Translate

आवणी (भात लावणी)

जुन महिन्याचा दुसरा आठवडा असतो.
आकाशात काळे काळे ढग जमू लागतात.सोसाटयाचा वारा वाहू लागतो. विजा चमकू लागतात.ढगांचा गडगडाट सुरू होतो. सुरूवातीला काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडु लागतो .काही ठिकाणी जनावरे, झाडे झुडपे, प्रसंगी माणसांवर विज पडते. अनेकांचे नुकसान होते.

त्यानंतर मोसमी पावसाला सुरूवात होते.उशिरा का होइना पाऊस पडू लागतो.ओढे- नाले,नद्या,ओहोळ खळखळून वाहू लागतात. शेतकऱ्यांना भाताची आवणी करण्याचे वेध लागतात. (आवणी हा ग्रामीण भागातील भातलागवड करणे या अर्थाने वापरतात)

धुवाधार पाऊस पडत असतो. भातरोपे तरारून वर आलेली असतात. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जाते. भातखाचरे पाण्याने फुल्ल भरून वाहू लागतात. आणि मग आवणी करण्यासाठी शेतक-यांची एकच धावपळ होते. सर्वांचे एकच लक्ष असते. लवकरात लवकर आपली आवणी संपवणे. 

काही शेतकऱ्यांना थोडी भातशेती असते.त्यांची लवकरच आवणी होते. परंतु ब-याच शेतक-यांची शेती जास्त असते. मणुष्यबळ कमीअसते. अनेकांकडे चिखलणी करण्यासाठी बैल नसतात. त्यांची या मोसमात खुपच ओढातान होते. या शेतकऱ्यांना मनुष्य बळ व औतकाठीसाठी वाट पहावी लागते.

ज्यांना थोडी शेती असते व त्यांची आवणी लवकर होते ते शेतकरी एकत्र येतात. अनेक गावांमध्ये गरजु शेतकरी असतात.हे गरजू शेतकरी ज्यांची आवणी झाली आहे या शेतक-याकडे येतात. (पश्चिम भागातील अनेक शेतक-यांना प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना किती जमीन आहे. व ती कोठे कोठे आहे याची इंत्यभुत माहिती असते.) 
img src="..." alt=" शेतकरी">
गरजू शेतक-यांची संपुर्ण आवणी करून देण्यासाठी विशिष्ट  रक्कम देण्याचे ठरवले जाते.त्यास "डफा" किंवा "खोती" देणे असे शब्द आहेत.

पुर्वी भागातील मुत्सुद्धी पुर्वजानी जशी शासकीय सुट्टी असते तशी शेतकऱ्यांना सुद्धा आठवडयातुन एकदा सुट्टीची योजना केलेली असते. यालाच "मोडा "असे म्हणतात. प्रत्येक गावचा मोडा हा मंगळवार किंवा रविवारी असतो.त्या दिवशी शेतीची कोणतीच कामे शेतकरी करत नाहीत.

आवणी करताना खुपच मजा येते. कधी जोरदार तर कधी रिमझिम पाऊस पडत असतो. भात खाचरात गुडघाभर पाणी असते.भात खाचरातील रोपे विशिष्ट पण सोप्या पध्दतीने काढली जातात त्याला दाढ खणने असे म्हणतात. छोटया रोपांची अगदी छोटी गड्डी बांधतात त्याला "मुठ "असे म्हणतात.असे अनेक मुठ एकत्रित केल्यावर या सर्वांना "आवान" असे म्हटले जाते.

 दाढ खणणे 
img src="..." alt=" भाताच्या रोपांची काढणी ">
प्रथमतः दाढ खणल्यावर त्याचे मुठ जेथे भातरोपे लावायची आहेत त्या ठिकाणी घेऊन जातात.भात रोपे लावायच्या आधी त्या खाचरात बैलांच्या सहाय्याने (यालाच औत म्हणतात.) गाळ केला जातो, मगच आवणी केली जाते.

गाळ करणे 
img src="..." alt=" शेतीची नांगरणी">
आवणी करताना पाऊस पडत असतो. सर्वजण भिजुन गेलेले असतात. प्रत्येकाकडे ईरणे किंवा प्ल्यास्टिक कागद असतो. खुपच मोठा पाऊस आलातर अंगावर ईरणे व कागद घेतात. अन्यथा इरणे व कागद बांधावर ठेवतात.दुपारचे जेवण भाकरी मसुराची किंवा काळ्या वटाण्याचीआमटी, लसणाची चटणी, कांदा व भात असे जेवण असते. सर्व शेतकरी पावसात बांधावर एकत्रित बसुन जेवतात.जेवण झाल्यावर पुरूष मंडळींना तंबाखू व विडीकाडी दिली जाते.व थोडयावेळाने परत कामाला सुरूवात केली जाते.
मुठ

img src="..." alt=" शेतकरी ">
आवणी करणा-या माणसांना मुठ पुरवणे खुपच आनंदाचे काम असते. दहा पंधरा मुठ दोन्ही हातात धरून पाण्यावरून ओढत नेऊन आवणी करणा-या माणसांपर्यत विशिष्ट पद्धतीने फेकने ही एक कलाच असते. काम करताना अजीबात श्रम होत नाही.

img src="..." alt=" भात शेतीची लावणी ">
ग्रामीण भागात खुप पाऊस पडतो.त्यामुळे त्या ठिकाणी मुख्यत्वे भातपीक घेतले जाते. ग्रामीण भागातील शेती ही चढ उताराची असल्याने छोटे छोटे दगड लावून बांध घालून प्लाँट केले जातात. हे प्लाँट कमीत कमी दोन गुंठे व जास्तीत जास्त वीस गुंठयापेक्षा जास्त मोठे असतात.याला 'खाचर' असे म्हटले जाते. 

उताराच्या जमीनीवरील पाणी वाहुन जाण्यासाठी प्रत्येक खाचराला विशिष्ट प्रकारे दगड लावले जातात. त्यावरून पाणी वाहून जाते. हे एकप्रकारे छोटे छोटे धबधबेच असतात.याला "प-ह्या"  म्हणतात. ज्या वेळी पाऊस पडतो. तेव्हा भातखाचरे भातलागवड केली असल्याने हिरवीगार दिसतात व त्या खाचरांच्या प-ह्या वरून खाली कोसाळणारे पाणी हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते.स्वर्गीय सुखाचा भास होतो.
img src="..." alt=" हिरवा निसर्ग ">
जिकडे तिकडे हिरवेगार व पांढरेशुभ्र झरे,ओढे-नाले,प-ह्ये नदी धबधबे भात खाचरातुन वाहणारे पाणी, हिरवेगार डोंगर ,हिरवीगार राने याची निसर्ग मुक्त उधळन करीत असतो.हे पाहून मन प्रसन्न होते. प्रफुल्लीत होते.पश्चिम भागातील जीर, रायभोग, खडक्या, इंद्रायणी तांदुळ फार प्रसिद्ध आहेत.मोठ्या प्रमाणावर या तांदळांची खरेदी केली जाते.

रामदास तळपे ग्रामीण संस्कृती 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...