पूर्वी गावाकडे शेताच्या बांधावरून, वाटेवरून, पाण्यावरून आणि कधी कधी फक्त एकमेकांकडे वाकडे पाहिल्यामुळेही तंटे व्हायचे.
सुरुवातीला दोन शब्दांनी सुरुवात व्हायची, मग शिव्यांचा पाऊस पडायचा आणि शेवटी एखाद-दुसरी थप्पड उडाली की प्रकरण "गावच्या प्रतिष्ठेचे" बनायचे.भांडण झाले की दोन्ही पक्ष पोलीस स्टेशन गाठायचे. त्या काळी पोलीसही फार तत्त्वज्ञान मांडत बसत नसत. दोन्ही पक्षांकडून थोडेफार "चहापाणी" झाले की प्रकरण मिटायचे. गावकरी खुश आणि पोलीसही खुश!
पण एकदा आमच्या गावात असे भांडण झाले की प्रकरण हाताबाहेर गेले. मारामारीत एका माणसाला बराच मार बसला. पोलीसांनी परिस्थितीची गंभीरता ओळखून समोरच्या पक्षातील चार जणांना थेट राजगुरुनगरच्या पोलीस कोठडीत पाठवले.
प्रकरण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर जाणार होते. वकिलांनी सांगितले, "दोन जामीनदार घेऊन या."
दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो. तेवढ्यात माझा मित्र धापा टाकत आला.
"आज ऑफिसला जाऊ नकोस. माझ्याबरोबर खेडला चल. प्रतिष्ठेचा प्रश्न आहे." आपले कस्टडीमध्येअसलेले आरोपी सोडवून आणायला पाहिजेत.
गावात "प्रतिष्ठेचा प्रश्न" हा असा शब्द आहे की त्यापुढे माणसाची बुद्धी लगेच सुट्टीवर जाते.
मी विचारले,
"अरे, जामीनदार किती लागतात?"
तो म्हणाला,
"दोन."
"मग?"
"मी चार पाठवले आहेत!"
मी म्हणालो,
"दोन लागतात तर चार कशाला?"
तो म्हणाला,
"राहू दे हाताखाली. काय फरक पडतो?"
मलाही त्या वेळी फरक पडला नाही. पण दिवस संपेपर्यंत किती फरक पडणार आहे याची मला कल्पना नव्हती!
सकाळी आम्ही मोटरसायकल काढली. पण ती काही चालू होईना. आम्ही किक मारून दमलो. मोटरसायकल मात्र आमच्याकडे पाहून हसत असल्यासारखी शांत उभी होती.
शेवटी आम्ही मोटर सायकल शिरगावला एका ठिकाणी ठेवून एसटीने राजगुरुनगर गाठले.
तेथे गेल्यावर समजले की आमच्या केसचे अजून काहीच झालेले नाही. वकिलाचा पत्ता नव्हता. दरम्यान मित्राने आणलेले चारही जामीनदार भुकेने व्याकुळ झाले होते.
आम्ही एका छोट्या हॉटेल मध्ये गेलो.
सर्वजणांनी अशी मिसळ खाल्ली की जणू नसून आम्ही दुष्काळग्रस्त भागातून आलेले निर्वासित होते! मिसळ संपली, पाव संपले, आणखी पाव आले, तेही संपले.
हॉटेलवाल्याने आमच्याकडे आणि रिकाम्या ताटांकडे पाहून तोंडात बोट घातले.
मिसळ खाऊन झाल्यावर बिल आले. बिल पाहताच सगळ्यांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहायला सुरुवात केली.जणू काही बिल कुणी भरायचे यासाठी मौनस्पर्धा सुरू झाली होती.
मुख्य असलेल्या आरोपीचा मुलगा शहरातून येणार होता. जामीनदारांकडेही पैसे नव्हते. काशिनाथकडे पैसे नव्हते. आरोपी तुरुंगात असल्यामुळे त्यांच्याकडे तर असण्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी माझ्याकडे सर्वांची नजर वळली. आणि गावच्या प्रतिष्ठेप्रमाणेच बिलाची प्रतिष्ठाही माझ्याच खिशावर आली! मी पैसे भरले.
दिवसभर वकील, कागदपत्रे, स्वाक्षऱ्या आणि सरकारी कार्यालयातील कासवगती यामध्ये वेळ गेला. शेवटी सायंकाळी सहा वाजता जामीन मंजूर झाला.
चारही आरोपी सुटले. आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. पण खरी परीक्षा आता सुरू होणार होती. साडेसहा वाजताची भोरगिरीची शेवटची एसटी पकडायची होती. तेवढ्यात मुख्य आरोपी असलेला माणूस म्हणाला,
"दोन मिनिटांत येतो." तुम्ही येथेच थांबा. असे म्हणून तो थोड्याच वेळात गायब झाला.
दोन मिनिटे गेली. दहा मिनिटे गेली.वीस मिनिटे गेली. भोरगिरी एसटी मात्र आमची वाट न पाहता निघून गेली.
शेवटी साहेब परत आले तेव्हा त्यांच्या तोंडाला दारूचा सुगंध नव्हता; तर संपूर्ण दारूचा कारखानाच चालत असल्यासारखे वाटत होते. सर्व गाड्या निघून गेल्या होत्या. डिसेंबरची रात्र, कडक थंडी,भूकआणि खिशात पैसे नाहीत. सगळे जण त्याला शिव्या घालत होते. तो मात्र निवांत होता. जणू काही आम्ही पिकनिकला आलो होतो! शेवटी एका जीपवाल्याने वाड्यापर्यंत सोडायला होकार दिला.
भाडे तीनशे रुपये.
दारू पिलेला मुख्य आरोपी म्हणाला,
"बसा गाडीत."
हे वाक्य त्या दिवसातील सर्वात मोठा विनोद ठरला.वाड्याला पोहोचलो.
जीपवाला पैसे मागू लागला. मुख्य आरोपीने खिसे चाचपले. पुन्हा चाचपले. आणखी चाचपले. आणि शेवटी म्हणाला, "माझ्याकडे पैसे नाहीत."
आमच्याबरोबर असलेले जामीनदार बाजीराव रोकडे आणि कै.धोंडू गवारी (चेअरमन) मला म्हणाले आता तुम्हीच काहीतरी करा. आणि दुसऱ्यांदा माझा खिसा रिकामा झाला.
आता वाडा ते मंदोशी जायचे होते.
आम्ही आमचा मित्र असलेल्या डॉक्टर लांडे यांच्याकडे गेलो. त्यांनी एक जीप मालकाला बोलावून घेतले आणि आम्हाला मंदोशी पर्यंत सोडवण्याची विनंती केली.
जीप मालक बोलला 250/- भाडे द्यावे लागेल. आमचा मुख्य आरोपी बोलला . मंदोशी मध्ये गेल्यावर गाडीमधून उतरताच तुला लगेच पैसे देतो. पैशाची अजिबात काळजी करू नको. यावरून मग आम्ही सर्वजण निर्धास्त झालो.
मंदोशीला पोहोचल्यावर पुन्हा तोच प्रकार. जीपवाला पैसे मागू लागला. मुख्य आरोपीने मोठ्या प्रेमाने मला सांगितले,
"आता तू दे पैसे. माझा मुलगा शहरातून आला की लगेच तुला देतो."
हे "लगेच" आजतागायत आलेले नाही!
त्याचा मुलगा अनेक वेळा गावात आला.
मी अनेक वेळा दिसलो.
पण पैसे मात्र मला कधीच दिसले नाहीत.
दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी निवांत मी काल नादुरुस्त झालेली मोटरसायकल आणण्यासाठी शिरगावला गेलो. मी मोटरसायकलवर बसलो. एक किक मारली. आणि काय आश्चर्य! मोटरसायकल पहिल्याच किकमध्ये चालू झाली! मला त्या वेळी असे वाटले की कालपासून माझी फिरकी घेणाऱ्या सर्व लोकांमध्ये मोटरसायकलही सामील होती.
त्या दिवसानंतर मी एक धडा शिकलो गावातील भांडणात जामीनदार मिळतात, आरोपी सुटतात, दारूड्याला दारू मिळते; पण शेवटी बिल भरण्यासाठी एक भोळा माणूस हमखास सापडतो. आणि त्या दिवशी तो भोळा माणूस मी होतो!
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा