शंकर दादा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शंकर दादा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शंकर दादा

गावी यात्रेच्या हंगामात कुस्त्यांचे जंगी आखाडे पहाण्यासाठी गावोगावी जाणे ही वेगळीच मजा असायची. जवळपासच्या गावांच्या आखाड्याला गावातील पंधरावीस जण हमखास असायचे.परंतू खुप दुरच्या गावचा आखाडा असेल तर जाणे टाळत.

एकदा असाच निवांत बसलो असताना माझ्या आत्याचा मुलगा शंकरदादा वनघरे (डेहणे )आला. आणि मला म्हणाला.

उद्या माझ्याबरोबर घोटवडी गावच्या कुस्त्यांच्या आखाड्याला येशील कामी म्हणालो. तसेही मला काही काम नाही आणि मी घोटवडी गाव पाहिले नाही. निदान गाव तरी पहाता येईल.जाऊ आपण.

आजुन कुणी येणार असेल तर बघ.मी त्याला म्हणालो.

शंकरदादा हा १९८५ ते १९९३ या काळात पश्चिम भागात एक नामांकित पहिलवान होता.भागात त्याचा दरारा होता.पानाला चुना लावायच्या आत तो समोरच्या पहिलवानाला आस्मानातील चांदण्या मोजायला लावायचा.असा त्याचा खेळ होता.

दुसऱ्या दिवशी दुपारी १२.३० वा.आम्ही दोघे पायवाटेने,रानामाळातुन पायवाटेने दरमजल करीत घोटवडीच्या दिशेने निघालो.पायवाटेने जात असताना वाटेच्या अगदी कडेला घर असलेल्या श्री.काळुराम भवारी यांचे दारातील मांडवात विश्रांतीसाठी थांबलो व बाहेरूनच पाणी मागीतले.श्री.भवारी यांच्या पत्नीचे माहेर आमच्या गावचे होते. सासुरवाशीनीला माहेरचे कुणीही भेटले तरी किती आनंद होतो हे सांगावयास नलगे.त्यांनी पाणी दिल्यावर आम्हा दोघांनाही जेवण्याचा आग्रह केला.आम्हाला दोघांनाही तशी खुपच भुक लागली होती.कारण आम्ही दोघेही जेवण न करताच निघालो होतो.चट आखाड्याला भात खाता येईल हा विचार केलेला.

प्रथम आम्ही नको नकोच म्हणालो.परंतु मनातुन जेवायची इच्छा होतीच. 

अरे जेवा थोडंथोडं? मटन आहे.

मटन म्हटल्यावर आम्ही बसलोच जेवायला.

पोटभर जेवल्यावर आमचा घोटवडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.उन्हातान्हातुन,डोंगरवाटेने कपाळावरचा घाम पुसत आम्ही चाललो होतो.उन मी म्हणत होतं,पायवाटेने अनेक लोक आखाडा पाहण्यासाठी चालले होते.ओळखीच्या लोकांबरोबर आम्ही गप्पा मारत एकदाचे घोटवडी गावात पोहचलो.

तेथे मंदिराच्या बाजुला भारूडाचा कार्यक्रम चालू होता. लोक भर उन्हात बसुन भारूडाचे वगनाट्य बघत होते.

काहीजण बर्फाच्या गारेगारी खात होते.स्रीया पाव्हण्यारावळ्या स्रीयांना कासाराकडुन बांगड्या भरून घेत होत्या. रेवड्या, शेंगोळी,खेळणी घेत होत्या.

थोड्याच वेळात भारूडाचा कार्यक्रम संपला.माईकवार अनाउंसमेंट झाली.सर्व यात्रेकरूंनी आखाड्याच्या जेवणासाठी बसुन घ्यायचे आहे.

अनाउंसमेंट झाल्याबरोबर आखाड्याला आलेले लोक तिकडे धावले.झाडाखाली विसाव्याला बसलेले,लोक झाडाखाली झोपलेल्या लोकांना उठवू लागले.लोकांचा लोंढा आखाड्याच्या जेवणाकडे चालू लागला.

भात खाचरांत,मोठमोठया ढेकळांतून लोकांच्या पंक्ती बसल्या.वडाच्या पानांचा पत्रावळीसारखा आकार करून लोक भात येण्याची वाट पाहू लागले.शेवटी एकदाच्या भाताच्या व आमटीच्या बादल्या घेऊन वाढपे लोक पंक्तीमधुन वाढू लागले.श्लोक झाल्यावर लोक आमटी भातात कालवुन खाऊ लागले.वर उन्हाचा कडाक्यात खाली तिखट आमटीचा ठसका व जीर तांदळाच्या भातावर लोक तुटून पडले.चारचारदा वाढपे बादल्या घेऊन वाढत होते.हाश्यहुश्य करत लोक जेवत होते.

च्यायला ! इथे एखादेतरी झाड असते तर झाडाच्या सावलीखाली निवांत जेवता आले असते असे विचार अनेकांच्या मनात तरळून जात होते.

शेवटी एकदाचे आम्ही जेवन करून आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो.

काही पोरांनी झाडाखाली पत्यांचा डाव मांडला.पोरं तीन पत्ती खेळू लागली.काहीजण गलीवर चिल्लर नाणी फेकून खेळू लागली.तर काहीजण वामकुक्षीसाठी सावलीला लवंडले.

तासाभरानंतर सनई,चौघडे वाजू लागले.

अरे उठा... जागे व्हा...

आखाडा निघाला. झोपलेल्यांना जागी करत लोक बोलू लागले. तीनपत्ती,गलीवरचे चिल्लर खेळ बंद करून लोक आखाड्याच्या दिशेने चालू लागले.

कुस्त्यांची दंगल

आखाडा सुरू झाला.सुरूवातीला लहान मुलांच्या कुस्त्या चालू झाल्या.आखाड्यात रेवड्या उधळल्या गेल्या.पोर शर्ट काढुन आखाड्यात एकमेकांना भिडू लागली.तार काही पोरं नुसतीच रेवड्या गोळा करू लागली.एकाच वेळी लहान पोरांच्या पंधरा वीस कुस्त्या सुरू झाल्या.एकच गलका झाला.नुसताच धुराळा...

सुरूवातीला दहा रूपयापासुन कुस्त्या चालू झाल्या.हळुहळू आखाड्याला रंग चढू लागला.पंचांच्या निर्णयावरून वाद झडू लागले.

शेवटी एकदा एका नामांकित मल्लावर म्हैस बक्षिस असलेली कुस्ती जाहिर झाली.कसलेला पहिलवान बघुन अनेकांनी आंदाज घेतला.व आपल्या आवाक्यात नाही हे ओळखुन अनेक जण जागीच थिजले.

इतकावेळ शंकरदादाही अंदाज करीत होता.समोर धरलेल्या पहिलवानापुढे शंकरदादा खुपच खुजा वाटत होता.आणि अचानक शंकरदादा उठला व समोर धरलेल्या पहिलवानापुढे जाऊन म्हणाला मी खेळतो याच्याबरोबर..

कुस्ती लावनारे श्री.मारूती धंद्रे बोलले.अरे तुझा याच्या बरोबर जोड आहे काय? मरायचय का तुला? समोरचा पहिलवान केवढा तु केवढा? तुझा पाडाव लागनार नाही! चल जागेवर जाऊन बस ?

हे ऐकून मलाही बरं वाटलं.खरंच शंकरदादा त्या पहिलवानापुढे अगदी खुजा व तब्येतीने खुपच बारीक होता.

शंकरदादा परत माघारी फिरला.तेवढ्यात खाली बसलेले पब्लीकमध्ये असणारा एकजण ओरडला.

होऊद्या या दोघांची कुस्ती तुम्हाला काय अडचण आहे?तो खेळायला तायार आहे ना ? नाहीतरी दुसरा कुनीच पहिलवान तायार नाहीय.

खाली बसलेला समाज ही कुस्ती झालीच पाहीजे म्हणून एकच गलका केला.

आणि शंकर दादाची कुस्ती लागली 

शेवटी गावकरी व धंद्रेसाहेबांची चर्चा झाली व एकदाची कुस्ती लागली.

शंकरदादाला मी खुपच दुषणं देऊ लागलो. तुला अकलेचा भाग आहे का? मरायचय का तुला त्याच्यासमोर? असे मी त्याला बोलू लागलो.

तो एवढचं बोलायचा गप तुला काय कळतयं ? पडलो तर पडलो.

दोनही पहिलवानांनी काच्या केला.आपापल्या देवाला नमस्कार केला.व दोघेही मैदानात उतरले.

जय बजरंग बली अशी गर्जना करीत‚ एका पायावर नाचत‚ जांग कसलेला समोरचा पैलवान मैदानभर फिरला. त्याची तयारी दाबजोर होती.दुसऱ्या बाजूनं शंकरदादाही ‘बजरंग बली कीऽ जय.’ असं गर्जत एका पायावर नाचत मैदानात उतरला. कळकाच्या दांड्यासमोर तुरकाठी दिसावी तसा शंकरदादा त्या पहिलवानापुढे किरकोळ दिसू लागला.अनेक जण हळहळले. हा हा म्हणता हा पहिलवान शंकरदादाला पाडणार हे सगळ्या लोकांना उघड दिसत होतं.

दोन पहिलवानांची खडाखडी 

पाच-दहा मिनिटं झाली. दोन्ही पैलवानांची मैदानात खडाखडी चालली होती. समोरच्या पहिलवानाने शंकरदादाला पटात घेतलं. कौशल्यानं शंकरदादानं पट फोडला.‘हे रे माज्या भाद्दरा!’ धंद्रे साहेब ओरडले.आपण कुस्त्या लावायला उभे आहोत हेच ते विसरले होते. शंकरदादा मैदानात एवढा वेळ कधीच कुचमला नव्हता. दमछाकीला तो टिकणं शक्यच नव्हतं. शंकरदादानं त्वरेने काही केलं तरच जमणार होतं. 

शंकरदादा सावध झाला. गळ्यात हात चढवायला चालून येणारा समोरचा मल्ल बघून‚ नाकात माती शिरल्याच्या आविर्भावानं चिमटी लावून त्यानं नाक शिंकरलं. 

तो ओला हात ढालीसारखा तसाच पुढं धरला. त्याच्या घाणेरड्या ओल्या हाताचा स्पर्श होणार म्हणून बिचकलेला पहिलवान आठ्या घालीत एक पाऊल मागं हटला.थोडावेळ त्याचं चित्त चलबिचल झालं. 

तेवढ्यात शंकरदादानं चपळाई करून त्याच्या दोन्ही पायांना आपल्या पायांची गोफणीमिठी घातली.आणि दार ढकलावं तसं त्याला नुसतं मागं ढकललं. पायाला आढा बसलेला धिप्पाड रपहिलवान ‘आकडीच्या’ डावावर हां हां म्हणता सरळ मैदानात उताणा झाला.

शंकरदादानं त्याला दिवसा चांदण्या मोजायला लावल्या. ‘बजरंग बली कीऽ जय!’ फटाकड्यासारखी उसळी घेत शंकरदादा मैदानभर बेहोश होऊन नाचू लागला.

म्हशी वरची कुस्ती जिंकली बक्षिसांची खैरात 

रोख बक्षिसांची तर नुसती खैरात झाली.

म्हशीवर कुस्ती जिंकली असल्यामुळे एका गावक-याने आम्हाला गोठ्यात बांधलेली म्हैस सोडून आमच्या हवाली केली.

अरेरे... काय ह्या म्हशीची अवस्था  

म्हशीला बघुन आम्ही टरकलोच.म्हशीचा अगदी सांगाडा दिसत होता.म्हैस घरी न्यावी की नाही याबाबत आमच्यात चलबीचल झाली. परंतू ही बक्षीस मिळालेली म्हैस आहे.न्यावीच लागेल असा विचार करून आम्ही दोघे म्हशीला घेऊन परत आल्या वाटेने घरी चालू लागलो.

डेहणे गावच्या हद्दीत सातक्यात (रानाचे नांव ) आल्यावर म्हैस जे बसली ती उठेचना. खुप प्रयत्न करूनही म्हैस काही उठेना.आम्ही मग तसेच घरी आलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही वाळलेल्या गवताच्या पेंढ्या व पाणी घेऊन गेलो.तर तेथे म्हैस बसलेलीच.गेल्यावर म्हशीला गवत टाकले.पाणी पाजले..म्हशीने आम्ही नेलेले सर्व गवत खाल्ले.परंतु म्हैस काही उठली नाही.आज उठेल उद्या उठेल असे करता करता आठ दिवस झाले तरीही म्हैस काही उठली नाही.

शेवटी आम्ही सात आठ लोकांना घेऊन गेलो.लाकडाची दंडाळी घालून म्हशीला उठवले.सुरूवातीला म्हैस पायच धरेना..आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिला..

सल्ला फायद्यात पडला 

कुणीतरी सल्ला दिला. म्हशीला काही दिवस पेंड,सुग्रास चालू करा.आपोआप तिच्यात उठायचे बळ येईल.असा सल्ला देऊन लोक घरी आले.

शंकरदादा दररोज म्हशीला पेंड,सुग्रास.गवत देत होता.पाणी पाजत होता.आणि अश्चर्याची गोष्ट तीन दिवसात म्हैस ऊभी राहीली.शंकरदादाला तो पहिलवान पाडल्यापेक्षा जास्त आनंद झाला.

अजुन चार दिवसांनी म्हैस स्वतःहून चालत घरी आली. हीच म्हैस पुढे अनेक वर्ष शंकरदादाकडे होती. म्हशीने दूध देऊन शंकरदादाची पुढे सेवा केली.

<center><a href="http://marathibloglist.blogspot.in/" target="_blank"><img src="https://i.ibb.co/N3wkPrP/120-8abc.png" alt="120-8abc" border="0" /></a></center>

रामदास तळपे





शंकर दादा



शंकर वनघरे  हा माझ्या आत्याचा मुलगा. माझ्यापेक्षा जवळजवळ दहा वर्षांनी मोठा.परंतु लहानपणापासून मोठा वात्रट होता.आई-वडिलांचा एकुलता एक असल्यामुळे अति लाडामुळे तो शाळा शिकला नाही.

लहानपणी तो शिकायला आमच्याकडे होता.एकदा अचानक तो गायब झाला.त्याला सगळीकडे शोधून पाहिले परंतु तो काही सापडला नाही.तेव्हा सहज आडात पडला की काय बघायला लोकांनी जेव्हा आडात शोध घेतला तेव्हा तो आडात अगदी तळाशी बसून होता.आडात अगदी कमी पाणी होते म्हणून नशीब.त्याला लोकांनी आडातून बाहेर काढले.आणि उगाच नसती आफत नको म्हणून माझ्या वडिलांनी त्याची रवानगी त्याच्या गावी केली.

एकदा त्याने सातवीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळी मराठीचे पेपर मध्ये प्रश्नाचे उत्तर म्हणून त्यावेळी फेमस झालेली गाणे जवा नवीन पोपट हा हे लिहिले होते आणि नापास झालो होता.त्याने त्याच्या सातवी नापासच्या दाखल्यावर नापासच्या पुढील ना ब्लेडने खोडून पास असे भासवले होते.

आठवीत सतत तीनदा नापास झाल्यावर त्याला आमच्या वडिलांनी म्हशी घेऊन दिल्या होत्या.रोज नदीकाठी म्हशी चारायला न्यायाच्या.म्हशीबरोबर नदीत डुंबायचे.दुध पिऊन व्यायाम करायचा.असा शंकर दादाचा नित्यक्रम झाला होता.

शंकर दादा रोज रात्री लोकांच्या शेतातील कोवळी मक्याचे ताटवे उपटून आपल्या म्हशीना आणायचा.त्यासाठी रोज तो वेगवेगळ्या शेतात जायचा.मला त्याला रात्री अपरात्री सोबत जावे लागायचे.

आमच्या मामाने म्हणजेच त्याच्या वडिलांनी पूर्वी पैलवानकी  केली असल्यामुळे शंकरदादा भागातील एक नामांकित पैलवान व्हावा असे त्यांना वाटत होते.आणि लवकरच त्यांचे स्वप्न शंकरदादाने पूर्ण केले.शंकरदादा भागातील एक नामांकित पैलवान झाला.भागातील यात्रा मधून तो अनेक कुस्त्या निकाली करायचा.दोन मिनिटात समोरचा पैलवान चितपट व्हायचा.असे अनेक डाव शंकर दादाकडे होते.

शंकर दादा पहाटे व्यायाम करायचा.त्यामुळे नाईलाजाने मला देखील पहाटे उठावे लागे व इच्छा नसताना देखील  त्याच्याबरोबर जोर बैठका काढाव्या लागत.

मी लहान असताना एकदा त्याच्याबरोबर म्हशीकडे कडे गेलो होतो. नदीच्या कडेला असलेल्या निवडुंगाला लालसर फळे आले होती. ती लालसर फळे शंकर दादांनी तोडली व त्यातील मला एक दिले.आम्ही दोघांनीही ती फळे खाल्ली. परंतु त्या फळाचे काटे माझ्या संपूर्ण जिभेला टोचले. व मी रडू लागलो. शंकर दादांनी मग माझ्या जिभेवरचे सर्व काटे हळूहळू काढून टाकले. परंतु त्या फळाची उग्र दर्प असलेली गोडसर चव अजूनही माझ्या मनात आहे.

शंकरदादाला पत्ते खेळण्याचा मोठा नाद होता.त्यासाठी तो कधीकधी माझ्याकडे पैसे मागायचा.मी काय बधत नाही असे त्याच्या लक्षात आल्यावर तो दहा रुपये दे संध्याकाळी वीस रुपये देतो असे आमिष दाखवायचा.शेवटी मला पैसे द्यावे लागायचे.पत्यात पैसे जिंकले की मला तो वीस रुपये द्यायचा. परंतु कधीकधी माझ्याकडले आहेत तेही पैसे जायचे.मग मात्र मी सावध व्हायचो. व शक्यतो त्याला पैसे द्यायला टाळायचो.

सन 1992-93 ला मी दहावीला असताना इतिहास व भूगोलचे सर आम्हाला खूपच गृहपाठ देत असत. गृहपाठ लिहून न आणल्यास अगदी वीस वीस छढ्या देत असत.माझ्या दृष्टीने इतिहास व भूगोल हे अतिशय सोपे विषय असल्याने मी दुसरे विषयांना अभ्यासासाठी प्राधान्य देत असे. माझी इतिहास व भूगोलचे गृहपाठ लिहून देण्यासाठी शंकर दादा धावून येत असे. त्याचे अक्षर सुंदर होते. परंतु त्याला डोके कमी होते. मी त्याला गाईडवर  खुणा केलेली प्रश्न व त्याचे उत्तरे वहीवर लिहायला सांगायचो. तो मन लावून सगळे गृहपाठ पूर्ण करायचा. त्या बदल्यात मी त्याला पत्ते खेळण्यासाठी दहा रुपये द्यायचो.

एकदा तो बटाटयांच्या काढणीसाठी सातगाव पठारला गेला होता.सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत तो बटाटे काढायचा.त्यावेळी त्याला चाळीस रुपये रोज मिळायचा.वीस पंचवीस दिवस काम करून शंकर दादा घरी आला.

त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही आंघोळीसाठी नदीवर चाललो असता वाटेत एक कातकरी भेटला. त्याच्याबरोबर अजून एक कातकरी होता.तो शंकर दादाला बोलला.दादा हा कातकरी आमच्याकडे पाहुणा आला आहे. त्याला कोकणात जायचं आहे.त्याच्या घरी मॅटर झाला आहे.त्याला पैशाची अत्यंत गरज आहे.त्यामुळे तो त्याच्याकडली चैन विकणार आहे. दोन तोळ्याची चैन आहे.पाच हजार रुपये म्हणतोय तो. बघ घ्यायची आहे का तुला? कातकऱ्यांनी त्याच्या हातात चैन दिली.शंकर दादाजी चल बी चल सुरू झाली. शंकर दादा बोलला घेतले असते रे चैन, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत कातकरी बोलला किती आहे तुझ्याकडे?

नऊशे रुपये आहेत शंकर दादा बोलला.

पाहूणा कातकरी बोलला. दोन हजार रुपये दे आणि चेन घेऊन टाक.त्याचवेळी माझ्या मनात शंका आली. ही चैन एक तर चोरीची असली पाहिजे. नाहीतर डुप्लिकेट.

मी शंकर दादाला बोललो. दादा नको आपल्याला चैन.चल उशीर झालाय.

शंकर दादा बोलला 900 रुपयाला द्यायचे असेल तर बघ. लगेच नऊशे रुपये रोख आणून देतो. माझ्याकडे तेवढेच आहेत.

पाहुणा कातकरी बोलला.दोन हजार रुपयाला घे.आता 900 दे व बाकीचे 1100 मी नंतर आल्यावर घेईन. मी शंकर दादाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याने माझे ऐकले नाही. लगेच घरी जाऊन त्याने 900 रुपये आणले. आणि कातकऱ्याला दिले व चेन घेतली.चैन गळ्यात घालून तो चालू लागला. तो एकदम खुशीत होता. त्याचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही.

आठच दिवसात चैनीचा रंग बदलला. पिवळी धमक असलेली चेन आता काळपट दिसू लागली. म्हणून आम्ही तज्ञ लोकांकडे जाऊन चैन तपासून घ्यायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितले अरे ही चैन बाजारी आहे.वीस पंचवीस रुपयाची आहे.त्यावेळी शंकर दादाच्या पायाखालची वाळू सरकली.तो एकच बोलू लागला. पैसे गेल्याचे दुःख नाही रे.परंतु वीस पंचवीस दिवस मी रोज सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत बटाटे काढायचो. ते कष्ट माझ्या डोळ्यापुढे येते.असे म्हणून तो दुःखी झाला.मी त्याला बोललो.आता दुःख होऊन काय उपयोग ? मी तुला पहिलेच सांगितले होते. परंतु तुला हाव नडली त्याला मी काय करणार.

शंकर दादाला लोकांची टिंगल करायची खूपच सवय होती. तो कोणत्याही माणसाची टिंगल करायचा. एकदा त्याने आम्हाला उघड आव्हान दिले. मी कुणाची ही टिंगल करू शकतो. एकदा तेथील जिल्हा परिषद सदस्य यांची तू टिंगल करू शकतो का ? असे आम्ही त्याला विचारले. तर तो लगेच तयार झाला. परंतु त्या बदल्यात तुम्ही काय देणार? असा आम्हाला त्याने प्रश्न केला.

तुला अब्बास सेठच्या हॉटेलात मिसळ खायला घालीन.आणि टिंगल नाही केली तर तू आम्हाला मिसळ खायला घालायची अशी आम्ही पैज लावली.दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच जिल्हा परिषद सदस्य असलेले कै.नानासाहेब कशाळे अब्बास शेठच्या हॉटेलला चहा पिण्यासाठी आले.त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक लोक होते.शंकर दादा आणि आम्ही तिथे गेलो.लगेच शंकर दादाने नानासाहेब कशाळे यांची टिंगल सुरू केली. त्यांनी पण खिलाडू वृत्तीने हसून दाद दिली.तेव्हा मात्र आम्हाला शंकर दादाला मिसळ खायला घालावी लागली. असा हा शंकर दादा.

शंकर दादा आणि मी त्यांच्या अंगणात असलेल्या खटार गाडीत झोपायचो.एकदा आम्ही खटार गाडीत आकाशाकडे तोंड करून झोपलो असता आकाशातून एक पेटलेला उल्का आमच्या दिशेने अत्यंत वेगाने खाली कोसळू लागला.आम्ही दोघेही घाबरून गेलो. शक्यतो उल्का आकाशातच पेटतो व नष्ट होतो.परंतु हा पेटलेला उल्का आमच्या बाजूलाच येऊन पडला. लागलीच आम्ही दोघे उल्का पडला होता त्या ठिकाणी गेलो. तो लालबुंद दगड हळूहळू  थंड झाला.अजूनही तो उल्का शंकर दादाकडे आहे.

असाच एकदा गावाला असाताना माझा मित्र आजारी पडला होता.भगताने त्याला खुप मोठे भुत लागले असुन हे भुत उतरावे लागेल व रोगी बरा झाल्यावर  उतारा म्हणुन एक बोकडाचा बळी द्यावा लागेल असे सांगीतले.परंतू एवढा खर्च आवाक्याबाहेर असल्याने मित्राचे वडिल चालढकल करू लागले.भगत सारखाच येऊन त्यांना सांगू लागला.ते भुत माझ्याकडे येऊन सतत मला तु सांगीतलेल्या प्रमाणे रोगी बरा झाला आहे.आता बोकडाचा बळी लवकर द्या.नाहीतर  तुझ्याकडेच पहातो.असे म्हणत आहे.तुम्ही ताबडतोब तयारी करा नाहीतर पुढे मी जबाबदार राहणार नाही.

मित्राचे वडिल सुशिक्षित असुनही हादरले.लगेच एका शुक्रवारी गावच्या हद्दीच्या बाहेर मध्यरात्री बोकडचा बळी देण्याचा कार्यक्रम ठरला.त्या प्रमाणे तयारी करण्यात आली.या कार्यक्रमाला माझ्यासारखेच अनेक उत्साही लोक जेवणासाठी आले होते.बाहेर गावचे अनेक नातेवाईक व त्यांचे मित्र जेवणासाठी आले होते.बोकडाच्या मानाने जेवायला आलेली गर्दी पाहुन आपल्याला आता अर्धपोटी रहावे लागते की काय अशी मला शंका आली.मी शंकरदादाला बोलुन दाखवली.तो म्हणाला अजिबात काळजी करू नको मी आहे.कारण तो खुप वेळा असल्या कार्यक्रमांना जाऊन आला होता.

ठरल्या प्रमाणे सर्व तयारी झाली.भगताच्या अंगात देव संचारला. तो सांगेल तो विधी करण्यात आला.पळसाच्या मोठया पानावर नुसत्याच भरपुर मटणाचा नैवेद्य भुतासाठी थोडया अंतरावर भगताने सांगीतलेल्या ठिकाणी ठेवण्यात आला. नैवेद्य ठेवायला अर्थात श्री शंकर वनघरे गेला होता. विशेष म्हणजे हा नैवेद्य थोडयावेळाने परत आणुन भगताने खायचा असतो. इकडे विधी चालुच होता.भगताला नविन धोतर,नेहरूशर्ट,टोपी व उपरने व रोख एक हजार रूपये देण्यात आले.हा कार्यक्रम चालू असताना शंकर रावने भुताला दाखवलेला नैवेद्य उचलुन आणला.व थोडया अंतरावर आम्ही दोघांनी जाऊन त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला.व परत गर्दीत येऊन मिसळलो.रात्र बरीच झाली होती.विधी संपला सर्वजण जेवायला बसलो.भगतासाठी भुताला दाखवलेला नैवद्य आनायला सांगीतला.तेथे अर्थातच नैवेद्य नव्हता.खरोखरच भुताने प्रत्यक्ष येऊन नैवद्य खाल्ला अशी भगताने सगळ्या जमलेल्या लोकांना सांगीतले.भुत फार जालीम होते.ते सतत माझ्याकडे जेवण मागत होते.पाहिलत ना तुम्ही?प्रत्यक्ष .झाली ना तुमची खात्री? असे म्हणुन भविष्यात अशीच सावज मिळविण्यासाठी स्वत:ची जाहीरात करून घेतली.आणि पुढे हाच भगत पश्चिम भागात नावारूपाला आला. डाँक्टर पेक्षा पेशन्टची गर्दी याच्याकडे होऊ लागली.(त्या काळात एवढी प्रचंड अंधश्रद्धा होतो की भुताचा नैवेद्य खाणे  दुरच पण ठराविक ठिकाणी असलेल्या भुताचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा यायचा.तेव्हा एवढी हिम्मत आम्ही दोघे सोडुन कुणाच्यातच नव्हती.विशेष म्हणजे तेव्हा मी दहावीला होतो.

शंकर दादा वयाने एवढा मोठा झाला आहे. तरीसुद्धा त्याचा पोरकटपणा अजून कायम आहे. एकदा त्याच्या गावातील एका दुकानदाराचे घर जळून खाक झाले होते.माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी शंकर दादा बरोबर त्यांच्या जळालेल्या घरी गेलो. घर पूर्ण जळून खाक झाले होते.घरातील बरेच साहित्य जळले होते.दगडाच्या भिंती सुद्धा धुराने काळ्या कुट्ट झाल्या होत्या. जळालेल्या घराचा मालक आणि मी घराची पाहणी करत होतो. आणि अशावेळी शंकर दादा खाली अर्धवट जळालेले शेंगदाणे गोळा करीत होता. त्याने बरेच शेंगदाणे गोळा करून एकेक खायला सुरुवात केली. आम्हाला म्हणाला देखील शेंगदाणे खूप खरपूस आहेत बर का. अशावेळी आम्ही दोघांनीही कपाळावर हात मारून घेतला. दुकानदार बोलला अरे शंकर माझे एवढे नुकसान झाले आहे आणि तु खुशाल शेंगदाणे खातो. तुला काही लाज लज्जा आहे की नाही. यावर शंकर दादा बोलला.आप्पा झाले ते झाले.

तुला नुकसान भरपाई भेटेल की. यासाठी आम्ही प्रयत्न करू काळजी करू नको.आणि इतकेच नव्हे तर शंकर दादाने त्यांना नुकसान भरपाई देखील मिळवून दिली होती.

शंकर दादाने आयुष्यात कधीच काम केले नाही. केवळ म्हशी सांभाळणे, नदीवर पोहणे, मासे पकडणे, शेळ्या मेंढ्या विकत घेऊन त्या चाकणच्या बाजारात जाऊन विकणे. म्हशींची खरेदी विक्री करणे एवढेच तो आयुष्यात काम करू शकला. त्याने कधीही कुठल्याही गोष्टीचे टेन्शन घेतले नाही. कोणत्याही दुःखद प्रसंगामुळे आणि संकटामुळे तो हातबल झाला नाही.

एकदा मी त्याच्याकडे खूप रात्र झाल्यामुळे  मुक्कामाला राहिलो होतो. रात्री जेवण करून आम्ही ओटीवर झोपलो. परंतु त्याच्या दारात चार-पाच कुत्री येऊन भुंकू लागत. आम्हाला काही झोप येत नसे. मग आम्ही दरवाजा उघडून त्या कुत्र्यांना दूरवर हाकलत असु. आम्ही अंथरुणावर येऊन झोपलो ना झोपलो तो परत ती कुत्री दारात येऊन ओरडत असत.त्यामुळे आम्हा दोघांनाही झोप काही येत नव्हती. तो म्हणाला अरे आजच असं झालय. तू आला म्हणून की काय ? त्यानंतर आम्हाला केव्हातरी डोळा लागला तोच दरवाजाचा खडखडाट ऐकू आला. शंकरदादा ने दरवाजा उघडला तर बाहेर बाळू कोरडे उभा होता. तो म्हणाला 

शंकर अरे आजी वारली..तू एक काम कर. मंदोशीला नातेवाईकांकडे जा व त्यांना निरोप दे. तोपर्यंत आम्ही तयारी करतो. बाकीची माणसे नातेवाईकांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो. आम्ही दोघेही उजाडल्यावर मंदोशीला गेलो.

शंकर दादाचे एका मुलीचे लग्न झाले असून एक मुलगी परदेशात नोकरी निमित्त आहे.. व एक मुलगा चाकण एमआयडीसी मध्ये कामाला आहे. आजही शंकरदादा जेव्हा भेट होईल तेव्हा कडकडून मिठी मारून भेटतो. व जुन्या आठवणीत रमून जातो .



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस