नविन शाळेवर रूजू होताना...


नवीन शाळेवर रुजू होताना... अनिल तळपे सर यांचा लेख 

काळाचौकी :- आटपाडी गाडीने विभुतवाडीत सकाळी ५:१५ ला कंडक्टरने बेल वाजवली चला विभुतवाडी अर्धवट झोपेतून जागे होऊन मी आणि माझा गावाकडचा मित्र वसंत आम्ही एक पिशवी व एक भांड्यांनी आणि आंथरून पांघरूनांनी भरलेलं पोतं घेऊन गाडीतून खाली उतरलो कंडक्टरने पुन्हा बेल वाजवली आणि गाडी आटपाडी च्या दिशेने निघून गेली.

आम्ही तसेच आंधारात रस्त्यावर उभे होतो.आम्ही इकडे तिकडे पाहत होतो,जवळ जवळ ८०% गाव झोपलेले होते.मध्येच कुणाचा तरी खाकरण्याचा आवाज येत होता. कुत्री  भुंकत होती.खूप भीती वाटत होती.कारण भाग नवीनच होता.आम्ही शाळा शोधत होतो.तेव्हढयात तिथे हातात डबडे घेऊन एक म्हातारा आम्हाला दिसला.त्याला विचारले शाळा कुठेय त्याने समोर हाथ केला,आणि रस्त्याच्या पलीकडे आहे हातानेच सांगितले.मग वसंतच्या डोक्यावर पोते माझ्या हातात पिशवी घेऊन आम्ही शाळेजवळ पोहचलो. आणि उजेड यायची वाट पाहू लागलो.

दुसऱ्या दिवशी शनिवार होता शाळा सकाळचीच होती. सात साडेसात वाजता अपर्णा बसागरे मॅडम शाळेत आल्या व त्यांनी आमची विचारपूस केली. त्या स्वभावाने जरा कडकच होत्या. आमच्याकडेच पोते पाहून त्या जरा रागातच म्हणाल्या कोण आहेत तुम्ही? आणि इथे काय घेऊन आलात? ते पहिलं उचला आत्ता इथे शाळा भरणार आहे. मग त्यांना मी सांगितले की मी गुळेवाडीला नवीन शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आलो आहे. थोड्या वेळाने आम्ही गुळेवाडीला जाणार आहोत.

हे ऐकुन मॅडम ला जरा आपण बोलल्याचा पश्चाताप्त झाला. आणि हासून म्हणाल्या सॉरी हं थांबा तुमच्या पिशव्या आणि पोते एका वर्गात ठेवा.गुळेवाडीचे शिक्षक श्री.ज्योतिराम सोळसे सर आता येतीलच.त्यांना थांबवण्यासाठी एका मुलाला बाईंनी रस्त्यावर पाठवले.

थोड्याच वेळात सोळसे सर त्यांच्या हिरो होंडा CD 100 गाडीवर आले .बसागरे बाईंनी त्यांना आमची ओळख करून दिली.त्यांना देखील खूप आनंद झाला.कारण सहा महिने ते एकटेच शाळेत होते.आणि नवीन जोडीदार आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. 

मग आम्ही त्यांच्या गाडीवर बसून गुळेवाडीला गेलो .शाळेच्या दोन वर्ग खोल्या होत्या. पट संख्या 40 च्या आसपास होती. शाळा मोकळ्या माळावर होती.शाळेत रुजू झालो.सरांनी शाळेची जरा माहिती सांगितली.11:30 ला शाळा सुटली 

मग आम्ही पुन्हा विभुतवाडीत आलो.तिथे आम्हाला शेळके सर (मेजर) ,भाबड सर भेटले दोघेही विभूतवाडीत राहत होते. Solase सरांनी त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि त्यांना माझ्यासाठी विभुतवाडीत रूम शोधा असे सांगितले व संध्याकाळी जेवायला झऱ्याला या असे सांगून ते निघून गेले.

मग आम्ही दोघे विभुतवाडीच्या शाळेत गेलो जिथे साहित्य ठेवले होते त्या खोलीची चावी घेतली. हॉटेल मध्ये नाष्टा करून रूम शोधायला गावात गेलो पण मनासारखी एकही रूम पसंत पडेना दुपारी शेळके सर आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला एक रूम पाहण्यासाठी घेऊन गेले, ती रुम पाहून मला तर घामच फुटला ती एका गोठ्यासारखी रूम होती,तिथे एक म्हातारी एकटीच राहत होती.तिची तिथे खूप एकावर एक रचून ठेवलेली मडकी होती. अंघोळीला बाथरूम नव्हते.आंघोळीची जागा बाहेर मोकळ्या जागेत होती.हे पाहून मला खूप वैताग आलेला होता.

मनातून आसं वाटत होतं की आहे आसं पुन्हा घर गाठावं नको ती नोकरी कुठं इथं येऊन पडलोय आसं वाटत होत.

शेवटी सायंकाळी ५ वाजता आम्ही चालत चालत झऱ्याकडे निघालो. झऱ्याला पोहचल्या नंतर झरे जरा चांगले गाव वाटले.इकडे तिकडे फिरल्या नंतर आम्ही कारगिल धाब्याजवळ एक आर्धावट कंपाऊंड होत त्यावर जाऊन आडवा पडलो आभाळाकडे पाहिले, आणि क्षणभर गावाकडे आसल्याचा भास झाला.

आणि ठरवलं की आता बास्स नोकरी सोडून गावाला जायचं आणि काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा.पण इकडे थांबायचे नाही 

तिथून आम्ही झरे स्टँड वर आलो.पिंटू राजमाने यांचे s.t.d. बूथ होतं. तिथून घरी फोन लावला आणि मुद्दाम सांगितले की हा भाग खूपच थर्डक्लास आहे.इथे रूम मिळत नाही दुकाने नाहीत कसलीही सुविधा नाही. मी घरी येऊन काहीतरी उद्योग व्यवसाय करतो,पण इकडे राहणार नाही मी उद्या गावाकडे निघणार आहे.

हे ऐकुन आमचा मोठा भाऊ (दादा) त्याला थोडं टेंशन आले. तो मला म्हणाला आरे तू  शिक्षक झाला आहेस ,तर तू एक काम कर, आत्ता लगेच येऊ नको, तू एक महिनाभर तिकडेच थांब शिक्षकाची नोकरी कशी आसते फक्त अनुभव घे आणि नाही आवडलं तर मला न विचारता घरी निघून ये.फक्त महिनाभर थांब. हे ऐकुन मला आनंद झाला.

 मग मी ठरवलं फक्त महिनाभरच रहायचय महिना आसा निघून जाईल आणि मग थेट गावाला निघून जाईन पण इथे राहण्याची इच्छा नव्हती.

मग आम्ही सोळसे सरांच्या घरी गेलो नुकताच त्यांचा मुलगा धीरु चा जन्म झालेला होता १० ते १५ दिवसांचा आसेल.तिथे आम्ही जेवण केले. सरांच्या सासूबाई तिथे आल्या होत्या.त्या म्हणायच्या की एवढा लहान आणि  मास्तर कसा झाला. त्या वेळी माझे वय २० वर्ष होत आणि तब्ब्येतही किरकोळच होती. जेवण झाल्यानंतर आम्ही चौकात गेलो जरा फिरलो सरांना सांगितले की विभुतवाडीत करामत नाही झऱ्याला रूम बघा त्यांनी हो म्हटलं आणि सरांचा निरोप घेऊन आम्ही झोपायला पुन्हा विभूतवाडीला आलो.

विभूत वाडीत गेल्यानंतर तिथे विभूतवाडीची आमच्या वयाची मुले आमच्याकडे बसायला आली,गप्पा गोष्टी झाल्या मग ती निघून गेली  

दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्ही हात पाय धुऊन पुन्हा झऱ्याला गेलो सोळसे सरकडे जेवण करून रूम पाहण्यासाठी गेलो. त्यांनी आम्हाला आमोल कारंडेची रूम (आताच्या प्रथमेश मेडिकलच्या शेजारी) समोर राजू न्हावी यांचे केशकर्टणालय चे दुकान होते. तर ती रूम जरा चांगली वाटली, तिथे पत्त्यांचा डाव चाललेला होता.रूम बद्दल विचारल्यावर अमोल तोंडातील गुटका थुंकून म्हणाला की रूम मिळेल पण एका आटीवर मास्तर शाळेत जरी गेले तरी  रुमची चावी आमच्याकडे राहील कारण दुपारच्या वेळेस तिथे पत्त्यांचा डाव चालायचा. मी देखील तयार झालो कारण आंथारून पांघरूण व पुस्तके सोडून माझ्याकडे काहीच नव्हते.

अशा तऱ्हेने रूमचा प्रश्न सुटला दुपारी आम्ही विभुतवाडीला जाऊन आमचे साहित्य आणले, खोली स्वच्छ करून साहित्य खोलीत ठेवले. मनातील ओझ कमी झाल्यासारखं वाटलं मग आम्ही पुन्हा कारगिल ढाब्याच्या कट्ट्यावर गेलो तिथे जरा बसलो  अंधार पडल्यावर आम्ही रूमवर आलो.वसंत नी स्वयंपाक केला.व कसा करायचा ते शिकवलं  मग आम्ही जेवण केले.चौकातून फिरून आलो आणि झोपून गेलो.

सकाळी वसंत लवकरच उठून अंघोळ करून तयार होता.मी म्हटले आरे एवढ्या लवकर कशाला उठलाय.तो म्हणाला आसेच मग मी उठलो अंघोळ केली,तो म्हणाला चल आपण चौकात चहा घेऊन येऊ.चहा घेतल्यानंतर आम्ही चौकात थांबलो तेवढ्यात ८:१५ ची सांगोला सातारा गाडी आली आणि वसंत पटकन गाडीत जाऊन बसला क्षणभर मला कळलेच नाही, कंडक्टर ने बेल वाजवली गाडी निघून गेली.मी गाडीकडे पाहताच राहिलो .खूप रडायला आले .मनातल्या मनात रडत तसाच रूमवर आलो. मला करामत नव्हते दुपारच्या गाडीने पुन्हा निघून जायचे आसा विचार मनात आला. तेव्हढ्यात सोळसे सर आले आणि म्हणाले सर चला शाळेत जाण्याची वेळ झाली.

मग मी सावध होऊन शाळेत जाण्यासाठी निघालो. त्यांच्या बरोबर शाळेत गेलो.परंतु माझे शाळेत लक्ष च लागत नव्हते.

शाळा सुटल्यावर संध्याकाळी रूमवर आलो आगदी  नर्व्हस होऊन बसलो होतो. तेवढ्यात रूम मालक अामोल कारंडे तिथे आला.थोडा वेळ गप्पा झाल्या त्याने गावाची भागाची माहिती सांगितली.थोडा वेळ थांबून तो निघून गेला.मग मी स्वयंपाकाची तयारी केली जेवण केले. थोड्यावेळाने पत्ते खेळणारी गॅंग आली. मी जरा चौकातून जाऊन आलो, व आल्यानंतर झोपून गेलो. पत्त्यांचा डाव रात्री दोन वाजेपर्यंत चालू होता.

असेच दिवस जात होते, मला फक्त एक महिनाच राहायचे होते त्यामुळे मी हे सर्व सहन करत होतो.

असेच एका रविवारी तेथील माझ्या वयाची मुले माझ्याकडे आली.आणि बसली त्यामध्ये विनोद वाघमारे, सुग्रीव कारंडे सागर कारंडे, मप्या, नागेश तांबोळी, संदीप, बापू हे होते. ते म्हणाले मास्तर मी त्यांच्याच वयाचा आसाल्यामुळे ते मला मास्तरच म्हणायचे एकजण म्हणाला की मास्तर तुम्हाला पोहायला येतं का? मी हो म्हटलं मग बिनु म्हणाला की चला आपण पोहायला जाऊ.मी तयार झालो.

ज.ने. वि च्या मागे एक विहीर होती.तिथे आम्ही जाऊन जवळ जवळ दोन तास पोहायलो. मग घरी आलो पोहून पोहून डोळे लाल झाले होते.

पण ओळखीही तश्याच छान झाल्या होत्या.नवीन मित्र मिळाले होते.आणि करमुन सुद्धा गेले.होते. मला काही कमी पडले की ही गॅंग मदतीला तयारच आसायाची.

मग आम्ही रविवारी दिवसभर महेंद्रच्या दुकानासमोर गोटया खेळायचो, मला पाहिल्यावर कुणाला वाटायचेच नाही की हे मास्तर आसेल म्हणून.

त्या वेळी नुकताच झऱ्यात पिंजरा चित्रपट पडद्यावर दाखवला होता,आणि मी तो चित्रपट पाहिला नव्हता, एक जण मला म्हणाला की तुम्ही पिंजऱ्यातील मास्तर नाहीत ना ? मी म्हणालो नाही.नंतर मी चित्रपट पाहिल्यानंतर मला त्या वाक्याची हसायला आली.😅😅

असं करता करता महिना संपत आला.घराची ओढ वाटायला लागली.मी दोन चार दिवसांनी गावी जाणार होतो.मी मित्रांना सांगितले की मी दोन चार दिवसांनी गावी जाणार आहे,पुन्हा येईल म्हणून सांगता येत नाही.यावर मित्रमंडळी खूप नाराज झाले.

ते म्हणाले की तुम्ही गावी जा पण परत या. बिनु तर मला म्हणाला की मी तुम्हाला आमच्या जागेत घर बांधून देतो.पण तुम्ही नोकरी सोडून जाऊ नका.त्या वेळी बिनु मिस्तरी काम करायचा मी म्हणालो ठीक आहे मी पुन्हा येईल.

मग मी गावी गेलो.घरातील सगळ्यांना वाटले की आता हा परत जाणार नाही.परंतु मी पुन्हा दोन दिवसांत झऱ्याला जायला निघालो घरातील सर्वांना आनंद झाला. 

नंतर अनिल काळेल,(विभूतवाडी),शशिकांत खाडे (झरे), रामदास देशमुख (मानेवाडी),विशाल पाटील (कुरुंदवाडी), प्रभाकर कटकदौंड (गुळेवाडी),सतीश सावळे (विभुतवाडी) हे नवे शिक्षक मित्र माझ्या रूम मध्ये पार्टनर म्हणून मिळाले.

लेखक :- अनिल तळपे अध्यक्ष खेड तालुका शिक्षक समिती 



शाळेचे रम्य दिवस


शाळेचे रम्य दिवस 

शिवाजी विद्यालय डेहणे येथे मी जेव्हा पाचवीला प्रवेश घेतला तेव्हा कै.आर.जे.पाटील सर मुख्याध्यापक होते. पाटील सर अतिशय कडक शिस्तीचे होते.कर्वे सर वर्गशिक्षक होते.तांबोळी सर,वरकुटे सर,फणसे सर,विधाटे सर,कोंढाळकर सर,जोशी मँडम,व्यवहारे सर,सवणे सर,फापाळे सर तर वरच्या वर्गासाठी गाडीलकर सर,महामुनी सर,दातीर सर,नढे सर,असे अनेकजण होते.

मी  ७ जुनला पाचवीत गेलो तेव्हा प्राथमिक आरोग्य केंन्द डेहणेच्या जरा अलिकडे दक्षिणेस असलेल्या कै.बाबुराव कौदरे यांच्या इमारतीमध्ये डावीकडून पहिल्या खोलीत भरत असे.

त्याशेजारी सहावीचा वर्ग व त्या शेजारी सातवीचा वर्ग होता.तर प्राथमिक आरोग्य केंद्र डेहणे च्या शेजारी पश्चिमेस डावीकडे नविन दगडी इमारतीमध्ये आठवी,नववी व त्या शेजारी दहावीचा वर्ग होता.ही इमारत मला खुपच आवडायची.खुप मोठे वर्ग,वर्गात लाकडी बेंच ,मोठमोठया  खिडक्या त्या मधून येणारा उजेड व बाहेर सुंदर व्हरांडा,समोर मोठे ग्राउंड होते.शाळा सकाळी.११.००वा.भरायची.

पांढरा शर्ट,खाकी चड्डी व डोक्यावर पांढरी गांधी टोपी व इनशर्टअसा गणवेश होता.ठरावीक वरच्या वर्गातील दहावीचे विद्यार्थी फुलपँट घालत.बाकी सर्वजन चड्डीच घालत.

मुलींना निळा स्कर्ट किंवा निळा परकर,पांढरा शर्ट (ब्लाउज) दोन वेण्या आणि लाल रिबन असा गणवेश होता.बुधवारी रंगीत कपडे घालायला परवानगी होती.परंतू रंगीत कपडे होतीच कोणाकडे?

दहावी पर्यंत कुणाच्याही पायात चपला किंवा बुट नसायचे. आणवानीच शाळेत यायचे.मी तरआकरावीला काँलेजला पहिल्या दिवशी आनवानीच गेलो.मधल्या सुट्टीत पहातो तर सगळ्यांच्या पायात चपला व बुट..मलाच मग कसेतरी वाटू लागले.आणी मग काँलेजवरून होस्टेलवर जाताना राजगुरूनगरच्या मशीदीजवळील पुलावर नऊ रूपायाची चप्पल घेतली.काँलेजला चप्पल घालून जातात हे माझ्या गावीही नव्हते.

याच शाळेच्या समोर असलेल्या  ग्राउंडवर प्रार्थना व्हायची.वर्ग निहाय एका ओळीत एका हाताच्या अंतरावर मुले प्रार्थनेला उभी राहत असत.लाईन थोडी जरी वाकडी असली तर सर मागुन काठीचे फटके मारत.समोर शाळेच्या व्हरांड्यावर सर्व शिक्षक एका ओळीत उभे राहत.

मी शाळेत गेलो तेव्हा "खरा तो एकची धर्म" ही साने गुरूंजींची प्रार्थना होती.त्याही आधी "सुंदर जीवन आता मी जगनार", ही प्रार्थना होती.मी ती ऐकलेली आहे.व ती कानांना खुपच गोड वाटायची.प्रार्थना झाल्यावर राष्ट्रगीत व्हायचे.एक साथ विश्राम झाल्यावर काही महत्त्वाची माहीती सांगीतली जाई.नंतर ओळीत आपापल्या वर्गात जायचे असा रिवाज होता.

पाचवीचा वर्ग हा अतिशय छोटा व खिडक्या नसलेला वर्ग होता.बेंच वगैरे काही मिजास नव्हती.खालीच ओळीने मांडी घालून बसावे लागे.डाव्या बाजूला मुली तर उजव्या बाजूला मुले बसायची.

तेव्हा दप्तर म्हणजे काय तर घरात जी रिकामी पिशवी असेल त्यामध्ये वह्या व पुस्तके ठेवायची व तीच पिशवी घेऊन शाळेत यायचे.त्यामध्चेच दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी रूमालात भाकरी व लसणाची,सुकटीची किंवा बोंबील,वाकट इत्यादी चटणी असे.पावसाळ्यात वर्गातच भाकरी खाल्या जात तर उन्हाळ्यात झाडाखाली बसुन भाकरी खात.

कधीतरी रूपाया दोन रूपये असतील तर आब्बासशेठच्या जनसेवा हाँटेलात ४० पैशात मिसळची नुसतीच तर्री विकत घेऊन त्याबरोबर भाकरी खायची परंतू हे लाड कधीतरी दोन तीन महिन्यांनी असत.

गरिब विद्यार्थ्यांना शाळेतुन जुन्या पुस्तकांचे वाटप केले जाई.एका आठवड्यात एक वर्गा असे वाटपाचे स्वरूप होते.पुस्तकांचे आज आता लगेच वाटप करण्यात येणार आहे.असे पांडू शिपायाने आणलेल्या रजिस्टरमध्ये लिहिलेली सुचना सरांनी वाचून दाखवल्यावर मुले पुस्तके घेण्यासाठी शाळेच्या आँफिसकडे धाव घेत,जुनीच पुस्तके मिळाल्यावर जो आनंद होई तो आता कधीच होणे नाही,वार्षिक परिक्षा संपल्यावर रिझल्ट घेण्याच्या दिवशी ही पुस्तके परत शाळेत जमा करावी लागत..नंतरच रिझल्टचे कार्ड दिले जाई.वह्या मात्र विकत घ्याव्या लागत.आठवी पर्यंत छोट्याच वह्या वापरल्या जात..त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असत.
कधीतरी कंपास घेतली जाई.
छोटी रंगपेटी असे.ती उघडल्यावर छोट्या छोट्या चौकोनी घरांत अनेक रंग असत.स्केचपेन नंतर आले.खडुंचे रंग होतेच.
पावसाळ्यात मुलांची अत्यंत वाईट परीस्थीती असे.अनेक मुले डोंगर द-यांतुन पावसापाण्यातुन विद्यार्जनासाठी शाळेत येत.परंतु येताना प्रचंड पाऊस,दुथडी भरून वाहणारे ओढे नाले,खडीचा रस्ता या दिव्यातुन जा ये करावी लागे.सर्वांचे कपडे पावसाच्या सटका-याने भिजून जात.शाळेत पण जमिनीला ओल आलेली असे.त्यावरच पोते टाकून बसावे लागे.शाळा सुटल्यावर घरी जाताना प्रचंड हवा व पाऊसाचा सटकारा असे.छत्री उघडून जात असता वारा छत्री मागे लोटायचा.त्यामुळे पुढे जाताना पाचवी,सहावीच्या छोट्या जीवाला प्रचंड कष्ट पडे.नाईलाजाने छत्री बंद करून पावसातच झपझप चालावे लागे.

जून महिन्यातील पाऊस

पुर्वी अनेक ठिकाणी ओढ्यावर पुल असत.त्याआधी तेही नव्हते.खुप पाऊस असल्यावर शाळेत जाता येत नसे.अनेक विद्यार्थ्यांना छत्री विकत घेणे शक्य नसे,ते प्लँस्टीक कागद डोक्यावर घेऊन येत.परंतू या कागदाच्या एखाद्या शिडातुन वारा आत शिरे.व मोठा फडफड आवाज होई.कधी हा वारा कागद किंवा छत्री   त्याच्याबरोबर दुर घेऊन जाई.कागद किंवा छत्री पकडताना विद्यार्थ्यांची केविलवानी धडपड सुरू होई.या पकडापकडीत दप्तर व तो सर्व भिजून  चिंब झालेला असे.

सप्टेंबर महिन्यात ४० मार्काची पहीली व दुसरी घटक चाचणी असे.प्रश्नपत्रीका ही हस्तलेखन केलेली  झेराँक्स काँपी असे.उत्तर पत्रीका ही फुलस्केप  चारपाच कागद एकत्र टाचून तयार केलेली असे.उत्तर पत्रीकेवर वरच्या अर्ध्या कागदावर छापील मजकुर असे.त्यावार "अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे", हा सुविचार त्याखाली आदिवासी शिक्षण संस्था संचलित "शिवाजी विद्यालय डेहणे"ता.खेड,जि.पुणे.त्याखाली विद्यार्थ्यांचे नांव वर्ग परिक्षा  नंबर व तुकडी असे  व उजव्या बाजुला प्रज्वलीत दिव्याचे चित्र असे....उत्तर पत्रीका लिहिताना पुरली नाही तर जादा पुरवणीचा ताव मिळे.काही हुशार विद्यार्थी दोन,तीन पुरवन्या जोडत...ह्या पुरवन्या मुख्य उत्तरपत्रीकेला दो-याने बांधत,.घटक चाचणी तीन दिवस असायची.

शाळेत असताना..चौथ्या किंवा पाचव्या तासाला पांडू सांगडे शिपाई रजिस्टर घेऊन वर्गात दाखल होई.रजिस्टरमध्ये काय लिहिलं असेल याची उत्सुकता तानली जाई.सर वाचुन दाखवत.... आज  ३१ तारीख आसल्यामुळे महिना अखेर आहे.त्यामुळे आज दुपार नंतर शाळेला सुट्टी राहील...किंवा अमुक..तमुक कारणामुळे उद्या शाळेला सुट्टी राहील..हे ऐकुण आम्हा विद्यार्थ्यांना जो आनंद होई..तितका आनंद अजुन तरी झाला नाही...

दिवाळीच्या आधी प्रथम सत्र परिक्षा असे.उत्तर पत्रीका एका छोट्या चोपडी सारखी असे.प्रश्नपत्रीका मात्र छापील असे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुसरी घटक चाचणी व एप्रिल महिन्यात वार्षिक परिक्षा असे.

तांबोळी सर,चिखले सर यांच्या काळात खेळ व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.श्री.बबनराव गोपाळे - कब्बडी श्री.रोहिदास आंबेकर - खोखो. श्री.अरूण कोरडे- कब्बडी श्री.तुकाराम कोरडे - वक्तृत्व या बाबतीत शिवाजी विद्यालय महाराष्ट्र भर पोहचवले.त्यामुळे शाळेचे नाव गाजू लागले.त्यामुळे निश्चितच शाळेकडुन व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा वाढल्या.शाळेचा दहावीचा रिझल्ट शतपटीने वाढला.

आम्ही सहावीत गेलो तेव्हा आम्हांला बसायला बेंच मिळाले.जमीनीवरून बेंचवर बसायला मिळणे हा एक वेगळाच आनंद होता.

शाळेमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम असत.तर कधी व्याख्यानाचे कार्यक्रम असत.दहावीच्या मुलांसाठी नाईटस्टडी असे.त्यामुळे रात्री शाळेतच अभ्यास करून झोपावे.आम्ही नाईटस्टडीला असताना रात्री कुणाचाना कुणाचा हरभरा उपटून हुळा करायचो.

दवाखान्या जवळील मोठ्या शाळेच्या उजवीकडे जो मोठा दगडी स्टेज होता त्यासाठीचे दगड आम्ही नायफडच्या बंधा-याजवळून आणले होते.तर नदीमधून वाळू देखील आणलेली होती.

तांबोळी सर,वरकुटे सर,व्यवहारे सर सुट्टीच्या दिवशी सुद्धा जादा तास घेऊन ज्ञानार्जनाचे काम करायचे.

श्री.तुकाराम भोकटे गुरूजीच्या घराजवळ "हसन सायकल मार्ट" दुकान होते.तेथे रूपाया तास या प्रमाणे मुले दुपारच्या सुट्टीत सायकल चालवून आनंद घेत असत.

हिवाळ्यात खुप थंडी असल्यावर शनिवारी शाळा जवळच, उन्हात भरे..व साडेनऊला सुट्टी व्हायची.आठवी ते दहावीचे वर्ग पाच तास झाल्यावर आकरा वाजता सुट्टी व्हायची.

त्याकाळात सर खुपच मारायचे.महामुनी सर पोटाच्या बाजुची कातडी जोरात चिमटीत पकडून वर ओढायचे.व भिंतीवर,फळ्यावर डोके आपटायचे..तर अनेक शिक्षक हातावर छड्या द्यचे.तर काही मुस्काटात लावायचे.तरकाही पाठीवर गुद्दे मारायचे.

असाच एक प्रसंग आम्ही दहावीत होतो.जानोबा मंदिराच्या उजवीकडे आसलेल्या इमारतीमध्ये आमचा वर्ग होता.माझा मित्र श्री.सुभाष भोकटे (आता तो विस्तार अधिकारी आहे.) आम्ही दोघे एकाच बेंचवर बसायचो.

आम्हाला मुलींच्या लाईनला सर्वात पाठीमागे असलेल्या रिकाम्या बेंचवर बसवण्यात आले होते.तेथेच आम्ही दररोज बसत असू. मुलांची लाईन वेगळी होती..बोरकर सर गणित विषय (गुणोत्तर-प्रमाण) शिकवत होते,सर्व जण एकाग्र होऊन ऐकत होता.

त्याचवेळी आम्ही मात्र एक वेगळेच नाट्य पहात होते.आमच्या समोर असलेल्या मुलीच्या डोक्यातून एक "ऊ" खाली तीच्या  शर्टवर (ब्लाऊज) येत होती.ती "ऊ " इकडून तिकडे खालीवर जात येत होती.आणि आम्ही मन लाऊन ते पहात होतो.आमचे शिकवण्या कडे लक्षच नव्हते.सरांचे हे लक्षात आले.शिकवुन झाल्यावर त्यांनी आम्हा दोघांना उभे केले.तुम्हाला गणित समजले असेलच हेच गणित फळ्यावर सोडून दाखवा,सर म्हणाले.सरांच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता,

सर तसे फार शांत पण बिघडल्यावर जो काही मार देत. की दुसऱ्या दिवशी उठणे ठीण..हे आम्ही दोघानीही दुसऱ्यांच्या बाबतीत पाहीले होते, मी बाजूला असल्यामुळे माझ्या हातात त्यांनी खडू दिला मी फळ्याजवळ गेलो.फळा स्वच्छ केला तेच गणित मी सोडवायला घेतले.

गणित विषय तसा माझ्या आवडीचा आसल्यामुळे मी एका झटक्यात गणित सोडवले...सर अवाक्क होऊन पाहू लागले.आता याला मारायचे तरी कसे.हा त्यांना प्रश्न पडला.ते म्हणाले तु गणित सोडवले हे खरे आहे परंतू तुमचे दोघांचे मुळीच लक्षनव्हते हेही खरे आहे. ठिक आहे.

आता तु सोडव बरं, गणित असे म्हणून सुभाषला बोलावून घेतले,सुभाषचा गणित विषय सोडला तर सर्व विषयात A+मार्क असत,पण गणित त्याचा शत्रू ..आता काही खरे नाही.मार निश्चितच मिळणार असे म्हणुन खडू हातात घ्यायला व शाळा सुटण्याची बेल व्हायाला एकच वेळ झाली.अशा रितीने मार वाचला..

तर अशा अनेक आठवणी या शाळेविषयी सांगता येतील अशीही शाळा..

रामदास तळपे



मंदोशी गाव


मंदोशी गाव

मंदोशी गाव हे १९९० पर्यत पुर्णपणे दुर्लक्षित असलेले गाव होते.हे गाव  तालुक्यातीलच लोकांना माहित नव्हते.तर बाकीच्यांचे काय घेऊन बसता.

१९९० साली कै.नारायणराव पवार साहेब यांच्या आमदारकीच्या काळात तळेगाव ते तळेघर हा रस्ता मंजूर होऊन लगेचच काम सुरू झाले.गावात पहिल्यांदाच अवाढव्य रस्ता बनवनारा बुलडोझर दाखल झाला.पुर्वी १९७२ च्या दुष्काळात शिरगाव ते तळेघर हा रस्ता मनुष्यबळावर झाला होता.परंतू तो अनेक ठिकाणी नादुरूस्त होता.प्रचंड मोठ्या लोखंडी चेनचा हा बुलडोझर एखाद्या राक्षसासारखा काम करत होता व रस्ता बनवत होता.

शिरगाव,खिंड,शिंबारटाक,मोहनवाडी,घुबाडकपरा,पायर,सोमाना,बोरीचा धस,वरचीमाची,भुमीर,उगलेवाडी फाटा,धायटावना,ना-याचा माळ,मार्गे तळेघर असा जुना मार्ग होता.बोरीचा धस हा मोठा चढ होता.नविन मार्गात बदल केलेला होता.बुलडोझर रस्ता तयार करताना रस्त्यावर येणारी मोठमोठी झाडे एका झटक्यात बाजुला फेकत होता.लोक दररोज काम पहायला जात होते....

संपुर्ण रस्ता सुरूवातीला खडीचा बनवण्यात आला होता.१९९५-९६ ला पहिल्यांदा डांबरीकरण करण्यात आले.

तत्पुर्वी मोहणवाडीच्या पुढे आताचा जो उड्डाणपुल आहे.त्या पुढे ओढ्यावर पुर्व पश्चिम असा छोटा पुल होता.व वर संपुर्ण डबर अंथरलेले होते.पुलाखाली पाणी जाण्यासाठी पाच मोठया सिमेंटच्या नळ्या होत्या. पावसाळ्यात अनेक वेळा महापुर आल्यावर पुलावरून पाणी जायचे.व वहातुक बंद व्हायची.पुर आल्यावर खालच्या पुलावर बसुन अनेकांनी विशिष्ट प्रकारे छत्री उघडुन मासे पकडले आहेत.

या पुलाने १९९० साली प्रचंड पुर आला असताना तत्कालीन शेतकरी कै.नारायण हुरसाळे यांच्या बैलाचा बळी घेतला होता.पुरामध्ये बैल पुरात वाहुन जात असताना या सिमेंटच्या नळीतुन वाहून जात असताना एक नळीतच आडकला व तेथेच गतप्राण झाला.कित्येक महिने त्याचा सांगाडा तसाच नळीत होता.

हाच तो मंदोशीचा सुप्रसिद्ध धबधबा 

हा छोटा पुल होण्याआधी या ओढ्यावर पुर्व पश्चिम असा दगडाचा एक बांध होता.मध्यभागी एक उंच दगडी चीरा होता.यालाच लोक उतार म्हणत असत.या चि-यावरून पाणी गेल्यावर लोक पलीकडे जात -येत नसत.

मोहनवाडीमध्ये आता जे शांताबाई वाघमारे यांचे घर आहे तेथे श्री.लक्ष्मण मोहन यांची गवताची पडाळ होती.व कै.शांताराम वाघमारे यांचे शेतात सन १९८५ मध्ये इलेक्ट्रिक नळ होता. या नळावर इलेक्ट्रिक पंप बसवला होता.बटन दाबल्यावर प्रचंड वेगाने पाणी यायचे.सतत लाइट जाणे व सतत होणारे बिघाड या मुळे कंटाळून  इलैक्ट्रिक मोटार काढून १९९१ मध्ये साधा हापसा बसवन्यात आला.

त्याही पुर्वी जिल्हा लोकल बोर्ड असताना १९५६ मध्ये आता जो मोहनवाडीच्या उड्डाणपुलावरून पुढे गावठ्यावर रस्ता झाला आहे.त्यापुढे बोर्डाची विहीर होती.ऐन उन्हाळ्यात सुद्धा आम्ही दिवसभर त्या विहीरीवर पोहत असायचो.

समोरच एक छोटा दगडाचा गणपती होता.आम्ही बादलीने गणपतीवर पाणी घालायचो.त्यापुढेच दुसरी एक विहीर होती.या विहीरीला चिखाळीची विहीर असे नाव होते.

ही विहीर बोर्डाच्या विहीरीपेक्षा लहान होती.ही विहीर सन १९८१ साली मंजूर होऊन सन १९८२ साली बांधकाम पुर्ण झाले होते. कै.बाबुराव गुंजाळ व कै.बारकू बेलदार यांनी ही विहीर बांधली होती.या विहीरीवर पोहण्यासाठी व कपडे धुण्यासाठी दिवसभर गर्दी असायची.

हुरसाळे वस्ती येथील विहीरही मला वाटते १९८१ च्या आसपासची असावी.ही विहीर स्वतः हुरसाळेवस्तीने स्ववर्गणी,मांडव खणन्या,व पै..पै..जमा करून बांधलेली आहे शिवाय जनावराना पाणी पिण्यासाठी प्रचंड मोठी लोखंडी काठवठ.होती.या वरून पुर्वी लोक कसे एकविचाराने राहत असत हे दिसुन येते.

मंदोशी गावच्या (सर्व वाड्या वस्त्या) माध्यमातुन या उड्डाण पुलाच्या बाजुला वड व नांदरूकीच्या झाडाभोवती पार बांधला होता.याला गोठण म्हणत असत.

या पारावर गावच्या यात्रेच्या मिटिंग होत.व यात्रेनंतर दुस-या दिवशी हजेरीचा कार्यक्रम होत असे.जनावराच्या पायात काटा भरला तर कै.किसन चांभार याच ठिकाणी काटा काढायचा. 

क्रिकेट सुरपारंब्या, तिसका, कब्बडी,विटीदांडू गोटया हे खेळ याच मैदानावर होत..शिवाय याच ठिकाणी गावडोह होता येथे सुद्धा पोहणे व्हायचे.वडाची लाल पिकलेली फळे व नांदरूकीची छोटी गोड फळे खायला मुलांची झुंबड व्हायची.काही मुले नांदरूकिच्या पिकलेली फळे दो-यामधे ओऊन गळ्यात घालत असत व नंतर काही वेळाने खाऊन टाकत.

पुर्वी गावात आंघोळीचा डोह हे ठिकाण खुपच प्रसिद्ध व सर्वांचे आवडते ठिकाण होते.सकाळ पासुन ते संध्याकाळ पर्यंत तेथे कुणीतरी आंघोळी साठी असायचेच.आम्ही दिवसभर पोहण्यासाठी तेथे असायचो.दिवसभरात सहा सात वेळा पोहणे व्हायचे.माणुस गावात जर सापडला नाही तर अंघोळीच्या डोहावर १००% असायचा.अंघोळीच्या डोहावर स्रीया चुकुनही येत नसत.

वर उल्लेख केलेली सर्व ठिकाणे हुरसाळे वाडीची विहीर वगळता आता  काळाच्या पडद्याआड गेली आहेत.आता त्यांची नामो निशानीही शिल्लक राहीलेली नाही.

सन जुन १९९१ रोजी मंदोशी येथे पाचवीचा वर्ग सुरू झाला..आणि अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडली गेली.आज अनेक विद्यार्थी चांगले जीवण जगत आहेत.

गावात पुर्वी १९५५साली जीवण शिक्षण मंदिर मंदोशी शाळा मंजूर झाली तेव्हा जिल्हा लोकल बोर्ड होता.

गावातील पहिले शिक्षक कै.श्री देवजी विरणक हे होते.त्यांना वर्षाला गाव मुले शिकवण्याच्या मोबादल्यात धान्य देत असे.नंतर जिल्हा लोकल बोर्ड बरखास्त होऊन  १९६२ जिल्हा परिषद आली.व गुरूजींना महीन्याला पगार सुरू झाला. त्यामुळे गावाने गुरूजींना धान्य देणे बंद झाले.

त्यानंतर कै दिवाणे.गुरूजी १९६५ ते १९७१  श्री गे.मा तनपुरे गुरूजी १९७१ ते जुलै १९८६ पर्यंत..श्री.रोडे गुरूजी १९७७ श्री.पंढरीनाथ भागीत गुरूजी जुलै १९८६ ते सन २००७ श्री.सुनील हांडे गुरूजी श्री.शिवराम सुपे गुरूजी.कै..मुक्ता मदगे गुरूजी.श्री.संजय नाईकरे गुरूजी,कै.मारूती मोरमारे मुख्याध्यापक श्री.शंकरराव विरणक मुख्याध्यापक श्री.चौधरी,श्री राजू मदगे,श्री कु-हाडे श्री.मनोज केंगले श्री माळी गुरूजी.श्री गवळी केंद्रप्रमुख अशा अनेकांनी विद्यार्थी घडवले.

हुरसाळेवाडी व जावळेवाडी येथे  १९८२ साली शाळा सुरू झाल्या. जावळेवाडी येथे के.पांडुरंग आसवले गुरूजी तर हुरसाळेवाडी येथे श्री.विठ्ठल मोरमारे गुरूजी हे प्रथम शिक्षक लाभले.जावळेवाडी येथे श्री.रामदास तिटकारे गुरूजी श्री.सुनील देवरे.श्री.रविकिरण डोंगरे यांची पहीलीच नियुक्ती जावळेवाडी येथे होती.त्यांच्याच काळात विद्यार्थी ख-या अर्थाने घडले.

पुर्वी मंदोशी गावठाणातील शाळा ही दगड मातीची होती.दरवर्षी शाळेला रंग दिला जाई.प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दहा पैसे वर्गणी काढली जाई.खाली लाल वर पिवळा व मध्ये निळ्या रंगाची पट्टी मारली जाई. गुरूजी फक्त पिवळा मातीचा रंग व पुडीमध्ये निळ पावडर डेहण्यावरून आणत.

लाल रंग आणायला तीसरी चौथीतील मोठी मुले श्री केशव हुरसाळे यांच्या घराच्या बाजूला त्यांच्या शेतातील लाल माती आणत व तीच माती भीजवून कापडाच्या बोळ्याने भिंतीला रंग दिला जाई.मुलींना शेण व पाणी आणुन द्यायचे.त्या खालील जमीन सारवायच्या.शाळा एकदम नवी कोरी दिसे.

१९८१ साली मंदोशी गावात पहिल्यांदा हापसा आला.सन १९८५ साली आंगणवाडी आली.ही आंगणवाडी गावच्या चावडीत भरत असे.नंतर आंगणवाडीला स्वतंत्र इमारत आली. सुरूवातीलाआंगणवाडी सेवीका सौ.सुंदरबाई बांगर तर मदतनीस कै.नर्मदाबाई वाघमारे ह्या होत्या.जावळेवाडीला सुरूवातीला बालवाडी होती.

श्री काळभैरवनाथ मंदिर 

पुर्वी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिर हे साधारण १९४२ साली बांधले.त्याआधी साधे मंदिर होते,आज जे मंदिराचे दगडी जोते आहे ते सन १९४२ सालचे आहे.हे जोत्याचे व दगडी बांधकाम गीरवली येथील कै.काशीनाथ गवंडी याने केले व लाकडी बांधकाम तसेच लाकडी मखर मंदोशी गावचे सुतार कै.सखाराम बारवेकर यांनी केले.हे मंदिर कौलाचे होते.खाली शहाबादी मोठी फरशी होती.

सन १९८४-८५ मध्ये पुन्हा मंदिराचे बांधकाम करण्यात आले.हे मंदीर पुर्वीच्याच पायावर बांधण्यात आले.हे मंदीराचे वैशिष्ट्य असे होते की ते पुर्णता: घडीव दगडामध्ये व सागवाणी लाकडामध्ये बांधले होते.खाली काळी पांढरी उच्च प्रतीची लादी बसवण्यात आली होती.व जाळीच्या डिझाइन होत्या.बाहेर सुंदर गच्ची व लाकडामध्ये जाळ्या बसवण्यात आल्या होत्या

त्यानंतर पुन्हा मंदिराचे बांधकाम २०१४ साली करणेत आले.व सन २०१८ ला जिर्णोद्धार झाला.

देवाच्या मुर्ती या आठराव्या शतकातील इतक्या जुन्या आहेत.या मुर्तीपुर्वी...छोट्या छोटया दगडी चारपाच शाळुंका होत्या.त्या अजुनही आहेत.

खुप पुर्वी या शाळुंकाचीच पुजा व्हायची.त्यामुळे हे देवस्थान जागृत देवस्थान असल्याचे सिद्ध होते...याच देवाचे मुख्य ठिकाण खरबाच्या माळावर आहे.तेथे पुर्वी साधे छोटे मंदिर होते.नंतर  सन १९९५ मध्ये  नवीन मंदीर बांधले आहे. 

हारतुरे,दंडवते,पालखी,नवरात्र (देव बसणे, पाचवी व नववी माळ ,देव उठणे,) देव पारधी जाणे,देव पारधीवरून येणे व श्री काळभैरवनाथ  जन्माष्टमी,रविवार हे मुख्य कार्यक्रम असतात.या वेळी दुरवरून लोक उपस्थित असतात.

पुर्वी जावळेवाडीकडे जाताना पिपाळडहाळ येथे कै.शिवराम मोहन यांनी त्यांच्या शेतावर मोट बसवली होती. ह्या मोटेचे दगडी बांधकाम हे रसुल गुलाब धोंडफोडे या गवंड्याने केले आहे.

येथे पुर्वी बटाट्याचे पीक घेतले जाई.पुर्वी मंदोशी, शिरगाव, टोकावडे,कारकुडी,भिवेगाव व भोरगीरी अशी संयुक्त ग्रामपंचायत होती.सन १९८३ मध्ये कै. बाळासाहेब दगडू तळपे हे पहिल्यांदा सरपंच झाले तर १९८५ ते १९९० पर्यंत कै.शंकरराव राघुजी हुरसाळे हे उपसरपंच होते. शिवाय कै.किसन देहू तळपे नंतर, कै.सिताराम दारकू तळपे हे ४० गावांशी सलग्न असलेल्या डेहणे आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे डायरेक्टर होते.

गावात १९७८ साली लाईट आली.गावात पहिल्यांदा १९७६ साली कै.सिताराम दुलाजी तळपे यांनी सायकल घेतली.तर पहीला रेडिओ श्री सहदेव जढर यांचा होता.आता सध्या जे वर गावठान आहे तेथे आंबेकर,मुठे,जढर,आंबवणे,तळपे दिघे,विरणक ही कुटुंबे रहायची परंतू १९३२ साली आलेल्या प्लेगच्या साथीत अनेक कुटुंबे विस्थापीत झाली.

गावाला शिरगाव, टोकावडे,कारकुडी,तळेघर,नायफड,

वांजाळे व धुओली अशा सात गावांची हद्द लाभलेली असुन मंदोशी गावच्या हद्दीत...श्री काळभैरवनाथ ग्रामदैवत, मारुती मंदीर, मुक्तार, वेताळ, वीर, कळमजा, दे..आई.सुळ्याचा महादेव कनीरबाबा. कोकाटवीर. भुमीर. खरबाचा मुख्य देव अशी देवस्थाने लाभली आहेत..

मंदोशी गाव हे निसर्गरम्य ठिकाण असुन आंबे, करवंदे, जांभळे,तोरणे,आंभेळी अशी अनेक फळे सिझनेबल उपलब्ध असतात.



पावसाळ्यात हिरवागार निसर्ग,खळाळते पाणी, डोंगरद-या,व निसर्गत:तयार झालेले धबधबे यामुळे पर्यटकांची महाराष्ट्रातुन गर्दी होते.नयनरम्य निसर्गसौंदर्यानं नटलेलं, धबधब्यांसाठी सुप्रसिद्ध मंदोशी,अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा अनमोल ठेवा,चारही बाजुंनी डोंगरांनी वेढलेलं, सहयाद्रीच्या कुशीत वसलेलं, भिमाशंकरजवळील हे छोटंसं गाव धबधब्यांसाठी प्रसिध्द आहे. याठिकाणी सुंदर फेसाळणारे छोटे, मोठे अनेक धबधबे आहेत. तरारलेली भात शेती, सर्वदूर पसरलेली हिरवळ, झुळझुळ वाहणारे पांढरेशुभ्र झरे, डोंगराच्या पायथ्याशी तुडुंब भरून वाहणारे ओढे,अधूनमधून पसरणारी धुक्याची चादर या सर्व निसर्गसौंदर्यानं डोळ्यांसोबतच मनही तृप्त होतं.

रामदास तळपे 

चित्र सौजन्य :-गणेश हुरसाळे, अरुण मोहन 

  
 व्हिडिओ सौजन्य :- श्री शंकर गवारी जावळेवाडी 








 


गावाकडचे साधेभोळे लोक

खुप दिवसातुन गावाला दोन तीन दिवस राहण्याचा योग आला होता. सकाळी अंघोळ झाल्यावर चहा घेत असतानाच मित्र काशिनाथ आला. त्याला चहा दिला.
चहा पित असतानाच तो म्हणाला. 
आज काय काम आहे का तुला?
काम नसेल तर चल रानात जाऊया. मध कुठे भेटते का पाहू. 
रानात हे शब्द उच्चारताच मी लगेचच होकार दिला.
माझ्याकडे पाण्याची कापडी पिशवी आहे त्यामध्ये पाणी थंड राहते. मी ती घेऊन येतो. असे म्हणून तो घरी गेला. तो पर्यत मी भाजी चपाती खाल्ली. थोड्याच वेळात तो आलाच. त्याच्या कमरेला आकडी व कोयता पहाताच मला लहानपणाच्या आठवणी जागृत झाल्या.

प्रत्येकाच्या घरी आकडी व कोयता असायचाच. आकडी म्हणजे एक चामड्याचा पट्टा असुन तो दोन्ही बाजूनी निमुळता असतो. त्याच्या मधोमध कोयता आडकवण्यासाठी लाकडी घोड्याच्या मुंडक्याचा आकार असलेला आकडा असतो. चामडी पट्याच्या एका टोकाला चामडी गुंडी व दुसऱ्या बाजुला गुंडी अडकवण्यासाठी चामड्याचीच काजी असते.(शर्टाचे बटन लावतात तसे) तर प्रत्येकाच्या घरी असणारी आकडी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

एवढयात आकडी पुराणातुन काशिनाथने "चल निघायचे ना"? या शब्दाने जागे केले.

चला निघुया. असे म्हणुन आम्ही जंगलाच्या दिशेने रवाना झालो. जाता जाता अजुन एक बालमित्र आम्हाला येऊन मिळाला. इतक्या वर्षातुन जंगलातील त्या पायवाटेने जाताना काल परवाच या वाटेने गेलो आहे असा भास झाला. लहान पणाच्या आठवणी एकदमच ताज्या झाल्या. संपुर्ण बालपण एका क्षणात तरूळून गेले. संपुर्ण रानावनातील पायवाटा अजुनही जशाच्या तशा आठवतात. रानातील प्रत्येक भागाला नावे असत.
त्यापैकी वानवळा दाखल काही. खतारी, हारहार गोट्या, आघाडी, मोरंटाक, देवकडा, देवमाची, तुरूकमाची, गाठ्या, कोटम, आसानमाची, भातलवान, खरबाचा माळ, काचळाचा माळ, धोधानी, माल्याचा कपरा, धवलीचा दरा, धोकटी, टिवई, मटमाळ, हेलग्याचं डोकं, आसानदरा, घुडीदांड, आड, देवमाची
कोल्हया, आंघोळीचा डोह, कळाममिहीर, पिपाळडहाळ, कुतार टेप, व्हळखचार,
वाक्षपत, शिंबारटाक, नावठिके, वडाचीवाडी, गव्हाळी, बेडखिंड, चिखाळी, आरतीचा मोढा, सावताची माची अशी अनेक ठिकाणाला अनेक नावे.

रानातल्या प्रत्येक आंब्याला नावे असत. प्रत्येक आंब्याची एक वेगळीच चव वेगळीच खासीयत असायची. काळ्या आंबा, शिप्या आंबा, मोकाशा, आरती, केसम्या, वरावट्या, गाडग्या, गोड्याआंबा, कोयती,भद्या अशी कितीतरी नावे सांगता येतील. 
या आंब्यांची चव अजुनही कित्येकांच्या स्मरणात असेल.

लहानपणी हे आंबे पाडाला लागल्यावर आम्ही या आंब्यांच्या अजुबाजूलाअढी घालायचो. अढी म्हणजे जमीनीत खड्डा खोदुन त्यामध्ये थोडा पालापाचोळा टाकायचा. त्यावर आंबे ठेवायचे. परत त्यावर पालापाचोळा मग परत त्यावर आंबे अशा प्रकारचे तीन चार थर लावले जात.हे सर्व झाल्यावर माती टाकून एक सारखे करून खुणेसाठी छोटा दगड ठेवायचा. 

पाच सहा दिवसानी जाऊन अढी उकरायची. एव्हाना आंबे पिकून मस्त सुगंध दरवळायचा. तेथेच बसुन एकाएका आंब्याचा स्वाद घ्यायचा. 
प्रत्येकालाच आंब्यावर जाता यायचे नाही. काही आंबे चढायला अवघड असायचे. आंब्याच्या उंच शेंड्यामध्ये पिवळेधमक पाड असायचे. मग काय! प्रत्येक जन दगड गोळा करायचा. आणि पाडाच्या दिशेने दगड मारले जायचे..ज्याच्या दगडाने आंबा पडेल त्याचा पाड हे समीकरण असायचे. कधीकधी मीच आंबा पाडला म्हणून दोन जनांमध्ये भांडणे व्हायची. मारामारी व्हायची. परंतू थोड्याच वेळाने पुन्हा गोडी व्हायची. ज्याला आंबे मिळाले नाहीत त्याला प्रत्येकजण दोन तीन आंबे द्यायचा. खुपच आंबे मिळाले तर शर्ट काढून त्यामध्ये आंबे घरी आणायचे.
पहाटेच्या थंडगार वा-याच्या झुळकेने प्रत्येक आंब्याखाली टपाटप आंब्याचे पाड पडायचे. अगदी उजाडताच आम्ही पिशवी घेऊन पाडाचे आंबे गोळा करायला जायचो. दररोज पाच पन्नास आंबे सहज मिळायचे.

अशाच आठवणीमध्ये रानातुन जात होतो. मध्येच एखादा ससा आम्हाला पाहिल्यावर वायू वेगाने पळताना दिसे. ठिकठिकाणी वनविभागाने लहान मोठी तळी खोदलेली आहेत. 

एका मोठ्या तळ्यात कातक-यांची तीन चार पोरं मासे पकडताना दिसली. काशिनाथने दम दिल्यावर बिचारी तळ्यातुन बाहेर निघाली. तेव्हा मी म्हणालो अरे! पकडा मासे..चालुद्या तुमचे काम. परंतू शंका मनात असल्याने ती मुले तळ्याच्या पाळीवरच उभी राहीली. आम्ही खुप पुढे आल्यावर परत तळ्यात शिरली.
जाताना प्रत्येक परिसर पाहिल्यावर अनेक आठवणी मेंदुच्या गाठोड्यातुन बाहेर येत होत्या.

अरे! येथे तर आपण पोते घेऊन जनावरांचे वाळलेले शेण गोळा करायचो.
येथे आपण गुरे सांभाळायचो..
येथल्या या झाडाखाली पाच सात मित्र भारूड (नाटक) करायचो.
येथे आपण क्रिकेट, विटीदांडू, गोट्या खेळायचो, खेकडे पकडायचो, सरपण गोळा करायचो. सर्व बालपण एका मागून एक असे स्मरत होते. स्वप्नगत आठवणी तरुळून जात होत्या.

रानातुन जात असताना काशिनाथची सावध नजर प्रत्येक झाडावर मधमाशाचे पोळे (मोहळ) आहे का हे शोधत होती.
एव्हाना एक दोन मोहळे त्यांनी पाहीली होती. पण ती अतीशय लहान असल्यामुळे त्याने दुर्लक्ष केले. असेच पुढे पुढे जात असताना एक गर्द पाने असलेल्या आंब्यावर मोहळ असेल या शक्यतेने त्याने निरखुन पाहिले. आणि त्याच्या मनासारखे झाले. आंब्यावर बरेच मोठे मोहळ होते. लगेच झाडावर सरसर चढत तो झाडावार गेला आणि अगदी पाच दहा मिनिटात मधाचे पोळे घेऊन खाली आला.
अगदी एकही मधमाशी न चावता त्याने मोहळ काढले होते. 
दुसऱ्या मित्राने तो पर्यंत चांद्याची पाने आणली होती.(चांदा हे एक झाड आहे.पुर्वी लग्नकार्य,पुजा ईत्यादीची जेवणे या चांद्याच्या पानावर चार पाच पाने लावुन पत्रावळी म्हणुन करत असत.) चांद्याच्या पानावर मध खाल्ली.
थोडावेळ गप्पा टप्पा झाल्या. आणि आम्ही रानातील जे सर्वात चांगल्या चवीचे आंबे होते त्या आंब्याकडे जायला निघालो. प्रत्येक आंब्याखाली गेल्यावर अनेक आठवणी दाटून आल्या. प्रत्येक आंबा, प्रत्येक ठराविक ठिकाण जणू मला विचारत होते.
अरे काय राम कसे काय..बरं आहे ना..? लहानपणीआमच्या आंगाखांद्यावर खेळलास.
दररोज न चुकता यायचास. 
आता पुर्ण विसरलास आम्हाला.?
इतकी माया पतळ झाली का रे.?
आम्ही तुला नेहमी आनंद दिला..आमची एकमेव इच्छा तु आम्हाला नेहमी भेटावेस..आमच्या आंगाखांद्यावर खेळावे...पण तु गेला मायावी दुनियेत...काय मिळाले तुला तेथे? तुलाच माहीत.येत जा अधुन मधून..बरं वाटतं. असा उगाचच भास झाला...नव्हे अगदी खरं होतं.

पुर्वी प्रमाणे आंब्याच्या शेंड्यामधील गुल्लर (पिवळेधम्मकआंबे) दगडाने पाडायची इच्छा झाली. प्रयत्न करून पाहीला. दगड शेंड्यापर्यंत गेलाच नाही. हाताला एक प्रचंड कळ आली. वेदना जाणवू लागली. आणि हा प्रयत्न बंद झाला. 
काशिनाथ झाडावर गेला व प्रत्येक फांदी हालवू लागला. त्या हेलकाव्यामुळे पाड खाली पडू लागले. आम्ही एका ठिकाणी ढिग केला. पुर्वी प्रमाणेच आंब्यांची चव चाखायला मिळाली. अगदी पुर्वी सारखीच जशीच्या तशी. काहीच बदल नाही..मन अगदी तृप्त झाले.

आंबे खाऊन झाल्यावर कापडी पिशवीतील थंडगार पाणी प्यायलो. आणि आब्याच्या झाडाखालीच रेंगाळलो. गार वा-याच्या झुळकेने केव्हा डुलकी लागली कळलेच नाही.
कुणाच्या तरी बडबडीने जाग आली 

दुपार केव्हाच टळून गेली होती आणि उन्हे उतरणीला लागली होती. पहातो तर शेजारील गावचे पाच सात जण थोड्या अंतरावर दिसले. आम्ही सर्वजण उठलो. जाऊन पहातो तर तेथे त्यांच्या शेतात रूढी परंपरेने दरवर्षी त्यांच्या देवाला बोकड देण्याचा कार्यक्रम होता.
पुर्वी ते आम्हा सगळ्यांना जेवणाचे आमंत्रण द्यायचे. आम्हीही न चुकता हजर असायचो. आम्हाला पाहुन त्यांना खुप आनंद झाला. 
आता जेवल्याशिवाय तुम्हाला जाऊ दिले जाणार नाही. असा गोड दम दिला.आमचा अगदी नाईलाज झाला.
ठिक आहे. तो पर्यत आम्ही रानात फिरून येतो. असे म्हणून आम्ही रानात नुसतेच फिरत राहीलो.

एका ठिकाणी एक कोलारू घर दिसले. आम्ही तिकडे गेलो. अंगणात मांडवाखाली एक म्हातारा घोंगडीवर बसुन टोपले विनत होता. बाजुलाच बांबुच्या काड्या पडल्या होत्या. त्याच्या डोक्याचा पटका व अंगातील बंडी पाहुन अजुन जुन्या आठवणी चाळवल्या.
आम्हाला बघुन त्याने रामराम केला.
या कुठलं पाव्हणं म्हणायचं? ओळख सांगीतल्यावर त्यांच्या डोळ्यात आश्रू तरळले..तेथूनच त्यांनी म्हातारीला आवाज दिला.
आगं पाणी घेऊन ये.पाहुणे आलेत.
कपाळाला भले मोठे कुंकू. नाकात बांगडीच्या आकाराची सोन्याची नथ. अंगात चोळी, मांडवकर लुगडे असलेली म्हातारी पाण्याचे तांबे भरून घेऊन आली.

पाणी पिल्यावर म्हतारा म्हणाला अगं! ओळखलेस का ? याला.
म्हतारीची नजर कमी झाली होती.ती अगदी निरखुन पाहु लागली...
म्हातारा म्हणाला. अगं हा मास्तरचा राम हाये.
आग बाय. तु सखुचा राम.केवढा मोठा झालास असे म्हणुन माझे मुके घेऊ लागली.

मी जेव्हा लहान होतो तेव्हा ती आम्हाला दररोज एक छोटे पातेलेभर दुध द्यायची. हरभरे, मसुरा, उडिद द्यायची. 
प्रत्येक कार्यक्रम असल्यावर मी त्यांच्याकडे जेवायला जायचो. वडिल त्यांना वेळोवेळी अर्थीक मदत करायचे. त्यांची मुले माझ्या वडिलांच्या हाताखाली शिकली. 
एक मंत्रालयात तर एकजण शिक्षक  आहे. त्यामुळे आमचे एक घनिष्ट नाते होते.

माझे वडील गेल्यावर आईला आधार म्हणून ती आमच्या घरी पंधरा दिवस राहीली होती. आम्हाला प्रचंड आधार देण्याचे काम तेव्हा तिने केले होते. मला देखील खुप गहिवरल्या सारखे झाले. तिच्या पदरात डोके खुपसुन मन मोकळे करावेसे वाटले.
इथे काय करता? जायचे लेकांकडे शहरात मी म्हणालो.
न्हाय बा..जो पर्यंत हातपाय हालतात तो पर्यंत या मातीचीच शेवा करणार.हीतच मरणारं. 
मी पांडुरंगाला रोज म्हणतुय पांडुरंगा मरण आले तर इथेच येउदे याच मातीत. बाकी कुठ जायची इच्छा नाही..अपेक्षा नाही. बास इतकचं.

नको नको म्हणताना म्हातारीने दुध व गुळ घालून शेवाया बनवल्या. 
खुप वर्षांनी स्टीलच्या पितळीत वाफाळलेल्या शेवाया खाताना अजूनच आठवणी चाळवल्या. अगदी पुर्वीचीच चव, तसेच प्रेम माझ्या भाग्याला आले होते.

थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या माझ्या आईच्या आठवणीने म्हतारीच्या डोळ्यांच्या कडा पानावल्या. अरे पोरा येत जा. अधुन मधुन.
या जीवनात हाये काय ? आज हाये अन उद्या न्हाय.एकमेकांशी चांगल राहणे, वागणे. आन बोलणे बाकी सर्व फुकाट हाये..
या वाक्यात म्हतारीने जागतीक दर्जाचे तत्वज्ञान सांगीतले. जे कोणत्याच शाळेत, शिकवले नाही.

परत यायच्या बोलीवर जड अंतकरणाने आम्ही तेथुन निघालो ते तडक जेवण बनवणा-या माणसांकडे. एव्हाना सर्व विधी उरकत आला होता. 
सुर्य मावळतीकडे जाउन बराच वेळ झाला होता. तो पर्यत इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या. एकेक करून बरेच लोक जमा झाले होते.
प्रत्येकाच्या हातात पितळी किंवा ताट होते. काहीजण येत होते. सर्व विधी झाल्यावार जेवणाच्या पंगती बसल्या आम्हालाही ताटे दिली. भात वाढला. त्यावर मटणाचा रस्सा. आणि बचकभर मटनाचे खडे.
जेवण सुरू झाले. आग्रह करून वाढण्यात आले..जेवण झाल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तो पर्यंत मिट्ट काळोख झाला होता. आम्ही मोबाइलच्या उजेडात घराकडे चाललो होतो. परंतु पायवाटा अजुनही जशा तेव्हा होत्या  तशाच आजही तशाच ओळखीच्या भासत होत्या.

रामदास तळपे (मंदोशी)
  
 

शरदराव जठार एक समाजसेवक



 शरद जठार एक समाजसेवक 

समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला पाठिंबा देऊन त्याच्या मागे उभे राहून त्याला सतत प्रेरणा देणे हे प्रत्येकाचे काम आहे.यामुळे निश्चितच चांगले कार्यकर्ते घडुन भागाचा विकास,लोकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होत असते.असेच आपल्या भागात श्री शरद जठार यांचे सामाजिक काम पाहून प्रत्येकाला एक नविन उर्जा प्राप्त होत असते.आज २९ श्री.शरद जठार यांचा वाढदिवस हेच औचित्य साधून त्यांच्याविषयी त्यांच्या कर्तुत्वाची माहीती वाचकांपर्यंत पोहचवावी या उद्देशाने दोन शब्द त्यांच्याविषयी लिहितो.

श्री.शरद जठार यांचा तसा माझा फारसा परिचय नव्हता..फक्त ते धुओली गावचे उपसरपंच आहेत.व भोसरी येथे राहतात.एवढेच माहीती होते.एकदा आँफिसमध्ये काम करत असताना एक शिक्षक काही कामानिमित्त आँफिसमध्ये आले व बोलता बोलता त्यांनी 

साहेब तुम्ही जुन्नर तालुक्यातील  का? असे विचारले.

मी म्हणालो मी खेड तालुक्यातील मंदोशी गावचा आहे.वाडा गावच्या  पश्चिम भागात माझे गाव आहे.

ते म्हणाले धुओली गाव पण तिकडे आहे का? 

मी -  हो.

तर ते म्हणाले तुम्हाला ते शरद जठार माहीत असतील ? 

मी - हो.माहित आहेत.

ते - अहो त्यांच्यामुळे आमचा पेशंट वाचला आमच्या पेशंटला यशवंतराव चव्हाण मेमोरियल हाँस्पिटलला (वाय.सी.एम.) अँडमीट करून घेत नव्हते.सर्व प्रयत्न करून पाहिले पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले.कुणीतरी श्री. शरद जठार यांचा फोन नंबर दिला.शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना फोन केला.आणि पुढच्या दहाच मिनीटात आमचा पेशंट अँडमिट करून घेतला. 

पुढे तो सुखरूप बरा झाला.इथेच आमची चर्चा संपली.पुढे एकदा काहीतरी कामानिमित्त शरद जठार यांना फोन केला होता.त्यांनी मला त्यांच्या नायफड पंचायत समिती गण या ग्रूपमध्ये सामाविष्ट केले.व पुढे त्या ग्रूपच्या माध्यमातून श्री शरद यांचे सामाजीक कामाचे एकेक पैलू उलगडत गेले.व त्यांच्या विषयी आदर वाटू लागला.

ते करीत असलेले काम पश्चिम भागाच्या दृष्टीने अतिशय मोलाचे आहे.सामाजिक काम करत असताना अनेकांचे स्वार्थ त्यात आडवे येतात.त्यामुळे सामाजिक कामाला गती मिळत नाही.त्यासाठी सर्व लोकांनी सामाजीक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सशर्त पाठिंबा दिला पाहिजे व प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरायची तयारीही ठेवली पाहिजे.

मझ्या मते पश्चिम भागात जर सामाजिक कार्यकर्त्यांची फौज असेल तर सर्व शासकिय योजना वैयक्तिक लाभाच्या योजना व इतर कामे चांगल्या प्रकारे राबल्या जातील. श्री शरद जठार यांच्कडे ग्रामपंचायतचे नेतृत्व आहे.

मानव अधिकार तालुका अध्यक्ष पद आहे जिल्हास्तरावर अनेक राजकिय व सामाजीक प्रमुख व्यक्तीबरोबर चांगले सबंध आहेत व या माध्यमातून ते चांगले काम करत आहेत ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. 

आपल्या भागातील कोरोनाचा संसर्ग असलेल्या व्यक्तीला रक्तातील प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याचे कामसुद्धा त्यांनी केले आहे. तर रात्री आपल्या भागातील मयत झालेल्या कोरोणा पेशंटला रात्री दोन वाजता स्मशानभुमीत P.P.P किट घालूनअग्नीडाग दिला आहे. 

आपआपसातील वादविवाद, मतभेद विसरून चांगले काम करणा-या व्यक्तीला नक्कीच पाठिंबा दिला पाहिजे.पश्चिम भागाला आज व्यसनमुक्ती केंद्राची गरज आहे.छोटे व्यवसाय मार्गदर्शन केंद्र व  मेळावे.व्यसनाधिन लोकांसाठी प्रबोधनकार यांची व्याख्याने आयोजीत करणे.

सर्व भागातील सरंपंच,ग्रामसेवक,कृषिसेवक,तलाठी,आरोग्य सेविका,शिक्षक प्रतिनीधी ,पशुधन पर्यवेक्षक यांचा मेळावा आयोजीत करून सर्वसामान्यां पर्यत सरकारी योजना कशा राबवता येतील यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.आजही पैशाने न होणारी कामे  

शरद जठार यांच्या शब्दाने होतात.हे ही महत्त्वाचे आहे.त्यांनी केलेल्या कामाची माहीती समाजातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचली पाहीजे व त्या कामाची दखल सर्वांनी घ्यावी यासाठी मी त्यांच्या काही सहका-यांकडून त्यांच्या विषयी माहीती मिळवली.त्या माहीतीवर थोडासा प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो.

*केलेली सुरवात*

भोसरीसारख्या ठिकाणी शिक्षण घेत असताना सकाळी काॅलेज  व दुपार नंतर  STD बुथवर 500 रूपये महिना पगारावर काम केले.

नंतर प्रायव्हेट कंपनीत करत असताना भरपुर असा मित्र परिवार जमवला.व त्यांचेशी चांगले सबंध ठेवले.नंतर माॅ साहेब ग्रुपची स्थापना केली व तिथुन पुढे सामाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली. 

ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना भोसरी सारख्या ठिकाणी असलेले विविध भागातील मा.नगरसेवक, मा.आमदार मा.लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी  दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आपल्याला मिळत असलेला मित्र परिवार व लोक प्रतिनिधी यांच्या सहकार्याच्या जोरावर धुओली गावात व पश्चिम भागात काम करण्यास सुरुवात केली. 

पश्चिम भागातील तरुण सहकारी, मा.पंचायत समिती सदस्य, मा.जिल्हा परिषद सदस्य, मा.आमदार या लोक प्रतिनिधींच्या सहकार्याच्या जोरावर पश्चिम भागात चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी मिळत आहे.  

*उपसरपंच म्हणून बिनविरोध*  *निवडून आल्यानंतर पहिला* *ध्वजारोहण  गावातील जेष्ठ* *नागरिकाच्या हस्ते केला.*

*गावातील असणारा वादविवाद* *मिटवले.*.

*गावातील विविध चांगल्या कामांची प्रशासनाने दखल घेत, गावाला जिल्हा परिषद गटात *संत गाडगे बाबा*ग्रामस्वच्छता पुरस्कार प्रथम क्रमांक मिळाला*गावात विविध विकास कामे मार्गी लावली.*

*वाढदिवसाचा खर्च टाळून गावातील*गरजू महिलांना साड्या* *वाटप केल्या.*

*गावातील एका गरीब कुटुंबाला* *दरवर्षी दिवाळीला मिठाई व कपडे करण्यात येतात.*  

*नायफड पंचायत समिती गण* *ग्रुपच्या माध्यमातून मित्र* *परिवाराच्या*सहकार्याने कोरोना* *काळात रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले*

मा.आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् च्या माध्यमातून पश्चिम* भागात जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट  वाटप करण्यात आले

नायफड पंचायत समिती गण ग्रुपच्या*माध्यमातून अपघात ग्रस्त तरुण राजु लांघी या तरुणाला पैसे व धान्य वाटप करण्यास मदत..

*पुणे या ठिकाणी असलेले* *यशवंतराव*चव्हाण हाॅस्पिटल* *(YCM) या ठिकाणी आपल्या    पश्चिम*भागातील नागरिकांचा* *कुठल्या ना कुठल्या कामासाठी* *संपर्क येतो तेव्हा त्यांना अ‍ॅडमिट* *करण्यापासून तर ते डब्याची व्यवस्था*करणे, वेळ प्रसंगी घरून* *डब्बा देणे, त्यांच बिल कमी करणे गाडीची व्यवस्था करून देणे* *काही नागरिकांचा वेळ व पैशाची* *बचत व्हावी, या वेळी त्या* *नागरिकांच्या नातेवाईक यांचे जन्म व*मृत्यू दाखले अगदी घर* *पोहच करणे, अगदी  अ‍ॅडमिट* *असलेल्या पेशंटला वेळो वेळी फोन*करून चौकशी करणे, त्यांना* *धीर देणे. रात्री अपरात्री फोन*आला तर त्या ठिकाणी जाऊन*मदत करणे, कोरोना* *काळात मयत झालेल्या आपल्या* *भागातील पाॅझिटीव पेशंटच्या* *नातेवाईक यांना रात्री दोन- तीन* *वाजता स्वता: त्या ठिकाणी* *उपस्थित*राहुन अंत्यविधी* *करण्यास*मदत करणे.आगदी* *कोरोना काळात वैयक्तिक लक्ष* *घालुन गावातील लोकांना अर्सेनिक*गोळ्यांचे वाटप केले*  *कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या* *महापुरात पुरग्रस्त भागाला खेड* *तालुका पश्चिम भागातुन 500 किलो*तांदुळ जमा करून* *पुरगरस्तांना  पश्चिम भागाच्या वतीने मदत पोहचवली* 

धुवोली/ वांजाळे संयुक्त ग्रामपंचायत ग्रामस्तरीय कोरोना समितीच्या वतीने  कोरोना विषयी नियोजन करण्यात येऊन  गावात सॅनिटाईजर, मास्क चे वाटप करण्यात आले. तसेच भविष्यात गावात कोणी रुग्ण पाॅझिटीव आला, तर त्याच्यासाठी ग्रामपंचायतचा असलेला हाॅल रिकामा करुन त्या ठिकाणी विलगीकरण (Corantine) करण्याची व्यवस्था करण्यात आली. यामुळे गावात  लोक सुरक्षित राहातील  आणि प्रशासनाचा ताण देखील कमी होईल. असेच नियोजन ग्रामीण भागातील लोक प्रतिनिधींनी करणे आवश्यक आहे..  जेणेकरून प्रशासनाचा ताण नक्कीच कमी होईल. हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य म्हणावा लागेल.

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मानवाधिकार मीडीया फाउंडेशनच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शरद जठार करत असलेले हे सामाजिक काम खरोखरच उल्लेखनीय आहे.हे नाकारून चालनार नाही.त्यांच्या या सामाजीक कामाची सर्वांनी दखल घेऊन त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे.


 


उतावळा नवरा



 उतावळा नवरा 

हा किस्सा मी खेड पंचायत  समिती येथे कार्यरत असतानाचा आहे. त्यावेळी माझा एक मित्र  प्रत्येक सुट्टी च्या दिवशी माझी टु व्हीलर घेऊन त्याच्या मैत्रिणीला घेऊन फिरायला जायचा. मला तिच्या बाबतीत फारशी माहिती नव्हती.आणि तशी काही गरज सुध्दा नव्हती. 

एक दिवस सकाळीच मला माझा मुंबईला नोकरी करत असलेला एक मित्र आँफिसमध्ये भेटायला आला.रामदास एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदा ती तुलाच सांगायची आहे म्हणून सकाळी सकाळी तुझ्याकडे आलोय.

बोल काय आनंदाची बातमी आहे? मी म्हणालो.

काल मी अमुक गावाला लग्नासाठी मुलगी पहायला गेलो होतो. एक नंबर… जबरदस्तच आहे पोरगी. डोळ्यापुढुन तिचा चेहरा जाता जात नाही. येत्या मंगळवारी ठरवूनच टाकायचे आहे.असे म्हणत पाकिटातून त्याने आयकार्ड साईज रंगीत फोटो मला पहायला दिला.

आनंदाची गोष्ट आहे फक्त गडबड करु नकोस. जरा दमाने घे..मी म्हणालो. 

गडबड करु नकोस काय म्हणतोस? उलट मी तर म्हणतोय येत्या मंगळवारी साखरपुडा उरकुनच टाकायचा.मित्र म्हणाला.

केव्हा एकदा लग्न होतय असे मला झाले आहे. तु सुट्टी काढ आपण सर्व नियोजन या आठवड्यात करून टाकू. 

त्याच गावचा माझा एक मित्र आहे त्याच्याकडून काही माहिती मिळाते का ते पाहू.मी त्याला म्हणालो.

काही माहिती घ्यायची गरज नाही आमच्या जुन्या पाहुण्यां पैकीच आहे गेलं वर्ष दिड वर्ष तिचे वडील लग्नासाठी माझ्या वडिलांच्या मागे लागले आहेत. मित्र म्हणाला.

पाच दहा मिनिटे अशाच इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मुलीचा फोटो माझ्या हतातच होता.आणि तेवढ्यात माझा तो दुसरा मित्र आला जो माझी टु व्हिलर न्यायचा.

मी त्याला माझ्या टेबलाजवळ बोलवून घेतले आणि फोटो त्याच्या समोर धरून विचारले.या मुलीला ओळखतोस? 

त्याने खिसे चापचायला सुरुवात केली.आणि मला म्हणाला. कधी खिशातून पडला कोणास ठाऊक ? दे की रामदास प्लिज..

मला घटनेचा पुर्ण अंदाज आला होता मी त्याला गप्प बसवायचा प्रयत्न करत होतो आणि तो पुढेच बोलत होता.

मी त्याला दरडाऊन म्हणालो उगाच काहीतरी बोलू नकोस हा फोटो तुझ्या कडील नाही आणि या मुलीचा आणि तुझा काही संबंध नाही.

अरे, काल खूप मोठा प्रॉब्लेम झाला. मी तिची वाट पहात थांबलो होतो पण ती आलीच नाही खुप उशीराने तिच्या चुलत बहीणीने येऊन मला सांगितले की तिला पहायला तमुक गावचे पाहुणे आले आहेत. सगळा पचका झाला ना राव माझा. नाही तर काल आम्ही पुर्ण नियोजन केले होते.( हे सांगत सांगत त्याने पाकीटातून त्या मुलीचा फोटो काढला) माझा तर माझ्याकडे आहे मग हा कुठला?

 हा..हा...आठवले गेल्या महिन्यात माझ्याकडील फोटो हरवला होता तो तुला सापडला असेल..हो.ना.? अशीच काही मिनिटे चर्चा चालली.

तिच्या सोबत लग्न करायला उत्सुक असलेला मित्र काय समजायचे ते समजून गेला. आणी काही न बोलता तिथून निघून गेला.

यालाच म्हणतात " उतावळा नवरा.आणि गुडघ्याला बाशिंग...

 

गावाकडच्या यात्रा

महाराष्ट्रात अनेक गावागावात ग्रामदेवतांच्या यात्रा भरतात.माघ महिन्यापासुन ख-या अर्धाने यात्रेचा हंगाम सूरू होतो.यात्रेचा हंगाम म्हणजे संपुर्ण भागात एक उत्साहवर्धक वातावरण असते.

आमच्याकडे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवडयापासुन यात्रा सुरू होतात. यात्रेच्या मिटींगची दवंडी कधी देतात याकडे आमचे लक्ष असायचे.मग एखाद्या वारी मांग प्रत्येक गल्ली बोळात किंवा चौकात किंवा चावडीच्या दारात दवंडी द्यायचा.दवंडी संपताच डफडे वाजवायचा.त्याचे शेवटचे हो...हो...हो...व त्यानंतरचा डफड्याचा आवाज ऐकूण अंगावर रोमांच उभा रहायचा.यात्रेची पुर्वतयारी काय वर्णावी.

गावागावात मंदीराचे पटांगण.गावचा पार,चावडी येथे गावची बैठक भरायची.अनेक वादविवाद झडायचे.एका बैठकीत निर्णय होत नसे.पुढील आठवड्यात पुन्हा बैठक बोलवली जाई.यात्रेसाठी करमणुकीचा कोणता कार्यक्रम आणायचा यावर खलबतं सुरू होत.नामांकित तमाशा,किंवा प्रसादिक भारूडे यांच्या बिदागीचा आकडा किती आहे यावर चर्चा केली जायची.त्यानुसार आखणी केली जाई.

पुर्वी तमाशा व प्रसादिक भारूडे ही खाली जमीनीवर केली जात.या तमाशा व भारूडाचे फक्त सात-आठ कलाकार असत.त्यांच्याकडे एक मोठी पायपेटी,ढोलकी व कपडेपटाची एक मोठी ट्रंक (पत्याची पेटी) एवढेच माफक साहित्य असे.रात्री राजा झालेला नटाच्या डोक्यावर पायपेटी किंवा कपडेपटाची ट्रंक असे.भारूडात व तमाशात  स्री पात्र करनारा पुरूष नट असे त्याला नाच्या म्हणत.

नाच्याचे काम करणारा नट केस कापत नसत.स्री प्रमाणे केस राखत असत.माझ्या माहितीप्रमाणे भागात अनेक नाचे होऊन गेले त्यापैकी कै.मोतीराम भाऊ मोहन,कै संपत (चंपा) जढर, मंदोशी श्री.सखाराम उगले कारकुडी श्री.गणपत सातपुते घोटवडी श्री.शंकर माळी नायफड श्री.निधन,भिवेगाव पालखेवाडी श्री गबाजी धामणगाव व कै.विठू नांगरे मोरोशी यांचे सर्वात मोठे योगदान लाभले.त्यांच्या कार्याचा ठसा अजुनही अनेकांच्या मनात घर करून आहे.

भारूडात प्रथम उमवरा,सावळ्या,गणपती व सरस्वती ही पात्रे रंगपटावर येत नंतर मुख्य वग सुरू होई.तर तमाशात गण,गवळन,सवालजबाब,बतावनी व नंतर वगनाट्य असायचे.

नंतर जमीनीवरील खेळ स्टेजवर होऊ लागले.भारूड व तमाशाच्या  साहित्याची टेंपो व ट्रकमधुन वाहतुक होऊ लागली.स्टेज,पडदे,लायटिंग आली.तमाशात व भारूडात नाच्यांची सद्दी संपुन स्रीया काम करू लागल्या.पुर्भावीच्रूया भारुडांचा ढाचा बदलला.मारूड म्हणजे मिनि तमाशाच झाला.तमाशात रंगबाजी हा नविन प्रकार आला.तमाशा आता आर्केस्ट्रा झाला आहे.कालाप्रमाणे प्रचंड  बदल झाले.

यात्रेच्या बैठकित नंतर घरपट वर्गण्या ठरवल्या जाई.देणग्या गोळा करत.प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी दिली जाई.भारूड किंवा तमाशा ठरवनारे,देवाचा बाजार आणनारे, हारतुरे आणनारे, मंदिर रंगकाम करून घेणारे बैलगाडयांचे टोकन काढणारे लाईट लाउड स्पिकर व्यावस्था करणे यात्रेचे हँडबील छापणे व ते सर्वांपर्यंत वाटणे इत्यादी कामे असत.बाकी सर्व कामे यात्रा कमिटी करत असे.

गावची यात्रा जसजशी जवळ येई तसतसे लोक यात्रेचा तयारीला  लागत.प्रत्येक घराच्या भिंती आतुन बाहेरून शेणामातीने व राखेने सारवल्या जात.आंगणाला मुरूम घालून अंगण शेणाने सारवुन मस्त बनवले जाई.अंगणाला छान पैकी मांडव घातला जाई.

दुपारच्या वेळेस आंगणात बसुन छानपैकी गप्पा मारणे.किंवा पत्ते खेळणे असा आनंद नाही.मध्येच दुपारच्या वेळेस  सायकल वर पेटारे घेऊन एखादा गारेगारवाला येई.बर्फाची लाल,गुलाबी,हिरवी,पिवळी गारेगार घेण्यासाठी बायका पोरांची झुम्मड होई.दुपारच्या रणरणत्या उन्हात अंगणात बसुन बर्फाची गारेगार खाण्यात फार मोठे समाधान असे.व वेगळाच आनंद होई.

घरादाराची साफसफाई झाल्यावर आठवडे बाजारातून बायकापोरांना,बाप्या मानसांना नवीन कपडे खरेदी केली जात.काहीजण लवकर कपडे शिवन्यासाठी टेलरकडे दररोज चकरा मारत.टेलर दररोज त्यांना आज नाही बाळा सकाळ ये हे पालपुद त्याला म्हणुन दाखवत असे.व बिचारा हिरमुसून घरी जाई.

ज्यावेळी टेलरकडुन तुझे कपडे शिवून तयार आहेत व हे घेऊन टाक.असे म्हणे त्यावर याचा आनंद गगणात मावेनासा होत असे.कपडे ताब्यात घेतल्यावर कधी घरी जाऊ व हे कपडे सगळ्यांना दाखवु असे त्याला होत असे.व आपोआप त्याचे पाय वेगाने घराच्या दिशेने चालू लागत.

यात्रा जवळ आल्यावर प्रत्येक घरातील माणुस आपापल्या दुरच्या नातेवाईकांना आमंत्रण देण्यासाठी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांना यात्रेचे आमंत्रण देत असे.मी सुद्धा मित्रांबरोबर  डोंगरद-यातुन,आडवाटेने,पायवाटेने जाऊन नातेवाईकांच्या गावी जाऊन यात्रेचे आमंत्रण दिले आहे.नातेवाईक सुद्धा यात्रेला  यात्रेच्या एक दिवस आधीच येत असत.गावचे मुंबई पुण्याकडील लोकही सर्व कुटुंबासह यात्रेच्या आदल्या दिवशी हजर असत.

यात्रेच्या दिवशी भल्या पहाटे उठून लोक अंघोळी पांघोळी करून तयार असत.सकाळी सकाळीच मंदीराकडे स्पिकर लावलेला असे.व त्यावर प्रल्हाद शिंदे किंवा इतर मराठी लोकगीतांचा आवाज कानी पडत असे.एकुणच यात्रेचा उत्साह काही औरच असे.

सकाळी देवास मांडव डहाळ्याचा कार्यक्म आटोपुन लोक हारतुरे आणन्यासाठी झुंडीच्या झुंडीने जात.हारतु-यांची मोठी मिरवणूक काढली जाई.गुलालाची उधळण होई.ढोल ताशा सनई व चौघड्याच्या वाद्यात हारतु-यांची मिरवनुक मंदिराच्या दिशेने रवाना होई.मंदीरात आल्यावर देवास कपडे चढवले जात.हार घातले जात.नारळ फोडून प्रसाद वाटला जाई.

तो पर्यत गावात अनेक दुकाने थाटलेली असत.खेळण्यांची दुकाने, लाडु,रेवड्या,शेव व भेळ यांची दुकाने,कलिंगड व कलिंगडाच्या खापा,द्राक्षे यांची दुकाने.थंड सरबत, गारीगार, कुल्फी स्रीयांची आभुषणे बांगड्या, पोत, माळा, पावडर, नेलपाँलीश इत्यादी अनेक दुकाने लावलेली असत.

काही मोठ्या गावांमध्ये बैलगाडयांच्या शर्यती असत.बैलगाडा घाटाकडे अनेक बैलगाडे आलेले असत.प्रचंड गर्दी झालेली असे.उंच मचानावर बसुन टोकन पुकारले जात.ठिकठिकाणी स्पिकरची कर्णे लावलेली असत.घाटाच्या दुतर्फा लोक  गर्दी करून बसलेले असत.काही लोक उंचावर काही झाडावर बसुन घाटातील बैलगाडयांच्या शर्यती पहात असत.संध्याकाळी इनाम वाटप केला जाई.

इकडे प्रत्येक पाहुण्यारावळ्याला जेवायला घातले जाई.संध्याकाळी ४ ते ५ या वेळात मंदिराकडे दंडवटे घेण्याचा कार्यक्रम असे.सर्व अबालवृद्ध,बायका पोरे सजुन धजुन मंदिराकडे दर्शनासाठी जात असत.अनेकांचे नवस फेडले जात.गुळ खोबरे.पेढे व बर्फी वाटली जाई.

संध्याकाळी सर्व पाहुणे रावळे यांना आग्रह करून जेवायला वाढले जाई.संध्याकाळी भारूड किंवा तमाशाचा कार्यक्रम असे.लोक सर्वात पुढे बसुन कार्यक्रम पहाता यावा म्हणुन अगोदरच जाऊन जागा धरत.स्टेजपुढे प्रेक्षकांची तोबा गर्दी व्हायची.रात्री पालखीचा कार्यक्रम झाल्याशिवाय भारूड किंवा तमाशा होत नसे.

काही ठिकाणी पालखी रात्री १२ वाजता निघायची.तो पर्यत लोक ताटकळुन जायचे.लहान मुले झोपी जायची.पालखीचा कार्यक्रम निघाल्या वर ढोल ताशांचा  सनई चौघड्यांच्या निनादात पालखी चालायची अनेक लोक पालखीच्या मागे पुढे चालायचे.अनेकांच्या अंगात वारे घुमायचे.ते पालखीपुढे दोन्ही हात हातात घालून विशिष्ट पद्धतीने नाचत राह्यचे.पालखीच्या पुढे फटाके व पाऊस पेटवले जायचे. पालखीचा कार्यक्रम संपल्यानंतर तमाशा किंवा भारूडाचा कार्यक्रम व्हायचा.

दुसऱ्या दिवशी सकाळीच काही लोक अखाड्याचे जेवण बनवण्यासाठी जायचे.त्यांनी बनवलेल्या आमटी भात व शाक भाजीचा दरवळ व लज्जत कायम मनात घर करून आहे.

सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम असायचा स्रीया  व बापे घरचे आवरून पोरांबाळासह हजेरीचा कार्यक्रम पहायचे.तो पर्यंत उन लागायला सुरूवात व्हायची.लोक मग बर्फाची गारीगार खाऊन जीव थंड करू पहायचे.

हजेरीचा कार्यक्रम संपल्यावर बायकांमाणसे पुहुण्या आलेल्या बायकांपोरींना बांगड्या भरायच्या.शेवरेवड्या घेऊन द्यायच्या.लहान मुलांना खेळणी घेऊन द्यायच्या.जेवण झाल्यावर यात्रेला आलेली  बायकपोरे आपापल्या गावाला निघत.

त्यानंतर आखाड्याचे जेवण असे.लांबलाबून पहिलवान आलेले असत.कुस्ती शोकींनाची मांदीयाळी जमलेली असे.मोठ्या भातखाचरात,ढेकळामधुन आखाड्याच्या जेवणाच्या पंगती बसत.वर उन्हाचा कहार व खाली तापलेली जमीन अशा परिस्थितीत  पानात भात व तिखट आमटीचा आणि शाकभाजीचा खमंग वास आसमंत दरवळून सोडे.प्रचंड भुक लागलेली असे.उन्हाच्या काहीलीने जीव मेटाकुटीला आला असे.

आणि अशातच श्लोक म्हणला जाई.पुंडलीकवरदेव हारीssssssविठ्ठल म्हणे पर्यंत लोकांना दम धरवत नसे.दुसरी वाढी झाल्यावर ७५%लोक तृप्त होत.काही खवय्ये तिसरी वाढी संपवून मगच उठत.

जेवण झाल्यावर लोक अंगणात,झाडाखाली बसुन वामकुक्षी घेत तर काही उगाचच कालच्या तमाशा व भारूडाच्या,पहिलवांनाच्या गप्पा चघळत बसत.आणि अचानक सनई,चौघडा,व डफड्याचा अवाज आल्यावर लोक खडबडून उठत.झोपलेल्या लोकांना जागे केले जाई.तो पर्यंत लोक बक्षीसांच्या वस्तू घेऊन नाचत गुलाल उधळीत आखाड्याच्या ठिकाणी हजर होत.

पंच कमिटी स्थनापन्न झाल्यावर लहान मुलांच्या कुस्या लावल्या जात.हळुच आखाड्यात रेवड्या उधळल्या जात.नंतर ५रूपया पासून इनाम सुरू होई.हळूहळू अखाड्याला रंगत येऊ लागे.नामांकित कुस्त्यांचे डाव पहाताना लोक तल्लीन होत.शेवटच्या कुस्तीवर सर्वात जास्त इनाम असे.शेवटची कुस्ती ही भागाची शान असलेल्या नामांकित पहिलवानावर लावली जायची.त्या नंतर हरहर महादेव चा गजर व्हायचा. व अखाडा संपायचा.

अशा प्रकारे प्रत्येक गावचा हा दोन दिवसाचा कार्यक्रम संपल्यावर गावात भयाण शांतता पसरायची.यात्रेचे दोन दिवस लोक पुन्हा पुन्हा आठवायचे.व पुढच्या यात्रेची वाट पाहीली जायची.

मित्रांनो आजही यात्रा भरवल्या जातात.परंतू यात पुर्वीची मजा नाही.नातेवाइकांविषयी आपुलकी नाही.जुन्या स्मृती विषयी ओढ नाही.लोकांना वेळ नाही.काहीजण तर यात्रेला सुट्टी नाही म्हणून येत नाहीत.आज पैसा आहे सर्व काही पैशाने विकत घेता येते.पुर्वी पैसे नसायचे.साधी बर्फाची गारीगार घेण्याची काहींची ऐपत नसायची.परंतू समाधान व आनंद हा प्रत्येकात कमालीचा होता.नातेवाईक,मित्र,मजा हिच त्यांची श्रीमती होती.


सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस