संजय सोळशे यांचे हॉटेल सह्याद्री



 श्री संजय सोळशे (वांजळे ता.खेड ) यांचे हॉटेल सह्याद्री 

अप्रतिम चव, प्रशस्त जागा, गाड्या पार्किंगची सोय असलेले पश्चिम भागातील एकमेव हॉटेल. ( हॉटेल सह्याद्री )

परवा गावी जाण्याचा योग आला.जाताना वांजळे तालुका खेड, जिल्हा पुणे येथे एक नवीनच हॉटेल दिसले. गाड्या पार्क करण्यासाठी प्रशस्त जागा असल्यामुळे सहजच मनात विचार आला चला चहा  घेऊया.

हॉटेलमध्ये गेल्यावर कळले की हे हॉटेल श्री संजय सोळशे यांचे आहे. तिथे गेल्यावर संजय किचनमध्ये आचारी काम करीत होता. नुकताच कढईमध्ये भज्यांचा घाणा टाकला होता.आणि त्याचा दरवळ नाकातोंडात घमघमात होता. कांदा भजी खाण्याची तीव्र इच्छा होत होती.परंतु आम्ही आधीच डेहणे येथे श्री राजू शेठ उबाळे यांचे हॉटेलात नाश्ता केला असल्यामुळे केवळ चहाच मागवला.

अरे! संजय हे तुझे हॉटेल आहे ? हो.. संजय म्हणाला.

तेथे भीमाशंकरला जाण्यासाठी आलेले अनेक भाविक आणि पर्यटक नाश्ता करण्यासाठी बसले होते. मोठ्या आवडीने लोक नाश्ता करत होते.

थोड्याच वेळात चहा आला. चहा घेतल्यावर चहाची अप्रतिम चव जाणवली. अतिशय फक्कड असा चहा होता. चहा पिताना खूपच समाधान वाटले. आणि त्याहीपेक्षा संजयचे हॉटेल पाहून  अतिशय आनंद वाटला.

संजय हा माझा वर्गबंधू.अभ्यासात तसा जेमतेमच होता. नववी पर्यंत शाळा शिकला. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि शिक्षण जेमतेम असल्यामुळे  राजगुरुनगर येथे हॉटेल लक्ष्मी येथे  वेटरचे काम करू लागला.

वेटरचे काम करीत असताना प्रचंड कष्ट घेऊन आचारी काम सुद्धा त्याने शिकून घेतले. त्याच्यामध्ये हॉटेल टाकायची खूप जिद्द होती. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे काहीच पर्याय शिल्लक नव्हता.

पावसाळ्यात भीमाशंकर ला जाणाऱ्या पर्यटकांची खूपच वर्दळ असते. हे पाहून नेकलेस धबधब्याजवळ संजयने एक छोटे तात्पुरते हॉटेल सुरू केले. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. लोक तेथे चहा नाश्ता करू लागले. परंतु एक महिन्यानंतर पुन्हा काय करायचे हा प्रश्न होताच. कारण धबधब्याचे पाणी कमी झाल्यावर लोक तेथे थांबत नसत.

खूप कष्ट आणि मेहनत करून संजयने त्याच्यात शेतात अगदी  राजगुरुनगर भीमाशंकर या रस्त्याच्या कडेला वांजळे गावच्या हद्दीत अतिशय टुमदार व सुंदर असे हॉटेल टाकले आहे. प्रशस्त जागा, गाड्या पार्किंग करण्याची सोय शिवाय अविट गोडीचे चविष्ट असे पदार्थ संजयच्या हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. फक्त एकदा तिथे जाऊन खात्री करण्याची आवश्यकता आहे.

भीमाशंकरला जाताना अवश्य श्री संजय सोळशे यांच्या  वांजळे येथील..... हॉटेल ला भेट द्या.

आपल्या भागातील नव उद्योजक श्री संजय सोळशे यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. अतिशय गरीब परिस्थिती असलेला युवक कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अगदी वेटर पासून स्वतःचे हॉटेल सुरू करतो. हेच खरे भूषणावह आहे. आपल्या भागात असे उद्योजक तयार होणे अतिशय आवश्यक आहे आहे.. सलाम  माझ्या वर्ग बंधू  संजयला.






बुकिंग साठी,संजय सोळशे यांचा संपर्क:- 8788416205



 

विठ्ठल भगत देवाचा पुजारी


गावात सगळ्यात जास्त भोळा भाबडा स्वभाव कुणाचा होता किंवा असेल तर तो म्हणजे विठ्ठल भगत...

विठ्ठल भगत म्हणजे आमच्या काळभैरव तथा वनदेवाचा पुजारी. सर्व गाव त्याला इठल्या आज्या या नावाने हाक मारायचे..विठ्ठल भगत म्हणजे आख्या गावाचा आजा....

विठ्ठल भगताला ओळखत नाही असा एकही माणुस सापडायचा नाही.

गावात सगळ्यांचा आवडता देवाचा पुजारी कोण असेल तर तो म्हणजे विठ्ठल भगत..नव्हे तो देवाचाही सर्वात आवडता पुजारी होता.

विठ्ठल भगत म्हणजे एक ठेंगणा ठुसका बांधा..काळा सावळा वर्ण,धोतर व पैरण व टोपी असा पेहराव. ही कपडे एखाद्या कार्यक्रमालाच हं...नाहीतर सदानकदा कमरेला टाँवेल व अंगात बंडी असे.

श्री.काळभैरव देव तसे अतिशय कडक देवस्थान.देवाच्या भोवती व सबंध पांढरीत (गावच्या हद्दीत) नाना प्रकारचे देव.. कोणत्या देवाला शेंदूर लावायचा आणि कोणत्या देवाला नुसतीच तेल लावायचे हे विठ्ठल भगत लिलया करायचा.

आघुटीची साथ व दिवाळीच्या साथीला पांढरील सर्व देवांना ( पाच पंचवीस देव ) शेंदूर व काही देवांना तेल लावायचे.नैवद्य दाखवायचा हे अतिशय अवघड काम विठ्ठल भगताला करावे लागे.देवाच्या बाहेर आंब्याच्या बनात पंधरा वीस देव प्रत्येकाला कोणता नैवेद्य  व कोठे ठेवायचा हे विठ्ठल भगतच जाणो.

देवाला सकाळ संध्याकाळी दिवा लावायचा. तेही त्याच  ठराविक वेळेला. त्यात कधीही बदल झाला नाही.टायमिंग म्हणजे टायमिंग.दर गुरूवारी व रविवारी देवाकडे खुप गर्दी असे. सकाळी भल्या पहाटे नदीवर जाऊन पाणी आणने. देवावर जलाभिषेक करून तिळाच्या तेलाचे देवाला माजणे करणे,भक्तांनी अणलेले तेल,आगरबत्ती,धुप लगामी लावुन ठेवणे.त्यांचे नारळ फोडुन अर्धा नारळ परत भक्ताकडे देणे.आंगारा देणे इत्यादी कामे विठ्ठल भक्ताला करावे लागत.

शिवाय सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे देवाला प्रसाद लावणे.

चाफ्याच्या कळ्या देवाच्या अंगाखांद्यावर ठेवून व पाण्याचा  देवावर हलकासा सपकारा मारून विठ्ठल भगत प्रसाद मागायला देवाच्य गाभाऱ्या बाहेर बसे.अनेकांची अनेक प्रकारची गा-हाणी असत.उजवी डावी चाले.कधीकधी देव पटकन उजवी किंवा डावी कळी सोडे..कधीकधी देव लहान मुलासारखा हट्टी होई तेव्हा..विठ्ठल भगत लहान मुलाला समजावतात तसे देवाला अर्जव करे...सोड...बाबा..सोड कोणतीही एक कळी सोड.

गरीब माणुसय, लय लांबुन आलाय तो.असे नको करू?

 दे त्याला कळी...नको टाईम लावू..सोड...सोड...सोड बरं..बाबा सोड ..

असे म्हणून परत परत देवावर पाण्याचा सबकारा मारला जाई..विठ्ठल भगत घामाघुम होई .आर्धातास होऊनही कधीकधी देव काय कळी सोडायचाच नाही.मग विठ्ठल भगत आलेल्या भक्ताला सांगायचा पिपरीला (गावाचे नाव) प्रसाद चालू असतील. तु बाबा पुढच्या रविवारी ये.असे मोठ्या निराशेने सांगे.तर कधीकधी देव पटापट कळ्या सोडायचा..

मला तेव्हा विठ्ठल भगताचे खुप अप्रूप वाटे.देव विठ्ठल भगताचे ऐकतो.आणि ते खरेही होते.वास्तव सत्य ..देवाचा सर्वात प्रिय भक्त कोण असे तर तो म्हणजे विठ्ठल भगत.त्यांच्या नंतर गावाने दुसरा पुजारी नेमला तरीही विठ्ठल भगत दररोज न चुकता देव दर्शनाला जात असे.

विठ्ठल भगताचे दुसरे आवडते काम म्हणजे गुरे संभाळणे..हे करत असतांना त्याला अनेक लोक भेटत.लोक विठ्ठल भगताची आस्थेने विचारपुस करत.विठ्ठल भगतही लोकांशी अत्यंत आदबीने बोले..आहो.जाहो करत असे.

 मला विठ्ठल भगत मास्तर म्हणत असे...कधी आले..कस काय बरं आहे का? माझ्या जवळ सुख दुःखाच्या गोष्टी मोठ्या विश्वासाने सांगत असे.मीही गाडी थांबवुन आस्थेने विचारपुस करत असे.

यात्रेला...साथीला,देव बसताना,देव पारधी जाताना विठ्ठल भगताची मोठी कसरत असे...अनेकांच्या अंगात वारे येई.विठ्ठल भगताचा लटकाप होई..सर्वांना ओवाळले जाई.तेव्हा कोठे वारे शांत होई.देवाची पुजा करताना डाव्या हातात घंटी व उजव्या हातात धुपात्र घेऊन जेव्हा तो पुजा करत असे तेव्हा त्याचे संपुर्ण शरीर लटलट हाले.

गावाने जवळजवळ 42 लाख रुपये खर्चून श्री काळभैरवनाथाची नवीन मंदिर बांधले.मंदिराच्या जिर्णोद्धार होता त्या दिवशी मंदिराच्या कळसावरून चिल्लर रूपया,दोन पाच दहा रूपयाची नाणी सोडायची होती. मी जमलेल्या भक्त भाविकांकडुन नाणी गोळा केली.त्यावेळी शेजारीच उभे असलेल्या विठ्ठल भगताकडे नाण्यांचे तबक दिले.व माझ्या शिवाय कोणाकडेही देऊ नको असे बजावले.आणि एकजणाला मंदिरावर चढवायला आम्ही दोघा तिघांनी मदत केली. त्या दरम्यान माझा भाऊ अनिल तळपे याने ते तबक विठ्ठल भगताकडुन अजुन नाणी गोळा करण्यासाठी घेतले...माणुस वर मंदिरावर चढल्यावर त्याच्या कडे तबक द्यायचे होते म्हणुन मी विठ्ठल भगताकडे तबकाची मागणी केली.आधीच उशिर झाला होता..विठ्ठल भगत अतिशय घाबरला.त्याच्या तोंडुन शब्द फुटैना..अंग थरथरू लागले.तेवढयात भावाने तबक माझ्याकडे दिले.मी ते वर दिले.

मी विठ्ठल भगताला विचारले येवढा का घाबरलाय? त्याचे उत्तर मास्तर तुम्ही माझ्याकडे मोठ्या विश्वासाने तबक दिले.अन मी दुसरीकडे दिले.पैशाचे काम..कुणी लांबवले असते तर? केवढे महागात पडले असते.शिवाय देवाच्या कामात खोळंबा झाला असता.तर? असा हा विठ्ठल भगत.

मी लहान असताना माझी आजी नेहमी म्हणायची. बाळ मोठा झाला की तीन थराचे घडीव  दगडी जोत्याचे पाच खण कौलारु घर बांध. मी सन 2014 साली माझ्या आजीचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. घर बांधत असताना आमच्याच गावातील विलास बांगरने अतिशय सुंदर दगडाचे जोते बनवले. हे काम जवळजवळ सहा महिने चालू होते. विठ्ठल भगताने जेव्हा ते जोते पाहीले तेव्हा त्याला खुप आनंद झालेला मी पाहिला.

मास्तर या जोत्याला तुम्ही लोखंडी कड्या बसवा.लय भारी दिसेल.जोत्याला कड्या बसवतात हे माझ्या गावीही नव्हते.पडत्या फळाची आज्ञा समजुन मी दोन हजार रूपयांच्या पितळी कड्या आणल्या. विलासने जेव्हा त्या कड्या बसवल्या तेव्हा ते जोते खुपच आकर्षक दिसू लागले.तात्काळ विठ्ठल भगताला बोलावून आणले.त्याने जेव्हा त्या जोत्याला लावलेल्या कड्या पाहिल्या तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसले ते अद्यापही माझ्या मनात कायम आहे.मी जेव्हा गावी जातो.आणि जेव्हा माझे लक्ष त्या कड्यांकडे जाते तेव्हा मला प्राकर्षाने विठ्ठल भगताची आठवण येते.व मी मनोमन त्या थोर माणसाला वंदन करतो.

विठ्ठल भगताकडे खुप गायी असायच्या..वासरे असायची.गो-हे असायचे.कायम बैल,गो-ह्यांची खरेदी विक्री व्हायची.अनेक लोक बैल पाहण्यासाठी विठ्ठल भगताकडे येत असत.

विठ्ठल भगताच्या काळात तीन वेळा मंदिर बांधले.त्याने तीनही वेळचा जिर्णोद्धार होताना पाहिला.

मंदिराचे काम लांबले.गावाजवळचे पैसे संपले.तसतसे विठ्ठल भगताला काळजी वाटू लगाली.मला भेटल्यावर मास्तर देवाचे तेवढे काम होयला पाहिजे होते.लय लांबले.इठल्या आज्या अजुन पंधरा वीस लाख रूपये लागतील.तेव्हा होईल.त्याला सध्या हजार दोन हजार रुपये सुद्धा कळत नव्हते त्याला पंधरा-वीस  लाख म्हणजे काय हे कसे समजणार ? मग मी समजावून सांगे.त्यावर त्याच्या चेहऱ्यावर मोठी विष्षणता पसरे.अगदी.चिंतातुर होई.

मग मीच म्हणे ! होईल देवाचे काम.देवालाच काळजी.आपण प्रयत्न करायचा तो बुद्धी देईलच ना..होणार काम.

मग मी त्याला देणग्या गोळा करण्यासाठीचे नियोजन सांगे..मग हळुहळु त्याच्या चेह-यावर समाधानाची लकाकी दिसे.

श्रावण /भाद्रपद महिन्यात अनेक गाया /म्हशी व्यायच्या.लोक गाया म्हशींचे कोवळे दुध देवाला नैवेद्यासाठी  घेऊन देवळात येत.मंदिरामध्ये कोवळे दुध व गुळ तांदळाची खीर शिजवली जाई.ही गरम वाफाळलेली खीर चाफ्याच्या पानावर खाताना  स्वर्गीय पक्वान्न खाल्याचा आनंद होत असे.विठ्ठल भगत आग्रहाने खीर वाढे.अशी खीर  दुसरीकडे मिळणार नाही..अप्रातिम चव.

एकदा मी सुमारे महिना दिड महिना आजारी होतो.माझा तपास करण्यासाठी विठ्ठल भगत दररोज सकाळ किंवा संध्याकाळ देवाचा अंगारा घेऊन  न चुकता येऊन विचारपुस करून जात असे.

मंदिराचे येवढे मोठे व सुंदर काम होऊनही विठ्ठल भगताचे मन थोडे खट्टूच होते.मी त्याला सहजच विचारले..इठल्या आज्या.मग कसे काय झालय मंदिराचे काम?

मास्तर मंदिराचे काम भागात चांगलं झालय.मंदिराचे कळशी काम अन या भिंतीला व खाली जमीनीला लावलेल्या लाद्या बघुन मी पार दिपुन गोलो..माझ्या सपनातबी असं मंदिर होईल असा विचार नव्हता केला...



पण मास्तर आपल्या बाबाला (देवाला) सागवानी गाभारा पाहिजे होता..तेच एक राहिलय.

विठ्ठल भगताच्या तिव्र इच्छा शक्तीमुळे देवाने त्याचे गा-हाने ऐकले. कारण आम्ही देवाचा लोखंडी व स्टीलचा गाभारा करण्याचे काम एका कॉन्ट्रॅक्टरला दिले होते. त्यासाठी त्याला 50 हजार रुपये दिले होते. परंतु वर्ष होऊनही काम काही होत नव्हते. शेवटी तो कॉन्ट्रॅक्टर बोलला. मला काही तुमचे काम करता येणार नाही. तुम्ही दुसरीकडून करून घ्या.

एकदा असेच बसलो असता श्री.नामदेव हुरसाळे म्हणाले..वाळदचे श्री.जालिंदर पोखरकर सागाची लाकडं देतोय.पाहिजे तेवढी..पण त्यांच्या रानातुन आपल्याला ती तोडावी लागतील.

काय अश्चर्य पहा..हेच गाभाऱ्याचे काम स्टील (लोखंडी) करायचे होते...हे काम आम्ही काँन्ट्रेक्टरला ठरवून पण दिले होते..परंतु हे काम देवालाच मान्य  नव्हते ...कारण तेथे काहीतरी व्यत्यय आला..व हे काम बारगळले.


सागवानाचा विषय झाल्यावर क्षणाचाही विलंब न करता ग्रामस्थांनी घेतला.व लगेच सागवानी लाकडे तोडायला ग्रामस्थ गेले.ही सर्व लाकडे श्री.दत्तू सुतार यांच्या दारात टाकली.हे काम ७५०००/- हजाराला ठरवून दिले. हे काम देखील वर्षभर चालले.नक्षीकाम करण्यासाठीच्या लाकडाना तोटा आला.परत काम बंद पडले..पुन्हा लोकांनी उचल खाल्ली.परत लाकडे तोडली.व ही सर्व लाकडे मंचर येथे कापायला नेली. परत ४२०००/-रूपये खर्च आला..हेही काम सुमारे वर्षे भर चालले.अतिशय सुंदर असा सागवानी गाभारा तयार झाला. मंदिरात नेऊन बसवला.रूबाबदार गाभारा पाहून मन प्रसन्न झाले..रूखरूख एकाच गोष्टीची वाटते ती म्हणजे हा देव्हारा पहायला आता विठ्ठल भगत हयात नाही.

विठ्ठल भगताने गावात कधीच कोणाशी भांडण केले नाही..की कोणाला शिव्या दिल्या नाहीत.कधीच कुणाबद्दल वाईट बोललेलं मी त्याला पाहिले नाही..किंवा कुणाबद्दल अढी बाळगली नाही.किंवा कधीच कोणाचे पैसे बुडवले नाहीत.अथवा मागीतलेही नाहीत.

विठ्ठल भगत हे अतिशय साधेभोळे व्यक्तिमत्त्व होते.लोकही विठ्ठल भगताच्या वाटेला गेले नाहीत.गावात कुणाचे भांडण झाले अथवा कुणी एखाद्याला  मोठमोठयाने बोलले तर विठ्ठल भगताचे अंग लटलट कापायचे.असे हे व्यक्तिमत्त्व.

विठ्ठल भगताने जी देवाची/गावाची सेवा केली आहे ते गाव कधी विसरू शकणार नाही.येवढे मात्र खरे...

🙏🙏💐💐


 

 

विठू नांगरे कलंदर माणूस


विठू नांगरे कलंदर माणूस 

विठू नांगरे हा आमच्या भागातील असा अवलिया होता की त्याला कोणते काम जवळ जमत नाही.असे कधी झाले नाही.

1975 ते सन 2000 पर्यंत आमच्या भागात नाट्यरूपी भारुड मंडळे जोमात होती. त्या काळात गावातील ठराविक घरामध्ये श्रावण महिन्यात धार्मिक ग्रंथांची पारायणे चालत असत. चैत्र आणि वैशाख महिन्यात सत्यनारायणाच्या महापूजा होत. प्रत्येक गावात यात्रा,जत्रा आणि उरूस असत. त्यामुळे धार्मिक वातावरणाबरोबर सांस्कृतिक वातावरण सुद्धा तयार झाले होते. त्यामुळे वेगवेगळ्या लोककलांना समाजाकडून प्रोत्साहन मिळत असे. या सर्व वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे नातेवाईक गण गोत्र, मित्र,आप्तेष्ट यांचा एकमेकांकडे नेहमी राबता असे. 

परंतु काहीही म्हणा त्यावेळी धार्मिक वातावरणाने लोक भारलेले होते. रामायण, महाभारतातील कथा, नवनाथ भक्तिसार मधील कथा विविध पुराणातील कथा यांनी समाजावर एक वेगळेच गारुड तयार केले होते. या कथांना कुठेतरी प्रत्यक्ष नाट्यरूपाने समाजासमोर आणले पाहिजे या उद्देशाने अनेक गावागावांमध्ये नाट्यरूपी भारुड मंडळ उदयास आली.वांजळे, वरचे भोमाळे, पाभे,धामणगाव, टोकावडे, मंदोशी,पोखरी, पवळेवाडी, देवतोरणे, नायफडसरेवाडची सारेवाडी,नाव्हाचीवाडी अशा अनेक गावांमध्ये नाट्यरूपी भारुड मंडळे उदयाला आली. अनेक कलाकार उदयाला आले आणि त्यात सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणजे विठू नांगरे. या काळात या नाट्यरूपी भारुड मंडळांना समाजाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकाश्रय मिळाला.

विठू नांगरे यांचे कोणतेही प्रकारचे शिक्षण झाले नव्हते. तरीही त्यांच्या रामायण महाभारतातील कथा आणि पुराणातील कथा तोंडपाठ होत्या. विठू नांगरे यांच्या गावात नाट्यरूपी भारुड नव्हते. तर ही विठू नांगरे भागातील कोणत्याही नाट्यरूपी भारुड मंडळात कोणत्याही प्रकारचे पात्र साकारत असे. मग तो राजा असो अथवा प्रधान, देव असो वा दानव किंवा स्त्री पात्र कोणतेही पात्र विठू नांगरे लिलया करत असे. विठू नांगरे च्या कोणत्याही भूमीकेला  समाज प्रचंड दात देत असे.

भारुडातील प्रसंगानुसार विठू नांगरे स्त्री भूमिका करत असे. नऊवारी लुगडे चापून चोपून नेसलेला व तशाच रंगाची चोळी परिधान केलेला विठू नांगरे कधी स्त्री प्रमाणे भासत असे. डोक्यावर चुंबळ, त्यावर पेटते निखारे आणि त्याच्यावर भाताचे पातेले एवढे सर्व डोक्यावर घेऊन विठू नांगरे गाण्याच्या तालावर नाचत असे. नाचता नाचता डोक्यावरचा भात शिजला जाई. तो पाबेतो त्याने कधीही डोक्याला हात लावलेले नसे. शिजलेला भात पाहून लोक अचंबित होत असत. विठू नांगरे यांना जमलेल्या प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळत असे.

पुराणा मध्ये अनेक कथा असत.त्यानुसार भारुडात वगनाट्य होत असे. त्यापैकी गरुडाची आई विनता व सर्पाची आई कद्रू या दोन सवतींची कथा पुराणा मध्ये आहे. विनताचे सत्य असूनही कद्रुने कशी खोटेपणाने पैज जिंकली. व विनताचा छळ केला हे वगनाट्य खूपच त्यावेळी लोकप्रिय झाले होते. विठू नांगरे विनताचे पात्र करायचा. ते पात्र इतके प्रभावी होते की लोक अक्षरशः रडायचे. स्रिया डोळ्याला पदर लावून मुसमुसून रडायच्या. हीच विठू नांगरे यांच्या कलेची पावती होती.

दरवर्षी शिमग्याला विठू नांगरे मरीआईच्या देव्हाऱ्याचे सोंग घेऊन भागातील गावांमध्ये जात असे. व मरीआईच्या भक्ताप्रमाणे कपडे परिधान करून स्वतःलाच चाबकाचे फटकारे मरत असे. लोक याही कलेला प्रचंड दात देत असत. व त्याला योग्य ती बिदागी देत असे.

विठू नांगरे यांचा सर्वात प्रभावी कार्यक्रम तो म्हणजे मोर नाचवणे. विठू नांगरे यांनी लाकडांच्या बांबूपासून मोर तयार केला होता. त्याला एक लोखंडी चोच तयार केली होती. त्यावर निळसर कपडे व पाठीमागे खरोखरच्या मोरांचा पिसारा मोराचे पिसे लावून तयार केला होता. अगदी खरोखरच्या मोराप्रमाणे. त्यामध्ये विठू नांगरे प्रवेश करून वेगवेगळ्या प्रकारे सनई चौघडांसमोर नाचत असे. त्यावेळी विशेषता लग्नामध्ये, यात्रांच्या मिरवणुकीमध्ये विठू नांगरे यांच्या मोराला प्रचंड मागणी होती. लहान थोर, आबाल वृद्ध स्त्रिया विठू नांगरे यांच्या मोराचा नाच पाहून आनंदित होत असत. विठू नांगरे यांच्या मोराला जुन्नर, आंबेगाव खेड आणि मावळ या चारही तालुक्यांमध्ये प्रचंड मागणी होती. मोर नाचवावा तर विठू नांगरे यांनीच असे लोक त्यावेळी म्हणत असत. वेगवेगळ्या भारोनामध्ये सुद्धा मोर नाचवला जाई.

विठू नांगरे यांना जसे धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला आवडे. तसेच त्यांना कुस्तीची सुद्धा प्रचंड आवड होती. विठू नांगरे यांना कुस्तीचे कोणतेही डाव येत नसत तरीही ते विविध यात्रांच्या आखाड्यामध्ये कुस्तीमध्ये भाग घेत असत. विठू नांगरे यांनी कुस्ती खेळताना कधीही लंगोट किंवा काच्या याचा उपयोग केला नाही. कारण विठू नांगरे हे मुळातच पैलवान नव्हते. त्यांच्याजवळ लंगोट आणि काच्या असणार कसा. त्यामुळे विठू नांगरे हे चड्डीवरच कुस्ती खेळत असत. कुस्ती खेळताना एकदा का विठू नांगरे यांनी भुई धरली की समोरचा पैलवान कितीही ताकदीचा व डावपेचाचा असला तरी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा विठू नांगरे त्याला पलटी होत नसे.आखाड्यात नुसताच फुफाटा उधळत राही. नाट्यरूपी भारुड मंडळात स्त्री पात्र  काम करताना रडविणारे विठू नांगरे कुस्ती खेळताना मात्र लोकांना प्रचंड हसवत असत.शेवटी ही कुस्ती सोडवली जाई.सोडवलेल्या कुस्तीला थोडेफार का होईना इनाम विठू नांगरे यांना मिळत असे. कधीही पैलवानकी न केलेल्या विठू नांगरे यांच्या कुस्तीची नेहमीच चर्चा होई.अजूनही एखादी कुस्ती पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ चालली की लोक विठू नांगरे यांच्या कुस्तीची आठवण काढतात.

 विठू नांगरे यांना नाट्यरूपी भारुड मंडळात पात्र काम करायची आवड होती तशीच पावसाळ्यात नदीला आलेल्या पुरामध्ये मासे पकडण्याची सुद्धा खूप आवड होती. नदीला मोठा पूर आल्यावर बांबू पासून बनवलेल्या येंडी मधून विठू नांगरे खूप मासे पकडत असत. पावसाळ्यात जेव्हा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येई. त्यावेळी आम्ही मासे पकडण्यासाठी नदीवर जात असू. त्यावेळी विठू नांगरे यांची हमखास आमची भेट होत असे.

प्रचंड गरिबी,जगण्यासाठी केलेली धडपड,अशाही परिस्थितीत आपल्या मधील कलेला वाव देत मनाला विरंगुळा देऊन विठू नांगरे आपल्या फाटलेल्या संसाराला ठिगळे लाऊ बघे. त्यावेळी सर्वच लोक गरीब होते. परंतु गरीब असूनही आपापले छंद जोपासून होते.

आजही समाजात यात्रांच्या हंगामात, शिमग्यात,लग्न कार्यामध्ये विठू नांगरे यांचे आजही जुने जाणते लोक नाव काढतात. व त्यांच्या केलेल्या कलेच्या कामाच्या स्मृतींना उजाळा देतात. अनेकांना शिवाजी पैलवान सुद्धा माहीत असेल. त्याविषयी सुद्धा दोन शब्द लिहून शिवाजी पैलवान यांना प्रकाशात आणूया. वाचकांचा प्रतिसाद मिळेल हीच अपेक्षा.


 



.

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम


माझ्या काकाला मुलगी पाहायला आम्ही दोघेच सुरुवातीला गेलो होतो. पण जाताना आजीने व आईने सांगितले होते. काकी व्यवस्थित पहा बरं. कशी आहे. काय आहे. घर कसंय. माणसं कशीय. सारं निट पहा बरं.

काका आणि मी स्प्लेंडरवरून जात असतानाच वाटेत अवकाळी पाऊस लागला. एका टपरीवजा हॉटेलात आश्रय मिळाला. एक बेवडा तिथेच दारू ढोसत होता.आम्ही दुर्लक्ष केले. काकांनी विचारले " चहा घ्यायचा का"? मीही हो म्हणालो.

त्या बेवड्याने जरासं पुढं जात कोपऱ्यावर लघुशंका केली. ते हॉटेल चालवणारी महिला. दुसरीकडे तोंड करत शिव्या देऊ लागली. याचा राग येऊन बेवडा तिच्या अंगावर धावून आला. पण त्याच्या हाताचा धक्का मला लागल्याने चहा सांडला. काकाला राग आला पण नविन गाव असल्याने तोंडातल्या शिव्या गिळून व रागाने उगारलेला हात खाली घेऊन. "अहो काका जरा नीट चाला की चहा सांडला ना पोराचा"!

पण त्या बेवड्यानं उलट काकांनाही शिव्या द्यायला चालू केल्या. काकांनी इकडे तिकडे पाहिले. त्या बाईनेही मुकसंमती देत खुणावले. मग काय पहलवान काकानं चांगलाच बडवला. पण त्यात त्या बिचाऱ्याचा दात मात्र पडला.

त्या बेवड्याच्या तोंडाला रक्त येत आहे हे पाहूनच मी घाबरलो. जवळच एक दात पडलेला दिसला. पण त्याच्या तोंडातली तर वरच्या दातांची अख्खी फळीच गायब होती. म्हणजे बाकीचे दात घशात गेले की काय ? असे वाटल्याने मी त्या बाईला म्हटलं " आजी इथं एकच दात आहे. पण बाबांचे तर चार दात गायब आहेत ? "ते व्हय ते मागल्या बारीला पाडलेत एक जणानं असेच."

गर्दी व्हायच्या आत आम्ही तिथून पळ काढला.

नाव व पत्ता विचारत विचारत शेवटी मुलीच्या घरी आलो. घरी कुणीच दिसत नव्हतं. दारात एक नांदुर्गीच झाड होतं. त्या झाडाखालीच एक खुप थकलेली म्हातारी बसली होती. बहुतेक तिला ऐकायला आणि दिसायला पण कमी येत होतं.

"घरी कुणी नाही का आजी?" पण आजीला रेंज काय मिळेना.

शेवटी दाराचा आवाज आला. तो मोठा वाडा होता. त्या आवाजामुळे आम्ही सावध झालो. काकांनी घरी कोणी आहे का ? हे विचारलं.

परकर पोलक्यातली मुलगी बहुतेक शेणानं सारवत होती. काहीसं केसांनाही शेण लागलं होतं.

तिनं काकांना विचारलं "कोण हवंय तुम्हाला?"

तिच्या प्रश्नानं काकाच गोंधळून गेले. " ते...ते... आम्ही मंदोशी वरून आलोत"

हं मग .. मंदोशी.. अय्या मंदोशी म्हणत तिनं खाडकन दरवाजा लावून घेतला.

आम्हाला कांहीच समजले नाही. आम्ही तसेच दारात उभे होतो. बहुतेक त्या वाडयाला दुसराही एक दरवाजा होता. जो पाठीमागच्या बाजूला होता.जो त्यांच्या शेतात जायचा शेतही वाडयाजवळच होते.

क्षणात तिने जत्राच भरवली. शेतात काम करणारी मजुर पण आम्हाला बघायला आली. या की या... काय खबर नाय कळीवलं नाय.. आसं अचानक यायचं आस्तं व्हय वं पावणं.

