भारतीय गुप्तहेर अजित डोवाल....

 

भारतीय गुप्तहेर अजित डोवाल....

अजित डोवाल हे भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर  आहेत.भारताच्या रॉ आणि एकूणच गुप्तचर संघटनेच्या गेली 50 वर्षाच्या इतिहासाचे ते साक्षीदार आहेत.त्यांनी सिक्कीम, मिझोराम मध्ये पाकिस्तान मध्ये आणि लंडन मध्ये देशासाठी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत.

या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे, दहशतवादविरोधी कार्य करणे, आणि भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देणे.

रॉची स्थापना 1968 मध्ये झाली.1962 च्या चीन-भारत युद्ध आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान गुप्तचर अपयशामुळे या संस्थेची आवश्यकता भासली.

रॉ ही भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे.ती गुप्तचर माहिती गोळा करणे, दहशतवाद रोखणे, आणि परदेशी संबंध सुधारणे यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये व्यस्त आहे. 

रॉ ही भारतीय गुप्तचर संघटना श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी निर्माण केली. रॉ ही संघटना त्यावेळी पाकिस्तान व बाहेरची उपद्रवी राष्ट्र काय करतात याची इंत्यभूत माहिती घेऊन त्यावर पुढील योग्य ते निर्णय काय घेतले पाहिजेत याचा आराखडा तयार करत असत. त्यासाठी या संघटनेला योग्य ती आर्थिक मदत केली जात असे.

परंतु पुढील काळात इंदिराजींचे सरकार जाऊन मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले. त्यांचा असा समज होता की रॉ ही संघटना इंदिरा गांधी यांनी विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केली आहे. त्यामुळे त्यांनी रॉ या संघटनेचे पंख छाटून त्यांचा निधी कमी केला.जवळजवळ रॉ ही संघटना बंदच पडली.

त्यामुळे रॉ या संघटनेचे कामकाज ठप्प झाले. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मोरारजी देसाई यांनी जर या संघटनेचे पंख छाटले नसते आणि या संघटनेला आर्थिक बळ दिले असते किंवा हा कार्यक्रम पुढे तसाच राबवला असता तर पाकिस्तानचा अवस्त्र बनवण्याचा कार्यक्रम भारताने हाणून पाडला असता.व आज जे काही पाकिस्तान कडे अवस्त्र आहे ते नसते.

अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. ते पाकिस्तान मध्ये गुप्त माहिती मिळवण्यासाठी गेले होते, तेव्हा तेथे अनेक गोष्टी घडायच्या. काही प्रसंग त्यांच्या जीवावर बेतणारेही झाले.

पाकिस्तान मध्ये असताना त्यांना एका माणसाने बरोबर ओळखलं होतं. आणि ते चांगलेच फसले होते. सन 1981 ते 1987 अशी सहा वर्ष अजित डोवाल हे पाकिस्तान मध्ये अधिकृतरित्या होते. भारताच्या रॉ ह्या गुप्तचर संघटनेसाठी काम करीत होते. 

परंतु त्या आधी 1977 साली गुप्तचर संघटनेसाठी गुप्तहेर म्हणून काम करीत असताना पाकिस्तान मधील रावळपिंडी या शहरा जवळील "कहूता" या गावी पाकिस्तान अवस्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी पाकिस्तानने E. R. L. इंजिनीयर रिसर्च लॅब संस्था स्थापन केली होती.आणि याचीच माहिती मिळवण्यासाठी अजित डोवाल सक्रिय होते. त्यासाठी अजित डोवल यांना वेगवेगळे वेश परिधान करावे लागत असत. व सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असे. व फिरावे लागत असे. त्यासाठी त्यांनी मुस्लिम वेश परिधान केला होता.

एकदा लाहोर मध्ये असताना एका मशिदीमध्ये त्यांच्या कामासाठी ते गेले होते. मशिदी मधून बाहेर येताना त्यांना असे जाणवले की बाहेर एका कट्ट्यावर बसलेला एक मुस्लिम मौलवी एकसारखा माझ्याकडे पाहत आहे व मला सतत निरखत आहे.अजित डोवल यांना थोडंसं अस्वस्थ वाटलं. तेवढ्यात त्या मौलवीने डोवाल यांना जवळ बोलावलं.आणि विचारलं तुम्ही मुस्लिम नाहीत तर तुम्ही हिंदू आहात. यावर अजित डोवाल म्हणाले मी हिंदू नाही मी मुस्लिम आहे.

त्यावर तो मुस्लिम मौलवी म्हणाला..

तुम्ही खोटं सांगता. तुम्ही खरोखर हिंदूच आहात.

तो मुस्लिम मौलवी दोवाल यांना म्हणाला तुम्ही माझ्याबरोबर चला, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.

अजित डोवाल हे अतिशय हिमती व्यक्तिमत्व होते. म्हणून तर त्यांना भारताने या कामगिरीवर पाठवलं होतं.

अजित डोवाल त्या मुस्लिम मौलवी बरोबर चालू लागले. कारण त्याशिवाय त्यांचे पुढे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता.

लाहोर मधील चार-पाच गल्ल्या चालून झाल्यावर एका छोट्याशा चाळीमध्ये खोली असलेल्या घरात ते दोघे गेले.

ते दोघे जमिनीवर बसले कारण तेथे त्यांच्याकडे खुर्ची नव्हती. मौलवी डोवल यांना म्हणाले. तुम्ही मुस्लिम नसून हिंदू आहात हे मी लगेच ओळखले कारण तुमच्या कानाच्या पाळीला छोटेसे छिद्र आहे.आणि ते केवळ हिंदूंचेच असते.

अजित डोवाल हे अतिशय हुशार होते. ते म्हणाले आमच्याकडे काही भागात कानाला छिद्र असते. पूर्वी मी हिंदूच होतो परंतु नंतर मुस्लिम बनलो आहे.

यावर तो मौलवी म्हणाला नाही... अजूनही तुम्ही हिंदूच आहात..

अजित डोवाल यांना शेवटी मान्य करावेच लागले. ते म्हणाले होय अजूनही मी हिंदू आहे. परंतु तुम्हाला कसं कळलं?

यावर तो मौलवी म्हणाला.. मीही हिंदूच आहे. असे म्हणून ते रडू लागले.

माझं संपूर्ण कुटुंब या पाकिस्तानी लोकांनी मारून टाकलं. मी कसातरी त्यांच्या तावडीतून वाचलो.आणि पर्याय नसल्यामुळे मी मुस्लिम वेश धारण करून मौलवी बनलो.आता वेगवेगळ्या मशीदी पुढे बसून मी माझा उदरनिर्वाह करत आहे.ज्यावेळी तुझ्यासारखे मुस्लिम वेश धारण करणारे लोक भेटतात.तेव्हा मी त्यांना बरोबर ओळखतो.आणि मला खूप आनंद होतो.

त्या मौलवीने त्याची छोटीशी पत्र्याची पेटी उघडली आणि आत मध्ये असलेला भगवान शंकराचा व दुर्गादेवीचा छोटा फोटो मला दाखवला.मी भक्ती भावाने त्या फोटोला वंदन केले.

त्या मौलवीने सांगितले. मी अजूनही गुप्तपणे माझा धर्म बदललेला नाही. मी अजूनही या देवांची रोज पूजा करत आहे. त्याने डोवल यांना सांगितले. तू लवकरात लवकर या कानाची छिद्रे बुजवून टाक. कारण दुसरे कुणी जर ओळखलं तर तू चांगलाच अडचणीत येशील. असे म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

डोवाल यांनी मी कोण आहे हे त्या मौलवीला सांगू शकले नाहीत. कारण त्यांना तशी परवानगी नव्हती.

पुढे अनेक वर्ष पाकिस्तान मध्ये राहिले त्यांना त्या माणसाला खूप काही मदत करावी असे वाटायचे. परंतु त्यांना त्यासाठी काहीही करता आले नाही. याबद्दल त्यांना वाईट वाटते.

डोवाल यांना गुप्तहेराची कामगिरी बजावत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. परंतु देशासाठी त्यांनी हे सर्व सहन केले.

रामदास तळपे 

मैत्री,अशीही (एक सत्यकथा)

मैत्री,अशीही (एक सत्यकथा) 

20 मे 2025 रोजी मला वर पक्ष असलेल्या मित्राकडून Whats app वर लग्नाची प्रत्रिका आली. लागोपाठ आठ दिवस पोस्ट पाठवत होते. शेवटच्या एक दिवसाअगोदर मला त्यांचा फोन आला. आपण आमच्या विवाह सोहळा उपस्थित राहुन,वधु वरांना शुभेच्छारुपी आशिर्वाद द्यावा.मी त्यांना होय,नक्कीच मी लग्न कार्यास उपस्थित राहीन असे सांगितले. 

प्रत्रिका पाहिल्यावर बघितले तर वधु माझ्या खास मित्राची मुलगी होती. हे पाहिल्यावर मला खूप आनंद झाला.

 वधूचे वडील व मी  शाळा आणि काँलेज मध्ये एकाच बेंच बसायचो. कधीतरी हॉटेल नाश्ता करायचो. एकत्र चहा घ्यायचो. आमची खूपच दृढ मैत्री होती. एकमेकाशिवाय कधी राहिलो नाही. तो माझ्या पेक्षा थोडा जास्त हुशार होता. मी मध्यम होतो.

पदवी शिक्षण झाल्यावर दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या..तो उच्च पदवावर गेला.नंतर एकमेकांची लग्न झाली मी माझ्या मित्राला आग्रहाने प्रत्रिका घरी जाऊन दिली. त्याने लग्नाला येण्याच वचन दिलं, पण तो काही माझ्या लग्नाला आला नाही.विशेष म्हणजे त्यांने त्याच्या लग्नाची मला प्रत्रिका सुद्धा दिली नाही.आमचे एकमेकांकडे मोबाईल नंबर होते.ते एकमेकांच्या मोबाईल मध्ये सेव्ह होते. असे असताना सुद्धा त्याने लग्नाचा साधा मेसेज सुद्धा केला नाही.

ज्यांच्या मुलांचे लग्न होते, ते सुद्धा माझे मित्रच होते. खूप छान आमची मैत्री होती. तर  त्यांच्या मुलाचा माझ्या ह्या मित्रांच्या  मुली सोबत 20/05/2025 विवाह सोहळा होता.

मी माझ्या या बालमित्राचे रोज Whats, up स्टेट्स दररोज पाहायचो.त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा दिनाचे खूप फोटो असायचे.

मला वर पक्षाकडून प्रत्रिका आली आहे.मी विचार करतोय, आपला बालमित्र नक्कीच आपल्याला प्रत्रिका पाठवीन.पण लग्न दिवसांपर्यंत मला वधु पक्षाची म्हणजे माझ्या बालपणीच्या मित्रांची प्रत्रिका आली नाही.

मी पुरता गोंधळून गेलो होतो.लग्नाला जावे की न जावे? पण वर पक्षाकडे माझी इज्जत खूप होती.आणि मला मानणारा वर्ग खुप मोठा होता.माझं वागणं,माझं बोलणंआणि माझी राहणीमान. समाजातील माझी इमेज अतीशय चांगली आहे. प्रत्येकजन माझ्या सोबत आपुलकीने वागायचा.

विवाह सोहळा दिवस उजाडला.मला सकाळी वर पक्षाकडून फोन आला.आपण आमच्या विवाह सोहळा दिनाचे पाहुणे आहात.आपणास नक्कीच विवाह सोहळाला यावेच लागणार आहे.

मी निश्चय केला. चला आपल्या मित्रांने आपणास प्रत्रिका दिली नाही,त्यांचा मेसेज अथवा फोन नाही.वर पक्षाकडून आपणास आग्रह करतात तर आपण विवाह सोहळाला उपस्थित राहुन वधुवरांना शुभेच्छा देऊ या.

मंगल कार्यालयात मी आणि माझे काही मित्र पोहचलो. प्रवेश द्वारा समोर स्वागताला उभी असलेली दोन्ही बाजुची मंडळी होती.एका बाजुला वधु कडील मंडळी आणि एका बाजुला वरपक्षाकडील मंडळी.

मी प्रवेशद्वारा जवळ पोचताच वर पक्षाकडील मंडळीने माझे अतिशय सुंदर स्वागत केले.शाल श्रीफळ आणि फेटा बांधून स्वागत केले.माझं स्वागत होत असताना नकळत माझ्या मित्रांचे माझ्याकडे लक्ष गेले. त्याला माझा सत्कार झालेला आश्चर्यकारक वाटलं. तरीही तो जवळ आला नाही की, साधी ओळख दाखवली नाही.

लग्नमंडपात गाद्या होत्या. तिथं पर्यत वर पक्षाकडील मित्र आम्हाला घेऊन माझा बसण्यापर्यत मान दिला.नंतर स्पिकर वरही पुकारण्यात आले. ज्यामध्ये माझ्या विशेष कामाचा गौरव होता, समाजात असलेल्या कार्याची दखल घेऊन निवेदकाने त्याच्या विशिष्ट पद्धतीने माझा नामोल्लेख केला होता. हे सर्व माझ्या मित्रांने ऐकलं, आणि त्यांच्या चेहरावरचा नुर एकदम पालटला.त्याला काय करावे हेच समजेना.तो माझ्या दोन वेळा जवळुन गेला पण त्यांची बोलण्याची हिम्मत झाली नाही.

मंगलाष्टका झाल्या.सर्व आलेल्या पाहुण्यांना शब्द सुमनांने आभार झाले.वरपक्षाकडील मंडळी जेवणाचा आग्रह करीत होती.मनापासून जेवण्याची इच्छा नव्हती पण आग्रह खुप झाला.त्याच वेळी एक चमत्कार घडला.माझा हा बालपणीचा मित्र माझ्या जवळ आला.धायमोकलुन माझ्या गळ्यात पडुन रडु लागला.मला ही काय करावे हे समजेना आणि माझ्या जवळ वरपक्षाकडील मंडळींना काही समजले नाही..मी स्थितप्रज्ञ झालो होतो.

तो म्हणत होता मित्रा, मी खूप चुकलो आहे मला माफ कर.मी तुला समजु शकलो नाही.तुझ्यातील चारित्र्य मनाचा मोठेपणा व तुझा समाजाप्रती असलेला भाव मला दिसला नाही. माझा अहंकार मला तुझ्या पासून दुर घेउन गेला.

एका मध्यम व्यक्ती सोबत आपण उच्च पदावर गेल्यावर का मैत्री करावी.मी तुझ्या सोबतच नाही तर आपल्या वर्गातील सर्वसाधारण नोकरी करत असलेल्या मित्रा सोबतची मैत्री मी उच्च अधिकारी झाल्यावर संपुष्टात आणली.आज माझ्या मुलीच्या लग्नात तुझा सत्कार होतोय, वरपक्षाकडील मंडळी तुझ्या मागे पुढे करतात.तुला प्रत्रिका बघुन समजलं होतं माझी मुलगी दिलीय तरीही तु स्थितप्रज्ञ होतास. ना चेहरावर कसलाही भाव. ना चेहरावर अपमानाची छटा. मित्रा मला माफ कर.

त्याने मग त्याच्या पत्नीला कोणाला तरी बोलावण्यास पाठवुन माझी ओळख करून दिली.दोघांनीहि हात जोडून. विनंती केली आपण जेवन करुन जावे..मी ही मागचं सगळं विसरून वरवधुच्या शब्दाला मान देऊन जेवण केले. माझा तो मित्र.मला आग्रहाने जेवु घालीत होता.माझ्या हदयात एक आनंदाची लहर येऊन गेली.

तुम्ही चांगलं वागा. तुम्ही चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व ठेवा.तुमचा समाजाला हेवा होईल असच चालत राहा.नक्कीच एक दिवस तुम्हाला झिडकारलेली व्यक्ती तुमच्या प्रेमात अथवा तुम्हाला मिस केल्या शिवाय राहणार नाही.

त्या दिवशी मित्राने घरी येऊन आम्हा सहपरीवाराला घरी येण्याचे आमंत्रण देण्यास येतो असं वचन दिलं.

मी ही दिलसे माफ केलं.कारण तो माझाच बालमित्र होता.

हरे कृष्ण राधे कृष्ण 🙏🙏

लेखक:- बालाजी शितोळे

तीन लघु कथा

 
तीन लघु कथा 

१. "गहन"

मी लिफ्ट मध्ये एका लहान मुलाला आईस्क्रीम खात असलेलं बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो, "आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील!"

तो मुलगा उत्तरला, "माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली."

मी विचारलं, "आइसक्रीम खाल्यामुळे?"

तो म्हणाला, "नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खूपसले नाही!"

किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात! आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय - कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय?

२. "थकलेला"

आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंट बद्दल बातम्या पाहात होतो - लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.

ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते मी सुटकेचा निश्वास टाकला.

बापरे, माझ्या मनावरचा ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!

मात्र मी एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.

३. "थांबा"

एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तीनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, "सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात."

त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागान ओरडून म्हणाला, "हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं ?"

त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीट पाशी उभी राहिली.

ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली, "सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं"

तात्पर्य, मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो. ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं.

या तीन कथा गंमतदार छोट्या वाटत असल्या तरी त्यात गुढ गम्य आहे…

😂😂😂

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण शोध आणि बोध

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण शोध आणि बोध 

परवाच वैष्णवी हगवणे या नवविवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. सध्या मीडियावाले ही एकच बातमी फिरवून फिरवून काथ्याकुट करत आहेत.

खरंतर मीडियावाल्यांनी यावर समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. परंतु ते न करता ते केवळ त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

वैष्णवी कस्पटे यांची श्री. सुशील हगवणे यांच्याबरोबर कुठेतरी भेट झाली. एकमेकांना इंस्टाग्राम वर चॅटिंग करू लागले. त्यानंतर ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले.

त्यानंतर हगवणे यांनी वैष्णवी हिला लग्नाची मागणी घातली परंतु वैष्णवीच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला. परंतु कसपटे यांनी एक दिवस वैष्णवीच्या घरी येऊन वैष्णवीला घेऊन जाण्यासाठी तयार केले. व वैष्णवी जाण्यास तयार झाली. हे पाहून तिच्या वडिलांनी निर्णय घेतला की आपण हे लग्न लावू, असे पळून जाऊ नका.

त्यानंतर कसपटे यांनी रीतसर वैष्णवी चे लग्न सुशील हगवणे या तरुणाबरोबर लावून दिले. लग्नाला तिला हुंडा म्हणून अत्यंत महागडी अशी फॉर्च्यूनर गाडी आणि 51 तोळे सोने भेट दिली.

लग्नानंतर चांदीची भांडी वेळोवेळी रोख रक्कम सुद्धा दिलेली आहे.असे कस्पटे यांच्या मुलाखती मधून ऐकायला मिळाले.

वेळोवेळी हगवणे यांनी वैष्णवीला वेठीस धरून कस्पटे यांच्याकडून एक प्रकारे खंडणीच वसूल केली. वैष्णवी त्यांच्या लेखी एक सोन्याचे अंडे देणारे कोंबडीच होती.

त्यानंतर हगवणे यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे व्यवसायासाठी एक कोटी रुपये रकमेची मागणी केली.त्यासाठी वैष्णवीला वेळोवेळी मानसिक, शारीरिक त्रास दिला,मारहाण केली. त्यानंतर वैष्णवीने आत्महत्या केली.असेही कस्पटे यांनी मुलाखतीत सांगितले.

वैष्णवी हगवणे या मुलीचा स्वभाव शांत होता. त्यामुळे तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन हागवणे कुटुंब आणि तिच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार केले.

मुलाचे वडील राजेंद्र हगवणे यांची जवळजवळ शंभर कोटी रुपयांची प्रॉपर्टी असतानाही त्यांना पैशाची किती हाव होती हे या प्रकरणांमधून स्पष्ट होते. हे एक विकृत मानसिकताच म्हणावी लागेल.

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांची चांगली व्हावे अशी प्रामाणिक इच्छा असते.त्या पोटी त्यांना मनाला मुरड घालून त्यांच्या भल्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात.

या प्रकरणाला न्याय तर मिळेलच परंतु काही शक्ती मीडियाचा गैरवापर करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी नाहक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करत आहेत. 

कुणीही नेते मंडळींनी किंवा प्रतिष्ठित व्यक्तींनी एखाद्याच्या लग्नाला जाणे हा थोडाच गुन्हा आहे? म्हणे काय तर अजितदादांनी फॉर्च्युनर गाडीची चावी मुलाच्या हातात दिली. अजित दादांनी हुंड्या साठी समर्थन दिले. म्हणून त्यांचा राजीनामा मागत आहेत. हुंडाबळी कायदा असताना अजित दादां सारखा खासदार, आमदार, विविध मंत्री पदे भूषवणारा नेता हुंड्याला समर्थन देणे शक्य तरी आहे का? 

वैष्णवीला छळणाऱ्या हगवणे कुटुंबाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तमाम महाराष्ट्राची मागणी आहे.

एखाद्याला न्याय मिळणे ऐवजी हे प्रकरणाचे राजकीय भांडवल कसे करता येईल व त्याचा फायदा कसा घेता येईल. हे राजकीय लोक एखाद्याच्या काठीने साप मारून बरोबर आपली पोळी भाजून घेत आहेत. व नहाक एखाद्याला बदनाम करत आहेत. 

मीडियाला याबाबत काहीही देणे घेणे नाही. आठ दिवस ही बातमी फिरवून फिरवून नको त्यांच्या मुलाखती घेऊन लोकांच्या पचनी पाडायची व आपला टीआरपी वाढवायचा एवढेच त्यांचे काम आहे. समाज प्रबोधन करण्याचे त्यांना काही गरज राहिलेली नाही. अशावेळी मीडियाने तज्ञ लोकांच्या मुलाखती घेऊन समाजाचे प्रबोधन करणे गरजेचे आहे.

असेच एक दुसरे उदाहरण माझे एक मित्र मिलिटरी मध्ये होते. ते मिलिटरी मधून रिटायर झाल्यानंतर घरी शेती करू लागले. वीस एकर शेतीमध्ये ते बटाट्याचे उत्पादन घेत होते. अतिशय प्रगतशील असे शेतकरी शिवाय मिलिटरी मॅन. भागात त्यांचा एक दरारा होता. 

त्यांची मुलगी लॉ कॉलेजला शिकायला होती. कॉलेजला शिकत असताना तिचे एका टुकार व कोणतेही काम करत नसलेल्या मुलावर प्रेम जडले. व करील तर या मुलाशीच लग्न करेल अशी तिने मनाशी खूनगाठ बांधली.वडील आपल्या लग्नाला मान्यता देणार नाहीत हे जाणून एक दिवशी घरी चिठ्ठी ठेवून मुलगी घरातील एक लाख रुपये व काही सोन्याचे दागिने घेऊन या टोकर मुलाबरोबर पसार झाली.

दुसऱ्या दिवशी चिठ्ठी वाचून मिलिट्री मॅन असलेल्या मित्राला जबरदस्त धक्का बसला. त्यांच्या मते आता माझी सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली. यावर चर्चा चर्वण झाले.अनेकांनी त्यांना सल्ला दिला. मुलगी कुठे असेल तिथून घेऊन या आणि मुलीचे रीतसर त्या मुलाबरोबर लग्न लावून द्या.

शेवटी हाच निर्णय घेऊन मुलाच्या घरी जाऊन आम्ही लग्न लावून देतो मुलगा कुठे आहे त्याला घेऊन या. असे मुलीच्या कडच्यानी सांगितले. मुलाला आणि मुलीला मदत करणारे मित्रांनी मुलास आणि मुलीस घरी बोलावून घेतले.

रीतसर लग्नाची बोलणी झाली. मुलीला घरी आणण्यात आले. सर्व नातेवाईकांनी आणि वडिलांनी मुलीला खूप समजावले परंतु मुलीचे एकच म्हणणे. करील तर त्याच्याशी लग्न करेल नाहीतर नाही. सर्व उपाय खुंटले.

आणि मुलीचे जमिनीवरील हक्क सोड पत्र घेऊन तिचा मोठ्या समारंभात लग्नविधी लावून दिला.

मुलगी नांदायला सासरी आली. नव्याचे नऊ दिवस संपले. जवळ असलेले सर्व पैसे संपले.शेवटी दागिने ही गहाण ठेवले व मौज मजा केली. मुलगा काहीच काम करीत नसल्यामुळे पैशाचा स्त्रोत हा तसा नव्हताच. शिवाय सासर कडे ज्यांची परिस्थिती ही बेताचीच असल्यामुळे चैन करणे यांना काही परवडेना.मुलीच्या वडिलांनी लग्न झाल्या झाल्या मुलीबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकल्यामुळे मुलीला वडिलांकडे सुद्धा मदत मागता येईना.

मुलगा कोणतेही काम करत नव्हता, त्यामुळे पैसा नाही. मुलाला दारूचे व्यसन लागले. संध्याकाळी घरात भांडणे होऊ लागली. मुलीला अक्षरशः मजुरी करण्याची वेळ आली. नवरा मुलीकडे मजुरी केलेल्या पैशांची सुद्धा मागणी करायचा.अशी बिकट अवस्था मुलीची झाली.

समाजात अशा या घटना सतत घडत असतात. तर मुख्य मुद्दा हे सर्व कशामुळे झाले.आज आपण मुला-मुलींना संपूर्ण स्वातंत्र्य देतो.प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे. रात्री दोन दोन वाजेपर्यंत चॅटिंग करणे, रील पाहणे, इंस्टाग्राम,फेसबुकचा सर्रास वापर करताना तरुणाई दिसत आहे. आणि ती बघून त्यावर आपले मत ठरवत आहेत. 

कोणताही अनुभव नसताना निर्णय घेण्याची स्वातंत्र्य ते आई-वडिलांकडे मागत आहेत.आई-वडिलांच्या अनुभवाला केराची टोपली दाखवत आहेत. आणि आपणच कसे हुशार आणि अनुभवी आहेत हे सिद्ध करताना दिसत आहेत.

काही काही मुले / मुली तर आई-वडिलांना, तुम्हाला काय कळतंय यातलं. तुम्ही गप्प बसा. अशी वाक्य त्यांच्या तोंडावर फेकतांना दिसत आहेत.

समाजाची दुसरी बाजू तर अतिशय विदारक आहे. स्वतःला सुशिक्षित आणि हाय प्रोफाईल म्हणून घेणारे काही काही आई-वडील मुलींच्या लग्नाचे वय संपून देखील प्रतिष्ठेच्या बडेजवा पाई चांगली चांगली स्थळे हातची घालवत आहेत. या पायी मुलीचे वय केव्हाच उलटून गेलेले असते. याची ते पर्व देखील करत नाहीत. 

पूर्वी लोक म्हणायचे, मुलीचे लग्न योग्य वेळी होणे हे केव्हाही चांगले. त्या काळात फार फार तर 24 च्या आत मुलीचे लग्न केले जाई.

परंतु आता शिक्षणाचे कारण सांगून किंवा सेटल होण्याची कारण सांगून 32- 35 पर्यंत लग्न केले जात नाही. यातून हे लोक निसर्ग नियम तोडत आहेत हे स्पष्ट आहे.

आज समाजाला संस्काराची गरज आहे, परंतु आजच्या या आधुनिक सोयी सुविधा ब्रह्मराक्षस बनून आपल्याच छाताडावर बसले आहेत. श्रीराम श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिंदुस्थानात आज आपल्याकडील असgलेल्या संस्कारांचा ऱ्हास होऊन एक विदारक चित्र समाजात निर्माण झाले आहे.


संजय सोळशे यांचे हॉटेल सह्याद्री



 श्री संजय सोळशे (वांजळे ता.खेड ) यांचे हॉटेल सह्याद्री 

अप्रतिम चव, प्रशस्त जागा, गाड्या पार्किंगची सोय असलेले पश्चिम भागातील एकमेव हॉटेल. ( हॉटेल सह्याद्री )

परवा गावी जाण्याचा योग आला.जाताना वांजळे तालुका खेड, जिल्हा पुणे येथे एक नवीनच हॉटेल दिसले. गाड्या पार्क करण्यासाठी प्रशस्त जागा असल्यामुळे सहजच मनात विचार आला चला चहा  घेऊया.

हॉटेलमध्ये गेल्यावर कळले की हे हॉटेल श्री संजय सोळशे यांचे आहे. तिथे गेल्यावर संजय किचनमध्ये आचारी काम करीत होता. नुकताच कढईमध्ये भज्यांचा घाणा टाकला होता.आणि त्याचा दरवळ नाकातोंडात घमघमात होता. कांदा भजी खाण्याची तीव्र इच्छा होत होती.परंतु आम्ही आधीच डेहणे येथे श्री राजू शेठ उबाळे यांचे हॉटेलात नाश्ता केला असल्यामुळे केवळ चहाच मागवला.

अरे! संजय हे तुझे हॉटेल आहे ? हो.. संजय म्हणाला.

तेथे भीमाशंकरला जाण्यासाठी आलेले अनेक भाविक आणि पर्यटक नाश्ता करण्यासाठी बसले होते. मोठ्या आवडीने लोक नाश्ता करत होते.

थोड्याच वेळात चहा आला. चहा घेतल्यावर चहाची अप्रतिम चव जाणवली. अतिशय फक्कड असा चहा होता. चहा पिताना खूपच समाधान वाटले. आणि त्याहीपेक्षा संजयचे हॉटेल पाहून  अतिशय आनंद वाटला.

संजय हा माझा वर्गबंधू.अभ्यासात तसा जेमतेमच होता. नववी पर्यंत शाळा शिकला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि शिक्षण जेमतेम असल्यामुळे  राजगुरुनगर येथे हॉटेल लक्ष्मी येथे  वेटरचे काम करू लागला.

वेटरचे काम करीत असताना प्रचंड कष्ट घेऊन आचारी काम सुद्धा त्याने शिकून घेतले. त्याच्यामध्ये हॉटेल टाकायची खूप जिद्द होती. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे काहीच पर्याय शिल्लक नव्हता.

पावसाळ्यात भीमाशंकर ला जाणाऱ्या पर्यटकांची खूपच वर्दळ असते. हे पाहून नेकलेस धबधब्याजवळ संजयने एक छोटे तात्पुरते हॉटेल सुरू केले. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. लोक तेथे चहा नाश्ता करू लागले. परंतु एक महिन्यानंतर पुन्हा काय करायचे हा प्रश्न होताच. कारण धबधब्याचे पाणी कमी झाल्यावर लोक तेथे थांबत नसत.

खूप कष्ट आणि मेहनत करून संजयने त्याच्यात शेतात अगदी  राजगुरुनगर भीमाशंकर या रस्त्याच्या कडेला वांजळे गावच्या हद्दीत अतिशय टुमदार व सुंदर असे हॉटेल टाकले आहे. प्रशस्त जागा, गाड्या पार्किंग करण्याची सोय शिवाय अविट गोडीचे चविष्ट असे पदार्थ संजयच्या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. फक्त एकदा तिथे जाऊन खात्री करण्याची आवश्यकता आहे.

भीमाशंकरला जाताना अवश्य श्री संजय सोळशे यांच्या  वांजळे येथील..... हॉटेल ला भेट द्या.

आपल्या भागातील नव उद्योजक श्री संजय सोळशे यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अतिशय गरीब परिस्थिती असलेला युवक कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अगदी वेटर पासून स्वतःचे हॉटेल सुरू करतो. हेच खरे भूषणावह आहे. आपल्या भागात असे उद्योजक तयार होणे अतिशय आवश्यक आहे आहे.. सलाम  माझ्या वर्ग बंधू  संजयला.






बुकिंग साठी,संजय सोळशे यांचा संपर्क:- 8788416205



 

गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस