Translate

शिवाजी विद्यालय डेहणे : सुवर्ण आठवणींचा प्रवास

शिवाजी विद्यालय, डेहणे ही खेड तालुक्याच्या पश्चिम भागात असलेली शाळा. स्वर्गीय आमदार कृष्णराव मुंडे साहेब हे या शाळेचे संस्थापक. त्या काळी डेहणे व परिसरातील विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी दूरच्या गावात जावे लागायचे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत. ही गरज ओळखून गावकऱ्यांनी आणि संस्थापकांनी शिवाजी विद्यालयाची स्थापना केली.

शिवाजी विद्यालय, डेहणे या शाळेचे नाव त्याकाळी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले ते खऱ्या अर्थाने आर. जे. पाटील सर (मुख्याध्यापक), गाडीलकर सर, महामुनी सर, तांबोळी सर, दातीर सर यांनी.

आर. जे. पाटील सर (मुख्याध्यापक)

शाळेची स्थापना झाली तेव्हा आर. जे. पाटील सर मुख्याध्यापक होते. मध्यम बांधा, पाच फूट उंची, करारी चेहरा, पांढरी शुभ्र सफारी व पांढरी पॅन्ट असा त्यांचा वेश होता. शिस्त, स्वच्छता आणि टापटीप त्यांना आवडायची. मुलांनी केस वाढवलेले त्यांना अजिबात खपायचे नाहीत. ते मुख्याध्यापक पदाला शोभून दिसायचे. मुले त्यांना खूप घाबरायची.

सन १९७९ मध्ये या शाळेची स्थापना झाली. सुरुवातीला आठवीचा वर्ग सुरू झाला. त्यानंतर नववी (१९८०-८१) व दहावी (१९८१-८२) सुरू झाली.

तेव्हा विद्यार्थ्यांना बसायला वर्ग नव्हते. तेव्हा शालेय वर्ग जानोबा मंदिरात, तर काही वर्ग धोंडूबाबा कोरडे (मा. पंचायत समिती सदस्य) यांच्या गुरांच्या गोठ्यात भरत असत.

त्यावेळी समस्त गावकऱ्यांनी नवीन शालेय वर्ग बांधण्याचा चंग बांधला. शाळेच्या बांधकामासाठी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या तमाशाचे आयोजन केले आणि तिकिटांच्या विक्रीतून झालेल्या नफ्यामधून शाळेच्या वर्गबांधकामासाठी हातभार लावला.

दरवर्षी होणारी यात्रा रद्द करून ग्रामस्थांनी घरपट वर्गणी काढली. भागातील अनेक दानशूर लोकांनी सढळ हाताने मदत केली आणि तीन वर्गखोल्यांची सुंदर इमारत उभी राहिली. इमारत अतिशय सुंदर होती.

नंतरच्या काळात बाबुराव कौदरे यांनीसुद्धा काही खोल्या शाळेला दिल्या होत्या. एका बाजूला बांधकाम होत असताना दुसऱ्या बाजूला शालेय अध्यापनाचे काम चालू होते.

सन १९८१-८२ मध्ये पहिल्याच वर्षी दहावीचा शाळेचा शंभर टक्के निकाल लागला. त्यामध्ये एकनाथ गणपत लांघी, वनराज विठ्ठल कहाणे, नामदेव श्रीपती वाजे, जगदीश भागुजी कशाळे, दगडू मारुती लांघी, राजू महादेव हुरसाळे व मनोहर श्रीपत रोकडे असे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामुळे शाळेच्या, भागाच्या आणि मुख्याध्यापक पाटील सरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असेच म्हणावे लागेल. 

शालेय गणवेश

पांढरा शर्ट, खाकी चड्डी व डोक्यावर पांढरी गांधी टोपी व इनशर्टअसा गणवेश होता. ठरावीक वरच्या वर्गातील दहावीचे विद्यार्थी फुलपँट घालत. बाकी सर्वजन चड्डीच घालत.

मुलींना निळा स्कर्ट किंवा निळा परकर, पांढरा शर्ट (ब्लाउज) दोन वेण्या आणि लाल रिबन असा गणवेश होता. बुधवारी रंगीत कपडे घालायला परवानगी होती. परंतू रंगीत कपडे होतीच कोणाकडे?

तत्कालीन शालेय दिवस 

सात जूनला शाळा सुरू व्हायची. पावसाळ्यात मुलांची अत्यंत वाईट परीस्थीती असे. अनेक मुले डोंगर, द-यांतुन पावसापाण्यातुन विद्यार्जनासाठी शाळेत येत. येताना प्रचंड पाऊस, दुथडी भरून वाहणारे ओढे नाले, खडीचा रस्ता या दिव्यातुन जा - ये करावी लागे. सर्वांचे कपडे पावसाच्या सटका-याने भिजून जात असत.
शाळेत जमिनीला ओल आलेली असे. त्यावरच पोते टाकून बसावे लागे. शाळा सुटल्यावर घरी जाताना प्रचंड हवा व पाऊसाचा सटकारा असे. छत्री उघडली की वारा छत्री मागे लोटायचा. त्यामुळे पुढे जाताना पाचवी, सहावीच्या छोट्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास व्हायचा. त्यामुळे नाईलाजाने छत्री बंद करून पावसातच झपझप चालावे लागे.

जून/जुलै महिन्यातील पाऊस

त्यावेळी अनेक ठिकाणी ओढ्यावर पुल असत. त्याआधी तेही नव्हते. खुप पाऊस असल्यावर शाळेत जाता येत नसे. अनेक विद्यार्थ्यांना छत्री विकत घेणे शक्य नसे, ते प्लँस्टीक कागद डोक्यावर घेऊन येत.  कागदाच्या शिडातुन वारा आत शिरे, मोठा फडफड आवाज होई. कधी हा वारा कागद किंवा छत्री त्याच्याबरोबर दुर घेऊन जाई. कागद किंवा छत्री पकडताना विद्यार्थ्यांची केविलवानी धडपड सुरू होई. या धंदलीत दप्तर व स्वतः सर्व भिजून चिंब झालेला असे.

दहावी पर्यंत कुणाच्याही पायात चपला किंवा बुट नसायचे. आणवानीच शाळेत यायचे. आणि गरीब विद्यार्थ्यांना फी भरायला पैसे नसायचे.

तेव्हा दप्तर म्हणजे काय तर घरात जी रिकामी पिशवी असेल त्यामध्ये वह्या व पुस्तके ठेवायची. तीच पिशवी घेऊन शाळेत यायचे. त्यामध्चेच दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी रूमालात भाकरी व लसणाची, सुकटीची किंवा बोंबील, वाकट इत्यादीची चटणी असे.

पावसाळ्यात विद्यार्थी वर्गातच भाकरी  खात असत. उन्हाळ्यात झाडाखाली बसुन भाकरी खात.

कधीतरी रूपाया दोन रूपये असतील तर आब्बासशेठच्या जनसेवा हाँटेलात ४० पैशात मिसळची नुसतीच तर्री विकत घेऊन त्याबरोबर भाकरी खायची परंतू हे लाड कधीतरी दोन, तीन महिन्यांनी असत.

शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक शिक्षक लाभले त्यांनी आपले ज्ञानार्जनाचे काम निष्ठेने केले त्यामुळेच अनेक विद्यार्थी घडले. 

गाडीलकर सर

कडक इस्त्री केलेली (पूर्वीची बच्चन स्टाईल) पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट, उंच शिडशिडीत बांधा, तरुण वयातच डोक्याला पडलेले टक्कल असे गाडीलकर सरांचे व्यक्तिमत्त्व होते. इन शर्ट करून अप टू डेट असलेल्या  गाडीलकर सरांचा प्रभाव सर्वावर पडायचा. 

गाडीलकर सर हे उत्तम इंग्रजी शिकवायचे. त्यांना अनेक विद्यार्थी खूप घाबरत असत. विद्यार्थ्यांना ते खूप मारायचे. त्यामुळे अनेक मुलांनी अर्धवट शाळा सोडून दिल्या. जी मुले शिकली, ती चांगल्या स्थितीत नोकरीला लागली.

गाडीलकर सर जसे उत्तम इंग्रजी शिकवायचे, तसेच उत्तम व्हॉलीबॉल खेळायचे. त्यांचा प्रत्येक शॉट हा अफलातून असायचा. ते उत्कृष्ट व्हॉलीबॉल पटू होते. त्यांचे स्थानिक पुढाऱ्यांशी, विद्यार्थ्यांच्या पालकांशी चांगले संबंध असायचे.

महामुनी सर

महामुनी सर हे सुद्धा उंच, शिडशिडीत बांध्याचे होते. राखाडी रंगाची पॅन्ट आणि पांढरा शर्ट, जाड भिंगाचा जाड चष्मा मला अजूनही आठवतो.

महामुनी सर वरच्या वर्गांना मराठी विषय शिकवायचे. ते जेव्हा भुतांच्या थरारक गोष्टी सांगत, तेव्हा जवळपास भूतं असल्याचा भास व्हायचा. गोष्टीच्या ठराविक पॉइंटला काही मुली जोरात किंचाळायच्या. अजूनही त्यांच्या भुतांच्या गोष्टी आठवल्या की अंगावर काटा उभा राहतो.

त्यांची शिक्षा करण्याची पद्धत मात्र वेगळी होती. इतरांसारखे ते छड्या मारत नसत, तर ते विद्यार्थ्यांच्या पोटाला चिमटा घेऊन वर उचलायचे किंवा फळ्यावर डोकं आपटायचे.

पहिली स्कूटर महामुनी सरांनी विकत घेतलेली. त्यांच्या स्कूटरकडे आम्ही कौतुकाने पाहायचो.

कर्वे सर

उंच व भरदार शरीरयष्टी असलेले कर्वे सर आम्हाला पाचवीला वर्गशिक्षक होते. आम्हाला ते गणित आणि मराठी शिकवत असत.

सवणे सर / कासार सर

सवणे सर / कासार सर ते सुद्धा त्यांच्याकडील विषय चांगल्या पद्धतीने शिकवत असत. परंतु मी शाळेत प्रवेश घेतल्यावर चार-पाच महिन्यातच त्यांची बदली झाली. त्यामुळे त्यांच्या फारशा आठवणी नाहीत.

नढे सर

नढे सर हे सुद्धा तरुण वयात टक्कल पडलेले हुशार शिक्षक होते. ते वरच्या वर्गांसाठी विज्ञान विषय शिकवायचे. त्यांचा फारसा संबंध आला नाही. लवकरच त्यांची बदली झाली. परंतु आमची सहल गोव्याला गेली होती, तेव्हा त्यांनी धमाल केली होती.

सत्तीकर सर (मुख्याध्यापक)

सत्तीकर सर हे शाळेचे मुख्याध्यापक होते. अतिशय शांत स्वभाव आणि सज्जन गृहस्थ असलेले शिक्षक होते. त्यांच्या काळात शाळेच्या अनेक पायाभूत सुविधा तयार झाल्या. आम्हाला ते पंडित नेहरूंसारखे भासायचे. गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके कशी मिळतील, यावर त्यांचा कटाक्ष असायचा. प्रत्येक शालेय कार्यक्रम ते साजरा करायचे. अनेक व्याख्याने त्यांनी आयोजित केली.

सत्तीकर सर हे कवितांना उत्तम चाली लावायचे. “गे माय भू तुझे मी”, “फेडीन पांग सारे”, “माझी मुक्ताई मुक्ताई” अशा अनेक कविता त्यांच्या चालीमुळे स्मरणात आहेत. त्यांचे दुर्दैवाने अपघाती निधन होणे हे खरोखरच मनाला चटका लावणारे होते.

पाटील सर (मुख्याध्यापक)

पाटील सर हे मुख्याध्यापक होते. त्यांच्या पत्नीदेखील याच शाळेत सहशिक्षिका होत्या. त्यांच्याबद्दल फारशा आठवणी नाहीत.

बोरकर सर

उंच व धिप्पाड शरीरयष्टी असलेले, पायजमा व नेहरू शर्ट घातलेले बोरकर सर आठवतात. आम्हाला ते गणित व भूमिती विषय शिकवायचे.

दहावीला गणित आणि भूमिती शिकवताना परीक्षेला कोणती गणिते येणार, याचा अचूक अंदाज त्यांना असायचा. त्यावरच त्यांचा फोकस असायचा. त्यामुळे आम्हाला ते उत्तम मार्गदर्शक वाटायचे.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी बा. भ. बोरकर ते हेच, असे आम्हाला वाटायचे. परंतु नंतर कळले की हे दुसरे बोरकर आहेत.

ते ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाचे प्रचारकदेखील होते. दरवर्षी महाशिवरात्रीला ते भोरगिरी येथील कोटेश्वर मंदिराजवळ स्थानिक लोकांना माहिती द्यायचे.

सुरगुडे सर

सुरगुडे सर हे आम्हाला दहावीला वर्गशिक्षक होते. ते उत्तम इंग्रजी शिकवायचे. रोज सकाळी नऊ ते अकरा आमचा क्लास घ्यायचे. “Royal Challenger” या २१ अपेक्षित प्रश्नसंच असलेल्या पुस्तकासारखा, परंतु वेगळा संच असलेल्या पुस्तकातून ते आम्हाला ग्रामर शिकवायचे. ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी आमचे शालेय वेळेव्यतिरिक्त जादा तास घेऊन आमचा इंग्रजी विषय पक्का केला.

दातीर सर

दातीर सर हे सुद्धा उत्तम गणित व विज्ञान हे विषय शिकवायचे. दहावीला असताना त्यांनी आम्हाला शालेय वेळेव्यतिरिक्त अतिरिक्त जादा तास घेऊन शिकवले.

जे विद्यार्थी गणित विषयात कच्चे होते, त्यांच्याकडून भूमितीमधील हमखास परीक्षेला येणारी चार प्रमेये घोटून तयार करून घेतली होती. त्यासाठी सतत टेस्ट घेतल्या जात. तेव्हा दहावीला ४१ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्याचे श्रेय दातीर सरांना द्यावे लागेल.

दातीर सर यांच्या पत्नीदेखील याच शाळेत सहशिक्षिका होत्या. दातीर सरांकडे एक जीपसुद्धा असल्याचे आठवते. शिवाय त्यांची काळी पॅन्ट, निळा शर्ट आणि केसांची स्टाईल अजूनही आठवते. त्यांचे ऋणानुबंध अजूनही डेहणे गावाशी टिकून आहेत. परवाच त्यांची आणि माझी एका लग्नसमारंभात भेट झाली होती.

क्षीरसागर सर

आम्ही आठवीला गेलो, तेव्हा क्षीरसागर सर बदली होऊन या शाळेत दाखल झाले होते. ते इंग्रजी शिकवतात, परंतु विद्यार्थ्यांना खूप मारतात, असे ऐकून होतो. त्यांची शिकवण्याची पद्धत खरोखरच उत्कृष्ट होती. त्यांचे सोलापुरी पद्धतीचे बोलणे वेगळ्या धाटणीचे वाटायचे.

क्षीरसागर सरांचे अक्षर खूपच छान होते. त्यांनी डेहणे गावातील मारुतीच्या मंदिराच्या भिंतीवर सुंदर हस्ताक्षरात काढलेल्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या इतक्या सुंदर होत्या की पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटायच्या. त्यांनी खूप वेळा मास्टर ट्रेनर म्हणून शासनाच्या शिक्षक परिसंवादामधून काम केले आहे.

पोखरकर सर

वरुडे गावचे पोखरकर सरसुद्धा इतिहास आणि भूगोल खूप छान शिकवायचे. मारायचेही खूप. समोरच्या बेंचवर बसलेल्या मुलांना त्यांची खूपच भीती असायची. त्यांनी प्रश्न विचारला की त्यांना तात्काळ उत्तर हवे असायचे. उत्तर न दिल्यास मिळेल तेथे रट्टे द्यायचे. त्यांची प्रश्न विचारायची पद्धतसुद्धा खूपच वेगळी होती.

“ये, तू सांग बरं रे, माणूस चंद्रावर सरळ न चालता टुनटुन उड्या का मारतो?”

तात्काळ उत्तर न दिल्यास रट्टे ठरलेले असायचे.

तांबोळी सर

मी सहावीला असताना तांबोळी सर नवीनच हजर झाले, ते क्रीडा शिक्षक म्हणून. अतिशय कडक व तितकाच प्रेमळ स्वभाव. उत्तम इंग्रजी शिकवायचे. विद्यार्थ्यांचे लवकरच ते प्रिय शिक्षक झाले.

तांबोळी सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. प्रत्येक आठवड्याला छोटी परीक्षा घ्यायचे. तिला “टेस्ट” म्हटले जायचे. टेस्ट ही पद्धत तांबोळी सरांनी रुजवली.

त्यांना खेळाची विशेष आवड होती. नव्हे, ते हाडाचे क्रीडाशिक्षक होते. मल्लखांब कसा खेळायचा, हे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिकवले. डबलबार, सिंगलबार, मल्लखांबवरील त्यावेळच्या विद्यार्थ्यांच्या कसरती आठवल्यावर अंगावर काटा येतो. विशेषतः रोहिदास आंबेकर काय कसरती करायचा!

बापरे! तो उत्तम खो-खोपटूसुद्धा होता. तो कधीच कोणाला बाद होत नसे, हे विशेष होते.

कबड्डीमध्ये अरुण पोपट कोरडे कबड्डी चॅम्पियन होता. कबड्डी, खो-खो, उंचउडी, लांबउडी, गोळाफेक व कुस्ती या स्पर्धांमध्ये शिवाजी विद्यालयाचे नाव जिल्हा पातळीवर खणखणीतपणे निनादू लागले, ते तांबोळी सरांच्या अथक परिश्रमामुळे.

यावर कळस चढवला तो बबनराव गोपाळे यांनी. बीट, तालुका, जिल्हा व राज्यपातळीवरील कुस्ती स्पर्धेत बबनराव गोपाळे यांचा प्रथम क्रमांक आला. शिवाजी विद्यालयाचा डंका संपूर्ण महाराष्ट्रात पिटला गेला. याचे सर्व श्रेय तांबोळी व चिखले सरांकडे जाते, यात वादच नाही.

त्यावेळी राष्ट्रीय नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त नेहमी भाषण स्पर्धेचे आयोजन केले जायचे. आठ दिवस आधी तयारी चालायची.

मुलांसमोर भाषण करणे म्हणजे सोपे काम नव्हे. भाषण करताना हातपाय लटपटायचे, तोंडातून शब्द फुटायचे नाहीत. असे असताना अनेक मुले भाषण करायची, हे कौतुकास्पद होते.

तुकाराम कृष्णा (बनाजीबुवा) कोरडे हे आमच्या पुढच्या वर्गात होते. सुरुवातीपासूनच अतिशय शांत व हुशार विद्यार्थी म्हणून तुकाराम गणला जायचा. भाषण कसे करावे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकाराम. भाषण करताना श्रोत्यांसमोर उभे कसे राहावे, श्रोत्यांकडे कटाक्ष कसा टाकावा आणि संवादफेक कशी करावी, हे त्यांच्याकडून समजले.

आजही मी जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा विचार करतो, हे सर्व आदिवासी दुर्गम भागात कोणत्याही सोयी-सुविधा नसताना देखील या कला या ठराविक विद्यार्थ्यांनी कशा आत्मसात केल्या असतील? उपजत ज्ञान दुसरे काय?

तेव्हा बीट, तालुका आणि जिल्हा पातळीवर भाषण स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. भाषण स्पर्धेत हमखास सकाळ वर्तमानपत्रात नाव झळकायचे, ते तुकारामचे. तुकाराम यांनी विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.

भाषण केले, दुसरे एक नाव गाजले, ते किसन नारायणराव जठार यांचे. किसन हे आमच्या मागच्या वर्गात होते. परंतु भाषण कसे करावे, आवाजातील चढ-उतार कमी-जास्त कसे करावे, आपले मुद्दे व श्रोत्यांना कसे पटवून द्यावे, हे किसन यांच्याकडून शिकलो. त्यांनीसुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्या. त्यांचे वडील नारायणराव जठार डेहणे गावचे काही काळ उपसरपंच होते.

तांबोळी सर विद्यालयाच्या सार्वजनिक गणपतीचे संपूर्ण डेकोरेशन अतिशय उत्तम करायचे. नैसर्गिक डेकोरेशनची पद्धत त्यांनीच रूढ केली.

प्रत्येक रविवारी ते विद्यार्थ्यांचे विशेष मोफत क्लास घ्यायचे. आपल्याकडे जे ज्ञान आहे, ते विद्यार्थ्यांना सढळपणे वाटायचे, अगदी मोफत.

एकदा त्यांनी २६ जानेवारी या राष्ट्रीय सणाच्या दिवशी अनपेक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पडक्या कंपाउंडमधून विद्यार्थ्यांचे लेझीम पथक थेट स्टेजवर आणून प्रेक्षकांना धक्का दिला. लेझीमच्या कसरती पाहून प्रेक्षक जागेवरच तोंडात बोट घालून खिळून राहिले.

तांबोळी सरांनी अनेक गुणी, परंतु गरीब विद्यार्थ्यांची फी सुद्धा कित्येक वेळा भरली असल्याचे मला आठवते. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अडचणीच्या काळात स्वखर्चाने जेवणाची सोय केली होती.

कोंढाळकर सर

कोंढाळकर सर हे चित्रकला विषय शिकवायचे. त्यांची बोलण्याची ढब अत्यंत वेगळी होती. ते कायम स्वेटर घालायचे. ऋषी कपूरसारखे.

त्यांनी पारंपरिक रंगपेटीतील रंग बंद करून प्रत्येकाने कॅमलचे रंग वापरण्यावर भर दिला. चित्र कसे काढायचे? ते कसे रंगवायचे? चित्राला आऊटलाईन कशी द्यायची? हे त्यांनी आम्हाला उत्तम पद्धतीने शिकवले. उष्ण रंग आणि शीत रंग हे त्यांनी शिकवले. कोणत्या रंगात कोणता रंग मिसळला म्हणजे कोणता रंग तयार होतो, हेही त्यांनी आम्हाला शिकवले. ते उत्कृष्ट चित्रकार होते.

फापाळे सर

मध्यम बांधा असलेले, थोडे उंचीने कमी असलेले फापाळे सर हे आम्हाला इंग्रजी विषय शिकवत असत. ते एक उत्तम व्याख्याते होते. विनोदी शैलीचे व्याख्यान ते लीलया करत असत. त्यांना विनोदी कथालेखक शंकर पाटील असे त्यावेळी म्हणत असत.

वरकुटे सर

उंच व शिडशिडीत बांध्याचे वरकुटे सर आम्हाला हिंदी विषय शिकवत. ते सर्व विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक होते. त्यांनी हिंदीतील अनेक कविता आमच्याकडून पाठ करून घेतल्या होत्या. ते आमचे रविवारी क्लास घेत असत. त्यांचा चेहरा कायम हसतमुख असे.

घुले सर

घुले सर हे मराठी विषय शिकवायचे.

वामन सर

मध्यम बांधा व डोक्यावर टक्कल असलेले वामन सर हे विज्ञान विषय शिकवायचे. त्यांचा वहीत लिहून देण्यावर जास्त भर असायचा. ते उत्तम विज्ञान विषय शिकवायचे. दहावीला आम्हाला ते विज्ञान विषय शिकवत असत.

लाळगे सर 

बारीक अंगचनीचे व मध्यम उंचीचे लाळगे सर आम्हाला इतिहास हा विषय शिकवायचे. ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने इतिहास विशेष शिकवायचे.

व्यवहारे सर 

व्यवहारे सर हे सहावीला आमचे वर्गशिक्षक होते.ते विज्ञान विषय शिकवायचे. सुट्टी मध्ये क्लास घ्यायचे. त्यांचे फुलांचे परागीभवन पुंकेसर हे शब्द अजूनही आठवतात. त्यांनी आम्हाला सकाळी वर्गात प्रवेश केल्यावर पसायदान म्हणायला शिकवले होते.

आम्ही २५ पैसे याप्रमाणे वर्गणी काढून दत्ताची तसबीर वर्गातील भिंतीवर लावली होती. दर गुरुवारी दत्तांच्या तसबीरीला हार घालून, अगरबत्ती लावली जायची. नारळ आणि खडीसाखर यांचा प्रसाद वर्गात वाटप केलं जायचा. हे सर्व व्यवहारे सरांचे संस्कार होते.

आम्हाला सहावीला बेंच नव्हते तेव्हा आम्ही सत्याग्रह केला होता. जोपर्यंत बेंच मिळत नाही तोपर्यंत वर्गात बसणार नाही. मुख्याध्यापक सत्तीकर सरांना ही माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासन दिले होते. आणि १५  दिवसात बेंच उपलब्ध सुद्धा करून दिले होते. सत्याग्रहाचे पडद्याआडचे सूत्रधार अर्थात व्यवहारे सर हेच होते.

शेख सर, फणसे सर, कदम सर, कुमकर सर, साळवे सर, गुंजाळ सर, विधाटे सर, दातीर मॅडम, पाटील मॅडम, घोलप सर (मुख्याध्यापक), शिंदे सर (पर्यवेक्षक) हे देखील अध्यापनाचे काम करत असत.

ताजने सर (मुख्य लिपिक) 

ताजने सर हे कार्यालयीन कामकाज करत असत. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, शाळा सोडल्याचे दाखले देणे, शालेय पुस्तके वाटप, शालेय विद्यार्थ्यांना विद्यावेतन वाटप, विद्यार्थ्यांना सूचना नोंदवही अशी अनेक कामे ते करत असत. त्यांचा विद्यार्थ्यांशी शक्यतो संपर्क येत नसे. परंतु कार्यालयात जेव्हा आम्ही जात असे तेव्हा ते कामात व्यस्त असत. त्यांच्याबद्दल सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांना आदर वाटायचा. 

पांडु सांगडे (शिपाई)

शाळेतील आवडता शिपाई कोण असेल, तर पांडू सांगडे. दुपारनंतर किंवा जेवणाच्या सुट्टीच्या आधी पांडू शिपाई रजिस्टर घेऊन वर्गात प्रवेश करायचे. रजिस्टरमध्ये काय सूचना आहेत, हे ऐकण्यासाठी सर्वांचे कान टवकारायचे.

ज्या दिवशी महिना अखेर असायची, तेव्हा पाच तासांनंतर, म्हणजेच जेवणाच्या सुट्टीनंतर शाळेला सुट्टी असायची. कधी कधी अचानक दुसऱ्या दिवशी सुट्टीची सूचना असायची. कधी व्याख्यान आयोजित केलेले असायचे, कधी पुस्तके मिळणार असल्याची सूचना असायची. अनेक सूचना असायच्या. त्या वाचल्यावर आनंद व्हायचा.

पांडू सांगडे हे रोज सकाळी नदीवर जाऊन थंड पाण्याने अंघोळ करायचे. आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर कधी कधी नदीवर अंघोळ करण्यासाठी जायचो. ते स्वयंपाक स्वतः हाताने करायचे.

शाळेची घंटा (Bell)

आठवीच्या वर्गाच्या उजव्या बाजूच्या कोपऱ्यावर शाळेची घंटा (Bell) होती. बरोबर ११ वाजता शिपाई बेल वाजवायचे आणि शाळा भरायची. प्रत्येक तासात 45 मिनिटांचा असायचा. प्रत्येक तासाला घंटीचे दोन ठोके पाडायचे. त्याबरोबर आपले शिकवण्याची काम अर्धवट ठेवून शिक्षक निघून जायची व नवीन विषयाचे शिक्षक वर्गात दाखल व्हायचे.

तीन तासानंतर पुन्हा घंटा घणघणायची. आणि पंधरा मिनिटांसाठी छोटी सुट्टी व्हायची. त्यानंतर पुन्हा दोन तास व्हायचे. आणि पुन्हा जेवणाच्या सुट्टीसाठी घंटा घणघणायची. यालाच मोठी सुट्टी मानायची.

त्यानंतर पुन्हा तीन तास व्हायचे. आणि बरोबर ४:४५ वाजता शाळेची घंटा घणघणायची आणि शाळेची सुट्टी व्हायची. त्याबरोबर विद्यार्थी घरच्या दिशेने पळत सुटायचे.

महिना अखेर असेल त्या दिवशी मात्र पाच तासानंतर दुपारी शाळा सुटण्याची. त्यावेळी विद्यार्थ्यांना मात्र खूप आनंद व्हायचा.

सार्वजनिक गणेशोत्सव

शाळेमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जायचा. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला ठराविक वर्गणी भरावी लागायची. गणेशोत्सवामध्ये नैसर्गिक पद्धतीचे डेकोरेशन केले जायचे. सकाळी आणि सायंकाळी आरती असायची. पाचव्या दिवशी गणपती विसर्जन असायचे.

गणेश विसर्जनाच्या वेळी मोठी मिरवणूक निघायची. मिरवणुकीमध्ये सर्व विद्यार्थी सहभागी व्हायचे. एकूणच गणेशोत्सवाच्या काळात खूपच धमाल असायची.

शालेय परीक्षा

पहिली व दुसरी घटक चाचणी साधारण सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होत असे. बेंचवर नंबर लिहायचे असल्यामुळे दुपारीच शाळा सुटत असे. परीक्षा तीन दिवस चालायची. प्रत्येक दिवशी दोन पेपर असायचे.

दुसऱ्या दिवशी विद्यार्थी पॅड, पेन, पेन्सिल व आवश्यक परीक्षेचे साहित्य घेऊन आपला परीक्षा क्रमांक कोणत्या वर्गात आला आहे हे शोधण्यासाठी शाळेच्या वेळेआधीच पोहोचत असत. उत्तरपत्रिका फुलस्केप आखीव कागदावर लिहिली जात असे. उत्तरपत्रिकेचे कागद संपल्यावर पुरवणी जोडण्यासाठी फुलस्केप कागद मिळत. त्यावेळी स्टेपलर हा प्रकार नव्हता. पुरवणी बांधण्यासाठी छोटा दोरा असायचा. पेपर ४० गुणांचा असे. १४ गुण मिळाले की पास समजले जाई.

घटक चाचणीचे पेपर संपल्यावर खरी उत्सुकता असायची ती गुणांची. काही उत्साही शिक्षक घटक चाचणी झाल्यानंतर दोनच दिवसांत पेपर तपासून उत्तरपत्रिकांचे भेंडोळे घेऊन वर्गात दाखल होत. प्रत्येकाला उत्तरपत्रिकेचे वाटप करत. सर्वाधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत. उत्तरपत्रिका पाहून झाल्यावर त्या पुन्हा गोळा केल्या जात. काही शिक्षकांच्या उत्तरपत्रिका मात्र खूप विलंबाने तपासल्या जात आणि नंतर गुण कळायचे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली सत्रांत परीक्षा असे. प्रत्येक पेपर तीन तासांचा असायचा. उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी अर्ध्या आकाराचे कागद असत. उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर छापील अक्षरांत “अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे” हे स्लोगन असे. त्याखाली “आदिवासी शिक्षण संस्था, जुन्नर संचलित शिवाजी विद्यालय, डेहणे” असे छापलेले असे. त्याखाली प्रश्न क्रमांक व गुणांची चौकट असायची.

अशाच प्रकारे तिसरी व चौथी घटक चाचणी आणि वार्षिक परीक्षा होत असे.

सकाळची शालेय प्रार्थना

सकाळी ११.०० वाजता शाळा भरत असे. शाळेच्या समोरील पटांगणात प्रार्थनेसाठी मुले-मुली रांगेत उभी राहत. सुरुवातीला “सुंदर जीवन आता मी जगणार” ही अतिशय सुंदर प्रार्थना होती. त्यानंतर बदल करून पुढे साने गुरुजींची “खरा तो एकचि धर्म” ही प्रार्थना कायम करण्यात आली.

प्रार्थना संपल्यावर काही महत्त्वाच्या सूचना सांगितल्या जात. उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना आणि टोपी न घातलेल्या मुलांना छडीचा प्रसाद मिळे.

कवायत व शनिवारची शाळा

शनिवारी सकाळी आठ वाजता शाळा भरायची. पाचवी ते सातवीची शाळा ९.४५ वाजता सुटायची, तर आठवी ते दहावीची शाळा अकरा वाजता सुटायची.

ऑक्टोबरपासून पुढे जानोबा मंदिराच्या पटांगणात कवायत असायची. एक विद्यार्थी ढोलावर ठोके मारत असे. पुढे तुकाराम कोरडे ज्या प्रकारे कवायत करत, त्याप्रमाणे बाकीचे विद्यार्थी पाहून करत. कवायतीचे १६ प्रकार असत. पी.टी.चे सर (तांबोळी सर) कवायती घेत.

कवायत संपल्यावर वर्गात जाऊन बसायचे आणि मुंबई–भोरगिरी एस.टी.ची वाट पाहायची. डेहणेच्या स्टॉपवर गाडी दिसली की उड्या मारत, शाळा सुटली नसली तरी गाडीत जाऊन बसायचे.

हिवाळ्याच्या दिवसांत शाळा वर्गात न भरता पटांगणात ओळीने बसायची. अभ्यासाऐवजी विद्यार्थी दुसरेच काहीतरी करत असत.

त्यावेळी डेहणे येथे सकाळी ९:३० वा, दुपारी १, ३, व ५ वाजता एसटी यायची. त्यामुळे बऱ्यापैकी जाण्या येण्याच्या सुविधा उपलब्ध होत्या. अनेक शिक्षक एसटीने यायचे तर काही शिक्षक खोल्या भाड्याने घेऊन डेहणे येथे मुक्कामी राहायचे. सुरगुडे सर, महामुनी सर, घुले सर, कर्वे सर, तांबोळी सर कुटुंबासह डेहणे येथे राहायचे. 

स्कॉलरशिप व पुस्तके वाटप

दरवर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळायचे. पाचशे ते सहाशे रुपये इतके विद्यावेतन असायचे. विद्यावेतन वाटप तीन दिवस चालायचे. विद्यार्थी व पालकांची खूप गर्दी व्हायची. हे विद्यावेतन साधारण जुलै महिन्यात मिळायचे. त्यावेळी गावातील हॉटेल आणि दुकाने फुल चालायची.

विद्यावेतनाचे नवीन फॉर्म जुलै महिन्यात विद्यार्थ्यांकडून भरून घेतले जात. फॉर्म भरण्यासाठी नववी व दहावीच्या चांगले हस्ताक्षर असलेल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जात असे.

शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना जुनी पुस्तके वाटप करण्याचा कार्यक्रमही असायचा. त्याचे वाटप साधारण आठवडाभर चालायचे. कार्यालयात रांगेत जाऊन पुस्तके घ्यायची. जुनी पुस्तके मिळाल्यावरसुद्धा खूप आनंद व्हायचा.

E.B.C.फॉर्म वाटप

दरवर्षी जुलै महिन्यात E.B.C. फॉर्म वाटप केले जात असे. तो फॉर्म भरून गावच्या सरपंचांची सही व शिक्का घ्यायचा आणि शाळेत जमा करायचा. पावसाळ्याच्या दिवसांत कधी ने-आण करताना फॉर्म भिजूनही जायचे.

२६ जानेवारी राष्ट्रीय कार्यक्रम

२६ जानेवारीची तयारी एक महिना आधीपासून चालायची. अनेक मुले-मुली गाण्यांमध्ये भाग घ्यायचे. गायक, गायिका, तबला आणि हार्मोनियम वादक असा संगीत संयोजनाचा थाट असायचा. नृत्य करणारी मुले आणि मुली वेगळी असायची.

मीना बाळासाहेब डोंगरे यांना तेव्हा शिवाजी विद्यालयाची गानकोकिळा म्हटले जायचे. त्या अतिशय सुंदर गाणी गात असत. मराठी चित्रपटगीते, कोळीगीते ही त्यांच्या आवाजात गायली जात आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यावर नृत्य करत असत. भागातील तमाम रसिकवर्ग २६ जानेवारीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहत असे.

त्यावेळी रेडिओवरील बातम्या फार प्रसिद्ध होत्या. विनोदी पद्धतीने बातम्या देण्याचे काम तुकाराम कोरडे करत असत. त्यावेळी सर्व प्रेक्षकांची हसून हसून पुरेवाट होई.

२६ जानेवारीच्या कार्यक्रमांमध्ये लेझीम पथकाची अत्यंत सुंदर पेशकश व्हायची. त्यांचे विविध खेळ पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायचे.

रात्री नाटकाचा कार्यक्रम असायचा. शाळेतील विद्यार्थी भाग घ्यायचे. त्यांना गावातील तरुण साथ द्यायचे. शालेय शिक्षकसुद्धा नाटकात भाग घ्यायचे.

डॉ. गणेश हिर्लेकर लिखित भाग्याचं कुंकू नाटक तांबोळी सरांनी बसवलं होतं. त्यात नढे सरांची खलनायकाची भूमिका अप्रतिम झाली होती. अनुपम खेरची झलक त्यामध्ये जाणवायची. शेख सरांची विनोदी भूमिका आणि तांबोळी सरांची मुख्य नायकाची भूमिका अप्रतिम झाले होत्या. विशेष म्हणजे भीमराब जाधव यांची बेवड्याची आणि रामदास माटे यांची वेड्याची भूमिका आज 30/32 वर्षानंतरही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते.

शैक्षणिक सहल 

दरवर्षी शाळेची सहल वेगवेगळ्या ठिकाणी जात असे. सहलीची तयारी महिनाभर आधीपासून सुरू व्हायची. सहलीला कायम लक्झरी आरामदायक बस असायच्या. त्यामधून मुले सहलीला जायची. 

सहलीला जाणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी भरपूर खोबरेल तेल लावलेल्या चपात्या, शेंगदाण्याची, लसणाची (तळलेली) चटणी, करंज्या, रव्याचे लाडू, कानवले असे अनेक पदार्थ घेऊन जात असत.

सन १९८७ मध्ये सहल अजिंठा वेरूळला गेली होती. (सहलीची वर्गणी १२५ रुपये) सन १९८८ (सहलीची वर्गणी १५० रुपये) मी सहलीबरोबर गोव्याला गेलो होतो. त्यानंतर १९८९ पंढरपूर, तुळजापूर अक्कलकोट, गाणगापूर, विजापूर, येथे सहलीला गेलो होतो. सहलीच्या वर्गणी मध्ये एकवेळचे जेवण समाविष्ट असायचे. सहलीला जाताना गाडीमध्ये गाण्यांच्या भेंड्या, विनोदी चुटकुले, पोवाडा असे अनेक कार्यक्रम व्हायचे. प्रत्येक प्रेक्षणीय ठिकाणी जाऊन त्याचे निरीक्षण करून वहीत नोंदवायचो.

व्याख्यानमाला

शाळेमध्ये अनेक वेळा व्याख्यानांचे आयोजन केले जायचे. अनेक व्याख्यात्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले जायचे. त्यामध्ये विनोदी व्याख्यान, कथाकथन, विज्ञानाचे प्रयोग, जादूचे प्रयोग असे अनेक प्रकारचे व्याख्याते व्याख्यान द्यायचे. त्यामुळे विद्यार्थी दशेत जीवन जगत असताना अन्य प्रकारचे ज्ञान मिळायचे. सुरगुडे सर, फापाळे सर खूपच विनोदी पद्धतीने कथाकथन व व्याख्यान द्यायचे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या शाळेतील तज्ज्ञ शिक्षक व्याख्यान देण्यासाठी शाळेत निमंत्रित केले जायचे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नवी उमेद मिळायची.

सर डे

दहावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला असायचा. परीक्षेच्या आधी दहावीच्या मुलांना एक दिवस शिक्षक होऊन खालच्या वर्गाच्या मुलांना शिकवण्याची दिव्य पार पाडावी लागे. अनेक विद्यार्थी यामध्ये मोठ्या हिरीरीने भाग घेत असत.

रंगीत पॅन्ट-शर्ट, डोळ्यावर गॉगल, पायात सँडल किंवा बूट घालून ते विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तयार असत. काही विद्यार्थी शिपाई होत.

आपणही शिक्षक होऊन मुलांना शिकवावे, असे मला कधीच वाटले नाही. नुसता विचार जरी मनात आला, तरी हात-पाय लटपटायला होत. अजूनही मी भाषण करू शकत नाही. लेखन मात्र  करू शकतो. 😂

नाईट स्टडी

सायंकाळी शाळा सुटल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना घरी जाऊन जेवण करून पुन्हा शाळेत यावे लागायचे. रात्री शाळेत येऊन निवांतपणे अभ्यास करावा, एकमेकांनी एकमेकांचे प्रश्न सोडवावेत, सामुदायिक अभ्यास करावा हा उद्देश.

परंतु काही विद्यार्थी अभ्यास सोडून अनेक उद्योग करायचे. कुणी हरभरा उपटून त्याचा हुळा करत असत, तर काहीजण वाटाणा उपटून त्याच्या शेंगा खात असत. काहीजण रात्री ग्राउंडवर सायकल चालवत असत, तर काहीजण अभ्यास करत असत.

१ मे परीक्षेचा निकाल

१ मे रोजी परीक्षेचा निकाल असे. त्यादिवशी ग्राउंडवर तमाम विद्यार्थी जमत असत. प्रत्येक वर्गातील मुले रांगेत बसून असत.

प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक आपल्या वर्गातील पहिल्या तीनमध्ये आलेल्या मुला-मुलींची नावे वाचून दाखवत. त्यानंतर कौतुकपर भाषणे होत. उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल वर्गात जाऊन देत असत.

हिरवट किंवा निळ्या रंगाच्या गुणपत्रकावर निळ्या पेनने लिहिलेले गुण असत. त्यामध्ये "उत्तीर्ण", "पास", "वरच्या वर्गात घातला" असे शेरे असत. वरच्या वर्गात घातलेल्या मुलांना लाल पेनने ज्या विषयात कमी गुण आहेत, त्यामध्ये प्लस मार्क दिले जात असत.

त्यावेळी पेढे हा प्रकार प्रचलित नव्हता. पास झाल्यावर मुले गूळ किंवा उबाळे यांच्या हॉटेलमधील कुंदा वाटून आनंद साजरा करत.

इतर उपक्रम

शाळेत असताना आम्ही शाळेचा व्हरांडा बांधण्यासाठी नायफड येथील बंधाऱ्याजवळून दगड आणले होते. तर नदीवरून वाळू आणली होती.

मराठी शाळेच्या पाठीमागे आणि शाळेच्या आवारात अनेक झाडे आम्ही लावली होती. आणि दर पंधरा दिवसांनी, जेव्हा आमची पाळी असेल, तेव्हा झाडांना पाणी घालायचो.

सोळसेवाडीच्या आमराईतील ओढ्यातून पाणी आणून ते झाडांना घालायचो. अजूनही ती झाडे जिवंत आहेत. रस्त्याने जाताना ज्यावेळी आम्ही त्या झाडांना पाहतो, त्यावेळी सर्व आठवणी तरळून जातात.

आज अनेक दशके उलटून गेली, अनेक शिक्षक काळाच्या पडद्याआड गेले, अनेक विद्यार्थी आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावले. मात्र शिवाजी विद्यालय, डेहणेच्या त्या आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यात ताज्याच आहेत. शाळेची इमारत, मैदान, वर्गखोल्या आणि शिक्षकांचे संस्कार हे आमच्या आयुष्याचे अमूल्य वैभव आहे. या विद्यालयाने आम्हाला केवळ शिक्षणच दिले नाही, तर जीवन जगण्याची दिशा दिली."

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...