावरून दिसून येते. त्यांचे योगदान वाडागावासाठी व भागासाठी मोठे होते हे नाकारून चालणार नाही.
अनंत गुणाजी केदारी हे अनेक वर्ष वाडा गावचे सरपंच होते. शिवाय ते जिल्हा परिषद सदस्य देखील होते.अनंत केदारी यांनी अनेक होतकरू मुलांना शैक्षणिक मदत केली. फी भरल्या.गरिबांना उधारीवर किराणा माल द्यायचे. व पीक निघाल्यावर धान्य घ्यायचे.
जुन्या मराठी शाळेच्या पाठीमागे जुनी तालीम होती. ही तालीम प्रकाश मंगेश पटवा यांनी भराभराटीला आणली. अनेक मल्ल तयार केले.
शंकर शिम्पी,अप्पा ठुसे व दत्तात्रय कुलकर्णी यांच्याकडे घोडे होते. दसऱ्याला भर पेठेतून हे घोडे पळवले जात असत. हे पाहायला खूप गर्दी होत असे.
शांताराम केदारी,शांताराम शिंदे गुरुजी,खंडेराव वागलाने,पापाशेठ,अनंत केदारी,भिमाजी सावंत,धोंडीभाऊ शेलार,दत्तात्रय कुलकर्णी,जितेंद्र शहा,सुनील केदारी,तांबोळी सर,दीपक कहाने,राम केदारी (संभाजी) डॉ. वसंत काजळे व अहमद तांबोळी असे एकाचढ एक गुणी कलाकार होते. त्यांनी नाट्यकला जिवंत ठेवली.त्यावेळी अनेक नाटके बसवली गेली.
वाडा हौशी कलावंत,सुरंगी व रंगलो रंभेच्या रंगमहाली ही नाटके फार प्रसिद्ध झाली.
असा हा सर्वगुण संपन्न गाव अठरा पगड जाती असूनही गुण्या गोविंदाने राहणारा गाव काळाच्या उदरात गडप झाला.
अजूनही कधी गावी जातो तेव्हा धरणात बुडालेले वाडा गाव किंवा पाणी सोडल्यावर उघडी मंदिरे पाहताना वाडा गावाच्या आठवणी जग्रुत होतात व एखाद्या चित्रपटाप्रमाणे मनचक्षु पुढून सर्रकन पुढे जातात. असावे ओली होतात.आणि त्याचे गरम थेंब खाली ओघल तात. आणि नकळत हात जोडून छातीवर येतात
रामदास तळपे
हेच ते चास कमान धरण ज्यामध्ये वाडा गाव धरणाच्या जलसाठ्यात बुडाले.