पुर्वीची कलानाट्य व भारूड मंडळे

पूर्वीची कला नाट्य व भारुड मंडळे

पूर्वी ग्रामीण भागात अनेक कला नाट्य व प्रसादिक भजनी भारुड मंडळ होती. त्यापैकी पोखरी व कानसे माळवाडी तालुका आंबेगाव व मावळ तालुक्यातील ओझर्डे आणि पवळेवाडी ही भारुडे त्या काळात फार प्रसिद्ध होती.त्यांच्याकडे अद्यायावत स्टेज व इतर सामग्री होती.सामान वाहतुकीसाठी ट्रकची व्यवस्था असायची.तर तळेघर ,भिवेगाव, उगलेवाडी, आहुपे या गावांचा तमाशा त्याकाळात फार प्रसिद्ध होता.

पश्चिम भागात टोकावडे,भोमाळे,धामणगाव, (मदगेवाडी) नायफडची (सरेवाडी) नाव्हाचीवाडी व खरोशी या गावांची कला नाट्य व भारुडे प्रसिद्ध होती.नाव्हाच्यावाडीची रामलीला व सरेवाडीची कृष्णलीला फार प्रसिद्ध होती.अनेक गावांच्या यात्रा,पूजा इत्यादी कार्यक्रमांना भारुडाचा कार्यक्रम होत असे.पोखरी,कानसे माळवाडी,ओझर्डे  व पवळेवाडी, आपटी, चांदुस कोरेगाव ही भारुडे  मुख्यता स्टेजवर होत असत. तर  बाकीची लहान भारुडे ही जमिनीवर होत असत.छोटासा मंडप  व एक पडदा असायचा.पडद्याच्या पाठीमागे भारूडातील पात्रांचा मेकअप चालायचा.मंडपाच्या पुढील भागात भारूडातील भजन मंडळी बसलेली असत.प्रत्येक भारूडात एक पायपेटी असायची व एक पेटी वादक त्यालाच पूर्वी पेटी मास्तर असे  म्हणत.

तेव्हा पेटीमास्तरला समाजात फार मान असे.पेटीमास्तरचाचा पोशाख म्हणजे निळ दिलेले धोतर किंवा पायजमा व नेहरूशर्ट व निळ दिलेली टोपी.उन्हाळा,पावसाळा व हिवाळा सतत गळ्यात कायम मफलर कडक इस्त्रीचा असा पोशाख असायचा. श्री धर्मा बुधाजी तळपे, श्री दत्तात्रय पंगाजी  मिलखे असे पेटी मास्तर प्रसिद्ध होते तर ढोलकी वाजवण्यात विठ्ठल उगले प्रसिद्ध होते.

पेटी मास्तर हा खुर्चीवर बसून पेटी वाजवायचा.पेटी मास्तर हा  स्वतः गायक असायचा.त्यानंतर पखवाज टाळ व खंजिरी  इत्यादी वादक व पाठीमागे भजन म्हणणारे असत.असा त्यांचा  संच असायचा.आम्हा लहान मुलांना भारूडातील नटमंडळी घालत असलेले कपडे यांचे फार आकर्षण असायचे. 

प्रथमता भारूडाची सुरुवात ही उमवरा या पात्राने होत असे. उमवरा हे पात्र स्टेजवर म्हणजेच मंडपात म्हणजेच पडद्याच्या पुढे आल्यावर भजन मंडळ मुख्यता पेटी मास्तर उमवरा शिरीधरा दयेचा देतो असारा हे भजन म्हणत असे व त्यापाठीमागे विशिष्ट वाद्यांचा आवाज तालासुरात बाकीचे भजने, भजन म्हणत. त्या तालावर उमवरा हे पात्र डुलत डुलत नाचत असे.उमवरा या पात्राचा पेहराव म्हणजे लेंगा घातलेला व त्यावर महाराजांचा अंगरखा व मुकुट असे.त्याच्या हातात एक पितळी किंवा ताट असायचे.

त्यानंतर पुढील पात्र हे सावळ्या वनमाळी हे असायचे. सावळ्याचा पोशाख हा उमवरा सारखाच असायचा.त्याच्या हातात शाल किंवा मफलर असायची दोन्ही हातात शालीचे दोन्ही बाजूचे पदराचे टोक घेऊन तो पेटी मास्तरच्या व भजन मंडळीच्या सावळ्या येरे वनमाळी, सावळ्या येरे वनमाळी ! भक्त तारीले, दुष्ट मारले येरे वनमाळी ! या भजनावर दोन्ही हात खालीवर करून नाचायचा.

त्यानंतर गणपतीचे पात्र यायचे.कधीकधी गणपतीचे पात्र हे एखादा लहान मुलगा करायचा.गणपतीचे सोंड असलेला मुकुट तोंडावर बांधून व गळ्यात चमकीच्या माळा रंगीत धोतर असा गणपतीचा पोशाख असायचा.कधीकधी पात्र काम करणारा छोटा मुलगा असायचा तर मुकुट मोठा असायचा. त्यामुळे व्हायचे काय की त्याला समोर काय चाललं आहे हेच दिसायचं नाही.आणि तो भलतीकडेच नाचायचा. त्यामुळे एकच हशा पिकायचा.गणपतीचे पात्र गेल्यावर पुन्हा सावळ्या वनमाळी हे पात्र यायचे आणि ते उमवरा असलेल्या पात्राला विचारायचे. येथे कोण आले होते? उमवरा हे पात्र त्याला सांगायचे येथे  भगवान श्री गणपती आले होते.ते ऐकुण वनमाळी मग म्हणायचा माझं त्यांच्याकडे एक छोटंसं काम होतं. उमवरा हे पात्र विचारायचे, त्यांच्याकडे तुमचे काय काम होते? सावळ्या वनमाळी हे पात्र म्हणायचे. मला त्यांची सोंड पिरगाळायची होती.उमवरा म्हणायचे अरे असे दुष्टा सारखे भाषण करू नको.

त्यानंतर शारदा हे पात्र यायचे.शारदा झालेले पात्र हे मोरावर बसून येत असे.मोर हा जुने पुराणे इरणे मध्यभागी कापून ते कमरेला बांधायचे, त्यावर रंगीत कापड असायचे. भंगारमधल्या पत्र्यापासून त्याची मान व चोच बनवलेलीअसे. हे पात्र लहान मुलांना खूप आवडायचे.भजन मंडळ  तालासुरात आली शारदा सुंदर ,आली शारदा सुंदर, आली मोरावर बसून.असे भजन म्हणायचे.त्यावर शारदा झालेली झालेले पात्र विशिष्ट तालात व ठेक्यात नाचायचे .शक्यतो हे पात्र कै.विठू नांगरे फार उत्तम करायचे.यानंतर परत सावळ्या वनमाळी हे पात्र यायचे.थोडासा नाच झाल्यावर ते उमवराला विचारायचे, येथे कोण आले होते? उमवरा सांगायचा येथे श्रीगणेशाची पत्नी शारदा माता या मोरावर बसून आल्या होत्या.सावळ्या म्हणायचा माझे त्यांच्याकडे थोडेसे काम होते? उमवरा म्हणायचा त्यांच्याकडे काय काम होते? मला त्यांच्या मोराची मान पिरगाळायची होती. व पिसे कधीकधी ग्रामीण मराठी भाषेत पखाडं उपटायची होती.उमवरा म्हणायचा अरे असे दुष्टा सारखे भाषण करू नको. हे सर्व झाल्यावर मुख्य भारुडाच्या वगनाट्यला सुरुवात व्हायची.

प्रत्येक भारुडात राजा, प्रधान, राणी ,द्वारपाळ ,राक्षस किंवा निगेटिव्ह रोल करणारे पात्र असायचे.भारुडात द्वारपाल यांचे काम अतिशय विनोदी असायचे. 

महाराजांच्या हातात कायम चाबूक असायचा व कमरेला तलवार असायची. आणि तो राजा द्वारपळाला म्हणायचा द्वारपाल दरबारात उशिरा का आला? त्यावर द्वारपाल म्हणायचा काय सांगू महाराज दरबारात यायला निघालो होतो परंतु येताना एक मोठा आंब्याचं झाड होतं. झाडावर खूप आंबे होते.मला आंबे खाऊशी वाटले. मी झाडावर चढलो, आंबे खाल्यावर मला काही झाडावरून उतरता आलं नाही मग काय केलं? असं राजा म्हणायचा. यावर पळत पळत घरी जाऊन शिडी आणली खाली उतरलो आणि धावत धावत दरबारात आलो असं म्हटल्यावर राजा त्याच्या पाठीवर चाबूक मारायचा. प्रेक्षक हास्य सागरात बुडून जायचे.

असेच दुसऱ्या द्वारपाळला राजा विचारायचा. दरबारात उशिरा येण्याचे कारण काय ?यावर द्वारपाल म्हणायचा.काय सांगू महाराज दरबारात येत असताना माझ्यापाठी एक वाघ लागला.मी घाबरून झाडावर चढलो.वाघ खाली बसून राहिला. शेवटी बराच वेळ बसल्यावर मला लघवीला आली मी झाडावर बसून लघवी करू लागलो आणि काय सांगू महाराज, त्या लगवीच्या धारेला पकडून वाघ झाडावर चढू लागला. इतक्यात मी लघवी आखडली आणि वाघ धाडकन खाली पडला. तसाच मी झाडावर उतरून लगेच दरबारात हजर झालो हे म्हटल्यावर महाराज चाबकाचा फटका द्वारपालाच्या पाठीवर मारायचे.अशा प्रकारचे त्यावेळेस विनोद होत असत.

द्वारपाळांची पात्र ही विनोदी असायची.भारुडात त्याकाळात स्री पात्रासाठी पुरुष भूमिका करायचे. त्यांना नाच्या असं म्हटलं जाई. त्याकाळात सखाराम उगले,(उगलेवाडी) गणपत सातपुते, घोटावडी, धामणगावचे गबाजी,शंकर माळी नायफड (माळेवाडी) पालखे वाडीचे निधन हे भिवेगावच्या तमाशात नाच्याचे काम करायचे. प्रत्येक नाच्याने स्री सारखे केस वाढवलेले असत. इतर वेळी केसांचा बुचडा बांधून त्यावर टोपी घालत.असा तो काळ होता. 
कै.विठू नांगरे हे भारुडातील कोणतेही पात्र लिलया करायचे. ते त्या काळातील भारुडाचे अनभिशिक्त सम्राट होते. सिताराम मुऱ्हे, टोकवड्याचे रामू न्हावी, किसन कोरडे, विठ्ठल लांघी, देवराम मुऱ्हे,बाबुराव गुंजाळ,काशिनाथ गुंजाळ, पंढरीनाथ भागीत, भिमाजी गोडे,दुलाजी गोडे, बबन गोडे (सरपंच), शंकर गवारी,काळू तिटकारे, देवराम तिटकरे, सखाराम उगले, विठ्ठल उगले, चिंधू वनघरे, बापू साबळे असे अनेक थोर कलावंत होते.

अनेक गावच्या  यात्रा ,पूजा या कार्यक्रमासाठी ते पायीच जात असत. त्यांचे सामान, भारुडात वापरायचे कपडे ,पाय पेटी, पखवाज ,टाळ इत्यादी असे मजल दर मजल करत ते गावोगावच्या यात्रेला जात असत. गावाने दिलेली बिदागी घेऊन ते दुसऱ्या गावच्या यात्रेला जात असत. रात्री भारुडात राजाचे काम केलेला नट सकाळी कपड्याची पेटी किंवा पाय पेटी डोक्यावर घेऊन पायी चालत असे. हे लोक केवळ गावाच्या नावासाठी पायपीट करत.आणि त्यातच ते समाधानी असत. पैशासाठी कुणीही हे उद्योग करत नसे हे विशेष.

भारुडाचे कार्यक्रम हे रात्री दोन बाजुला राँकेलचे पलीते लावुन केले जात असत. पुढील काळात गॅस बत्ती आल्यावर गँसबत्तीच्या उजेडात होत असत.त्यानंतर लाईट आली.स्पिकर आले. 

टोकावड्याच्या भारुडात झाकझुक करणारी एक विजेरी होती.लढाईच्या वेळी ती चमकवली जात असे.कधीकधी खुप वेळ लढाई चालायची.प्रेक्षक कंटाळुन जायचे.शेवटी प्रेक्षकांमधला एकजन उठून म्हणायचा.आता बास करा या लढाया.पुढचे पात्र येउद्या.

भारूडात भक्त प्रल्हाद अर्थात हिरण्यकशपुचा वध,राजा हरिश्चद्र, उज्जैनीचा राजा विक्रम अर्थात शनी आला साडेसात वर्ष,असे धार्मिक वग असायचे.हे वग पाहण्यासाठी बाकीच्या गावचे लोक आपापल्या गोधड्या घेऊन भारूड किंवा तमाशा पाहण्यासाठी जागा धरून बसायचे. तमाशात देखील अशाच प्रकारचे हास्यविनोद व वगनाट्य व्हायचे.हे तमाशे बिगर स्टेजचे व जमिनीवर चालायचे.फक्त एक पडदा असायचा. त्यापुढे तमाशा चालायचा.

तमाशात असलेल्या  नाचाचे काम करणारा नट अनेक स्री पात्र करायचा. कधीकधी दुसरा नाच्या असायचा. त्याकाळात चवली पावली वर तमाशे व्हायचे.गाव त्यांना देईल ते मानधन ते कोणतीही घासाघीस न करता घ्यायचे. बिगर आमंत्रणाचे  हे तमाशे यात्रा हंगामात गावोगावी फिरत असत. तमाशा किती लांबून आला आहे यावर त्यांची बिदागी ठरली जाई. तमाशात नाच्याचे काम करणारा प्रेक्षकांमध्ये जाऊन चवली पावली गोळा करत असायचा. एखादा माणुस चवली पावली देऊन त्याच्या मित्राला चवली पावली देण्याविषयी नाच्याला सांगायचा. नाच्या नाचत नाचत म्हणायचा. सोमाजीचे सांगनं आहे कोणाला, तर गोमाजी यांना. बाबारे तू मुंबईवरून आला आहेस.तमाशासाठी काहीतरी चवली पावली सोड .नुसतं तोंडात माशा गेल्यावानी नुसताच तमाशा पाहू नकोस.असे नाच्याने म्हणल्यावर गोमाजीला सुद्धा काहीतरी चवली पावली सोडायला लागायची. त्यानंतर तमाशातील नाचण्याचे काम करणारा नाच्या म्हणायचा.सोमाजीच्या शेपटाला बांधलाय डबा,गोमाजी वाजवी खबा खबा असे म्हणून तो पायातील चाळ वाजवीत विशिष्ट पद्धतीने नाचायचा .पायाचा ठेका, घुंगरांचा आवाज व ढोलकीची थाप याचा अतिशय सुंदर आवाज घुमायचा.असा तो काळ होता. 

काळाच्या ओघात महाराष्ट्राची ही लोककला लोप पावली. त्यानंतर टीव्ही, व्हिडिओ, कँसेट ,व्हिसीडी, डीव्हीडी, विविध प्रकारचे चैनल पेन ड्राईव्ह ,साधे फोन,रंगीत फोन, स्मार्टफोन, पेन ड्राईव्ह यांचा जमाना आला.आणि पूर्वीच्या लोककला काळाच्या ओघात लुप्त झाल्या.  




      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस