Translate

बैलगाडा शर्यती जुन्या आठवणी

img src="..." alt=" बैलगाडा शर्यत">

पुर्वी पासून ग्रामीण भागाला बैलगाडा शर्यतीची परंपरा लाभली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये हवेली, शिरूर, मावळ, खेड आंबेगाव आणि जुन्नर तसेच खेड तालुक्यातील वाडा, डेहणे, गोरेगाव, साकुर्डी, वाशेरे, वाळद,आव्हाट, खरोशी, एकलहरे व शेंदुर्ली या गावामध्ये प्रामुख्याने यात्रेच्या निमित्ताने बैलगाड्यांच्या मोठ्या प्रमाणात शर्यती आयोजीत केल्या जात असत.

यात्रा कमिटी

गावची यात्रा भरवताना आधी स्थानिक पातळीवर मीटिंग आयोजित करून वर्गण्या, देणग्या गोळा करण्यावर भर दिला जातो.

या साठी यात्रा कमीटी एक महिना आधीपासुनच तयारीला लागते. वर्गण्या व देणग्या वसुल केल्या जातात. काही उत्साही लोक बैलगागाडा शर्यतींसाठी वस्तूरूपाने देणग्या देतात. त्यामध्ये कपाट, टिव्ही, पंखा, घड्याळ यांचा सामावेश असतो, आता तर मोटरसायकल, फोर व्हीलर अशा बक्षिसांचा वर्षाव केला जातो.

बैलगाडयांच्या शर्यतीसाठी एक ते पाच क्रमांक काढले जातात. बक्षीसांची संख्या जर जास्त असेल तर एक ते पाच क्रमांकासाठी वस्तुंची विभागणी केली जाते. 

फळीफोड गाडा 

बैलगाडा घाटामध्ये एकूण जे गाडे  पळवले जातात त्या गाड्यांमध्ये पाच क्रमांक काढले जातात. या पाच क्रमांकामध्ये अनेक गाडे असतात. आणि या गाड्यांमध्ये पहिल्या पाच क्रमांका मध्ये सर्वात पहिला गाडा म्हणजे फळीफोड गाडा. या फळीफोड गाड्यासाठी वेगळे इनाम असते.

सतत तीन वर्ष पहिला येणारा गाडा

सतत तीन वर्ष प्रथम येणा-या गाड्यांसाठी वेगळे इनाम असते. हे इनाम वैयक्तिक स्वरुपात असते. शिवाय प्रथम क्रमांकासाठी जाहीर केलेले बक्षीस देखील मिळते.

आता बैलगाडा घाट दुरुस्तीसाठी ट्रॅक्टर, जेसीबी यांच्या सहाय्याने दुरुस्ती केली जाते, परंतु पूर्वी बैलगाडा घाट दुरूस्ती साठी आठ दिवस आधीच गाडाशौकिन ग्रामस्थ तेथे जाऊन दुरूस्ती करत. त्यांना भेळ व जिलेबी दिली जाई.

पुर्वी यात्रेच्या आदल्या दिवशीच गाडा मालक सायंकाळी यात्रा असलेल्या गावी दाखल होत. दुस-या दिवशी सकाळी टोकन देण्याचे काम सुरू होई. त्यासाठी गाडामालकाची रांग लाऊन टोकन दिले जात.

नंतर पुढे ही पद्धत बदलली गेली यात्रेच्या दिवशी सकाळी नऊ ते बारा या काळात सर्व गाडामलकांच्या नावाच्या चिठ्ठया काढून सोडत पद्धतीने टोकन काढले जाऊ लागले. 

पुर्वीचा घाट व नंतर बनवलेला घाट यात अधूनिकपणा आला. घाटातील बैलगाड्यांची अचुक माहीती आँखो देखा हाल पहाण्यासाठी घाटाच्या शेजारी उंच मचान तयार करून चार बाजुला लाऊडस्पीकरची कर्णे बांधन्यात येत. 

मचाणावर पाच-पंचवीस गावचे कार्यकर्ते गर्दी करून बसत. त्यापैकी एकाकडे सेकंद पहाण्याचे घड्याळ असे. तर दोन जण अलाउंसींग करायला असत. शेजारीच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली असे. 

कार्यकर्त्यांसाठी भेळ, शेव, रेवडीची व्यवस्था असे. मलाही लहानपणी त्या मचाणावर जाऊन गाडे पाहण्याची मजा घ्यावी असे वाटायचे. परंतु ही इच्छा कधीही पुर्ण झाली नाही.

काही जण झाडावर बसुन गाडे पाहाण्याचा आनंद लुटायचे. झाडावर आधीच बरेचजण बसलेले असायचे. तेथेही आमचा नंबर लागला नाही. 

दुपारी बाराच्या नंतर घाट चालू व्हायचा. घाटाच्या खाली मैदानात सगळीकडे खिल्लारी पंढरेशुभ्र बैलच बैल दिसायचे. प्रचंड भंडार उधळला जायचा. काही अवखळ बैलांना सांभाळताना लोकांची त्रेधातिरपट व्हायची. 

घाटाच्या दुतर्फा व जिकडे तिकडे लोकांचा प्रचंड कोलाहाल दिसायचा. धोतर, पैरण, टोपी, पायजमा, खमीस, पँन्टव शर्ट घालून लोक यात्रेला आलेले असायचे. 

लांबुन सगळीकडे पांढरेच पांढरे दिसे. जागोजागी सुस्पष्ट आवाज यावा म्हणून लाऊडस्पिकरची कर्णे लावलेली असत. काही कर्णे झाडांवर देखील बांधली जात. 

जागोजागी लोकांना थंडगार करण्यासाठी सायकलीवर बर्फाच्या गारेगारी, कुल्फ्या, आईसक्रिम, फालुदा इत्यादी पदार्थ विकले जात. त्यानंतर दुधाच्या? कुल्फ्या आल्या. 

त्यावेळी घाटाच्या बाजूला बैलगाडा पाहायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये  लेमनगोळ्या, कलिंगडाच्या खापा, लहानमुले विकत असत. 

बैलगाडयांच्या घाटाजवळ गेल्यावर एक वेगळेच वातावरण असायचे. सगळीकडे नुसती गर्दी व गोंगाट यांचा कोलाहाल असायचा.

हे पहा सर्व गाडामालकांना नम्र सुचना.

कृपया टोकन नंबर प्रमाणे आपापले गाडे जुंपावेत..

ग्रामस्थ मंडळी पुढील गाडा जुंपायला मदत करा.

घाटात जास्त गर्दी करू नका.

एकदा जुंपलेला गाडा पुन्हा जुंपल्यास स्पर्धेतुन बाद करण्यात येईल.

अशी स्लोगन वाक्य असलेल्या सूचना  स्पिकरवर सतत चालू असत.

टोकन नंबर बारा..श्री.सोमाजी गोमाजी कापसे यांचा सुटत आहे गाडा.

खेड तालुक्याचे प्रगतशिल शेतकरी...डेहणे गावचे सरपंच/पाटील/चेअरमन इत्यादी इत्यादी 

श्री सोमाजी गोमाजी कापसेssss  फार नामांकित बारी आहे बरं का मंडळी ! पहाल तर हसाल नाही तर फसाल. 

निशान.पडताच भिर्ररररस्स्स्स्स्स

आराराराराssssssझाssssलीस्स्स्सस्स्स

नुसतं.भुंगाटन. सेकंद..बाssरा असे पुकारताच घाटातुन लोक गाड्याच्या पठीमागे पळायचे. काही उत्साही लोक क्षणार्धात बैलांना पकडुन आणायचे. 

काही बैलगाडे घाट संपल्यावर सुद्धा कितीतरी वेळ पळतच राह्यचे. त्याच्या मागे गाडामालका बरोबर आलेले कार्यकर्ते बैलांना पकडण्यासाठी धावाधाव करायचे. काही बैल एवढे हुशार की निशान पडताच किंवा घाट संपताच थांबायचे.

काही गाडी नुसतीच पळायचे, कधीकधी मोठे अपघात व्हायचे. त्यामध्ये बैल दगावले जायचे. 

कमी सेकंद मध्ये आलेल्या बैलांची सनई, डफडे व ताशाच्या गजरात..भंडार उधळत मिरवणूक वाजत गाजत निघायची. 

त्यासाठी पांढरी शुभ्र कडक इस्त्रीचे कपडे घातलेले नारायण व वसंत गायकवाड आणि इतर वाजंत्री मंडळी आपापले डफडे घेऊन तयार असायचे. म्हातारे, कोतारे, अबाल, वृध्द देहभान विसरून नाचायचे.

काय आनंद होता तो?. असा आनंद आता होणे नाही.एखाद्या वयोवृद्ध माणसाला जरी लाख रुपये मिळाले. तरी तो इतका कधी नाचू शकत नाही.

👉🏻 हेही वाचा ट्रॅक्टर पूर्वीचे दिवस. बैलजोडी आणि बैलगाडी

अनेक बैलगाडा मालकांकडे घोड्या होत्या. या घोड्या बैलगाड्याच्या पुढे थोड्या अंतरावर उभी केलेली असे. त्यावर  घोडेस्वार बसलेला असे. निशान पडताच ही घोडी वायूवेगाने घाटातून पळत असे. त्यामागे बैलगाडा आसे. हे दृश्य अतिशय जबरदस्त असे. श्वास रोखुन लोक स्पर्था पहात. घोडेस्वरांचे अतिशय कौतुक वाटायचे. 

सुत्रसंचालक, बैलगाडा शर्यती पहायला आलेल्या मान्यवरांचे स्वागत करायला असायचा. 

श्री.अमुक तमुक यांचे घाटात अगमन झालेले आहे. त्यांचे यात्रा कमिटीच्या वतीने हर्दिक स्वागत. यात्रा कमिटीने आपले स्वागत केल्याचे ऐकल्यावर एखाद्या साधारण माणसाचा उर इंचभर वाढे. तो घरी गेल्यावर पाच पंचवीस लोकांना माझा यात्रा कमेटीने स्वागत केले असे गावभर सांगत सुटे, 

बारा वाजे पासून ते संध्याकाळी सुर्य मावळेपर्यंत बैलगाडयांच्या शर्यती चालू असायच्या. संध्याकाळी इनाम वाटप केले जाई. 

त्या काळातले प्रसिद्ध गाडा मालक 

पश्चिम भागात अनेक नामांकित गाडे होते. त्यापैकी कै.नानासाहेब भिकाजी कशाळे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा सरपंच  डेहणे कै.सखाराम सावंत, गणपत गिरजू कशाळे, कै.चिमण श्रीपत कोरडे, नावजी कृष्णा वनघरे, श्री सितारामशेठ कोरडे (मा.सरपच) सर्व डेहणे, 

पांडू बांगर, भागू बांगर, मारूती भोपळे, आंबेकर, किसन रंगाजी भालेराव एकलहरे,

श्री.धोंडीभाऊ म्हतारबा दरेकर श्री.रामभाऊ सिताराम खामकर, कै.दगडू उमाजी खामकर, दगडू भिवाजी वाघमारे गाव शेंदुर्ली. 

धोंडू लक्ष्मण शिंदे, विठ्ठल सोळशे गाव वाजळे 

जिजाबा आप्पा पोखरकर, किसन धोंडिबा पोखरकर, राघू हरि पोखरकर, सखाराम भिकाजी गाडेकर- गाव वाळद

कै.बाजीराव मोरे, श्री.ज्ञानदेव काशिनाथ सुरकुले, श्री पुनाजी भागुजी सुपे श्री.शिवराम धोंडिबा पावडे, नथू गणा हुंडारे, दत्तात्रय वाडेकर, भिकाजी हुंडारे, पारूशेठ हुंडारे, बाबुराव माळी, काशिनाथ माळी, प्रकाश नागू साबळे, राम नाईकडे, नानाभाऊ माळी, बबुशा पावडे, विठोबा रामा पावडे सर्व वाडा व वाड्याचा दरा. 

गजाबा गिलबीले, कोयाळी 

गंगाराम कडलक तिफनवाडी 

संभाजी रोकडे, कै.सहादू भागू वर्ये, कमा भिमा कोकणे चौधरी गाव साकुर्डी 

राघू बाळा चिमटे गाव वाशेरे.

धारू कृष्णा गवारी (गुरूजी) गोरेगाव.

नामदेव धोंडू मडके, नारायण दुलाजी भवारी गाव धामणगाव बु!! 

नथू बुरसे - बुरसेवाडी इत्यादी बा-या नामांकित होत्या.

अलाउन्सर 

जसे गावागावातून बैलगाडा मालक होते तसेच बैलगागाडा शर्यतींचे अलांउसर (सुत्रसंचालन) करणारे सुद्धा फार प्रसिद्ध होते. 

मनोहर दत्तू कोरडे (पोष्टमन) डेहणे 

दामू लांडगे गाव वाळद 

कै.कोळेकर (कोये,कुरकुंडी) 

यांच्या नावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. कोळेकर यांचा आवाज व बैलगाड्यांच्या चकारींचा आवाज एकमेकाशी एकरूप होत असे. त्यामुळे एक वेगळाच नाद असमंत दणानुन सोडे. हा आवाज ऐकताना मन थरारून जाई. अजुनही हा आवाज कित्येकांच्या कानात जसाच्या तसा असेल. 

एक जुनी हृदयस्पर्शी आठवण 

विशेषतः विठोबा रामा पावडे यांचा गाडा घाटातुन पळताना लोक झालीssss विठू रामाची बारी असे सगळे ओरडायचे. 

त्यावेळी वाडा गावचे कै.सभाजी रावजी पावडे यांना घाटातील गाडे जुंपन्याचा भलताच शौक होता.

गाडा जुंपल्यावर लगेचच त्यांच्या अंगावरून गाडा गेल्याने त्यांना १९७१ साली प्राण गमवावा लागला होता. त्यांचे स्मारक जुन्या वाड्यात बांधले होते. त्यानंतर त्यांचा मुलगा बबुशा संभाजी पावडे यांनीसुद्धा बैलगाडा सुरू ठेवला.

बैलगाड्या पुढे पळणाऱ्या घोड्या 

लोकांना जसे बैलगाड्या विषयी आकर्षण होते तसेच बैलगाडयांच्या पुढे पळणा-या घोड्यांबद्दलही होते. 

कै. बाजीराव मोरे यांच्याकडे एक पांढरी शुभ्र घोडी होती. त्या घोडीवर शक्यतो कोण बसत नसत. ही घोडी बैलगाड्या पुढे पळत असे. व अधून मधून मागे पाहत असे.  

बैलातील व स्वतःमधील अंतर वाढल्यावर ती घोडी आपला वेग कमी करून मागे पाहून पुढे पळत असे.

शेंदुर्ली गावचे तानाजी दरेकर हे त्यावेळी आठवी नववीला असतील तेव्हा ते घोडीवर बसायचे. आणि ही घोडी गाड्याच्या पुढे पळायची. घोडी पुढे पळताना गोडी आणि बैला मधील अंतर कमी झाल्यावर लोक श्वास रोखून पाहू लागायचे.अंग थरारून जायचे. निशान पडतात लोक मोठमोठ्याने ओरडायचे.

बैलगाड्यासाठी साधारण चार बैल लागतात. ठराविक प्रसिद्ध गाडा मालक सोडले तर सर्वच शेतकऱ्यांकडे चार बैल काही नसायचे. त्यासाठी मग याचा एक, त्याचे दोन, दुसऱ्याचा एक, स्वतःचे दोन असे करून वैलगाडे पळवले जात व आपली हौस भागवून घेतली जाई.

बैल घाटामध्ये अशा गाडा मालकाचे नुसते नाव पुकारली तरी त्या शेतकऱ्याच्या अंगात मुठभर मांस वाढलेले असे. इतका आनंद त्याला होत असे की विचारू नका. आणि गाडा नंबर जर आला तर तर बोलायचेच काम नाही. एकच गाडा चार जणांच्या नावावर पळवला जाई. परंतु ती एक हौस होती. नशा होती, धुंदी होती, आनंद होता, मजा होती.

वैलगाडे बनवणारे स्पेशालिस्ट कारागीर.

सुरुवातीला बैलगाड्याची चाके खूप जड आणि मोठी असत. या बैलगाड्यांमध्ये पुढे अनेक बदल झाले. हलक्या क्वालिटीचे आणि कमी वजनाचे गाडे अस्तित्वात आले.

अनेक जण गाड्यांना घुंगरे, मोराची पिसे, वेगवेगळ्या रंग संगतीमध्ये ऑइलपेंटने  सजवलेले गाडे खूपच उठावदार दिसत. शेतकऱ्यांची काही मुले हे गाडे घाटाकडे नेत असताना त्यांचे खूप अप्रूप वाटे.

जुन्या वाड्यामध्ये ताजने सुतार यांच्याकडे हे गाडे बनवले जात असत. किंवा स्थानिक सुतार देखील बनवून देत.

अनेकांकडे घोड्या होत्या. शेतक-यांनी त्यांच्या बैलावर प्रचंड प्रेम केले, जीव लावला. कित्येकांनी बैलांच्या दशक्रिया केल्या. बैलांचे पोटच्या मुलासारखे लाड केले. हे कुनीही नाकारू शकणार नाही. 

या बैलगाडा शर्यती हा ग्रामीण भागाच्या यात्रेमधील करमणुकीचा एक अविभाज्य घटक आहेत. विरंगुळ्याचे महत्त्वाचे साधन आहे. या बैलगाडा शर्यतीवर खेडेगावची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. अनेकांचे संसार त्यावर अवलंबून आहे. 

बैलगाड्याशिवाय यात्रा म्हणजे बीनमिठाचा स्वयंपाक असेच म्हणावे लागेल.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...