महाराष्ट्रात फार पूर्वीपासून रानभाज्यांना फार महत्त्व आहे. अनेक लोकांना रानभाज्या आजही तितक्याच प्रिय आहेत.
केळीच्या झाडाबद्दल अनेक लोकांना माहिती आहे. महाराष्ट्रात केळीची शेती केली जाते. अगदी अंगणात किंवा परसात देखील केळीचे झाड उगवलेले दिसते.
केळीच्या बागा मामाच्या, पिवळ्या घडांनी वाकायच्या. अशी कविता देखील होती.
जसे आपण केळी खातो, तसेच केळीच्या पानांना सुद्धा हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. देवाचा प्रसाद आपण केळीच्या पानावर ठेवतो. केळीच्या पानावर जेवणे इतर पूर्वीपासून चालत आले आहे. व आजही केळीच्या पानावर जेवणे हे सर्वश्रेष्ठ मानले जाते.ज्याप्रमाणे केळांना आणि पानांना महत्त्व आहे. त्याचप्रमाणे केळीच्या फुलाला सुद्धा तितकेच महत्त्व आहे.केळीच्या फुलाला केळफुल असे म्हणतात.
ज्याप्रमाणे परसात, केळीचे झाड असते. तसेच जंगलात देखील असते. त्याला रानकेळी, किंवा कौदरी असे म्हणतात. या कवदरीला सुद्धा फुल येते. ते परसातल्या केळी सारखे सेम असते.
तर या केळ फुलाची भाजी फारच अप्रतिम असते. ही भाजी खाल्यावर भाजीची चव कुणीच विसरू शकणार नाही इतकी ती अप्रतिम चविष्ट भाजी आहे.
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितलेला किस्सा
या भाजी बाबत सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार नाना पाटेकर सांगतात.
तिरंगा चित्रपटाचे शूटिंग चालू होते. ते चित्रपटात प्रसिद्ध कलाकार राजकुमार हे काम करत होते. नाना पाटेकर अजूनही शेतातल्या आणि गावरान भाज्या खातात. शूटिंगला जाताना नाना पाटेकर यांना त्यांच्या आईने केळफुलांची भाजी डब्यात दिली. नाना पाटेकर तो डबा घेऊन शूटिंगला गेले.
दुपारी जेवणाचा लंच ब्रेक झाला. नाना पाटेकर व राजकुमार जेवायला बसले. राजकुमार नानाला म्हणाले. हा माझा डबा तुम्ही खा. व तुमचा डबा आज मी खाणार.
ठीक आहे नाना बोलले आणि त्यांनी त्यांचा डबा राजकुमार यांना दिला.
डबा खाऊन झाल्यावर राजकुमार नानांना बोलले.
नाना ! मा को कहना, खिमा बहुत अच्छा बनाया था.
यावर नाना राजकुमार यांना म्हणाले. राजकुमार जी तो खिमा नव्हता.केळीच्या फुलांची भाजी होती.
यावर राजकुमार नानांना बोलले. नही जानी,ये तो खिमा ही था !
तर अशा या गावाकडच्या भाज्या जो खरा खावय्या आहे त्यालाच ही चव कळणार.
केळफुलाची भाजी ही एक पौष्टिक आणि पारंपरिक भाजी आहे. केळफुलाची भाजी बनवण्यासाठी वेळ लागतो.
केळफुल साफ करायला थोडी मेहनत घ्यावी लागते, पण एकदा ते साफ केले की भाजी बनवणे सोपे होते.
केळफूल साफ करण्याची आणि तयार करण्याची पद्धत:
पूर्वतयारी
बाहेरील भाग काढणे: केळफुलाचे बाहेरील जाडसर, लालसर पापुद्रे (साल) काढून टाका. आतील भागातील हलके गुलाबी रंगाच्या साली दिसेपर्यंत हे करत रहा.
कळ्या वेगळ्या करणे: प्रत्येक सालीच्या आत फुलांच्या लहान कळ्यांचा गुच्छ असतो. त्या कळ्या हळूवारपणे काढून घ्या.
कळ्या साफ करणे:
प्रत्येक कळीच्या आत एक पातळ, लांबसर आणि पांढरा दांडा असतो दांडा आणि कळीच्या टोकावर असलेला छोटा, पांढरा, चिकट भाग काढून टाका.
हा भाग काढणे खूप आवश्यक आहे, यामुळे भाजीला कडवटपणा येऊ शकतो आणि ती काळी पडू शकते.
चिरणे आणि भिजत ठेवणे :
साफ केलेल्या कळ्या आणि आतील कोवळा पांढरा भाग बारीक चिरून घ्या. चिरलेले केळफूल लगेच मिठाच्या पाण्यात (पाण्यात थोडे मीठ घाला) रात्रभर भिजत ठेवा. यामुळे केळफुलाचा चिक आणि काळपटपणा निघून जातो.
वाफवणे
भिजत ठेवल्यानंतर केळफूल हाताने घट्ट पिळून पाणी काढून टाका. त्यानंतर केळफूल आणि भिजवलेली चणाडाळ वेगळ्या भांड्यात ठेवून कुकरमध्ये २-३ शिट्ट्या करून वाफवून घ्या.
आवश्यक साहित्य:
१ मध्यम केळफूल,१/२ कप चणाडाळ
( चणाडाळ रात्रभर भिजत घालावी)
२ बारीक चिरलेले मोठे कांदे
५ ठेचून किंवा बारीक चिरून लसूण पाकळ्या.
१ इंच किसलेले आले, चिमूटभर हिंग
२-३ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
१०-१२ पाने कढीपत्ता, १/२ चमचा हळद
१/२ चमचा मोहरी,१/२ चमचा जिरे
१-२ चमचे लाल तिखट (चवीनुसार)
१-२ चमचे काळा मसाला,१ छोटा चमचा धणे-जिरे पूड
चिंचेचा कोळ (चवीनुसार) बारीक चिरलेली कोथिंबीर
खोवलेले ओले नारळ, तेल,मीठ चवीनुसार
केळफुलाची भाजी बनवण्याची कृती
एका कढईत तेल गरम करा.
तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे आणि हिंग घाला.
आता चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
ठेचलेला लसूण आणि किसलेले आले आणि हिरव्या मिरच्या घालून एक मिनिट परता. कढीपत्ता घाला.
हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि काळा मसाला घालून चांगले परतून घ्या.
आता वाफवलेले केळफूल आणि चणाडाळ घालून चांगले मिसळून घ्या.
चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ घालून पुन्हा ढवळा.
कढईवर झाकण ठेवून भाजी दहा मिनिटे मंद आचेवर शिजू द्यावे.
त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेले ओले नारळ घालून गॅस बंद करा.
गरमागरम केळफुलाची भाजी भाकरी, बरोबर सर्व्ह करा.
केळफुलाचे औषधी गुणधर्म
केळ फुलाची भाजी खाल्ल्याने आपलं मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही होतो. केळ्फुलातील गुणधर्मांमुळे त्याचं सेवन केल्यास आपला मूड सुधारतो.
केळफुलात असलेलं मॅग्नेशियम तणाव कमी करतं आणि नैराश्य येण्यापासून वाचवतं.केळफुलातील फायबर पचनास मदत करतं. सेवन केलेल्या आहारातील पोषक तत्त्वं शोषून घेण्यास केळफुलातील गुणधर्म उत्तेजन देतात.
टॅनिन, अँसिड, फ्लेवोनॉइड आणि अँण्टिऑक्सिडण्टस भरपूर प्रमाणात असतं. हे घटक फ्री रॅडिकलशी लढण्यास उत्तेजन देतात. तसेच केळफुलातल्या या गुणधर्मांमुळे कर्करोग आणि हदयरोगाचा धोका कमी होतो.
रामदास तळपे
शरद जठार हक्काचा माणूस, आपला माणूस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा