श्रावण महिन्यातील ग्रामीण जीवन




श्रावण महिन्यातील ग्रामीण जीवन

जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झालेला असायचा. भाताची पेरणी केली जायची. थोड्याफार प्रमाणात पाऊस सुरू असायचा. आणि मग अशातच ग्रामीण भागातील स्रीयांची लगबग सुरू व्हायची. ती म्हणजे घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत कुंपण करणे. घरातील लहान मोठ्यांच्या मदतीने जंगलात जाऊन टनटनी, निरगुडी, रामेठा अशाच अंगठ्या एवढ्या परंतु उंच झाडाची लाकडे आणली जात. त्याला खाकर असे म्हणतात. 

घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत जमीन सपाट करून त्यावर शेणखत टाकले जाई.ते मातीत मिसळून संपूर्ण जागा सपाट केली जाई. मधील जागा उंच ठेऊन त्यावर पावसाळी आळूचे कंद लावले जात. ती जागा थोडे उंच ठेवतात आणि  बाकीची जागा पाणी निघून जाण्यासाठी विशिष्ट पद्धतीने तयार केली जाते. 

या कुंपणाला पश्चिम भागात वाडगे असेही म्हटले जाते. या वाड्ग्यात पावसाळी आळु (आळवड) भोपळ्याचे (डांगर) बी, दोडक्याचे बी, घेवडा आणि घोसाळेचे बी तसेच कारले आणि काकडीचे बी पेरले जाई. गवती चहा लावला जाई.  त्यानंतर छान पैकी कुंपण केले जाई .हे सर्व लावल्यावर थोड्याच दिवसात वाडग्यातील अळूच्या कंदांना छान पैकी कोंब फुटत. पेरलेले सर्व बी उतरून येई. आम्हा लहान मुलांना याची प्रचंड उत्सुकता असे की उतरून आलेला कोंब हा कोणत्या भाजीचा आहे. यावरून आमच्या पैजा लागत. कोण काकडीचा तर कोण भोपळ्याचा, दोडक्याचा ,कारल्याचा यावरून वादविवाद व्हायचे. जास्तच गोंगाट झाल्यावर घरातील बायामाणसे आमच्या जवळ येत व आम्हाला चांगलेच दटावत. अजिबात वाडग्यात जाऊ नका.अशी तंबी दिली जाई. 

पूर्वी पावसाळ्यात त्याकाळात शासनाकडून प्रत्येक शाळेला प्रत्येक विद्यार्थ्यांना पावसाळ्यात दोन झाडे लावण्याबाबत परिपत्रक आलेले असायचे. त्यानुसार गुरुजी आम्हाला प्रत्येकाने दोन झाडे लावावी. अशा सूचना देत. त्यानुसार प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अभ्यासापेक्षा झाडे लावन्यावर जास्त भर देत. प्रत्येक जण आपापल्या शेतात किंवा घरामागील वाडग्यात आंबा आणि जांभूळ ही दोन झाडे सर्रास पणे लावायचे. दुसऱ्या दिवशी प्रत्येकाला गुरुजी किती झाडे लावली याबाबत विचारून यादी तयार करायचे. व तालुक्याला पाठवून द्यायचे. आम्ही मुले दररोज झाडांची किती वाढ झाली आहे हे पाहायचो. हे साधारण पंधरा ते वीस दिवस चालायचे. नंतर उत्साह मावळून जायचा.

शाळेत पूर्वी प्रत्येक मुलाला एक खाकी चड्डी आणि मांजर पाट पांढरा शर्ट मिळायचा.तर मुलींना एक निळी पांढरी फ्रॉक मिळायची. शाळेत जेव्हा कपडे वाटप व्हायचे तेव्हा शाळेत न येणारे विद्यार्थी सुद्धा शाळेत हजेरी लावायचे. आणि कपडे मिळताच पुन्हा गैरहजर राहायचे. या कपड्यांचे प्रत्येक मुलाला नवीन नवीन खूप अप्रूप वाटायचे. कपडे नवीन परंतू पावसाळ्याचे दिवस घरात माळ्यावर पेंढा (वैरण) सरपण व गोव-या साठवल्यामुळे घरात खुप धुर व्हायचा आणि बाहेर गाळ व पाऊस यामुळे हे कपडे आठ दहा दिवसात नवे आहेत यावर कोणाचाच विश्वास बसत नसे. त्याच प्रमाणे त्याची क्वालिटी अत्यंत खराब असल्यामुळे हे कपडे नवीन वाटायची नाहीत. नंतर या कपड्यांविषयी असलेली नवलाई निघून जायची.

पावसाळ्यात खुप जण माळावरून खेकडे (किरवे) आणायचे. प्रत्येकाकडे रात्री खेकडाचे कालवन असायचे.कधीकधी लोक भरलेल्या खेकडांचे कालवन करायचे.खेकडांच्या कवटात हुलग्याचे,बाजरीचे किंवा हरबऱ्याचे पीठ मिठ मिरची व मसाल्यासह घालून  त्याचे कालवण बनवले जाते.त्याची चव न्यारीच असते.

हे सर्व झाल्यानंतर यायचा श्रावण महिना.श्रावण महिन्यात प्रत्येक घरात मोठ्या माणसांना उपवास असायचे.उपवास असल्यावर दुपारपासूनच उपवासाची तयारी सुरू व्हायची.

वाडग्यातून आळूची पाने आनायची. ती स्वच्छ धुऊन त्यावर बाजरीचे किंवा बेसन पीठ मीठ-मसाला लावून त्याचे पाचवड केले जात. घरात त्यावेळी खूप माणसे असायची.(एकत्र कुटुंबपध्दती) त्यानुसार आळूचे पातवडही खूप करावे लागत. पातवड झाल्यावर आंघोळीच्या मोठ्या पातेल्यात थोडा पेंढा ठेवायचा. त्यात पाणी घालायचे व त्यावर चाळण व भांड्यात पातवड ठेवले जायचे .आणि हे पातेले चुलीवर ठेवून खाली खुप जाळ केला जायचा. वर परात ठेवायची.अशाप्रकारे पातवड बनवत.

काही घरांमध्ये पातवडाच्या वड्या केल्या जात तर काही ठिकाणी तसेच पातवड खाल्ले जायचे.या भाजीचा गिरंगीटा सुध्दा केला जाई. 

श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडायचा. ओढ्या नाल्यांना स्वच्छ पांढरे शुभ्र पाणी असायचे. गावात ठिकठिकाणी रात्री भजने असायची. मोठे धार्मिक वातावरण असायचे. दर सोमवारी भाविक मोरगिरी मार्गे कोटेश्वराचे दर्शन घेऊन भीमाशंकरला जात.

आम्ही लहानपणी कोटेश्वर मार्गे भोरगिरी वरून भीमाशंकरला गेलेलो आहे.तेव्हा पायी चालण्यात खूप मजा वाटायची. भीमाशंकर ला गेल्यावर तिथल्या कुंडात पाण्यात खूप मजा वाटायची भीमाशंकरला भाविकांची खूप गर्दी असायची. दर्शन झाल्यावर लाह्या आणि खडीसाखर घेऊन आम्ही पुन्हा कोटेश्वर मार्गे भोरगिरी वरून घरी जायचो, तेव्हा प्रत्येक जण स्वच्छंदी असायचा. कोणालाही कसलाही कामाचा किंवा कशाचाच ताण नसायचा. त्यामुळे त्यावेळी कुणीही आजारी पडत नसे. कुणालाही रक्तदाब,डायबेटीस नव्हता. हृदय विकार नव्हता. मुळव्याध नव्हते.पोटाचे आजार नव्हते कारण त्यावेळी प्रत्येक जण निसर्गाच्या सानिध्यात राहायचा.

परंतु आता मात्र आपण आपल्या कामामुळे निसर्गापासून दूर गेलो त्यामुळे आपल्याला नाना आजार जडले. चाळिशीत असलेला माणूस जणू साठ पासष्ठ वर्षाचा म्हातारा वाटतो हे उदाहरण आहे. म्हणूनच गड्या आपुला गाव बरा  हे सूत्र प्रत्येकाने जपले पाहिजे, गावाला गेले पाहिजे, आपण लहानपणी ज्या ठिकाणी ज्या माळावर ज्या रानात अनेक वेळा गेलो त्या ठिकाणी आपण गेलो पाहिजे. पहा आपणाला एक वेगळाच आनंद मिळेल. आणि बालपणीच्या आठवणी दाटून येतील एवढे मात्र खरे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस