भागीत गुरूजी


१९ जुन १९८६ साली श्री.पंढरीनाथ भागीत गुरुजी मंदोशी गावच्या शाळेत हजर झाले. तत्पुर्वी शाळेची अवस्था अतिशय वाईट होती. जवळ जवळ वर्षभर शाळेत शिक्षकच नव्हते.

हुरसाळे वाडीचे कै.विठ्ठल मोरमारे गुरुजी त्यांची शाळा करुन दुपारी दोन तास शाळा उघडायचे.असे सतत वर्षभर चालले होते. त्याकाळात पुर्णवेळ शिक्षक नसल्याने खुप मुलांचे अतोनात  शैक्षणिक नुकसान झाले.

आम्ही चौथीला असतांना जुन महिना असावा. पाऊस पडायला सुरूवात झाली होती. ओढे नाले ओसांडुन वाहत होते. शाळा बंद असल्यामुळे पोरं मासे,खेकडे पकडणे, गुरे संभाळणे ही कामे करत होती.

आणि एक दिवस अचानकच सकाळी १०.१५ वा.शाळेची घंटा घणघणली. सर्व मुलांमाणसांना अश्चर्याचा धक्का बसला. कुणीतरी सांगितले नविन मास्तर आलेत. सर्वच लोकांना व मुलांना कोण नविन गुरूजी आलेत हे पाहण्याच्या उत्सुकते पोटी शाळेकडे आपापल्या मुलांना घेऊन शाळेकडे चालू लागले.

शाळेत गेल्यावर पहातो तर पांढरा शुभ्र कडक इस्त्री असलेला लेंगा,पैरण व टोपी गळ्यात मफलर असलेले गुरूजी आम्हाला दिसले. लोकांना गुरूजीनीच ओळख करून दिली.

मी श्री.पंढरीनाथ भागीत गुरूजी.इथे जवळच असलेल्या भोमाळे गावचा आहे. यापुर्वी कहू येथे होतो. आजच बदलीने या शाळेवर हजर झालो आहे.

तेव्हा उद्या पासुन सर्वांनी आपापल्या मुलांना शाळेत पाठवायचे. कुणीही मुलांना घरी ठेवायचे नाही. अशी लोकांना सक्त ताकीदच देऊन टाकली.तीही कडक शब्दांत.

दुसऱ्या दिवशी नियमित पणे शाळा भरली. साफसफाई झाल्यावर प्रार्थना सुरू झाली. नंतर राष्ट्रगीत झाले.

यापुर्वी आम्ही कधीच प्रार्थना किंवा राष्ट्रगीत म्हटलेले नव्हते. त्यामुळे शाळेत एक नविनच उत्साह जाणवत होता..

गुरूजींची शिकवण्याची पद्धत खासच होती. शिवाय शाळा सुटायच्या आधी अर्धा तास उजळणी, पाढे, कविता गुरूजींच्या मागे मोठ्याने म्हणताना मजा येत असे..नंतर हे सर्व मुलेच स्वतःहुन म्हणू लागली.

शाळेला जोडुनच पाठीमागे व शाळेच्या उजव्या बाजुला लोकांनी गुरे बांधण्यासाठी व पेंढा ठेवण्यासाठी पडव्या बांधलेल्या होत्या..गुरूजींनी सबंधितांना बोलावुन त्या पडव्या काढुन टाकायला सांगीतलंं.

यावर त्यांनी गुरूजी पडव्या काढल्या तर आम्ही गुरे कुठे बांधू? राहुद्या त्यांचा शाळेला काय त्रास आहे का?असे म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला..परंतू गुरूजींनी कडक भाषेत त्यांना ताकीद दिली.

दोन दिवसात पडव्या काढल्या नाहीत तर मला वर कळवायला लागेल! बघा मग ? ही मात्रा सबंधितांवर लागू झाली आणि त्यांनी लगेचच पडव्या काढायला सुरूवात केली.त्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील त्यांना मदत केली.

तेव्हा शाळेच्या उजव्या बाजुला व पाठी मागे मोठ मोठे उकिरडे होते. गुरूजींनी व विद्यार्थ्यांनी पाठीमागे रस्त्याच्या खाली मोठा चर खोदुन त्यामध्ये कचरा साठवण्याची व्यवस्था केली. बराचासा कचरा जाळून टाकला. या साठी ग्रामस्थांनी सुद्धा मदत केली.

भागीत गुरुजी आले तेव्हा शाळेची अतिशय वाईट स्थिती झाली होती एका बाजूला शाळेची भिंत ढासळली होती तर पुढील बाजूच्या खिडक्या तुटल्या होत्या शिवाय दरवाजाही तुटलेला होता त्यामुळे शाळेमध्ये कुत्री- मांजरे वास्तव्यास होती. त्यांनी बरीचशी जमीन उकरली होती.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून थोडेफार पैसे जमा केले. श्री.दुंदा बांगर यांनी पडलेली भिंत दुरुस्त करून दिली. श्री.कांताराम तळपे यांनी खिडक्या व दरवाजा दुरुस्त करून दिला. सौ.अनुसयाबाई शकर जढर(पारधी) यांनी शाळेच्या आतुन व बाहेरूनच्या भिंती, शेणा- मातीने लिंपून शेण व राखेने सारवून काढल्या. त्यासाठी त्यांना दहा रुपये मजुरी दिल्याचे मला स्पष्ट आठवते. 

हे सर्व झाल्यावर शाळेला छान पैकी रंग देऊन वर छताला रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या. शाळेला कुलूपाची सोय केली.

यापूर्वी शाळेला कुलूप नसायचे, त्यामुळे शाळेत इतर वेळी पत्त्यांचा डाव चालायचा. कुत्री - मांजरे आत जायची. शाळा कुलुप बंद झाल्यावर हे सर्व बंद झाले. अशा प्रकारे भागीत गुरुजीनी शाळेला नवचैतन्य दिले,

काळी परिपाठाला होणाऱ्या प्रार्थना राष्ट्रगीत व प्रतिज्ञा कविता, भक्तीगीते, भावगीते, समुहगीते यामुळे शाळेला नवचैतन्य आले. लोकही कौतुकाने हे सर्व ऐकायला बाहेर थांबत असत.

भागीत गुरूजी ज्यावेळी गावात प्रवेश करत असत किंवा लांबुन दिसत.तेव्हा खेळत असलेल्या मुलांची त्रेधातिरपट उडत असे.तात्काळ मुले हातपाय धुऊन दप्तर घेऊन शाळेचा रस्ता पकडत.स्वच्छ गणवेश,दररोज अंघोळ,बारीक केस,नखे काढलेली असलीच पाहीजे असा गुरूजींचा आदेशच असे. 

भागीत गुरुजींच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे बाहेर गावचे विद्यार्थी देखील मंदोशीच्या शाळेत दाखल होऊ लागले. त्यामुळे शाळेचा पट १२ वरून ३०च्या दरम्यान झाला. पर्यायाने दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती झाली.

सन १९९३ मध्ये भागीत गुरुजींनी इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यासाठी तेव्हाचे तत्कालीन उपसरपंच कै.शंकरराव हुरसाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व प्रयत्नातून पाचवीचा वर्ग मंदोशी गावात सुरू झाला. 

त्याबरोबर अजून एक शिक्षकांची नियुक्ती झाली.आता गावात भागीत गुरुजी, सुनील हांडे गुरुजी, कै. मुक्ताजी मदगे आणि शिवराम सुपे गुरुजी असे तीन शिक्षकआले. नंतर श्री,संजय नाईकरे आले.

पुढच्या वर्षी सहावीचा वर्ग मंजूर झाला. श्री संजय नाईकरे हे अजून एक शिक्षक हजर झाले. त्यानंतर सातवीचा वर्ग अशा प्रकारे इयत्ता सातवी पर्यंत शाळा मंदोशी गावात सुरू झाली. 

शाळेचे वर्ग वाढत असताना शाळेला वर्गखोल्या देखील मंजूर झाल्या.आणि शाळेला एकूण सहा शिक्षक मिळाले. यासाठी भागीत गुरुजींचे परिश्रम व योगदान हे अतिशय महत्त्वाचे होते. 

याच काळात अनेक विद्यार्थी तयार झाले. अनेकांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या लागल्या तर अनेक जण चांगल्या पदावर पोहोचले. 

मंदोशी गावचा शाळेचा पट १५३ वर पोहोचला तेव्हा बीट पातळीवर व केंद्र पातळीवर होणाऱ्या अनेक शालेय स्पर्धा मंदोशी गावात होत असत.

बाहेर गावचे विद्यार्थी व शिक्षक,गावचे विद्यार्थी व शिक्षक यांना जेवणाची व्यवस्था मंदोशी गावाकडुन असायची. त्यामुळे अनेक बाबींसाठी शाळेला गावानेही भरपुर सहकार्य केले.

पुर्वी शाळेत एक दोन तुकडे झालेला व तसाच जोडलेला फळा होता.शाळेचे दप्तर ठेवण्यासाठी एक छोटी लाकडी पेटी होती.पाय तुटलेला एक टेबल व खुर्ची होती.बस्स इतकेच काय ते साहित्य होते परंतू नंतर याच काळात नविन शाळेचे बांधकाम झाले.

नविन वर्गखोल्या,नविन कपाटे,टेबल खुर्च्या, नवीन बेंच, वाचनालया साठी नविन पुस्तके, टिव्ही, टेपरेकॉर्डर, स्पिकर सेट, खेळाचे साहित्य, भजनाचे साहित्य, बँड, ढोल, तुतारी,मुलांना नविन दप्तर, गणवेश, पाठ्यपुस्तके, स्काँलरशिप, विद्यावेतन मोफत दुध वाटप असे कितीतरी साहित्य व योजना आल्या. भागीत गुरूजींच्या काळात या छोट्या शाळेचे वटवृक्षात रूपांतर झाले.

केंद्र पातळी,बीट पातळी,तालुका पातळी वर शाळेचा भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.तसेच जिल्हा पातळीवर देखील शाळेचा तृतीय क्रमांक आला. यासाठी कै,मुक्ता मदगे गुरूजी,प्रसिद्ध हर्मोनियम वादक श्री.धर्मा बुधाजी तळपे यांचे मोलाचे योगदान लाभले.

भागीत गुरूजीं विषयी सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या मनात आदराची भावना होती.भागीत गुरूजी मंदोशी गावात सहकुटुंब तब्बल २२ वर्ष राहीले..ते गावचा एक घटक होते. 

गावातील प्रत्येक सामाजीक कार्यात ते भाग घेत. यात्रेला ते भरघोस देणगी देत. लोकांच्या सुखदुःखात भाग घेत.गावात वादविवाद झाल्यावर दोनही बाजुच्या लोकांना चार समजुतीच्या गोष्टी सांगत. प्रसंगी अर्थीक मदत देखील करत.

त्यांच्या काळात १२विद्यार्थी असलेला पट १५३ वर जाऊन पोहचला.व शिवाय एका शिक्षकाचे सहा शिक्षक झाले.शाळेला कै.मारूती मोरमारे, गुरूजी,श्री.शंकरराव विरणक,गुरूजी ,श्री.माळी गुरूजी असे पात्र मुख्याध्यापक लाभले. परंतू भागीत गुरूजींचे महत्त्व यत्किंचितही कमी झाले नाही.

श्री.पंढरीनाथ भागीत,श्री.सुनिल हांडे, श्री.संजय नाईकरे व कै.मुक्ता मदगे गुरूजी, किसन म्हातारबा तळपे यांनी ख-या अर्थाने विद्यार्थी घडवले. आज ते विद्यार्थी समाजाचा एक घटक बनुन चांगल्या प्रकारचे जीवन जगत आहेत. याचे श्रेय या सर्वांना दिले पाहिजे.

सन 2009 मध्ये त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाली. व ते जि प प्राथमीक शाळा साबुर्डी येथे हजर झाले. तेथेही त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्जानाचे काम केले.

एप्रिल 2023 मध्ये त्यांना विस्तार अधिकारी या पदावर अत्यंत अल्प काळासाठी पदोन्नती मिळाली. आणि लगेच जून 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.

आता भागीत गुरूजी कधीतरी भेटतात. मग आम्ही अवार्जुन वेळ काढुन गावातल्या मागील घटनांना ऊजाळा देतो.ते दिवस आठवतो. 

समाधानाची भावना आमच्या दोघांच्याही मनात तयार होते. "कालाय तस्मैय नमः"अशा या गुणसंपन्न शिक्षकाला भावी आयुष्य सुखसमृद्धीचे व आरोग्य संपन्न जावो ही सदिच्छा...








लेखक - रामदास तळपे ग्रामीण संस्कृती

गाव तस चांगलं ...

 गाव तसं चांगलं 

मंदोशी गाव हे ख-या अर्थाने महाराष्ट्रात प्रख्यात झाले ते पावसाळ्यात ओसांडून वाहणाऱ्या धबधब्यामुळे.पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग,डोंगर द-या मधुन ओसांडणारे पाणी व धबधबे..तत्कालीन शिक्षक श्री.संजयजी नाईकरे यांचे यामध्ये  मोठे योगदान आहे.पावसाळ्यात हे निसर्गवैभव पहायला हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात.

तसे पाहिले तर मंदोशी गावाने अनेकांना पुढे आणले.कै.विष्णू कमाजी हुरसाळे! के.खेमा तळपे,श्री,सहदेव जढर,कै.विष्णू पांडु तळपे,श्री.विष्णू गोमा तळपे,कै.हरिभाऊ आंबवणे श्री.बारकू तळपे, श्री.किसन गोडे,श्री.होनाजी मोसे श्री.कुशाबा अंबेकर या नामवंत पहिलवानांनी अनेक संस्मरणीय कुस्त्या केल्या.त्याकाळी या कुस्त्या केवळ पागोट्यावर  (फेटा)  असत.त्यानंतर श्री.हरिभाऊ हुरसाळे,श्री.महादू मोहन, श्री.अशोक सुतार,श्री.दत्ता आंबवणे,श्री.अंकुश हुरसाळे, श्री.प्रकाश आंबेकर ,.दत्ता तळपे,श्री.सुरेश तळपे,श्री.भिमाजी मिलखे अशा अनेक जणांनी गावचे नाव अजरामर केले.पश्चिम भागात मंदोशी गावाला एक परंपरा होती..भागात दरारा,होता नावलौकिक होता.

जसे गावासाठी पहिलवान मंडळींचे योगदान होते.तसेच अनेक कलाकार सुद्धा होते..फार पुर्वी गावचा तमाशा होता.कै.विष्णू हुरसाळे,कै.मोतीराम मोहन,कै.संपत जढर कै.बुधाजी तळपे, कै.शंकर अहिलू तळपेअसे असे अनेक कलाकार होऊन गेले या कलाकारांनी त्यांची कला कोकणापर्यंत सादर करून मंदोशी गाव कुठेतरी आहे याची जाणीव करून दिली.त्यानंतर गावात हर्मोनियम (पायपेटी) पेटीमास्तर तयार झाला पाहिजे या जाणिवेतुन गावाने श्री.धर्मा बुधाजी तळपे यांना हार्मोनियम शिकवण्यासाठी गावाने पेटीमास्तरची नेमणुक केली.त्याचा संपुर्ण खर्च (पगार) त्यावेळी गावाने उचलला.नंतर गावाने त्या काळात साधारण १९६८-६९ साली रुपये गावाने वर्गणी काढून ५०००/-ची मुंबईवरून नवीन पायपेटी विकत आणली.त्यानंतर परत एकदा कै.सिताराम तळपे.श्री.चिंधू धोंडू तळपे.कै.नामा जढर यांनी सुद्धा तमाशासाठी योगदान दिले.

मंदोशी गावचे एकतारी भजन फार प्रसिद्ध होते.कै.बाळासाहेब तळपे (सरपंच ) वीणा व चिपळ्या अप्रतीम वाजवायचे. कै.ज्ञानदेव तळपे पखवाद उत्तम वाजवायचे.त्याकाळात या भजनाला वाडा,भिमन्याहार व भामन्याहार अशा दोन्हीही भागात या भजनाला प्रचंड मागणी होती.त्यांनीही एक प्रकारे गावाचे नाव रोशन केले.

जावळेवाडीचा तमाशा सुद्धा मला आठवतो..कै.नारायण तळपे व श्री.बबन गोडे (मा.सरपंच) (राजा) श्री.शंकर गवारी (कल्याण) व श्री.दुलाजी गोडे (चेअरमन) द्वारपाळ हे पात्र करायचे.गोडे परिवाराचा सुद्धा पुर्वी गावात दरारा होता.वचक होता.त्यांच्याकडे खेड,आंबेगाव.व जुन्रर तालुक्यातुन अनेक लोक येत असत.येवढे त्याकाळात त्यांचे येवढे सबंध होते.हे अश्चर्यकारकच म्हणावे लागेल.त्याच प्रमाणे कै.शंकर राघुजी हुरसाळे यांचे सुद्धा तत्कालीन राजकीयय पुढारी खासदार श्री.अशोकराव मोहळ,कै.साहेबराव सातकर,आमदार कै.नारायणराव पवार अशा अनेकांशी जवळचे संबध होते.

पश्चिम भागात कै.बाळासाहेब तळपे यांचा सुद्धा प्रचंड दबदबा होता.परंतु अल्पावधीतच त्यांची राजकिय कारकिर्द बहरलीच नाही त्यातच ते गेले.

श्री.धर्मा तळपे,श्री.सुदान बारवेकर,कै.चंद्रकांत मोहन,श्री.बबन आहिरे,श्री.दिगांबर उगले,कै.विष्णू पांडू तळपे यांनी सगीत भजन तालुक्यात प्रसिद्ध केले मला आठवतय सन १९९५ साली मंदोशी गावच्या भजनाचा प्रथम क्रमांक आला होता. सन २००५ पर्यत या भजनाचा सुवर्णकाळ होता.मला आठवतय आठवड्यातील चार दिवस हे भजन बाहेरगावी असायचे.ख-या अर्थाने मंदोशी गावाचे नाव तेव्हा सगळीकडे दुमदुमत होते.कै.चंद्रकांत मोहन यांची भजने अद्यापही कानात रुंजी घालतात.

पुर्वी गावात लग्न कार्यासाठी,यात्रांसाठी गावचा ताफा फार प्रसिद्ध होता..श्री.नामदेव रोकडे (सनई)कै.शांताराम रोकडे (सनई) श्री.कचर रोकडे (ताशा) बबन आहिरे (ताशा) कै.श्रीपत रोकडे धोटा,श्री.शिवराम रोकडे (ढोलकी/ संबळ) यांच्या ताफ्याला सन १९८५ ते १९९९ पर्यत प्रचंड मागणी होती.हा ताफा खेड,आंबेगाव,जुन्नर व मावळ या चार तालुक्यामध्ये गावचे नाव गाजवत होता.ख-या अर्थाने मंदोशी गाव जिल्ह्यात पोहचवण्याचे काम या मंडळींनी केले आहे.

श्री.दत्ता आंबेकर श्री.अंकुश हुरसाळे.यांनी दे आई प्रतिष्ठाणची स्थापना करून भागात प्रथमच हळदीकुंकू,आरोग्य तपासणी, झाडांचे वाटप,भजन,किर्तन या सारख्या माध्यमातून समाजसेवेची मुहर्तमेढ रोवली व अद्यापही त्यांचे कार्य चालू आहे. हाच धागा पकडून कोकाटवीर देवस्थानच्या माध्यमातून श्री शंकर गवारी व श्री.सखाराम गोडे यांचेही समाजासाठी मोठे योगदान आहे.

कै.नारायण हुरसाळे यांनी म्हटलेले श्लोक कै.दत्तू हुरसाळे यांनी म्हटलेले श्लोक व मंगलाष्टका श्री.सुदाम बारवेकर यांनी वाचलेली पोथीव अध्याय अद्यापही जुने लोक विसरू शकलेले नाहीत.

श्री.वामण जढर यांच्या अमृता व नमृता या दोन मुलींनीसुद्धा बाल किर्तनकार म्हणून भरपुर प्रसिद्धी मिळवली व गावचे नाव महाराष्ट्रभर पोहचवले.

आताही ह.भ,प.अशोक महाराज हुरसाळे एक तरूण प्रवचनकार व किर्तनकार म्हणून नावारूपाला येत आहेत.श्री.रोहिदास व श्री.एकनाथ वाघमारे श्री.गोपाळ हुरसाळे श्री.सुदामराव तळपे साहेब श्री.दत्ता गोडे,श्री.नामदेव हुरसाळे,श्री नामदेव तळपे साहेब (मंदिर बांधकामात मोलाचे कार्य)श्री.एकनाथ तळपे (उपसरपंच / बिरसा ब्रिगेड)श्री.अरूण मोहन श्री.यमन हुरसाळे, श्री.शिवाजी हुरसाळे,श्री.अनिल तळपे (अध्यक्ष शिक्षक समिती) श्री.देवराम मोहन यांचे सुद्धा गावासाठी भरपुर योगदान आहे. श्री.शंकरराव गवारी हे सुद्धा सामुदायिक वधूवर सुचक मंडळाच्या माध्यमातून काम करत आहेत त्यांनी सुद्धा गावचे नाव नाशिक,अहमदानगर,ठाणे व पुणे अशा चार जिल्ह्यात नेले आहे.प्रा.श्री.गणेश हुरसाळे सर यांनी सुद्धा पुण्यासारख्या विद्येचे माहेघर असलेल्या शहरात शुन्यातुन ज्ञानज्योत क्लासेसच्या माध्यमातून मंदोशी गावचे नाव मोठे केले आहे. २५-३० शिक्षक त्यांच्याकडे नोकरी करतात.मी सुद्धा ग्रामीण संस्कृतीच्या माध्यमातून गावचे नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.प्रत्येक जनआपापल्या परीने गावचे नाव मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत या सारखा आनंद नाही.तरी  सगळेजण एकत्र येत नाही.हे मोठे दुर्देव म्हणावे लागेल..



बोलीभाषेतील हद्दपार झालेले ग्रामीण शब्द

आपल्या लहानपणी आपण सर्रास वापरनारे अनेक ग्रामीण बोलीभाषेतील शब्द आज जवळ जवळ हद्दपार झाले आहेत.जे शब्द उच्चारत आपण घडलो,वाढलो मोठे झालो त्या शब्दांबाबत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या भावनेतुन आज मी जुन्या  मराठी भाषेतुन हद्दपार किंवा खुप दिवस आपल्या कानावर न पडलेल्या शब्दांना उजाळा देत आहे.हे शब्द वाचताना या शब्दाबद्दल तुमच्याही काही आठवणी असतील तर त्या जागृत झाल्याशिवाय राहणार नाहीत. 

तसेच शहरात रहाणा-या आपल्या मुलांबाळांना सुद्धा याचा उपयोग होईल.आणि आपली प्रिय मातृभाषा ही लयास न जाता ती दिवसोंदिवस वृध्दींगत झाली पाहिजे याचे भान तुम्ही आम्ही सर्वांनी ठेवणे हे अत्यंत आवश्यक आहे.

शेतीनिष्ट शब्द

कुडवना - जमीन खणन्याचे लाकडी छोटे औजार.

सरजाम -शेतीची मशागत करण्यासाठी लागणारी सर्व                          औजारांचा संच.

शेत नांगरणी साठीचे लाकडी औजारे

नांगराचा दात, हाळस. रूमणे, मुठ, जुकाड, शिवाळं, यालं कुळव, कुळवाची दांडी. लोड. फराटं

लोखंडी वस्तू 

साखळी, फास, वसू, फाळ, पहार, टिकाव, खोरे (फावडे ,

चामडी वस्तू 

जुपण्या. चाबुक असे अनेक शब्द आहेत ते प्रांत निहाय बदलू शकतात.

मोट - विहिरीतुन शेतीसाठी बैलांच्या साहाय्याने पाणी                      काढण्याचे साथन

पखाल - विहिरीतुन मोटेच्या सहायाने पाणी साठवुन वर                      काढण्याचे चामड्यापासुन बनवलेले साधन

धान्य साठवणूक करण्याच्या वस्तू 

कनंग - मेसकाठीपासुन बनवलेले भात साठवण्याचे धान्य                  कोठार.

कनगा- कनगी पेक्षा थोडा मोठा असतो.

तटटया - भात साठवण्याचे चटई सारखे मेस काठी पासुन                    बनवलेले कोठार.यातील धान्य संपल्यावर वळकुटी                  करून ठेवता येते.

पाटी -  शेण किंवा धान्य वाहुन नेण्यासाठी वापर करतात.

हारा -  पाटी पेक्षा थोडा  मोठा असतो.

दुरडा-  लग्न,पुजा किंवा जेवणावळीसाठी या मध्ये भात                      ठेवतात.

टोपले- या मध्ये भाकरी ठेवतात.

डुरकुले व कणगुले - कणगी पेक्षा अगदी लहान असते.

बलाद - भिंतीमध्ये धान्य साठवुन ठेवण्यासाठी केलेली व्यवस्था.

डालगे- कोंबड्या एकत्रित करून वरून हे ठेवतात.

डालगा - वाळलेला पालापाचोळा वाहुन आणन्याचे साधन .

सुप- धान्य पाखडण्याची (नीट करणे) वस्तू.याचा उपयोग भात         उपणने व त्याला वारा घालने ,देवक बांधने,बलुतेदारांना           धान्य वाटने यासाठी करतात.

मासे पकडण्याची साधने.

तोंडया,भोताड ,बुडदुड,येंडी,गळ

पेटे - सहा -सात वाळलेले भोपळे च-हाटाच्या सहाय्याने एकत्र         बांधुन केलेले साधन याचा उपयोग  नदीतील पाण्यातुन           पैलतिरावर जाण्यासाठी केला जातो..

धान्य मोजन्याची साधने.

पायली, अधुली, आठवा, निठवा. मापटी, चिपटी.

स्वयंपाकाची साधने - 

चुल - चुल स्वयपाक करण्याची  मातीचे साधन चुलीच्या पाठी थोडी जागा असते त्याला भानवस म्हणतात.चुलीच्या उजव्या बाजुला वऊल असते त्यावर तयार झालेले भात किंवा कालवणाचे पातेले ठेवतात.वऊलाच्या पाठीमागे एक मडके पुरलेले असते.त्यात मीठ ठेवतात .हे सर्व चुलीचेच भाग असतात.

दांड-  चुलीच्यावर आडवा बांधलेला बांबू किंवा काठी यावर               पावसाळ्यात घोंगडी वाळत घालतात.

काठवट - पुर्वीचे पीठ मळण्याचे लाकडी भांडे.

कहाल - पेजवळ्या (घावणे)करण्याचे कच्च्या लोखंडापासुन                  बनवलेले भांडे.

तानतवली /चरवी किंवा कासांडी - दुध ठेवण्याचे छोटे पसरट                                                  व उभट भांडे.

तवली - कढी,आमटी व बोंबलाचे कालवण करण्याचे मातीचे               भांडे.

माठ-  पिण्याचे पाणी ठेवण्याचे मातीचे भांडे.

रांजण - ताक बनवण्याचे मातीचे मोठे भांडे.

आहार - पेटलेल्या चुलीतील निखारे

चाटू -  आमटी,कालवण वाढण्याचे लाकडी साधन.

पितळी - जेवणाचे ताट.(पितळ्या ह्या पितळ या धातुपासुन                   बनवलेल्या असत.)

पाटा- यावर मिरची वाटतात.दगडी साधन

वरवंटा - मिरची वाटण्याचे दगडी साधन

घडोशी - घडवंची यावर पाणी पिण्याची भांडी ठेवतात.हांडे                   वगैरे..

तपेले - मध्यम आकाराचे तांब्या किंवा पितळाचा छोटा हांडा .

चिमटा - चुलीतील निखारे किंवा गरम वस्तू उचलन्याचे साधन

इंगळ - चुलीतील पेटलेले कोळसे

उखळ - भात कांडण्यासाठी असलेले दगडी खोल दगडी (गल)             साधन

मुसळ - भात कांडण्याचे लाकडी साधन

शेंबी - मुसळाच्या तळाला असणारे लोखंडी गोल आकाराची             वस्तू.

कालवण - आमटी किंवा पातळभाजी

कोरडयास- आमटी किंवा पातळ भाजी

चोपणे - पुर्वी प्रत्येक घरामधील जमीन ही मुरूम टाकुन                        चोपण्याच्या साहायाने चोपुन सपाट केली                              जायची. त्यानंतर शेण व पाणी एकत्र करून                          जमीणीवर ते मिस्रण शिंपडले जायचे.त्याला शेणकाला करणे म्हणतात.त्यावर परत चोपण्याच्या सहायाने चोपुण सपाट करायची.

बारी - खिडकी

कोन्हेरे /देवळी - घरातील छोट्या वस्तू ठेवण्यासाठी भिंतीत केलेली आलमरी ,कपाट

घोंगता - पावसापासुन भिजू नये यासाठी घोंगडीमध्ये प्लँस्टीक कागद घालून तयार करतात..

तिळस - लोखंडी तार घोंगडीचा घोंगता निसटून जाऊ नये यासाठी तिळशीचा उपयोग करत,

तडकी - कारवीच्या लाकडाच्या काठ्यांपासुन बनवलेला झाप दरवाजा)

कुहीट - गवताचे छप्पर पुर्वी गावात ७५% घरे कुहीटीची असत.

पडाळ- जनावरांचा गोठा

दगडाचे जोते - पुर्वी श्रीमंत लोकांचे वाडे व घरे जोत्यांची असत.जोते म्हणजे घराच्या पायाचे दगड हे जोते तीन थरांचे असते.सगळ्यात खालच्या दगडाला बेंद्री म्हणतात.त्याच्या वरच्या थराच्या दगडाला गुंड्या म्हणतात तर सर्वात वरच्या दगडाला पानथरी असे म्हणतात.जोते हे दगड घडवून तयार करावे लागायचे.खुपच कष्टप्रद असे हे काम होते.आता जोते बनवने कारागिंरा अभावी नामशेष झाले आहे.(आमच्या घराचे जोते अजुनही शाबुत आहे)

 घराविषयी च्या वस्तू 

खांब - लाकडाचे असतात.

तुळई -  लाकडाचा मोठा खांब दोन समोरासमोरील लाकडी खांबावर ठेवतात.

लग -एक लाकडी खांबाचा प्रकार दोन शेजारील खांबावर ठेवतात.

आडं - पुर्वी घरे बांधताना घराच्या मध्यभागी तुळईच्या वर                  छोट्या खांबाचे आडे असायचे.

पाखाडी  - घराच्या आड्यच्या दोन्ही खालच्या बाजुकडे  छोटे खांब असतात त्याला पाखाडी म्हणतात.

वासे - घराच्या छपरावर लाकडाचे लांब बांबू आडे व पाखाडी             यावर बसवतात.

बँटम - लाकडाच्या छोट्या पट्या.वास्यांवर आडव्या बाजुने                  ठोकतात.त्यावर कौले बसवतात.

खण- घरातील दोन खांबामधील अंतर (साधारण पाच फुटांचे अंतर) पुर्वी घरे ही तीन खण,पाच खण व नऊ खणांची असत.

पडद्या - घराच्या समोरील व घरातील आडव्या भिंती.

चांधई - घराच्या दोन्हीही बाजुच्या दगडी भिंतीवरील निमुळत्या             विटांच्या भिंती.

पडघी/ पढई - घराच्या मागच्या बाजुची छोटी आडवी खोली.

कोन्हेरे- भिंतीमधील छोटे बिगर दरवाजाचे अत्यंत छोटे कपाट.याला देवळी हा पण शब्द आहे.

भंडारी- घराची छोटी खिडकी

भानलस - चुलीच्या मागील ओट्याची जागा...भाकरी भाजल्यावर तवा उभा करतात..शिवाय भानवशीच्या उजव्या बाजुला छोटे मडके असायचे त्यामध्ये प्रामुख्याने मीठ ठेवत.व त्यावर छोट्या गाडग्या मडक्यांची उतरंड असे.भानवशीवर प्रामुख्याने मांजरे झोपत. 

घडुशी - पाण्याची भांडी ठेवण्यासाठी असलेली लाकडी घडवंची या घडवंचीला तीन लाकडी पाय असत.त्यावर हांडे व इतर भांडी ठेवत.घडवंच्या मध्ये दोन प्रकार होते.साधी लाकडाची तीन पाय असलेली व दुसरी चार लाकडी पाय असलेली घडवंची.शिवाय या घडवंचीलाच छोटी लाकडी मांडणी असे.त्यामध्ये पितळी व तांब्यांची भांडी ठेवत.त्याकाळी हे दृश्य अगदी शोकेस कपाटासारखे दिसे.

मांडव - पुर्वी प्रत्येकाच्या घरासमोर मांडव असायचा.मांडवा                 शिवाय घराला शोभा नसे.

मेढी - मांडव तयार करण्यासाठी घराच्या अंगणात दोन्ही  आडव्या बाजुला तीन दोन इंग्रजी  Y सारखे लाकुड रोवत.

दर खणने- मेढी रोवण्यासाठी छोट्या पहारीने घेतलेला खड्डा.

फोकाट्या - मेढींवर उभे आडवे ठेवण्यात येणारे लाकडी बांबू.त्यावर निर्गुडीच्या फांद्या टाकून त्यावर गवता किंवा भाताचा पेंढा टाकत.झाला मांडव तयार...या मांडवात दुपारी स्रीया रिकाम्या वेळेत गोधड्या शिवत,..पोरे पत्ते खेळत..दारावर आलेले लोक ( डबे करणारा,मासे घेऊन येणा-या कातकरणी,भांड्यावाला,बांगड्यांवाला,  सुया दोरा विकणा-या वैदीनी,बोंबील,वाकट,भाजी विकणारे असे सगळेच लोक अथवा बायकांचा सौदा या अंगणातच होत असायचा.

शेनकाला - भरपुर शेन व पाणी एकत्र करून अंगणात टाकुन खराट्याने सगळीकडे पसरवणे..यालाच शेनकाला म्हणतात.हे वाळल्यावर अंगण सुंदर दिसते.

हगामा- हंगामा...कुस्त्यांचा आखाडा 

उरूस - यात्रा

सुपारी फोडणे - साखरपुडा

द्याज - पुर्वी नवरदेवाकडुन नवरीकडील मुलीला ठराविक 

         किलो तांदुळ,डाळ व पैशाच्या स्वरूपात दिले जाणारी             मदत.

गरसुळ - मंगळसुत्र

तोडे - पायात घालायचा पुर्वीचा एक दागीना. याला बाजूबंद               देखील म्हणतात 

याळा - दंडात घालायचा पुर्वीचा एक दागीना

पुतळ्या - गळ्यात घालायचा पुर्वीचा एक दागीना

इस्तू- विस्तव

सपार - मातीच छोटे घर

कुत्रू- कुत्रा

केरसुणी - झाडू

शिरई- झाडू

औंदा/ यंदा - यावर्षात

कुपितार - विचित्र 

गैबान्या - मंद

किडुक - साप

इळंमाळं - दिवसभर

सानच्याला - संध्याकाळी 

जित्राब - म्हशी..जनावर

कापड - कपडे

ढाळवांत्या - जुलाब व उलट्या

गोमतार - गोमुत्र

माळवं - भाजीपाला 

धसकाट - ज्वारी बाजरी भात कापल्यावर जमीनीत राहिलेला                  काही भाग

चघाळ - जनावरांचा खाऊन उरलेला चारा 

म्होरं - पुढे

इदरं - द्वाड ,हट्टी

तिवडा - पूर्वी धान्य मळण्यासाठी खळ्याचा वापर करत. खळ्यात कणसं टाकून त्यावर बैल, फिरवलेजायचे. त्यांना गोल फिरता यावे म्हणून खळ्याच्यामध्ये उभे लाकूड रोवले जायचे त्याला तिवडा म्हणत.

भुसकाट -धान्य मळल्यानंतर जो बारीक भुगा राहतो त्याला                   भुसकाट म्हणतात. याला जनावरं खातात.

वैरण -ज्वारी, बाजरी व भात काढल्यानंतर जो भाग एका जागी           बांधून पेंडी बांधली जायची त्याला वैरण म्हणतात

वळचण - घराच्या उतरत्या भागावरून जे पाणी पडते तो                       पत्र्याचा भाग जरा लांबपर्यंत घेतलेला असतो                         त्यामुळे पाणी घरापासून लांब पडते. 

बलुतं - पूर्वी वस्तू विनिमयाची पद्धत होती. त्यावेळी शेतकर्‍यांच्या गरजा गावातच भागवल्या जायच्या. सुतार, लोहार, तेली, माळी असे बारा प्रकार असायचे त्यांना बलुतं म्हणत. या बलुत्यांना शेतकरी आपल्या शेतात जे पिकेल ते थोडं थोडं प्रत्येकालाच देत असे त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत असे.

लोंबी - गहू पेरल्यानंतर ज्यामध्ये गहू तयार होतो त्याला लोंबी म्हणतात.

तलंग - कोंबडीच्या लहान पिल्लाला तलंग म्हणतात.

कालवड - गाईच्या लहान पिल्लाला स्त्रीलिंगी असले तर              कालवड म्हणतात व पुल्लिंगी असेल तर खोंड म्हणतात.

रेडकू - म्हशीचे लहान पिल्लू स्त्रीलिंगी रेडकू आणि पुल्लिंगी                असेल तर टोणगा/रेडा म्हणतात.

दुरडी -दुरडी मेसाच्या कांब्यापासून तयार करतात त्यातून पाणी गळते... धान्यात माती, कचरा असला तर ते धान्य दुरडीत टाकायचे दुरडीत पाणी घेऊन किंवा पाण्यातच दुरडी हालवायची त्यामुळे माती केर-कचरा निघून जातो.

हारा - मेसाच्या कांब्यापासून विणून तयार केलेला असतो. लहान असते त्याला टोपलं म्हणतात, मोठ असेल त्याला हारा म्हणतात. जास्तकाळ हारा टिकावा म्हणून शेणाने सारवला जातो.

बाचकं -धान्य भरण्यासाठी पोत्याचा उपयोग केला जातो त्यात             छोटं पोतं असते त्याला बाचकं म्हणतात.

वटकावण, -भाकरी भाजीत भिजू नये म्हणून पितळीत भाकरी ज्या बाजूला असेल त्या बाजूला उंचवटा करायचा. हा उंचवटा करण्यासाठी एका बाजूला उतार असलेला लाकडाचा तुकडा असायचा. त्यालाच वटकावण म्हणत

पका - खुप

तेली - त्याला

वांझुटी - मुल नसलेली स्त्री

 पडाळ - पडवी गुरे बांधण्यासाठी केलेली जागा  

खंडी -२० मणाची खंडी.

मण -४० शेराचा मण.

पायली -दोन आदुल्या म्हणजे पायली.

आदुली - चार आठवे म्हणजे एक आदुली.

औदासा - एक शिवी 

मापटं -(आठवा) एक शेर म्हणजे  दोन मापटं (आठवा)

चिपटं -(निठवा) दोन चीपटं म्हणजे एक मापटं(आठवा)


 

नविन शाळेवर रूजू होताना...


नवीन शाळेवर रुजू होताना... अनिल तळपे सर यांचा लेख 

काळाचौकी :- आटपाडी गाडीने विभुतवाडीत सकाळी ५:१५ ला कंडक्टरने बेल वाजवली चला विभुतवाडी अर्धवट झोपेतून जागे होऊन मी आणि माझा गावाकडचा मित्र वसंत आम्ही एक पिशवी व एक भांड्यांनी आणि आंथरून पांघरूनांनी भरलेलं पोतं घेऊन गाडीतून खाली उतरलो कंडक्टरने पुन्हा बेल वाजवली आणि गाडी आटपाडी च्या दिशेने निघून गेली.

आम्ही तसेच आंधारात रस्त्यावर उभे होतो.आम्ही इकडे तिकडे पाहत होतो,जवळ जवळ ८०% गाव झोपलेले होते.मध्येच कुणाचा तरी खाकरण्याचा आवाज येत होता. कुत्री  भुंकत होती.खूप भीती वाटत होती.कारण भाग नवीनच होता.आम्ही शाळा शोधत होतो.तेव्हढयात तिथे हातात डबडे घेऊन एक म्हातारा आम्हाला दिसला.त्याला विचारले शाळा कुठेय त्याने समोर हाथ केला,आणि रस्त्याच्या पलीकडे आहे हातानेच सांगितले.मग वसंतच्या डोक्यावर पोते माझ्या हातात पिशवी घेऊन आम्ही शाळेजवळ पोहचलो. आणि उजेड यायची वाट पाहू लागलो.

दुसऱ्या दिवशी शनिवार होता शाळा सकाळचीच होती. सात साडेसात वाजता अपर्णा बसागरे मॅडम शाळेत आल्या व त्यांनी आमची विचारपूस केली. त्या स्वभावाने जरा कडकच होत्या. आमच्याकडेच पोते पाहून त्या जरा रागातच म्हणाल्या कोण आहेत तुम्ही? आणि इथे काय घेऊन आलात? ते पहिलं उचला आत्ता इथे शाळा भरणार आहे. मग त्यांना मी सांगितले की मी गुळेवाडीला नवीन शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी आलो आहे. थोड्या वेळाने आम्ही गुळेवाडीला जाणार आहोत.

हे ऐकुन मॅडम ला जरा आपण बोलल्याचा पश्चाताप्त झाला. आणि हासून म्हणाल्या सॉरी हं थांबा तुमच्या पिशव्या आणि पोते एका वर्गात ठेवा.गुळेवाडीचे शिक्षक श्री.ज्योतिराम सोळसे सर आता येतीलच.त्यांना थांबवण्यासाठी एका मुलाला बाईंनी रस्त्यावर पाठवले.

थोड्याच वेळात सोळसे सर त्यांच्या हिरो होंडा CD 100 गाडीवर आले .बसागरे बाईंनी त्यांना आमची ओळख करून दिली.त्यांना देखील खूप आनंद झाला.कारण सहा महिने ते एकटेच शाळेत होते.आणि नवीन जोडीदार आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. 

मग आम्ही त्यांच्या गाडीवर बसून गुळेवाडीला गेलो .शाळेच्या दोन वर्ग खोल्या होत्या. पट संख्या 40 च्या आसपास होती. शाळा मोकळ्या माळावर होती.शाळेत रुजू झालो.सरांनी शाळेची जरा माहिती सांगितली.11:30 ला शाळा सुटली 

मग आम्ही पुन्हा विभुतवाडीत आलो.तिथे आम्हाला शेळके सर (मेजर) ,भाबड सर भेटले दोघेही विभूतवाडीत राहत होते. Solase सरांनी त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि त्यांना माझ्यासाठी विभुतवाडीत रूम शोधा असे सांगितले व संध्याकाळी जेवायला झऱ्याला या असे सांगून ते निघून गेले.

मग आम्ही दोघे विभुतवाडीच्या शाळेत गेलो जिथे साहित्य ठेवले होते त्या खोलीची चावी घेतली. हॉटेल मध्ये नाष्टा करून रूम शोधायला गावात गेलो पण मनासारखी एकही रूम पसंत पडेना दुपारी शेळके सर आमच्याकडे आले आणि त्यांनी आम्हाला एक रूम पाहण्यासाठी घेऊन गेले, ती रुम पाहून मला तर घामच फुटला ती एका गोठ्यासारखी रूम होती,तिथे एक म्हातारी एकटीच राहत होती.तिची तिथे खूप एकावर एक रचून ठेवलेली मडकी होती. अंघोळीला बाथरूम नव्हते.आंघोळीची जागा बाहेर मोकळ्या जागेत होती.हे पाहून मला खूप वैताग आलेला होता.

मनातून आसं वाटत होतं की आहे आसं पुन्हा घर गाठावं नको ती नोकरी कुठं इथं येऊन पडलोय आसं वाटत होत.

शेवटी सायंकाळी ५ वाजता आम्ही चालत चालत झऱ्याकडे निघालो. झऱ्याला पोहचल्या नंतर झरे जरा चांगले गाव वाटले.इकडे तिकडे फिरल्या नंतर आम्ही कारगिल धाब्याजवळ एक आर्धावट कंपाऊंड होत त्यावर जाऊन आडवा पडलो आभाळाकडे पाहिले, आणि क्षणभर गावाकडे आसल्याचा भास झाला.

आणि ठरवलं की आता बास्स नोकरी सोडून गावाला जायचं आणि काहीतरी उद्योग व्यवसाय करायचा.पण इकडे थांबायचे नाही 

तिथून आम्ही झरे स्टँड वर आलो.पिंटू राजमाने यांचे s.t.d. बूथ होतं. तिथून घरी फोन लावला आणि मुद्दाम सांगितले की हा भाग खूपच थर्डक्लास आहे.इथे रूम मिळत नाही दुकाने नाहीत कसलीही सुविधा नाही. मी घरी येऊन काहीतरी उद्योग व्यवसाय करतो,पण इकडे राहणार नाही मी उद्या गावाकडे निघणार आहे.

हे ऐकुन आमचा मोठा भाऊ (दादा) त्याला थोडं टेंशन आले. तो मला म्हणाला आरे तू  शिक्षक झाला आहेस ,तर तू एक काम कर, आत्ता लगेच येऊ नको, तू एक महिनाभर तिकडेच थांब शिक्षकाची नोकरी कशी आसते फक्त अनुभव घे आणि नाही आवडलं तर मला न विचारता घरी निघून ये.फक्त महिनाभर थांब. हे ऐकुन मला आनंद झाला.

 मग मी ठरवलं फक्त महिनाभरच रहायचय महिना आसा निघून जाईल आणि मग थेट गावाला निघून जाईन पण इथे राहण्याची इच्छा नव्हती.

मग आम्ही सोळसे सरांच्या घरी गेलो नुकताच त्यांचा मुलगा धीरु चा जन्म झालेला होता १० ते १५ दिवसांचा आसेल.तिथे आम्ही जेवण केले. सरांच्या सासूबाई तिथे आल्या होत्या.त्या म्हणायच्या की एवढा लहान आणि  मास्तर कसा झाला. त्या वेळी माझे वय २० वर्ष होत आणि तब्ब्येतही किरकोळच होती. जेवण झाल्यानंतर आम्ही चौकात गेलो जरा फिरलो सरांना सांगितले की विभुतवाडीत करामत नाही झऱ्याला रूम बघा त्यांनी हो म्हटलं आणि सरांचा निरोप घेऊन आम्ही झोपायला पुन्हा विभूतवाडीला आलो.

विभूत वाडीत गेल्यानंतर तिथे विभूतवाडीची आमच्या वयाची मुले आमच्याकडे बसायला आली,गप्पा गोष्टी झाल्या मग ती निघून गेली  

दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्ही हात पाय धुऊन पुन्हा झऱ्याला गेलो सोळसे सरकडे जेवण करून रूम पाहण्यासाठी गेलो. त्यांनी आम्हाला आमोल कारंडेची रूम (आताच्या प्रथमेश मेडिकलच्या शेजारी) समोर राजू न्हावी यांचे केशकर्टणालय चे दुकान होते. तर ती रूम जरा चांगली वाटली, तिथे पत्त्यांचा डाव चाललेला होता.रूम बद्दल विचारल्यावर अमोल तोंडातील गुटका थुंकून म्हणाला की रूम मिळेल पण एका आटीवर मास्तर शाळेत जरी गेले तरी  रुमची चावी आमच्याकडे राहील कारण दुपारच्या वेळेस तिथे पत्त्यांचा डाव चालायचा. मी देखील तयार झालो कारण आंथारून पांघरूण व पुस्तके सोडून माझ्याकडे काहीच नव्हते.

अशा तऱ्हेने रूमचा प्रश्न सुटला दुपारी आम्ही विभुतवाडीला जाऊन आमचे साहित्य आणले, खोली स्वच्छ करून साहित्य खोलीत ठेवले. मनातील ओझ कमी झाल्यासारखं वाटलं मग आम्ही पुन्हा कारगिल ढाब्याच्या कट्ट्यावर गेलो तिथे जरा बसलो  अंधार पडल्यावर आम्ही रूमवर आलो.वसंत नी स्वयंपाक केला.व कसा करायचा ते शिकवलं  मग आम्ही जेवण केले.चौकातून फिरून आलो आणि झोपून गेलो.

सकाळी वसंत लवकरच उठून अंघोळ करून तयार होता.मी म्हटले आरे एवढ्या लवकर कशाला उठलाय.तो म्हणाला आसेच मग मी उठलो अंघोळ केली,तो म्हणाला चल आपण चौकात चहा घेऊन येऊ.चहा घेतल्यानंतर आम्ही चौकात थांबलो तेवढ्यात ८:१५ ची सांगोला सातारा गाडी आली आणि वसंत पटकन गाडीत जाऊन बसला क्षणभर मला कळलेच नाही, कंडक्टर ने बेल वाजवली गाडी निघून गेली.मी गाडीकडे पाहताच राहिलो .खूप रडायला आले .मनातल्या मनात रडत तसाच रूमवर आलो. मला करामत नव्हते दुपारच्या गाडीने पुन्हा निघून जायचे आसा विचार मनात आला. तेव्हढ्यात सोळसे सर आले आणि म्हणाले सर चला शाळेत जाण्याची वेळ झाली.

मग मी सावध होऊन शाळेत जाण्यासाठी निघालो. त्यांच्या बरोबर शाळेत गेलो.परंतु माझे शाळेत लक्ष च लागत नव्हते.

शाळा सुटल्यावर संध्याकाळी रूमवर आलो आगदी  नर्व्हस होऊन बसलो होतो. तेवढ्यात रूम मालक अामोल कारंडे तिथे आला.थोडा वेळ गप्पा झाल्या त्याने गावाची भागाची माहिती सांगितली.थोडा वेळ थांबून तो निघून गेला.मग मी स्वयंपाकाची तयारी केली जेवण केले. थोड्यावेळाने पत्ते खेळणारी गॅंग आली. मी जरा चौकातून जाऊन आलो, व आल्यानंतर झोपून गेलो. पत्त्यांचा डाव रात्री दोन वाजेपर्यंत चालू होता.

असेच दिवस जात होते, मला फक्त एक महिनाच राहायचे होते त्यामुळे मी हे सर्व सहन करत होतो.

असेच एका रविवारी तेथील माझ्या वयाची मुले माझ्याकडे आली.आणि बसली त्यामध्ये विनोद वाघमारे, सुग्रीव कारंडे सागर कारंडे, मप्या, नागेश तांबोळी, संदीप, बापू हे होते. ते म्हणाले मास्तर मी त्यांच्याच वयाचा आसाल्यामुळे ते मला मास्तरच म्हणायचे एकजण म्हणाला की मास्तर तुम्हाला पोहायला येतं का? मी हो म्हटलं मग बिनु म्हणाला की चला आपण पोहायला जाऊ.मी तयार झालो.

ज.ने. वि च्या मागे एक विहीर होती.तिथे आम्ही जाऊन जवळ जवळ दोन तास पोहायलो. मग घरी आलो पोहून पोहून डोळे लाल झाले होते.

पण ओळखीही तश्याच छान झाल्या होत्या.नवीन मित्र मिळाले होते.आणि करमुन सुद्धा गेले.होते. मला काही कमी पडले की ही गॅंग मदतीला तयारच आसायाची.

मग आम्ही रविवारी दिवसभर महेंद्रच्या दुकानासमोर गोटया खेळायचो, मला पाहिल्यावर कुणाला वाटायचेच नाही की हे मास्तर आसेल म्हणून.

त्या वेळी नुकताच झऱ्यात पिंजरा चित्रपट पडद्यावर दाखवला होता,आणि मी तो चित्रपट पाहिला नव्हता, एक जण मला म्हणाला की तुम्ही पिंजऱ्यातील मास्तर नाहीत ना ? मी म्हणालो नाही.नंतर मी चित्रपट पाहिल्यानंतर मला त्या वाक्याची हसायला आली.😅😅

असं करता करता महिना संपत आला.घराची ओढ वाटायला लागली.मी दोन चार दिवसांनी गावी जाणार होतो.मी मित्रांना सांगितले की मी दोन चार दिवसांनी गावी जाणार आहे,पुन्हा येईल म्हणून सांगता येत नाही.यावर मित्रमंडळी खूप नाराज झाले.

ते म्हणाले की तुम्ही गावी जा पण परत या. बिनु तर मला म्हणाला की मी तुम्हाला आमच्या जागेत घर बांधून देतो.पण तुम्ही नोकरी सोडून जाऊ नका.त्या वेळी बिनु मिस्तरी काम करायचा मी म्हणालो ठीक आहे मी पुन्हा येईल.

मग मी गावी गेलो.घरातील सगळ्यांना वाटले की आता हा परत जाणार नाही.परंतु मी पुन्हा दोन दिवसांत झऱ्याला जायला निघालो घरातील सर्वांना आनंद झाला. 

नंतर अनिल काळेल,(विभूतवाडी),शशिकांत खाडे (झरे), रामदास देशमुख (मानेवाडी),विशाल पाटील (कुरुंदवाडी), प्रभाकर कटकदौंड (गुळेवाडी),सतीश सावळे (विभुतवाडी) हे नवे शिक्षक मित्र माझ्या रूम मध्ये पार्टनर म्हणून मिळाले.

लेखक :- अनिल तळपे अध्यक्ष खेड तालुका शिक्षक समिती 



शाळेचे रम्य दिवस


शाळेचे रम्य दिवस 

शिवाजी विद्यालय डेहणे येथे मी जेव्हा पाचवीला प्रवेश घेतला तेव्हा कै.आर.जे.पाटील सर मुख्याध्यापक होते. पाटील सर अतिशय कडक शिस्तीचे होते.कर्वे सर वर्गशिक्षक होते.तांबोळी सर,वरकुटे सर,फणसे सर,विधाटे सर,कोंढाळकर सर,जोशी मँडम,व्यवहारे सर,सवणे सर,फापाळे सर तर वरच्या वर्गासाठी गाडीलकर सर,महामुनी सर,दातीर सर,नढे सर,असे अनेकजण होते.

मी  ७ जुनला पाचवीत गेलो तेव्हा प्राथमिक आरोग्य केंन्द डेहणेच्या जरा अलिकडे दक्षिणेस असलेल्या कै.बाबुराव कौदरे यांच्या इमारतीमध्ये डावीकडून पहिल्या खोलीत भरत असे.

त्याशेजारी सहावीचा वर्ग व त्या शेजारी सातवीचा वर्ग होता.तर प्राथमिक आरोग्य केंद्र डेहणे च्या शेजारी पश्चिमेस डावीकडे नविन दगडी इमारतीमध्ये आठवी,नववी व त्या शेजारी दहावीचा वर्ग होता.ही इमारत मला खुपच आवडायची.खुप मोठे वर्ग,वर्गात लाकडी बेंच ,मोठमोठया  खिडक्या त्या मधून येणारा उजेड व बाहेर सुंदर व्हरांडा,समोर मोठे ग्राउंड होते.शाळा सकाळी.११.००वा.भरायची.

पांढरा शर्ट,खाकी चड्डी व डोक्यावर पांढरी गांधी टोपी व इनशर्टअसा गणवेश होता.ठरावीक वरच्या वर्गातील दहावीचे विद्यार्थी फुलपँट घालत.बाकी सर्वजन चड्डीच घालत.

मुलींना निळा स्कर्ट किंवा निळा परकर,पांढरा शर्ट (ब्लाउज) दोन वेण्या आणि लाल रिबन असा गणवेश होता.बुधवारी रंगीत कपडे घालायला परवानगी होती.परंतू रंगीत कपडे होतीच कोणाकडे?

दहावी पर्यंत कुणाच्याही पायात चपला किंवा बुट नसायचे. आणवानीच शाळेत यायचे.मी तरआकरावीला काँलेजला पहिल्या दिवशी आनवानीच गेलो.मधल्या सुट्टीत पहातो तर सगळ्यांच्या पायात चपला व बुट..मलाच मग कसेतरी वाटू लागले.आणी मग काँलेजवरून होस्टेलवर जाताना राजगुरूनगरच्या मशीदीजवळील पुलावर नऊ रूपायाची चप्पल घेतली.काँलेजला चप्पल घालून जातात हे माझ्या गावीही नव्हते.

याच शाळेच्या समोर असलेल्या  ग्राउंडवर प्रार्थना व्हायची.वर्ग निहाय एका ओळीत एका हाताच्या अंतरावर मुले प्रार्थनेला उभी राहत असत.लाईन थोडी जरी वाकडी असली तर सर मागुन काठीचे फटके मारत.समोर शाळेच्या व्हरांड्यावर सर्व शिक्षक एका ओळीत उभे राहत.

मी शाळेत गेलो तेव्हा "खरा तो एकची धर्म" ही साने गुरूंजींची प्रार्थना होती.त्याही आधी "सुंदर जीवन आता मी जगनार", ही प्रार्थना होती.मी ती ऐकलेली आहे.व ती कानांना खुपच गोड वाटायची.प्रार्थना झाल्यावर राष्ट्रगीत व्हायचे.एक साथ विश्राम झाल्यावर काही महत्त्वाची माहीती सांगीतली जाई.नंतर ओळीत आपापल्या वर्गात जायचे असा रिवाज होता.

पाचवीचा वर्ग हा अतिशय छोटा व खिडक्या नसलेला वर्ग होता.बेंच वगैरे काही मिजास नव्हती.खालीच ओळीने मांडी घालून बसावे लागे.डाव्या बाजूला मुली तर उजव्या बाजूला मुले बसायची.

तेव्हा दप्तर म्हणजे काय तर घरात जी रिकामी पिशवी असेल त्यामध्ये वह्या व पुस्तके ठेवायची व तीच पिशवी घेऊन शाळेत यायचे.त्यामध्चेच दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी रूमालात भाकरी व लसणाची,सुकटीची किंवा बोंबील,वाकट इत्यादी चटणी असे.पावसाळ्यात वर्गातच भाकरी खाल्या जात तर उन्हाळ्यात झाडाखाली बसुन भाकरी खात.

कधीतरी रूपाया दोन रूपये असतील तर आब्बासशेठच्या जनसेवा हाँटेलात ४० पैशात मिसळची नुसतीच तर्री विकत घेऊन त्याबरोबर भाकरी खायची परंतू हे लाड कधीतरी दोन तीन महिन्यांनी असत.

गरिब विद्यार्थ्यांना शाळेतुन जुन्या पुस्तकांचे वाटप केले जाई.एका आठवड्यात एक वर्गा असे वाटपाचे स्वरूप होते.पुस्तकांचे आज आता लगेच वाटप करण्यात येणार आहे.असे पांडू शिपायाने आणलेल्या रजिस्टरमध्ये लिहिलेली सुचना सरांनी वाचून दाखवल्यावर मुले पुस्तके घेण्यासाठी शाळेच्या आँफिसकडे धाव घेत,जुनीच पुस्तके मिळाल्यावर जो आनंद होई तो आता कधीच होणे नाही,वार्षिक परिक्षा संपल्यावर रिझल्ट घेण्याच्या दिवशी ही पुस्तके परत शाळेत जमा करावी लागत..नंतरच रिझल्टचे कार्ड दिले जाई.वह्या मात्र विकत घ्याव्या लागत.आठवी पर्यंत छोट्याच वह्या वापरल्या जात..त्या अतिशय निकृष्ट दर्जाच्या असत.
कधीतरी कंपास घेतली जाई.
छोटी रंगपेटी असे.ती उघडल्यावर छोट्या छोट्या चौकोनी घरांत अनेक रंग असत.स्केचपेन नंतर आले.खडुंचे रंग होतेच.
पावसाळ्यात मुलांची अत्यंत वाईट परीस्थीती असे.अनेक मुले डोंगर द-यांतुन पावसापाण्यातुन विद्यार्जनासाठी शाळेत येत.परंतु येताना प्रचंड पाऊस,दुथडी भरून वाहणारे ओढे नाले,खडीचा रस्ता या दिव्यातुन जा ये करावी लागे.सर्वांचे कपडे पावसाच्या सटका-याने भिजून जात.शाळेत पण जमिनीला ओल आलेली असे.त्यावरच पोते टाकून बसावे लागे.शाळा सुटल्यावर घरी जाताना प्रचंड हवा व पाऊसाचा सटकारा असे.छत्री उघडून जात असता वारा छत्री मागे लोटायचा.त्यामुळे पुढे जाताना पाचवी,सहावीच्या छोट्या जीवाला प्रचंड कष्ट पडे.नाईलाजाने छत्री बंद करून पावसातच झपझप चालावे लागे.

जून महिन्यातील पाऊस

पुर्वी अनेक ठिकाणी ओढ्यावर पुल असत.त्याआधी तेही नव्हते.खुप पाऊस असल्यावर शाळेत जाता येत नसे.अनेक विद्यार्थ्यांना छत्री विकत घेणे शक्य नसे,ते प्लँस्टीक कागद डोक्यावर घेऊन येत.परंतू या कागदाच्या एखाद्या शिडातुन वारा आत शिरे.व मोठा फडफड आवाज होई.कधी हा वारा कागद किंवा छत्री   त्याच्याबरोबर दुर घेऊन जाई.कागद किंवा छत्री पकडताना विद्यार्थ्यांची केविलवानी धडपड सुरू होई.या पकडापकडीत दप्तर व तो सर्व भिजून  चिंब झालेला असे.

सप्टेंबर महिन्यात ४० मार्काची पहीली व दुसरी घटक चाचणी असे.प्रश्नपत्रीका ही हस्तलेखन केलेली  झेराँक्स काँपी असे.उत्तर पत्रीका ही फुलस्केप  चारपाच कागद एकत्र टाचून तयार केलेली असे.उत्तर पत्रीकेवर वरच्या अर्ध्या कागदावर छापील मजकुर असे.त्यावार "अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे", हा सुविचार त्याखाली आदिवासी शिक्षण संस्था संचलित "शिवाजी विद्यालय डेहणे"ता.खेड,जि.पुणे.त्याखाली विद्यार्थ्यांचे नांव वर्ग परिक्षा  नंबर व तुकडी असे  व उजव्या बाजुला प्रज्वलीत दिव्याचे चित्र असे....उत्तर पत्रीका लिहिताना पुरली नाही तर जादा पुरवणीचा ताव मिळे.काही हुशार विद्यार्थी दोन,तीन पुरवन्या जोडत...ह्या पुरवन्या मुख्य उत्तरपत्रीकेला दो-याने बांधत,.घटक चाचणी तीन दिवस असायची.

शाळेत असताना..चौथ्या किंवा पाचव्या तासाला पांडू सांगडे शिपाई रजिस्टर घेऊन वर्गात दाखल होई.रजिस्टरमध्ये काय लिहिलं असेल याची उत्सुकता तानली जाई.सर वाचुन दाखवत.... आज  ३१ तारीख आसल्यामुळे महिना अखेर आहे.त्यामुळे आज दुपार नंतर शाळेला सुट्टी राहील...किंवा अमुक..तमुक कारणामुळे उद्या शाळेला सुट्टी राहील..हे ऐकुण आम्हा विद्यार्थ्यांना जो आनंद होई..तितका आनंद अजुन तरी झाला नाही...

दिवाळीच्या आधी प्रथम सत्र परिक्षा असे.उत्तर पत्रीका एका छोट्या चोपडी सारखी असे.प्रश्नपत्रीका मात्र छापील असे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात दुसरी घटक चाचणी व एप्रिल महिन्यात वार्षिक परिक्षा असे.

तांबोळी सर,चिखले सर यांच्या काळात खेळ व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली.श्री.बबनराव गोपाळे - कब्बडी श्री.रोहिदास आंबेकर - खोखो. श्री.अरूण कोरडे- कब्बडी श्री.तुकाराम कोरडे - वक्तृत्व या बाबतीत शिवाजी विद्यालय महाराष्ट्र भर पोहचवले.त्यामुळे शाळेचे नाव गाजू लागले.त्यामुळे निश्चितच शाळेकडुन व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा वाढल्या.शाळेचा दहावीचा रिझल्ट शतपटीने वाढला.

आम्ही सहावीत गेलो तेव्हा आम्हांला बसायला बेंच मिळाले.जमीनीवरून बेंचवर बसायला मिळणे हा एक वेगळाच आनंद होता.

शाळेमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम असत.तर कधी व्याख्यानाचे कार्यक्रम असत.दहावीच्या मुलांसाठी नाईटस्टडी असे.त्यामुळे रात्री शाळेतच अभ्यास करून झोपावे.आम्ही नाईटस्टडीला असताना रात्री कुणाचाना कुणाचा हरभरा उपटून हुळा करायचो.

दवाखान्या जवळील मोठ्या शाळेच्या उजवीकडे जो मोठा दगडी स्टेज होता त्यासाठीचे दगड आम्ही नायफडच्या बंधा-याजवळून आणले होते.तर नदीमधून वाळू देखील आणलेली होती.

तांबोळी सर,वरकुटे सर,व्यवहारे सर सुट्टीच्या दिवशी सुद्धा जादा तास घेऊन ज्ञानार्जनाचे काम करायचे.

श्री.तुकाराम भोकटे गुरूजीच्या घराजवळ "हसन सायकल मार्ट" दुकान होते.तेथे रूपाया तास या प्रमाणे मुले दुपारच्या सुट्टीत सायकल चालवून आनंद घेत असत.

हिवाळ्यात खुप थंडी असल्यावर शनिवारी शाळा जवळच, उन्हात भरे..व साडेनऊला सुट्टी व्हायची.आठवी ते दहावीचे वर्ग पाच तास झाल्यावर आकरा वाजता सुट्टी व्हायची.

त्याकाळात सर खुपच मारायचे.महामुनी सर पोटाच्या बाजुची कातडी जोरात चिमटीत पकडून वर ओढायचे.व भिंतीवर,फळ्यावर डोके आपटायचे..तर अनेक शिक्षक हातावर छड्या द्यचे.तर काही मुस्काटात लावायचे.तरकाही पाठीवर गुद्दे मारायचे.

असाच एक प्रसंग आम्ही दहावीत होतो.जानोबा मंदिराच्या उजवीकडे आसलेल्या इमारतीमध्ये आमचा वर्ग होता.माझा मित्र श्री.सुभाष भोकटे (आता तो विस्तार अधिकारी आहे.) आम्ही दोघे एकाच बेंचवर बसायचो.

आम्हाला मुलींच्या लाईनला सर्वात पाठीमागे असलेल्या रिकाम्या बेंचवर बसवण्यात आले होते.तेथेच आम्ही दररोज बसत असू. मुलांची लाईन वेगळी होती..बोरकर सर गणित विषय (गुणोत्तर-प्रमाण) शिकवत होते,सर्व जण एकाग्र होऊन ऐकत होता.

त्याचवेळी आम्ही मात्र एक वेगळेच नाट्य पहात होते.आमच्या समोर असलेल्या मुलीच्या डोक्यातून एक "ऊ" खाली तीच्या  शर्टवर (ब्लाऊज) येत होती.ती "ऊ " इकडून तिकडे खालीवर जात येत होती.आणि आम्ही मन लाऊन ते पहात होतो.आमचे शिकवण्या कडे लक्षच नव्हते.सरांचे हे लक्षात आले.शिकवुन झाल्यावर त्यांनी आम्हा दोघांना उभे केले.तुम्हाला गणित समजले असेलच हेच गणित फळ्यावर सोडून दाखवा,सर म्हणाले.सरांच्या डोळ्यात प्रचंड संताप दिसत होता,

सर तसे फार शांत पण बिघडल्यावर जो काही मार देत. की दुसऱ्या दिवशी उठणे ठीण..हे आम्ही दोघानीही दुसऱ्यांच्या बाबतीत पाहीले होते, मी बाजूला असल्यामुळे माझ्या हातात त्यांनी खडू दिला मी फळ्याजवळ गेलो.फळा स्वच्छ केला तेच गणित मी सोडवायला घेतले.

गणित विषय तसा माझ्या आवडीचा आसल्यामुळे मी एका झटक्यात गणित सोडवले...सर अवाक्क होऊन पाहू लागले.आता याला मारायचे तरी कसे.हा त्यांना प्रश्न पडला.ते म्हणाले तु गणित सोडवले हे खरे आहे परंतू तुमचे दोघांचे मुळीच लक्षनव्हते हेही खरे आहे. ठिक आहे.

आता तु सोडव बरं, गणित असे म्हणून सुभाषला बोलावून घेतले,सुभाषचा गणित विषय सोडला तर सर्व विषयात A+मार्क असत,पण गणित त्याचा शत्रू ..आता काही खरे नाही.मार निश्चितच मिळणार असे म्हणुन खडू हातात घ्यायला व शाळा सुटण्याची बेल व्हायाला एकच वेळ झाली.अशा रितीने मार वाचला..

तर अशा अनेक आठवणी या शाळेविषयी सांगता येतील अशीही शाळा..

रामदास तळपे



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस