ग्रामीण एसटी प्रवासाचे दिवस


पूर्वी गावाकडे कच्चे रस्ते असायचे.1990 पर्यंत कडधे गावापर्यंत डांबरी रस्ता होता. यापुढे भोरगिरी पर्यंत कच्चा खडीचा रस्ता असायचा.

ग्रामीण एसटी प्रवास 

त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच एसटी बस होत्या.लाल धुराळा उधळीत एसटी यायची.एसटीच्या पाठीमागे धुराचा डोंगर तयार व्हायचा. या धुराळ्यात मागचे काहीच दिसत नसायचे.एसटी आल्यावर आम्ही वाऱ्याची दिशा बघून एसटीचा धुरळा चुकवायचा प्रयत्न करायचो.

त्याकाळी रस्ते झाले नव्हते.त्यामुळे ठराविक ठिकाणीच एसटीची सेवा उपलब्ध होती.तेही कच्चे रस्ते होते.अनेक लोक एसटी पकडण्यासाठी घरातून तासभर आधीच पायवाटेने, राना माळातून, डोंगर वाटेने पायी चालत एसटीच्या स्टॉप जवळ येत असत.कधी कधी आधीच एसटी निघून जाई.नाईलाजाने मग लोक पायी चालत. मी सुद्धा अनेक वेळी असा प्रवास केला आहे.

सन 1990 पूर्वीची एसटी 

त्यावेळी वाहतूकही तूरळक असायची.राजगुरूनगर - डेहणे ही एसटी सकाळी दहा वाजता डेहण्याला यायची. या गाडीत प्रामुख्याने शाळेचे शिक्षक,सरकारी कर्मचारी आणि ठराविक गावाकडचे प्रवासी असायचे.याच गाडीत सकाळ वर्तमान पत्र, पावच्या लाद्या आणि बटर खेड वरून पाठवत असत.पूर्वी 90 % लोकांकडे घड्याळे नसायची. ही गाडी आली म्हणजे दहा वाजले असे लोक बिनधास्त समजायचे.आणि त्या प्रमाणे कामाचे नियोजन करायचे. काही दिवसानंतर ही गाडी बंद झाली.

ग्रामीण महाराष्ट्रातील एसटी चे महत्व

समस्थ पश्चिम पट्ट्याची आणि मुंबईकरांची आवडती गाडी म्हणजे परेल -भोरगिरी ही होय.सकाळी 9.40 वाजता ही गाडी डेहण्याच्या स्टॉप वर उभी असे. या गाडीला त्यावेळी प्रचंड गर्दी असायची.शनिवारी आमची शाळा सकाळी 9.30 वा. सुटायची.बऱ्याच मुलामुलींचा लोंढा डेहण्याच्या स्टॉपला जमा व्हायचा.त्या वेळी डेहणे ते शिरगांव तिकीट होती 75 पैसे. तर हापतिकीट होती 40 पैसे. बऱ्याच मुलांकडे हे पैसेही नसायचे. त्यामुळे बरीच मुले पायीच प्रवास करत असत.

काही लोकांना मुंबईला जायचं असल्यामुळे व होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून वाळद आव्हाट, खरोशी व डेहण्यावरून या गाडीने मुंबईकर प्रवासी भोरगिरीला जात. व येताना मुंबईचे तिकीट काढत असत.

अनेक लोक सणावाराला,यात्रेला,लग्नकार्याला व सुट्टीला बायकामुलांसह गावी येत.मुंबईकरांच्या मुलांची कपड्यांची फॅशन,पायातील बूट किंवा चपला आणि बोलण्याची स्टाईल खुपच रुबाबदार असे.परंतु गावाकडच्या पोरांना त्यांचे कधीच आकर्षण वाटायचे नाही.खाकी चड्डी, पांढरा शर्ट व बिगर चप्पलेचे कोठेही रानोमाळ भटकणे,ओढ्यात किंवा नदीत पोहणे, गोटया, विटीदांडू व क्रिकेट खेळणे,आंबे करवंदे, जांभळे खायला रानात भटकणे हाच त्यांचा खरा आनंद व समाधान होते.हे मुंबईकर पोरांना जमत नसे. त्यांना गावच्या पोरांचा हेवा वाटे.

गावची यात्रा असेल त्या दिवशी सारा गाव एसटी स्टॉपवर येऊन आतुरतेने परेल - भोरगिरी गाडीची वाट पाहायचा. मुंबईकर येताना देवासाठी हरतुरे, देवाच्या रंगीत मखमली छत्र्या, छात्र चामरे व हारतुरे घेऊन येत असत.लोकांच्या दृष्टीक्षेपात गाडी येताच सनई,चौघडे ही वाद्य वाजत्री वाजू लागत.स्टॉप वर गाडी उभी राहताच गाडी भोवती गर्दी जमा होई.साहित्य गाडीतून बाहेर काढले जाई.

मुंबईकरांची सुट्टी संपल्यावर त्यांना गाडीत बसवून देण्यासाठी निम्मा गाव स्टॉपपर्यंत जात असे.

त्याही पूर्वी तळेगाव - टोकवडे ही गाडी तळेगाव येथून 7.30 वाजता तर खेड येथून सव्वानऊ वाजता निघत असे.तर डेहाण्याला आकरा वाजता येत असे. या गाडीत पोस्ट ऑफिसच्या पत्राची पार्सल येत असत..ही गाडी सर्वात आधी म्हणजे साधारण 1975 ला सुरु झाली.आणि त्यानंतर मग इतर दुसऱ्या.निवांतपणाने जगणारे लोक या गाडीने प्रवास करत असत.

मी शाळेत होतो.नववीची वार्षिक परीक्षा होती. साडे आकराचा पेपर. आम्ही बरीच शाळेची मुले मुली तळेगाव गाडीची वाट पाहत बसलो. 11.20 झाले.गाडी काही येईना.आता काय करायचं ? पेपरला गेलो नाही तर नापास व्हायची भीती. मग काय निघालो आम्ही पळत. अर्धा तास उशीर झाला. परंतु एकदाचे आम्ही शाळेत पोचलो. व पेपर लिहिला.

राजगुरुनगर भोरगिरी ही एसटी शिरगावला दोन वाजता यायची.व अडीच तीन वाजता फिरून परत जायची. या गाडीला त्यामानाने गर्दी कमी असायची.

मुक्कामची गाडी बऱ्याच लोकांची सर्वात आवडती गाडी होती.बाहेरगावी गेलेले सर्व लोक मुक्काम गाडीने घरी येत असत. ही गाडी साधारण आठ वाजता शिरगाव स्टॉप ला येत असे. या गाडीला सुद्धा प्रचंड गर्दी असायची. 

या गाडीत पिणारे खाणारे लोक असायचे. कंडक्टर बरोबर त्यांचे वादविवाद व्हायचे.जास्त वादावादी झाल्यावर ड्रायव्हर गाडी उभी करत असे.आता इथून पुढे गाडी जाणार नाही. सर्वांनी उतरून घ्या.असे म्हणल्यावर लोक तंटा सोडवत असत.रात्रीच्या काळ्याकभिन्न अंधारात मुक्कामची गाडी धावत राही. पुढचा उजेड सोडला तर बाहेर खिडकीतून पाहिल्यावर दूरवर नुसता अंधार दिसे. आपण कोठे आलो आहोत हेही कळत नसे.

हीच मुक्कामची गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता राजगुरुनगरला जायला निघे. प्रत्येक स्टॉपचे सकाळचे प्रवासी घेऊन ही गाडी राजगुरुनगरच्या दिशेने रवाना होई. 

त्यावेळी ठिकठिकाणीच्या स्टॉप वर गावाकडचे दूध घालणारे गवळी दूध घालण्यासाठी जमत असेल. त्या ठिकाणी दूध संकलनाचे काम चालू असायचे. एसटीच्या ड्रायव्हरला मोफत पिण्यासाठी दूध दिले जायचे.काही ड्रायव्हर कंडक्टर त्यांच्याजवळ असलेल्या किटलीत फुकट दूध घ्यायचे. 

दूध संस्थेवाले लोकही त्यांना फुकट दूध द्यायचे. काही लोकांना ड्रायव्हर बसतो त्या केबिनमध्ये बसायला खूप आवडायचे.ओळखीचा ड्रायव्हर असेल तर तीन-चार जण बसायचे.त्यावेळी एसटी ड्रायवर व कंडक्टरची लोक खुप काळजी घेत.

पूर्वी एसटीला मागे दरवाजा होता. त्यानंतर एसटीचे रूप बदलले.अनेक अमुलाग्र बदल झाले.पाठीमागचा दरवाजा पुढे आला.नवीन सुरवातीला लोक एसटी आल्यावर गाडीत जागा धरण्यासाठी मागच्या बाजूला पळत जायचे.परंतु दरवाजा असायचा पुढे.परत लोक पुढे धावायचे.खूपच गंमत व्हायची.

काही लोक एसटीची गर्दी बघून गाडीच्या मागच्या खिडकीतुन मागच्या बाजूने शिरायचा प्रयत्न करायचे. तर ड्रायव्हर नाही हे बघून काहीजण ड्रायव्हरच्या दरवाज्यातून गाडीत घुसायचे. काहीजण एसटीच्या मोडक्या खिडकीतून शरीर एसटीत ढकलायचा प्रयत्न करायचे. 

अनेकांकडे पिशव्या, गाठोडी,भांडीकुंडी,बाजाराचे साहित्य, कोंबड्या चितड्या व कामधंद्याचे साहित्य असायचे. ते सर्व एसटीत भरताना लोकांची प्रचंड धांदल व्हायची. काही जन बाहेरून खिडकीतून रुमाल किंवा टोप्या एसटीतील सीटवर टाकायचे. त्या ठिकाणी आत सीटवर दुसरेच कोणीतरी बसलेले असायचे.त्यावरून प्रचंड भांडणे व्हायची. एकच कोलहाल व्हायचा.

एसटी बस ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी एसटीचा प्रवास करून त्यांनी त्यांची शाळा कॉलेज पूर्ण केले. दूर शहरात केव्हा तालुक्याचे ठिकाणी शिक्षणासाठी असलेल्या आपल्या मुलांना ग्रामीण भागातून जेवणाचे डबे,पोहोचवण्याचे काम सुद्धा ड्रायव्हर,कंडक्टर करत असत.

ग्रामीण भागात नोकरी करणारे अनेक नोकरदार एसटीच्या सेवेवर अवलंबून असत. प्रत्येकासाठी एसटी अगदी वाट बघत थांबत असे. इतके एसटीचे प्रवाशावर प्रेम होते.

काळ बदलला.प्रवासासाठी अनेक साधने निर्माण झाली. अनेकांकडे मोटरसायकली,चार चाकी गाडी आल्या. तर काही लोक गाडी वेळेवर नाही म्हणून अन्य वाहनाने प्रवासासाठी जाऊ लागले.त्यामुळे एसटीचे महत्त्व कमी झाले.अजूनही कधी एसटीने प्रवास केला तर जुने दिवस आठवतात. आणि जुन्या आठवणीत एसटीचे जुने किस्से,जुन्या आठवणीत मन रमून जाते.

रामदास तळपे 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस