Translate

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात.

डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिमत्त्व आहेत. वैद्यकीय सेवेसोबतच समाजसेवेची अखंड तळमळ, आदिवासी बांधवांविषयी असलेली आत्मीयता आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे त्यांनी अनेकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

डॉ. राहुल जोशी हे खेड तालुक्यातील नायफड गावचे सुपुत्र. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्याशी माझी फारशी ओळख नव्हती. मात्र त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल मी अनेकदा ऐकले होते. योगायोगाने घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यालयीन कामानिमित्त गेलो असताना आमची प्रथम भेट झाली.

पहिल्याच भेटीत त्यांनी माझे अभिनंदन केले. "तुमचे ग्रामीण संस्कृतीवरील लेख मी नेहमी वाचतो," असे त्यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत व्यस्त असलेला एक डॉक्टर माझे लेख वाचतो, हे ऐकून मला अतिशय आनंद झाला. त्या दिवशी रुग्णांची मोठी गर्दी असल्याने संवादासाठी फारसा वेळ मिळाला नाही. मात्र त्यांनी दुपारी त्यांच्या सरकारी निवासस्थानी जेवणासाठी आग्रहाने बोलावले.

त्यानंतर अनेक वेळा आमच्या भेटीगाठी झाल्या. त्यांच्या सहवासातून आणि गप्पांमधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उलगडत गेले. मुळात डॉक्टरांच्या मनात आदिवासी समाजाविषयी अपार प्रेम, जिव्हाळा आणि अभिमान आहे. आदिवासी समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, लोकपरंपरा, श्रद्धा, देव-देवता, विवाहसंस्कार, चालीरीती आणि इतिहास यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे.

आदिवासी भागातील आरोग्यविषयक समस्या, सरकारी योजनांचा अपुरा लाभ, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आदिवासींसाठी असलेल्या अनेक सवलतींचा इतरांकडून होणारा गैरवापर याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच त्यांनी वैद्यकीय सेवेला केवळ व्यवसाय म्हणून न पाहता समाजपरिवर्तनाचे साधन म्हणून स्वीकारले आहे.

दरवर्षी आदिवासी भागात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून ते हजारो गरजू लोकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवत असतात. मोफत नेत्रतपासणी, मोफत चष्मे वाटप, आदिवासी महिलांची हिमोग्लोबिन तपासणी, मोफत औषधवाटप आणि आरोग्यविषयक जनजागृती असे अनेक उपक्रम ते सातत्याने राबवितात. 

विशेष म्हणजे या कार्याचा त्यांनी कधीच गाजावाजा केलेला नाही. वर्तमानपत्रांमधील प्रसिद्धी, सामाजिक माध्यमांवरील प्रचार किंवा स्वतःच्या नावाचा उदोउदो करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामावर त्यांचा अधिक भर असतो.

ग्रामीण रुग्णालयात त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांशी त्यांचे नाते हे केवळ डॉक्टर आणि पेशंट इतकेच मर्यादित नाही. अनेक आदिवासी आणि ग्रामीण बांधव त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे मानतात. 

अनेक वृद्ध रुग्ण डॉक्टरांशी बोलताना औपचारिकतेचा विसर पडून त्यांना प्रेमाने "अरे-तुरे" म्हणतात. एखाद्या स्वतःच्या मुलाशी जसे बोलावे तसे ते डॉक्टरांशी बोलतात. या मागे असतो तो डॉक्टरांनी जपलेला विश्वास आणि माणुसकीचा जिव्हाळा. डॉक्टरसुद्धा या प्रेमाचा राग न मानता त्यातच आपले यश शोधतात. एखाद्या डॉक्टरला रुग्णांकडून मिळणारा हा सन्मान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा असतो.

शासकीय सेवेसोबतच राजगुरुनगर येथे पंचायत समितीसमोर "लीलावती नेत्रालय" या नावाने त्यांचे नेत्ररुग्णालय आहे. डोळ्यांच्या विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी अनेक रुग्ण तेथे येत असतात. त्यांनी आतापर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले असून अनेक नेत्रशस्त्रक्रियाही पार पाडल्या आहेत.

त्यांच्या अनुभवाची प्रचिती रुग्णांशी संवाद साधताना वारंवार येते. अनेकदा एखादा रुग्ण तपासणीसाठी समोर बसला की त्याच्या बोलण्यावरून, हालचालींवरून किंवा लक्षणांवरून त्याला नेमका कोणता त्रास आहे याचा अंदाज डॉक्टरांना येतो. 

रुग्णाला कोणत्या कारणामुळे त्रास झाला आहे आणि त्यावर कोणता उपचार आवश्यक आहे, हे ते अचूकपणे सांगतात. त्यांच्या या अनुभवामुळे आणि अभ्यासामुळे रुग्णांचा त्यांच्यावर असलेला विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेला आहे.

डॉ. जोशी यांच्या सेवाभावी वृत्तीचा प्रत्यय मला एका प्रसंगातून आला. एकदा मी त्यांच्या दवाखान्यात बसून त्यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीचा दूरध्वनी आला. 

राजगुरुनगरपासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणगाव येथील एक रुग्ण गंभीर आजारी होता. त्याला तातडीने दवाखान्यात आणणे आवश्यक होते. मात्र त्या कुटुंबाकडे कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने परिस्थिती अधिकच कठीण झाली होती.

फोनवरून परिस्थिती समजताच डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णाला आणण्यासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली. त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, दुर्गम भागातील अडचणी किंवा इतर औपचारिक बाबींचा विचार न करता त्यांनी प्रथम रुग्णाला उपचार मिळणे महत्त्वाचे मानले. त्या क्षणी मला जाणवले की, डॉक्टरांसाठी रुग्ण हा केवळ उपचार घेणारा माणूस नसून त्याची जबाबदारी असतो. अशा असंख्य छोट्या-मोठ्या घटनांमधून त्यांच्या मनातील माणुसकी आणि सेवाभाव सतत प्रकट होत असतो.

डॉ. जोशी यांचे व्यक्तिमत्त्व केवळ वैद्यकीय क्षेत्रापुरते मर्यादित नाही. त्यांना पायी प्रवास करणे, रानावनातून भटकंती करणे, उंच डोंगर-दऱ्या, गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग करणे विशेष आवडते. 

आंबा, जांभूळ, करवंद यांसारख्या रानमेव्याचा आस्वाद घेत निसर्गाच्या सान्निध्यात रमणे हा त्यांचा आवडता विरंगुळा आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात संवेदनशीलता, निरीक्षणशक्ती आणि जीवनाविषयीची सकारात्मक दृष्टी दिसून येते.

अलीकडेच महाराष्ट्र शासनाने डॉ. राहुल जोशी यांची ग्रामीण रुग्णालय, तळेघर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे वैद्यकीय अधिष्ठाता या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. 

त्यांच्या या नियुक्तीमुळे आदिवासी आणि ग्रामीण भागातील आरोग्यसेवेला नवी दिशा मिळेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. आदिवासी समाजाच्या समस्या, त्यांची गरज आणि दुर्गम भागातील आरोग्यव्यवस्थेची वास्तव परिस्थिती यांची त्यांना असलेली सखोल जाण या पदावर निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. 

त्यामुळे आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ मिळेल, असा विश्वास वाटतो.

आजच्या काळात समाजसेवेच्या मोठमोठ्या घोषणा करणारी माणसे अनेक दिसतात; परंतु शांतपणे, कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजासाठी काम करणारी माणसे फारच कमी आढळतात. 

डॉ. राहुल जोशी यांच्याशी संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. ते केवळ आजारांवर उपचार करणारे डॉक्टर नाहीत, तर माणसांच्या वेदना समजून घेणारे संवेदनशील समाजभान असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. 

आदिवासी गावात किंवा वाडी वस्तीवर  राहणाऱ्या एखाद्या कुटुंबाची अडचण असो, एखाद्या गरीब रुग्णाच्या उपचाराचा प्रश्न असो किंवा आरोग्यसेवेपासून वंचित राहिलेल्या लोकांची समस्या असो, त्या प्रत्येक प्रश्नाकडे ते केवळ प्रशासकीय किंवा वैद्यकीय दृष्टीने पाहत नाहीत; तर माणुसकीच्या नजरेतून पाहतात. म्हणूनच त्यांच्या कार्यात सेवा, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम दिसून येतो.

डॉ. राहुल जोशी हे अशाच मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. वैद्यकीय सेवा, सामाजिक बांधिलकी, आदिवासी समाजाविषयीची आत्मीयता, निसर्गप्रेम आणि माणुसकीचा जिव्हाळा यांचा सुंदर संगम त्यांच्या जीवनात दिसून येतो.

आजच्या प्रसिद्धीच्या युगात कामापेक्षा जाहिरात मोठी मानली जाते. अशा काळात कोणताही गाजावाजा न करता "आदिवासी, गरीब आणि गरजू लोकांच्या जीवनात आरोग्याचा आणि आशेचा प्रकाश निर्माण करणारे डॉ. राहुल जोशी हे समाजातील खऱ्या अर्थाने दीपस्तंभ आहेत."

अशा सेवाभावी, अभ्यासू आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला मनापासून सलाम. समाजासाठी त्यांचे कार्य असेच अविरत सुरू राहो आणि त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळो, हीच सदिच्छा.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...