महादेव कोळी समग्र इतिहास
महादेव कोळी जमात प्राचीन काळी महादेव कोळी या डोंगराच्या रांगात राहत असावी असे म्हटले जाते.तेथून ते बालेघाटाच्या रांगा ओलांडून गुजरात मध्ये आले.गुजरात मधील डांग भागात बरीच शतके राहिले असावेत. कारण महादेव कोळ्यांची मूळ भाषा ही डांगानी होती.
गुजरात मधील डांग भागाच्या जंगलात आणि कडेकपारीत राहिल्यानंतर तिथून हळूहळू नाशिक,त्र्यंबकेश्वर,अहमदनगरचा पश्चिम भाग,पुणे जिल्ह्याचा पश्चिम भागात ते डोंगरदऱ्यामध्ये राहू लागले.
महादेव कोळ्यांच्या जमातीला स्थलांतर करणे हे पाचवीलाच पुजले होते.
अनेक महादेव कोळी या भागात कायमस्वरूपी राहिल्यामुळे आजही त्रिंबकेश्वर,अकोले, भागात गावाकडे डांगानी भाषा बोलली जाते. व जुन्नर आंबेगावच्या ग्रामीण भागात अजूनही त्या भाषेचे प्राबल्य दिसून येते.
असे असतानाही अनेक महादेव कोळ्यांची भटकंती ही 18 व्या शतकाच्या मध्यापर्यंत अशीच चालू होती. १८५० नंतर ते ठीक ठिकाणी स्थायिक झाले.
जुन्नर तालुक्याचा पश्चिम भाग,आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भागात अनेक महादेव कोळी हे साधारण 12 व्या शतकात आले असावेत.असा अंदाज आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील व मावळ तालुक्याच्या पश्चिम भागातील महादेव कोळी हे जुन्नर,आंबेगाव तालुक्यांच्या या पश्चिम भागातुन साधारण अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरित झाले आहेत.
आजही आपण पाहतो की कातकरी समाज हा आजही स्थलांतर करतो एखाद्या गावाच्या डोंगरावर, किंवा नदीकाठी फार तर दोन ते तीन वर्षे राहून तो दुसऱ्या गावाकडे स्थलांतर करत असतो.अगदी असेच स्थलांतर पूर्वी महादेव कोळी करत होते.
त्या काळात ठिकठिकाणी एक दोन घरे करून, डोंगरामध्ये पाणी असलेल्या ठिकाणी महादेव कोळी हे वस्ती करून राहत होते. त्यावेळी गावाची निर्मिती झाली नव्हती.अनेक गावांची निर्मिती ही अगदी अठराव्या शतकाच्या पूर्वर्धात झालेली आहे.
जुन्नर ही यादवांची राजधानी असल्यामुळे जुन्नर ही मोठी बाजारपेठ होती.काही महादेव कोळी जुन्नर सारख्या बाजारपेठेत काही जीवनावश्यक वस्तूंची ने आण करण्यासाठी येत असल्यामुळे व तेथील लोकांच्या सानिध्यात आल्यामुळे थोडीफार त्यांच्यात प्रगती झाली.आणि त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्याशिवाय यादवांच्या काळात घाटघर मार्गे कोकणात व्यापार केला जात असल्याने त्याचाही फायदा महादेव कोळ्यांच्या जडणघडणीत झाला असावा.
काही महादेव कोळी हे जुन्नरच्या पश्चिम भागातून सरकत सरकत आंबेगाव तालुक्याच्या व खेड तालुक्याच्या पश्चिम भागात स्थलांतरित झाले. तेथेही आंबेगाव ही जुनी बाजारपेठ असल्यामुळे तेथील महादेव कोळी लोक स्थानिक लोकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत बदल होऊन ठिकठिकाणी गावे वसण्यास मदत झाली.
असे असले तरी महादेव कोळ्यांच्या रूढी, परंपरा, देव देवता, सण व वार, यामध्ये कोणताही बदल झाला नाही. त्या रीती, रिवाजाप्रमाणे पुढे चालूच राहिल्या. हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.
राहणीमान
महादेव कोळी हे सतत स्थलांतरित करीत असले तरी ते कायमच जंगलाच्या पायथ्याशी, डोंगरदऱ्यात पाणी असलेल्या ठिकाणी अगदी दोन,दोन घरांची वस्ती करून राहत असत. मोठ्या संख्येने वस्ती करून ते कधीही राहिले नाहीत.
त्यावेळी पुरुष लज्जा रक्षणासाठी लंगोटी वापरत असे. व डोक्याला पटका (फेटा) बांधत असे. हाच कायमस्वरूपी त्याचा वेश होता. तर स्त्रिया लुगड्याचा तीन हात तुकडा व स्वतःच सुईने शिवलेली चोळी वापरत असे.
घरे
महादेव कोळ्यांची घरी ही अगदीच छोटी असत. उपलब्ध असलेल्या दगडांचा वापर करून वाटोळे आकाराचे त्यांचे घर असे. त्यावर वासे व फोकाठ्या टाकून कड्याच्या ठिकाणी असलेल्या लांब गवताने त्यांचे घर शाकारत असत. त्यामुळे जोरदार पावसातही घरामध्ये पावसाचा एक थेंबही येत नसे. या घरामध्ये साधारण चार-पाच लोक मावतील एवढीच जागा असे. या घरांना केंबळाची किंवा कुहीटीची घरी असे म्हणत.
घरातील वस्तू
महादेव कोळ्यांकडे घरामध्ये प्रामुख्याने दगडाची जाते, दगडाचा पाटा व वरवंटा, दगडाचे उखळ व खैराच्या लाकडाचे मुसळ, पीठ मळण्यासाठी लाकडाची काठवट, सूप, व इतर सर्व गाडगी मडकी असत. या गाडगे मडक्यामध्ये भात व कालवण शिजवत असत.भाकरी सुद्धा मातीच्या भांड्यातच भाजली जात असे. काही लोक भाकरी करून पाट्यावर वाटलेल्या मिरची बरोबर पाट्यावरच खात असत.
याचा अर्थ महादेव कोळी येत्या काळातही चांगल्या प्रकारचे कारागीर होते हे लक्षात घेतले पाहिजे. कारण दगडाची जाती, पाटा वरवंटा, लाकडाची काठवट, उखळ व मुसळ इत्यादी दगडाच्या व लाकडाची वस्तू त्यांना अत्यंत सुबक अशा बनवता येत होत्या हे मान्य करावे लागेल.
स्थलांतर करताना या सर्व वस्तू घेऊन त्यांना पुढील ठिकाणी जावे लागत असे.
स्थैर्य
इंग्रजांच्या काळात महादेव कोळ्यांना ते राहत असलेल्या ठिकाणी जमिनी देण्यात आल्या. त्यांच्या नावावर करण्यात आल्या. त्यामुळे महादेव कोळी समाजाला त्या ठिकाणी एक प्रकारे स्थैर्य मिळण्यास मदत झाली.
जमिनी कसत असताना त्यांना बैलांची गरज भासली. त्यामुळे बैलाबरोबरच ते गाई पाळू लागले. सोबतीला कोंबड्या चितड्या आल्याच. शेतजमिनी कसू लागल्यामुळे व दूध दुभते आल्यामुळे बऱ्यापैकी त्यांच्याकडे असलेल्या साहित्याची विक्री होऊ लागली. त्यामुळे अनेक लोकांकडे लोखंडी तवा, तांब्या पितळेची भांडी, सोन्या चांदीचे दागिने घेण्याचे ऐपत निर्माण झाली.
सगळ्यांनाच चांगल्या प्रकारचे जमिनी मिळाल्या असे नाही. काहींना अगदी वरकड दगड धोंडे असणाऱ्या जमिनी मिळाल्या. त्यामध्ये शक्यतो काहीच पिकत नसे.परंतु असे असले तरी जवळजवळ 90 टक्के लोक भूमिहीनच होते. त्याचवेळी महादेव कोळ्यामध्ये सुद्धा बळी तो कान पिळी ही पद्धत सुरू झाली.अनेक लोक नदीकडेला सखल असलेल्या किंवा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कसदार जमिनीच्या मालकाकडे मजूर म्हणून काम करू लागले.
हळूहळू महादेव कोळ्यांची वस्ती वाढू लागली व त्याचे रूपांतर गावांमध्ये झाले. काही गावांचे रूपांतर भागांमध्ये झाले. आणि त्यामधूनच अनेक गावांमध्ये इंग्रजांच्या काळात तालेवर असलेल्या माणसाला पाटीलकी मिळाली.
कायमस्वरूपी शेत जमिनी मिळाल्यामुळे लोक हळूहळू शेती करू लागले. त्यासाठी गाईगुरे, बैल यांचे पालन केले गेले. परंतु ही शेती अतिशय निकृष्ट दर्जाची व डोंगरदऱ्यात असल्यामुळे भात पीक, नाचणी, सावा, खुरासनी, इत्यादी पिके घेऊ लागले
शेती व्यवस्था
महादेव कोळी हे प्रामुख्याने डोंगर उतारावर राहत असल्यामुळे डोंगर उतारावरील खोट्या वनस्पती तोडून त्याची लाकूड व पालापाचोळा त्याच ठिकाणी ठेवून कालांतराने पेटवून दिला जात असे. यालाच दळे करणे असे म्हणतात. डोंगर उतारावर असे अनेक दळी असत. पेटवून दिलेली जमीन व्यवस्थित साफ करून त्या ठिकाणी बैलांच्या सहाय्याने नांगरत असत.
पावसाळ्यात नाचणीचे रोप लावून, भात लावणी झाल्यानंतर श्रावण महिन्यात नाचणीची आणि सावा यांची लावणी केली जात असे.
नदीच्या कडेला व जंगलाच्या पायथ्याशी आणि माळरानावर काही सकल भागात प्रामुख्याने भात शेती केली जात असे. अजूनही करतात. त्यावेळी उत्कृष्ट असे चवदार भाताचे वाण महादेव कोळ्यांनी तयार केले होते. तामकुडा,जीर, खडक्या, रायभोग,अशा अनेक भाताच्या जाती विकसित केल्या होत्या.
रब्बी हंगामात ते हरभरा, मसूर व वाटाणा ही पिके घेत असत. तर घरा पाठीमागील वाडग्यात केव्हा इतर ठिकाणी रताळी, अळवड, डांगर भोपळे, काकडी, घेवडा, कारली व दोडका या भाज्या लावत असत.
रानभाज्या व कंदमुळे
त्या काळात अनेक रानभाज्यांचा शोध महादेव कोळ्यांनी लावला. त्या आजही तितक्याच चविष्ट व आरोग्यदायक आहेत.
त्यापैकी चाव्याची भाजी, चाव्याचा बार, कुर्डूची भाजी, चिलूची भाजी, कवदरीचे सोंडगे, भोकराची भाजी, फणसाची भाजी, तेऱ्याची भाजी, सायरी च्या फुलांची भाजी, अशा अनेक भाज्या प्रचलित झाल्या.
कंदमूळ पैकी रताळी, चाव्याचा कंद,अनुवाचा कंद, आळवडीचा कंद,हळंदे व पंधे इत्यादी कंदमुळे ऋतुमानानुसार भाजून किंवा शिजवून खात असत. हे कंदमुळे आजही तितकेच प्रसिद्ध आहेत. यांना सध्या खूप मागणी आहे.
शिकार
महादेव कोळी हे प्रामुख्याने मोठ्या प्राण्यांचे शिकार करत असत. रान डुकरे, भेकर, ससे, साळींद्र, व लांडोर यांची शीकार करत असत. ते कधीही लहान प्राणी व पक्षी यांची शिकार करत नसत. त्यांच्याकडे हाडबे हे हत्यार असे. छोट्या बांबूला दोन्ही बाजूला धार असलेले नांगराच्या फळासारखे लोखंडी शस्त्र बसवलेले असे. कातकरी व भिल्ल हे शक्यतो छोट्या प्राण्यांची आणि पक्षांची शिकार करत असत. म्हणून त्यांच्याकडे गिलवर, आणि तीर कामठा ही छोट्या प्राण्यांना मारण्यासाठी ची हत्यारे असत. जी महादेव कोळ्यांकडे नसत. यावरून महादेव कोळी छोट्या प्राण्यांची किंवा पक्षाची शिकार करत नसावेत हे स्पष्ट होते.
औषधी वनस्पती
महादेव कोळ्यांना त्या काळात अनेक औषधी वनस्पतींची माहिती होती. त्यापैकी हाडसांधी,कुर्डूचे बी, दगडाचा पाला, कात्री निरगुड, कुळसुन्याच्या मुळ्या, अर्जुन सादड्याची साल अशा अनेक वनस्पती औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध झाल्या.
पंचक्रोशीतील गावांमध्ये, मोडलेले हाड बसवणारा, अंगात देवाचे वारी येणारा, आजारी असलेल्या माणसाला वनस्पतींचे औषध देणारा वैद्य,विंचू अथवा सर्पदंश झालेल्या माणसाला औषध देणारा, गायक,कलाकार,वस्तू बनवणारे कारागीर असे अनेक लोक प्रसिद्धीस आले.
बदलती जीवनशैली
पूर्वी लंगोटी नेसत असलेले बरेचसे लोक परगावी जाताना धोतर नेसू लागले. एवढाच काय तो बदल. परंतु शेतात पिकत असलेले धान्य त्यांना वर्षभर पुरत असल्यामुळे बऱ्यापैकी स्थिरता आली. परंतु सगळ्याच महादेव कोळ्यांना जमिनी मिळाल्या असे नाही. अनेक लोक भूमिहीनच राहिले त्यामुळे त्यांचे स्थलांतर हे चालूच होते. त्यांच्या जीवनशैलीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. ज्यांना बऱ्यापैकी सुपीक जमिनी मिळाल्या होत्या. त्यांच्या मध्ये मात्र अमुलाग्र बदल झाला. त्यांची केंबळाची घरे जाऊन ज्योत्याची घरी आली
महादेव कोळ्यांची कारागिरी
महादेव कोळी स्थायिक झाल्यानंतर व ते चांगल्या प्रकारे शेती करू लागल्यानंतर त्यांची कला व कारागिरी अधिकच विकसित झाल्याचे पाहायला मिळते.मेसाच्या बांबूपासून टोपली, पाट्या, दुरडी, हरे, कनंगी, तट्टया,सुप,लहान मुलांसाठीचे पाळणे, इत्यादी वस्तू ते उत्तमरीत्या करत असत.
ज्याप्रमाणे ते बांबू पासून वस्तू बनवतात त्याचप्रमाणे नदीकिनारी किंवा ओढ्या किनारी राहणारे महादेव कोळी हे मासे पकडण्यासाठी मेसाच्या बांबू पासून बुडदूड, भोताड, इत्यादी वस्तू उत्तमरीत्या बनवत असत.
त्याचप्रमाणे घरे बांधण्यासाठी लाकडाचे खांब, तुळया व वासे, फळ्या, लाकडाचे बैल, लाकडाच्या बाहुल्या, तूप विकण्यासाठी लाकडी माप नवाटके व चवाटके, लाकडाची आधुली, लाकडाचा आठवा व नीठवा इत्यादी वस्तू सुद्धा अतिशय सुबक व कला कसुरीच्या बनवत असत.
त्याचप्रमाणे दगडी वस्तू म्हणजेच उखळ,जाते इत्यादी वस्तू ते सुरुवातीलाच बनवत होते. परंतु घराच्या ज्योत्याचे दगड, दगडाचा दिवा, इत्यादी सुद्धा ते बनवत असत. उत्तरोत्तर ही कला बहरत जाऊन विशिष्ट कलाकार उदयास आले. व पिढ्यानपिढ्या काही लोक व्यवसाय म्हणून ही कला जोपासू लागले.
महादेव कोळ्यांचे आकाश ज्ञान
महादेव कोळ्यांना आकाशातील ग्रहताऱ्यांचे ज्ञान उपजतच अवगत असावे कारण ते पिढ्यान पिढ्या निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे त्यांना ते माहीत असावे.
हिंदू धर्मशास्त्रातील 27 नक्षत्र, पौर्णिमा व अमावस्या, महिने व वार हे त्यांना तोंडपाठ होते. सूर्यग्रहण व चंद्रग्रहण हे कधी होणार आहे याची सुद्धा त्यांना माहिती होती. आकाशात असणारी तीकांड, बाज,ध्रुवतारा, शुक्रतारा इत्यादींचे ज्ञान त्यांना होते. याचा पुरावा म्हणून मी एक उदाहरण देतो.
माझी आजीचे 1990 च्या जून महिन्यात निधन झाले. त्यावेळी तिचे वय साधारण 90 असावे. म्हणजेच तिचा जन्म साधारण 1901 साली झाला असावा. माझ्या आजीला सर्वच्या सर्व 27 नक्षत्र तोंडपाठ होती. शिवाय पावसाळ्यात एका नक्षत्राला पंधरा दिवस दिलेले असतात. त्यावेळी कोणते नक्षत्र कधी सुरू होईल व कधी संपते याचीही माहिती होती. तसेच पौर्णिमा कधी आहे व अमावस्या कधी आहे हेही माहीत होते. विशेष म्हणजे ती पूर्णतः निरक्षर होती. मग याचा अर्थ तिला हे ज्ञान आले कसे?
म्हणजेच याचा अर्थ तिला तिच्या आई कडून हे ज्ञान आले असले पाहिजे. अशीच पिढ्यानपिढ्या हे ज्ञान पुढे पुढे चालू राहिले. म्हणजेच महादेव कोळ्यांना खूप पूर्वीपासून नक्षत्र तारे वार, निसर्गातील चमत्कार, इत्यादींची माहिती होती. हीच माहिती आर्यनी त्यांच्याकडून घेतली असावी. म्हणजेच महादेव कोळी हे आकाश ताऱ्यांचे उत्तम मार्गदर्शक होते हे निर्विवाद मान्य करावेच लागेल. त्याचप्रमाणे या वर्षात किती पाऊस पडेल. याचेही त्यांना ज्ञान होते.
कविता, कथा व लोकगीते
महादेव कोळी रात्री मुलांना गोष्टी सांगताना प्रामुख्याने राजा, प्रधान व राक्षसांच्या गोष्टी सांगत असत. या गोष्टी या पिढीकडून पुढचे पिढी कडे येत गेल्या. व अगदी 80 च्या दशकापर्यंत त्या लोकमानसात अस्तित्वात होत्या. माझी आजी अनेक गोष्टी सांगायची त्यामध्ये या सर्व गोष्टी राजा व प्रधान, राक्षस, गुप्त होणारी माणसे, जंगलातील गुहा, प्राणी व पक्षी यांच्या असत. या गोष्टीमध्ये प्राणी व पक्षी माणसासारखे बोलत असत. यावरून या सर्व गोष्टी त्या काळातील लोकांनी रचलेल्या होत्या हे स्पष्ट होते. यामधून करमणुकीच्या साधनांचा जन्म झाला.
त्याचप्रमाणे त्यावेळी अनेक लोकगीते, व लग्न गीते, भल्लरी, पावसाची गाणी, शेतीची गाणी अस्तित्वात आली. हे सर्व महादेव कोळ्यांनी रचलेले होते हे स्पष्ट आहे. कारण त्यांच्या गाण्यात निसर्ग, शेतीवाडी, झाडांची नावे, तत्कालीन प्राण्यांची नावे व पक्ष्यांची नावे, ही कुठे ना कुठे येत होती. पुढे ही गाणी या पिढीकडून पुढच्या पिढीकडे वाटचाल करू लागली. ही गाणी कोणी लिहिली असावीत या कथा, गोष्टी व गाण्यांचे लेखक कोण असावेत हे मात्र इतिहासाला शोधता आले नाही. ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल. याचा अर्थ महादेव कोळी हे जरी जंगलात राहत असले तरी आधुनिक आणि शास्त्रीय विचारात ते किती प्रगल्भ होते हे दिसून येते. मुख्य प्रवाहात तिने आल्यामुळे त्यांच्या कला व शास्त्र इतरांनी अवगत करून घेतले व त्यांचे नाव त्यांनी मोठे केले.
धर्मशास्त्र
साधारण 15 व्या शतकापासून अनेक डोंगरावर महादेवाच्या पिंडी आहेत. या पिंडी त्या काळात महादेव कोळ्यांच्या कलाकारांनीच बनवलेल्या होत्या. व आजही त्या अस्तित्वात आहेत. त्या काळातील महादेवाच्या पिंडी, नंदी, वाघोबा इत्यादीच्या दगडी मूर्ती आजही आदिवासी कलेचा पुरावा देतात. म्हणजेच महादेव कोळी हे किती प्रगल्भ होते हेही दिसून येते.
अनेकांच्या शेतामधील त्यांच्या पूर्वजांची थडगी ही किती आखीव रेखीव व सुबक मूर्तीनी परिपूर्ण बनवलेली असत.
त्याचप्रमाणे भैरोबा, काळभैरवनाथ, मुक्तार किंवा इतर असलेले देव यांच्या मूर्ती सुद्धा खूपच सुबक असत.आजही त्या मंदिरामध्ये अस्तित्वात आहेत. व आपण आजही त्यांची पूजा करतो.
आज अनेक लोक म्हणतात की आदिवासी निसर्ग पूजक आहेत. परंतु आदिवासी ही मूर्ती पूज्य सुद्धा आहेत. कारण शंकराचे पिंडी,भैरवनाथाच्या मूर्ती, वीर देव, वाघोबा, अशा अनेक मूर्ती महादेव कोळ्यांनीच घडवलेले आहेत. ठाकर आणि भिल्ल हे समाज जरी आदिवासी असले तरी त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. म्हणून महादेव कोळी हे मूर्ती पूजक सुद्धा होते हे मान्य करावे लागेल.
सोळाव्या शतकात रामदास स्वामींनी ठराविक गावामध्येच रामाची आणि मारुतीची मंदिरे बांधून मूर्ती स्थापन केल्या. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे.परंतु यापूर्वी कोणत्याही गावात या मूर्ती अस्तित्वात नव्हत्या. व अजूनही नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रात आपणास प्रत्येक गावात शंकराचे आणि भैरवनाथाचे मंदिर पहावयास मिळते.
महादेव कोळ्यांची कला
महादेव कोळी हे सन 19 10 च्या आसपास पासून तमाशा ही कला सादर करीत असत. त्या काळात अनेक गावांचे तमाशा प्रसिद्ध होते. तमाशामध्ये वग सादर करताना त्या काळात ते रामायण महाभारतातील कथांचा उपयोग करत असत. यावरून त्यांना रामायण व महाभारताची इंत्यभूत माहिती होती.
नावे व आडनावे
आडनावे ही सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात उदयास आली. त्यापूर्वी नावाच्या नंतर कुळाचे किंवा गोत्राचे नाव लावत असत. मुलांची नावे ही शेवटी "जी" लावून ठेवली जात असत. उदा. धोंडजी,देवजी,कमाजी,ठकुजी, चिमाजी,सावजी,बुधाजी, इत्यादी.
जोत्याची घरे
जोत्याचे घर जमिनीत पाया खोदून बांधलेले असे. जोते हे प्रामुख्याने तीन थरांचे असे. सर्वात खालच्या घडीव दगडाला बेंद्री असे म्हणत. तर मधल्या दगडाच्या थराला गुंड्या असे म्हटले जाईल. शेवट वरच्या थराला पानथरी असे म्हणत असत.
बेंद्री चा दगड सहा इंच रुंद दोन ते तीन फूट लांब असे. तर गुंड्या हा दगड साधारण एक फुट रुंद व एक फुट लांब असे. वर पाणथरीचा दगड सहा इंच रुंद व तीन फूट लांब असे. हे सर्व दगड मिरची वाटायच्या पाट्यासारखे घडीव असत. याला लोक टीचीव किंवा घडीव जोते असे म्हणत. टीचीव जोती ओबडधोबड असत.
खण
घराचा एक खण म्हणजे पाच फूट अंतर. काही घरे पाच, सात,नऊ खणांची असत. त्यासाठी खांब, तूळया, लग, वासे, बॅटम, कांभेरे, फळ्या हे लाकडाचे घटक असत. बॅटम ही प्रामुख्याने मेसाच्या काठीची असे. त्यावर धाब्याची आणि त्यानंतर नळीची आणि त्याही नंतर कवले वापरायची पद्धत होती. परंतु ही घरे सधन असलेल्या महादेव कोळ्यांकडेच असायची. बाकी सर्वांची घरी ही केंबळाची असत. केंबळाची म्हणजे ओबडधोबड दगड व गवताची. प्रत्येक घराच्या बाहेर अंगण असे व त्यावर मांडव घातलेला असे.
विविध प्रकारचे सण वार
महादेव कोळ्यांचे प्रामुख्याने गणी चौत, श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार, बैल अमावस्या, नवरात्र, देव पारधी जाणे, होळी व अक्षय तृतीया हे सण ते मोठ्या आस्थेने साजरी करत असत.
गणी चौथ
गणी चौथ म्हणजे गणेश चतुर्थी या दिवशी तांदळाच्या पिठाचे अगदी छोटे छोटे उंडे (गोळे) करून ते गुळाच्या पाण्यात शिजवत असत. व डांगराच्या पानावर आपल्या शेताला नैवेद्य दाखवत असत.
नवरात्र
नवरात्र मध्ये वरसुबाई, काळभैरवनाथ या देवांच्या देवळामध्ये पळसाच्या पानात माती ठेवून त्यावर धान्य पेरत व नऊ दिवस देवळामध्ये भजन पूजन केले जाई. जे लोक देवळामध्ये नऊ दिवस बसून असत त्यांना देव धरणे असे म्हणत. हे लोक नऊ दिवस उपवास करत. प्रत्येक दिवशी देवाला किंवा देवीला तिळांच्या फुलांची माळ घातली जाई. पाचवी माळ व नववी माळ या दिवसाला अनन्य साधारण महत्व असायचे. नववी माळ घातल्यावर देव उठवणे असे म्हणत. या दिवशी देवाला काही ठिकाणी कोंबड्याचा बळी दिला जातो.
श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार
या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला जातो. व भगवान शंकराला नैवेद्य दाखवला जातो. ठिकठिकाणी जवळपास असलेल्या शंकराच्या मंदिरात यात्रा भरवतात. तेथे भजन करतात.
बैल अमावस्या किंवा बैलपोळा
भाद्रपद अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या पितरांना घरावर फक्त खिरीचा नैवेद्य ठेवत असत. त्यानंतर दुपारी बैलांचा बैल पोळ्याचा सण साजरा केला जात असे. संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करून बैलांना नैवेद्य ठेवण्याची प्रथा होती. आहे.
गावाची साथ करणे
प्रत्येक गावात भाताची लावणी करायच्या आधी व भाताची कापणी करायचे आधी अशी दोन वेळा सात केली जाते. सात केल्याशिवाय कोणतीही कामे करता येत नाहीत.
साथ रविवार किंवा मंगळवारी केली जाते. सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन बोकड आणून गावाच्या ग्रामदैवतेला बळी देतात. पूजा विधी करून त्या ठिकाणी जेवण केले जाते. दुसऱ्या दिवसापासून शेतीच्या कामाला सुरुवात करतात.
मोडा पाळणे
रविवार हा भैरोबाचा व मंगळवार हा वरसुबाई किंवा कळमजा या देवांचा वार असतो या वारी प्रामुख्याने शेतातले काम करत नाहीत. यालाच मुळा पाळणे असे म्हणतात.
वाघ बारस
कार्तिक महिन्याच्या द्वादशीला वाघबारस साजरी केली जाते. अनेक ठिकाणी वाघोबाची मंदिरे आहेत. अनेक गावांमध्ये वाघोबाचे ठाण आहे वाघोबाला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक ठिकाणी मोठी यात्रा भरते. वाघबारस हा महादेव कोळी समाजाचा एक मोठा सण असतो. तो उत्सव ते मोठ्या भक्ती भावाने साजरा करतात.
यात्रा व उत्सव
चैत्र महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी वरसुबाई ची यात्रा भरते. अनेक भाविक भक्त वरसुबाईच्या दर्शनासाठी येत असतात. सुकाळवेढे येथे परसूबाईचे अतिशय सुंदर हेमाडपंथी मंदिराला लाजवेल असे शिल्प तयार केले आहे. 17 व्या शतकानंतर हे भारतात असे पहिलेच मंदिर आहे की जे दगडामध्ये बांधण्यात आले आहे. आतापर्यंत साधारण या मंदिराला दीड कोटी रुपये खर्च झाला आहे. अनेक भाविक भक्त सरळ हाताने या मंदिरासाठी देणगी देत असतात.
अखेदी ( अक्षय तृतीया )
अखेरीच्या दिवशी अगदी सकाळी घराच्या पुढील भिंतींना शेणाच्या करंजी सारखे गोळे चिकटवायचे. पाच गोळ्यांच्या तीन ते चार रांगा असत. प्रत्येक क्षणाच्या गोळ्याला खालच्या बाजूला चाप्याची फुले खोचायची.आणि दोरा चहुबाजूने गुंडाळायचा. हेच गोळे धान्याच्या कणगी वर सुद्धा लावत असत.
ज्याच्या घरात वडील वर गेले असतील तर बाजारातून करा घेऊन येत.व ज्यांच्या घरात आई गेली असेल तर केळी घेऊन येत. (करा आणि केळी हे मडक्यांचे प्रकार आहेत ) ही मडकी पाणी ठेवतो त्या ठिकाणी पाण्याने पूर्ण भरून ठेवत असत. दुपारी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जात असे. व आपापल्या पितरांना नैवेद्य दाखवला जात असे.
महादेव कोळ्यांच्या देवदेवता
भैरोबा, मुक्तार, खंडोबा, वाघोबा, वीर, मुंजोबा, कनीरबाबा वरसुबाई, कळमजा, गडदुबाई, जानुबाई, ताथवडी, मुक्ताबाई,कळसुबाई, अशा अनेक देव देवता आहेत. त्यांचे तिथी परंपरेप्रमाणे उत्सव साजरे करतात.
महादेव कोळ्यांच्या प्रत्येक कुळाचे देव हे वेगवेगळे असतात. काही लोकांचा भैरोबा दिगदचा आहे तर काही लोकांचा देव अबीर खिंडीचा भैरोबा आहे.
प्रमुख मुख्य ठिकाणे
भैरोबा - दिगद व अबीर खिंड, देवतोरणे, गोरेगाव
वरसुबाई - सुकाळवेढे जुन्नर
गडदुबाई - आंबे हातवीज (जुन्नर)
महालक्ष्मी - सुरकुंडी (ता खेड जि पुणे )
उपवास
मुख्यतः सोमवार, मंगळवार उपवास केला जात असे. सोमवार हा शंकराचा वार तर मंगळवार हा वरसुबाई, कळमजा, इत्यादी देवींचा वार असे. मंगळवारचा उपवास ह्या स्त्रिया करत असत.
लहान मुलांना नायटा, किंवा इतर काही त्वचारोग झाल्यास वरसुबाई च्या नावाने उपवास करून गावात प्रत्येक घरात कोरडा शिधा मागण्याची पद्धत होती. ज्या स्त्रीचे मूल लहान आहे. व त्याला नायटा किंवा इतर त्वचा रोग झाला आहे. ती सकाळी उठून स्नानादी क्रिया कर्म करून घरोघरी जोगवा मागत असे.
घराच्या दारात गेल्यावर, भीमाशंकरच्या कळमजाचा, सुकळवेढ्याच्या वरसुबाईचा जोगवा असे मोठ्याने म्हणे. हे ऐकून घरातील स्त्री तिच्या ओट्यात ओंजळभर तांदूळ टाकत असे. व विचारपूस करत असे. हेच तांदूळ घरी घेऊन संध्याकाळी त्याचा भात घालून तो नैवेद्य खाल्ला जात असे.पाच घरी मागून आणलेले भात भाकरी हे सुद्धा जोगव्याचाच एक प्रकार होता.
बाळाची पाचवी पुजणे
बाळाचा जन्म झाल्यावर पाच दिवसांनी पाचवीचा कार्यक्रम केला जात असे. पाचवीला मिरची वाटायच्या पाट्यावर नदीकाठी किंवा ओढ्याच्या काठी असलेला लव्हा, पाण्यातले खेकड व मासा,व खारीक,खोबरे, हळदी, कुंकू दगडाचा दिवा लावून पूजा केली करत असत. आता अलीकडे लोक पाट्यावर मासे खेकडे ठेवणे ऐवजी पाटी पुस्तक ठेवतात. काही लोक तर पाचवी सुद्धा करत नाहीत.
बाराबळी मोडणे
बाळ बारा दिवसाचे झाल्यावर घराच्या बाहेरील भिंतीवर कोळशाने दोन देवांची आकृती काढली जाते. व शेंद्राचे डोके काढतात.त्याला हळद कुंकू लावतात.ओढ्याच्या काठी असलेला लव्हा, व साबराच्या छोट्या छोट्या फांद्या तिथे ठेवतात.पूजेचे साहित्य ठेवून बाळ बाळंतीणीला दर्शन करायला लावतात. त्यानंतर तिथे नैवेद्य ठेवला जातो. यालाच बाराबळी मोडणे असे म्हणतात.
मुलगा झाला असेल तर दहा दिवसाचे विटाळ पडतात. व मुलगी झाली असेल तर महिना भर विटाळ पाळले जाते.
सटवायची पूजा
काही ठराविक गावांच्या हद्दीमध्ये सटवायची मंदिरे असतात. त्या ठिकाणाहून जर गरोदर महिला गेली किंवा बाळ घेऊन गेले तर काही ठराविक महिन्यांनी किंवा वर्षांनी सटवायला कोंबड्याचा बळी दिला जातो. आजही ही प्रथा चालू आहे.
बाराहय देणे
प्रत्येक गावात मुलगा असेल तर बोकड व मुलगी असेल तर छोटी शेळी (पाठ) गावच्या ग्रामदेवतेच्या हद्दीमध्ये बळी देऊन पूजा केली जाते. अनेक लोकांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते.
जावळ काढणे
प्रत्येक गावच्या पानावठ्याच्या ठिकाणी किंवा वड्याच्या कडेला किंवा नदीच्या कडेला मुलगा असेल तर बोकड व मुलगी असेल तर कोंबडीचा बळी दिला जातो. व पूजा करतात. मामाला बोलावून मुलाची किंवा मुलीचे थोडेसे केस कापले जातात. यालाच बट काढणे किंवा जावळ काढणे असे म्हणतात. अनेक लोक मुला मुलींना खोबऱ्याची वाटी व गुळ भेट म्हणून देतात.
सुपारी फोडणे ( साखरपुडा)
एखाद्या मुलाचे लग्न जमल्यावर रात्री जेवण झाल्यावर पाच ते सहा लोक मुलीच्या गावाला जात असत. त्या ठिकाणी गेल्यावर सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होत असे. त्यानंतर मुलाकडच्या लोकांनी आणलेला गुळ वाटप होई.आणि नंतर नवरदेवाकडील लोक व नवरीकडील वस्तीतील सर्व लोकांना जेवण असे.
देवक बांधणे
लग्न असलेल्या घरी हळदीच्या दिवशी अंगणातील मेंढीला शेतीची अवजारे म्हणजेच जुपन्या, सूप,खैराच्या लाकडाचे मुसळ, सागाचा आठवा त्यावर दगडाचा दिवा ठेवतात. आणि हे सर्व कासऱ्याने बांधतात. यालाच देवक बांधणे असे म्हणतात. देवक बांधणे हा प्रकार महादेव कोळी स्थिरस्थावर झाल्यावर व वस्त्या करून राहिल्यावर रूढ झाला असावा.
द्याज देणे ही प्रथा आता बंद झाली आहे त्यामुळे लिहिण्यात काही अर्थ नाही.
गोते भाऊ
आपले आडनाव सोडून दुसऱ्या आडनावाचे लोक हे गोते भाऊ असतात. प्रत्येकाचे गोटे भाऊ हे वेगवेगळे असतात. गोतेभावामध्ये आपापसात लग्न संबंध करत नाहीत.
उदा :- बेंढरी यांचे गोते भाऊ तळपे आहेत.
1970 च्या दशकात कै श्री.कृष्ण राव मुंढे साहेब हे आमदार असताना निवड मंडळाचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी अनेक तरुणांना मुख्य प्रवाहात आणून शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी,अशा अनेक नोकऱ्या दिल्या.अनेक तरुणांना पोस्ट, तारा ऑफिस,अमिनेशन फॅक्टरी,फोर्ट, टाकसाळ, मंत्रालय, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी नोकरी देऊन मुख्य प्रवाहात आणले.
त्यामुळे खऱ्या अर्थाने महादेव कोळी समाजाचे लोक पुण्या मुंबई च्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी स्थायिक झाले. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले. व तेही पुढे नोकरी पाण्याला लागले. ही मुंडे साहेबांची कृपा म्हणावी लागेल. तेव्हा जर मुंढे जर नसते तर महादेव कोळी समाज अजून कित्येक वर्ष मागे असता. आज खऱ्या अर्थाने त्यांचे भव्य स्मारक असणे आवश्यक आहे. त्यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरी करणे हे सर्व महादेव कोळ्यांचे कर्तव्य आहे.
आज महादेव कोळी मुख्य प्रवाहात आले आहेत. परंतु महादेव कोळ्यांच्या रूढी, परंपरा, रीती रिवाज, भाषेची जपणूक ही फक्त गावाकडेच पाहायला मिळते. आधुनिकतेच्या नावाखाली सुशिक्षित असलेला महादेव कोळी समाज मात्र हे सर्व विसरला आहे.
अनेक उच्चशिक्षित लोक तर वर्षानुवर्ष गावाकडे येतच नाहीत. ते शहरांमध्येच स्थायिक झाले आहेत. त्यांना समाजाविषयी कसलेच ममत्व नाही.
मध्यमवर्गीय महादेव कोळी समाजातील लोकांना आपली ही संस्कृती टिकवली पाहिजे. संस्कृतीचा विस्तार केला पाहिजे. आपली संस्कृतीची नवीन पिढीला माहिती द्यायला पाहिजे. असे वाटत असते. त्यासाठी ते प्रयत्नही करतात. परंतु अनेक संघटना झाल्यामुळे मेळ बसत नाही. हे विदारक चित्र आहे.
महादेव कोळी प्रसिद्ध व्यक्तिमत्व
तानाजीराव मालुसरे: हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक शूर योद्धा आणि सेनापती होते, जे महादेव कोळी होते.
जायबा मुकणे:- यांनी जव्हार संस्थानाचे राज्य स्थापित केले, जे पूर्वी महादेव कोळींच्या ताब्यात होते.
थोर क्रांतिकारक :- विर खेमा नाईक, राघोजी भांगरे, होनाजी केंगले, हे प्रसिद्ध क्रांतिवीर होते. तर सतु मराडे हे बंडकरी म्हणून ओळखले जात. त्यांचा इतिहास प्रसिद्ध आहे. यावर अनेक जणांनी स्वतंत्र लेखन केले आहे. मी सुद्धा या तिघांवर स्वतंत्र लेख लिहिले आहेत.
मा. आमदार श्री कृष्णराव मुंडे- यांच्या काळात अनेक आदिवासी तरुणांना नोकरी मिळाल्या. त्याने अनेक ठिकाणी विद्यालय व महाविद्यालय उभारली. व शिक्षणाची दारे खुली केली.
मा. श्री. मधुकरराव पिचड साहेब - हे आदिवासी नेते, कॅबिनेट मंत्री,विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद अशी अनेक पदे भूषवली आहेत. त्यांच्यावर सुद्धा अनेकांनी स्वतंत्र लेखन केले आहे.
पहिले भारतीय प्रशासनिक सेवेमधील I. A. S. अधिकारी डॉक्टर गोविंद घारे हे अतिशय उच्च शिक्षित अधिकारी होते. त्यांनी आदिवासी समाजावर अनेक मोठे मोठे पुस्तके आणि ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांनीच खऱ्या अर्थाने महादेव कोळ्यांना त्यांच्या पुस्तकाच्या लेखनामधून पुढे आणले व जगाला ओळख करून दिली.
मास्टर शंकरराव कोकाटे टोकवडे तालुका खेड यांचा प्रसिद्ध असा तमाशा होता. त्यांच्यावर सुद्धा स्वतंत्र लेखन केले आहे.
धोंडू महाराज गाडेकर हे जुन्या काळातील कला नाट्यातील एक लोकप्रिय कलाकार होते.
महादेवकोळी समाजातील कुळे व आडनावे
अ : अंबवणे, अंभिरे.
आ : आंबेकर, आढळ, आसवले, आढारी, आवारी, आस्वले.
इ : इष्टे, इदे, इधे, इरणक.
उ : उतळे, उंबरे, उगले, उंडे, उभे.
क : करवंदे, कारभळ, कांबळे, काठे, कोरडे, किरवे, कराळे, कोकणे,कडाळी,कडू, कचरे, कोकाटे, कसाळ, कोथेरे, केवाळे, कोळप, कोंडुळे, केदारी,केंगले, कुर्हाडे, कवटे, कौठे, कोकदरे, कोथे, कावळे,कावते,कोल्हे,केकरे, कुडेकर, कोंडार, केंग, कोकतरे, कोकते, कवदरी, कुंदे, केदारे,करके, करटुले, करोटे, करवदे, कोंडावळे, कुलाळ, कौले.
ख : खामकर, खुटाण, खाडे, खोरगडे, खादे, खेताडे, खामसे, खतेले,खोडे,खताले, खोकले.
ग : गभाले, गवारी, गारे, गोडे, गोंद्के, गंभीरे, गेंगजे,
गडदे, गवते,गमे, गागरे, गोंदे, गबाले, गिरजे, गांजवे, गातवे, गोणके, गोडसे. गाडेकर
घ : घोटवडे, घुटे, घोडे, घनकुटे, घोईरत, घोटकर, घोटे, घारे, घाणे.
च : चपटे, चिमटे, चौधरी, चहाले, चौरे.
ज : जोशी, जढर, जाधव, जंगले, जफरे, जागले, जाखेरे.
झ : झांजरे, झाडे, झोले, झडे, झापडे.
ट : टेंगचे
ठ : ठुबळ, ठोकळ, ठवळे, ठोंगिरे.
ड : डामसे, डगले, डावखर, डवणे, डहाळे, डावखोर.
ढ : ढवळे, ढेंगळे, ढोके, ढोंगे.
त : तळपे, तरपाडे, तातळे, तांबडे, ताते, तिटकारे, तारडे, तुरे,
तराळ, तळपाडे, तांबेकर.
थ : थिगळे, थवले, थुवळ, थेरे.
द : दांगट, दळवी, दिघे, दाते, दगडे, दिवे, दिवटे, दांडेकर,देशमुख,दारणे, दरणे.
ध : धरमुडे, धनगर, धादवड, धराडे, धोंगडे, धोंडे, धोंडामरे,धिंदळे,धोत्रे, धिमे.
न : नाडेकर, नंदकर, निसरड, निगळे, नांगरे, निर्मळ, नवाळी,नवले, नांदे, नडगे.
प : पावसे, पोटे, पारधी, पावडे, पोटकुळे, पेकारी, पिचड,पोफळे,पादीर, पटमोरे,पाडेकर, पाटेकर, पाटील,पोटिंदे,पडवळे, पेरे, पोपेरे.
फ : फलके.
ब : बांबळे, बुरुड, बगाड, बांगर, बुळे, बेंढारी, बोऱ्हाडे, बांडे,
बोकड, बुरसे, बोटे,बेंडकोळी, बरामते, बोबडे, बेनकर, बोंबले, बनबरे, बागडे.
भ : भोजने, भारमळ, भाकीत, भवारी, भांगले, भोईर, भांगे,
भोमाळे, भालेकर,भालिंगे, भांडकोळी, भूरकुंडे, भोपळे,भागीत, भारती, भोते, भोकटे,भांडकुळे,भौरले, भादवड, भाकरे.
म : मते, मुंढे, मोहरे, मुठे, मदगे, मांडवे, मेमाणे, माळी,मेने मुदगून,मुकणे,मोजे, मोडक, मिळखे, मोहंडुळे, मरभळ,मराडे, मोरमारे, म्हसळे,मसळे,मोसे, म्हसाळे, मुंजे, मुळे मोकाशी, मेचकर, माळुंजे, मेठल, मोरे,मुऱ्हे.
य : येडे, येले.
र : रगतवान, रेंगडे, रावते, रढे, रोंगटे, रगडे, राक्षे.
ल : लोहकरे, लांडे, लांघी, लाडके, लेंभे, लोखंडे, लोकरे, लामटे,लहांगे, लाहुरे,लोटे, लोहरे, लिलके, लहामटे, लोटमोरे.
व : वरे, वडेकर, वाळुंज, वाजे, वासाळे, वाळकोळी, विरणक,वायाळ, वाघ,वारघडे, वडे, वाळेकर, वयणे, वायकोळी, वेले, वुंडे, वनघरे.
स : सांगडे, साबळे, सुपे, सरोगदे, सुरकुले, सारकते, सासरे,सातपुते, सालकर,सरोकते, सावळे, साकभोर, सुकटे.
श : शिंगाडे, शेळके,शेकरे, शेजवळ, शेणे, शेंडे, शेंगले, शेळकंदे.
ह : हेमाडे, हिले, हामरे, हिरले, हडके
पुणे-१८संदर्भ : सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी. (डॉ. गोविंद गारे.)
मराठी भाषेतून लयाला गेलेले किंवा जात असलेले डांगाणी शब्द
आगाद - सुरुवातीलाच... आम्ही यावर्षी आगाद लावणी केली.
आठवार - लग्न न झालेला...
आपाप - आपोआप आईच्यान - आई शपथ
आळाण - बेसन इवळने - ओरडणे
उनून - गरम उलीउली - थोडा थोडा
इवाईन - विमान इळमाळ - दिवसभर
उलिसा - थोडासा लय वाढखू - खुप वेळ
केंधुळा - खुप वेळ कुहीट- झोपडी वरचे जुने गवत
कोडगा - निर्लज्ज खकाणा - धूळ
गावडी - गाय गुताडा - गुंता
गोट - गोष्ट बिरडं - शर्टाचे बटण
घासल्याट - रॉकेल झावळा - सायंकाळ
डाकतर - डॉक्टर दाठीमुठीचा- खोटं खोटं
धवळा - पांढरा वजवज - हळूहळू
नवाल - आश्चर्य मॉकार - पुष्कळ
नवचंडी - नवरात्र म्हंगाला - म्हणाला
वायला - वेगळा हाडहाड्या - खादाड
सत्री - छत्री येटाळणी - भाताची कापणी
शिराई - झाडू गबाळ्या - अस्वच्छ
आम्हाली - आम्हाला तुम्हाली - तुम्हाला
तेली - त्याला मपला - माझा
तूपला - तुझा डंगरी - म्हातारी
गवारी - गुराखी इरना - इरले
गैबान्या - येडपट इस्तु - विस्तव
ईदरं - विक्षिप्त ढाळवांत्या - जुलाब उलट्या
पटका - फेटा बंडी
बयाद्वार - व्यवस्थित घडूशी - घडवंची
न्याकाळ - सरळ पान लागणे - साप चावणे
बेंडगुळ - एक शिवी आराटबाट्या - एक शिवी
फाटी - सरपण खासखन्या - एक शिवी
चिरगुट - चिंधी दूंदया - जुनी घोंगडी
आखटी - शेकोटी फलाण्या बिस्तान्या - अमुक अमुक
लांडी - लांडोर
लेखक :- रामदास तळपे
या लेखाची कृपया कोणत्याही प्रकारे कॉपी करू नये. कॉपी राईट हा कायद्याने गुन्हा आहे. तसे केल्याचे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.