भाजीवाली ताई

भाजीवाल्या ताईशी माझी ओळख व्हायला

तसे दोनचार वर्षे सहज झाली असावीत. मी तीला ताई म्हणतो कारण ती मला पहील्यांदा भेटलो तेव्हा दादा म्हणाली.

बाजारात माझ्या मित्राचे दुकान आहे. त्या दुकानाच्या पायरीजवळ ती भाजी विकायला बसते. मी मित्राकडे दोन तीन दिवसाआड जायचो. 

रसरशीत हिरव्या भाज्या घेउन ही तिथे बसलेली. साहजिकच भाजी तिच्याकडून घेण्याची सवय लागली. नेहमीच्या ओळखीने एक नातेही निर्माण झाले. 

बारीक अंगकाठी, रापलेला चेहरा, पण नेहमी हसतमुख. प्रत्येक वाक्यात दादा म्हणायची सवय. 

नंतर मित्राने त्याच रोडवर थोडे पुढे  

दुकान घेतले पण जाण्यायेण्याचा रस्ता तोच राहीला. कधीतरी मित्राला भेटून रस्त्यावरून मोटरसायकलने घाईघाईने निघालो की ताईची हाक ठरलेली..

दादा...ओ..दादा आज भाजी नको का? 

मग मी निमुटपणे भाजी घ्यायला थांबतो.

बर दे अर्धा किलो. 

काय दादा अर्धा किलो भाजी पुरते तरी का घरात? एक किलो तरी घ्या.

ताई..चार जण तर आहेत. अर्धाकिलो पुरेल.

असू द्या दादा. एक किलो स्वस्त पडते म्हणून एक किलो घ्यायलाच लावते.

बर..भाजीचे भावही एकदम रास्त, आणि मोजणेही अघळपघळ.

एकदा तर अर्धा किलो कोबी घरी जाऊन बायकोला दिला तर ती म्हणाली कोणी दिला? पाऊण किलोच्या वरतीच आहे. दोनचार भाज्या एकदम घेतल्या तर पाच दहा रूपये स्वतःहून कमी घेणार. शिवाय निघतांना तिच्याजवळ असलेले मुठभर बोरे किंवा चारपाच आवळे पिशवीत टाकणार..

हे वैनीला द्या माझ्याकडून मला आश्चर्य वाटते एवढा दिलदारपणा एवढ्या गरीबीतही ही ठेवते कसा?

एकदा भरदुपारी तीन साडेतीन वाजता मी एस् टी स्टँडजवळ उभा होतो, तेवढ्यात डोक्यावर टोपली आणि हातात एक गोणपाटाची थैली (ज्यात तराजू व वजन असावेत) घेउन ताई चाललेली दिसली. 

मी हाक मारली.

ताई इकडे कुठे ?

दादा घरी चालले. वाडीत.

म्हणजे तू वाडीत राहते? आणि मग येते किती वाजता?

वेळ तर माहीत नाही दादा. पण सकाळी सकाळीच शेतात जाऊन भाजी आणते. मग जी एसटी मिळेल तिने इथे येते. भाजी संपत आली की पुन्हा घरी.

बापरे! मग स्वयंपाक कधी करते?

मीच करते ना दादा. दोन्ही येळा. सकाळी लवकर उठून भाजी भाकरी करते, मग शेतातून भाजी घेते. आता इथून घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक. 

चला. येऊ मी?

मला काय वाटले कुणास ठाऊक. म्हटले थांब ताई. उन किती आहे. थंडगार उसाचा रस घे.

नको दादा. गाडी निघून जाईल.

काही निघणार नाही, ये.

म्हणून मी शेजारीच असलेल्या रसवंतीकडे निघालो 

तेवढयात तिने पुन्हा हाक मारली.

दादा?..

काय गं ताई?

रस महाग असतो. त्यापेक्षा चहाचं पिऊ.

काही फार फरक पडत नाही, आणि पैसे मी देतोय ना..

नको दादा. चहाच पिऊ.

बरं..चहा पिऊ..

आम्ही शेजारच्या हॉटेलमध्ये शिरलो. तिने हॉटेलच्या बाकावर टोपली पिशवी ठेवली. टोपलीत काही भाजी उरलेली असावी कारण त्यावर ओले गोणपाट पसरून ठेवलेले. तिने पदराने घाम पुसला आणि तिथल्या माठातले तांब्याभर पाणी एका दमात घटाघटा प्यायली.

मी चहावाल्याला म्हणालो, एक स्पेशल चहा दे.

दादा तुम्ही नाही घेत?

नाही. आत्ताच जेवण झाले.

असू द्या दादा. तुम्हीही घ्या. उन्हातान्हाचे फिरतात.

मी मनात म्हटले, तुझ्या कष्टापुढे माझे श्रम काहीच नाही.

चहा घेण्याची इच्छा नव्हती. पण तिचे मन मोडवेना. मीही चहा घेतला.

तिने अगदी शांतपणे चवीचवीने चहा घेतला. पुन्हा आपली टोपली उचलली. पुन्हा थांबली. टोपलीतून एक हातभर लांबीची काकडी काढली. 

मला देत म्हणाली घ्या दादा.

नको गं मला कशाला?"

असू द्या. उन्हाळ्याची चांगली असते. 

पोर आली असतील ना सुट्टीची घरी द्या त्यांना.

त्यापेक्षा तुझ्या मुलांना दे.

ते खातात. त्यांची फिकीर नाही. घ्या लवकर, माझी गाडी निघून जाईल.

मी नाईलाजाने काकडी घेतली. तिने टोपली डोक्यावर घेतली. पुन्हा तोंडावरचा घाम पुसला. 

येते दादा. म्हणत निघाली.

मी हातातल्या काकडीकडे आणि लगबगीने जाणाऱ्या तिच्या कृश कायेकडे बघत राहीलो. 

गरीबीतही आनंदी राहणारे आणि उदार असणारे लोक आपल्याला बरेच शिकवून जातात...

रामदास तळपे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस