Translate

महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे राजीनामे: घोटाळे, बंड आणि राजकीय वळणे

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत, जिथे गंभीर आरोप, घोटाळे किंवा नैतिक जबाबदारीमुळे मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. 

img src="..." alt=" महाराष्ट्र मंत्रालय मुंबई ">
या लेखात आपण यशवंतराव चव्हाण साहेब, ए. आर. अंतुले, शिवाजीराव निलंगेकर, वसंतदादा पाटील, शरद पवार, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांसारख्या मुख्यमंत्र्यांच्या काळातील महत्त्वाच्या राजीनाम्यांचा आढावा घेणार आहोत. 

तसेच आर. आर. पाटील यांच्यासह इतर नेत्यांच्या प्रकरणांचाही समावेश आहे.

यशवंतराव चव्हाण साहेब यांचा राजीनामा.

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ">
सन 1962 साली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना भारतावर चीनचे आक्रमण झाले होते. त्यावेळी पंडित नेहरू यांच्या सरकारमधील संरक्षण मंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांना परिस्थिती हाताळता न आल्यामुळे त्यांनी स्वतः राजीनामा दिला.
त्यानंतर पंतप्रधान पंडित नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी दिली. 

त्यासाठी यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यावेळी हिमालयाच्या मदतीला सह्याद्री गेला अशी म्हण प्रचलित झाली.

वसंतदादा पाटील यांचा राजीनामा

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंत दादा पाटील ">
वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना अधिवेशनामध्ये वसंतदादांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी म्हणजेच शरद पवार, सुंदरराव सोळंकी या मंत्र्यांनी राजीनामे दिले. आणि शरद पवार यांनी 45 आमदारांच्या गटासह बंड केले.

त्यामुळे वसंतदादा पाटील यांचे सरकार अल्पमतात आले आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यावेळी पाठीत खंजीर खुपसला हा शब्द प्रचलित झाला.

शरद पवार यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा 

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार ">

वसंत दादा पाटील यांच्या सरकारमधील तत्कालीन मंत्री शरद पवार यांनी ४० आमदारांसह बंड केल्यामुळे वसंत दादा पाटील यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले होते. 

त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्या ४० आमदारांसह जनता पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे आमदार एकत्र करून पुरोगामी लोकशाही दल निर्माण करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

१७ फेब्रुवारी १९८० रोजी हे सरकार इंदिरा गांधींनी कलम ३५६ नुसार राष्ट्रपती राजवट लागू करून शरद पवार यांचे सरकार बरखास्त केले. त्यामुळे शरद पवार यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

ए. आर. अंतुले प्रकरण: सिमेंट घोटाळा

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ए आर अंतुले ">
ए. आर.अंतुलें तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या खासगी ट्रस्टला पैसे मिळवून देण्यासाठी बिल्डरांना अतिरिक्त सिमेंटचा पुरवठा केला. असा तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी आरोप केला होता.
 
विद्यार्थी आणि कलाकारांसाठी ए आर अंतुले यांनी इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेची स्थापना केली होती.
त्यावेळेस महाराष्ट्रात सिमेंटची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. सिमेंट वाटपाचे संपूर्ण अधिकार कलेक्टर आणि तहसीलदार यांना दिले होते.

अशावेळी खाजगी बिल्डरांना वाढीव सिमेंटचा पुरवठा करण्यात आला होता. त्याच्या बदल्यात प्रत्येक गोणीमागे अंतुले यांनी बिल्डरांकडून इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानला मोठ्या देणग्या मिळवून दिल्या होत्या. 
हे प्रकरण तत्कालीन विरोधी पक्षनेते श्री शरद पवार यांनी उचलून धरले.

या प्रकरणी उच्च न्यायालयात आर. एस. नायक यांनी अंतुले यांच्या विरुद्ध दावा दाखल केला. न्यायालयात आर. एस. नाईक विरुद्ध ए.आर.अंतुले असा खटला चालला. 

उच्च न्यायालयाने अंतुलेंच्या विरोधात निर्णय दिल्यानंतर १२ जानेवारी १९८२ च्या जानेवारी महिन्यात अंतुले यांना राजीनामा द्यावा लागला. 

या प्रकरणामुळे त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली, पुढे या खटल्यातून ते निर्दोष सुटले. परंतु ए आर अंतुले हे आजही त्यांनी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयासाठी  प्रसिद्ध आहेत 

शिवाजीराव निलंगेकर प्रकरण मार्कशीट घोटाळा

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर ">
शिवाजीराव निलंगेकर यांना १९८६ मध्ये त्यांच्या मुलीच्या वैद्यकीय प्रवेशासाठी मार्कशीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप झाला.

निलंगेकर यांच्या कन्या चंद्रकला डवले यांनी M.D. ही परीक्षा दिली होती. यापूर्वी चंद्रकला यांनी तीनवेळा एम डी ची परीक्षा दिली होती, परंतु त्यांना अपयश आले. 

चंद्रकला यांनी चौथ्यांदा परीक्षा दिली तेव्हा त्यांचे वडील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे मुख्यमंत्री होते. चंद्रकला डवले या एम.डी. परीक्षा उत्तीर्ण झाल्या. परंतु मुख्यमंत्री असलेल्या वडिलांनी पदाचा गैरवापर करून मुलीचे दोन गुण वाढवल्याचा आरोप झाला होता. या आरोपामुळे निलंगेकरांना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं होतं.

हे प्रकरण विरोधी पक्ष आणि मीडियाने उचलून धरले. शिवाय न्यायालयाने ताशेरे ओढल्यामुळे निलंगेकरांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

निलंगेकर यांनी ३ जून १९८५ रोजी मंत्री पदाची शपथ घेतली होती. ६ मार्च १९८६  रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला.

शंकरराव चव्हाण यांचा राजीनामा 

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण ">
राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यावेळी  महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना केंद्रामध्ये गृहमंत्री या पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे शंकराव चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला.

शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर सन 1988 मध्ये शरद पवार हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

सुधाकरराव नाईक यांचा राजीनामा 

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक ">
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या सरकारला  बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत उसळलेल्या दंगली रोखण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री पदाचा २२ फेब्रुवारी १९९३ रोजी राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर त्यांची हिमाचल प्रदेश या राज्याच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली होती. 

मनोहर जोशी यांचा राजीनामा 

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी ">
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जमिनी व्यवहार यावरून आरोप झाले. त्यातच पक्षांतर्गत निर्णयामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे  यांच्या एका चिठ्ठीवर मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले होते.

विलासराव देशमुख राजीनामा प्रकरण 

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख ">
मुंबईवर २६/११/ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर प्रशासकीय अपयश आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यावर संवेदनशीलतेचा अभाव असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.

हल्ल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी मुलगा रितेश देशमुख आणि प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यासोबत हॉटेल ताजला भेट दिली, यावर  जनतेमधून आणि मीडियाकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती. 

जनतेचा रोष आणि पक्षांतर्गत दबावानंतर विलासरावांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला.

या प्रकरणावरून केवळ विलासरावच नाही, तर तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनाही राजीनामा द्यावा लागला.

अशोक चव्हाण आणि आदर्श प्रकरण

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण ">
अशोक चव्हाण यांनाही आदर्श घोटाळ्यामुळे २०१० मध्ये मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.

कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या विधवा आणि माजी सैनिकांसाठी असलेल्या या सोसायटीत अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांना सदनिका (फ्लॅट्स) मिळाल्याचा आरोप झाला होता. 

या प्रकरणामुळे काँग्रेस हायकमांडने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आणि ९ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. 

त्यावेळी आदर्श घोटाळा हा शब्द पुढे प्रचलित झाला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 

हेही वाचा :-1952 ते आतापर्यंत काँग्रेस पक्षाच्या चिन्हांचा इतिहास

पृथ्वीराज चव्हाण यांचा राजीनामा 

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ">
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचे सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतल्यामुळे त्यांचे सरकार अल्पमतात आले होते.आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा 

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ">
देवेंद्र फडणवीस यांनी सन 2019 रोजी मुख्यमंत्र्याचे पदाची शपथ घेतली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.

बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना तीनच दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी हा पहाटेचा शपथविधी म्हणून आजही मानला जातो 

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा 

img src="..." alt=" महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ">
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

त्यावेळी 50 खोके एकदम ओके हे स्लोगन वाक्य फारच प्रसिद्ध झाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात राजीनामे हे केवळ राजकीय घटना नसून ते जनतेच्या अपेक्षा, नैतिकता आणि सत्तासंघर्ष यांचे प्रतिबिंब आहेत.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)




भेसळयुक्त कलिंगड कसे ओळखाल? जाणून घ्या

उन्हाळा आणि कलिंगड अतूट नाते 

आता उन्हाळा सुरू झाला आह. पाणी उन्हाची तीव्रता सुद्धा चांगल्या प्रकारे जाणवू लागत आहे. उन्हाच्या झळा लागत आहेत. त्यामुळे सहाजिकच काहीतरी थंडगार खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी आपण आसुसलेले असतो. 

हे पाहून व्यापारी लोक स्थानिक दुकानदारांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात कलिंगड विकताना दिसतात. त्यामुळे बाजारपेठा मध्ये जिकडे तिकडे कलिंगडाचे ढिगच ढिग पाहायला मिळत आहेत. 

बाजारात सर्वाधिक मागणी असणारे फळ म्हणजे कलिंगड (टरबूज). शरीराला थंडावा देणारे, पाण्याने भरलेले आणि पोषक घटकांनी युक्त असे हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. 

पण अलीकडच्या काळात भेसळीचा प्रश्न इतका वाढला आहे की, आपण खात असलेले फळ खरोखर नैसर्गिक आहे की रसायनांनी तयार केलेले याबाबत शंका निर्माण होते.

काही व्यापारी कलिंगड लवकर पिकवण्यासाठी आणि आतून अधिक लाल दिसण्यासाठी रसायनांचे इंजेक्शन वापरत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. 

अशा भेसळयुक्त कलिंगडाचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ग्राहक म्हणून आपण सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.

या लेखामध्ये आपण भेसळयुक्त कलिंगड ओळखण्याच्या सोप्या टिप्स, त्याचे दुष्परिणाम आणि सुरक्षित खरेदीचे उपाय सविस्तर जाणून घेणार आहोत.

कलिंगडाचे खाण्याचे फायदे

कलिंगड हे फक्त चवीला गोडच नाही तर अत्यंत आरोग्यदायी फळ आहे. त्यामध्ये खालील पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात:

पाण्याचे प्रमाण (९०% पेक्षा जास्त)

व्हिटॅमिन A आणि C

पोटॅशियम

मॅग्नेशियम

फायबर

फायदे

शरीराला थंडावा देतो

डिहायड्रेशनपासून बचाव

त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर

पचन सुधारते

पण जर हेच फळ भेसळयुक्त असेल तर फायदे उलट नुकसानात बदलू शकतात.

कलिंगडाच्या आकारावरून लोक अनेकदा नर आणि मादी कलिंगड असेही वर्गीकरण करतात.

​नर कलिंगड  हे आकाराने थोडे लांबट असतात. यात पाण्याचे प्रमाण जास्त असते पण ते गोडीला थोडे कमी असू शकतात.

​मादी कलिंगड हे आकाराने पूर्ण गोलाकार असतात. ही कलिंगडं तुलनेने जास्त गोड असतात.

नेहमी आकाराने मध्यम आणि गोलाकार किंवा लंबवर्तुळाकार कलिंगड निवडावे.

भेसळयुक्त कलिंगड का धोकादायक?

काही विक्रेते कलिंगड आकर्षक दिसण्यासाठी आणि लवकर विक्री होण्यासाठी खालील रसायनांचा वापर करतात.

1. एरिथ्रोसिन (Erythrosine)

हा एक कृत्रिम रंग आहे. कलिंगड आतून अधिक लाल दिसावे म्हणून वापरले जाते.

2. कॅल्शियम कार्बाइड (Calcium Carbide)

हे रसायन फळे लवकर पिकवण्यासाठी वापरले जाते. हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.

संभाव्य दुष्परिणाम

पोटदुखी

उलट्या, मळमळ

त्वचेच्या समस्या

दीर्घकालीन आजारांचा धोका

भेसळयुक्त कलिंगड ओळखण्याच्या सोप्या टिप्स

1. टिश्यू पेपर किंवा कापूस चाचणी

कलिंगडाचा एक छोटा तुकडा घ्या आणि त्यावर टिश्यू पेपर किंवा कापूस हलकेच घासा.

जर टिश्यू लाल झाला तर फळात कृत्रिम रंग असण्याची शक्यता आहे

रंग बदलला नाही तर फळ नैसर्गिक असण्याची शक्यता जास्त

2. बाहेरील पिवळे डाग तपासा

कलिंगडाच्या सालीवर पिवळे डाग दिसले तर ते दोन प्रकारचे असू शकतात:

नैसर्गिक (जमिनीवर पडून राहिल्याने)

कृत्रिम (कार्बाइडमुळे)

खूप गडद आणि जास्तच पिवळे डाग असल्यास सावध राहा

3. इंजेक्शनच्या खुणा शोधा

कलिंगडाच्या बाहेरील भागावर लहान छिद्रे दिसली तर हे इंजेक्शन दिल्याचे संकेत असू शकतात.असे फळ खरेदी टाळा

4. आवाजावरून ओळखा

कलिंगडावर हलकेच टिचकी मारा

खणखणीत आवाज आला तर ते पिकलेले आणि चांगले आहे.

बोथट आवाज आला तर ते कच्चे किंवा खराब आहे असे समजावे.

5. वजन आणि आकार तपासा

जड कलिंगड म्हणजे त्यात पाणी जास्त आहे

खूप हलके वाटत असेल तर ते आतून खराब असू शकते

6. आतल्या भागाचा रंग 

नैसर्गिक कलिंगड जर कापले तर आत थोडे असमान पांढरा आणि लाल रंग आणि धाग्यासारखी रचना

जर कलिंगड भेसळयुक्त असेल तर कापल्यावर आत खूप गडद लाल, एकसारखा रंग

7. इंजेक्शनद्वारे रंग भरला आहे की नाही हे तपासण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे:

​कृती: कलिंगडाचा एक छोटा तुकडा कापून पाण्याच्या पेल्यात टाका.

​जर पाण्याला लगेच लाल रंग सुटला, तर समजावे की त्यात कृत्रिम रंग (Erythrosine) मिसळला आहे. नैसर्गिक कलिंगड पाणी लगेच रंगीत करत नाही.

​शुगर सिरपची भेसळ

​आजकाल फक्त रंगाचेच नाही, तर गोडव्यासाठी 'सॅकरिन' किंवा शुगर सिरप चे इंजेक्शन दिले जाते.

​जर कलिंगड कापल्यानंतर मधल्या भागातून जास्तच पाणी गळत असेल किंवा तो भाग गरजेपेक्षा जास्त चिकट लागत असेल, तर त्यात साखरेच्या पाण्याची भेसळ असण्याची शक्यता असते.

कलिंगड खरेदी करताना घ्यायची काळजी

शक्यतो विश्वासार्ह विक्रेत्याकडूनच खरेदी करा

कापलेले कलिंगड विकत घेऊ नका.

खरेदीपूर्वी तपासणी करा

घरी आणल्यानंतर मीठाच्या पाण्याने धुवा

भेसळ टाळण्यासाठी काय करावे?

आजच्या काळात ग्राहक जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे. आपण खालील गोष्टी करू शकतो:

भेसळ दिसल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवा

स्थानिक बाजारात जनजागृती करा

कुटुंबीयांना योग्य माहिती द्या.

कलिंगड हे उन्हाळ्यातील अत्यंत उपयुक्त आणि आरोग्यदायी फळ आहे. पण भेसळीमुळे त्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. 

त्यामुळे फळ खरेदी करताना थोडी काळजी घेतली तर आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो.

लक्षात ठेवा

थोडी जागरूकता, मोठा आरोग्य फायदा.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)



अजातशत्रू आणि आधुनिकतेचे दूत: किसन विठ्ठल तळपे गुरुजी

आमच्या गावातील किसन विठ्ठल तळपे गुरुजी हे व्यक्तिमत्त्व म्हणजे अक्षरशः “अजातशत्रू” म्हणून ओळखले जाते. आज त्यांचे वय सुमारे साठच्या आसपास आहे. परंतु आजपर्यंत त्यांचा कोणाशीही वादविवाद झाल्याचे कुणी ऐकलेले नाही. गावात शांत, साधे आणि संयमी स्वभावामुळे त्यांना सर्वजण आदराने पाहतात.

अतिशय बुजरा स्वभाव असल्यामुळे ते कधीही कार्यक्रमाच्या मुख्य प्रवाहात येत नाहीत. त्यांना ते आवडत देखील नाही. आपला कुणी माणसान्मान करावा. आपले नाव माइकवर पुकारावे असे त्यांना अजिबात वाटत नाही.

अतिशय गरीब परिस्थितीत शिक्षण घेऊन ते सन 1985 सन.प्राथमिक शिक्षक झाले परंतु त्यावेळी शिक्षकांना खूपच कमी पगार होता. घरच्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून स्वतःचे लग्न आणि नवीन घराचे बांधकाम अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

तळपे गुरुजींचा स्वभाव जर पाहिला तर अतिशय साधा, सरळ,काहीसा अबोल आणि बुजरा स्वभाव, एकाद्याशी बोलायचे जर झाले तर अगदी कामापुरते बोलणार. ते जास्त बोललेले अद्याप कोणी पाहिले नाही. तसे नात्याने ते माझे दूरचे आजोबा लागतात.

अनेकांना त्यांचा स्वभाव माहीत असल्यामुळे गावातील लोक त्यांच्याशी यथातथाच संपर्क ठेवतात. त्यांनाही त्याचे काही वाटत नाही. त्यामुळे अनेकांना त्यांचे अंतरंग तितकेसे कळत नाहीत.

आपल्याकडे न मागता सल्ला देणारे अनेक लोक असतात. परंतु मदत मागितली की मात्र कोणीही तयार होत नाही.

परंतु तळपे गुरुजींचे अगदी वेगळे आहे त्यांनी अद्याप कधीच कुणाला कोणताच सल्ला दिलेला नाही. आणि कधी कुणाचे भांडण मिटवायचा देखील प्रयत्न केला नाही.

परंतु जर त्यांच्याकडे एखाद्या कामाचा सल्ला मागितलाच तर मात्र अचूक मार्गदर्शन करणार. त्यावेळी त्यांचे अनुभव सांगणार. हे मात्र ठराविक लोकांनाच माहित आहे. 

भांडणाच्या बाबतीत जर त्यांना विचारले तर त्यांचे अगदी स्पष्ट मत आहे. भांडण करून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही. आणि भांडणाऱ्या दोन्ही पैकी एकाद्या व्यक्तीला चांगला सल्ला पटत नाही. त्यामुळे त्यांना सल्ला द्यायचाच कशाला?

आज अनेक लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आपण पाहतो. तरुण पोरांना कितीही चांगला सल्ला दिला तरी ते ऐकत नाही. आणि ज्यावेळी गंभीर संकट ओढवते त्यावेळी मात्र त्यांना पश्चाताप होतो.

परंतु मी मात्र सुरतीपासून त्यांचा सल्ला मानत आलेलो आहे.अनेक प्रसंगी त्यांचा सल्ला घेतला आहे आणि अजूनही घेतो. त्यांच्या सल्ल्यामागे त्यांचा अनुभव आहे.

आमच्या गावात तळपे गुरुजी हे नव्या युगाचा एक आधारस्तंभ आहेत. काळाची पाऊले ओळखून काळा बरोबर कशी प्रगती करावी हे त्यांच्याकडून शिकावे.

फार पूर्वी आमच्या गावात सेकंड हॅन्ड जुन्या सायकली, एक-दोन होत्या. एक-दोन रेडिओ होते.

परंतु तळपे गुरुजींनी नव्या युगाची पावले ओळखून सन १९८९ साली अगदी नवी कोरी करकरीत अशी ॲटलास (ATLAS) सायकल आणली होती. त्यावेळी ही सायकल पाहण्यासाठी संपूर्ण गाव त्यांच्या अंगणात लोटला होता.

ते जेव्हा नव्या सायकल वरून रपेट मारत असत तेव्हा आम्हालाही अशी सायकल घ्यायची तीव्र इच्छा व्हायची. आणि हया इछेतूनच पुढील दोन वर्षात गावामध्ये आठ नऊ सायकली दाखल झाल्या.

गावात एक दोन जणांकडे फक्त रेडिओ होते परंतु टेप रेकॉर्डर मात्र कुणाकडेच नव्हता. त्यावेळी नवीनच फिलिप्सचे वेगवेगळ्या आकर्षक रंगात आणि बॉक्समध्ये बाजारात टेप रेकॉर्डर दाखल झाले होते.

आणि अशाच वेळी गावात पहिला टेप रेकॉर्डर तळपे गुरुजींनी विकत आणला. त्यावेळी कॅसेट हा प्रकार आम्ही प्रथमच पाहिला होता. तेही वेळी टेपरेकॉर्डर पाहण्यासाठी त्यांच्या घरी गावातील लोकांची गर्दी झाली होती.

त्यावेळी दादा कोंडके यांची गाणी, गाढवाचं लग्न, प्रल्हाद शिंदे यांची भक्ती गीते, आणि मराठी चित्रपटातील गाणी अशा अनेक कॅसेट्स तळपे गुरुजींच्या घरी होत्या. संध्याकाळी त्यांच्या दारात टेप रेकॉर्डर वरची गाणी किंवा भक्ती गीते ऐकण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी व्हायची.  

त्याचवेळी कथा अनुसूयेची, राजा हरिश्चंद्र तारामतीची कथा, चांगुणाची कथा अशा अनेक कॅसेट्स त्यांच्याकडे होत्या. या कथा ऐकून लोक अक्षरशः रडताना मी पाहिले आहे.

काहीच दिवसांनी तळपे गुरुजींनी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही देखील घेतला होता. परंतु आमचा गाव चारी बाजूंनी डोंगर आणि त्यामध्ये गाव असल्याने पाहिजे तसे रेंज मिळत नव्हते. त्यामुळे टी व्ही वरील चित्र व्यवस्थित दिसत नसायचे.

वेगवेगळे प्रयोग करूनही त्यामध्ये काहीच सुधारणा होत नव्हती.

काळाची पाऊले ओळखून तळपे गुरुजींनी नवीन एम 80 मोटरसायकल आणली. त्यावेळी आमच्या गावात नव्हे तर भागात असलेली ही पहिलीच एम 80 मोटरसायकल होती.

त्यावेळी सायकल शिवाय कोणत्याच गाड्या भागत नव्हत्या. दूर वाडा गावामध्ये एक दोन राजदूत होत्या. एखादी जीप आणि ट्रक एवढेच काय ते. परंतु तळपे गुरुजींनी आणलेली नवीन एम 80 गावात एक कुतूहलाचा विषय बनली होती.

एक गमतीशीर आठवण 

एकदा मात्र मारुती तळपे वायरमन याच्या शेतात भात लावणीचे काम चालू होते. दोन-तीन बैलजोड्या चिखल करण्यासाठी झटल्या होत्या. अर्थात ते पावसाळ्याचे दिवस सुरू होते.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मारुती वायरमन माझ्याकडे आला आणि म्हणाला संध्याकाळी शेतातील कामगारांसाठी मटणाच्या जेवणाचा बेत आहे. तू पण जेवायला ये.

यावर मी म्हटलं. 

ठीक आहे. येऊ की.

यावर तो म्हणाला. 

आपल्याला गड्यांसाठी विठ्ठलवाडीला दारू आणायला जावं लागेल.

अरे पण! आता खूप पाऊस पडत आहे. शिवाय अंधार पण पडला आहे. तू लवकरच म्हटला असता तर गेलो असतो. मी म्हणालो.

यावर तो म्हणाला. 

आपण गुरुजींची M80 घेऊन जाऊ. परंतु ते मला देणार नाहीत. तूच त्यांच्याकडे माग.

आम्ही दोघे गुरुजींकडे गेलो. आणि त्यांना आमची समस्या सांगितली. परंतु काय आश्चर्य गुरुजींनी सुद्धा खळखळ न करता लगेच गाडीची चावी हातात दिली.

मी गुरुजींचा रेनकोट आणि पॅन्ट घातली आणि मारुतीला गाडीवर बसवून विठ्ठलवाडीच्या दिशेने गेलो. तेथे पोहोचल्यावर मी गाडीवरच बसून राहिलो आणि मारुती दारू आणण्यासाठी कातकऱ्यांच्या झोपडी मध्ये गेला

पाऊस जोरदारपणे कोसळत होता. मी गाडीवरच बसून होतो. रेनकोट घालूनही आतून सर्व भिजून गेलो होतो. थोड्याच वेळात मारुती दारूचा ड्रम घेऊन आला. 

तो गाडीवर बसल्यावर गाडी स्टार्ट केली आणि गिअर बदलायला गेलो तर डाव्या हातातील मुठी सकट सर्वच डांबळं (Handle Assembly) निखळून खाली आलं. खूप प्रयत्न करूनही ते काही आम्हाला बसवता येईना. पाऊस पडतच होता आणि रात्र सुद्धा वाढत होती. कुठून बुद्धी सुचली आणि गाडी घेऊन आलो असे वाटू लागले.

डोक्यात विचार चक्र चालू असतानाच अचानक लक्षात आले की येथे शेजारीच चंद्रकांत लांघी यांच्याकडे सुद्धा M80 आहे. त्यांना येत असेल तर पाहूया. म्हणून आम्ही दोघेजण त्यांच्या घरी गेलो.

आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा बाहेरचा दरवाजा उघडाच होता. चंद्रकांत लांघी हरिपाठ म्हणत होते. आम्हाला पाहिल्याबरोबर त्यांनी हरिपाठ थांबवून आमची विचारपूस केली.

आम्ही सर्व परिस्थिती सांगितल्यावर लगेच ते हरिपाठ स्थगित ठेवून गाडीचे काही पान्हे घेऊन आमच्या मदतीसाठी निघाले. गाडी जवळ आल्यावर त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला. 

अहो गाडीची गुंडी निसटली आहे. थांबा आपण बसवू या.

M80 ला गुंडी असते हे आम्ही प्रथमच ऐकत होतो. शर्टाला गुंडी असते. एवढेच आम्हाला माहीत होते. पाच-दहा मिनिटे खटपट करून त्यांनी गाडीची गुंडी बसवली. तोपर्यंत ते सुद्धा भिजून चिंब झाले होते.

मी त्यांचे आभार मानून गाडी स्टार्ट केली. मी विचार केला गिअर टाकल्यावर जर परत गुंडी निसटली तर? त्यापेक्षा रिस्क घ्यायलाच नको. आणि कोणताही गिअर न बदलता पहिल्या गियरवरच विठ्ठलवाडी ते मंदोशी असा प्रवास केला. 

गाडी व्यवस्थित गुरुजींच्या दारात पार्क करून पुन्हा कधी यांची गाडी चालवायची नाही असा निश्चय केला. तर अशा या आठवणी.

एरवी ते अगदी स्थितप्रज्ञ माणसासारखे वाटतील. परंतु त्यांचा स्वभाव तितकाच विनोदी देखील आहे.

एकदा गावाला आम्ही आमच्या शेतात देवासाठी दोन कोंबडे कापले होते. तळपे गुरुजी, मी आणि अजून एक दोन जण शेतामधील खळ्यात होतो. त्याचवेळी आकाशात ढग जमू लागले होते. पाऊस येण्याची शक्यता ही वाटत होती.

नुकतेच दोन कोंबडे कापून सर्व काही तयारी झाली होती. तीन दगडाची चूल तयार करण्यात आली होती. सरपणही गोळा करून आणले होते. चुल पेटवली आणि पाऊस पडायला सुरुवात झाली.

हळूहळू पावसाने रुद्र रूप धारण केले. त्यावेळी आमच्या अंगावर छत्री वगैरे  काहीच नव्हते. सर्व काही भिजून गेले. आता पुढे काय करायचे या विवंचनेत  आम्ही होतो. भूकही प्रचंड लागलेली होती.

आणि अशावेळी तळपे गुरुजींनी मोठ्याने गाणे म्हणायला सुरुवात केली. आम्ही हे पाहून आवक झालो.

यावर मी त्यांना बोललो 

अहो प्रसंग काय तुम्ही नाचताय काय?

यावरती म्हणाले नका टेन्शन घेऊ उघडेल पाऊस.

अहो पाऊस उघडेल परंतु आपले सरपण आणि चुल विझुन गेली त्याचे काय?

नका काळजी करू होईल व्यवस्थित. अशा प्रसंगी असा पाऊस परत कधी पडेल का? तर घेऊया थोडेसे नाचून आणि गाऊन. यावरती पुन्हा गाणे म्हणू लागले.

थोड्याच वेळात पाऊस उघडला. यावर मी म्हटले आता काय करायचे?

ते म्हणाले तुमच्या घरातून गॅस आणि शेगडी घेऊन या आपण त्यावर स्वयंपाक करू. ही आयडिया आमच्या ध्यानीमनी देखील नव्हती.

तात्काळ आम्ही गॅस आणि शेगडी आणली आणि त्यावर स्वयंपाक केला.

संकटात असताना देखील आनंद कसा मिळवायचा आणि संकटावर मात कशी करायची हे फक्त तळपे गुरुजींकडूनच शिकावे.

एकदा मी गावाला यात्रेच्या मीटिंगसाठी गेलो होतो. त्यावेळी मी खूपच आर्थिक अडचणीत होतो. 

मीटिंग संपल्यावर तळपे गुरुजी माझ्याकडे आले आणि एका बाजूला नेऊन माझ्या खिशात सात हजार रुपये ठेवले.

यावर मी म्हटले आहो ! कशाला मला पैसे देताय?

यावरती म्हटले राहू दे, संकट काळात मदत करायची नाही तर मग केव्हा? असे म्हणून ते तिथून निघून गेले.

त्यांचे घरचे कुटुंब देखील अतिशय सुसंस्कृत. त्यांची पत्नी म्हणजे आमची सखू आज्जी.... परंतु सर्वजण आज्जीच म्हणतात. त्यांचे लग्न झाल्यापासून त्या जेव्हा आमच्या गावात नांदायला आल्या तेव्हापासून सारागाव त्यांना आज्जीच म्हणतो. 

सखू आज्जीचा स्वभाव देखील अतिशय मनमिळावा असा आहे. नाती कशी जपायची हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे. त्यांचा हसतमुख चेहरा पाहून मरगळलेल्या माणसाला देखील जगण्याची नवीन ऊर्जा मिळते. अडल्या नडलेल्यांना गरजवंतांना सतत त्या मदत करताना दिसतात.

त्यांच्या घरासमोरून चालताना त्यांनी जर घरातून पाहिले तर मोठ्याने हाक मारून त्या बोलावून घेणार आणि चहापाणी करूनच सोडणार. 

गावाला तर सतत त्यांच्याकडे पाहुणे मंडळींची रेलचेल असते. 

तळपे गुरुजींनी अगदी सुरुवातीला त्यांनी कारकूडी, भिवेगाव येथे उपशिक्षक म्हणून काम केले. ज्ञानार्जनाचे काम करत असताना अनेक विद्यार्थी घडवले. तेथील लोकांशी त्यांचे अजूनही तितकेच चांगले संबंध आहेत. हे त्यांच्या वागणुकीवरून लक्षात येते.

त्यानंतर त्यांना मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती मिळाली. खेड तालुक्याच्या पूर्व भागात काम करत असताना. तिथेही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले. गावकऱ्यांशी आणि शिक्षकांशी त्यांचे अतिशय चांगले संबंध होते.

ते जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा ते कार्यरत असलेल्या चांदुस गावाने आणि शिक्षकांनी त्यांचा मोठा सेवापूर्ती कार्यक्रम आयोजित केला होता. आमच्या गावातूनही अनेक लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.

त्यांनी आमच्या गावासाठी देखील त्यांच्या सेवापुर्ती निमित्त उत्तम जेवणाचे आयोजन केले होते. परंतु दुर्दैवाने मला त्यांच्या दोनही कार्यक्रमाला जाता आले नाही.

आजच्या धावपळीच्या आणि दिखाऊपणाच्या काळात तळपे गुरुजींसारखी साधी, शांत आणि संयमी माणसे फार कमी दिसतात. 

त्यांनी कधी प्रसिद्धीची अपेक्षा ठेवली नाही, पण त्यांच्या आयुष्याने मात्र अनेकांना प्रेरणा दिली. म्हणूनच आमच्या गावासाठी तळपे गुरुजी हे फक्त शिक्षक नाहीत, तर एका युगाचे साक्षीदार आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.

त्यांच्याकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते की, निवृत्ती म्हणजे केवळ कामातून थांबणे नव्हे, तर स्वतःच्या अनुभवाची शिदोरी पुढच्या पिढीला अत्यंत निगर्वीपणे देणे होय. धावपळीच्या या युगात, जिथे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत धावतोय, तिथे तळपे गुरुजी एखाद्या संतासारखे शांत उभे आहेत.

रामदास तळपे ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान 

 

  



केक्यादादा एक कलंदर माणूस

ग्रामीण भागातील कलंदर माणसं 

ग्रामीण भागात सर्वात कलंदर कलाकार कोण असेल तर तो म्हणजे केक्या दादा. केक्या दादाला ओळखत नाही असा शोधूनही माणूस सापडणार नाही.

img src="..." alt=" केक्यादादा ">
जातीने सुतार.गोरा पान, उंच धडंग गडी. पांढरा पायजमा व शर्ट डोक्यात वाकडी गांधी टोपी, गळ्यात तुळशीची माळ, एकेक शब्द अडखळत बोलणार. परंतु एकदा तोंडाचा पट्टा सुरू झाला की अजिबात थांबणार नाही. वाटेत जाताना कोणी जर भेटलं तर अगदी वाकून राम राम करणारा अगदी भोळा भाबडा, मनाने गरीब परंतु अतिशय विनोदी स्वभावाचा असा हा केक्या दादा.

केक्या दादाचे नाव लक्ष्मण सावळेराम सुतार जरी असले तरी सर्व भागातील बाया व गडी माणसे, लहान सहान त्याला केक्यादादा या टोपण नावानेच हाक मारणार. 

जात सुतार असल्यामुळे नवीन घरांची कामे, घर दुरुस्तीची कामे, लाकडी अवजारे, लाकडी वस्तू बनवणे हे त्याचे काम. हे सर्व सुतारकाम तो अगदी इमाने इतबारे करीत असे.

मुळात विनोदी स्वभाव असूनही केक्या दादाने खरंतर त्यावेळी प्रसादिक भारुड मंडळात काम करायला पाहिजे होते. परंतु का? काय माहित त्याने विठू नांगरे सारखा प्रसादिक भारुड मंडळाचा मार्ग स्वीकारला नाही. 

त्यावेळेस शाळेत पायी डेहणे येथे जावे लागायचे. शाळेत जाताना वांजळे येथील पूल ओलांडून डेहणे येथील ओढ्यातील पुलावरून जावे लागायचे.आमची शाळा सकाळी 11 वाजता असायची.

पावसाळ्यातील प्रसंग 

ते पावसाळ्याचे दिवस होते. त्यादिवशी अगदी मध्यरात्रीपासून सततधार पाऊस चालू होता.ओढ्या नाल्यांना जिकडे तिकडे पूर आला होता.भीमा नदी सुद्धा दुथडी भरून हद्द ओलांडून वाहत होती. आणि अशाही परिस्थितीत आम्ही शाळेत चाललो होतो.

डेहणे गावच्या ओढ्याला भयंकर पूर आला होता. पुलावरून पाणी तीव्र गतीने वाहत होते. पुलावरून पलीकडे जायचे कुणाचेच धाडस होत नव्हते. दोन्ही बाजूचे लोक पुलाच्या दोन्ही टोकावर ओढ्याचे  पाणी कमी होण्याची वाट पाहत होते.

इतक्यात डेहण्याच्या बाजूकडून मोठ्या धाडसाने केक्या दादांने पुलावरून चाललेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये प्रवेश केला व पूल ओलांडून आमच्या बाजूकडे सुखरूप आला. त्याचे धाडस बघून इतरही लोक एकमेकांच्या हाताला धरून पुलावरील पाण्यात शिरले. व पूल ओलांडू लागले. आणि आमच्या बाजूकडे सुखरूप आले.

केक्या दादांनी आम्हा पोरांना सांगितले.

पोरांनो! ओढ्याला खूप पाणी आहे. तुम्ही आता घरी चला. त्याचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही त्याच्याबरोबर घरच्या दिशेने चालू लागलो. 

थोडं पुढे गेल्यावर काही बाया समोरून येत होत्या. जवळ आल्यावर एका बाईने विचारले.

केक्या दादा, डेहण्याच्या वाहळाला किती पाणी हाये रे?

यावर केक्या दादा म्हणाला.

हाये टेऱ्या, टेऱ्या.... जाशाल तुम्ही. 

हरिपाठ आणि केक्यादादा 

एकदा जावळेवाडीला त्याने काम घेतले होते. संध्याकाळी दिवस बुडाल्यावर केकया दादा जावळेवाडी वरून मोरोशीला आमच्या शेताच्या बांधावरून चालला होता. व चालता चालता हरिपाठ म्हणत होता.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधी वेल्या!

यावर आम्ही अरे! केक्या दादा हरिपाठ हा देवळात म्हणायचा असतो.

त्याचं काय आहे. माझा आता हरिपाठचा टाईम झाला आहे. हरिपाठ हा वेळेतच म्हणला पाहिजे. मग मी कुठेही असलो तरी सहा वाजले की हरिपाठ चालू करतो. 

एक वेळ मुसलमान नमाज पठण करायला वेळ चुकवतील पण मी हरिपाठाची वेळ चुकवत नाही.

कामाचा व्यवहार

एकदा त्याने आमच्या चुलत्याच्या घराच्या दुरुस्तीचे काम घेतले होते. सकाळी सकाळी चुलत्याच्या ओटीवर कामाच्या व्यवहाराची बोलणी चालू होती.

गावातील चार-पाच माणसे एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला केक्या दादा यांचा व्यवहार चालू होता.

केक्या दादांनें कामाचे 850 रुपये सांगितले. 

यावर गावच्या लोकांनी 700 रुपये सांगितले.

केक्या दादा मात्र 800 रुपयावर ठाम होता. शेवटी गावच्या लोकांनी 725 रुपये फायनल केले.

यावर केक्या दादा म्हणाला.

शे ssssss वटचं सांगतो. पावणे सातशेच्या कमी होणार नाही. नाहीतर काम दुसरं कोणालाही द्या.

हे ऐकून बाकीचे लोक चक्रावले. ते लगेच या गोष्टीला तयार झाले.

मी तिथेच होतो. मी त्याला विचारले. केवढ्याला काम फायनल झाले. 

तर तो म्हणाला पावणे सातशे...

यावर मी म्हटले. तुला व्यवहार कळतो का?

यावर तो उतरला.सा ssssहेब बरोबर आहे पावणे सातशे शेवटी मला परवडलं पाहिजे ना?

अरे, सारखा पावणे सातशे काय म्हणतो. त्यांनी सव्वा सातशे सांगितले. आणि तू मात्र पावणे सातशे सांगतोय. तुला साडेसातशे म्हणायचं आहे.

त्याच्या चूक लक्षात आल्यावर मात्र तो भलताच गोंधळून गेला. मग मी लोकांना साडेसातशेला फायनल करायला लावले.

देणगीचा मजेशीर प्रसंग 

एकदा आम्ही धामणगाव येथे यात्रेनिमित्त आखाड्याला कुस्त्या पाहायला गेलो होतो. आमच्या गावातील सात-आठ जण बरोबर होते.

दुपारचा हजेरीचा कार्यक्रम नुकताच झाला होता. आम्ही मेमाणे गुरुजींच्या दारात बसलो होतो. सहज टाइमपास म्हणून मी आणि माझा मित्र दगडू जढर कुठल्यातरी गावच्या यात्रेच्या हँडबिल वरील देणग्यांचा हिशोब करत होतो. जवळच सात आठ पोरे निवांत बसली होती. 

तेवढ्यात घाईघाईने तेथून केक्या दादा जाताना दिसला. 

यावर आमच्या गावातील एक जणांने केक्या दादाला हाक मारली.. केक्या दादा परत माघारी फिरला. आणि आमच्या जवळ येऊन त्याला म्हणाला..

बो sssss ल काय काम आहे? माझ्याजवळ टाईम नाही. मला अर्जंट काम आहे.

यावर गावातला एक जण म्हणाला. 

केक्या दादा, बोल! तुझी देणगी किती करायची? 151 का 101 बोल किती करू?

यावर केक्या दादा म्हणला माझे 51 रुपये करा. आणि नाव लिहा. लक्ष्मण सावळेराम सुतार.असे म्हणून त्यांने 51 रुपये दगडू जढरच्या हातात दिले. आणि तात्काळ निघून गेला. आम्ही आवक होऊन बघू लागलो.

मी आमच्या पोरांना सांगितले अरे, केक्या दादाला परत बोलवा आणि त्याचे पैसे देऊन टाका. कशाला त्या गरीबाचे पैसे घेतात? परंतु एकदा हातात पडलेले पैसे पोरं थोडीच देणार. राहू द्या, रेवड्या घ्यायला होतील. असे म्हणून विषय संपवला.

रात्रीचा प्रसंग 

एकदा रात्री साधारण पावणे आठच्या दरम्यान मी मोटरसायकल वरून तळेघर मार्गे घरी चाललो होतो. तळेघरच्या पुढे माळामध्ये जे तळे आहे त्याच्या पाठीमागे काळ्या कभिन्न अंधारातून केक्या दादा चालला होता.

मोटरसायकलच्या उजेडातून अगदी लांबूनच मी त्याला ओळखले. एका हातात पांढरी पिशवी असलेली हत्यारे व दुसऱ्या हातात खांद्यावर घेतलेली करवत घेऊन तो अतिशय घाईघाईने चालला होता.

👉🏻 हेही वाचा विठू नांगरे भारुड सम्राट

मी जवळ गेल्यावर त्याला मोठ्याने हाक मारली. केक्या दादा कुठे गेला होता रे? इतक्या रात्री अंधारातून चाललाय?

मला पाहिल्यावर त्याला खूप आनंद झाला. तो एकच वाक्य सारखा म्हणायचा. साहेब देवाच्या रूपानेच तुम्हाला पाठवलं. कारण पुढे जंगलातून जाताना मला खूप भीती वाटणार होती. मी सारखा देवाचा धावा करीत होतो. आणि तुम्ही अचानक आले. आणि तशाही स्थितीत तो माझ्या पाया पडू लागला.

मी त्याला मोटरसायकलवर बसवले व गप्पा मारत पुढे चालू लागलो. त्याने जांभोरीला कुणाचे तरी घराचे काम घेतले होते. काम पूर्ण करण्याच्या नादात उशीर झाला हे त्याला कळलेच नाही.

पुढे गेल्यावर गावातील अनेक लोक पायी पायी दूंदा बांगर यांच्या सत्यनारायण पूजेला चालले होते. मग आम्ही ही पूजेला गेलो. सत्यनारायणाचा प्रसाद घेतल्यावर अंगणामध्ये बसून आमटी भात व शाक भाजीचे येथेच भोजन केले. आणि केक्या दादाला त्याच्या गावाला मोरोशीला सोडले व घरी आलो.

आता केक्या दादाचा मुलगा गणपत हा राजगुरुनगर येथे राहत आहे. केक्या दादाही अधून मधून राजगुरुनगरला येतो. अधून मधून रस्त्यात भेटतो. लांबूनच दोन्ही हात जोडून व अगदी वाकून नेहमीच्या पद्धतीने रामराम करतो. मी त्याला घेऊन म्हसे मामाच्या चहाच्या ठेल्यावर जातो. आम्ही दोघे तिथे बसून चहा पीत पीत जुन्या आठवणींना उजाळा देतो.

✍️ माझा हा लेख मूळतः Marathishrushti वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे.


रामदास तळपे. (ग्रामीण संस्कृती) 




 


सायकलनंतर गावाला वेग देणारी गाडी – M80 च्या त्या जुन्या आठवणी”

M 80 मोटरसायकल ग्रामीण भागाचा आधार 

img src="..." alt=" M 80"मोटारसायकल >
पूर्वी पुणे शहराला सायकलींचे शहर असे म्हणत असत. परंतु सन 1980 च्या दशकात मात्र क्रांती झाली आणि हळूहळू रस्त्यावर लुना स्कूटर दिसू लागल्या.

सन 1986 ते 1995 पर्यंत ग्रामीण भागात डांबरी रस्ते झाले नव्हते. खडीचे कच्चेच रस्ते होते. असे असताना देखील 1986 नंतर M 80 मोटरसायकल गावाकडे बऱ्यापैकी दिसू लागल्या. त्याआधी पंचक्रोशी मध्ये किंवा एखाद्या मोठ्या गावात एखादी राजदूत गाडी असायची.

एक काळ असा होता की ग्रामीण भागातील रस्त्यावर एखादी गाडी दिसली की लोक वळून बघायचे. त्या काळात सायकलनंतर गावोगावी ज्या वाहनाने सर्वसामान्य माणसाला वेग दिला, ते म्हणजे M80 मोटरसायकल. मजबूत बांधणी, साधी रचना आणि कमी खर्च यामुळे M80 अनेक कुटुंबांचा अविभाज्य भाग बनली होती.

आज आधुनिक बाईक्स आणि स्कूटरच्या युगात M80 क्वचितच दिसते, पण ज्यांनी त्या काळात ती चालवली आहे त्यांच्यासाठी ती केवळ वाहन नव्हती, तर आठवणींचा खजिना आहे.

सन 1986 नंतर ग्रामीण भागात M 80 चे आगमन 

सन 1986 नंतर अगदी हलकीफुलकी लाल आणि पिवळ्या रंगात उपलब्ध असलेली एम 80 बाजारात आली.

एम 80 मोटरसायकलच्या डव्या हाताच्या मुठीत (Handle grip) गिअर बदलण्याची सोय होती.

गिअर क्लच दाबून पुढे आणि बाकीचे दोन गियर मागे होते. 

हँडलवरच 1, 0, 2, 3 असे गियरचे नंबर होते. त्यामुळे ही गाडी शिकायला सर्वात सोपी आणि सुटसुटीत होती. वजनाला हलकी देखील. 

हँडलवरच गिअर असल्यामुळे ही गाडी शिकायला अत्यंत सोपी होती.अनेक लोक याच गाडीवर गाडी चालवायला शिकले.

गावातील दैनंदिन जीवनात M80 चा वापर 

गावाकडे M80 फक्त फिरण्यासाठी वापरली जात नव्हती. ती कामाची गाडी होती.

सकाळी दूध डेअरीला नेण्यासाठी

बाजारात भाजीपाला किंवा धान्य नेण्यासाठी

शेतात जाण्यासाठी

मुलांना शाळेत सोडण्यासाठी

लग्नकार्य किंवा जत्रेला जाण्यासाठी

ऑफीसला जाण्यासाठी 

कधी कधी M80 वर तीन-चार जण बसलेले दिसायचे. मागे मोठा कॅरियर असल्यामुळे त्यावर पोते, दूधाचे कॅन किंवा भाजीच्या टोपल्या बांधल्या जायच्या.

त्या काळात पेट्रोल अगदीच स्वस्त होते साधारण 20 रुपये लिटर आणि या गाडीला मायलेज सुद्धा 40 ते 45 असे होते. त्यामुळे सर्वसामान्य माणसांना ही गाडी परवडत असे.

अनेक लोकांना नवीन M 80 घ्यायची ऐपत नसायची. परंतु M 80 घ्यायची तीव्र इच्छा असायची तेव्हा लोकांकडे सेकंड हॅन्ड M80 घेण्याचा पर्याय उपलब्ध असायचा.तेव्हा या गाडीची रिसेल व्हॅल्यू सुद्धा अतिशय उत्तम होती.

त्या काळात M80 असलेला माणूस गावात थोडा प्रतिष्ठित समजला जायचा.

लग्नासाठी मुलगी पाहायला जाताना किंवा जत्रेला जाताना M80 वर जाणे हे अभिमानाची गोष्ट मानली जायची.

आमच्या गावात एम 80 चे आगमन 

आमच्या गावात प्रथम सन 1997 च्या आसपास आमच्या किसन तळपे गुरुजींनी सेकंड हॅन्ड M80 विकत घेतली. तेव्हा सारा गाव ही गाडी पाहण्यासाठी गोळा झाले होते.

तळपे गुरुजी गाडीची अतिशय चांगल्या पद्धतीने काळजी घेत असत. शक्यतो ते कोणालाच गाडी वापरायला देत नसत.

तळपे गुरुजी नव्या युगाचा आधारस्तंभ 

आमच्या गावचे प्रामाणिक आणि सचोटीने वागणारे व्यक्तिमत्व म्हणजे किसन तळपे गुरुजी. त्यांनी नव्या युगात चाललेले बदल तातडीने अमलात आणले.

आमच्या गावात पूर्वी एक दोन सेकंड हॅन्ड सायकली होत्या. परंतु सर्वात पहिली नवीन कोरी करकरीत ॲटलस (ATLAS) सायकल तळपे गुरुजींनी विकत आणली तेव्हा सारा गाव पाहायला गेला होता.

त्याचप्रमाणे नवीन टेप रेकॉर्डर, नवीन ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही, एम 80 सर्वप्रथम तळपे गुरुजींनीच खरेदी केली. त्यामुळे आमच्या गावाचे नव्या युगाचे प्रवर्तक म्हणून त्यांची ख्याती आहे. 

एक गमतीशीर आठवण 

एकदा मात्र मारुती तळपे वायरमन याच्या शेतात भात लावणीचे काम चालू होते. दोन-तीन बैलजोड्या चिखल करण्यासाठी झटल्या होत्या. अर्थात ते पावसाळ्याचे दिवस सुरू होते.

संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मारुती वायरमन माझ्याकडे आला आणि म्हणाला संध्याकाळी शेतातील कामगारांसाठी मटणाच्या जेवणाचा बेत आहे. तू पण जेवायला ये.

यावर मी म्हटलं. 

ठीक आहे. येऊ की.

यावर तो म्हणाला. 

आपल्याला गड्यांसाठी विठ्ठलवाडीला दारू आणायला जावं लागेल.

अरे पण! आता खूप पाऊस पडत आहे. शिवाय अंधार पण पडला आहे. तू लवकरच म्हटला असता तर गेलो असतो. मी म्हणालो.

यावर तो म्हणाला. 

आपण गुरुजींची M80 घेऊन जाऊ. परंतु ते मला देणार नाहीत. तूच त्यांच्याकडे माग.

आम्ही दोघे गुरुजींकडे गेलो. आणि त्यांना आमची समस्या सांगितली. परंतु काय आश्चर्य गुरुजींनी सुद्धा खळखळ न करता लगेच गाडीची चावी हातात दिली.

मी गुरुजींचा रेनकोट आणि पॅन्ट घातली आणि मारुतीला गाडीवर बसवून विठ्ठलवाडीच्या दिशेने गेलो. तेथे पोहोचल्यावर मी गाडीवरच बसून राहिलो आणि मारुती दारू आणण्यासाठी कातकऱ्यांच्या झोपडी मध्ये गेला.

पाऊस जोरदारपणे कोसळत होता. मी गाडीवरच बसून होतो. रेनकोट घालूनही आतून सर्व भिजून गेलो होतो. थोड्याच वेळात मारुती दारूचा ड्रम घेऊन आला.

 गाडी नादुरुस्त झाली 

तो गाडीवर बसल्यावर गाडी स्टार्ट केली आणि गिअर बदलायला गेलो तर डाव्या हातातील मुठी सकट सर्वच डांबळं (Handle Assembly) निखळून खाली आलं. खूप प्रयत्न करूनही ते काही आम्हाला बसवता येईना. पाऊस पडतच होता आणि रात्र सुद्धा वाढत होती. कुठून बुद्धी सुचली आणि गाडी घेऊन आलो असे वाटू लागले.

डोक्यात विचार चक्र चालू असतानाच अचानक लक्षात आले की येथे शेजारीच चंद्रकांत लांघी यांच्याकडे सुद्धा M80 आहे. त्यांना येत असेल तर पाहूया. म्हणून आम्ही दोघेजण त्यांच्या घरी गेलो.

आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा बाहेरचा दरवाजा उघडाच होता. चंद्रकांत लांघी हरिपाठ म्हणत होते. आम्हाला पाहिल्याबरोबर त्यांनी हरिपाठ थांबवून आमची विचारपूस केली.

चंद्रकांत लांघी या देवदुताची मदत 

आम्ही सर्व परिस्थिती सांगितल्यावर लगेच ते हरिपाठ स्थगित ठेवून गाडीचे काही पान्हे घेऊन आमच्या मदतीसाठी निघाले. गाडी जवळ आल्यावर त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला. 

अहो गाडीची गुंडी निसटली आहे. थांबा आपण बसवू या.

M80 ला गुंडी असते हे आम्ही प्रथमच ऐकत होतो. शर्टाला गुंडी असते. एवढेच आम्हाला माहीत होते. पाच-दहा मिनिटे खटपट करून त्यांनी गाडीची गुंडी बसवली. तोपर्यंत ते सुद्धा भिजून चिंब झाले होते.

मी त्यांचे आभार मानून गाडी स्टार्ट केली. मी विचार केला गिअर टाकल्यावर जर परत गुंडी निसटली तर? त्यापेक्षा रिस्क घ्यायलाच नको. आणि कोणताही गिअर न बदलता पहिल्या गियरवरच विठ्ठलवाडी ते मंदोशी असा प्रवास केला. 

गाडी व्यवस्थित गुरुजींच्या दारात पार्क करून पुन्हा कधी यांची गाडी चालवायची नाही असा निश्चय केला. तर अशा या आठवणी.

आज आधुनिक बाईक्स आणि स्कूटरच्या गर्दीत M80 फारशी दिसत नाही. पण ज्या पिढीने तिच्यावर स्वार होऊन गावच्या कच्च्या रस्त्यांवर प्रवास केला आहे, त्यांच्या आठवणीत ही गाडी आजही तितकीच जिवंत आहे.

M80 म्हणजे फक्त वाहन नव्हते, तर त्या काळातील ग्रामीण जीवनाचा विश्वासू साथीदार होते.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान) 



घराघरात वापरले जाणारे रॉकेल – एक काळ (आठवणी)

रॉकेलच्या जुन्या आठवणी 

img src="..." alt=" पितळी स्टोव्ह ">
आजच्या गॅस, इंडक्शन आणि विजेच्या युगात रॉकेल (केरोसीन) हा शब्दही नवीन पिढीला माहीत नसेल.परंतू काही वर्षांपूर्वीपर्यंत घराघरात मोठ्या प्रमाणावर परवालीचा होता. 

ग्रामीण भागात तर रॉकेल म्हणजेच घराचा प्रकाश, स्वयंपाक आणि जगण्याचा आधार होता. रॉकेलचा दिवा, स्टोव्ह, गॅसबत्ती आणि रेशन दुकानातील रॉकेलची रांग या सगळ्या गोष्टी आजही अनेकांच्या आठवणींमध्ये जिवंत आहेत.

हा लेख त्या काळाच्या आठवणींना उजाळा देणारा आहे.

रॉकेल म्हणजे काय?

रॉकेल हे पेट्रोलियमपासून तयार होणारे एक द्रवरूप इंधन आहे. स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण आणि मध्यमवर्गीय  कुटुंबांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असे. रॉकीलला केरोसीन ही इंग्रजी नाव होते तर ग्रामीण भागात रॉकेलला घासलेट असे सुद्धा म्हणत असत.

रॉकेलचे प्रमुख उपयोग

रॉकेलचे उद्योग क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होत होता. परंतु ग्रामीण भागात गरीब जनतेचे रॉकेल हे जगण्याचे महत्त्वाचे साधन होते.

अनेक भागात तेव्हा गावागावामध्ये वीज पोहोचली नव्हती. त्यामुळे चिमणी, काचेचा कंदील, गॅसबत्ती,स्टोव्ह व चूल पेटवण्यासाठी रॉकेलची खऱ्या अर्थाने गरज भासायची.

रेशन दुकानदार 

त्याकाळात रॉकेलची खुल्या बाजाराने विक्री होत नसे. तेव्हा रॉकेल रेशन दुकानात मिळत असे. दर महिन्याला रेशन दुकानापुढे भली मोठी रांग लागत असे. 

काही रेशन दुकानदार महावस्ताद असत. उशीरा रॉकेल नेण्यासाठी आलेल्या लोकांना रॉकेल संपले असे सांगत तसेच प्रत्येक कुटुंबाचे थोडे थोडे रॉकेल शिल्लक ठेवून काळ्या बाजाराने हॉटेल मालकांना विकत असत. त्यावेळी रेशन दुकानदारांना मोठी डिमांड होती.

स्वयंपाकासाठी (रॉकेलचा वापर)

रॉकेल हे स्वयंपाकाचे प्रमुख इंधन होते. चुल पेटवण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात रॉकेलचा उपयोग होत असे.गोवरीवर थोडे रॉकेल शिंपडायचे आणि माचीसची काडी ओढायची. तात्काळ मोठा जाळ व्हायचा. आणि चूल पेटायची.

शेणाच्या गोवऱ्या 

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर स्त्रिया शेणाच्या गोवऱ्या बनवत असत. सकाळी व संध्याकाळी गोवरीवर थोडे रॉकेल टाकून चूल पेटवत असत. गोवऱ्या हया प्रामुख्याने जनावरांनी न खाल्लेले गवत व शेण या पासून बनवल्या जात असत.

रॉकेलचा दिवा – अंधारातील उजेड

ग्रामीण भागात वीज नसलेल्या काळात रॉकेलचा दिवा म्हणजेच घराचा एकमेव उजेड. संध्याकाळ झाली की आई किंवा आजी दिव्यात वात बसवून रॉकेल भरायची आणि दिवा लावायची.

चिमणी 

लोखंडी पत्र्यापासून नरसाळ्याच्या आकाराचा छोटा दिवा बनवलेला असे. त्यामध्ये रॉकेल भरून जुन्या कपड्याच्या चिंध्यांची वात तयार करून त्यामध्ये सोडायची. आणि त्यामध्ये रॉकेल भरायचे.

प्रत्येकाच्या घरी अशा रॉकेलच्या चिमण्या असायच्या. ही चिमणी चुलीच्या भानवसीवर, किंवा घडवंचीवर ठेवलेली असायची. तिचा मिनमिनता प्रकाश घरभर पसरायचा. ही चिमणी बाजारात किंवा बोहऱ्याच्या दुकानात विकत मिळत असे.

काही लोकांकडे चिमणी घ्यायलाही पैसे नसत. अशावेळी छोट्या काचेच्या बाटलीत रॉकेल भरून वात तयार करून ती पेटवली जाई. त्याचाही चिमणी सारखाच उजेड पडत असे.

कंदील 

अनेक जणांना काचेचा कंदील माहित असेल किंवा त्याचे चित्र पाहिले असेल. पूर्वी अनेक मध्यमवर्गीय लोकांकडे हा कंदील असायचा.

कंदीलला सर्वात खाली छोटी गोल छोटी टाकी असायची. त्यामध्ये रॉकेल भरायचे. कॉटनच्या कापडाची वात तयार करायची. ती वात रॉकेलच्या टाकीत जाईल अशी व्यवस्था असे. वात खाली वर करायला तारेचे अगदी छोटे गोल चाक असे. त्यामुळे कंदील असा उजेड कमी जास्त करता येत असे.

कंदील मधील ज्योत विझू नये म्हणून गोल काचेची व्यवस्था केलेली असे. ही काच काही वेळाने कंदीला मध्ये ज्योत असलेल्या धुरामुळे काळी पडत असे. त्यामुळे कंदीलाची काच दररोज स्वच्छ करावी लागत असे. काच पडू नये म्हणून त्यालाच लोखंडी तार अडकवलेले असे.

कंदील हा रात्री अपरात्री कोठेही बाहेर घेऊन जाता येत असे. त्यामुळे कंदील हे दिव्या पेक्षाही प्रगतीचे खूपच पुढचे साधन होते.

रानामध्ये गाईगुरे हरवल्यावर त्यांचा शोध घेण्यासाठी, मुलांना अभ्यासासाठी, शेताची राखणी करण्यासाठी, दूर गावच्या भजनाला किंवा यत्रांना जाण्यासाठी त्याकाळी कंदीलाचा फारच उपयोग होत असे.

गॅसबत्ती 

गॅसबत्ती कंदीलाच्या पेक्षा फारच पुढचे प्रगतीचे पाऊल होते.  

ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात गॅस बत्तीला एक वेगळेच स्थान होते. लग्न समारंभ असो, जत्रा असो किंवा गावातील एखादा मोठा कार्यक्रम असो, गॅस बत्तीशिवाय तो कार्यक्रम पूर्णच होत नसे.

गॅस बत्ती हा रॉकेलवर चालणारा प्रेशर दिवा होता. कंदील पेक्षाही शंभर पटीने याचा उजेड जास्त होता आणि तोही पांढरा स्वच्छ. 

या गॅसबत्ती मध्ये रॉकेलला दाबाने वर पाठवले जाते आणि ते जळताना  मॅन्टलच्या जाळीला तापवते. ही जाळी तापल्यावर खूप तेजस्वी पांढरा प्रकाश निर्माण होतो.

हा प्रकाश इतका प्रखर असतो की एखाद्या मोठ्या अंगणात किंवा रस्त्यावर देखील पुरेसा उजेड पडतो.

मला लहानपणी या गॅस बत्तीचे खूपच कुतूहल वाटत असे. आणि अजूनही तितकेच वाटत आहे. मोठे झाल्यावर आपणही एक गॅसबत्ती घ्यावी असे त्यावेळी माझे स्वप्न होते. परंतु आद्यपही ते पूर्ण झाले नाही.

गॅसबत्तीची मेंटल (पांढरी जाळी) नेहमी बदलायला लागत असे. ही जाळी त्यावेळी दुकानांमध्ये विक्रीला असायची.

गावातील लग्न आणि गॅस बत्ती

पूर्वी गावात लग्न समारंभ म्हणजे एक मोठा सोहळा असायचा. लग्नाच्या मिरवणुकीत गॅस बत्तीचा विशेष वापर होत असे. काही लोक खांद्यावर गॅस बत्ती घेऊन पुढे चालत असत आणि त्या प्रकाशात संपूर्ण मिरवणूक उजळून निघायची.

वाजत-गाजत ढोल, ताशा, बँडच्या तालावर मिरवणूक निघायची आणि गॅस बत्तीचा उजेड त्या वातावरणाला आणखी रंगतदार बनवायचा. त्या प्रकाशात वधू-वरांची मिरवणूक पाहायला गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण रस्त्यावर उभे राहत.

जत्रा आणि गॅस बत्ती

गावातील जत्रा हा देखील मोठा उत्सव असायचा. त्या काळात जत्रेतील दुकानं, खेळणी, मिठाईची स्टॉल्स आणि तमाशाचे फड हे सगळे गॅस बत्तीच्या प्रकाशात उजळलेले असायचे.

जत्रेच्या मैदानात रात्री गॅस बत्ती लावल्यावर संपूर्ण परिसर उजळून निघायचा. यात्रेला काही दुकाने हमखास यायची. काही दुकानदारांकडे सुद्धा गॅसच्या बत्त्या होत्या. त्या उजेडात लोक खरेदी करायचे, गप्पा मारायचे आणि कार्यक्रमांचा आनंद घ्यायचे.

तमाशा आणि नाटकात गॅस बत्ती

पूर्वी ग्रामीण भागात तमाशा आणि लोकनाट्य आणि प्रासादिक संगीत भारूड यांना खूप मोठे महत्त्व होते. त्या काळात स्टेजवर लाईटची व्यवस्था नसल्यामुळे गॅस बत्तीचा वापर केला जात असे.

स्टेजच्या दोन्ही बाजूला गॅस बत्ती लावली जायची आणि त्या प्रकाशात कलाकार आपली कला सादर करायचे. त्या तेजस्वी प्रकाशामुळे कलाकारांचे चेहरे आणि हालचाली स्पष्ट दिसत असत.

गॅस बत्ती चालवण्याची कला

गॅस बत्ती चालवणे ही देखील एक कला होती. प्रत्येकाला ती नीट चालवता येत नसे. गॅस बत्तीमध्ये रॉकेल भरून पंपाने हवा भरावी लागायची. मग ती आधी थोडी गरम करून पेटवावी लागायची.

जर योग्य प्रकारे प्रेशर दिले नाही तर दिवा नीट पेटत नसे. मोठा भडका उडायचा त्यामुळे गावात काही लोक गॅसबत्ती चालवण्यात तरबेज असायचे. लग्न किंवा कार्यक्रमात त्यांना खास बोलावले जायचे.

परंतु काही म्हणा गॅसबत्ती हे श्रीमंत माणसाचे लक्षण होते. गरिबांना ती मिळणे अशक्य.

गॅस बत्ती ही केवळ प्रकाश देणारी वस्तू नव्हती, तर ती ग्रामीण जीवनाचा एक महत्त्वाचा भाग होती. वीज नसलेल्या काळात गॅस बत्तीने अनेक गावांचे अंधार दूर केले आणि लोकांच्या आयुष्यात उजेड आणला.

आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे गॅसबत्ती मागे पडली असली तरी गॅसबत्तीच्या उजेडातील त्या आठवणी मात्र आजही गावाच्या इतिहासात जिवंत आहेत.

रॉकेलचा स्टोव्ह 

आज गॅस शेगड्या, इंडक्शन आणि आधुनिक स्वयंपाकघरामुळे स्वयंपाक करणे खूप सोपे झाले आहे. पण काही वर्षांपूर्वी ग्रामीण आणि शहरातील अनेक घरांमध्ये पितळी स्टोव्ह हा स्वयंपाकाचा मुख्य आधार होता. 

त्या काळातील स्वयंपाकघर, त्यातील कामाची धावपळ आणि पितळी स्टोव्हचा आवाज आजही अनेकांच्या आठवणीत ताजा आहे.

रॉकेलचा स्टोव्ह हा अनेक मध्यमवर्गीय लोकांकडे असे. आता जशा गॅसच्या शेगड्या आहेत. तशाच पूर्वी रॉकेल वर चालणाऱ्या शेगड्या होत्या. परंतु या शेगड्या श्रीमंत लोकांकडे उपलब्ध असायच्या.

मध्यमवर्गीयांकडे प्रामुख्याने शहरी आणि सुधारित गावातील मध्यमवर्गीय लोकांकडे पितळाचे स्टोव्ह उपलब्ध असत. मात्र 80 टक्के गरीब लोक मात्र प्रामुख्याने चुलीचाच उपयोग करत होते.

मात्र हळूहळू क्रांती होऊन सर्वसामान्यांकडे सुद्धा काही काळानंतर  पितळाचे स्टोव्ह आले. 

पितळी स्टोव्ह म्हणजे काय?

पितळी स्टोव्ह हा रॉकेलवर चालणारा एक प्रकारचा प्रेशर स्टोव्ह होता. त्याचा मुख्य भाग पितळ (ब्रास) धातूपासून बनवलेला असल्यामुळे त्याला पितळी स्टोव्ह असे म्हणत. 

या स्टोव्हमध्ये रॉकेल भरून पंपाने हवा भरली जात असे आणि त्यातून निर्माण झालेल्या दाबामुळे स्टोव्ह पेटून ज्वाला तयार होत असे. 

स्वयंपाकघरातील महत्त्व

पूर्वी घराघरात स्वयंपाकासाठी मातीची चूल आणि पितळी स्टोव्ह दोन्ही वापरले जात. सकाळी चहा करायचा असेल, पटकन काही बनवायचे असेल किंवा पावसाळ्यात चूल पेटवणे कठीण झाले तर पितळी 

स्टोव्ह फार उपयोगी पडायचा. स्टोव्ह पेटवताना आधी त्यात रॉकेल भरायचे, मग पंपाने हवा भरायची. त्यानंतर थोडे रॉकेल बाहेरच्या भागात टाकून ते पेटवायचे. थोड्याच वेळात स्टोव्ह जोरात “फुस्सss” असा आवाज करत पेटायचा आणि त्यावर भांडे ठेवले की स्वयंपाक सुरू व्हायचा.

स्टोव्ह पेटवण्याचे कौशल्य

पितळी स्टोव्ह पेटवणे ही सुद्धा एक कला होती. प्रत्येकाला ते नीट जमायचेच असे नाही. जर हवा जास्त भरली तर ज्वाला खूप मोठी व्हायची आणि कमी भरली तर स्टोव्ह नीट पेटत नसे.

कधी कधी स्टोव्ह बंद पडला की त्याची नळी स्वच्छ करावी लागायची. त्या कामासाठी एक बारीक सुईसारखी वस्तू असायची. त्याला पिन असे म्हटले जात असे. त्यामुळे स्टोव्ह नीट चालू ठेवण्यासाठी थोडे कौशल्य आवश्यक होते.

चुलीपेक्षा स्टोव्ह लवकर स्वयंपाक होत असे. त्यामुळे शहरात कामाला जाणाऱ्या माणसांना डबा करून देण्यासाठी स्टोव्हचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असे.

स्टोव्हचे धोके 

त्यावेळी हळूहळू का होईना परंतु प्रगतीच्या दिशेने देशाची वाटचाल चालू होती. सुती कपड्यांची जागा आता टेरिलीन किंवा टेरीकॉटने घेतली होती.

शहरांमधून सुती साड्या जाऊन आता बऱ्यापैकी सर्वसामान्य स्रिया टेरीलीनच्या छापील पातळे नेसू लागले होत्या. परंतु ग्रामीण भागामध्ये अद्याप पर्यंत कोणताच बदल झाला नव्हता. त्यामुळे सुती कपडे हेच वापरण्याची प्रमुख साधन होते.

आणि त्याच वेळेस शहरी भागात  सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरात  बऱ्यापैकी स्टोव्ह दिसू लागले होते. स्टोव्ह कसे वापरायचे याबद्दल अनेकांना माहीत नव्हते. त्यामुळे स्टोव्ह पेटवताना स्टोव्हचा भडका उडून टेरिलीनची साडी असल्यामुळे अनेक स्त्रियांचे अपघात होऊन मृत्यू झाले.

त्यावेळी हुंडा पद्धती ही खूप मोठी समस्या होती. ठिकाणी स्त्रियावर अत्याचार होत असत. अशावेळी स्त्रीवर रॉकेल ओतून पेटवून दिले जाई. यामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांचे बळी गेले. म्हणूनच रॉकेल जशी चांगले होते तसे वाईट देखील.

रॉकेल हद्दपार का झाले? 

1. एलपीजी गॅसचा प्रसार

रॉकेल कमी होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे घरगुती एलपीजी गॅसचा प्रसार.

1990 नंतर भारतात घराघरात गॅस सिलेंडर उपलब्ध होऊ लागले. गॅसवर स्वयंपाक करणे सोपे, जलद आणि स्वच्छ असल्यामुळे लोकांनी हळूहळू रॉकेल स्टोव्ह वापरणे बंद केले.

सरकारनेही गॅस कनेक्शन वाढवण्यासाठी विविध योजना सुरू केल्या. त्यामुळे ग्रामीण भागातही गॅसचा वापर वाढला.

2. वीजेचा विस्तार

पूर्वी वीज नसल्यामुळे रात्री प्रकाशासाठी चिमणी, दिवा आणि गॅसबत्ती वापरली जात होती. पण गावोगावी वीज पोहोचल्यावर LED बल्ब, ट्यूबलाईट आणि इतर लाईट्स वापरायला सुरुवात झाली.

यामुळे प्रकाशासाठी लागणारे रॉकेल पूर्णपणे बंद झाले.

3. सरकारी धोरणे

सरकारने काळाच्या ओघात रॉकेलवरील अनुदान (सबसीडी) कमी करायला सुरुवात केली. कारण रॉकेलचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले. काही लोक रॉकेल डिझेलमध्ये मिसळून वापरत होते. पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात भेसळ होत होती.

प्रदूषणाची सुद्धा मोठ्या प्रमाणात समस्या होती.

म्हणून सरकारने हळूहळू रॉकेलचे वितरण कमी केले. आणि शेवटी बंद केले. आता तर औषधाला देखील रॉकेल मिळत नाही.

तात्पर्य 

एकेकाळी रॉकेल हा ग्रामीण आणि शहरी जीवनाचा अविभाज्य भाग होता. प्रकाश, स्वयंपाक आणि अनेक कामांसाठी त्याचा वापर होत असे. पण तंत्रज्ञानातील बदल, गॅसचा प्रसार, वीज उपलब्धता आणि सरकारी धोरणांमुळे रॉकेल हळूहळू लोकांच्या जीवनातून हद्दपार झाले.

घराघरात वापरले जाणारे रॉकेल हे केवळ इंधन नव्हते, तर एक जीवनपद्धती होती. त्याने अनेक कुटुंबांचे जीवन उजळवले, स्वयंपाकघर धगधगते ठेवले आणि अंधारातही आशेचा किरण दिला.

आज आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत, पण रॉकेलच्या त्या मंद प्रकाशातल्या आठवणी आजही हृदयात ताज्या आहेत.

रॉकेलचा काळ संपला असेल, पण त्या आठवणी कायम आहेत कारण त्या आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा भाग आहेत.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान)


आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...