पूर्वीची गावाकडील करमणुकीची साधने

उन्हाळ्याच्या दिवसात सर्व लोक अंगणात झोपायचे. सकाळी सकाळी जाग याची तीच मुळी प्रल्हाद शिंदे यांच्या ऐका सत्यनारायणाची कथा किंवा चल ग सखे चल ग सखे पंढरीला या गाण्यानी.

अरे! आज कोणाची तरी पूजा आहे वाटतं? विचारल्यावर कुणीतरी सांगायचे. आज गणपत मोहनाची पूजा आहे.

गावात सर्व गाव आणि वाड्या वस्ती मिळून दरवर्षी 25 ते 30 जणांच्या पूजा असायच्या परंतु गणपत मोहन यांची पूजा म्हणजे मोठे पर्वणीच असायची. कारण त्या पूजेला प्रसादिक भारुड मंडळाचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी भारुड पाहायला मिळणार म्हणून मोठा आनंद व्हायचा.  

गावाकडे पूर्वी सत्यनारायण महापूजा, यात्रा जत्रा निमित्त करमणुकीची साधने म्हणून भजनी भारुड यांना खूपच मागणी होती. गावागावांमध्ये भजनी भारुडे असायची.

सत्यनारायणाच्या महापूजा निमित्त सुद्धा अनेक सधन लोक भजनी भारुडाचा कार्यक्रम ठेवायचे.

आमच्या गावात गणपत मोहन हे मुंबईला असल्यामुळे दरवर्षी त्यांच्याकडे गावाला ते पूजेचा कार्यक्रम ठेवत असत. त्यांच्या पूजेला सर्वात जास्त पर्वणी म्हणजे भारुडाचा कार्यक्रम हा ठरलेला असायचा.

त्या काळातली भारुडे ही जमिनीवर होत असत. स्टेज हा प्रकार तेव्हा कोणाच्या गावीही नव्हता. 

एक रंगीत पडदा असायचा. त्या पडद्यासमोर भारुड करण्यासाठी थोडीशी जागा मोकळी ठेवून प्रेक्षक बसत असत. पडदयाच्या मागे भारुडातील पात्र काम करणारी लोक भारुडातील वेगवेगळी कपडे घालून सजण्या धजण्याचे काम करत असत.

गावातील वाड्या वस्तीचे लोक भारुडाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी करायचे. संध्याकाळी साडेसात आठ वाजेपर्यंत पूजा संपायची. त्यानंतर तीर्थप्रसाद व लगेच जेवणाच्या पंगती बसायच्या.

त्यानंतर अंगणातच भारुडाचा कार्यक्रम सुरू व्हायचा. 

त्या काळात टोकावडे, धामणगाव, भोमाळे, सरेवाडी, नाव्हाची वाडी अशी अनेक भारुड मंडळे होती. त्या काळात भारुड मंडळांनी करमणुकीचे काम करता करता धार्मिक भावना जोपासण्याचे काम केले.

तिसरी, चौथीला असताना एकदा गणपत मोहन यांच्या पूजेच्या निमित्ताने भोमाळे येथील भारुड मंडळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मी मित्र मच्छिंद्रसह सगळ्यात पुढे भारुड पाहण्यासाठी बसलो होतो.

भजन मंडळी बसलेल्या मध्यभागी मृदंग वाजवणारा माणूस कोंबड्यासारखी मान उडवीत मोठमोठ्याने मृदंग वाजवीत होता. पाय पेटीवाला नाना प्रकारचे स्वर काढून लंबकासारखा दोन्ही बाजूने हेलकावे खात होता. तर टाळ वाजवणारे छातीवर हानुवटी टेकवून जोरजोरात टाळ कुटीत होते. खरं म्हणजे लोकांच्या गोंगाटापेक्षा टाळांचा आवाज कमी पडतो म्हणून ते टाळावरच सुड उगवीत होते. 

हा सारा प्रकार ऐन रंगत आला तेव्हा कुठे भारुड मंडळाची पात्र रंगून तयार झाली. 

पहिले पात्र उमावराचे आले. लाल जरीचे धोतर व त्याचप्रमाणे पिवळा जरीचा अंगरखा डोक्यावर पिवळा फेटा व हातामध्ये एक पूजेचे ताट घेऊन उमवरा नाचत नाचत आला.

भजनी मंडळांनी जोर जोरात सर्व वाद्य वाजवून आसुरी आनंद घेण्याचा प्रयत्न केला.

उमावरा शिरीधरा दयेचा देतो आसरा.. असे गायन करायला सुरुवात केली. खूप वेळ नाचल्यावर उमावरा असलेले पात्र एका कोपऱ्यात उभे राहिले.

त्यानंतर सावळ्या नावाचे पात्र येऊन भजनाच्या वाद्यामध्ये जोरात उंच उड्या मारून नाचू लागले. अंगणातील मांडवाला त्याचे डोके लागते की काय अशी आम्हाला भीती वाटू लागली.

खूप वेळ नाचल्यावर व दमुन भागून सावळ्याच्या पात्राचा संवाद सुरू झाला. परंतू खूप वेळ नाचल्यामुळे सावळ्याला नीट संवाद देखील म्हणता येईना. अशी त्याची अवस्था झाली.   

त्यानंतर आपल्या दोन काळ्या हातांना लाल रंगाचे दोन लाकडी हात बांधून आणि एक सोंडेचा लालबुंद मुखवटा तोंडावर धरून पोट खपाटीला गेलेला गणपती बाकावर बसला होता. बरोबर सरस्वतीही आली होती. 

पावसाळ्यात अंगावर घेतो त्या इरण्याचा साठा मधोमध कापून त्यामध्ये डोके घालून तो साठा सरस्वतीने कमरेला बांधला होता. त्यावर निळ्या रंगाची शाल गुंडाळली होती. व पुढे मेसाच्या काठीची चोच तयार केली होती. व पाठीमागे खरोखरच्या मोराची पिसे चिकटवली होती. असा हा मोराचा मुखवटा बांधून सरस्वती मोरावर स्वार झाली होती. तिने कमरेच्या मोरा सकट नाच केला आणि घामाच्या धारांनी तिचा पोलका चिंब भिजला तेव्हा तिने नाच थांबवला.

सरस्वती घामाच्या धारा शालूच्या पदराने पुसत असताना सूत्रधार आणि गणपती यांचा संवाद झाला. आणि हत्तीच्या सोंडेतून माणसाचा आवाज निघून भारुड मंडळीला आशीर्वाद मिळाला.

त्यानंतर मुख्य वगाला सुरुवात झाली. अरुंद बाकड्याचे सिंहासन करून राजा त्यावर अरुड झाला होता. बाजूला प्रधानजी उभा होता.

कोणत्याही क्षणाला तलवार बाहेर काढावी लागेल अशा पद्धतीने कमरेच्या तलवारीवर हात ठेवून राजा म्हणाला. परधानजी आपल्या या राज्याची व्यवस्था कशी काय हाये?

पण प्रधानजीने उत्तर दिले नाही. त्याचे राजाकडे लक्षच नव्हते. खुद्द राजाकडे पाठ फिरवून तो उभा होता. राजाच्या दरबारात आपल्याला फक्त उभे राहण्यापुरती जागा मिळावी म्हणून तो प्रेक्षकांकडे रदबदली करीत होता. 

अरे! जरा पाय ठेवण्यापुरती तरी जागा द्या.

जरा मारून घ्या मारून घ्या. खुद्द राजा ही प्रधानजीच्या मदतीला आला. 

राजाच्या सिंहासनाला चिकटून बसलेल्या काही लोकांनी किरकोळ हालचाल करून राजाचा आदर केला. पण ते तरी मागे कुठे जाणार ? जागा होते कुठे?

मग जागच्या जागी फिरत राजा पुन्हा म्हणाला.

परधानजी आपल्या या राज्यात व्यवस्था चोख हाये का नाही?

म्हराज, आपल्या राज्याची व्यवस्था चोख हाये पण...

परधानजी पण म्हणजे काय ? साफ साफ बोला? राजा बोलला.

म्हाराज आपल्या राज्यात दैत्यांचा लय तरास होतो.

काय म्हणता? माझ्या राज्यात दैत्य? 

मी त्यांना ठार मारून टाकणार हाये. 

अशी गर्जना करत राजाने म्यानाशी झटापट करीत गंजलेली तलवार कशी बशी बाहेर काढली. उजव्या हातात तलवार धरून तलवारीचे टोक त्याने डाव्या हातात धरले आणि एकदा डावा पाय, तर एकदा उजवा पाय वर उडवीत वाद्यांच्या गजबजाटात बराच वेळ तांडव नृत्या सारखे नृत्य केले.

ते नृत्य चालू असताना अनेकांच्या हातापायावर राजाचे दणकट राजेशाही पाय पडून काही काळ रडण्या केकटण्याचा गोंगाट झाला. आणि तेथेच युद्धाला पुरेशी मोकळी रणभूमी तयार झाली.

तेवढ्यात आसमानाला भेदून जाणारी एक आरोळी उठली. लोक दचकून इकडे तिकडे पाहतात न पाहतात तोच आणखी आरोळ्या मागून आरोळ्या उठल्या. 

आरडाओरडा करीत तेथे नाचत दैत्य खुद्द प्रेक्षकांतूनच वाट काढत पुढे आला. वाटेत सापडलेल्या बिचार्‍या प्रेक्षकांना राक्षसी कृत्याचा प्रत्यय देत तो थेट दरबारात घुसला.

दैत्याचा वेष संपूर्ण काळा होता. तोंडाला अबीर बुक्का फासल्यामुळे तो अधिक भयानक दिसत होता. त्यातून फक्त सफेद डोळे तेवढे उठून दिसत होते. केसांची टोके कमरेला टेकली होती. 

त्याने आपली तलवार उपसली आणि त्या अरुंद अशा जागेत त्याने अक्षरशः थयथयाट केला.

आरोळ्या ठोकीत तो सिंहासनावर म्हणजे बाकड्यावर चढला. तिथून त्याने पुन्हा एक आरोळी ठोकून वरच्या छताला लागेल अशी उडी मारली. त्या उडी बरोबर वर टांगलेली आंब्याच्या पानांची तोरणे तुटून खाली आली.

शेवटी राजा आणि दैत्य यांची शाब्दिक देव घेव झाली. आणि प्रकरण ठरल्याप्रमाणे हातघाईवर आले. 

भजनी मंडळांनी सारे बळ एकवटून वाद्य वाजवली आणि लढाईला अनुकूल असे वातावरण निर्माण केले. 

बराच वेळ त्यांचे तुंबळ युद्ध झाले आणि अखेर सहा फूट लांबीचा दैत्य गारद झाला. तो मरून पडताच पडद्यावाल्याने पडदा धरायला हवा होता. परंतु विडी विझवून उठेपर्यंत पडदेवाल्याला उशीर झाला आणि डोळे मिटून मरून पडलेल्या दैत्याला वाटले, पडदा धरलेला आहे, म्हणून तो उठला आणि बाजूला पळाला. ते पाहून जिवंत झाला, जिवंत झाला असे ओरडत प्रेक्षकांनी गलका केला.

त्यानंतर पहाटेपर्यंत भारुड चालू होते. दरम्यान पावलोपावली लढाया झाल्या. राणीचे गायन झाले. द्वारपाळांचे विनोद झाले. आणि पहाटे कोंबडा आरवल्यावर भारुड संपले.

त्या काळात सर्वांची भाषणे तोंडपाठ होती असेही नाही. पण आख्यानाच्या अनुरोधाने जे ज्यावेळी सुचेल ते तोंडाबाहेर यायचे.

परंतु सन 1988 - 89 च्या काळात टीव्ही व व्हीसीआर मुळे हिंदी आणि मराठी चित्रपट गावोगावी आणि गल्लोगल्ली धुमाकूळ घालू लागले. आणि या भारुड मंडळांना उतरती कळा लागली. हळूहळू भारुड मंडळे नामशेष होण्याच्या मार्गावर आली.

त्यानंतर पुढे आमुलाग्र बदल झाला आणि लोकसत्तानारायणाच्या महापूजा ऐवजी भारुड ऐवजी प्रेक्षकांसाठी पिक्चर ठेवू लागले. 

गावाकडची तरुण मंडळी पिक्चर पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावांमध्ये जाऊ लागली. त्या काळात प्रत्येक गावात वाड्या वस्त्यांसह 30-40 पोरं असायची.

असेच एकदा मोरोशी येथे शांताराम तिटकारे गुरुजी यांनी त्यांच्या सत्यनारायणाच्या महापूजे निमित्त चित्रपट ठेवले आहेत असे कळाले.

संध्याकाळी आमच्या गावातील वाड्यावस्त्या पाच-पन्नास पोरं मोरोशी येथे चित्रपट पाहण्यासाठी गेलो त्यामध्ये मी सुद्धा होतो. 

तिथे गेल्यावर तेथील ग्रामस्थांनी आमचे स्वागत केले. व लगेच जेवण्यासाठी पंगतीमध्ये बसवले. सर्वांनी दोन दोन तीन वाढया आमटी, भात व शाक भाजीवर ताव मारला.

त्यानंतर ठरल्याप्रमाणे चित्रपट व्हिडिओ वर दाखवण्याचे काम सुरू झाले. पहिला पिक्चर लावला पटली रे पटली. त्यानंतर त्यांनी दुसरा एक मराठी चित्रपट लावला. परंतु आमची पोरे म्हणायची हिंदी चित्रपट लावा. तर ती मंडळी म्हणायची नाही आम्ही मराठी पिक्चर लावणार.

त्यावरून थोडेसे तू तू मै मै  झाले. शेवटी आमच्या गावातील सर्व पोरे घरी निघाली.  मोठे असलेल्या पोरांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता.

मोरोशीच्या लोकांना पिक्चर पाहू द्यायचा नाही. त्यासाठी डीपी जवळ जाऊन आमच्या पोरांनी रात्रीच्या त्या काळ्याकभिन्न अंधारात खाचरातील ढेकळांनी पोल वरील दगडी डिओ पाडण्याचा प्रयत्न सुरु केला.

शेवटी गंगाराम जढर यांनी एका ढेकळाच्या तडाख्यात शिरगाव आणि मोरोशीचे दोन्ही डिओ पाडण्याचे महान कार्य केले. त्याबरोबर शिरगाव आणि मोरोशीच्या लाईट गायब झाल्या. आणि त्यांचा पिक्चर पाहण्याचा हेतू पूर्ण होऊ शकला नाही. याचे समाधान घेऊन मंदोशीचे कार्यकर्ते गावाच्या दिशेने चालू लागले.

परंतु दुसऱ्या दिवशी मोरोशीचे लोक संध्याकाळी आमच्या गावात येऊन मीटिंग घेणार आहेत असे कळल्यावर सर्वांचे धाबे दणाणले. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी आठ वाजता मोरोशीचे ग्रामस्थ मंदोशीमध्ये दाखल झाले.

थोड्याच वेळात सर्व पोरांना बोलावणे पाठवले. काही पोरं आली काही लपून बसली. मोरोशीच्या लोकांनी लाईटच्या पोलवरील डीवो पाडल्यावर प्रत्येकाच्या घरातील बल्ब आपोआप गळून पडले. शिवाय आमचा पिक्चर देखील बंद पाडले. त्यामुळे आमचे खूपच नुकसान झाले आहे ते तुम्ही भरून द्या असे मीटिंगमध्ये सुनावले. नाहीतर आम्ही पुढे पोलीस स्टेशनला कम्पलेट करू असेही सांगितले.

गावातील सर्व लोकांनी आम्हा पोरांना खूपच दुषणे दिली. व प्रत्येक पोराकडून दहा रुपये अशी वर्गणी काढून मोरोशीच्या लोकांच्या हवाली करतो असे सांगितल्यावर ते लोक निघून गेले.

आम्ही त्यांची लाईट घालवली होती व त्यांचा पिक्चर बंद पाडला होता हे मान्य. परंतु त्यांचे ब्लब मात्र गळून पडले नव्हते. व फिटिंग केलेल्या वायरही जळाल्या नव्हत्या हे खरे असूनही आम्हाला गावातील लोक काहीच बोलू देत नव्हते.

ठरल्याप्रमाणे प्रत्येक पोरांनी दहा रुपये याप्रमाणे वर्गणी जमा करून 390 मोरोशीच्या लोकांच्या हवाली केले. 

त्या बहाद्दरानी त्या पैशाचा एक बोकड आणून मटणाचा रस्सा आणि भात करून खाल्ला. हे आम्हाला खूप दिवसांनी कळले.

तर अशा या गावाकडील गमती जमती. आता मात्र गावाकडे नावालाही पोरं शिल्लक नाहीत. सर्व तरुण आणि त्यांच्या बायका मुले रोजगारासाठी शहरात दाखल आहेत. आणि म्हातारी कोतारी चार दोन माणसे मात्र गावात शिल्लक आहेत. 

पूर्वी प्रत्येकाच्या घरात आठ दहा असलेली जनावरे आता नावाला देखील सापडत नाहीत. गावाकडे अनेक लोकांनी सुंदर घरे बांधली आहेत परंतु त्या घरांमध्ये राहायला कुणीच नाही. सर्व घरे कुलूपबंद अवस्थेत घरमालकांची आणि घरातील माणसांची वाट पहात उभी आहेत दिवसेंदिवस महिनो महिने.

रामदास तळपे 

 



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वीची गावाकडील करमणुकीची साधने

उन्हाळ्याच्या दिवसात सर्व लोक अंगणात झोपायचे. सकाळी सकाळी जाग याची तीच मुळी प्रल्हाद शिंदे यांच्या ऐका सत्यनारायणाची कथा किंवा चल ग सखे चल ...

विठू नांगरे कलंदर माणूस