Translate

महाराष्ट्रातील तमाशा परंपरा आणि शंकरराव कोकाटे यांचे जीवनकार्य

ग्रामीण भागातील कलेची आवड

महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला तमाशा कलावंतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. 

img src="..." alt=" तमाशातील एक आदा ">

पूर्वी ग्रामीण भागात कलेला अत्यंत मोठे महत्त्व होते. लोकांना कलेची खरी जाण होती आणि कलेची कदर करणारी माणसेही होती.

कलेची जोपासना

त्या काळात कलेच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. अंगभूत कला हीच कलाकाराची खरी शिदोरी होती. ग्रामीण भागातील कलाकारांवर रसिकांनी मनस्वी प्रेम केले, कलेला दाद दिली आणि प्रसंगी वर्गण्या काढून कलाकारांना मदतही केली.

यामुळे अनेक कलाकार पुढे आले, लोकप्रिय झाले आणि ग्रामीण भागाचे नाव उज्ज्वल केले. अशा कलाकारांच्या कलेचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा आणि आपण सर्वांनी तो वाचावा, हीच अपेक्षा.

लोककलेचे शिलेदार 

भागातील तमाशा क्षेत्राला खऱ्या अर्थाने वैभव मिळवून देणाऱ्यांत प्रामुख्याने शंकरराव कोकाटे (टोकावडे), विष्णू चासकर, रामचंद्र वाडेकर, राम पोखरकर आणि भोकटे परिवाराचा मोठा वाटा आहे. तसेच, विठू नांगरे यांच्यासारख्या 'भारूड सम्राटांनी' अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम घडवून आणला.

ग्रामीण भागात अनेक कलाकारांनी कलेची सेवा केली आहे. त्यापैकी खालील कलाकार 

तमाशा सम्राट शंकरराव कोकाटे (टोकावडे),
विष्णू चासकर (चास)
रामचंद्र वाडेकर (सुरकुंडी)
राम पोखरकर (वाळद)
मारुती भोकटे, नंदा भोकटे, दत्ता भोकटे (साकुर्डी)
शंकरराव आहिलू तळपे,
मोतीराम मोहन, संपत जढर,
विष्णू हुरसाळे (मंदोशी),
चिंधू वनघरे, बापू साबळे (भिवेगाव),
सखाराम उगले, विठ्ठल उगले (कारकुडी),
नारायण गायकवाड (डेहणे) यांनी तमाशाची सेवा केली.

प्रसादिक भारुडाची परंपरा

प्रासादिक भजनी भारुडाची सेवा देखील अनेक मान्यवरांनी केली.
विठू नांगरे (मोरोशी) हे प्रसादिक भजनी भारूड मंडळाचे अनभिषिक्त सम्राट होते.

तसेच बाबुराव गुंजाळ, काशिनाथ गुंजाळ, कै. शेळके मामा (पोखरी),सिताराम मुऱ्हे, रामू न्हावी (टोकावडे), दत्तात्रय मिलखे गुरुजी, मुरलीधर माळी गुरुजी,
शंकर मारुती ठोकळ, मारुती सावळेराम ठोकळ, शंकर माळी (स्रीपात्र), कोथेबुवा,
सुदाम उर्फ वाळकू माळी, मारुती वडेकर, गीताराम डवणे (नायफड) यांनी ग्रामीण भागातील भारूड संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले.

आताची परिस्थिती

भारूडांचे खेळ आता शेवटची घटका मोजत आहेत. गावागावातील प्रासादिक भजने काही अपवाद वगळता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

तरीही काळाच्या ओघात या कला मागे पडल्या असल्या तरी या मातीतून कलाकारांचा ओघ अजूनही सुरू आहे.

त्यापैकी –
विकास सोनवणे (शेंदुर्ली),
दत्तात्रय तिटकारे (नायफड),
दत्ता उबाळे,(मिसेस मुख्यमंत्री)
बाबूराव भोर (पिपाणी) यांचा उल्लेख करावा लागेल.

मास्टर कै. शंकरराव कोकाटे

मास्टर कै. शंकरराव कोकाटे हे खेड तालुक्यातील टोकावडे गावचे होते. वयाच्या १३व्या वर्षी त्यांनी मुंबई गाठली. सुरुवातीला त्यांनी मुंबईत डबेवाल्यांचा व्यवसाय केला. त्या काळातच त्यांचे पाय नाटकाकडे वळले.

ते सुरंगी नाटकात दरोडेखोराची भूमिका करत असत. त्यांची कला पाहून तमाशा सम्राट कै. तुकाराम खेडकर यांनी त्यांना तमाशात काम करण्याची संधी दिली.

त्यांनी तमाशात अनेक नकारात्मक भूमिका केल्या.

कालीमातेची भूमिका

एका वगनाट्यात त्यांनी कालीमातेची भूमिका केली होती. प्रथेप्रमाणे तमाशातील महिला कालीमातेची पूजा करत असताना त्यांची स्टेजवर एंट्री झाली. त्यांच्या प्रभावी रूपामुळे एक महिला अक्षरशः बेशुद्ध पडली.

स्वतःचा तमाशा

नंतर त्यांनी स्वतःचा तमाशा काढण्याचा निर्णय घेतला. वाडा गावचे कै. अनंत दगडू केदारी (अंतूशेठ) व शांतारामशेठ यांनी आर्थिक मदत केली. मुंबईतील चाकरमान्यांनीही मोठे सहकार्य केले.

त्या काळी सुमारे १५,००० रुपयांची मदत जमा झाली जी त्या काळात मोठी रक्कम होती.

तमाशाची लोकप्रियता

त्यांच्या तमाशात ७०–८० लोकांचा मोठा ताफा होता.
स्टेज, लाईट, स्पीकरसाठी स्वतंत्र दोन ट्रक असत.

त्यांनी सिद्दी जोहर, अफजलखान, औरंगजेब यांसारख्या भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारल्या.

त्या काळात कलाकार होणे सोपे नव्हते. गावोगावी बैलगाडीने किंवा पायी प्रवास, रात्र-रात्र जागून केलेले प्रयोग आणि तुटपुंज्या मानधनावर चालणारा संसार... तरीही या कलावंतांनी कधी कलेशी तडजोड केली नाही. अंगात ताप असतानाही घुंगरू बांधून स्टेजवर उभे राहणारे हे 'कलेचे वारकरी' होते."

मी एकदा जालन्याला गेलो होतो.तेव्हा एका वृद्ध माणसाबरोभर चर्चा करत असताना त्यांनी कै.शंकरराव कोकाटे यांनी केलेल्या भुमीकांविषयी आठवणी सांगीतल्या. 

ते ज्या वेळी सांगत होते त्या वेळी मी रोमांचीत झालो व नकळत अभिमानाने डोळे पाणावले व उर भरून आला.

आजही कधी कोकणात जा. अनेक वृद्ध लोक आजही कै.शंकरराव कोकाटे यांच्या आठवणी सांगतील.

कोकाटे यांचा हा तमाशा साधारण ९ ते १० वर्ष चालू होता. त्यांनी त्यांचा तमाशा संपुर्ण महाराष्ट्रातील विविध भागात केला कै. कोकाटे यांनी. ख-या अर्थाने आपल्या पश्चिम भागाचे नाव संपुर्ण महाराष्ट्रात मोठे केले.

अपघात आणि उतरती कळा

कै.कोकाटे यांचा तमाशा हा ठाणे जिल्ह्यातुन शहापुर येथील एका गावातुन तमाशाचे काम संपवून परतीचा प्रवास करत असताना किनवलीच्या हद्दीत त्यांच्या तमाशाचा ट्रक उलटला.

त्या अपघातामध्ये हालगीपटू शांताराम थोरात (टोकावडे) मुळूक आचारी (चास) यांचा मृत्यू झाला.

या धक्क्यामुळे ते आजारी पडले. पुण्याला उपचारासाठी नेत असताना डेहणे येथे त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ४८ वर्ष होते.

निष्कर्ष

शंकररावांनी केवळ खलनायकच नाही, तर 'ऐतिहासिक' आणि 'पौराणिक' पात्रांना आपल्या आवाजाने आणि देहबोलीने जिवंत केले. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी मैलोन्मैल चालत येणारा रसिक प्रेक्षक, हीच त्यांच्या श्रीमंतीची खरी साक्ष होती.

तमाशा म्हणजे केवळ नाच-गाणे नव्हते, तर ती अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणारी एक कला होती. वगनाट्यातील छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा सामाजिक विषयांवरील भूमिका पाहून ग्रामीण जनता भारावून जात असे."

कै. शंकरराव कोकाटे यांनी ग्रामीण भागाचे नाव महाराष्ट्रभर उज्ज्वल केले. त्यांची कला आणि योगदान सदैव स्मरणात राहील.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)

२ टिप्पण्या:

  1. कै.शंकरराव कोकाटे टोकावडेकर या महान कलावंताच्या भुमिका आजही आठवतात. मी वाडा या ठिकाणी शांताबाईंच्या बोर्डींगला असतांना त्यांचा तमाशा व नाटक पाहिलं आहे.
    आमच्या जांभोरी गावच्या यात्रेत अनेकदा त्यांचा तमाशा असायचा. लहानपणी मी त्यांचा लोकनाट्य तमाशा अनेकदा पाहिलेला आहे.असा कलाकार पुन्हा होणे नाही.

    उत्तर द्याहटवा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...