Translate

जात्यावरच्या ओव्या : ग्रामीण स्त्रीच्या भावविश्वाचा जिवंत वारसा

जात्यावरच्या ओव्या : बहिण-भावाच्या नात्यातील माया, ओढ आणि ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब

महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीत जात्यावरच्या ओव्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील स्त्रिया दळण दळताना आपल्या मनातील भावना, सुख-दुःख, आठवणी, प्रेम, विरह आणि नात्यांची ओढ या ओव्यांमधून व्यक्त करीत असत. या ओव्या केवळ गाणी नसून ग्रामीण स्त्रीच्या जीवनाचा जिवंत इतिहास आहेत. प्रस्तुत ओव्यांमध्ये बहिण-भावाचे नाते, आई-वडिलांचे प्रेम, सासुरवासातील वेदना आणि कुटुंबातील बदलते संबंध यांचे अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण आढळते.

जात्यावरच्या ओव्या हा महाराष्ट्राच्या लोकसाहित्याचा एक अमूल्य ठेवा आहे. या ओव्या कोणी रचल्या, त्या प्रथम केव्हा गायल्या गेल्या किंवा त्यांचा उगम नेमका कुठे झाला, याचा ठोस इतिहास उपलब्ध नाही. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, या ओव्या कोणत्याही एका कवीच्या लेखणीतून जन्मलेल्या नसून त्या ग्रामीण स्त्रियांच्या जीवनातून, त्यांच्या अनुभवांतून आणि भावविश्वातून निर्माण झालेल्या आहेत.

पहाटेच्या शांत वेळी घरातील स्त्रिया जात्यावर धान्य दळताना आपल्या मनातील सुख-दुःख, प्रेम, विरह, कष्ट, आशा, अपेक्षा आणि जीवनानुभव या ओव्यांतून व्यक्त करीत असत. त्यामुळे या ओव्या केवळ गीते नाहीत, तर ग्रामीण स्त्रीच्या अंतःकरणाचा आवाज आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, आईकडून मुलीकडे आणि आजीकडून नातीकडे त्या मौखिक परंपरेने पोहोचत राहिल्या. हेच त्यांचे खरे जतन होय.

काळ बदलला, गावोगावी गिरण्या आल्या, घराघरांत पिठाच्या चक्क्या पोहोचल्या आणि जात्याचा वापर हळूहळू कमी होत गेला. आज अनेक घरांत जाते केवळ आठवणींचा भाग बनले आहे. जात्याचा आवाज थांबला, दळणाची पद्धत बदलली; परंतु त्या जात्याभोवती विणलेले भावविश्व मात्र अजूनही जिवंत आहे. जाते काळाच्या उदरात गडप झाले, पण जात्यावरच्या ओव्या काळाच्या ओघातही टिकून राहिल्या.

आजही या ओव्या ऐकल्या की माहेराची ओढ, भावाबहिणीचे प्रेम, आईची माया, सासुरवासाचे दुःख आणि ग्रामीण जीवनातील साधेपणा डोळ्यांसमोर उभा राहतो. म्हणूनच जात्यावरच्या ओव्या या केवळ लोकगीते नसून आपल्या संस्कृतीच्या स्मृती, आपल्या मातीतल्या भावनांचा वारसा आणि ग्रामीण जीवनाचा जिवंत इतिहास आहेत. जोपर्यंत मराठी माणूस आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे, तोपर्यंत जात्यावरच्या ओव्या त्याच्या हृदयात चिरंतन जिवंत राहतील.

बहिण-भावाच्या प्रेमाची हळवी आठवण

"माळ्याच्या मळ्यामंदी उंच झाडाची दैनं, आण भावाची बहीण मागे वळून पाहीन" या ओवीत बहिणीच्या मनातील भावाविषयीची ओढ व्यक्त झाली आहे. माहेर सोडून सासरी निघालेली बहीण वारंवार मागे वळून पाहते, कारण तिथे तिचे बालपण, तिचा भाऊ आणि तिच्या आठवणी असतात.

"बहीण-भावंडं एका भाकरीचा काला, आण माझ्या भाऊराया एका कुशी जन्म झाला" या ओवीत बहिण सांगते की आम्ही एकाच आईच्या पोटी जन्मलो, एकाच भाकरीचे तुकडे खाऊन मोठे झालो. त्यामुळे आमचे नाते केवळ रक्ताचे नसून जिवाभावाचे आहे.

संसारामुळे बदलणारे नाते

"आनं आल्यात भावजया, नाही राहिली ओळख" या ओवीत विवाहित भावाच्या संसारानंतर बहिणीला जाणवणारा बदल व्यक्त झाला आहे. भावजई घरात आल्यावर भाऊ पूर्वीसारखा राहिला नाही, अशी खंत बहिणीच्या मनात आहे.

"बहीण भावाची जाळी कशानं तुटली, आणं बंधुला बाई माझ्या राणी अभंड भेटली" या ओवीत बहिणीला वाटते की भावाच्या आयुष्यात पत्नी आल्यामुळे त्यांच्या प्रेमाच्या नात्यात अंतर निर्माण झाले. ही भावना अनेक ग्रामीण कुटुंबांत दिसून येते.

माहेर आणि सासर यातील फरक

"आई बापाच्या राजी खाल्लं शिक्यावरचं लोणी, भावाच्या गं राजी ताकाला सत्ता नाही" या ओवीत माहेरी असताना मिळणारे प्रेम, लाड आणि स्वातंत्र्य यांची आठवण आहे. मात्र काळ बदलल्यावर त्याच घरात बहिणीचे स्थान बदलल्याची वेदना व्यक्त होते.

"आई बापाच्या राजी मोठं मोहळ मुलुख, आणं भावाच्या राजी बाई खोलीला कुलूप" या ओवीत आई-वडील जिवंत असताना घर आपले वाटत होते; पण त्यांच्या निधनानंतर किंवा काळ बदलल्यावर माहेर परके झाल्याची भावना व्यक्त झाली आहे.

सासुरवासातील दुःख

"बहिणीला सासुरवास भावाच्या कानी गेला, वाटभर घरी बंधू पाणी नाही प्याला" ही ओवी अत्यंत भावस्पर्शी आहे. बहिणीला सासरी होणारा त्रास कळताच भाऊ इतका व्याकूळ होतो की तो वाटेत पाणीही पीत नाही. यात भावाचे बहिणीवरील प्रेम आणि काळजी दिसून येते.

"बहिणीला सासुरवास जाऊन सांगतो आईला, लई जाच त्या बाईला" या ओवीत बहिणीच्या दुःखाची वेदना संपूर्ण कुटुंब अनुभवत असल्याचे चित्र दिसते.

आईचे महत्त्व

"माऊली गं माझी ती चौदा तोळ्याचं गं तानं, घडीभर करमेना माझ्या माऊली वाचूनं" या ओवीत आईचे महत्त्व सोन्यापेक्षाही मौल्यवान असल्याचे सांगितले आहे. आईशिवाय क्षणभरही करमत नाही, अशी मुलीची भावना आहे.

"दळण ग रांधनाचा कंटाळा नाही केला, माऊली माझी बया जन्म वाघिणीने दिला" या ओवीत आईने दिलेल्या कष्टाळूपणाची, धैर्याची आणि संघर्षशील वृत्तीची जाणीव व्यक्त होते.

भावाची माया

"भाऊ घेतो चोळी, भावजय आनमानी" या ओव्यांमध्ये बहिणीच्या छोट्या-छोट्या अपेक्षा दिसतात. भाऊ बहिणीसाठी चोळी आणतो, तिची काळजी घेतो, तिचे लाड करतो. ही ग्रामीण संस्कृतीतील भाऊ-बहीण नात्याची सुंदर परंपरा आहे.

अंतरीची माया कधी तुटत नाही

"बहिण भावाचा गं झगडा कोण गं सोडीन, अंतरीची माया चिखल पाण्याला सोडीना" या शेवटच्या ओवीत या सर्व ओव्यांचा सार दडलेला आहे. भाऊ-बहिणीत कितीही वाद झाले, रुसवे-फुगवे आले तरी त्यांच्या मनातील प्रेम कधी कमी होत नाही. जसा चिखल आणि पाणी एकमेकांपासून सहज वेगळे होत नाहीत, तशीच त्यांच्या अंतःकरणातील माया कधी तुटत नाही.

या जात्यावरच्या ओव्या ग्रामीण स्त्रीच्या भावविश्वाचे जिवंत दर्शन घडवतात. बहिण-भावाचे नाते, माहेराची ओढ, सासुरवासाचे दुःख, आईचे प्रेम आणि कुटुंबातील बदलते संबंध या सर्व भावना अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे या ओव्या केवळ लोकसाहित्य नसून ग्रामीण समाजाच्या संस्कृतीचे, मूल्यांचे आणि नातेसंबंधांचे अमूल्य सांस्कृतिक दस्तऐवज आहेत. त्या आजही ऐकताना डोळ्यांत पाणी आणतात आणि मनाला आपल्या मातीतल्या संस्कृतीची ओळख करून देतात. खाली काही ओव्यांचे ग्रामीण संदर्भासह अर्थ दिले आहेत.

जात्यावरच्या ओव्या : अर्थ आणि भावार्थ

१. ओवी

माळ्याच्या मळ्यामंदी

उंच झाडाची दैनं !

अन,भावाची बहीण

मागे वळून पाहीन!!

अर्थ : माहेर सोडून सासरी जाताना बहीण वारंवार मागे वळून पाहते. जसे मळ्यातील उंच झाड दूरवरूनही दिसते, तसेच तिच्या मनात भाऊ आणि माहेराच्या आठवणी कायम उभ्या असतात.

२. ओवी

बहीण - भावंडं

एका भाकरीचा काला !

अन, माझ्या भाऊराया

एका कुशी जन्म झाला !!

अर्थ : भाऊ आणि बहीण एकाच आईच्या पोटी जन्मलेले, एकाच भाकरीचे तुकडे खाऊन वाढलेले आहेत. त्यांच्या नात्यातील जिव्हाळा आणि रक्ताचे नाते यांचे वर्णन येथे केले आहे.

३. ओवी

वाटं नी चालली

वाण्या बामनाची जाळी

अन, तेच्या गं मेळ्या मंदी

बंधू माझा वनमाळी

अर्थ : जगात अनेक लोक असले तरी बहिणीच्या दृष्टीने तिचा भाऊच सर्वांत श्रेष्ठ आहे. "वनमाळी" हा शब्द येथे गुणी, देखणा किंवा प्रिय व्यक्तीसाठी वापरला आहे.

४. ओवी

सूर्या रं नारायणा

तापू नको रं लई

अनं, बंधूराजनं रे माझ्या

छतरी नेली नाही

अर्थ : उन्हात चालताना बहिण सूर्याला विनवते की जास्त तापू नको. कारण तिचा भाऊ तिच्यासोबत नाही आणि तिला संरक्षण देणारी छत्रीही नाही. येथे भाऊ म्हणजे आधाराचे प्रतीक आहे.

५. ओवी

बहीण - भावंडं

एका येलाची वाळकं

अनं, आल्यात, भावजया

नाही राहिली ओळख

अर्थ : भाऊ-बहीण लहानपणापासून एकत्र वाढले. पण भावजय घरात आल्यावर भावाच्या वागण्यात बदल झाल्याची खंत बहिण व्यक्त करते.

६. ओवी

बहीण भावाची

जाळी कशानं तुटली

अनं, बंधुला बाई माझ्या

राणी अभंड भेटली

अर्थ : भाऊ आणि बहिणीतील प्रेमाचे बंधन कसे तुटले, असा प्रश्न बहिण विचारते. त्याचे कारण म्हणजे भावाला भांडखोर पत्नी मिळाली आणि संसारात तो रमला.

७. ओवी

आई बापाच्या राजी

गुळाच्या गुळवेल्या

अनं, भावाच्या गं राजी

बहिणी पेडं वरुनी गेल्या

अर्थ : आई-वडिलांच्या काळात बहिणींना खूप मान-सन्मान होता. पण आता परिस्थिती बदलली असून त्यांचे महत्त्व कमी झाल्याची भावना व्यक्त केली आहे

८. ओवी

आई बापाच्या राजी

मोठं मोहळ मुलुख

आनं भावाच्या राजी

बाई खोलीला कुलूप

अर्थ : आई-वडील असताना संपूर्ण घर आपले वाटत होते. पण आता भावाच्या घरात स्वतःची पत कमी झाल्याची वेदना येथे व्यक्त होते.

९. ओवी

आई बापाच्या राजी

खाल्लं शिक्यावरचं लोणी

अन भावाच्या गं राजी

ताकाला सत्ता नाही

अर्थ : माहेरी लाडाने राहणारी मुलगी लग्नानंतर त्याच घरात परकी झाल्याची भावना या ओवीत दिसते.

१०. ओवी

भाऊ घेतो चोळी

भावजय आनमानी

अन चंद्र माझा नितं

चांदणीला कोण मानी

अर्थ : भाऊ बहिणीवर प्रेम करतो, तिच्यासाठी भेटवस्तू आणतो. पण भावजयला ते आवडत नाही. बहिणीला वाटते की तिचा भाऊ चंद्रासारखा आहे.

११. ओवी

गावावरून गं गेला

बंधू घरी नाही आला

अन कोणत्या गं गोष्टीचा

बंधूला राग आला

अर्थ : भाऊ घरी न आल्याने बहिण चिंतित झाली आहे. तिच्या मनात भावाविषयीची काळजी आणि प्रेम दिसते.

१२. ओवी

जातं ईश्वर तुला

वढून पाहिलं

अन माझ्या माऊलीचं दूध

तुझ्या कारणी लावलं

अर्थ : बहिण भावजयला उद्देशून म्हणते की माझ्या आईच्या दुधावर वाढलेल्या भावाला तू माझ्यापासून दूर केले आहे.

१३. ओवी

दळान दळीते

जसं हराणं पळातं

अन माझ्या माऊलीचे दूध

माझ्या मनगटी खेळतं

अर्थ : आईने दिलेल्या संस्कारांमुळे आणि शक्तीमुळे मी कोणत्याही कष्टाला घाबरत नाही.

१४. ओवी

माऊली गं माझी ती

चौदा तोळ्याचं गं तानं

अन घडीभर करमेना

माझ्या माऊली वाचूनं

अर्थ : आई सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. तिच्याशिवाय क्षणभरही करमत नाही.

१५. ओवी

बहिणीला सासुरवास

भावाच्या कानी गेला

अन वाट भर घरी बंधू

पाणी नाही प्याला

अर्थ : बहिणीला सासरी त्रास होत असल्याचे कळताच भाऊ व्याकूळ होतो. तिच्या दुःखाने त्याला चैन पडत नाही..

१६. ओवी

बापाने दिली लेकं

विहिरी पाहिल्या पाण्याच्या

अन भावाने दिली बहीण

कनगी पाहिल्या धान्याच्या

अर्थ : मुलीचे लग्न करताना तिच्या सुखाचा विचार केला जातो. भाऊही बहिणीला चांगल्या, समृद्ध घरात देण्याचा प्रयत्न करतो.

१७. ओवी

बहिण भावाचा गं झगडा

कोण गं सोडीन

अन अंतरीची माया

चिखल पाण्याला सोडीना

अर्थ : भाऊ-बहिणीत भांडणे होतात, रुसवे-फुगवे होतात; पण अंतःकरणातील प्रेम कधीही संपत नाही. चिखल आणि पाणी जसे सहज वेगळे होत नाहीत, तसे हे नातेही अतूट असते. 

१८. बहिणीच्या गावा जाया सांगतो सतरा वढी...

ओवी :

बहिणीच्या गावा जाया

सांगतो सतरा वढी

अन सासरवाडीला ग जाया

नंदी पयोनीचा सोडी

अर्थ :

या ओवीत विवाहित भावाच्या बदललेल्या वागणुकीवर बहिणीने मार्मिक भाष्य केले आहे. बहिणीच्या गावी जाण्याचा विषय निघाला की भाऊ अनेक कारणे, सबबी आणि अडचणी सांगतो. तो जाणे टाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु सासरवाडीला जाण्याची वेळ आली की तो कोणतीही सबब न सांगता तत्परतेने निघतो. संसारात रमलेल्या भावाच्या वागणुकीमुळे बहिणीच्या मनात निर्माण झालेली खंत आणि उपेक्षेची भावना या ओवीत व्यक्त झाली आहे.

१९. बहिणीच्या गावा जाया याची सकण तुटली...

ओवी :

बहिणीच्या गावा जाया

याची सकण तुटली

अन सासरवाडीला ग जाया

गाडी यानी गं जुपली

अर्थ :

बहिणीच्या गावी जाण्याची वेळ आली की भावाला अनेक अडचणी दिसू लागतात. कधी गाडी बिघडली, कधी जू तुटले, कधी दुसरे काही कारण पुढे केले जाते. मात्र सासरवाडीला जाण्याचे ठरले की त्याच गाडीला जूंपून प्रवासाची तयारी लगेच होते. बहिणीच्या नात्यापेक्षा पत्नीच्या नात्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याची बहिणीच्या मनातील वेदना या ओवीत अत्यंत उपरोधिक पद्धतीने व्यक्त झाली आहे.

२०. भाऊ घेतो चोळी भावजय डोळं मोडी...

ओवी :

भाऊ घेतो चोळी

भावजय डोळं मोडी

अन सांगते शिंप्या दादा

खणाची घाल घडी

अर्थ :

भाऊ बहिणीवर प्रेमाने चोळी घेऊन देतो; पण भावजयला ते आवडत नाही. बहिण मात्र शिंप्याला चोळी सुंदर शिवण्यास सांगते. या ओवीत भावाच्या प्रेमाविषयीचा आनंद आणि भावजयबद्दलची खंत व्यक्त झाली आहे.

२१. भाऊ घेतो चोळी भावजय तिथं आली...

ओवी :

भाऊ घेतो चोळी

भावजय तिथं आली

अन रुपयाची चोळी

पाव नं कमी केली

अर्थ :

बहिणीसाठी घेतलेल्या वस्तूमध्ये भावजय हस्तक्षेप करते किंवा तिच्या खर्चावर मर्यादा आणते, अशी भावना या ओवीत व्यक्त झाली आहे. बहिणीच्या मनातील भावजयविषयीची सल येथे दिसून येते.

२२. मापायला गेली मी तं हजाराला भारी...

ओवी :

मापायला गेली मी

तं हजाराला भारी

अन हलकी वाटते तुला

भावजय नारी

अर्थ :

बहिण स्वतःच्या मूल्याची जाणीव करून देते. ती म्हणते की माझी किंमत मोठी आहे, परंतु भावजय मला कमी लेखते. ही ओवी स्त्रीच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देते.

२३. दळण ग रांधनाचा कंटाळा नाही केला.

ओवी :

दळण ग रांधनाचा

कंटाळा नाही केला

अन माऊली माझी बया

जन्म वाघिणीने दिला

अर्थ :

ग्रामीण स्त्री कष्टांना घाबरत नाही. आईने दिलेल्या संस्कारांमुळे आणि धैर्यामुळे ती संसारातील सर्व कामे आनंदाने करते. "वाघिणीने दिला जन्म" ही प्रतिमा तिच्या आईच्या जिद्दीचे प्रतीक आहे.

२४. सासुरवासिनी गं साऱ्या या, का निघाल्या उन्हाच्या...

ओवी :

सासुरवासिनी गं साऱ्या या,

का गं निघाल्या उन्हाच्या?

अन आई बापा विना

भाऊ भावजाया कोणाच्च्या 

अर्थ :

 माहेरी जात असलेल्या वाटसरू सासुरवाशींनी ना ती म्हणते एवढ्या उन्हातान्हातून तुम्ही कुठे चालला आहात? त्या माहेरी चालले आहेत हे कळल्यावर आई वडील आहेत तोपर्यंतच माहेर. त्याच्यानंतर माहेराला काही अर्थ नाही.

आई-वडिलांच्या निधनानंतर माहेरचा आधार कमी होतो. अशा वेळी भाऊ आणि भावजय यांच्याशी असलेले नातेही बदलू शकते. या ओवीत स्त्रीच्या असुरक्षिततेची भावना व्यक्त झाली आहे.

२५. सासुरवाशीनीची मला येते गं बाई किंवं...

ओवी :

सासुरवाशीनीची मला

येते गं बाई, किंवं

अन सासरी माझी मैना

तिच्यापाशी माझा जीव

अर्थ :

सासरी गेलेल्या व तिथे खूप सासुरवास असलेल्या  मुलीची आठवण सतत मनात येते. तिच्याशी असलेले भावनिक नाते आणि जिव्हाळा या ओवीत व्यक्त झाला आहे.

२६. सासुरवाशींनी गं बस माझ्या बाई वसरीला...

ओवी :

सासुरवाशींनी गं बस

माझ्या बाई वसरीला

अन तुझ्या गं शीनयाची

मैना माझी सासरला

अर्थ :

सासरी चाललेल्या वाटसरू मुलीला ती म्हणते घडीभर माझ्या घराच्या ओसरीवर बस, पाणी पी, भाकर तुकडा खा. तुझ्याच वयाची माझी मुलगी सासुरवाशीन आहे. त्यामुळे तू सुद्धा माझी मुलगीच समाज. 

सासुरवाशिणी स्त्रियांमध्ये एक वेगळे भावनिक बंध असतात. एकमेकींचे दुःख समजून घेणे, आधार देणे आणि आपुलकी जपणे हा या ओवीचा मुख्य आशय आहे.

२७. सासुरवास काही असू माझा गं मला...

ओवी :

सासुरवास काही असू

माझा गं मला

अन सांगते, बंधू राया

सोयऱ्याशी हसून बोला

अर्थ :

सासरी कितीही अडचणी आल्या तरी नातेसंबंध जपणे महत्त्वाचे आहे. बहिण भावाला समजावते की नातेवाईकांशी प्रेमाने आणि आदराने बोल.

२८. .आई बापाच्या राजी गुळाच्या गुळवेल्या...

ओवी :

आई बापाच्या राजी

गुळाच्या गुळवेल्या

अनं भावाच्या गं राजी

बहिणी पेडं वरुनी गेल्या

अर्थ : आई-वडिलांच्या काळात बहिणींना घरात प्रेम, मान आणि गोडवा मिळत असे. गुळवेलीसारखा तो स्नेह सर्वत्र पसरलेला होता. पण काळ बदलला, भावाचा संसार सुरू झाला आणि बहिणींचे माहेरातील स्थान पूर्वीसारखे राहिले नाही, अशी खंत या ओवीत व्यक्त होते.

२९. भाऊ घेतो चोळी भावजय आनमानी...

ओवी :

भाऊ घेतो चोळी

भावजय आनमानी

अन चंद्र माझा नितं

चांदणीला कोण मानी

अर्थ : बहिणीच्या दृष्टीने तिचा भाऊ चंद्रासारखा सुंदर आणि प्रिय आहे. त्यामुळे भावजयच्या नाराजीची तिला पर्वा वाटत नाही. भावाविषयीचे अपार प्रेम या ओवीत दिसून येते.

३०. गावावरून गं गेला बंधू घरी नाही आला...

ओवी :

गावावरून गं गेला

बंधू घरी नाही आला

अन कोणत्या गं गोष्टीचा

बंधूला राग आला

अर्थ : भाऊ घरात न आल्याने बहिण चिंतेत पडते. त्याला कोणाचा राग आला असेल का, काही दुःख झाले असेल का, अशी काळजी तिच्या मनात निर्माण होते. भावावरील प्रेमाचे हे सूक्ष्म चित्रण आहे.

३१. जातं ईश्वर तुला वढून पाहिलं...

ओवी :

जातं ईश्वर तुला

वढून पाहिलं

अन माझ्या माऊलीचं दूध

तुझ्या कारणी लावलं

अर्थ : ही ओवी भावजयला उद्देशून म्हटलेली आहे. बहिणीला वाटते की आईच्या दुधावर वाढलेला भाऊ आता तिच्यापासून दूर गेला आहे. त्यामुळे ती भावजयबद्दल नाराजी व्यक्त करते.

३२. दळान दळीते जसं हराणं पळातं...

ओवी :

दळान दळीते

जसं हरानं पळातं

अन माझ्या माऊलीचे दूध

माझ्या मनगटी खेळतं.

अर्थ : आईच्या दुधातून मिळालेली ताकद आणि संस्कार माझ्या अंगात आहेत. त्यामुळे मी कोणत्याही संकटाला किंवा कष्टाला घाबरत नाही, असे या ओवीत स्त्री अभिमानाने सांगते.

३३. सासुरवासिनी गं साऱ्या या, का निघाल्या उन्हाच्या...

ओवी :

सासुरवासिनी गं साऱ्या

या, का निघाल्या उन्हाच्या?

अन आई बापा विना

भाऊ भावजाया कोणाच्या

अर्थ : बहिणीला सासरी खूप त्रास होत असल्याचे समजल्यावर तिच्या दुःखाची बातमी आईपर्यंत पोहोचवली जाते. मुलीच्या वेदनेत संपूर्ण माहेर सहभागी होते, ही भावना येथे व्यक्त होते.

या ओव्या केवळ लोकगीत नसून ग्रामीण स्त्रीच्या भावविश्वाचे, कुटुंबव्यवस्थेचे आणि सामाजिक वास्तवाचे जिवंत दस्तऐवज आहेत. त्यामध्ये बहिण-भावाचे प्रेम, आईची माया, सासुरवासाचे दुःख, भावजयशी असलेले संबंध आणि माहेराविषयीची ओढ यांचे अत्यंत प्रभावी चित्रण आढळते. त्यामुळे या ओव्या महाराष्ट्राच्या लोकसाहित्याचा अमूल्य सांस्कृतिक वारसा मानल्या जातात.

रामदास तळपे ( ग्रामीण संस्कृती)






कातकरी समाजाच्या सपना वाघमारे यांची प्रेरणादायी झेप

ऊसतोडीपासून लंडनपर्यंत : कातकरी समाजाच्या सपना वाघमारे यांची प्रेरणादायी झेप

"मी शिकले नसते, तर मलाही ऊसतोडीसाठी जावं लागलं असतं..."

हे शब्द आहेत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चिंचवली येथील कातकरी समाजातील तरुणी सपना राजेश वाघमारे हिचे. या एका वाक्यात केवळ तिचा वैयक्तिक संघर्ष नाही, तर संपूर्ण कातकरी समाजाचे वास्तव सामावलेले आहे.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका छोट्याशा आदिवासी वाडीपासून सुरू झालेला तिचा प्रवास आज थेट इंग्लंडमधील लंडनपर्यंत पोहोचला आहे. आदिवासी विकास विभागाच्या ग्लोबल स्कॉलरशिप कार्यक्रमांतर्गत तिला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स आणि क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन या प्रतिष्ठित संस्थांकडून तिला एलएलएम अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी प्राप्त झाली आहे.

संघर्षातून उभी राहिलेली जिद्द

सपना वाघमारे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील चिंचवली या आदिवासी वाडीत झाला. तिचे आई-वडील उदरनिर्वाहासाठी ऊसतोडीच्या कामासाठी स्थलांतरित होत असत. अशा परिस्थितीत अनेक मुलांचे शिक्षण अर्धवट राहते. मात्र, सपनाच्या आयुष्यात तिचे आजी-आजोबा आणि मामा भिवा पवार यांनी आधारस्तंभाची भूमिका बजावली.

आई-वडील मजुरीसाठी बाहेर असताना त्यांनी सपनाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. रोहा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने माणगाव तालुक्यातील वनवासी कल्याण आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. पुढे पुण्यात जाऊन तिने नोकरी करत-करत गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबीची पदवी संपादन केली.

समाजातील वास्तवाने घडवली वकील

सपना सांगते की, तिने कायद्याचे शिक्षण केवळ करिअरसाठी निवडले नाही. तिच्या निर्णयामागे कातकरी समाजातील महिलांवरील अत्याचार, अन्याय आणि असुरक्षितता हे वास्तव होते.

तिच्या मते, समाजातील अनेक महिला आजही आपले प्रश्न उघडपणे मांडू शकत नाहीत. त्यांना कायद्याची माहिती नाही, त्यांच्यासाठी लढणारे प्रतिनिधित्व कमी आहे. त्यामुळे तिला वकील बनून आपल्या समाजातील महिलांना न्याय मिळवून देण्याची प्रेरणा मिळाली.

शिक्षण म्हणजे परिवर्तनाचे साधन

सपना वाघमारे यांची सर्वात महत्त्वाची जाणीव म्हणजे शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.

ती स्पष्टपणे सांगते "मी शिकले नसते, तर मलाही ऊसतोडीसाठी जावं लागलं असतं."»

हे विधान कातकरी समाजातील हजारो मुलांच्या वास्तवावर प्रकाश टाकते. स्थलांतर, दारिद्र्य, बालविवाह आणि शिक्षणातील गळती या समस्यांमुळे अनेक मुलांचे भविष्य अंधारात जाते. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणाच्या संधी मिळाल्यास परिवर्तन शक्य आहे, हे सपनाने सिद्ध करून दाखवले.

नव्या पिढीची आशा

रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातून वकील होणारी आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारी ती पहिल्या महिलांपैकी एक मानली जाते. तिचे यश केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून संपूर्ण कातकरी समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.

तिच्या यशामुळे कातकरी समाजातील मुलींसमोर शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहेत. समाजातील अनेक तरुण-तरुणींना आता उच्च शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.

समाजासाठी काम करण्याची बांधिलकी

लंडनमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्या समाजासाठी काम करण्याचा तिचा दृढ निश्चय आहे. स्थलांतरित मजूर कुटुंबांची मुले, बालविवाह, महिलांवरील अत्याचार, साक्षरतेचा अभाव आणि कायदेशीर हक्कांविषयी जागृती या क्षेत्रांत काम करण्याची तिची इच्छा आहे.

कातकरी समाजाचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. परंतु या संघर्षमय इतिहासातूनच सपना वाघमारे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडतात. चिंचवलीच्या आदिवासी वाडीतून सुरू झालेला तिचा प्रवास लंडनपर्यंत पोहोचला असला, तरी तिचे पाय अजूनही आपल्या समाजाच्या मातीत घट्ट रोवलेले आहेत.

सपना वाघमारे यांची यशोगाथा ही केवळ एका विद्यार्थिनीची कथा नसून शिक्षण, जिद्द आणि सामाजिक बांधिलकी यांच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही कशी साकार होऊ शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जिवंत वारसा

महाराष्ट्राची लोकसंस्कृती ही अत्यंत समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे. ग्रामीण जीवन, शेती, सण-उत्सव, देव-धर्म, प्रेम, विरह, पराक्रम आणि सामाजिक परंपरा यांचे जिवंत चित्र मराठी लोकगीतांमध्ये दिसून येते. 

प्राचीन काळापासून लोकांच्या भावना, अनुभव आणि जीवनपद्धती शब्दबद्ध करून जपणारे हे लोकसंगीत आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे.

मराठी लोकगीते ही केवळ मनोरंजनाची साधने नव्हती, तर ती समाजशिक्षण, इतिहास, संस्कार आणि लोकपरंपरा जपण्याचे प्रभावी माध्यम होती. गावागावांत, वाड्यावस्त्यांत, शेतात, देवळात आणि सणसमारंभांत ही गीते गायली जात असत.

मराठी लोकगीत म्हणजे काय?

लोकांच्या तोंडी परंपरेतून पिढ्यान् पिढ्या चालत आलेली गीते म्हणजे लोकगीते. यांचा कोणताही विशिष्ट लेखक नसतो. समाजातील सामान्य लोकांनी आपल्या अनुभवांमधून ही गीते निर्माण केली. त्यामुळे लोकगीतांमध्ये वास्तव जीवनाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते.

प्राचीन मराठी लोकगीतांचे प्रमुख प्रकार

१. ओव्या

ओवी हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन लोकगीत प्रकार मानला जातो. स्त्रिया दळण-कांडण, जात्यावर काम करताना किंवा घरकामाच्या वेळी ओव्या म्हणत असत.

पूर्वी पहाटेचा पहिला कोंबडा अरवल्यावर स्त्रियांना उठून दळणाची तयारी करावी लागे. त्यावेळी आजच्यासारख्या गिरणी नव्हत्या. प्रत्येकाच्या घरी जाते असायचे.

जात्यावर दळता दळता स्त्रिया अतिशय सुंदर अशा ओव्या गात असत. या ओव्या दूरपर्यंत शिवारात ऐकायला येत. पहाटेच्या त्या सुखद गारव्यात त्या सुंदर ओव्या ऐकून मन तृप्त होत असे.

परंतु आता मात्र ही कला पूर्णपणे लोप पावली आहे.

ओव्यांची वैशिष्ट्ये.

साधी आणि भावस्पर्शी भाषा,

स्त्रियांच्या भावना आणि दुःखांचे चित्रण,

कौटुंबिक जीवनाचे वास्तव दर्शन

उदाहरण

जात्यावरची ओवी

दळ दळ जात्या, दळ ग माये

संसाराचा भार पडला खांद्यावरी |

लेकीच्या माहेरा, ऊन कडक पडलं

माय माऊलीची छाया, माझ्या मनाला ग पडली ||

​दळ दळ जात्या, दळ ग माये

संसाराचा भार पडला खांद्यावरी |

बापाच्या अंगणी, पारिजात फुलला

सासरच्या उन्हात, जीव माझा ग कोमेजला ||

​दळ दळ जात्या, दळ ग माये

संसाराचा भार पडला खांद्यावरी |

विठ्ठलाच्या पायी, वाहिली तुळस

मायबापाच्या पुण्याईचा, संसाराला ग कळस ||

ओव्यांमध्ये आईचे प्रेम, सासुरवास, पतीवरील भावना आणि ग्रामीण जीवनाचे सुंदर चित्र दिसते.

२. लावणी

लावणी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य आणि अत्यंत लोकप्रिय लोककला प्रकार आहे. शृंगार, भक्ती आणि समाजप्रबोधन यांचा मेळ घालणारी ही कला प्रामुख्याने तमाशा या लोकनाट्याचा मुख्य भाग आहे.
लावणीची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
१. शब्दाची उत्पत्ती आणि अर्थ
'लावणी' हा शब्द 'लावण्य' (सौंदर्य) या शब्दावरून आला आहे. एखाद्या विषयाचे किंवा रूपाचे लावण्य शब्दांतून आणि नृत्यातून साकारणे म्हणजे लावणी.
२. प्रमुख प्रकार
विषय आणि सादरीकरणानुसार लावणीचे दोन मुख्य प्रकार पडतात:
शृंगारिक लावणी 
यात स्त्रीचे सौंदर्य, प्रेम, विरह आणि मानवी भावनांचे दर्शन घडते. ही लावणी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी गायली व नाचली जाते.
निर्गुणी लावणी: 
यात अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि मानवी जीवनाचे नश्वरत्व यावर भाष्य केले जाते. संत परंपरेचा प्रभाव या लावणीवर जाणवतो.
३. सादरीकरणाची पद्धत
नृत्य आणि अभिनय: 
लावणी सादर करणाऱ्या नर्तकीला कलावंत' म्हणतात. लावणीत नृत्यासोबतच 'अदाकारी' (चेहऱ्यावरील हावभाव) आणि 'आंगिक अभिनय' यांना अत्यंत महत्त्व असते.
वेशभूषा: 
नर्तकी नऊवारी साडी, नाकात नथ, हातात हिरवा चुडा आणि पायात जड घुंगरू परिधान करते.
बैठकीची लावणी: 
पूर्वीच्या काळी ही लावणी एका ठिकाणी बसून केवळ शब्दांच्या आणि अभिनयाच्या जोरावर सादर केली जात असे.
४. वाद्यसंगीत
लावणीची लय पकडण्यासाठी खालील वाद्ये वापरली जातात:
ढोलकी: 
हे लावणीचे प्राण आहे. ढोलकीच्या ठेक्याशिवाय लावणी अपूर्ण आहे.
तुणतुणे आणि खंजिरी: 
सुरासाठी आणि तालासाठी ही वाद्ये वापरली जातात.
५. प्रसिद्ध शाहिर आणि योगदान
पेशवेकाळ: 
या काळात राम जोशी, प्रभाकर, होनाजी बाळा आणि सगनभाऊ यांसारख्या शाहिरांनी लावणीला सुवर्णकाळ मिळवून दिला. होनाजी बाळा यांनी लावणीला शास्त्रीय संगीताची जोड दिली.
आधुनिक काळ:
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर, कांताबाई सातारकर व सुरेखा पुणेकर यांसारख्या कलाकारांनी ही कला जगभरात पोहोचवली.
६. सांस्कृतिक स्थान
लावणी ही केवळ करमणूक नसून ती महाराष्ट्राच्या मातीतील एक जिवंत कला आहे. ग्रामीण जीवनापासून ते मराठी चित्रपटांपर्यंत लावणीने आपले स्थान अढळ राखले आहे. 'ठसकेबाज' गायकी आणि 'लयबद्ध' पायकाम ही लावणीची खास वैशिष्ट्ये मानली जातात.
थोडक्यात सांगायचे तर  लावणी म्हणजे नृत्यातील डौल, संगीतातील गोडवा आणि मराठी मनाचा जिवंतपणा यांचा सुंदर संगम आहे.

३. भारूड

संत संत एकनाथ यांनी भारूड या प्रकाराला विशेष उंची दिली. भारूडामध्ये अध्यात्म, समाजप्रबोधन आणि विनोद यांचा सुंदर संगम आढळतो.

भारूडाची वैशिष्ट्ये

रूपकात्मक शैली, सामाजिक संदेश, विनोदी आणि उपरोधिक भाषा

उदाहरण

“विंचू चावला, वृश्चिक चावला...”

भारूडातून अंधश्रद्धा, लोभ आणि समाजातील दोषांवर प्रहार केला जात असे.

पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मात्र भारुडाचा बाज हा वेगळा होता. त्याला प्रसादिक भारूड असेही म्हटले जाते. रामायण, कृष्ण लीला, पुराणातील वेगवेगळे प्रसंग भारुडांच्या द्वारे प्रबोधनाचे काम करत असत.

पश्चिम भागात विठू नांगरे, बाबुराव गुंजाळ, सीताराम मुऱ्हे, रामू न्हावी (टोकावडे), धामणगाव, नाव्हाचीवडी, सरेवाडी (नायफड), पोखरी, गोहे, पवळेवाडी, देवतोराणे या गावच्या कलाकारांनी भारुडाची कला महाराष्ट्रात नेण्याचे काम केले.

४. अभंग

अभंग हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा लोकगीत प्रकार आहे. भक्ती आणि अध्यात्म यांचे सुंदर दर्शन अभंगांमध्ये होते.

प्रमुख संत

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सावता माळी, रोहिदास,

उदाहरण

रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजणी 

पैल तो गे काऊ कोकताहे 

अभंगांमधून भक्ती, मानवता आणि समानतेचा संदेश दिला गेला.

महाराष्ट्रातील दिग्गज संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अनेक अभंग लता मंगेशकर यांच्या आवाजात संगीतबद्ध केले. त्याची गोडी अजूनही कायम टिकून आहे.

अजित कडकडे, सुरेश वाडकर यांनी अभंग त्यांच्या गायकीने अजरामर केले. 

५. गोंधळ

महाराष्ट्रातील गोंधळ' ही एक अत्यंत प्राचीन, समृद्ध आणि लोकप्रिय लोककला आहे. हा केवळ मनोरंजनाचा प्रकार नसून ते एक धार्मिक विधीनाट्य आहे.
गोंधळाविषयीची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे.
१. स्वरूप आणि धार्मिक महत्त्व.
गोंधळ हा प्रामुख्याने देवीच्या (अंबाबाई, तुळजाभवानी, रेणुकामाता) आराधनेसाठी घातला जातो. महाराष्ट्रात कुलधर्म-कुलाचार म्हणून लग्न, मुंज किंवा नवीन वास्तूशांती यांसारख्या शुभ कार्यानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे. 'आईचा गोंधळ' घालून देवीला प्रसन्न करणे आणि तिचे आभार मानणे हा यामागचा मुख्य उद्देश असतो.
२. गोंधळी (कलाकार)
गोंधळ घालणाऱ्या कलाकारांना 'गोंधळी' म्हणतात. हे लोक परंपरेने ही कला जोपासतात.
वेशभूषा
गोंधळी सहसा अंगरखा, धोतर आणि डोक्याला मानाचा पटका किंवा पागोटे घालतात. त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ असते.
वाद्ये
गोंधळामध्ये 'संबळ' आणि 'तुणतुणे' ही दोन प्रमुख वाद्ये वापरली जातात. सोबत टाळ आणि खंजिरीचा वापर होतो.

३. गोंधळाचे सादरीकरण

गोंधळाचे दोन मुख्य भाग असतात.

पूर्वरंग
यामध्ये गण (गणपतीची स्तुती), कुलदेवतेचे आवाहन आणि सुप्रसिद्ध 'अंबाबाईचा जोगवा' यांचा समावेश असतो.

उत्तरंग
यामध्ये पौराणिक कथा, आख्याने किंवा लोककथा सांगितल्या जातात. हे सादरीकरण गाणी आणि संवादांच्या माध्यमातून केले जाते.
४. प्रमुख प्रकार
महाराष्ट्रात गोंधळाचे प्रामुख्याने दोन प्रकार आढळतात:
1. कदमराई गोंधळ
हे गोंधळी तुळजाभवानीचे भक्त असतात.
2.रेणुराई गोंधळ
हे गोंधळी माहूरच्या रेणुकादेवीचे भक्त असतात.
५. सामाजिक महत्त्व
गोंधळाच्या माध्यमातून केवळ धार्मिक कथाच सांगितल्या जात नाहीत, तर त्यातून समाजप्रबोधनही केले जाते. साध्या, सोप्या भाषेत आणि लोकसंगीताच्या लयीत सादर होणारा हा प्रकार महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे.
थोडक्यात सांगायचे तर "उदे गं अंबाबाई, उदे!" च्या जयघोषात आणि संबळाच्या कडकडाटात सादर होणारा गोंधळ म्हणजे महाराष्ट्राच्या भक्तीचा आणि शक्तीचा एक आगळावेगळा आविष्कार आहे.

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव जवळील पिंपळगाव येथील श्री. प्रकाश अण्णा पाचंगे यांनी जागरण गोंधळ ही लोकपरंपरा महाराष्ट्रात पुढे नेण्याचे काम केले आहे. अजूनही त्यांचे कार्य अविश्रांत चालू आहे.

६. पोवाडा

पोवाडा हा महाराष्ट्रातील वीररसाने ओतप्रोत भरलेला एक अत्यंत प्रभावी लोककला प्रकार आहे. ऐतिहासिक घटना आणि शौर्यगाथा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे हे एक महत्त्वाचे माध्यम राहिले आहे.
पोवाड्याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
१. स्वरूप आणि विषय
पोवाडा म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शौर्याचे, पराक्रमाचे किंवा ऐतिहासिक घटनेचे केलेले गुणगान.
यात मुख्यत्वे वीररस असतो, पण काही वेळा करुण किंवा हास्यरसाचाही वापर केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्यातील मावळ्यांच्या पराक्रमावर आधारित पोवाडे सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
२. शाहीर आणि सादरीकरण
पोवाडा रचणाऱ्या आणि गाणाऱ्या कलाकाराला 'शाहीर' असे म्हणतात.
शाहीर हातात डफ घेऊन आणि पायात घुंगरू बांधून उभा राहून पोवाडा सादर करतो.
त्याला साथ देणाऱ्या इतर कलाकारांना 'झिलकरी' म्हणतात, जे शाहिराच्या ओळींचा शेवटचा भाग उचलून धरतात.
३. प्रमुख वाद्ये
पोवाड्याची लय आणि जोम टिकवण्यासाठी खालील वाद्यांचा वापर होतो:
डफ: हे पोवाड्याचे मुख्य वाद्य आहे.
तुणतुणे: सुरासाठी याचा वापर केला जातो.
खंजिरी किंवा टाळ  तालासाठी वापरले जातात.
४. रचना (ढब)
पोवाड्याची सुरुवात सहसा 'गण' (गणपतीची स्तुती) करून होते.
त्यानंतर मुख्य विषयाला सुरुवात होते, ज्याला 'चाल'असेही म्हणतात.
पोवाड्याच्या प्रत्येक कडव्याला चौक' म्हणतात.
५. ऐतिहासिक महत्त्व
शिवकाळ
या काळात अफझलखानाचा वध, तानाजी मालुसरे यांचा पराक्रम यांवर रचलेले पोवाडे सैन्यात उत्साह भरण्याचे काम करत. (उदा. अज्ञानदास शाहीराने गायलेला अफझलखान वधाचा पोवाडा).
पेशवेकाळ:
या काळात राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ यांसारख्या प्रसिद्ध शाहिरांनी पोवाडा अधिक समृद्ध केला.
स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. ना. गव्हाणकर यांनी पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती केली.

थोडक्यात सांगायचे तर पोवाडा म्हणजे केवळ गाणे नसून तो महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाचा जिवंत दस्तऐवज आहे. 'जी जी जी...' या ललकारीने श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणण्याची ताकद या लोककलेत आहे.

७. भजन आणि कीर्तन

महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाने आणि भक्ती परंपरेने दिलेली भजन आणि कीर्तन ही दोन अमूल्य दाने आहेत. या दोन्ही माध्यमातून ईश्वराची भक्ती आणि नामस्मरण केले जाते.
१. भजन 
भजन म्हणजे ईश्वराचे नामस्मरण किंवा स्तुती गाणे. हे सामूहिक किंवा वैयक्तिक रित्या केले जाते.
स्वरूप: 
भजनात प्रामुख्याने संतांनी रचलेले अभंग, पदे किंवा ओव्या गायल्या जातात. यात साधेपणा आणि भक्तीभाव महत्त्वाचा असतो. शब्दांमधील अर्थापेक्षा त्यातील आर्ततेवर भाविकांचा जास्त भर असतो.
वाद्ये: 
टाळ, मृदंग (किंवा पखवाज) आणि विणा ही भजनाची मुख्य वाद्ये आहेत. सुरासाठी हार्मोनियमचा वापर केला जातो.
प्रकार: 
महाराष्ट्रात 'चक्री भजन' आणि 'उभे भजन' हे दोन प्रकार विशेष लोकप्रिय आहेत. चक्री भजनात भजनी मंडळ गोलाकार बसून किंवा फेर धरून भजन करतात, तर उभे भजनात वारकरी उभे राहून टाळाच्या ठेक्यावर विठ्ठलनामाचा गजर करतात. ग्रामीण भागात संगीत भजनाला फार महत्त्व आले आहे.अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रने संगीत भजनाची सुरुवात होत असते. यामध्ये अभंग गवळणी आणि भैरवी इत्यादी प्रकार असतात.
महत्व: 
भजनामुळे मन एकाग्र होते आणि सामूहिक रित्या नामस्मरण केल्याने समाजात एकात्मतेची भावना वाढीस लागते.
२. कीर्तन 
कीर्तन हे केवळ गायन नसून ते एक 'विधीनाट्य' किंवा 'प्रबोधन' करण्याचे प्रभावी माध्यम आहे. "कीर्तनाद्वारे जग उद्धरूं" असे संत नामदेवांनी म्हटले असून, त्यांनीच ही परंपरा खऱ्या अर्थाने रुजवली.
स्वरूप:
कीर्तनात गायन, वादन, नर्तन आणि निरूपण (व्याख्यान) यांचा सुंदर संगम असतो. कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला 'कीर्तनकार' किंवा 'हरिदास' म्हणतात. ते एखादा अभंग केंद्रस्थानी ठेवून त्यावर आधारित विवेचन करतात.
पद्धत: 
कीर्तनकार आपल्या विवेचनात पौराणिक कथा, संतांचे दाखले (दृष्टांत) आणि श्लोक सांगून विषयाची मांडणी करतात. यामुळे क्लिष्ट आध्यात्मिक विषयही सर्वसामान्यांना सहज समजतात.

महाराष्ट्रातील प्रमुख परंपरा:

वारकरी कीर्तन: 
यात पूर्णतः विठ्ठल भक्ती आणि संतांच्या शिकवणुकीवर भर असतो. यात 'नाम संकीर्तनाला' सर्वाधिक महत्त्व दिले जाते.
नारदीय कीर्तन: 
यात कथाकथन किंवा आख्यान सांगण्यावर जास्त भर असतो. याचे 'पूर्वरंग' (तत्त्वज्ञान) आणि 'उत्तरंग' (कथा) असे दोन भाग पडतात.
 उद्देश:
 ईश्वरी भक्तीचा प्रसार करण्यासोबतच समाजाचे नैतिक, आध्यात्मिक आणि वैचारिक प्रबोधन करणे हा कीर्तनाचा मुख्य उद्देश असतो.
थोडक्यात सांगायचे तर भजन आणि कीर्तन ही महाराष्ट्राच्या आध्यात्मिक संस्कृतीची दोन मुख्य अंगे आहेत. भजनातून भक्तीचा आनंद मिळतो, तर कीर्तनातून भक्तीसोबतच जगण्याचे ज्ञानही मिळते. 'नामदेव पायरी' पासून ते आधुनिक 'सागर महाराज शिर्के यांच्या' कीर्तनापर्यंत या परंपरेने महाराष्ट्राची माती आणि मने सुसंस्कृत केली आहेत.

८. अंगाईगीते

अंगाईगीत हे महाराष्ट्राच्या लोक साहित्यातील आणि संस्कारांमधील एक अत्यंत हळुवार आणि वात्सल्यपूर्ण अंग आहे. लहान मुलाला झोपवण्यासाठी आईने गायलेले हे एक भावूक गाणे असते.
अंगाईगीतांची महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.
१. स्वरूप आणि भाव
अंगाईगीत हे मुख्यत्वे वात्सल्य रसात (प्रेम आणि ममता) गुंफलेले असते.
 या गाण्यांचा सूर अत्यंत कोमल, संथ आणि लयबद्ध असतो, ज्यामुळे बाळाला शांत झोप लागते.
यात केवळ आईचे प्रेमच नाही, तर बाळाचे कौतुक, त्याला मिळणारी सुखसोयींची स्वप्ने आणि घरातील इतर नात्यांचे संदर्भही येतात.
२. विषयांची विविधता
निसर्ग, चांदोबा, चिमणी-पाखरं, पाळणा, आणि झुलणारी फांदी अशा प्रतिमांचा वापर केला जातो. (उदा. "चांदोबा चांदोबा भागलास का?")
धार्मिक संदर्भ, बाळामध्ये साक्षात 'बाळकृष्ण' किंवा 'राम' पाहण्याची वृत्ती अंगाईगीतांतून दिसते. (उदा. "जो जो रे बाळा, जो जो रे", "रामाचा पाळणा").
बाळाचे रूप, बाळाचे डोळे, त्याचे हास्य आणि त्याचे भविष्य यावर अनेक ओव्या रचलेल्या असतात.
३. सादरीकरण
अंगाईगीत गाताना आई बाळाला मांडीवर घेऊन थोपटते किंवा पाळणा हलवत हळू आवाजात गुणगुणते.
यात शब्दांपेक्षा त्यातील 'लय' (Rhythm) आणि'आवाजातील ओलावा' अधिक महत्त्वाचा असतो.
४. प्रसिद्ध अंगाईगीते
मराठी साहित्यात आणि चित्रपटांत काही अतिशय लोकप्रिय अंगाईगीते आहेत:
"निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई..."
"निज माझ्या नंदलाला, निज माझ्या गोपाळा..."
"हलके हलके जोजवा, माझ्या लाडक्याला..."
५. सांस्कृतिक महत्त्व
अंगाईगीत हे बाळावर होणारा पहिला संस्कार मानला जातो. या गीतांमधून मुलाला भाषेची ओळख होते आणि आईच्या आवाजामुळे त्याला सुरक्षिततेची जाणीव होते. ग्रामीण भागात आजही स्त्रिया दळण दळताना किंवा कामे करताना रचलेल्या ओव्यांमधून आपल्या बाळासाठी अंगाईगीते तयार करतात.
थोडक्यात सांगायचे तर अंगाईगीत म्हणजे आईच्या हृदयातील मायेचा पाझर आहे, जो शब्दांच्या आणि सुरांच्या रूपाने बाळाच्या झोपेत सुखद स्वप्ने पेरतो.

मराठी लोकगीतांचे सांस्कृतिक महत्त्व

मराठी लोकगीते ही महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा आरसा आहेत. त्यातून आपल्याला तत्कालीन समाजरचना, शेतीपद्धती, स्त्रियांचे जीवन, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक मूल्ये समजतात.

लोकगीतांचे प्रमुख महत्त्व

लोकपरंपरा जतन करणे

इतिहासाची माहिती मिळणे

समाजप्रबोधन

सांस्कृतिक ओळख टिकवणे

ग्रामीण जीवनाचे चित्रण

आधुनिक काळातील लोकगीतांची स्थिती

आजच्या डिजिटल युगात आधुनिक संगीताच्या प्रभावामुळे पारंपरिक लोकगीतांची लोकप्रियता काही प्रमाणात कमी झाली असली तरी अनेक कलाकार आणि संशोधक हे लोकसंगीत जतन करण्याचे कार्य करत आहेत. लोककला महोत्सव, शालेय अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे लोकगीतांना पुन्हा नवसंजीवनी मिळत आहे.

प्राचीन मराठी लोकगीते ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे. ओव्या, लावणी, भारूड, अभंग, पोवाडे आणि अंगाईगीते यांतून महाराष्ट्राचे सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन जिवंत होते. ही लोकगीते केवळ संगीत नसून आपल्या इतिहासाची, परंपरेची आणि लोकभावनांची जपणूक करणारी अमूल्य सांस्कृतिक संपत्ती आहे.

म्हणूनच पुढील पिढ्यांना ही लोकपरंपरा समजावी आणि टिकून राहावी यासाठी मराठी लोकगीतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)

बारावी नंतरचे विविध कोर्स



दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यावर तुमच्यासाठी अनेक कोर्सेस उपलब्ध असतात.

तुम्ही आयटीआय, पॉलिटेक्निक डिप्लोमा किंवा पॅरामेडिकल कोर्सेस निवडू शकता. तसेच, शॉर्ट टर्म कोर्सेस सुद्धा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात म्हणजेच आयटीआय मध्ये उपलब्ध असतात.

दहावी व बारावी नंतरचे काही लोकप्रिय कोर्सेस

आयटीआय (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्था. 

आय.टी.आय. हे एक व्यावसायिक शिक्षण आहे, जे विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कौशल्ये शिकवते.

आय.टी.आय. अभ्यासक्रमांची माहिती:

अभ्यासक्रमांचा प्रकार:

आयटीआय मध्ये अभियांत्रिकी व गैर-अभियांत्रिकी असे दोन प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 

अभ्यासक्रमांचा कालावधी:

अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत असतो. 

प्रवेश प्रक्रिया:

आयटीआय मध्ये प्रवेश दहावी व बारावीच्या गुणांवर आधारित असतो. 

उपलब्ध ट्रेड:

आयटीआय मध्ये इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, संगणक ऑपरेटर, कारपेंटर, पेंटर, ड्रेस मेकिंग आणि फॅशन डिझायनिंग यांसारख्या अनेक ट्रेडमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध असतात. 

स्वयंरोजगाराच्या संधी:

आयटीआय केलेले विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. 

उच्च शिक्षणाच्या संधी:

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 

आयटीआय मध्ये उपलब्ध काही प्रमुख अभ्यासक्रम:

Electriciyan: इलेक्ट्रिशियन:

विद्युत उपकरणांची दुरुस्ती आणि देखभाल करणे.

Fiter: फिटर:

यंत्रसामग्रीची दुरुस्ती आणि देखभाल करणे.

फिटरची कामे:

यंत्रसामग्रीची जोडणी:

फिटर यंत्रांचे भाग एकत्र जोडणे.


दुरुस्ती व देखभाल

यंत्रामध्ये काही बिघाड झाल्यास, दुरुस्त करणे

नवीन यंत्रे स्थापित करणे आणि ती कार्यान्वित करणे

यंत्रांची नियमित तपासणी करून त्यांची देखभाल करणे. 

फिटरचे विविध प्रकार: 

जनरल फिटर: 

विविध प्रकारची कामे करणारा.

मेकॅनिकल फिटर: 

यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करणारा.

मेंटेनन्स फिटर: यंत्रांची नियमित देखभाल करणारा. 

Velder: वेल्डर 

धातू जोडणे आणि दुरुस्त करणे.

वेल्डिंग हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे, जे आधुनिक जगाच्या अनेक भागांमध्ये आवश्यक आहे. 

Carpenter: कारपेंटर:

लाकडी वस्तू बनवणे आणि दुरुस्त करणे 







Painter: पेंटर :

विविध पृष्ठभागांवर रंगकाम करणे.

Dress Meking: 

ड्रेस मेकिंगमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणि कलात्मकता यांचा संगम असतो. या कलेमुळे व्यक्ती  सुंदर आणि योग्य कपडे तयार करू शकते.आधुनिक युगात दररोज कपड्यांची फॅशन वेगवेगळ्या माध्यमांनी वाढत आहे. त्यामुळे ड्रेस मेकिंग ला फारच महत्त्व आले आहे. व व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. 

Dress Designing:

ड्रेस डिझायनर कपड्यांच्या डिझाइनवर काम करतात, ज्यात रंग, पोत,आकार आणि प्रमाण यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.ते कपड्यांचे नमुने तयार करतात, फॅब्रिक निवडतात आणि कपड्यांचे उत्पादन कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करतात. ड्रेस डिझाईनिंग ला आधुनिक युगात प्रचंड महत्व आले आहे. एक ब्लाउज डिजाइनिंग करायला काही स्त्रिया पाच पाच हजार रुपये मोजतात. म्हणजे विचार करा ड्रेस डिझाईनिंग हे किती महत्त्वाचे आहे. या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या प्रचंड संधी उपलब्ध असतात.
हा एक व्यावसायिक आहे जो लेथ मशीन वापरून धातू, लाकूड किंवा इतर सामग्रीला विशिष्ट आकार देतो.

तो धातूचे भाग बनवतो, नट-बोल्ट तयार करतो किंवा इतर वस्तू वळवून योग्य आकार देतो.

मेकॅनिक (मोटार वाहन)

यंत्रे,उपकरणे किंवा वाहनांची दुरुस्ती करणे.

यांत्रिक भागांची तपासणी करणे, त्यांची दुरुस्ती करणे आणि त्यांची देखभाल करणे.

यंत्रांमध्ये काही समस्या असल्यास त्यांचे निदान करणे आणि दुरुस्त करणे.

वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांसाठी विशिष्ट ज्ञान आणि कौशल्ये असणे

रेफ्रिजरेशन आणि एअर कंडीशनिंग:

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आहे, जिथे विविध अभ्यासक्रम उपलब्ध असतात.

नोकरीच्या संधी:

उत्पादन युनिट्स, बांधकाम कंपन्या, रेल्वे, ऑटोमोबाइल उद्योग,वीज वितरण कंपन्या, इत्यादी. 

स्वयंरोजगाराच्या संधी:

आयटीआय केलेले विद्यार्थी स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. 

उच्च शिक्षणाच्या संधी:

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षण घेण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. 

वायरमन : 

सध्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंना आजच्या युगात खूपच महत्त्व आले आहे. दैनंदिन जीवनात इलेक्ट्रॉनिक हा अविभाज्य घटक झाला आहे. त्यासाठी वायरमन कोर्स व्यवसायिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण वायरमन साठी लोकांची खूपच मागणी असते.

निष्कर्ष:

ITI अभ्यासक्रम हे तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये शिकण्यासाठी एक उत्तम माध्यम आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात कौशल्ये विकसित करून चांगले करिअर घडवू शकता. 

इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये विविध ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाते.

Polytechnic: पॉलिटेक्निक 

अभियांत्रिकी डिप्लोमा कोर्सेससाठी हे उत्तम आहे.

आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक किंवा अभियांत्रिकी (B.Tech) अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो, ज्यामुळे त्यांचे तांत्रिक ज्ञान वाढते आणि करिअरमध्ये प्रगती करता येते. 

छोट्या कालावधीचे कोर्सेस :

कमी कालावधीत एखादे कौशल्य शिकण्यासाठी हे कोर्सेस उपयुक्त आहेत,

कॉम्प्युटर:

संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक: 

(COPA):

Comput & programming

ब्युटीशियन

आजच्या या आधुनिक युगात प्रत्येक स्त्रीला आपण आधुनिक आणि सुंदर दिसलो पाहिजे असे वाटते. यासाठी ब्युटी पार्लरमध्ये भेट देऊन ते आपले सौंदर्य अधिकच सुंदर करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे ब्रिटिशन या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे. हल्ली ब्रिटिशियनचे अनेक कोर्स उपलब्ध असतात. 

ब्रिटिशियनचा कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. वेगवेगळे कार्यक्रम,लग्नकार्य, छोटे-मोठे इव्हेंट, सण समारंभ,वाढदिवस, इत्यादी कार्यक्रमासाठी आपण ऍडव्हान्स बुकिंग करू शकता.

 रांगोळी

आजच्या आधुनिक युगात रांगोळीला खूप महत्त्व आले आहे. विविध कार्यक्रमांमध्ये रांगोळी काढण्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्याचप्रमाणे लग्न समारंभ, वेगवेगळे इव्हेंट यासाठी सुद्धा रांगोळीसाठी पाचारण करावे लागते.

रांगोळीला आज व्यवसायाचे रूप आले आहे. तालुक्याच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरात रांगोळीचे अनेक कोर्स उपलब्ध आहे. हे कोर्स पूर्ण करून आपण त्याला व्यवसाय करून देऊ शकता. 

मेहंदी:

 

लग्न समारंभ, हिंदू धर्मातील वेगवेगळे सण, छोटे मोठे कार्यक्रम, वाढदिवस यासाठी मोठे हौसेने मेहंदी काढली जाते. लग्न समारंभासाठी चांगल्या मेहंदी व्यवसायिका  ला बुकिंग करावे लागते. मेहंदीची क्रेझ सध्या खूप असल्याकारणाने मेहंदीला व्यवसायाचे रूप आले आहे.

छोट्या शहरात अनेक ठिकाणी मेहंदीचे कोर्स उपलब्ध असतात. मेहंदी चा कोर्स पूर्ण करून आपण त्याची व्यवसायात रूपांतर करू शकता.

हॉटेल मॅनेजमेंट: 

बारावी नंतर हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येते. अनेक महाविद्यालये आणि संस्थांमध्ये हॉटेल व्यवस्थापनाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण:

बारावी नंतर हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेता येते. अनेक महाविद्यालये आणि संस्थांमध्ये हॉटेल व्यवस्थापनाचे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. व्यवस्थापन.

अतिथी सेवा:

अतिथींच्या गरजा पूर्ण करणे, चांगली सेवा देणे, आणि तक्रारींचे निराकरण करणे. 

आर्थिक व्यवस्थापन:

हॉटेलचे बजेट, खर्च, आणि उत्पन्न यांचा ताळमेळ राखणे. 

ऑपरेशनल व्यवस्थापन:

हॉटेलच्या दैनंदिन कामांचे व्यवस्थापन करणे, जसे की साफसफाई, अन्न आणि पेय सेवा, इत्यादी. 

विक्री आणि विपणन:

हॉटेलचे जाहिरात आणि प्रमोशन करणे. 

तंत्रज्ञान:

हॉटेलमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे, जसे की ऑनलाइन बुकिंग, डिजिटल पेमेंट, इत्यादी. 

हॉटेल व्यवस्थापनाचे फायदे:

करिअरच्या संधी:

हॉटेल व्यवस्थापनामध्ये विविध करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.

चांगली कमाई:

हॉटेल व्यवस्थापनातील करिअरमध्ये चांगली कमाई होऊ शकते.

व्यक्तीमत्व विकास:

हॉटेल व्यवस्थापनातील कामामुळे व्यक्तीमत्व विकास होतो. 

हॉटेल व्यवस्थापनासाठी आवश्यक कौशल्ये:

नेतृत्व क्षमता, संवाद कौशल्ये, समस्या सोडवण्याची क्षमता, ग्राहक सेवा कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्ये

भाषा कौशल्ये (इंग्रजी आणि इतर भाषा) 

आरोग्य क्षेत्रातील विविध कोर्सेस:

लॅब टेक्निशियन:

लॅब टेक्निशियन कोर्सचे प्रकार:

डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (DMLT):

हा एक लोकप्रिय डिप्लोमा कोर्स आहे, जो बरावी नंतर करता येतो. भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व जीवशास्त्रामध्ये 50% पेक्षा मार्क्स असणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमामध्ये काय शिकवतात:

रक्त, लघवी आणि इतर शारीरिक द्रव्यांचे नमुने घेणे आणि त्यांचे विश्लेषण करणे.

सूक्ष्मजीवशास्त्र, शरीरशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान आणि पॅथॉलॉजी यांसारख्या विषयांचा अभ्यास.

विविध वैद्यकीय चाचण्या करणे, जसे की हिमोग्लोबिन, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर, इत्यादी.

प्रयोगशाळेतील उपकरणांचे व्यवस्थापन आणि देखभाल. 

नोकरीच्या संधी:

सरकारी आणि खाजगी रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर्स, ब्लड बँक्स, रिसर्च लॅबोरेटरीज, फार्मास्युटिकल कंपन्या.

फार्मसी असिस्टंट:

प्रवेश पात्रता:

फार्मसी असिस्टंट कोर्ससाठी साधारणपणे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाचा कालावधी:

फार्मसी असिस्टंट कोर्स साधारणपणे 6 महिने ते 1 वर्षाचा असतो.

अभ्यासक्रम:

औषधं कशी बनवतात आणि साठवतात.

औषधांची माहिती (उदा. उपयोग, दुष्परिणाम, डोस).

औषधं कशी द्यायची.

रुग्णांना औषधांबद्दल माहिती देणे.

फार्मसीमध्ये कायदे आणि नियम.

फार्मसीतील कामाचे व्यवस्थापन.

नोकरीच्या संधी:

फार्मसी असिस्टंट कोर्स केल्यानंतर तुम्हाला फार्मसी, हॉस्पिटल, किंवा आरोग्य केंद्रांमध्ये काम मिळू शकते.

महाराष्ट्रात अनेक शासकीय आणि खाजगी संस्था फार्मसी असिस्टंट कोर्स ऑफर करतात. तुम्ही तुमच्या जवळच्या संस्थेत चौकशी करू शकता. 

फार्मसी असिस्टंट कोर्सचे फायदे:

तुम्ही कमी वेळेत (6 महिने ते 1 वर्ष) फार्मसी क्षेत्रात प्रवेश करू शकता.

तुम्हाला औषधं आणि आरोग्य सेवांबद्दल माहिती मिळते.

तुम्हाला फार्मसीमध्ये चांगली नोकरी मिळू शकते.

तुम्ही लोकांच्या आरोग्यासाठी मदत करू शकता. 

फार्मसी असिस्टंट कोर्स एक चांगला पर्याय आहे ज्यांना फार्मसी क्षेत्रात करिअर करायचे आहे. हा कोर्स तुम्हाला आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये देईल, ज्यामुळे तुम्ही फार्मसीमध्ये यशस्वी होऊ शकता. 

नर्सिंग कोर्स:

नर्सिंग कोर्सेसचे प्रकार:

ए.एन.एम. (ANM - Auxiliary Nursing Midwifery):

हा 2 वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. हा कोर्स मुख्यतः ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी असतो. 

जी.एन.एम. (GNM - General Nursing and Midwifery):

हा 3.5 वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. यात 6 महिन्यांची इंटर्नशिप असते. 

शैक्षणिक अहर्ता :

या कोर्स साठी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

एमबीबीएस (MBBS): 

बॅचलर्स ऑफ मेडिसिन, बॅचलर्स ऑफ सर्जरी. हा डॉक्टर होण्यासाठीचा मूलभूत अभ्यासक्रम आहे. यासाठी NEET (National Eligibility cum Entrance Test) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

बीडीएस (BDS): 

बॅचलर्स ऑफ डेंटल सर्जरी.

बीएएमएस (BAMS): 

बॅचलर्स ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी.

बीएचएमएस (BHMS): 

बॅचलर्स ऑफ होमियोपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी.

बी.फार्म (B.Pharm):

बॅचलर्स ऑफ फार्मसी.

अभियांत्रिकी (Engineering)

अभियांत्रिकी (Engineering) 

हा बरावी सायन्स नंतरचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. यामध्ये विविध शाखा उपलब्ध आहेत:

कॉम्प्युटर अभियांत्रिकी (Computer Engineering): 

सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स.

मेकॅनिकल अभियांत्रिकी (Mechanical Engineering):

यंत्रांची रचना, उत्पादन आणि देखभाल.

सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering): इमारती, पूल आणि इतर पायाभूत सुविधांची निर्मिती.

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी (Electronics & Telecommunication Engineering): इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि दूरसंचार प्रणाली.

इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (Electrical Engineering): 

विद्युत प्रणाली आणि ऊर्जा.

केमिकल अभियांत्रिकी (Chemical Engineering):

रासायनिक प्रक्रिया आणि उत्पादने.

प्रवेश: JEE Mains, MHT-CET यांसारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून तुम्ही बी.ई. (B.E.) किंवा बी.टेक (B.Tech) कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता.

विज्ञान (Science)

विज्ञान क्षेत्रात पदवी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध पर्याय आहेत:

बी.एस्सी. (B.Sc.): 

भौतिकशास्त्र (Physics), 

रसायनशास्त्र (Chemistry), 

गणित (Mathematics), 

जीवशास्त्र (Biology), 

वनस्पतीशास्त्र (Botany), 

प्राणीशास्त्र (Zoology), 

सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology), 

जैवतंत्रज्ञान (Biotechnology), 

संगणकशास्त्र (Computer Science) 

यांसारख्या विषयांमध्ये तुम्ही बी.एस्सी. करू शकता.

बी.सी.ए. (BCA - Bachelor of Computer Applications): 

कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी.

बी.एस्सी. कृषी (B.Sc. Agriculture): 

कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान.

प्रवेश: अनेक महाविद्यालये बरावीच्या गुणांवर आधारित प्रवेश देतात, तर काही प्रवेश परीक्षा घेतात.

वाणिज्य (Commerce)

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे पर्याय उपलब्ध आहेत:

बी.कॉम: 

(B.Com - Bachelor of Commerce): लेखाशास्त्र, वित्त, व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या विषयांचा अभ्यास.

बी.बी.ए :

(BBA - Bachelor of Business Administration): व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रशासनाचे मूलभूत ज्ञान.

बी.एम.एस :

(BMS - Bachelor of Management Studies): व्यवस्थापन कौशल्यांवर लक्ष केंद्रित.

सी.ए: 

(CA - Chartered Accountancy): लेखापाल (अकाउंटंट) बनण्यासाठीचा व्यावसायिक कोर्स.

सी.एस:

(CS - Company Secretary): कंपनी सेक्रेटरी बनण्यासाठीचा व्यावसायिक कोर्स.

प्रवेश: बहुतांश अभ्यासक्रमांसाठी बरावीच्या गुणांवर आधारित प्रवेश असतो, तर काही संस्था स्वतःच्या प्रवेश परीक्षा घेतात.

कला (Arts)

कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक वैविध्यपूर्ण पर्याय आहेत:

बी.ए:

(BA - Bachelor of Arts): इतिहास (History), भूगोल (Geography), राज्यशास्त्र (Political Science), अर्थशास्त्र (Economics), समाजशास्त्र (Sociology), मानसशास्त्र (Psychology), साहित्य (Literature) यांसारख्या अनेक विषयांमध्ये बी.ए. करता येते.

बी.जे.एम.सी: 

(BJMC - Bachelor of Journalism and Mass Communication): पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रात करिअरसाठी.

बी.एस.डब्ल्यू:

(BSW - Bachelor of Social Work): सामाजिक कार्य क्षेत्रात रुची असलेल्यांसाठी.

बी.एफ.ए: 

(BFA - Bachelor of Fine Arts): चित्रकला, शिल्पकला, उपयोजित कला (Applied Arts) यांसारख्या कला प्रकारांमध्ये.

एल.एल.बी :

(LLB - Bachelor of Legislative Law): बारावीनंतर पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एलएल.बी. कोर्स असतो.

प्रवेश: 12वीच्या गुणांवर आधारित प्रवेश, काही ठिकाणी प्रवेश परीक्षा.

व्यावसायिक व कौशल्य-आधारित अभ्यासक्रम (Vocational and Skill-based Courses)

आजकाल व्यावसायिक आणि कौशल्य-आधारित अभ्यासक्रमांना खूप महत्त्व दिले जाते.

ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया:

ॲनिमेशनचे मुख्य प्रकार:

पारंपारिक ॲनिमेशन:

यामध्ये हाताने काढलेल्या चित्रांचा किंवा रेखाचित्रांचा वापर केला जातो, जी एका विशिष्ट क्रमाने दर्शवून हालचाल निर्माण केली जाते. 

संगणक ॲनिमेशन:

यामध्ये संगणकाचा वापर करून 2D किंवा 3D प्रतिमा तयार केल्या जातात आणि त्या हलवल्या जातात. 

स्टॉप मोशन ॲनिमेशन:

यामध्ये वस्तू किंवा बाहुल्यांची छायाचित्रे एका विशिष्ट क्रमाने घेतली जातात आणि नंतर ती एकत्रित करून हालचाल दर्शवली जाते. 

ॲनिमेशनचा उपयोग चित्रपट, टीव्ही शो, व्हिडिओ गेम्स, मोबाईल ॲप्स आणि इतर अनेक ठिकाणी केला जातो. 

(Animation & Multimedia): 

ग्राफिक डिझायनिंग:

ग्राफिक डिझाईनमध्ये, डिझायनर विविध व्हिज्युअल घटक जसे की चित्रे, रंग, फॉन्ट आणि लेआउट (layout) वापरून माहितीपूर्ण आणि आकर्षक डिझाईन्स तयार करतात. 

उदाहरणे:

पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रांसाठी लेआउट तयार करणे

जाहिरात (ऍडव्हर्टायझिंग) आणि मार्केटिंग साहित्य तयार करणे

वेबसाइट्स आणि ॲप्ससाठी डिझाइन तयार करणे

उत्पादन पॅकेजिंग डिझाइन करणे

लोगो आणि ब्रँड ओळख (ब्रांड आयडेंटिटी) तयार करणे 

ग्राफिक डिझाईनचे घटक:

टायपोग्राफी:

अक्षरांचे (फॉन्ट) आणि शब्दांचे डिझाइन.

रंग:

रंगांचा वापर करून डिझाइनमध्ये भावना आणि अर्थ निर्माण करणे.

प्रतिमा:

चित्रे, ग्राफिक्स आणि इतर व्हिज्युअल घटकांचा वापर.

लेआउट:

घटकांची मांडणी आणि व्यवस्था. 

ग्राफिक डिझाईनचा उपयोग:

ग्राफिक डिझाईनचा उपयोग विविध क्षेत्रांमध्ये केला जातो, जसे की: 

वृत्तपत्रे आणि मासिके:

बातम्या आणि माहिती प्रभावीपणे सादर करणे.

जाहिरात आणि मार्केटिंग:

उत्पादने आणि सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे.

वेबसाइट्स आणि ॲप्स:

वापरकर्त्यांना आकर्षक आणि वापरण्यास सोपा अनुभव देणे.

शिक्षण:

माहिती सोप्या पद्धतीने सादर करणे.

ब्रँडिंग:

कंपनीची ओळख (आयडेंटिटी) निर्माण करणे.

वेब डिझायनिंग:

वेब डिझाईनिंग म्हणजे वेबसाईट (website) तयार करण्याची प्रक्रिया. यात वेबसाईटचे स्वरूप, रचना, नेव्हिगेशन, आणि वापरकर्ता अनुभव (user experience) यांचा समावेश असतो. थोडक्यात, लोकांना वेबसाईटवर सहजपणे माहिती मिळवण्यासाठी आणि ती वापरण्यासाठी सोयीस्कर बनवण्याची प्रक्रिया म्हणजे वेब डिझाईनिंग. 

टूरिझम आणि ट्रॅव्हल मॅनेजमेंट :

(Tourism & Travel Management): पर्यटन उद्योगात करिअरसाठी.

प्रवेश: बरावीच्या गुणांवर आधारित किंवा थेट प्रवेश.

इतर पर्याय 

संरक्षण दल :

(Defence Services): एनडीए (NDA -National Defence Academy) द्वारे सैन्य, नौदल किंवा वायुदलात अधिकारी म्हणून सामील होऊ शकता.

शिक्षक:

(Education): डी.एड (D.Ed - Diploma in Education) किंवा बी.एल.एड (B.El.Ed - Bachelor of Elementary Education) करून प्राथमिक शिक्षक बनू शकता.

ग्रामसेवक कोर्स:

बारावीनंतर ग्रामसेवक प्रशिक्षणाचा दोन वर्षाचा कोर्स करू शकता.

एल एस एस

हा पशुवैद्यकीय कोर्स आहे. सध्या या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील विधी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी MH CET Law किंवा इतर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. 

शैक्षणिक पात्रता:

बरावी उत्तीर्ण किंवा पदवीधर उमेदवार विधी अभ्यासक्रमांसाठी अर्ज करू शकतात. 

कागदपत्रे:

आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे, जसे की शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला (लागू असल्यास), आणि इतर आवश्यक कागदपत

योग्य कोर्स कसा निवडावा?

तुमची आवड : तुम्हाला कोणत्या विषयात किंवा क्षेत्रात अधिक रस आहे हे ओळखा.

तुमची क्षमता : तुमची कोणत्या विषयात चांगली समज आहे किंवा कोणत्या प्रकारचे काम तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जमेल.

करिअरचे ध्येय : तुम्हाला भविष्यात काय बनायचे आहे? कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची आहे?

संशोधन : विविध कोर्सेस, महाविद्यालये आणि त्यांच्या भविष्यातील संधींबद्दल सखोल माहिती मिळवा.

पालक आणि शिक्षकांशी चर्चा (Discuss with Parents & Teachers): त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्या.

तुमच्या आवडीचे आणि क्षमतांचे विश्लेषण करा, विशिष्ट करिअर ध्येये निश्चित करा, विविध कोर्सेसची माहिती मिळवा, शैक्षणिक संस्था आणि त्यांच्या अभ्यासक्रमांची माहिती घ्या, करिअर समुपदेशकाशी संपर्क साधा.

बारावीनंतर उपलब्ध असलेल्या कोर्सेसची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे, तुमच्यासाठी योग्य कोर्स निवडण्यासाठी थोडा वेळ द्या आणि सखोल संशोधन करा.

रामदास तळपे 





आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...