मोबाईलचा अतिवापर एक व्यसन
या मोबाईलच्या युगात नवी पिढी गाव म्हणजेच ग्रामीण संस्कृती हरवत चाललीआहे मोबाईल हेआता सगळ्यात मोठ्या प्रमाणावर करमणुकीचे साधन झाले आहे त्याचा वाढता अतिरेक होऊ लागला आहे. काही लोक आणि स्त्रिया तर अगदी रस्त्याने पायी जाता जाता सुद्धा मोबाईल बघत जातात.
काही लोक सार्वजनिक ठिकाणी मोठा आवाज करून युट्युब वरील रील बघत असतात. मोबाईल शिवाय काही सुचत नाही.
एक वेळ खायला मिळाले नाही तरी चालेल परंतु मोबाईल रिचार्ज हा करायलाच पाहिजे. मोबाईल हे दारूपेक्षा महाभयंकर व्यसन जडले आहे. काही लोक तर मोबाईल मधून बाहेर निघायलाच मागत नाहीत.
या मोबाईलमुळे नैसर्गिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपोआपच गदा आले आहे. आताशी लोक शक्यतो पायी सुद्धा फिरत नाहीत. साधे अर्धा किलोमीटर जायचे असले तरी मोटरसायकल वरून जातात. त्यामुळे लोकांचे चालणे सुद्धा दुरापास्त झाले आहे.
आणि खाण्यापिण्याचे तर बोलायचीच काम नाही.
भेसळीचे युग
अलीकडच्या काळात पैशाच्या मागे सर्व लोक लागल्यामुळे पैसे कमावणे हाच सगळ्यात महत्त्वाचा मार्ग निर्माण झाला आहे.
दुधात,पाण्यात, भाजीपाल्यात, अन्नधान्यात, हॉटेलात मोठ्या प्रमाणात भेसळ होताना दिसते. त्यामुळे सकस अन्न हा शब्द आता इतिहास जमा होऊ लागला आहे.
गावाला विसरत चाललेली पिढी
अलीकडच्या काळात शहरात राहिलेली मुले गावाचे नाव सुद्धा घेत नाहीत. एवढी ती शहर संस्कृतीत रुळली आहेत. आणि गावाकडचे लोक सुद्धा आपली शेतीवाडी आणि घरदार सोडून वाढत्या चंगळ वादाला पोसण्यासाठी शहराकडे धावू लागली आहेत. त्यामुळे गावच्या गावे ओस पडू लागले आहेत.
त्यामुळे गावच्या रूढी, परंपरा, रीती, रिवाज, आपुलकी, प्रेम व जिव्हाळा हल्लो पावत असून महाराष्ट्रीयन संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे नातेवाईक, मित्र परिवार, गावकरी यांच्याशी नाते तुटत चालल्यामुळे एकला चाललो रे अशा वागण्यामुळे एखाद्यावर आलेल्या संकटाशी सामना करायला त्याला कुणाचेही बळ मिळत नाही.
योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे मुला मुलींचे विवाह न जमणे, वाढते घटस्फोट, ताण तणाव, हृदयविकार, डायबिटीस सारखे आजार, एकटेपणाची भावना इत्यादी गंभीर बाबी निर्माण होत चालले आहेत.
वाढत चाललेले एकाकीपण
एकटेपणा इतका वाढला आहे की लोक एखाद्या लग्नकार्याला, दशक्रियेला किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावून तात्काळ निघून जातात. दशक्रियेला तर लोकांना एवढी घाई असते की पसायदान होण्यापूर्वीच लोक आपापल्या कामाला? निघून जातात. त्यामुळे समाजामध्ये एकटेपणाची भावना प्रबळ बनत चालली आहे.
गावाकडचे हरवत चाललेले जीवन
पूर्वी गावाकडे अगदी सकाळी सकाळी कुणीतरी येऊन
अरे! झाला का चहा पाणी? असे म्हणून घरात प्रवेश करायचे.
परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही.
अलीकडच्या पिढी तर गावाला जायचे नावच घेत नाही. कारण काय तर त्यांच्या भाषेत गावाला खूप बोअर होतं.
परंतु त्याच गावाकडे पूर्वी किती मज्जा होती, व गावाकडे राहणाऱ्या लोकांनी गावाकडचा काय आनंद घेतला आहे, हे त्यांना कोण सांगणार.
जुनं ते सोनं
एकदा असंच गावच्या राहणी मानावरून विषय निघतो तेव्हा तरुण पिढीची हाकाटी असते. गावाला कसल्याच facility नाहीत. नेट, टीव्ही, मोबाईल वगैरे शिवाय कसा टाईमपास होणार?
त्यावर त्यांना माझे हे उत्तर आहे.तुम्ही कधी, लंगडी, विटी दांडू, काचापाणी, निळी शाई, लंगोरी, लपाछपी, गोट्या इत्यादी खेळ खेळले आहात काय?
तुम्ही रानात जाऊन कधी गुरे सांभाळले आहेत काय?
तुम्ही रानातील झऱ्याचे अगदी उन्हाळ्यात सुद्धा गुडघे आणि हात टेकून वाकून थंडगार पाणी पिले आहे काय.?
तुम्ही कधी रानडुकराची शिकार केली आहे काय?
तुम्ही कधी मित्रांबरोबर खेकडे आणि मासे पकडले आहेत काय?
तुम्ही कधी रानात जाऊन जनावरांचे वाळलेले शेण गोळा केले आहे काय?
तुम्ही शेतातील ताजी भाजी काढून त्याची भाजी खाल्लीय का?
रस्त्याने जाताना कैऱ्या, बोर, चिंचा दगडाने पाडल्या आहेत का?
कधी उन्हातील उभ्या बेसावध मित्रांच्या पायाला पाठीमागून भिंगाचा चटका दिलाय का?
कधी सायकल नळीतून चालवलीय का? ढोपरं, गुडघे फोडून घेऊन स्वतः सायकल चालवायला शिकलाय का?
कापडी व चिंध्याच्या बॉल तयार करून आबादबी खेळलास का?
कधी झाडावर चढलात का?
कैऱ्या, टरबूज, मक्याची कणस, बोर, चिंचा, पेरू, काकड्या चोरून खाल्ल्यात का?
ओल्या सारवलेल्या जमीनीवर चालत गुपचूप पाणी पिताना पाण्या सोबत ओरडा व धपाटा पदरात पाडून घेतलाय का?
आईच्या पदराला कधी हात पुसलेत का?
वडील घरी येईपर्यंत मोकाट खेळून ते येण्यापूर्वी हळूच अभ्यासाला बसलास काय?
भावाला / बहिणीला ज्यास्त खाऊ दिला म्हणून आईशी भांडण करून ज्यास्तीचा खाऊ मिळवलाय का?
आईशी भांडून रडून कधी 10 पैश्याचे गारीगार घेऊन हात कपडे गिरबडेपर्यंत खाल्लेय का?
शिक्षकांचा डोळा चुकवून खिशातील चोरलेल्या बोर चिंचा व पकडल्यावर त्यांचा मारही कधी खाल्ला आहे का?
अंगाला नदीकाठची पोयट्याची माती फासून नदीत उडी मारलीस का?
लग्नातल्या बुंदी व शिऱ्या साठी भर उन्हात २-४ मैल पायपीट कधी केली आहे का?
एखादया वर्षाच्या गॅपने मिळणाऱ्या नवीन कपड्यात म्हणजे शाळेच्या ड्रेसमध्येच मित्रासमोर तोऱ्यात मिरवलायस का? त्या बदल्यात नव्याचे नऊ बुक्के कधी खाल्लेस का?
आपली बॅटींग झाल्यावर पोट दुखतं म्हणून घरी पळून आलास काय कधी?
खाऊ खाण्यात भावंडापेक्षा जास्त वेळ काढून त्यांचा लवकर खाऊन संपला म्हणून तोंड वेडावून वाकुल्या दाखवल्यात काय?
सुटी लागण्यापूर्वीचा शेवटचा पेपर झाला की खेळण्यासाठी चिंगाट पळत आनंदाने ओरडत घरी आलास काय?
थंडीत सकाळी अनवाणी जाताना खिशातून काडेपेटी काढून रस्त्यातील पालापाचोळा यांची शेकोटी / जाळ केलाय का कधी?
अशीच शेकोटी करून शेतातील हरबरा उपटून चेहरा हात काळे करत गरम गरम हुळा खाल्लाय का कधी?
तुम्ही कधी हरभरा, वाटाणा आणि गव्हाचा हुळा खाल्ला आहे काय?
मित्रांबरोबर शेजारच्या गावांच्या यात्रेला भारुड किंवा तमाशा पाहायला गेला आहेस काय?
शेजारच्या गावांच्या मुलांबरोबर कधी क्रिकेट खेळला आहेस काय?
त्यांच्या जीवनात साधने, सुबत्ता असेल पण समाधान व विविधता ही तसुभरही राहिली नाही.
आम्ही आमच्या विश्वात इतके रमलेले होतो की साधने, सुबत्ता नाहीत याचे कधीच दुःख, खंत वाटली नाही. जे काही थोडेफार मर्यादित होतं त्यातून अमर्यादित आनंद लूटलाय आम्ही.
दौलत और शोहरत से इतना कर मत, उलझना किसी देहाती गरीब से देखा है जिंदगी को हमने आपसे भी बहुत ज्यादा करीबसे.
रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा