आदिवासी समाज दशा आणि दिशा


आदिवासी समाज दश आणि दिशा 

.

आदिवासी म्हणजे अधिवास म्हणजे प्राचीन काळापासून इतिहास ज्यावेळी लिहिला गेला त्याच्याही आधीपासून भारतात राहणारा समाज होय आज आपण महाराष्ट्राचा इतिहास पहिला भारताचा इतिहास पाहिला जगाचा इतिहास पाहिला या इतिहासामध्ये अगदी प्राचीन काळाचे वर्णन आहे परंतु आदिवासी समाज हा इतिहास लिहिणार यांचाही आधीपासून भारतात महाराष्ट्रात नांदतो आहे हे सर्वांनी मान्य केले आहे भारतात महाराष्ट्रात अनेक स्थित्यंतरे झाली परंतु आदिवासी समाज हा मूळ निवासीच राहीला. 1970 पर्यंत आदिवासी समाज मुख्य प्रवाह प्रवाहात आलेल्या नव्हता तथापि माननीय कृष्णराव मुंडे साहेब हे आमदार झाल्याने ते नियोजन मंडळाचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या काळात शिक्षक ग्रामसेवक तलाठी अशा अनेक नोकऱ्या आदिवासी समाजातील तरुणांना मिळवून दिल्या त्यामुळे समाज मुख्य प्रवाहात हळू हळू येऊ लागला शिक्षणाचे महत्व कळले शिक्षणामुळे काही का होईना प्रगती झाली आज अनेक लोक आईएएस अधिकारी वर्ग 1 चा अधिकारी वर्ग 2 चे अधिकारी वकील डॉक्टर इंजिनीयर आहेत अनेक लोक पुणे मुंबई संपूर्ण महाराष्ट्र नोकरीच्या निमित्ताने कार्यरत आहेत शिवाय विधानसभेत आपले 24 आमदार कार्यरत आहेत नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत याठिकाणी आपले बरेच पदाधिकारी राजकीय पातळ्यांवर कार्यरत आहेत ही आपल्या जमेची बाजू असली तरी अजूनही 75% आदिवासी समाज विविध योजना शिक्षण नोकरी या पासून वंचित आहे ही खरी शोकांतिका म्हणावी लागेल. आपल्या समाजात तीन वर्ग तयार झाले आहेत. पहिला वर्ग म्हणजे सुपर क्लास वन अधिकारी उच्चशिक्षित यांचा उच्चभ्रू वर्ग. त्यातील ठराविक हाताच्या बोटावर मोजता येईल इतके लोक समाजासाठी काहीतरी करतात. परंतु बाकीचे कधी वर्षानुवर्ष गावाला येत सुद्धा नाहीत ,त्यामुळे ते लोक समाजापासून काहीसे अलिप्त आहेत. आता पाहूया वर्ग 2 समाज वर्ग दोन समाज म्हणजे सर्वसाधारण नोकरी करणारे तुम्ही-आम्ही वर्ग 2 वर्ग-3 वर्ग 4 मध्ये नोकरी करणारे तुम्ही-आम्ही. चांगल्या कंपन्यांमध्ये बऱ्यापैकी नोकरी करणारे लोक. तसेच समाजाची आवड असणारे लोक.या लोकांचे सतत विविध कार्यक्रमानिमित्त गावाला नेहमी येणे-जाणे असते. त्यामुळे गावाकडील लोकांचे दयनीय संसार पाहून अनेकांना आपल्या गावाविषयी काहीतरी करावे, गावाचा विकास झाला पाहिजे, आपल्या आदिवासी समाजाचा विकास झाला पाहिजे ही सततची भावना त्यांच्या मनात असते. ते इतरांना तसे बोलूनही दाखवतात. परंतु रोजचे दैनंदिन कामकाज सुट्ट्यांमध्ये घरातील कामे यामुळे त्यांना ना म्हणावा तसा वेळ मिळत नाही, त्यामुळे त्यांना आदिवासी समाजाविषयी सामाजिक आर्थिक मदत करायची इच्छा असूनही व योग्य संघटन नसल्याने म्हणावी तशी मदत करणे किंवा योगदान देणे शक्य होत नाही.आता राहता राहिला वर्ग तीन चा समाज. या समाजात गावाकडील शेतकरी मजूर ,कामगार, नोकरी नसलेले तरुण, तात्पुरती नोकरी करणारे तरुण यांचा वर्ग या समाजाचा खऱ्या अर्थाने विचार केला तर त्यांचा पुढील भविष्याविषयी निश्चित असा फोकस नसल्याने व हातात जगण्या इतके पैसे नसल्याने हा वर्ग मुख्य प्रवाहापासून भरकटला आहे. त्यामुळे बाकीच्यांनी कितीही जीव तोडून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला तरी अशक्य आहे. याचा विचार सुशिक्षित समाजांनी करणे गरजेचे आहे. आपला समाज पूर्वीची परंपरागत शेती अजूनही करत आहे, त्यामध्ये नवीन सुधारणा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत नाही. आपल्याकडील अंगभूत कौशल्याचा वापर करताना दिसत नाही, काही लोकांना भरपूर शेती असूनही ते नोकरीच्या शोधात किंवा रोजगाराच्या शोधात गाव सोडून तुटपुंजा वेतनावर दूर शहरात फटके जिणे जगत आहेत. ही शोकांतिका म्हणावी लागेल. वाढती व्यसनाधीनता आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण जास्त आहे, त्याचप्रमाणे निकृष्ट आहारामुळे स्त्रियांच्या शरीरातील हिमोग्लोबीन चे प्रमाण झपाट्याने कमी होत आहे. याही बाबी अतिशय महत्वाच्या  आहेत. आज गावोगावी वाढत्या व्यसनाधीनतेमुळे समाज अनेक वर्ष मागे गेला आहे. यासाठी ठोस नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी बृहत आराखडा करून शासनाच्या माध्यमातून, समाजसेवकांच्या माध्यमातून, विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, तुम्हा-आम्हा नोकरदारांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी वेळ देणे हे आवश्यक आहे. आपल्या समाजात आपण काही लोकांना प्रतिनिधी किंवा विविध पदावर नेमणूक करतो. परंतु काही लोक एखाद्या कार्यक्रमा पुरते हजेरी लावतात. आणि निघून जातात. यासाठी सामाजिक आवड असणाऱ्या व समाजाची तळमळ असणाऱ्या लोकांची राज्य,  जिल्हा,  तालुका, भाग आणि ग्राम समिती समिती गठित  करणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून प्रत्येक भागात किंवा गावात शेती विषयक व्यसनमुक्ती विषयक, आरोग्यविषयक, शैक्षणिक अशी नामांकित व्याख्याने आयोजित केली पाहिजेत. एखाद्या भागात व्यसनमुक्ती केंद्र ,कृषी सहाय्य व सल्ला केंद्र, रोजगाराच्या संधी मार्गदर्शन इत्यादी मेळावे आयोजित केली पाहिजेत. आदिवासी समाज हा मुख्यत्वे डोंगर दर्‍यात राहणारा समाज आहे. अनेक लोकांना चांगल्या शेतजमिनी आहेत. तर काही जणांना माळरान आहे. या माळरानात किंवा डोंगरावर पावसाळ्यातील पाणी ठराविक ठिकाणी आडवून उन्हाळ्यात या माळरानावर किंवा डोंगरावर कलमी आंबे ,जांभूळ, फणस किंवा अनेक फळझाडे लावली तर येत्या चार-पाच वर्षात त्यांना दोन तीन लाखाचे उत्पन्न मिळू शकते. शिवाय परिस्थिती नुसार वेगवेगळी पिके येतील का?याचाही विचार करावा लागेल.त्यासाठी प्रत्येक भागात प्रत्येक गावात पाणी फाउंडेशन ही योजना राबवली पाहिजे. पावसाळ्यातील ओढया नाल्याने वाहणारे पाणी प्रत्येक गावात  कधी श्रमदानाने तर कधी शासनाच्या मदतीनेआडवले गेले पाहिजे.  त्याचा योग्य वापर करून झाडे फळे फुले व शेती यासाठी उपयोग केला पाहिजे.आपल्या समाजात अनेक ग्रामसेवक,कृषि सेवक,कृषि सहायक,कृषि अधिकारी,जनावरांचे डाँक्टर,शिक्षक आरोग्य कर्मचारी,समाजसेवक सरपंच,सदस्य विवीध पदाधिकारी आहेत.त्यांचाही समाजासाठी उपयोग करून घेतला पाहिजे.त्यांना मान सन्मान दिला तर ते स्वयंस्फुर्तीने मदतीसाठी पुढे येतील.त्यासाठी भागनिहाय या लोकांची समिती गठित करणे आवश्यक आहे.त्यामधून कुणीही वंचीत राहता कामा नये.सर्वांची मिटिंग महिन्यातून एकदा झाली पाहिजे. सर्वांनी मिटींगला येणे बंधनकारक केले पाहिजे. आपणही आपल्या समाजाची काही देणे लागतो ही भावना त्यांच्यात रुजवली पाहिजे. त्यामुळे लोक एकत्र येतील संवाद साधला जाईल. एकमेकांच्या भेटीगाठी होतील. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे .मासिक सभेमध्ये सरकारी योजनांचा आढावा, नामांकित व्याख्या त्याचे व्याख्यान आयोजित करण्याचे नियोजन करणे, सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ यांच्याशी योग्य समन्वय ठेवणे इत्यादी अनेक कामांचा आढावा घेता येईल. यासाठी समाज परिवर्तन करणे, आदिवासी समाजाला  दिशा देणे ही काळाची गरज आहे. तरच खऱ्या अर्थाने आदिवासी समाज प्रगतीपथावर गेल्याशिवाय राहणार नाही. व लोकही आर्थिक मदत सामाजिक मदत करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येतील. परंतु त्याचे बीज कुठेतरी पेरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि आपण आपली स्वतःपुरतं न पाहता समाजासाठी काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली पाहिजे, समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतला पाहिजे. एकमेकांचा सन्मान केला पाहिजे.  हीच खरी मा. बिरसा मुंडा मा. राघोजी भांगरे मा. सत्तू मराडे, मा. नाग्या कातकरी शिवनेरी वरील थोर क्रांतीकारक हुतात्म्यांना  आदरांजली ठरेल .

आदिवासी दिनानिमित्त या सर्व नेत्यांना माझी भावपूर्ण आदरांजली 



ग्रामीण भाग दशा आणि दिशा


 ग्रामीण भाग दशा आणि दिशा 

१९७२ मध्ये आलेल्या दुष्काळामध्ये अनेक ग्रामीण भागातील अनेक लोक विस्थापित झाले.पोट भरण्यासाठी अनेक लोक गाव सोडून नोकरीच्या शोधात मुंबई ,भिवंडी.पुणे अशा शहरात किंवा अन्य ठिकाणी गेले. तिकडे मिळेल ती नोकरी करून पोट भरू लागले व जमेल तशी मदत गावी कुटुंबाला करू लागले.

काही जण खटपटी करून सरकारी नोकरीत चिकटले.तर काहीजण कुठं खाजगी मध्ये किंवा हमाली वगैरे मिळेल ती नोकरी करू लागले व जमेल तशी मदत गावाला आपल्या कुटुंबाला करू लागले.

मुंबईच्या मानाने गावचे जीवन तसे खुप चांगले होते.गावाला काम केलेच पाहिजे असे काही नव्हते,दोन वेळची भाकर व राहायला निवारा होता.पण मुंबईचे जीवन मात्र अतिशय खडतर होते. 

कामाचे स्वरूप,राहाण्याची व खानावळीची सोय याचे काय वर्णन करावे? शब्दात वर्णन करणे कठिण.मुंबईचे जीवन दहा बाय दहाच्या अत्यंत छोट्या खोल्या.त्यात राहणारी सात,आठ पोराबाळांसह राहणारी माणसे.त्यामध्ये त्यांच्याकडे जेवायचे. बाहेर कुठेतरी रस्त्यावर, झाडाखाली,किंवा मिळेल त्या जागेवर झोपायचे. आंघोळ व कपडे धुण्याचे हाल तर विचारूच नका. काहीजण कामाच्या ठिकाणी अंघोळ करायचे व कपडे धुऊन तसेच ओले कपडे अंगात घालायचे.जेवणाचे त्यातल्या त्यात जरा बरे होते.कारण गावच्या किंवा भागातल्या ओळखीच्या ठिकाणी खानावळीची.व्यवस्था असे.

गावावरून आलेला तरूण रोजचे कष्टाचे काम.त्त्यामुळे त्याचा खाण्याचा आहार साहजीकच जादा असायचा.परंतु त्यामानाने खानावळीत भरपेट जेवण मिळायचे नाही.अर्धपोटी राहुन काम करावे लागे.हे दररोज च्या कामाचे स्वरूप असे.

त्याकाळी लोक जास्त शिकलेले नसायचे.त्यामुळे नोकरीचे चान्सेस कमीच असायचे.पण प्रत्येक जणाचा एकच उद्देश असायचा तो म्हणजे गावाकडचे आपले कुटुंब जगवले पाहिजे. भले आपल्याला कितीही कष्ट पडले तरी चालतील.कितीही यातना भोगाव्या लागल्या तरी चालतील.आता हेच आपले जीवन. परंतु आता माघारी फिरणे नाही.घरी गावाला जाणे नाही अशी पक्की मनाशी खुणगाठ बांधुन नव्या जोमाने काम करत.व आलेले दिवस कसेतरी कष्टाने ढकलत.मुंबईला गेलेला कष्टकरी समाज मिळेल तसे काम करत होते.

काहीजण मिल मध्ये तर काहीजण कुठे सरकारी नोकरी मिळते का? या साठी प्रयात्न करत.त्यांचे कामाचे खाडे होत. त्यांचे हाल तर विचारू नका.प्रसंगी त्यांना उपाशी तापाशी रहावे लागे. नोकरी शोधायला. दिवस- दिवस पायी वणवण करायची.दिवसभर अन्नाचा कण पोटात नसायचा. शिवाय नोकरी मिळेलच याची शाश्वती नसे. शिवाय इकडे कामाचा खाडा व्हायचा ते वेगळाच.

कधी कधी असलेली तात्पुरती नोकरी पण जायची आणि बेरोजगार व्हायची वेळ यायची.अशाही परिस्थितीत सरकारी नोकरी मिळेल ही आस असायची. 

त्याकाळी भागातील काही लोक सरकारी नोकरी करायचे. त्याकाळात टाकसाळ, फोर्ट अमिनेशन फॅक्टरी ,विविध बँका, मंत्रालय इत्यादी ठिकाणी वर्ग 4 मध्ये काही लोक कामाला होते. 

त्यावेळी त्या ठिकाणी कधी कधी भरती निघायची.आणि हे लोक आपल्या गावातील आपल्या भागातील लोकांना  मुंबईला आणायचे.त्यांचे खाण्यापिण्याची राहायची व्यवस्था करायचे.आणि तेथे चिटकवायचे. 

त्याकाळात जे नोकरीला होते त्यांना गावचा, भागाचा, प्रचंड अभिमान असायचा. आपल्या भागातील आपल्या गावातील तरुण नोकरीला लागले पाहिजेत. त्यांची घरेदारे सुखी झाली पाहिजेत. सुखाचा संसार झाला पाहिजे. समाजासाठी त्यांचा हातभार लागला पाहिजे. ही भावना होती. ही सामाजिक बांधिलकी होती. त्यांनी कधीच स्वतःपुरते पाहिले नाही. नेहमीच समाजाचा विचार केला आणि या विचारातूनच अनेक तरुण नोकरीला लागले. त्यांना रोजीरोटी मिळू लागली. त्यांचे संसार झाले. फुलले, बहरले. तर काही लोक आहे ते काम प्रामाणिकपणे करू लागले. जरी त्यांना सरकारी नोकरी मिळाली नाही तरी त्यांचेही संसार चांगल्या प्रकारे झाले. त्यांनीही भागाची, गावची आपल्या कुटुंबाची उत्तम प्रकारे सेवा केली.

त्याकाळात मुंबईकरांनी गावाला आपल्या कुटुंबाला वेळोवेळी आर्थिक मदत केली. घरात आठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या भावा बहिणींची लग्न, नवीन घराचे बांधकाम, स्वतःचे लग्न, शेतीची सुधारणा, विहिरी बांधल्या. बैल, जनावरे घेताली. भावा-बहिणीच्या मुलांचे शिक्षण केले  त्यांना नोकऱ्या लावल्या नातेवाईकांना मदत केली. गावच्या त्यांच्या कुटुंबानेही त्यांनी दिलेल्या पैशाचा योग्य विनियोग केला. त्यामुळे त्यांची घरेदारे सुधारली. जमीन सुधारणा झाली. शेतात चांगले उत्पन्न येऊ लागले. कधीकधी काही जमिनी विकत घेतल्या गेल्या. त्यात सुधारणा केल्या. 

त्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. एकमेकाबद्दल प्रेम होते आपुलकी होती. जिव्हाळा होता. मुंबईकर प्रत्येक वर्षी गावाला येत असत. गावकरी त्यांचे उत्तम प्रकारे स्वागत करत. गावच्या विकासासाठी, मंदिरासाठी, धर्म शाळेसाठी, चावडी साठी सार्वजनिक भांडी, सार्वजनिक खेळांचे उदा.लेझिम, झांज ढोल,भजनाचे साहित्य,मंदिर जीर्णोद्धार, यात्रा -जत्रा सणवार यासाठी मुंबईकर आर्थिक मदतीत नेहमीच गावाच्या पाठीशी असत. 

या मुंबईकरामुळे नोकरी करणाऱ्या मंडळींमुळे खऱ्या अर्थाने कुटुंबाचा, गावाचा, भागाचा विकास झाला. लोक प्रपंचाला लागले. त्यांनी जर स्वतःचा जीव मारला नसता, त्याग केला नसता तर क्षणभर विचार करा.

आज आपण कितीतरी वर्ष मागे असतो. आपली अवस्था काय झाली असती. हा विचार न करणेच बरे.परंतु पुढे काळ बदलला.

परंतु आजकाल लोक साधे सख्ख्या भावाला किंवा बहिणीला व नातेवाईकांना विचारत नाहीत. सामाजीक कामात भाग घेत नाहीत. कोणाच्या सुख-दुःखात भाग घेत नाहीत. असे लोक म्हणतात की समाजाचा विकास झाला पाहिजे. भागाचा विकास झाला पाहिजे. देशाचा विकास झाला पाहिजे. त्यावेळी फार मोठे आश्चर्य वाटते. कधीकधी हसावे की रडावे हेच कळत नाही.

कधीकधी हेच लोक समाजाचा विकासासाठी समाजाचे नेतृत्व Target निघतात. त्यावेळी आश्चर्य वाटतं.अशा लोकांना समाज किती स्वीकारेल याचेही भान या महाभागांना नसते.

आपल्या आधीच्या पिढीने अतिशय दुःखात स्वतःचा जीव मारून कुटुंबांचा विकास केला आहे प्रसंगी त्यांनी त्यांच्या आवडी निवडी हौस मोज त्यांचे छंद खाणे पिणे यांना कधीच महत्व न देता आपल्या पुढच्या पिढीला आपल्यासारखे वाईट दिवस येऊ नयेत आपली पुढची पिढी सुखी झाली पाहिजे हा विचार त्यांनी सतत डोळ्यांपुढे ठेवून ते जगले.

आणि आज आपण आपल्या आजोबा, पंजोबा, वडील ,चुलते यांच्यामुळे सुखाचे चार घास खातोय. याचा तरुण पिढीने विचार केला पाहिजे.आपल्या वडील व आजोबांना तुम्ही संसार कसा उभा केला? त्यासाठी काय  यातना भोगल्या? हे विचारणे आवश्यक आहे. त्यांना मानसन्मान दिला पाहिजे. त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. 

कधीकधी काळाच्या ओघात त्यांचा सल्ला कसा निरुपयोगी आहे हेही ही तरुण पिढीने खुबीने त्यांना पटवून दिले पाहिजे. उगाच तुम्हाला काही कळत नाही. तुम्हाला अकलेचा भाग नाही. तुम्ही आमच्यासाठी काय केले ? केले तर उपकार केले का? ही भाषा असेल तर सामाजिक विकास होणे अवघड आहे हेही तितकेच खरे.

भिमाशंकर धार्मिक पर्यटन स्थळ

भीमाशंकर धार्मिक पर्यटन स्थळ 

भीमाशंकर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आहे. राजगुरुनगर पासून साठ किलोमीटर अंतरावर भोरगिरी गावच्या हद्दीत हे मंदिर आहे. 

भीमाशंकरला जाण्यासाठी राजगुरुनगर मार्गे वाडा,डेहणे,मंदोशी,तळेघर या मार्गे जाता येते. राजगुरुनगर भोरगिरी पर्यंत डांबरी रस्ता आहे. काही हौशी पर्यटक भोरगिरी येथे गाड्या पार्क करून पाय वाटेने भोरगिरी ते भीमाशंकर हा पाच किलोमीटरचा टप्पा पार करतात. आपल्या गाड्या पार्क करून पाय वाटेने निसर्गाच्या सानिध्यातुन भिमाशंकरला जाता येते. 

भोरगिरी ते भीमाशंकर हा मार्ग साधारण पाच किलोमीटर आहे.भीमाशंकर येथून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी या ठिकाणी उगम पावते. भीमाशंकर हे तीर्थक्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. हे जंगल सदाहरित अरण्यां पैकी एक आहे. यालाच डाकिनीचे वन असेही म्हटले जाते.

भीमा नदी उगमस्थान

१९८५ साली महाराष्ट्र शासनाने हे अरण्य अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या अभयारण्यात बिबट्या,उदमांजर, ससा, रान मांजर,रान डुक्कर ,सांबर, भेकर , कोल्हा, लांडगा, तरस चितळ, काळवीट, मुंगूस, विविध जातीचे साप इत्यादी प्रकारचे प्राणी आढळतात.

या जंगलातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू हा होय. यालाच उडणारी खार असेही म्हटले जाते. 

शेकरू हे तांबूस रंगाचे असून ते फक्त भीमाशंकर अभयारण्यात पाहायला मिळते. अभयारण्य आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने भीमाशंकर हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.

महाराष्ट्राची उडती खार म्हणजेच शेकरू 

भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर होय. 

या ज्योतिर्लिंगा पासून पूर्वेला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नदी भीमा ही उगम पावते. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेली आहे. भीमाशंकर मंदिर हेमांडपंथी पद्धतीचे असून ते पेशव्यांच्या काळात नानासाहेब फडणवीस यांनी बांधलेले आहे. 

हे मंदिर साधारण सतराव्या शतकात बांधलेले आहे. पूर्वीचे मंदिर अतिशय साधे असे होते. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम हे साधारण १९८१ ते १९८५ या काळात केलेली आहे. नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर समोरून बघता येत नाही.

भीमाशंकर मंदिर
मंदिराचा भव्य सभामंडप उंच कळस हे प्रमुख आकर्षण आहे. समोर दोन पाण्याची कुंड असुन पुर्वी भीमाशंकरला आल्यावर या कुंडात स्नान करूनच भीमाशंकराचे दर्शन घेतले जाई. परंतु आता स्नान करण्यास बंदी आहे. 

शेजारी दुसरे कुंड सुद्धा आहे 1991 साली या कुंडाच्या तळातील गाळ काढला असता त्यामध्ये अनेक प्राचीन नाणी सापडली. ही नाणी यादव काळापासून असल्याचे पाहायला मिळाले. पूर्वी लोक दर्शनाला आल्यावर कुंडात काही पैसे टाकायचे. त्यामुळे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे.

याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती राजाराम महाराज हे भीमाशंकरला दर्शनासाठी आल्याच्या इतिहासात नोंदी आहेत. 

नवनाथांपैकी सर्व नाथ भीमाशंकराच्या दर्शनाला आलेले आहेत. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील याठिकाणी दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. 

वसईचे युद्ध जिंकल्यावर तेथील चर्चमध्ये असलेली भव्य घंटा चिमाजी आप्पा पेशवे यांनी याठिकाणी आणलेली आहे. मंदिराच्या सभामंडपात  समोरील बाजूस ही घंटा बांधलेली असून या घंटेवर १७२९  अशी नोंद आहे.

मंदिराच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावर गुप्त भीमाशंकर आहे. भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगा मध्ये आहे. परंतु तिथून ती गुप्त होते. मंदिरापासून पूर्वेला साधारण एक किलोमीटरवर पुन्हा प्रकट होते. असे मानले जाते. हीच जागा गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखली जाते.

भीमाशंकरला राममंदिर,कळमजाई मंदिर, कोकणकडा, सिताराम बाबा आश्रम, नागफणी, अंजनीमातेचे तळे, हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे.

भीमाशंकर मंदिराच्या पश्चिमेला कोकणकडा असून त्याची उंची जवळ जवळ अकराशे मीटर इतकी आहे. कोकण कड्यावरून खाली कोकणातले विहंगम असे दृश्य दिसते. अतिशय स्वच्छ वातावरणात पश्चिमेकडचा अरबी समुद्रही दिसू शकतो. येथूनच कोकणात जाण्यासाठी शिडीचा घाट, बैल घाट व गणपती घाट असे घाट आहेत.
 
भीमाशंकरच्या सीमेलगत रायगड आणि ठाणे जिल्हा यांची हद्द आहे.भीमाशंकर ते खांडस हे अंतर साधारण १४ कि.मी. इतके आहे. अनेक पर्यटक खांडस मार्गे भीमाशंकरला येतात. भीमाशंकरच्या जंगलात विविध प्रकारच्या औषधी वनस्पती आहेत. त्यामुळे देशातून अनेक लोक याठिकाणी पर्यटन,दर्शन. औषधी वनस्पती,अभ्यासासाठी.गिरीभ्रमण यासाठी येत असतात.

अंजनी मातेचे तळे 
भीमाशंकर मंदिराच्या नैऋत्यकडे अंजनी तळे प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी सिताराम बाबा यांचा आश्रम आहे. त्याचप्रमाणे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे नागफणी.

सिताराम बाबांच्या आश्रमापासून नागफणी कडे जायला पायवाट आहे. ही पायवाट जंगलातून जाते. नागफणी हे ठिकाण अभयारण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे. याठिकाणी प्रचंड जोरात वारा वाहतो. या ठिकाणावरून कोकण व परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसते.

नागफणी 
भीमाशंकरला जाण्यासाठी राजगुरुनगर, मंचर, घोडेगाव मार्गे सुद्धा जाता येते.परंतु वाडा मार्गाने चास मधील सोमेश्वर मंदिर, व त्या समोरील महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेली दीपमाळ शेजारील विस्तीर्ण नदीचा किनारा भव्य असा नदी घाट, अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले बुरसेवाडी जवळील शंभू महादेव मंदिर, चासकमान धरण, पुनर्वसित वाडगाव, कोटेश्वर मंदिर भोरगिरी, मंदोशीचा घाट, चासकमान धरणाचा विस्तीर्ण जलसाठा, हिरवागार निसर्ग, उंच उंच डोंगर, पांढरेशुभ्र जल कोसळणारे मोठमोठे धबधबे,धुओली जवळील नेकलेस धबधबा यामुळे अनेक पर्यटक या मार्गाने भीमाशंकरला जाणे पसंत करतात. आणि पर्यटकांच्या दृष्टीने भाविकांच्या दृष्टीने हाच मार्ग उत्तम आहे हे मात्र तितकेच खरे.

भीमाशंकर जवळील कोंढवळ येथील धबधबा
 
त्याचप्रमाणे राजगुरुनगर- वाडा- डेहणे शिरगाव - मंदोशी  घाटातून तळेघर मार्गे जाता येते. वाडा - डेहणे- शिरगाव -टोकावडे- कारकुडी मार्गे राजपुर वरून भीमाशंकरला जाता येते. राजगुरुनगर -वाडा -शिरगाव भोरगिरी मार्गे कोटेश्वराचे दर्शन घेऊन देखील भीमाशंकरला जाता येते.

भीमाशंकरला प्रत्येक श्रावण महिन्यातील सोमवारी प्रचंड गर्दी असते. श्रावण महिन्यात भीमाशंकरला प्रचंड धुके असते. त्यामुळे आपण स्वर्गात आहोत किंवा आकाशात आहोत असा भास होतो. 

भीमाशंकरला प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे सगळीकडे खळाळून पांढरेशुभ्र धबधबे वहात असतात. सुंदर रस्ता नागमोडी वळणे, हिरवेगार गवत आणि प्रचंड जंगल उंच उंच डोंगर रांगा यांनी नटलेला हा परिसर आहे. त्यामुळे अनेक निसर्गप्रेमी याठिकाणी भेट देत असतात. 

चासकमान धरण 

भीमाशंकरचा उल्लेख शिवपुराणात वाचायला मिळतो. भीमाशंकर येथे तेथील स्थानिक लोक विविध औषधी वनस्पती विकण्यासाठी घेऊन बसलेले असतात. या वनस्पतीमुळे अनेक लोकांचे जुने आजार बरे झाल्याची उदाहरणे आहेत. 

या अभयारण्यात आंबा,जांभूळ,शिसम, हिरडा, बेहडा, रिठा, उंबर, रानजाई, कोकम, शिकेकाई, आवळा अडसूळ, आपटा, फणस, रानतुळस करवंदे व आपल्याला माहीत नसलेल्या विविध औषधी वनस्पती या अरण्यात आहेत.

तसेच सुतारपक्षी पारवा, कोकीळ, तांबट, मोर ,लांडोर, घुबड, चंडोल, खाटीक, धनेश, रानकोंबड्या आणि अनेक माहित नसलेले पक्षीही या ठिकाणी पाहावयास मिळतात. 

भीमाशंकरला संपूर्ण श्रावण महिना महाशिवरात्री, व त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा भरते. प्रत्येक अमावस्येला स्थानिक लोक दर्शनासाठी जातात.

भीमाशंकरला येणाऱ्या भाविकासाठी व पर्यटकांसाठी मुक्कामासाठी एस.टी.स्टँड जवळच महाराष्ट्र शासनाचे  M,T.D.C. (महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ) आहे.

व राजपुर जवळ भव्य भक्त निवास आहे. त्याशिवाय ब्लु माँरमन सारखी भव्य रेस्टाँरंट आहेत. भिमाशंकर येथे अनेक स्थानिक हॉटेलमधून गरमा गरम भजी, गरमागरम बटाटेवडे, मिसळ,भेळ व कडक चहा यांचा आस्वाद घ्यायला एक वेगळाच आनंद मिळतो. 

स्थानिक दुकानदारांकडून. बेलफुल किंवा इतर केलेली छोटी खरेदी केल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान हे परमेश्वराचे दर्शन घेतल्याचा भास होतो.

ग्रामीण भागातील हातभट्टीचा उदय

ग्रामीण भागातील हातभट्टीचा उदय 

१९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाचे सावट अजूनही पुरते ओसरले नव्हते. १९७३ वेळेवर पाऊस पडला. आणि लोकांच्या जीवात जीव आला. शेतीची कामे पुर्वी सारखी सुरू झाली. परंतु दुष्काळ हा फक्त एक वर्षा पुरता होता. परंतू दुष्काळा पेक्षा महाभयंकर संकट ग्रामीण भागावर येणार आहे. याची पुसटशी कल्पना देखील कुणाला नव्हती.

१९७२ मध्ये रोजगार हमी मधून ठराविक गावोगावी कच्चे  रस्ते झाले.परंतु त्या काळात कोणाकडे साधी सायकल देखील कोणाकडे नव्हती. 
त्याच वेळी चाकण, राजगुरूनगरच्या व्यापा-यांनी किटाचा व्यवसाय सुरू केला. किटाचा व्यवसाय म्हणजे जंगलातील मोठी मोठी झाडे तोडून तेथेच कोळशाच्या भट्ट्या लावायच्या. व तयार कोळसा व मोठया झाडांचे ओडके वखारीत नेऊन होलसेल विकायचे. यालाच किटाचा व्यवसाय असे म्हणतात.

गरीब लोक आपल्या रानातील मोठी मोठी झाडे प्रापंचिक गरजेपायी कवडीमोल भावाने विकू लागले. व्यापारी निरक्षरतेचा आणि गरीबीचा फायदा घेऊन कवडीमोल भावाने लाकडांची खरेदी करून लोकांच्या गरिबीचा,निरक्षरतेचा असाहयतेचा फायदा घेऊन पिळवणुक करत असे. लोकांना दुसरा पर्याय नव्हता.

वनखाते आधीच लाचार झाल्याने मुग गिळून उघड्या डोळ्यांनी सूरू असणारी वृक्षतोड पहात होते. त्याकाळी प्रचंड वृक्षतोड झाली. जंगलेच्या जंगले ओसाड पडली.त्या काळात जंगल तोड केल्यावर कोळसा तयार करण्यासाठी मोठमोठया भट्टया लावाव्या लागत. हे काम आपल्या भागातील लोकांना येत नव्हते. 

हे काम त्याकाळी कोकणातील कातकरी ही जमातच करत असे. मग ह्या व्यापा-यांनी ब-याच कातक-याना कोळशाच्या भट्ट्या लावण्यासाठी कोकणातून देशावरील ग्रामीण भागात आणले गेले. 

कातकऱ्यांचा कोळशाच्या भट्ट्या लावण्यात हातखंडा होता. त्यांना मदतीसाठी वृक्षतोडीसाठी स्थानिक लोक मदत करायचे. दिवसभर काम करून कातकरी लोक दमून जायचे. कातकऱ्यांना दररोज संध्याकाळी कष्टाची कामे संपल्यावर हातभट्टीची दारू लागायची.

त्यासाठी ते स्वतः हातभट्टीची दारू काढायचे. दररोज संध्याकाळी दारू प्यायचे व विडया ओढायचे. असा त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. 

स्थानिक लोकही नंतर कामाच्या नादात कातक-यांकडून विडी ओढू लागले. व हळूहळू काहीजण दारूही प्यायला शिकले. परंतू तेव्हा दररोज काही कुणी दारू पित नसत. कधीतरी चोरून कुणाला कळनार नाही अशा पध्दतीने कपभर घेतली जाई.

नंतर दोन तीन कांदे खाल्ले जात. त्यावेळी दारू पिणे म्हणजे फार मोठा गुन्हा समजत. हा किटाचा व्यवसाय साधारणपणे १९८२ पर्यंत चालू होता. त्यानंतर किटाचा व्यवसाय व कोळशाच्या भट्या बंद झाल्या. 

कोकणातून आलेले कातकरी एव्हाना बऱ्यापैकी स्थायिक झाले होते. आता ते पुन्हा कोकणात जाऊ शकत नव्हते. या कातकार्यांना ना जमिनी ना काही. त्यामुळे ओढ्या नाल्यांतून आणि नदीमधून मासेमारी करून हे मासे गावागावातून झाडाच्या पानावर स्थानिक गावक-यांना विकले जाऊ लागले. 

त्याकाळी लोकांकडे पैसा नव्हता. त्यामुळे हे मासे लोक आपल्याकडील भात, धान्य देऊन त्याबदल्यात मासे घेत. यावरच कातकऱ्यांचा उदरनिर्वाह चालत असे.

जोडीलाच त्यांनी हातभट्टीची दारू गाळणे हा छोटासा उद्योग सुरू केला. व हळूहळू लोक दारू पिण्यासाठी कातकऱ्यांकडे जाऊ लागले. लवकरच कधीतरी दारू पिणार यांचे दररोज दारू पिण्यात रूपांतर झाले.पुढे दारूचे व्यसन लागले. 

या व्यसनापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ऐन चाळीशीत अनेक दारूडे कैलासवासी झाले. आणि त्यांची मुलेबाळे बायका पोरे रस्त्यावर आली. संसार उध्वस्त झाले. 

त्यावेळी लागलेल्या किडीने आता अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. अनेक लोक म्हणतात समाज सुधारला पाहिजे, साक्षरतेचे प्रमाण वाढले पाहिजे. मंदिरे झाली पाहिजेत. रस्ते झाले पाहिजे. बंधारे झाले पाहिजेत. शाळा सुधारल्या पाहिजेत. विद्यार्थी घडले पाहिजेत. 

परंतु ही व्यसनाधिनता कमी केली पाहिजे, त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, आपल्या भागात व्यसन मुक्त केंद्र झाले पाहिजे. असे कुणीही म्हणत नाही. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल... 

यासाठी अनेक समाजसेवकांनी पुढे येण्याची गरज आहे. सरकार दरबारी पाठपुरावा केला पाहिजे. वर्गण्या व देणग्या गोळा करून आपल्या भागात व्यसनमुक्ती केंद्र चालवण्याची नितांत गरज आहे एवढं मात्र खरं..

रामदास तळपे

झळा 1972 च्या दुष्काळाच्या.

   

 झळा 1972 च्या दुष्काळाच्या 

साल होते १९७२ जुन महिना आला. परंतु पावसाचे कोणतेही चिन्ह दिसेना.ना ढगांचा गडगडाट ना विजांचा चमचमाट.रोज लोकांचे आकाशाकडे डोळे लागायचे.आज पाऊस पडेल उद्या पडेल या आशेवर लोक स्वतःशीच समजुत घालायचे.देवाची करूणा भाकायचे.परंतू पर्जन्यदेवतेला काही पाझर फुटत नव्हता.

अशातच जून गेला.नंतर जुलै सुध्दा गेला.लोकांची उरली सुरली पेरणीची आशा पुर्णत: मावळली.आँगष्ट सुद्धा कोरडाच गेला.अन्नधान्यचं पिकलं नाही.म्हणजेच चाराही नाही.त्यामुळे जनावरे चारा पाण्यापासुन तडफडून मरू लागली.

त्यावेळी प्रत्येक कुटुंबाकडे २० ते २५ जनावरे असायची. जवावरांचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी लोकांना पहावत नव्हता. अनेकांनी त्यांची सर्व जनावरे रानमळ्यात व जंगलात सोडून दिली. तोपर्यंत सप्टेबर आला.एकामागुन एक दिवस जात होते. लोकांनी पावसाची आशा सोडून दिली होती.आता इथून पुढे कसे जगायचे या विवंचनेत सर्वजण होते. 

आणि अशातच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस पडू लागला. ओढ्या नाल्यांना पाणी आले. परंतु त्याचा आता काहीच उपयोग नव्हता. प्रत्येकाचा घरातील अन्नसाठा संपत आलेला होता. काही लोक झाडपाला व कंदमुळे खाऊन जगत होते. काही लोक जंगलातील कंद मुळावर गुजराण करू लागले. 

मा. यशवंतरावजी चव्हाण साहेब 

त्यावेळी स्वर्गीय मा.यशवंतराव चव्हाण साहेब केंद्रीय मंत्री होते. तर मुख्यमंत्री होते स्वर्गीय मा.वसंतराव नाईक. लोक उपासमारीने मरायची पाळी आली. शासन दरबारी याची दखल घेतली गेली.लोक जगवले पाहिजेत हा एकच विचार शासनाच्या विचाराधीन होता. 

त्यावेळी शासनाने अमेरिकेकडून आणि रशिया कडून धान्याची आयात केली. शासनाला चांगले धान्य लोकांना पुरवणे शक्य नव्हते. फक्त लोक जागवायचे होते. त्यासाठी निकृष्ट प्रकारचे धान्य मागवले गेले. ते धान्य तेथील लोक डुकरांना आणि गुरांना खायला घालत. ते धान्य म्हणजे तांबडा मिलो. तांबडा तांदूळ व किडकी ज्वारी व ओलसर दमट गहू. हे ते धान्य होते.

या धान्यामध्ये अनेक बियाणाची भेसळ असायची.आज सगळीकडे गावाच्या बाजूला जे काँग्रेस गवत उगवलेले असते ते ह्या तांबड्या मिलो बरोबर व किडक्या ज्वारी बरोबर आलेले बियाणे आहे.

 
1972 च्या आधी काँग्रेस गवत नव्हते. त्यावेळेस तत्कालीन आमदार मा. शरद पवार साहेब यांनी लोकांना मोफत धान्य देण्यापेक्षा त्यांच्या हाताला काहीतरी काम द्या. त्यांना रोजगार द्या.व आठवड्याला धान्य द्या.अशी सूचना केली. मंत्रिमंडळाने ही सूचना तात्काळ उचलून धरली. 

शासनाने रोजगार हमी योजना ही योजना नव्याने अस्तित्वात आणली. त्यानुसार प्रत्येक दुष्काळी भागात कामे सुरू केली. कच्चे रस्ते बांधणे, विविध प्रकारची तळी, तलाव, सार्वजनिक विहिरींचे खोदकाम, छोटे बंधारे इत्यादी कामे सुरू केली. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांना रोजगार मिळू लागला. लोक दररोज कामाला जाऊ लागले .

परंतू हा रोजगार अतिशय तुटपुंजा होता.त्यावेळी प्रती दिवस मजुरी होती एक रुपया 20 पैसे. आठवड्याला प्रत्येक कुटुंबाला चार किलो धान्य दिले जाई. लोक पोटाला चिमटा घेऊन अन्न आणि पाणी वाचवत होते.आपल्या मुलाबाळांना जगवत होते.अर्धपोटी राहात होते.काही स्त्रिया आपल्या महिन्या-दोन महिन्यांच्या लहान बाळांना घेऊन रोजगार हमीच्या कामावर जात होत्या.झाडाखाली लहान मुलांना ठेवून रोजगार हमीचे काम करत होत्या.असा तो काळ होता. 

यावेळी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि तालुके या दुष्काळाच्या छायेखाली होते. रेशनिंगच्या दुकानात दोन दिवसांनी रेशन मिळणार आहे हे लोकांना कळाल्यावर रेशनिंगच्या दुकानासमोर दोन दिवस आधीच लोक गोधड्या घेऊन तेथे नंबर लावून झोपत असत. इतकी भयानक परिस्थिती त्यावेळेस उद्भवली होती. 

त्यावेळेस फक्त जमीनदार लोकांची परिस्थिती चांगली होती. त्यांना 1972च्या दुष्काळाच्या कोणत्याच झळा जाणवल्या नाहीत. त्यावेळी काळाबाजार करणारे व सावकार हे मालामाल झाले. तर सामान्य जनता दुष्काळात भरडली गेली.

काही ठिकाणी अर्धवट दळलेले निकृष्ट प्रतीचे गहू व मका यामध्ये गुळ व तेल घालून जाडेभरडे पीठ (सुकडी) पुरवली जाई. या सुकडी वर अनेक मुलांची गुजराण झालेली आहे. हे विसरता येणार नाही. 

त्यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री मा.यशवंतराव चव्हाण साहेब हे दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी खेड तालुक्यात येणार आहेत. ही बातमी काही दुष्काळी भागात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना कळली.त्यानुसार त्यांनी रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या लोकांच्या बैठका घेतल्या. 
त्यांची एकच मागणी होती रोजगार वाढवून द्या. धान्याचा पुरवठा वाढवा. रोजगाराच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून द्या.तगाई माफ करा. इत्यादी मागण्यासाठी सर्वांनी अमुक अमुक दिवशी खेड तालुक्यात माननीय चव्हाण साहेब दौरा करनार आहेत. त्यांची गाडी खेडला अडवून त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊ. त्यासाठी उपस्थित रहा.असे सांगीतले.

त्याकाळात गाड्यांची कोणत्याही प्रकारची सोय नव्हती. एवढ्या लांबून लोक कसे येणार ही शंका होती. त्यावेळी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (एस.पी) मा.श्रीनिवासन साहेब हे होते व मा. श्री विर्क साहेब हे उपाधीक्षक (डी.वाय.एस.पी) होते विर्क साहेब हे नंतर महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक झाले. 

खेड तालुक्यातील लोक चव्हाण साहेबांची गाडी अडवणार आहेत हे त्यांना कळले. त्यांनी या ठराविक कामगार कार्यकर्त्यांना बोलावून घेतले.आणि त्यांना सांगितले तुमच्या मागण्यांचे निवेदन आमच्याकडे द्या.आम्ही तुमची निवेदन साहेबांना देतो.परंतु कार्यकर्ते हे ठाम होते. ते म्हणाले की आम्हीच निवेदन देणार. त्यावर त्यांनी सांगितले ठीक आहे. उद्या काही कमी जास्त झाले,जमावाचा उद्रेक झाला, दंगल धोपे झाले तर तुम्हाला जबाबदार धरू.कार्यकर्त्यांना वाटले जमुन जमुन असे किती लोक जमणार? फार फार तर दहा वीस लोक जमतील.असा त्यांचा अंदाज होता. 

ठरल्याप्रमाणे चव्हाण साहेब यायच्या दोन तास आधी दुष्काळावर काम करणारे दहा वीस कार्यकर्ते ठरलेल्या ठिकाणी जमा झाले. त्यावेळी काही काँग्रेसचे कार्यकर्ते हारतुरे व ढोल-लेझीम याच्या पथकासह चव्हाण साहेबांचे स्वागत करण्यासाठी थोडे पुढच्या बाजुला जमले होते.कदाचित त्यांना दुष्काळाचे काहीही देणे-घेणे नसावे. 

तासाभरात चारही दिशांकडून दुष्काळग्रस्त कामगारांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. त्यात स्त्रियांचे प्रमाण प्रचंड होते. एका तासात काय नियोजन करावे हे पोलिसांना सुचेनाच. श्रीनिवासन व विर्क साहेब कार्यकर्त्यांच्या पुढे येऊन आता काही गंभीर परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल असे सांगून निघून गेले. कार्यकर्त्यांनाही काय करावे हे सूचना.एवढे दुष्काळग्रस्त कामगार या ठिकाणी येथील हे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. हे पाहून सर्वजण अवाक् झाले.पोलीस यंत्रणेला काय करावे काहीच सुचेना.

एवढ्यात चव्हाण साहेबांची गाडी त्या ठिकाणी आली. प्रचंड जमाव जमलेला होता. स्त्रियांनी चव्हाण साहेबांच्या गाडीकडे झेप घेतली.जमाव प्रक्षुब्ध होतो की काय असे वाटले.आणि अशातच एका कामगार कार्यकर्त्यांनी चव्हाण साहेब जिंदाबाद ही घोषणा दिली.आणि काय आश्चर्य प्रक्षुब्ध झालेला जमाव शांत झाला. 

चव्हाण साहेब गाडीतून बाहेर आले. कार्यकर्त्यांनी त्यांचे निवेदन चव्हाण साहेबांकडे दिले.चव्हाण साहेबांनी निवेदन वाचल्यावर कामगारांना सांगितले. 

मी तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करीत आहे. परंतु या सर्व गोष्टीसाठी कमीत कमी आठ दिवस लागतील.असे म्हणून चव्हाण साहेब गाडीत बसले आणि ते हार-तुरे न स्वीकारता पुढील दुष्काळी दौरा करण्यासाठी दावडी, वाफगाव भागाकडे रवाना झाले..

चव्हाण साहेबांनी बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या.त्यावेळी तगाई हा प्रकार होता.शासनातर्फे जनावरांना चारा दिला जाई. व ठराविक दिवसांनी त्याचे पैसे शासनाकडे भरणा करावे लागत. तगाईची नोंद सात बारावर केली जात असे. 

त्यावेळी पाळीव जनावरांसाठी छावण्या ही संकल्पनाच त्याकाळात उदयाला आली नव्हती. खोल खोल विहिरी खोदुन भूगर्भातल्या बँकेत पाण्याचे साठी काही प्रमाणात जादा कष्ट घेऊन उपलब्ध होते. त्यामुळे त्याकाळात बऱ्याचशा विहिरींची कामे झाली.विहिरीवर नंतर मोटा बसवण्यात आल्या. थोडक्यात जरी दुष्काळ पडला होता तरी भूगर्भात पाण्याचे साठे भरपूर होते. 

त्यावेळी आठवड्याला चार किलो बेचव निकृष्ट दर्जाचे धन्य मिळत असे. घरात खाणारी तोंडे जास्त असत मग अशावेळी त्या धान्यात काही रानातील भाजीपाला कंदमुळे घालून गिरगिटा बनवला जाई.व ते अन्न बळे बळे पोटात ढकलले जाई. फक्त कसेतरी जगायचे हा एकमेव उद्देश होता.

 त्यावेळी आपला देश विकसनशील असल्यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी जास्त निधी खर्च करणे शक्य नव्हते. 1972 च्या दुष्काळाच्या झळा अनेक लोकांनी सोसल्या व अनुभवल्या त्या काळातील लोकांना विचारले की अजूनही त्यांच्या अंगावर काटा येतो. डोळे पाण्याने डबडबले जातात.

परंतु आता काळ बदलला. भारत विकासाच्या मार्गावर आहे. आपल्या भागात एमआयडीसी आहे काही ठिकाणी रोजगार उपलब्ध आहे. त्यामुळे शक्यतो खाण्यापिण्याची आबाळ होत नाही. परंतु पूर्वी रोजगाराचे कोणतेच साधन उपलब्ध नव्हते. आज खाण्या पिण्या व्यतिरिक्त दुसऱ्याच गरजा महत्वाच्या वाटतात.1972 च्या दुष्काळात पोटाला अन्न आणि पिण्यासाठी पाणी हीच एकमेव गरज होती. आणि सरकार ती पुरवू शकत नव्हते.



सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस