गावाकडची पहाट
आज गॅसच्या जमान्यात उभी राहिलेली आधुनिक स्वयंपाकघरं पाहताना, मातीच्या चुलीची ऊब मनात नकळत जागी होते.”पहाटेचा कोंबडा आरवल्याबरोबर स्त्रिया उठुन कामाला लागत असत.शेरभर धान्य घेऊन त्या जात्यावर दळू लागत. जात्यावर दळताना त्यांनी गायलेली जात्यावरची गाणी अगदी दुरपर्यंत निनादत असत. जात्यावरच्या ओव्यांचा ध्वनी ऐकून एक वेगळाच उत्साह असमंतात दरवळत असे.
तो पर्यंत झुजूमुंज्र झालेले असे. त्यावेळी न्याहारीसाठी आणी रात्रीच्या जेवणासाठी भाकरीचे पिठ रोजच्या रोज दळले जात असे.
धान्य दळून झाल्यावर प्रातर्विधी उरकून चुलीमध्ये असलेली अतिरिक्त राख काढून टाकली जाई. त्यानंतर चूल आणि भानवस सारवून चुल पेटवली जात असे. आणि मगच नवीन दिवसाला सुरुवात होई.
चुलीजवळची सकाळची ऊब
सकाळी उठून घरातील माणसे आणि लहान मुले चुलीजवळ शेकायला गर्दी करत असत. आणि शेकता शेकता चहा कधी होईल याची वाट पाहत असत.
स्टीलच्या पितळी मधून चहा पिणे ही एक वेगळीच मजा होती. काहीजण चहामध्ये नाचणीच्या शिळ्या भाकरी कुस्करून खात असत. त्यावेळी दुकानात एक रुपयाला दहा बटारे मिळत. आम्ही ग्लासमध्ये बटरं कुस्करून चहा मध्ये खात असू.
सकाळची कामे उरकली जात. त्यावेळी घरात अनेक माणसे असल्यामुळे कामे विभागुन केली जात.
कुणी स्वयंपाक तर कुणी झाडलोट तर कुणी शेण काढणे कुणी गोव-या थाबणे अशी कामे असत.
गोवऱ्या थापने
सकाळी सकाळी जनावरांचे शेण काढून झाल्यावर काही शेण जवळच असलेल्या मोकळ्या शेतात किंवा बांधावर स्रिया घेऊन जात असत. तेथेच नाचणीचे, किंवा साव्याचे भुसकाट आधीच आणून ठेवलेले असे.
थोडेसे शेण, भूसकाट व थोडेसे पाणी या मिश्रणात गोवऱ्या थापल्या जाई. या गोवऱ्या सुद्धा थापताना गोल, वाटोळ्या अशा प्रकारच्या गोवऱ्या असत. ओळीने थापलेल्या आणि शेतात किंवा बांधावर वाळत घातलेल्या गोवर्या पाहताना एक वेगळीच मजा वाटायची.
वाळलेल्या गोऱ्या तिथेच अगदी व्यवस्थित रचून ठेवलेले असायच्या.
वाळलेले शेण गोळा करणे
लहानपणी आमचे सर्वात आवडती काम कोणते असेल तर वाळलेले शेण गोळा करणे.
सुट्टीच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी चहा नाश्ता करून आम्ही पोती घेऊन रानात आणि रानोमाळ चुलीत घालण्यासाठी आणि शेतीची डाळ भाजण्यासाठी शेण गोळा करण्यासाठी भटकत असू.
वाळलेले शेण गोळा करताना अजूनही ते दिवस आठवतात. शेण गोळा करता करता भूक लागल्यावर आम्ही उंबराची पिकलेली लाल उंबरे खात असू.
उंबराच्या झाडाखाली सावलीला हमखास अनेक गाईगुरे बसलेली असायची. उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना फार गवत मिळायचे नाही. त्यामुळे उंबराच्या फळावर त्या बिचाऱ्यांची गुजराण चाललेली असायची.
आम्ही मग त्यांच्यामध्ये सामील व्हायचो. तहान लागल्यावर डोंगर कपारीतील थंडगार पाणी प्याल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जायचे.
माळरानावरचे बालपण”
शेण गोळा करून झाल्यावर इतर मित्रांना आम्ही शेण गोळा करायला मदत करायचो गोट्या, विटी दांडू, क्रिकेट असे विविध खेळ माळरानावर आम्ही खेळत असू. देहभान विसरून आम्ही खेळात रमून जायचो.
सूर्य डोक्यावर आल्यावर मग आम्ही खेळ आटोपून वाळलेल्या शेनाची पोती घेऊन घराच्या दिशेने मार्गक्रमण करत असू.
नवीन चुलीचे आगमन
प्रत्येकाच्या घरात तेव्हा मातीच्या चुली असत. काही दिवसानंतर चूल ठीक ठिकाणी तुटून फुटून जात असे.
चुलीमध्ये लाकडं पुढे सारताना त्याचे झटके चुलीला बसायचे..नव्या चुलीचे सुद्धा टौकै उडायला सुरुवात व्हायची थोड्या दिवसातच. माती चांगली लागली तर चूल टिकायची नाहीतर लवकरच ढासळायची त्यामुळे कसेतरी दगडाची चीप किंवा कौलाचा तुकडा लावून वेळ निभावून नेली जाई.
परंतु नंतर मात्र खास चूल आणण्यासाठी स्त्रिया कुंभाराकडे जात असत. तिथे अनेक प्रकारच्या चुली उपलब्ध असत.
छोटी चूल, एक ववलाची चूल, एकावेळी दोन पातेले ठेवून अन्न शिजवायची बिगर वववलाची चूल असे चुलींचे वेगवेगळे प्रकार होते.
गावात कुंभारांचे आगमन
गावाला प्रत्येक घरात एक किंवा दोन मातीच्या चुली असायच्या. मातीच्या चुली घरोघरी.. असं काहीतरी असावं बहुधा. अनेक घरात दोन चुली असायच्या…मातीच्या चुली दोन प्रकारे त्या काळात मिळायच्या.
अगदी सकाळी सकाळी नऊ-साडेनऊच्या दरम्यान कुंभारीन तयार केलेली चूल डोक्यावर घेऊन आमच्या गावात यायची. जुन्या टॉवेलाची छोटीशी चुंबळ डोक्यावर घेऊन त्याच्यावर चूल घ्यायची.
चूल डोक्यावर घेऊन जेव्हा तीन,चार किलोमीटर लांब असलेल्या तिच्या गावातून चालत चालत आमच्या गावापर्यंत यायची तोपर्यंत ती कमरेत वाकुन जायची. नऊवारी नेसलेली कपाळावर आडवं कुंकू ठसठशीत, तोंडावर घामाच्या धारा वाहत असायच्या.
ती आल्यावर रस्त्याच्या एका कोपऱ्यात मातीची चुल हळूच उतरायची. ती जड चुल खाली उतरताना तिला उरलासुरला जोर लावायला लागायचा…तिच्यासोबत तिचा नवरा अजून एक चुल घेऊन उभा असायचा. तो पुढच्या गल्लीत जायचा.
तीनं आवाज दिल्यानंतर पाच सहा बायका गोळा व्हायच्या…बहुतेक तो वार मंगळवार असायचा. जिला गरज आहे ती चुल पारखून घ्यायची. चुलीच्या बदल्यात तिला पैसे देण्याची पद्धत नव्हती तर ....दोन ते तीन पायली धान्य द्यायचं...'जसं ठरेल तसं'
धान्य घेण्यासाठी तीनं चांगली मजबूत फडकी आणलेली असायची.. टोपल्यातलं धान्य.. पाटीत काढल्यानंतर मापाने मोजून तिला घातलं जायचं.. आणि मग चुल आपली व्हायची.
चूल तयार करण्याची दुसरी पद्धत
चूल बनवण्याची दुसरी पद्धत सुद्धा त्यावेळी होती. स्वतः माती आणून घरातचं भिजवायची, चांगली मळायची आणि चूल बनवायची. या पद्धतीने चुल बनवायला जास्त वेळ लागायचा. पण गावात ठराविक जानकर बायका चुली बनवायच्या.
चांगली काळी माती आणायची, त्यातले सगळे खडे, कचरा बाजूला काढायचा, थोडासा भाताचा कोंडा मिक्स करायचा आणि चांगला मुरवायचा चिखल चांगला मळल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे.
त्यानंतर मग चूल बनवणाऱ्या जानकर बाईला बोलावून आणायचे. आमच्या गावात माझी आई खूप छान प्रकारे चूल बनवायची
आयताच्या आकाराचा वितभर उंचीचे मातीचे गोळे चांगले थोपटून थोपटून सपाट बनवायचे. मग चिखल थोडा सुकायला लागल्यावर चुलीचा आकार कापला जायचा.
चुल कापून झाल्यानंतर, त्याच्यावर मातीचे उंडे बसवायचे आणि मग शेवटी तिला सुकत ठेवायची. चुल सुकल्यानंतर तिला चांगली सारवायची.
चूल आणि भानवस
भानवस असल्याशिवाय चुलीला शोभा नसे. घरातील चूल आणि भानवस पाहून घरातील स्त्री कशी आहे हे ठरवले जाई. त्यामुळे अनेक स्त्रिया चूल आणि भानवस आखीव रेखीव आली पाहिजे यासाठी आग्रही असायच्या.
चूल घातल्यावर तिच्या पाठीमागे व्यवस्थित रचलेली चुलीच्या उंची इतकीच वित दीड वीत भानवस रचलेली असायची. भानवसीच्या उजव्या बाजूला मडके पुरलेले असायचे. त्या मडक्यात शक्यतो मीठ ठेवत असत. हेच मीठ स्वयंपाकासाठी वापरले जाई.
चूल घातल्यावर चूल आणि भानवस माती आणि राखेच्या गिलाव्याने व्यवस्थित सारवली जाई. त्यानंतर मग शेणाच्या आणि राखेच्या गिलाव्याने व्यवस्थित सारवून मग चूल पेटवली जाई.
नवीन चूल पेटवायला सुद्धा मुहूर्त पाहिला जात असे. यासाठी गावातील चार-पाच मैत्रिणींना आवतनं दिले जाई.
चूल पेटवायच्या आधी हळद-कुंकू वाहून चुलीची पूजा केली जात असे. त्यानंतर मग दूध उतू घालायचे आणि त्यानंतर चहा करून मैत्रिणींना दिला जात असे.
घरची कारभारीन या मानाची हकदार असायची. नवीन चूल बसवल्यावर घराला नवपणं आल्या सारख वाटायचं. कारण भाकरी घालताना, जाळ व्यवस्थित लागायचा, त्यामुळे जेवण बनवणाऱ्या बाईचं डोळ झोंबायचं नाहीत... कारण अगोदरच्या चुलीनं...जाता जाता खूप त्रास दिलेला असायचा.
चुलीवरच्या जेवणाची चव
चुलीवरच्या जेवणाची चवचं वेगळी असायची. भाकरी तव्यात टाकल्यावर एका हाताने त्याला लाकडं सारुन जाळ लावायचा आणि आधीँ- कच्ची भाजल्यानंतर तिला थोडेसे विस्तव बाहेर काढून त्याच्यावर उभी करायची.
लाल विस्तवावर चांगले खरपूस भाजल्यावर तिला दोनदा फिरवायची आणि भानवसीवर उभी करायची... चूल आणि भिंत याच्यामध्ये भानवसीची जागा असायची भिंतीला टेकून भानवसीवर भाकरीच्या रांगा अशा उभ्या असायच्या जसं काय बैलगाड्या शर्यतीसाठी उभ्या आहेत.
मटणाचा रस्सा , धपाटे, पुऱ्या, भाकरी, तव्यात केलेल्ं पिठलं, भाज्या आणि सगळ्यात आवडतं पुरणपोळी आणि झणझणीत सार.
मक्याच्या किंवा ज्वारी बाजरी च्या हंगामात कणसे चुलीत भाजायला भारी वाटायचं. छोटी छोटी कणसं एका मोठ्या पाटीत उकडली जायची... त्याच्यात मीठ टाकलं जायचं आणि शिजल्यानंतर ते खाली उतरून खायला सुरुवात केली जायची.
रानातून आणलेली कंदमुळे, बटाटे, रताळी, बोंबलाचे किंवा वाकटीचे छोटे तुकडे, मासे चुलीच्या आहारामध्ये आम्ही भाजून खात असू. त्यांची अप्रतिम चव अजूनही जिभेवर रेंगाळत असते.
चुलीवर तव्यात घालून केलेले मोकळे बेसन, बेसनाची वाटोळी भजी, पापुद्रा आलेल्या भाकरी, बीडाच्या कहालीमध्ये केलेल्या पेजवळ्या (घावणे), शेंगदाण्याच्या गूळ घालून केलेल्या पोळ्या यांची चव अजूनही आठवण आल्यावर जिभेवर रेंगाळते.
चुलीत अख्खा पावसाळा पुरतील एवढी चांगली कठीण लाकडं प्रत्येक जण पावसाळ्याच्या तोंडावर घरात माळ्यावर साठवून ठेवायचा.
चुलीचा विस्तव जपून ठेवणे
रात्री जेवण झाल्यावर चूल पूर्ण विझवली जात नसे. त्यात एखादा निखारा राखेखाली दाबून ठेवला जायचा, ज्याला 'विस्तव राखणे' म्हणतात. सकाळी पुन्हा तोच विस्तव फुंकून नवी चूल पेटवली जायची. हे 'विस्तव राखणे' म्हणजे घराची लक्ष्मी आणि परंपरा जिवंत ठेवण्याचं प्रतीक मानलं जायचं.
चुलीजवळच्या काही आठवणी
पावसाळ्यात बाहेरून आल्यानंतर चुली समोर दहा मिनिटे जरी बसलं तरी दिवसाचा शिणवटा निघून जायाचा.
पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरी घोंगडी असायची. दिवसभरात रानात जाताना अंगावर घेतलेली घोंगडी भिजून जात असे. त्यामुळे ही घोंगडी चुलीवर असलेल्या दांडावर वाळत घातली जाई.
अनेक जण आपल्या छत्र्या चुलीवरच वाळत घालत असत. त्यावेळी छत्रीचे कापड देखील मांजरपाट या प्रकारचे असे. त्यामुळे छत्र्या लवकर सुकत नसत.
चुली जवळ शेकत असताना अनेक प्रकारच्या गप्पा रंगत असत.
चुलीवरचे जेवण इतकं आवडायचं की त्याची आठवण आज देखील ताजी आहे संध्याकाळी दिवस मावळायला चूल पेटवायची ते रात्री दुधाचा टोप उतरवून मशेरीला विस्तव बाहेर काढल्या वर तिला आराम मिळायचा.
आजी आणि घरातील बायांचं ठरलेलं असायचं. जेवण झालं की तंबाखूची पिशवी घेऊन बसायच्या. मूठभर तंबाखू काढून त्याच्यावर लाल भडक विस्तव ठेवायच्या. मशेरीचा वास नाकातोंडात गेल्याशिवाय राहायचा नाही.मुलांना दुधाची साय पातेलं पुसून खायची सवय असायची.त्यामुळे मुले झोपायच्या अगोदर चुली समोर लुडबुड करत असायची.
चुलीभोवतीचे सणवार आणि संस्कृती
चुलीचा संबंध फक्त रोजच्या जेवणाशी नव्हता, तर तो सणांशीही खोलवर जोडलेला होता.
नागपंचमी: या दिवशी चूल पेटवायची नसते, असा एक नियम पाळला जायचा. त्या दिवशी आदल्या दिवशीचे पदार्थ किंवा चुलीवर न रांधलेले पदार्थ खाण्याची प्रथा कशी होती, याचा उल्लेख करता येईल.
दिवाळीचे अभ्यंगस्नान: नरक चतुर्दशीच्या पहाटे चुलीवर मोठ्या 'हंड्यात' किंवा 'काहिलीत' पाणी तापवले जायचे. त्या पाण्याला मिळणारी एक वेगळीच 'कडक' ऊब आणि वाफ घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण करायची.
दिवसभर थकलेली चूल रात्री शांत व्हायची. दुसऱ्या दिवशी जर उपवास असेल तर त्याच रात्री तिला साफ करून सारवुण घेतली जायची.
सकाळी उठल्यावर चूल पेटवताना पहिल्यांदा सगळी राख बाहेर काढायची आणि छोटेसे वाळलेल्या शेणाचा तुकडा किंवा गोवारीचा तुकडा घ्यायचा त्यावर थोडसं रॉकेल टाकायचं आणि मग पेटवायची. तोंड धुवायच्या पाण्यापासून सुरुवात व्हायची.
चुलीशी संबंधित साधने (विस्मरणात गेलेली शस्त्रे)
आजच्या 'मायक्रोवेव्ह' आणि 'मिक्सर'च्या काळात काही वस्तूंची नावेही नवीन पिढीला माहित नाहीत:
फुकणी: चुलीतला जाळ विझू नये म्हणून लोखंडी किंवा बांबूच्या फुकणीने फुंकर घालताना डोळ्यांतून येणारे पाणी आणि त्यातून होणारी कसरत.
सांडशी आणि चिमटा: गरम पातेलं उतरवण्यासाठी वापरली जाणारी ती काळीकुट्ट सांडशी.
पळी आणि उलाथणे: भाकरी उलटण्यासाठी लागणारे लोखंडी उलाथणे आणि त्याचे चुलीवर होणारे ठणठण आवाज.
हद्दपार होत असलेली चूल
गावाला आज घराघरात गॅस आला आहे. गॅस सिलेंडर आल्यामुळे रॉकेल बंद झाले. कुणी आताशी रानात वाळलेले शेण गोळा करायला जात नाही किंवा सरपण आणायला जात नाही.
गोवऱ्या थाबायच्या कमी झाल्या आहेत कारण लोकांकडे जनावरच राहिली नाहीत.
गॅस शेगडी दहा मिनिटात कुकर मधला भात शिजवून देते. परंतु काहीही म्हणा गॅस वरच्या जेवणाला चुलीवरच्या जेवणाची सर केव्हा येणार नाही. चुलीवरच्या जेवणाची चव मात्र गॅसच्या शेगडीवर कधीच मिळत नाही.
आज घराघरात गॅस आहे, वेळ वाचतो, सोय होते; पण मातीच्या चुलीची ऊब, धुरकट चव आणि चुलीजवळ रंगलेल्या गप्पा या आठवणी मात्र कधीच संपणार नाहीत. चूल फक्त स्वयंपाकाचं साधन नव्हती, ती घराचं हृदय होती.”
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)