त्यांनी बसायला घोंगडी अंथरली. मी आणि काका घोंगडीवर बसलो. त्या माणसांनी चहुबाजूंनी आम्हाला घेरलं होतं. मला तर स्वतःला जंगलात असून जंगली लोकांनी आम्हाला चहुबाजूंनी घेरल्यासारखंच वाटायला लागले. आणि जोराचा ओरडलो " काका वाचवा !

याला असं काय झालं म्हणून सगळे पुन्हा माझ्याकडे पाहू लागले. काय नाही.. काय नाही... टि.व्ही जास्त बघतो ना आणि त्यातल्या त्यात भुताच्या मालिका बघायची हौस. त्यामुळे सगळीकडे त्याला....

असं असं... टिव्ही लावायची का बाळा. वय गं काके लाव. ये थांबय चिवे मी लावणारे. म्हणत जि.प. शाळेच्या गणवेशात भांडणारे बहिण भावंडं. काकीनं म्हणजेच आमच्या काकांच्या सासूबाईनं धपाटं देऊन दोघे पळविली.

बारका टिव्ही टिपावर ठेवला होता. त्याखाली पोत्याला पोतं शिवून टिप झाकला होता. टिव्ही चालू केला Black and White खरखर आवाज करत होता.

कुणीतरी आठवण करून दिली " ये आंटीना हालीव रं म्हादया"

म्हाद्या आधीच अँटीनाच्या पोलवर चढला होता. आणि अँटीना हलवत " आलंय का चितार म्हणत ओरडत होता.

नाही... नाही... आलं... गेलं....नाही... नाही... आलं... गेलं.... आलं आलं आलं... असं लहानगी पोरं ताला सुरात ओरडत होती. मीही त्यांच्यात सामिल होऊन योगदान दिले होते. हळूहळू मीही मिसळून गेलो.

कांही चित्र दिसते ना दिसते तोच लाईटच गेली. सारे प्रयत्न निष्फळ ठरले.

मुलगी नविन धुतलेला ड्रेस घालून आली. मध्येच कुणीतरी म्हातारी म्हणते " आगं तायडे साडी घालाव लागती वं... ?

ये आजे नाय माझ्याकं साडी.. आन मला नाय आवडत साडी घालाया... 

तु उठ बर हितून पईली.. जा तुज्या घरी.... ढंगरी.?

आता काका आणि मी चांगलेच घाबरलो.

ये तायडे आसं म्हणत नसत्याती, म्हाताऱ्या माणसास्नी... पिकलं पान हाय !

आजी बिनलाज्यावानी आमच्याकडे बघून हसती.

ती नवरी मुलगी म्हणते - " हयॅ ह्यॅ म्हणं पिकलं पान... गळून बी पडना एकदाचं...!

आता आजी थयाथया करू लागली. नवरीच्याच आईनं व शेजारच्या बाईनं आजीची समजूत काढत बाहेर नेलं.

बाहेरच्या नादुर्गीच्या झाडाखालच्या म्हातारी जवळ आजीला बसवलं.

समजावणीच्या सुरात नवरीची आई आजीला म्हणते " तुमी बी अत्याबाय पोरीच्या नादी लागतयासा अजून कळती नाय ती.

काय गं पारे म्हण... कळती नाय आज लगीन केलं तर वरसात पोरं व्हत्याल की, आन मग कळती नाय! लय ऐकूनी घेतलं मी बी. अं लय नगं तोरा दावू. असंच व्हतं. बग असलाच म्हातारडा नवरा भेटंन. सराप हाय मपल्या म्हातारीचा.'

काय बाय करावं अत्याबायला आवं आसलं वंगाळ नगा बोलू वं... पावणं आल्यात दारात ते काय म्हणतली...

आल्यात म्हंजी काय म्या आमंतरण दिलं व्हतं वय यायचं.. त्यांच ती आल्याती... त्यांचं ती जात्याली.

दुर्लक्ष करून नवरीच्या आईनं आजीला बाहेर सोडलं.

आणि वाड्याचं दार लावून आमच्या समोर येऊन बसली. काकांला दबक्या आवाजात म्हणाली "चकारली मातारी, खुळ बसलंया.. मातारपणात नवरा गेला... ल्योक गेला. आमीच संभाळतो तिला. काय वं लागतंया माताऱ्या माणसाला. कोरभर भाकर तुकडा तर आपुन कुतऱ्यालाबी टाकतूया.

माणसाला दिला तर तेवढंच पुण्य लागतंया.. लै बाय बेकार अस्तो मातारपणाचा जल्म. देव लवकर बी नेत नाय वं असल्याला. तरणीबांड जवान माणसांनाच काय व्हया लागलं की ती मरत्याती कायनु बायनू कारनांनी.. आन ही आसली आमच्या मढ्यावर सोडत्याती.

तिचा एकटीचाच पट्टा चालू व्हता. तेवढयात मोठ्ठा कर्कश आवाज झाला. सगळेच दचकून गेले. लाईट आली होती. व टिव्हीला मुंग्या आल्याने आवाज येत होता.

काकानं मुलगी पाहिली त्यांना पसंदही पडली. ते दोघंही बराचवेळ एकमेकांना चोरून बघायचे. मी खिशातल्या डायरीत माझं लिखानकाम करत होतो.

जेवणं झाली. बेसन वड्या. दही ताक वाढताना नवरीची आई पुन्हा म्हणाल्या " आदी कळवली असतं तर मटान केलं असतं.

आमची जेवणं झाली. "तायडे, पावण्याला हात पुसाय दी की"

पण लाजाळू काकानं नाही राहूद्या घेतो. म्हणत बसूनच पाठीमागचा टॉवेल ओढला. आणि जेवढया घरातल्या होत्या  नव्हत्या तेवढ्या गुंडाळून कोंबून ठेवण्यात आलेल्या साड्या  त्याच्या अंगावर. खरकाट्या ताटात एकूणच वाड्याभर पसरल्या.

सारवासारव करीत पुन्हा म्हणाल्या " आमच्या तायडीला गोदडी शिवायचा लई नाद हाय" बसून म्हणून काय ऱ्हात नाही.. काय बाय करतच असती.

निघण्याची वेळ आली. पण माझं लिखाण काम चालूच व्हतं. काका म्हणाले - " काय रं राम काय लिहतोस मगापास्न"

काय नाही. तुम्हाला नाही दाखवणार.''

माझं निरीक्षण चालूच होतं आणि टिप्पणही मी माझ्या डायरीत नोंदवत होतो. भिंतीवरती फॅमिली फोटो लावलेला होता. त्यात नवरी मुलगी तिच्या दोन वेण्या आणि गावकडची लहान मुलांना बोटभर डोळयाला काजळ लावायची पद्धत. मी काकाला म्हणालो " काका ती नवरी आहे काय ?"

नवरीचीच आई मध्ये बोलली " व्हय बाळा तुझ्या एवढी व्हती ना तवा जत्रात काढला व्हता फोटू. मी तायडी आणि तायडीचा बाप. येईलच एवढयात फाट्यावर गेला आसंल मुतारा ढोसायला."

आणि मग माझं आणि काकांचं दोघांचंबी एकाचवेळी लक्ष गेलं फोटोकडे.

अरे हा तर मघाचाच " बेवडा "

तेवढयात कानावर आवाज आला. ये म्हातारे झाडाखली काय बसलीस.

आजी - तुहया पोरीनं हाकलून लावलंय मला. सजनीनं.... नवरा कराय निघालीय झिप्री...

कुठाय ती... तायडे S S S

तायडी म्हणजेच नवरीनं दार उघडले. तो बेवडा आत आला.

दार लावून काय बसलीस माझ्या आजीला बाहेर काढून... तुझ्या मायला तुझ्या...

खरकाटी भांडी न्हाणीत ठेवत झटकन तीची आई मध्ये येत म्हणते "आवं आवं असं पोरीला मारू नगासा' पाव्हण्यापुढं ग्वांड दिसतं का ते...

पाव्हणं .... कुठाय पाव्हणं....

सगळी आम्हाला शोधत होती... आणि आम्ही खुष्कीच्या मार्गाने म्हणजे वाड्याच्या मागच्या दारानं वावरा वावरानं पळत होतो.

कसंबसं घरी आलो. संध्याकाळी घरचे सर्वजण जेवायला बसलो होतो. आमचं खटल्याचं घर वडिल धरून पाचजण भावंडाचं. त्यांची मुलं म्हणजे कसा भरलेला वाडा.

सर्वात लहान चुलताच लग्नाचा राहिल्याने सगळी धावपळ होती. शोधाशोध होती.

आजीनं मला विचारलं . " मग राम कशीय नवीन काकू.. मी छान म्हटलं. "

घर कसंय - वाडा हाय मोठ्ठा एवढा दोन्ही हातानं दाखवत.

आत कसाय रं वाडा. मग मी जेवता जेवता उठलो. खिशातली डायरी काढली अन् वाचू लागलो.

दारात नांदुर्गीचं झाड त्याखाली म्हातारी

सतरा कोंबड्या

37 पिल्लं

एक रेडकू

5 कुत्र्याची पिल्लं

दोन गाई

दोन बैलजोडी

घरात टिप

टिपावर पोत्यांचं कव्हर

बारका ONIDA TV

जुना फॅन

कपाट

03 पितळी ताटं

0 4 जर्मन ताटं

मोठा स्टिलचा तांब्या

चेंबलेला जग

धान्याची दीड पोती

1 घोंगडी

वाड्याभर चिंध्या

2 पातेली

तेवढयात काकांनी डायरी हिसकावून घेतली. हे ल्हेत व्हतास व्हय रं.

आता तुम्हीच सांगा एखाद स्थळ (बायको) बघायला गेल्यावर काय काय गोष्टी करायच्या.


गावाकडच्या रेसिपी व पदार्थ..


गावाकडच्या रेसिपी व पदार्थ 

आजकाल प्रत्येक गृहिनीला संध्याकाळी कोणती भाजी करावी. किंवा कोणता स्वयंपाक करावा हा मोठा प्रश्न असतो.शहरात तर सुट्टी असेल तर सर्रास लोक ढाब्यावर जेवायला जातात. त्यात मीही एक.

ढाब्यावर जायला नकोच वाटते.त्याच त्या पनीरच्या भाज्या?? कोल्हापुरी व्हेज,व्हेज तिरंगा,स्टार्टरला पनीर चिल्ली,सोयाबीन चिल्ली,मसाला पापड. ... . नुसता विचार जरी आला तरी असलेली भुक निघुन जाते.परंतु घराच्या किंवा मित्रांच्या आग्रहामूळे जावेच लागते.

पूर्वी लोकांना खायला नीट मिळत नव्हते.आणि आता सुग्रास ? भोजन असूनही भुक लागत नाही.

एकदा असाच निवांत बसलो असता लहानपनाच्या अनेक आठवणी डोळ्या समोरून तरळून गेल्या.

मला आठवतंय ग्रामीण भाग तेव्हा स्वयंपूर्ण होता.आमच्या कडे भाताची व नाचणीची लावणी झाल्यावर लोक बऱ्या पैकी निवांत असायचे. गणपती मध्ये पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला असायचा.माझा नाना व इतर गावातील लोक मुरमाड असलेली किंवा डोंगर उतारावरील जमीन नांगरून त्यामध्ये हूलगे पेरत असत.कुणी उडीद,खुरासनी (काळे तीळ),भुईमुग पेरत असत. तर भात निघाल्यावर हरभरा,वाटाणा,मसूर,गहू पेरत असत.त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याकडे भाता बरोबरच भरपूर कडधान्ये होत असे

 गावाकडची शेंगुळी 


गावाकडे हूलग्याच्या पिठापासून शेंगोळी सर्रास बनवली जात असत.माझी आई परातीच्या बूडावर खुप छान शेंगोळीचे वेढे बनवत असे.शेंगोळीच्या वेढ्याचे झणझणीत कालवण,भाकरी व कांदा ही एक वेगळीच फर्माईश असे.शेंगोळयाचा रस्सा भाताबरोबरही तितकाच चविष्ट लागत असे.दोन घास सरस अन्न पोटात जात असे.

हूलग्याचे कढाण (वरण) नुसते मीठ टाकून देखील छान चव लागायची.

वाफवड्याचे कालवण 

अजून एक चविष्ट पदार्थ गावाकडे हमखास असायचा.तो म्हणजे हरबरा डाळ भिजत घालायची.नंतर पाट्यावर सरभरीत वाटायची.तव्यावर त्याचे छोटे छोटे सांडगे थोड्या तेलात परतायचे. नंतर त्याचे कालवण (रस्सा) बनवायचे.खूपच अप्रतिम चव असायची.

शेतातील कामासाठी जर माणसे असतील तर दुपारच्या जेवणाची मोठी लगबग असायची.मसूराची झणझणीत घट्ट आमटी,नाचणी किंवा तांदळाच्या भाकरी,गावाकडील बनवलेले पापड,कांदा आणि खडक्या किंवा रायभोग तांदळाचा भात हे जेवण मोठ्या पाटीतून शेतातील झाडाखाली आणले जाई.

लोक काम थांबवून ओढ्यात हातपाय धुऊन झाडाच्या थंडगार सवलीत पंगती करुन बसत असत.पितळीमध्ये भरपूर आमटी वाढली जाई.सोबतीला कांदा,लसणाची चटणी,पापड असे.लोक आमटीत भाकरी चुरुन खात असत.शेतात झाडाच्या सावलीला पंगतीत जेवण्याची मजा काही औरच असायची.

त्या काळी गरिबी असल्यामूळे अनेक महिला घरात अगदीच काही नसल्यास नुसत्या कांद्याचे (कांदवणी) कालवण करत असत. काही लोक मुद्दाम घरधनीनला आठवण करुन देत असत.आज कांदवणी कर बरका !.कांदा चिरायचा. तो तेलात तळायचा. त्यात मीठ मसाला घालायचा. पाणी घालायचे दोन उकळ्या आल्यावर कालवण तयार.तर मला हे कांदवणी खूपच आवडायचे.

 तव्यावरची वाटोळी भजी 

हरबरे भिजत घालून ते भिजले की तव्यावर केलेली डाळीच्या पिठाची वाटोळी भाजी तांदळाच्या भाकरी बरोबर खाताना वेगळीच मजा यायची.

 तिळाची कोंड 

उखळ।त काळे तीळ,लाल मिरची व मीठ कुटून बनवलेली कोंड तोंडी लावण्यासाठी छानच असायची.




तव्यावरचे सुक्क बेसन 

तव्यावर केलेले मोकळं (सुक्क) बेसन हा एक अप्रतिम चवीचा पदार्थ असायचा.त्याचप्रमाणे तव्यावरची बेसनाची पोळी सुद्धा 
अप्रतिम चव द्यायची.

तव्यावरची बेसनाची पोळी (धीरडे)

उकडलेल्या अंड्यांचे कालवण सुध्दा beshच असायचे.




उकडलेल्या अंड्याची कालवण 
पूर्वी दुपार नंतर कातकरी नदीचे मासे गावात विकायला घेऊन यायचे.छोट्या पानावर वाटा असायचा. त्यावर नदीचे छोटे छोटे (चिंगळया) मासे असायचे. हे मासे तव्यावर बनवले जात असत. या माशांची चटणी भाकरी बरोबर छानच लागत असे.

कैरीच्या कचऱ्या

हळद मीठ लाऊन मडक्यात मुरत ठेवलेल्या कैऱ्या भाकरी बरोबर खाण्यात वेगळीच खुमारी होती.

गावाला अनेक भाज्या केल्या जात असत.कौदरीच्या सोंडग्याची भाजी,भोकरीच्या कोवळ्या पानांची मुटकी,कुर्डूची भाजी,वाळवलेल्या भोकराची भाजी,चिलुची भाजी,सायरीच्या फुलांची भाजी,ते-याची भाजी,चैताची भाजी अशा अनेक रानभाज्याची चव छानच असायची.

 केळ फुलाची भाजी 



केळ फुलांची भाजी तर अप्रतिमच असते. केळीला जे मोठ्या नारळ एवढे फळ येते.ते तोडून आणायचे. कोबी सारखे असते. त्याची पाने काढून टाकायची.आत कंगव्यासारख्या दात्रे असलेल्या भाग असतो.तो सर्व भाग काढून घ्यायचा. तू भाग उभा चिरून रात्रभर पाण्यात ठेवायचा.दुसऱ्या दिवशी पातेल्यात टाकून उकडून घ्यायचा. अनावश्यक पाणी पिळून बाहेर टाकायचे. नंतर पातेल्यात तेल,कांदा, जिरे मोहरी, लसणाच्या पाकळ्या परतून घ्यायच्या. त्यामध्ये केळ फुलाचा हा भाग टाकायचा. मीठ व गोडा मसाला घालून मंद आचेवर शिजवून द्यायचे. ही भाजी अप्रतिम असते.

या भाजी बाबत सुप्रसिद्ध चित्रपट कलाकार नाना पाटेकर सांगतात. तिरंगा चित्रपटाचे शूटिंग चालू होते. ते चित्रपटात प्रसिद्ध कलाकार राजकुमार हे काम करत होते. नाना पाटेकर अजूनही शेतातल्या आणि गावरान भाज्या खातात. शूटिंगला जाताना नाना पाटेकर यांना त्यांच्या आईने केळीच्या फुलांची भाजी डब्यात दिली. नाना पाटेकर तो डबा घेऊन शूटिंगला गेले.

दुपारी जेवणाचा लंच ब्रेक झाला. नाना पाटेकर व राजकुमार जेवायला बसले. राजकुमार नानाला म्हणाले. हा माझा डबा तुम्ही खा. व तुमचा डबा आज मी खाणार.

ठीक आहे नाना बोलले आणि त्यांनी त्यांचा डबा राजकुमार यांना दिला.

डबा खाऊन झाल्यावर राजकुमार नानांना बोलले.

नाना ! मा को कहना, खिमा बहुत अच्छा बनाया था.

यावर नाना राजकुमार यांना म्हणाले. राजकुमार जी तो खिमा नव्हता.केळीच्या फुलांची भाजी होती.

यावर राजकुमार नानांना बोलले. नही जानी,ये तो खिमा ही था !

तर अशा या गावाकडच्या भाज्या जो खरा खावय्या आहे त्यालाच ही चव कळणार.

केळीच्या फुलासारखीच कोवळ्या फणसाची भाजी पण अशाच पद्धतीने बनवले जाते. या भाजीची चव सुद्धा अप्रतिमच असते बर का !

 भिजवलेल्या गहू हरभऱ्याच्या घुगऱ्या 

गावात लहान मुलाचे नाव ठेवायच्या वेळी किंवा वीर (देव) नाचवायच्या वेळी मीठ घालून उकडलेले गहू व हरभऱ्याच्या घुगऱ्या सुध्दा छानच चवदार लागायच्या.

पूर्वी लोक घराच्या पाठीमागे भाज्या लावत.अळू,डांगर भोपळा,दोडका,कारली,घोषाळी,काकडी यांचे बी पेरत.यापैकी कोवळया काकडीचे कळे खायची मजा औरच असायची.शिवाय भोपाळघारी,भोकाचे वडे,काकडीचा गर तांदळाच्या पिठात गुळ कालऊन हाळदीच्या पानात बनवलेले पातोळे खुपच छान असायचे.

फास्ट फूडच्या जमान्यात मात्र हे सर्व पदार्थ नामशेष झाले किंवा होत आहेत.त्यामुळे मात्र हार्ड,रक्तदाब,बद्धकोष्ठ,शुगर अपचन वेगवेगळे पोटाचे आजार मात्र ओढऊन घेत आहोत. कळतंय पण वळत नाही.असेच म्हणावे लागेल.


 

गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस