गावठ्यावरची म्हातारी

गावठ्यावरची म्हातारी 

गावठ्यावरची म्हातारी आमच्या गावापासून जवळच असलेल्या गावठ्या वरच्या शेतात अर्धे कौलारू व अर्धे गवत असलेल्या छपरात राहायची. तिच्याकडे गाया म्हशी, शेळ्या आणि बैल देखील होते. 

दररोज डेअरीला ती दूध घालायची. तांब्याभर दुध आम्हाला आणून द्यायची. तापवून जाडसर खरपूस झालेल्या दुधाबरोबर चपाती व भात खाताना चव म्हणजे काय याची प्रचिती यायची.

मी साधारण एक वर्षाचा होतो तेव्हा चव दार व रुचकर असे तामकुड्याचे तांदूळ गावठ्यावरच्या म्हातारीने आम्हाला दिले होते. दररोज थोडासा भात घालून बाळाला दुधाबरोबर खायला घाल असा सल्ला देखील माझ्या आईला दिला होता.

ती जर कधी बाजाराला गेली तर न चुकता आमच्या घरी येत असे.साठे बिस्कीटचा पुडा, किंवा गोडी शेव आम्हाला देत असे. माझ्याच वयाचा तिचा मुलगा विठ्ठल शिक्षणासाठी आश्रम शाळेत शिकायला होता.  तो दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी येई. ती तिचा मुलगा विठ्ठल माझ्यामध्ये पाहत असे. त्यामुळे तिचा जीव माझ्यावर विशेष होता.

दसऱ्या, दिवाळीच्या दिवसात माझी आई मला जवळच शेतात राहणाऱ्या गावठ्या वरच्या म्हातारीकडे मला पाठवायची. गावठ्यावरचे अंतर माझ्या घरापासून थोडे दूर होते. मी माझ्या मित्राला घेऊन पाय वाटेने रमत गमत म्हातारीच्या घरी जायचो. दारातच म्हातारी तिथे काही बाई काम करताना दिसायची.

तिथे गेल्यावर म्हातारी दुधात गूळ टाकून केलेल्या वाफाळलेल्या शेवया मला द्यायची. वाफाळलेल्या शेवया हा तिचा फेवरेट पदार्थ होता. या वाफाळलेल्या शेवयांमध्ये प्रेम, आपुलकीची गोडी ठासून भरलेली होती.

मी घरी जाताना निघालो की, ती मोठा डांगर भोपळा, हातभर लांब अशी काकडी, घोसाळी, दोडके, भुईमुगाच्या शेंगा असे काही बाही गाठोड्यात बांधून द्यायची. 

जाताना तोंडावरून हात फिरवायची आणि कडाकडा बोटे मोडायची. माझे वडील लहानपणीच गेल्यामुळे आम्ही तेव्हा अगदी अनाथ झालो होतो. माझी आई तीन मुलांचा सांभाळ कशी करणार याची जाणीव होऊन ती तीळ तीळ तुटायची. 

कसं होणार. लेकरांचं. बा. परमेस्वरा तूच बघ रे बाबा ! यांचं. असं म्हणायची. 

तेव्हा माझ्याही मनात कालवा कालव व्हायची. तिची घालमेल पाहून मलाही गलबलून यायचं.

हिवाळ्याच्या दिवसांत क्रिकेट खेळून आम्ही दुपारचे विहिरीवर पोहून परतू लागलो की बाजार घेऊन आलेली म्हातारी मला वाटेवर दिसायची. मला बघून ती आपोआप रस्त्याच्या कडेला थांबायची. सोबतीच्या मित्रांना सोडून मी हळूच रस्त्याच्या कडेला म्हातारीकडं जायचो.

मी तिची विचारपूस करतो आहे, तेवढ्यात तिच्या डोकीवरची पाटी खाली यायची. मांड्यांवर पाटी तोलून धरून म्हातारी चवळीच्या कोवळ्या शेंगा बचकभर माझ्या ओंजळीत ठेवताना म्हणायची‚ 

आता मोठा झालास बाबा तु 

कदी माझ्या घराकडे पाय वाकडं व्हत नाईत तुझ. घे. 

तिनं दिलेल्या चवळीच्या शेंगा भर रस्त्यावरून खात जाताना मला कशाचंच भान उरायचं नाही. वाटायचं‚ या म्हातारीचं आणि आपलं कसलं तरी गुंतवा झालेलं नातं आहे. कसलं ते काही कळायचं नाही.

गावठ्या वरच्या म्हातारीला तीन मुले होती. पैकी दोन मुलांची लग्न झाली होती. विठ्ठल हा सगळ्यात धाकटा माझ्या वयाचा. विठ्ठल या शेंडेफळात म्हातारीचा जीव गुंतलेला असायचा. आपल्या विठ्ठलनं चांगली कापडं घालावी. बुकं वाचावी‚ लई मोट्ट व्हावं असं म्हातारीला वाटायचं. त्यासाठी ती उरात गावरान माया भरून जिवाचा आटापिटा करायची.

तिचा नवरा दामूबाबाला सुगावा लागणार नाही अशा बेताने डोक्यावरच्या पाटीत चार-एक पायली भात भरून घेऊन ती माझ्या आईकडं येऊन म्हणायची‚ 

सखू वाईच नड हाय. इठ्ठलला पैकं होवं. एवढं भात घे नी शंभर रुपये द्ये. तिचं ते‚ पोराच्या काळजीने व्याकुळ झालेले बोल ऐकले की मी कुठंतरी खोलवर गलबलून उठायचो.

माझे वडील लवकरच गेल्यामुळे आम्हाला तिने खूपच मानसिक आधार दिला होता. पंधरा दिवस ती आमच्या घरात राहिली देखील होती.

मावशी पैसे घेऊन जा. भात कशाला त्याबद्दल? इठ्ठल काही परका नाही. माझी जशी तीन आहेत तसाच तो चौथा.आई म्हातारीला स्त्रीपणाचा आधार देऊ बघायची.

तसं कसं ? तुझाबी सौंसार हाय.घरात कर्तं मानूस न्हाई. 

ह्ये भात घानवट ऱ्हाऊ दे तंवर.. तुमच्याकडं. 

खूप पावसाळे वाहून जाताना बघितलेली म्हातारी‚ वनवासातल्या कुंतीसारखी शहाणपणाचं बोलायची.

गावठ्यावरच्या म्हातारीकडे दरवर्षी अश्विन महिन्यातल्या  तिसऱ्या मंगळवारी वरसुबाईचा नैवेद्य असायचा. त्यासाठी भात आमटी, शाकबाजी व बुंदीचे जेवण असायचे.

शेणसारवण केलेली पाटी घेऊन गावठ्या वरची म्हातारी वरसुबाईच्या जेवणाचं आमंत्रण द्यायला आमच्या घरी यायची. माझ्या आईशी ती नेहमी खास मनाच्या कप्प्यातलं बोलायची. अंगणात उभी राहून ती आईला हाक घालायची‚ 

सखू..जरा भाहेर ये.

आई बाहेर गेली की त्या दोघींच्या अंगणातच गप्पा जमून जायच्या. म्हातारी वरसुबाईच्या निवदाचं आवतन’ द्यायला आलो आहोत हे विसरायची. आपल्या विठ्ठलच शिक्षान’ कसं करावं याचा सल्ला विचारताना म्हातारी आपली शेतीवाडी घर शेकारणी सारं सारं विसरलेली असायची. 

आई तिला घरात नेऊन चहा द्यायची. 

येते ग सखू म्हणत म्हातारी माझ्या घरासमोरच्या अंगणा पर्यंत जायची आणि पुन्हा परतायची. 

बघितलासा सखू ध्यानातच ऱ्हात नाई‚ लेकरांस्नी वरसुबाईच्या निवदाला गावठ्यावर लावून दे सांच्याला.

वरसूबाईचं देऊळ दीड-एक मैलावर असल्यामुळं माझी भावंडं जायला कुरकुरायची. मी एखादा जोडीदार घेऊन‚ आंब्याच्या डेरेदार झाडांच्या राईतून वरसु बाईच्या देवळाजवळ यायचो. 

वडाच्या पानांच्या पत्रावळीवरचा आमटीभात शाकभाजी व बुंदीचा निवद घोंगडीवर बसून खाताना कसली तरी आगळीच चव तोंडात रेंगाळू लागायची.

मी लग्न झाल्यावर पत्नीसह गावठ्या वरच्या म्हातारीला भेटायला गेलो. घरातील एका अंधाऱ्या खोलीत म्हातारी लोखंडी खाटावर गोधडी पांघरून आजारपणामुळे निपचित पडली होती. 

मी बायकोसह म्हातारीच्या अंधाऱ्या घरात गेलो. मी आलोय हे कळताच म्हातारी अंथरुणात उठून बसली. आम्ही दोघांनी तिला नमस्कार केला. मी तिच्या खाटेवरच टेकलो. म्हातारी आपल्या विठ्ठल कडं बघत क्षीण आवाजात म्हणाली‚ 

जोडप्यानं आल्यात. त्वांड गॉड कर बाबा त्येचं.

विठ्ठलने आमच्या हातांवर साखरेचे चमचे पालथे केले. ब्येस क्येलंस ल्येका मास्तरच नाव राकलंस. माझे वडील शिक्षक असल्याने ती वडिलांना मास्तर म्हणायची.

विठ्ठल फोन मधून तु लिव्हलेलं वाचून दावतो.

जेवणाच्या खोलीकडं बघत‚ म्हातारी सुनांना उद्देशून म्हणाली‚ 

अगं! सवाशीन आली. कुनीतरी कुकू लावा की गं तिच्या कपाळाला.

म्हातारीचं बोलणं ऐकताना माझं काळीज चिरल्यासारखं झालं.

गावठ्यावरच्या म्हातारीच्या घराबाहेर पडताच मी बायकोला म्हणालो‚ बघितलंस‚अशी माणसं भेटायची नाहीत इथून पुढं.

थोड्याच दिवसांत माझ्या मोबाईलवर मेसेज आला.  

प्रिय रामदास,

तुझी गावठ्यावरची म्हातारी गेली. तुझं नाव काढलं तिनं जाताना. 

तुझा विठ्ठल....

आजही मी गावी जातो. गावी गेल्यावर गावठ्यावरच्या म्हातारीची तीव्रतेने आठवण येते. आणि नकळत मी गावठ्या वरची वाट चालू लागतो. दुरूनच म्हातारीचे घर दिसते. म्हातारी आपल्यात नाही हे मनाला पटतच नाही. 

म्हातारी आपल्यात आहे असा भास होतो. का? काय माहित? परंतु म्हातारीच्या घराकडे जायला पावले जड होतात. मग मी तिथूनच म्हातारीच्या घराच्या दिशेने म्हातारीला नमस्कार करतो आणि मागे फिरतो.

रामदास तळपे

बालपणीचे दिवस

साधारण 1976 चे ते साल असावे. दुष्काळात  शासनाने रोजगार हमीची कामे काढून लोकांच्या हाताला काम दिले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता भुकेच्या विवंचनेतून बाहेर पडली होती. हळू हळू परिस्थिती पूर्वपदावर येत होती. तत्कालीन देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा देऊनही  सत्तर टक्के लोकांची गरीबी होती तशीच होती. 

शेती मध्ये आधुनिकता नव्हती. संकरित बी बियाणे तो पर्यंत विकसित झाले नव्हते. त्यामुळे कमी उत्पन्न शेतीतून मिळत असे.

नुकत्याच सहकाराच्या माध्यमातून दूध डेअरी काढल्या होत्या. त्यामुळे शेत कऱ्याच्या घरी थोडा फार दुग्ध व्यवसाय चालत होता. म्हणून तरी जीवनावश्यक वस्तू बाजारात जाऊन घेता येत होत्या. 

घरामध्ये खाती तोंड वाढत असल्यामुळे कुटुंब प्रमुखाला तारेवरची कसरत करावी लागत होती. जशी ही स्थिती सगळी कडे होती तशीच आमच्या ही घरी होती.

आमच्या घरात आमचे आजोबा कुटुंब प्रमुख होते. घरामध्ये दोन बैल दोन म्हशी, एक शेळी, एक कुत्रे, एक मांजर असा मुक्या जनावरांचा तांडा होता. 

आम्ही तीन भावंड, आजोबा, आजी, आई, वडील असा आमचा परिवार आनंदाने तर नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी जीवन जगत होता. 

घरातील म्हशी गाभण असल्यामुळे घरात दूध हे नावाला सुद्धा पहाण्यास मिळत नव्हते. आणि मग दूध नसले की घरात पैसा आपले तोंड लपवून ठेवत असे. त्यामुळे घर चालवताना खूप आर्थिक ओढाताण होत असे.

वसंत ऋतूच्या आगमनाने रानातील आंब्याची झाडे मोहरली होती. त्यावर्षी आंबे भरपूर होणार हीच भविष्यवाणी वर्तवली जात होती. सामायिक रानात आमची चार आंब्याची झाडं होती. सगळ्या झाडांना आंबे लगडलेले होते. 

ही चार ही झाडे भावकी मिळून होती. एके दिवशी भावकीतील चार, पाच माणसं त्या थोराड आंब्याखाली जमा झाली. आंबा पाडाला लागल्याने त्याला उतरवण्याचे काम त्या दिवशी होणार होते. 

झाडा वर एक माणूस तर खाली एक माणूस अशी जोडी जोडी तयार झाली वर चढणाऱ्या माणसाकडे एक खोडी होती. आंब्याच्या झाडाच्या शेंड्यावरील आंबे तो त्या खोडीत घेत होता. त्यातील एक एक आंबा खाली असणाऱ्या माणसाकडे झेलण्यासाठी देत होता. पोत्याच्या घडी मध्ये एक एक आंबा उतरवला जात होता. 

झाडाखाली मोठी आंब्याची रास लागली. सगळ्या भावकीला समान वाटा देण्यात आला. हे आंबे मोजण्यासाठी आजोबांच्या वयाची तीन माणसं बसली होती. सुरवातीला धान्य किंवा इतर वस्तू मोजताना लाभ असे बोलण्याची पद्धत होती. नंतर दोन, तीन असे मोठ्याने बोलले जायचे. यामुळे वाटे होत असताना कोणतीही गडबड होत नव्हती. 

प्रत्येकाने पोत्यात भरून आंबे घरी आणले घरात मोकळ्या जागेत पेंढ्याच्या थरात ते पिकवण्यासाठी ठेवले.

आंबा पिकल्या नंतर खूप गोड लागत होता. साधारण एक आंबा अर्धा किलोच्या वजनाचा असेल. तो पिकण्यासाठी सहा ते सात दिवस लागले.

सात, आठ दिवसानंतर पिकलेले आंबे बाहेर काढले. आंब्यांच्या सुगंधाने संपूर्ण घर दरवळून गेले होते. 

इकडे घरातील जीवनावश्यक वस्तू संपल्या होत्या. येणाऱ्या बाजाराची वाट पहावी लागली होती. गुळ, घासलेट, कपड्याचा साबण, गोडेतेल, अशा सर्व सामान गरजेचे होते. घरात दूध नसल्याने दुधाचा पगार मिळण्याची शक्यता नव्हती. 

त्या वेळी आजोबांनी आईला आणि मला सांगितले. जर ही आंब्याची पाटी तुम्ही बाजारात जाऊन विकली तर गरजेपुरता बाजार येऊ शकतो. 

तसे पाहिले तर बाजाराचे ठिकाण म्हणजे खेड तालुक्याच्या पश्चिम भागाची मोठी बाजारपेठ म्हणजेच वाडा गाव. त्यावेळी गाड्यांची कोणतीही साधने नव्हती. पायी जाणे हाच पर्याय. 

त्यासाठी दोन तास पायी चालत जावे लागणार होते. शिवाय ते आंबे डोक्यावर घेऊन जावे लागणार होते. आजच्या काळात माणसाला रिकामे एवढे अंतर पायी चालता येत नाही. तेव्हा ते डोक्यावर सामान घेऊन जावे लागणार होते.

शनिवारचा दिवस बाजाराचा असल्याने आईने शेण ,पाणी, लवकर उरकले. मी सुद्धा तिच्या बरोबर जाण्यास तयार झालो. माझे त्यावेळी वय साधारण दहा वर्षाचे असेल.

आईने एका पाटीत पन्नास साठ आंबे मावतील तेवढे घेतले. तर माझ्याकडे पंचवीसेक आंबे एका खताच्या गोनीत भरून दिले.

अंगात शाळेचा एकच सदरा जो धुवून तोच घालायचा असा आणि ठिगळ लावलेली खाकी चड्डी अशा पेहरावात आईआणि मी दोघे मायलेक आंबे विकायला बाजाराला निघालो होतो. निघालो होतो.

बाजाराला जाण्यासाठी काही सासुर वाशीणी स्रिया रस्त्याने चालल्या होत्या. त्यापैकी आईची खास मैत्रीण आईला गप्पा मारण्यासाठी भेटली होती. आईच्या डोक्यावर तीस ते चाळीस किलोचे ओझे तर माझ्या कडे खताच्या गोनीत असलेल्या आंब्याचे वजन साधारण दहा एक किलो होते.

आई आणि तिच्या संसाराच्या गप्पा रंगात आल्या होत्या. म्हणतात ना प्रवास बोलण्याच्या नादात कधी पूर्ण होतो ते कळत नाही. अगदी तसेच होत होते. आईची ती मैत्रीण सासूचे गाऱ्हाणे आईला सांगत होती. पण आई मात्र आमच्या आजी बद्दल काहीच सांगत नव्हती. त्यांच्या गप्पा मी तलीन होऊन ऐकत चाललो होतो.

परंतु त्या डोक्यावरच्या गोणीने मला चालणे असह्य केले होते. कितीही केले तरे माझे खेळण्याचे ते वय, परंतु संसाराचे ओझे वाहण्यासाठी मला तिथे जुंपले होते. मी या खांद्यावरून त्या खांद्यावर ते ओझे रागाने ठेवत होतो. गोनीतले ते निर्जीव आंबे सर्व सहन करत होते. 

रस्त्यांमध्ये एक विसाव्याचा आंबा होता. त्याला गर्द सावली होती. बाजाराला निघालेला आणि बाजार करून आलेला वाटसरू तिथे विसावा घेत असायचा. आम्ही सुद्धा काही काळ तेथे विसावा घेतला. 

मग मजल दरमजल करत वाड्याच्या बाजारात पोहचलो. एक रिकामी जागा पाहून आईने बरोबर आणलेली पाटी त्यामधील आंबे पोत्यावर पसरवले. माझ्याकडील आंब्याची अवस्था दयनीय झाली होती. आंब्याचे ओझे सतत खालीवर केल्यामुळे ते आंबे अगदीच बिलबिलीत झाले होते. 

पिवळे धमक आंबे पाहून गिऱ्हाईक येत तर होते. पण भाव ऐकून पुढे जात होते. आईच्या लक्षात आले होते,भाव थोडा  जास्तच आपण सांगत आहोत. मग काही वेळाने थोडा भाव कमी केला.

काही वेळातच आईकडील सारे आंबे  विकले गेले. मात्र माझ्या कडील आंबे पाहून गिऱ्हाईक नाक मुरडत पुढे निघून जात होते.

आई मला सतत बडबड करत होती.

तू जर बरोबर ओझे एकसारखे डोक्यावर आणले असते तर हे आंबे सुद्धा चांगल्या भावाने विकले गेले असते. माझी चूक मला कळली होती. आई बोलत असताना मी काही वेळा रडत होतो. परंतु माझे दुःख मी आईला सांगू शकत नव्हतो. 

नंतर इकडचे तिकडचे करत आईने ते आंबे अर्ध्या भावात विकले.

आम्ही दोघे ही मायलेक भुकेने अगदीच व्याकुळ झालो होतो. आमच्या कडे घरचा सगळा बाजार येईल एवढे पैसे आले होते. बरोबर आम्ही घरातून भाकरी आणली होती.

अहमद शेठच्या हॉटेल मध्ये भुकेच्या भरात चार भाकरी मिसळ बरोबर कुठे फस्त झाल्या याचा पत्ताच लागला नाही. 

मिसळ खाऊन आम्ही तृप्त होऊन बाहेर  पडलो. पुढे जाऊन आईने चिमणभाईच्या दुकानात जाऊन सगळा बाजार केला. आणि तो बाजार आम्ही आल्या रस्त्याने परत गावाला घेऊन निघालो. 

परंतु येताना पेक्षा घरी जातानाचा आनंद हा खूप मोठा होता. टिचभर पोटासाठी आपण आयुष्यात आज किती मेहनत करतो. पण त्याहीपेक्षा घरातील सगळीच माणसं रात्रदिवस अपार कष्टातून आपल्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने फुलवत असतात याची मला कल्पना आली.

गावाकडे शालेय जीवन जगत असताना अनेक ज्ञात, अज्ञात मोठ्या माणसांचे, गावकऱ्यांचे,आई वडिलांचे, नातेवाईकांचे आणि गुरुजनांचे संस्कार माझ्यावर घडले. अनेक जीवाचे जिवलग मित्र मिळाले. त्यांच्या या आशीर्वादानंमुळे आज मी जो काही आहे तो केवळ या लोकांनी केलेल्या संस्कारामुळे आणि त्यांचे आशीर्वादामुळे.

आज जरी शहरात नोकरी धंद्यानिमित्त असलो तरी अजूनही गावाला आणि भागाला विसरलेलो नाही. आज जरी सुखाचा घास खात असलो तरी शालेय जीवनातील बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा याची चव अजूनही जिभेवर रेंगळत आहे.

उन्हाळ्यात मित्रांबरोबर रानात जाणे, गुरे सांभाळणे, झाडाच्या कैऱ्या पाडून मिठाबरोबर खाणे, विहिरीवर मनमूराद पोहणे, पंचक्रोशीतील यात्रांना जाणे संध्याकाळी जेवण झाल्यावर काळ्याक भिन्न रात्री अंथरुणावर पडून आजीच्या गोष्टी ऐकणे यासारखा आविट आनंद मिळाल्याचे भाग्य मला लाभले की जे आजही विसरू शकत नाही.

आज मात्र खेडेगावांची परिस्थिती वेगळी आहे, पूर्वीचे दिवस आता राहिले नाहीत. माणसे सुद्धा अबोल झाली आहेत. अगदी दगड गोट्यासारखी. काळाचा महिमा दुसरं काय ?

लेखक :- बाळासाहेब मेदगे, औदर



भात शेतीची आवणी /लावणी

मे महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होताच, आकाशात ढग जमू लागतात. काही ठिकाणी वळवाचा पाऊस पडतो.

दररोजच सकाळी सकाळी आकाशात ढग जमू लागतात. आणि दुपारी हे सर्व गायब होतात. पावसाचा थेंबही पडात नाही. दररोज रेडिओवर पाऊस अंदमानात आला आहे, समुद्रामधील वाऱ्यामुळे तिकडेच अडकला आहे अशा बातम्या येतात.

चिंतू हुरसाळे: 

अशातच रोहिणी नक्षत्र संपून मृग नक्षत्र सुरू होते. आमच्या गावातील लोक चिंतू हुरसाळे यांच्याकडे जाऊन पेरणीचा मुहूर्त कधी आहे. हे पाहण्यासाठी गर्दी करतात.

चिंतू बुवा लाकडी संदुकात ठेवलेले पंचांग काढतात. आणि बाहेर येऊन घोंगडी वर बसलेल्या गावकऱ्यांच्या समोर बसून  पंचांगाचे एक एक पान उलटेपालटे करतात. जमलेल्या पैकी काही लोक पंचांगावर सुट्ट्या नाण्याची चिल्लर ठेवतात. आणि उत्सुकतेने मुहूर्त कधी आहे हे ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात.

चिंतू बुवा पेरणीचा मुहूर्त सांगतात. हा मुहूर्त साधारण तीन ते पाच जून चा असतो. तेथे अनेक चर्चा झाडतात. पाऊस नाही मग पेरणी करायची तरी कशी? अनेक प्रकारच्या चर्चा होतात. 

परंतु चिंतूबुवाचा मुहर्त योग्य मानून जरी पावसाचा पत्ता नसला तरी त्यांनी सांगितलेल्या मुहूर्तावर धुळवाफेत सारा गाव पेरणी करून मोकळा होतो.

धुळवाफेत पेरणी करूनही आठ दिवस उलटून गेलेले असतात. तरीही पाऊस पडात नाही.अशावेळी अनेक लोक चिंताग्रस्त व्हायचे.

परंतु त्यानंतर हळूहळू पावसाला सुरुवात होते. भाताची रोपे म्हणजेच दाढ तरारून वर येते. पावसाचा जोर वाढू लागतो. भात खाचरामध्ये पाणी पाणीच पाणी होते. रात्रभर पाऊस पडत राहतो. घरातील  मोठी माणसे म्हणतात. 

दाढीच्या भोवतीने पोहळी काढायला पाहिजे होती. आता सगळी दाढ पाण्याने गाडून गेली असेल.

पोहळी काढणे : 

भाताचे रोप असलेल्या दाढी मध्ये पाणी साचते. त्यामुळे भाताच्या रोपांची वाढ होत नाही. हे पाणी भातरोप असलेल्या दाढीमध्ये येऊ नये म्हणून संपूर्ण रोपाच्या भोवतीने फावड्याच्या सहाय्याने मातीचा वीतभर उंचीचा मातीचा बांध घालतात. त्यामुळे बाहेरचे पाणी आत येत नाही  यालाच पोहळी काढणे असे म्हणतात. 

खत मारणे :

भाताच्या रोपाची वाढ जलद व्हावी या साठी लोक युरिया खताचा वापर करतात. प्रामुख्याने भात रोपांना युरिया खत मारले जाते. युरिया खत हे साखरेसारखे असते. लहान असताना मी साखर समजून युरिया खत खाल्ले होते. परंतु तोंडात कडू चव आणि तोंडात चिकट झाल्याने कितीही थुंकले तरी कडूपणा आणि चिकटपणा जाता जात नव्हता.

खत मारल्यावर आपले भातरोपाची किती वाढ झाली आहे. हे काही शेतकरी दररोज सकाळी शेतात जाऊन पाहत असतात. कारण रोपे मोठी झाल्याशिवाय अवनी करता येत नाही.

दररोज पाऊस पडतच असतो. ओढून आले भरून वाहू लागतात. शेतीचे दोन प्रकार असतात.

रानव्याची खाचरे :

रानव्याची खाचरे ही डोंगराच्या उतारावर असतात. ही जमीन निचऱ्याची असते. खूप पाऊस पडला तरच याच्यात पाणी येते. पाऊस नसल्यावर या खाचरामध्ये पाण्याचा थेंबही साठत नाही. त्यामुळे खूप पावसाची वाट पहावी लागते. काही लोक जेथे पाणी असेल तेथून पाट काढीत आपल्या शेतात आणतात.

या पाटा वरून शेजारच्या शेतकऱ्यांच्या मारामाऱ्या होतात. दरवर्षी हे ठरलेलेच असतं. परंतु आता गावाकडे बरीचशी शेती ही पडीकच असते. शेती करायला कुणाला वेळच मिळत नाही. सर्व लोक नोकरीसाठी दूर शहरात जाऊन राहिले आहेत. शेती करणारे लोक कधीच वर गेले आहेत.

रानव्याच्या खाचरांमध्ये हळवी भाते  लावतात. हळवे म्हणजे लवकर येणारे पीक. ही पिके साधारण बैलपोळा ते दसऱ्यापर्यंत काढायला येतात. त्यांना फार पाणी लागत नाही. शिवाय पाऊसही नंतर कमी कमी होतो.

भाताच्या हळव्या जाती : इंद्रायणी, फुले समृद्धी, पार्वती, इत्यादी.

झोळाची खाचरे:

भात शेतीचा दुसरा प्रकार म्हणजे झोळाची खाचरे. या खाचरांमध्ये पाऊस पडल्यावर लगेचच खाचरामध्ये पाणी साचायला सुरुवात होते. हे पाणी खाचरामध्येच साचून राहते. शिवाय डोंगरावरून येणारे पाणी खाचरा,खाचरांमधून या भागातून वाहत जाते. यालाच झोळाची खाचरे म्हणतात.

झोळाच्या खाचरांची लावणी लवकर सुरू होते. कारण त्यामध्ये पाणी असते. त्या तुलनेत रानवेच्या खाचरामध्ये पाणी नसल्यामुळे पाणी साचण्याची वाट पहावी लागते. ज्याची रानवेची जमीन आहे असे शेतकरी झोळांच्या शेती वाल्यांना मदत करतात. 

झोळांच्या शेतीमध्ये खूप उशीर पर्यंत पाणी साचून राहते. त्यामुळे तेथे गरी भाते म्हणजेच जास्त दिवस असलेली भातशेती केली जाते. ही भात शेती दिवाळी नंतरही अगदी हिरवीगार असते. भात काढणीला खूप दिवस लागतात.

या शेतीमध्ये गरा कोळंब, खडक्या, जीर तांबडा रायभोग, कमोद इत्यादी पिके घेतली जातात. हा तांदूळ अतिशय सुवासिक आणि खाण्यासाठी उत्तम मानला जातो.

आवणीची लगबग :

धुवाधार पाऊस पडत असतो.भातरोपे तरारून वर आलेली असतात. जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन जाते. भातखाचरे पाण्याने फुल्ल भरून वाहू लागतात. आणि मग आवणी करण्यासाठी शेतक-यांची एकच धावपळ होते.सर्वांचे एकच लक्ष असते. लवकरात लवकर आपली आवणी संपवणे. 

काही शेतकऱ्यांना थोडी भातशेती असते. त्यांची लवकरच आवणी होते. परंतु ब-याच शेतक-यांची शेती जास्त असते. मणुष्यबळ कमीअसते. अनेकांकडे चिखलणी करण्यासाठी बैल नसतात. त्यांची या मोसमात खुपच ओढातान होते. या शेतकऱ्यांना मनुष्य बळ व औत काठीसाठी वाट पहावी लागते.

ज्यांना थोडी शेती असते. त्यांची आवणी लवकर होते असे शेतकरी एकत्र येतात. अनेक गावांमध्ये गरजु शेतकरी असतात.हे गरजू शेतकरी ज्यांची आवणी झाली आहे या शेतक-याकडे येतात. (पश्चिम भागातील अनेक शेतक-यांना प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना किती जमीन आहे. व ती कोठे कोठे आहे याची इंत्यभुत माहिती असते.) 

गरजू शेतक-यांची संपुर्ण आवणी करून देण्यासाठी विशिष्ट रक्कम देण्याचे ठरवले जाते.त्यास "डफा" किंवा "खोती" देणे असे शब्द आहेत.

मोडा पाळणे :

पुर्वी भागातील मुत्सुद्धी पुर्वजानी जशी शासकीय सुट्टी असते तशी शेतकऱ्यांना सुद्धा आठवडयातुन एकदा सुट्टीची योजना केलेली असते. यालाच "मोडा "असे म्हणतात. प्रत्येक गावचा मोडा हा मंगळवार किंवा रविवारी असतो.त्या दिवशी शेतीची कोणतीच कामे शेतकरी करत नाहीत. मोडा हा ग्रामदैवताच्या नावाने पळाला जातो.

आवणी करताना खुपच मजा येते. कधी जोरदार तर कधी रिमझिम पाऊस पडत असतो. भात खाचरात गुडघाभर पाणी असते. भात खाचरातील रोपे विशिष्ट पण सोप्या पध्दतीने काढली जातात त्याला दाढ खणने असे म्हणतात. छोटया रोपांची अगदी छोटी गड्डी बांधतात त्याला "मुठ "असे म्हणतात. असे अनेक मुठ एकत्रित केल्यावर या सर्वांना "आवान" असे म्हटले जाते.

दाढ खणणे :

प्रथमतः दाढ खणल्यावर त्याचे मुठ जेथे भातरोपे लावायची आहेत त्या ठिकाणी घेऊन जातात.भात रोपे लावायच्या आधी त्या खाचरात बैलांच्या सहाय्याने (यालाच औत म्हणतात) गाळ केला जातो, मगच आवणी केली जाते.

गाळ करणे :

आवणी करताना पाऊस पडत असतो. सर्वजण भिजुन गेलेले असतात. प्रत्येकाकडे ईरणे किंवा प्ल्यास्टिक कागद असतो. खुपच मोठा पाऊस आलातर अंगावर ईरणे व कागद घेतात. अन्यथा इरणे व कागद बांधावर ठेवतात. दुपारचे जेवण भाकरी मसुराची किंवा काळ्या वटाण्याची आमटी, लसणाची चटणी, कांदा व भात असे जेवण असते. सर्व शेतकरी पावसात बांधावर एकत्रित बसुन जेवतात.जेवण झाल्यावर पुरूष मंडळींना तंबाखू व विडीकाडी दिली जाते.व थोडयावेळाने परत कामाला सुरूवात केली जाते.

मुठ :

आवणी करणा-या माणसांना मुठ पुरवणे खुपच आनंदाचे काम असते. दहा पंधरा मुठ दोन्ही हातात धरून पाण्यावरून ओढत नेऊन आवणी करणा-या माणसांपर्यत विशिष्ट पद्धतीने फेकने ही एक कलाच असते.काम करताना अजीबात श्रम होत नाही. परंतु भर पावसात मुठांचे ओझे या शेतातून त्या शेतात वाहून नेण्याचे काम खूपच जिगरी असते. मोठ्यांचे ओझे घेऊन कधी पाय घसरून पडू हे सांगता येत नाही.

भात लावणी :

भात लावण्यासाठी खूप माणसे एकत्र आलेली असतात पोटरी भर पाण्यात भात लावायचे काम चालू राहते. गप्पागोष्टी करत भात लावणीचे काम सुरू राहते.

भल्लर :


खूप मोठे शेती असेल तर अगदी 50 ते 60 माणसे भात लावणी करत असतात. एक माणूस बांधावर उभे राहून ढोल वाजवीत असतो. दुसरा माणूस भलरीची गाणी म्हणत असतो. आणि त्या पाठोपाठ भात लावणारे स्त्री, पुरुष भलरी ची गाणी म्हणत असतात. अगदीच धुंद वातावरण असते. गाण्याच्या तालासुरात लावणीचे काम वेगाने सुरू राहते. पावसाच्या सरी अधून मधून पडत असतात.

गरम पाण्याची अंघोळ :


सकाळपासून काम करून अंग चिंबून गेलेले असते. परंतु थंडी मात्र वाजत नाही. काम संपल्यानंतर संध्याकाळी घरी आल्यावर गरम गरम पाण्याने आंघोळ करणे,अगदी स्वर्गीय आनंदाची प्राप्ती करून देते. 

काही लोक संध्याकाळी आपल्या बैलांना सुद्धा गरम पाण्याची आंघोळ घालत असत. कारण बैलांना सुद्धा दिवसभर काम करून थकवा येत असेल.

गावाकडचे विलोभणीय दृश्य :

ग्रामीण भागात खुप पाऊस पडतो.त्यामुळे त्या ठिकाणी मुख्यत्वे भातपीक घेतले जाते. ग्रामीण भागातील शेती ही चढ उताराची असल्याने छोटे छोटे दगड लावून बांध घालून प्लाँट केले जातात. हे प्लाँट कमीत कमी दोन गुंठे व जास्तीत जास्त वीस गुंठयापेक्षा जास्त मोठे असतात.याला 'खाचर' असे म्हटले जाते. 

उताराच्या जमीनीवरील पाणी वाहुन जाण्यासाठी प्रत्येक खाचराला विशिष्ट प्रकारे दगड लावले जातात. त्यावरून पाणी वाहून जाते.

हे एकप्रकारे छोटे छोटे धबधबेच असतात. याला "प-ह्या" म्हणतात.ज्या वेळी पाऊस पडतो. तेव्हा भातखाचरे भातलागवड केली असल्याने हिरवीगार दिसतात.व त्या खाचरांच्या प-ह्या वरून खाली कोसळणारे पाणी हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसते. स्वर्गीय सुखाचा भास होतो.

जिकडे तिकडे हिरवेगार व पांढरेशुभ्र झरे, ओढे-नाले, प-ह्ये नदी धबधबे भात खाचरातुन वाहणारे पाणी, हिरवेगार डोंगर हिरवीगार राने याची निसर्ग मुक्त उधळन करीत असतो. हे पाहून मन प्रसन्न होते.प्रफुल्लीत होते.पश्चिम भागातील जीर,रायभोग,खडक्या,इंद्रायणी तांदुळ फार प्रसिद्ध आहेत. मोठ्या प्रमाणावर या तांदळांची खरेदी केली जाते.

खाज कुहे :

जवळजवळ महिनाभर लोक सतत शेतात काम करत असत. त्यामुळे सतत पाण्यात राहिल्यामुळे पायांना कुहे होत. पायाच्या बोटांमधल्या बेचांगळ्यात प्रचंड खाज यायची. 

अनेक लोक संध्याकाळी बीटेक्स मलम पायांना चोळायचे. काहीजण चुलीमध्ये पायाची बोटे शेकवायचे. 

काही लोक अगदी आघोरी प्रकार करायचे. प्रत्येक पायाचे बोट घेऊन त्याला दोऱ्याने खालपासून वरपर्यंत करकचून आवळीत व राहण्याचे. व सुईने वरच्या भागाला टोचायचे. त्या त्यामधून काळे कुळकुळीत रक्त बाहेर पडायचे. हे केल्यावर मात्र पायाच्या बोटांची खाज कमी व्हायची.

सण समारंभ व वृत्तवैकल्ये :

आवनी झाल्यावर मग मात्र बऱ्याच लोकांना काही काम नसायचे. दररोज शेतात जाऊन आपली भात शेती कशी आहे याची पाहणी करत बसायचे. व दुपारी गुरे सोडून रानात न्यायची.

अवनी झाल्यानंतर श्रावण महिना सुरू होऊन नागपंचमी, तिसरा श्रावणी सोमवार, रक्षाबंधन इत्यादी सण तसेच प्रवचन, कीर्तन, भजने, व्रत वैकल्ये, ग्रंथांची पारायणे, यामध्ये लोक रममान व्हायचे. अशी गावाकडे मजा असायची.

लेखक :- रामदास तळपे 

थंड ही हवा, धुंद गारवा 

हा पाऊस, रिमझिम बरसे 

रेशीम धारा, या रुणझुणती 

जल थेंबाचे, उधळीत मोती 

पानफुले नाचती गंध फुले भोवती 

झुलती जलांचे आरसे 

हिरवी शेते, हिरवी राने 

आवती भवती, हिरवी कवने 

नटली बघा ही धरा, झोक तिचा साजरा 

नवरी नवेली ही दिसे 

गीत :- वंदना विटणकर :- गायिका पुष्प पागधरे 















 




गावाकडचे गुराखी

बाळासाहेब मेदगे यांचा लेख 

श्यामला नुकतच दहावं वर्ष लागलं होतं. त्या काळात शिक्षणा पेक्षा घरातील गुरढोर सांभाळण्यासाठी अशा वयात आलेल्या मुलांना गुरांकडे पाठवलं जायचं.

आजू बाजूच्या बऱ्या पैकी परिस्थिती असलेली मुले गावातील शाळेत जात होती. परंतु श्याम सारखी चार ते पाच पोर आपली गुर भली आणि आपण भले असेच जीवन जगत होती. 

दिवस उगवला की श्यामचा दिवस चालू होई. सकाळची साखर झोप त्याला घेता येत नसे. पहाटे पासून घरात एकच कामांची गडबड चालू होत होती. गुरांच्या धारा काढणे, त्यांना अंबवन, जात्यावर दळण विहिरीवरून पाणी आणणे, ही सगळी कामे त्याच्या व्यतिरिक्त केली जात होती.

सकाळी झोपेतून उठल्यावर श्याम कसे बसे तोंड धुवून चहा घेत असे आणि गुरे सोडून रानात चरायला घेऊन जात असे. त्याच्या बरोबर खालच्या आळीतील महादू, शेजारचा रामू, वरच्या आळीतील जगू,आणि गावातील अशी दोन तीन पोर मिळून सगळे जन रानात आप आपली गुरे घेऊन जात असत. 

उन्हाळ्यातील लगीनघाई संपली होती. उन्हाळ्यात गुरे दिवसभर रानातून घरी आपोआप येत होती. फक्त पाणी पाजन्यासाठी ओढ्यावर घेऊन जावं लागत असे.

वैशाखा मध्ये तर श्यामने लग्नाच्या वराती, यात्रा, यांचा खूप आनंद घेतला होता.

मृग नक्षत्र पर्जन्य राजाला घेऊनच आले होते.शेतातील ढेकळे पावसाच्या पाण्याने पूर्ण विरघळून लोण्यागत झाली होती. रानातील शेवटच्या घटका मोजत असलेलं वाळलेले गवत मृतप्राय अवस्थेतून पुनर्जन्म घेऊन धरणीवर अवतरले होते. सगळी वसुंधरा हिरवाईची चादर घेऊन नव्या नवरी सारखी अवतरली होती. गेली आठ महिने हिरव्या चाऱ्या पासून गुरे दूर होती ती आता मात्र हिरवा चारा खाऊन जोगवत होती.

अजून मात्र साथ झाली नव्हती. साथ म्हणजे ज्या वेळी ही साथ होत होई तेव्हा पासून प्रत्येकाने आपली गुरे ही आपल्या रानातच चारावी असा खाक्या पंचायतीचा होत होता.

दुसऱ्या दिवशी साथ होती. गावदेवी म्हणजेच मरीआईला कोंबडं कापले. इडापिडा टळू दे असा नवस घरातले बोलले होते.

साथ झाली तसे सगळे गुराखी आपली गुरे रानात चारू लागले होते. प्रत्येकाचे रान सुध्दा हाकेच्या अंतरावर होते. एखाद्याला काही लागले तर दुसरा मदत करत होता. रानाच्या बाजूने डोंगर रांगेतून आलेला मोठा झरा वहात होता. या झऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्यातून मधुर संगीताचा आनंद ही गुराखी मंडळी घेत होती.

त्या दिवशी एक तास अगोदर खूप जोरात पाऊस येऊन गेला. गुरे प्रत्येकाच्या रानात त्यांच्याच नादात चरत होती. 

श्याम, जगू, महादू या मंडळींनी एक बेत आखला.या गुराख्यांनी झऱ्यात प्रवेश केला. प्रत्येकाला मोठी मोठी चार- पाच खेकडे भेटली. त्यांनी रानातील वाळलेल्या टनटणीची लाकडे जमा केली. त्याला आग लावून त्या मध्ये पकडलेली खेकडे भाजली. प्रचंड ताकदीचा हा रानमेवा यांनी फस्त केला.

श्रावण जसा चालू झाला तसा हिंदू धर्माच्या सणाना प्रारंभ झाला. रान भाज्या श्रावणातील प्रत्येक सोमवारच्या उपवासाला मिळू लागल्या. प्रत्येक सणासुदीला घरात गोड धोड पदार्थ बनत असत. ते सर्व पदार्थ ही सगळी गुराखी मंडळी रानात एकमेकांना देत असायची.

घरातील शिळी भाकरी जरी असली तरी रानात तिची चव न्यारीच लागत होती.

एकमेकांची भाजी भाकरी एकत्र करून गोकुळातल्या काल्याची आठवण करून देत होते. 

कृष्ण जन्मात कृष्णा बरोबर असणारे सगळे सवंगडी अशीच घरातील शिदोरी वृंदावनात आणत होते.आणि जीवनातील प्रमोच्च आनंद घेत होते. श्रावणात प्रत्येकाच्या घरी धार्मिक ग्रंथांची पारायणे होत होती.

एकमेकांना ते पौराणिक कथा ऐकवत असत. विशेष करून हरिविजय ग्रंथाचा या मंडळींना अभिमान वाटत होता. कारण कृष्ण हा सगळीकडे भरून उरला आहे याची जाणीव सगळ्यांना झाली होती.

श्रावणातल्या इंद्रधनुष्याचा,आणि उन पावसाचा खेळ या मंडळींनी जवळून पाहिला होता.भाद्रपद मध्ये गूरानी बाळसे धरले होते.अमावस्येला बैल पोळा साजरा करून बैलांप्रती कृतज्ञता राखली होती. दिवाळी आली तेव्हा गुरांच्या शिंगांना तेल लावून वसुबारस अगदी आनंदात साजरी केली होती. दिवाळीतील कामांची लगबग आणि घरातील करंजी, लाडू, शंकर पाळी यांचे सुंदर समीकरण होत असे.

गावाच्या बाजूला असणारा घनदाट डोंगर, व पडीत रानातून वाढलेली झाडे त्यामुळे वाघ जनावरांसाठी धोक्याची घंटा ठरा यचा. या वाघापासून गुरांचे रक्षण व्हावे म्हणून रानामध्ये वाघबारस साजरी करण्याची पूर्वंजा पासून प्रथा चालत आलेली होती. त्या प्रथेला अनुसरून त्या दिवशी रानात वाघ बारस करण्याचे ठरले होते.

प्रत्येकाने काही तरी घरातून आणायचे होते. कोणी तांदूळ, कोणी दूध, कोणी साखर. 

खिर बनवण्यासाठी लागणारी भांडी सुध्दा कोणी आणायची ही सर्व कामे ठरलेली होती. प्रत्येकाच्या घरातून सगळी मंडळी जेवणासाठी आली होती. 

अस्सल म्हशीच्या दुधातील खिर सुंदरच बनली होती. सगळ्यांनी तृप्तीचा ढेकर दिला होता. व सगळे जन पुढील वर्षाच्या वाघ बारसेच्या प्रतीक्षेत हरवून बसले होते.

दिवाळी जावून काही दिवस झाले. प्रत्येक शेतकऱ्याचा भुईमूग काढण्याचा हंगाम चालू झाला होता. या मंडळींचा एक नित्य नेम ठरला होता. रोज कोणाच्या तरी शेतातून भुईमुगाचे डहाळे आणून त्याला छान पैकी भाजून त्यावर ताव मारायचा असा नित्यक्रम चालूच असायचा. 

म्हणता म्हणता हिवाळा सुरू झाला. बाहेर थंडी मी म्हणत होती. शेतकरी मंडळींनी रब्बी पिकांची तयारी चालू केली होती. कोणी हरभरा, ज्वारी, गहू, बटाटा, कांदा, अशी काही विहिरीच्या पाण्यावर तर काही पहाटे पडणाऱ्या दवावर अशा पिकांची लागवड केली होती. हिवाळा ऋतू म्हणजे या पिकांना वरदानच ठरत होता.

रानाच्या बाजूला असणारा हरभरा चांगलाच पोसला होता. ज्वारी सुध्दा भरपूर कणसे घेऊन बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. त्या काळात बियाणे हे घरचेच असे त्यामुळे कोणत्याही पिकाची खात्री देता येत होती. 

हिवाळ्यात हिवाळाच अनुभवयास मिळत होता. निसर्ग सुध्दा व्यवस्थित साथ देत होता. 

हरभऱ्यामध्ये दाणे भरू लागले होते. त्यावेळी या गुराखी मंडळींनी एक शक्कल लढवली.ज्याच्या शेतात चांगला हरभरा असेल त्याच्या शेतातून गुपचुप तो आणायचा आणि मोठी शेकोटी करून त्यावर तो भाजायचा आणि मग सगळे आजू बाजूला बसून त्याचा चवीचवीने उपभोग घ्यायचा असा कार्यक्रम हप्त्यातून एकदा ठरलेला असायचा.

हरभरा खावून झाला की मग मात्र यांची नजर शेतातील ज्वारी कडे जायची. ज्वारी सुध्दा हूर्ड्यावर आलेली असायची. मग ते हुरडा पार्टी करायचे. ज्वारीचं ते भलेमोठे कणीस त्यांचा अंतरात्मा शांत करत होते. असे गुण्या गोविंदाचे दिवस हे गुराखी  अनुभवत होते.

एकदाचा तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात कायम सल कोरून गेला होता. महाराष्ट्र शासनाने गाव तिथे वीज असावी असे धोरण जाहीर केले होते. तालुक्याच्या गावातून इतर ठिकाणी असलेल्या गावांना वीज जोडणी करण्याचा प्रयत्न केला जात होता. 

एक मुख्य वाहिनी व तिला उप वाहिन्या करून गावातून लाईट पोहचवण्यासाठी प्रयत्न होऊ लागले होते.

अशीच एक मुख्य वाहिनी या गुराखी मंडळीच्या रानातून पश्चिम दिशेच्या गावांना गेली होती. लोखंडी पोल उभे करून त्या मधून विद्युत तारेचे जाळे सगळीकडे पहावयास मिळत होते.

गुराखी म्हंटले की झाडावर चढने, विहिरीत, ओढ्यात पोहणे, हे आलेच त्या मध्ये ही मंडळी तरबेज असायची.

या गुराख्यामधला जगू मोठा चपळ होता. नजर हटे पर्यंत तो कोणतेही काम करत होता. 

असाच एक दिवस दुपारचे साडे तीन वाजले होते. गुरे रानात चरत होती. सगळी गुराखी मंडळी त्या लोखंडी पोल जवळ आली. 

जगूने सगळ्यांना सांगितले 

बघा, मी एका क्षणात या लोखंडी पोलवर चढुन त्याला असलेल्या तारेला लोंबकळुन दाखवतो.

याच्या पूर्वी त्याने एकांतात असे केले होते, त्यामुळे त्याला त्याचा आत्मविश्वास होता. 

बाकीचे सगळे त्याच्या कडे पहातच राहिले. श्याम जरा संशयानेच त्याच्याकडे पहात होता. या विजेच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असतो याची त्या बिचाऱ्याला काहीच कल्पना नव्हती. आणि इतर गुराख्यांना सुद्धा.

जगू एका क्षणात त्या लोखंडी पोलवर चढला आणि काही वेळेतच त्या तारेला लोंबकळत आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करणार होता. 

जसा त्याने तारेला स्पर्श केला तोच त्या वेळी मुख्य वाहिनीतून खूप मोठा विद्युत प्रवाह जात होता. त्याचा आघात एवढा भयंकर होता की त्याला खूप दूरवर फेकले गेले.

त्याचे सगळे शरीर काळे निळे पडले होते. सगळे त्याच्या कडे धावत गेले. घरी निरोप पाठवून त्याला लगेच घरी आणले. 

त्याला ताबडतोब उपचाराची गरज होती. त्यावेळी दळणवळणाची कोणतीच सोय नव्हती. घरातील बैलगाडी जुंपली आणि त्यावर जागुला टाकून बाजार पेठेच्या गावात हलवण्यात आले. 

तिथे गेल्या नंतर त्याची चौकशी डॉक्टरने केली. शरीराकडे पाहून डॉक्टर हैराण झाले. कारण तो विद्युत प्रवाह सगळ्या शरीरात पसरला होता. 

डॉक्टर ने उपचार चालू केले खरे, परंतु त्यांनाच खात्री देता येत नव्हती की जगू वाचेल का? दोन तासाच्या अथक प्रयत्नातून सुध्दा जगू मध्ये कोणताच बदल दिसत नव्हता.

काही काळ गेला असेल तेंव्हा डॉक्टरने त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या दिवशी जगुचे पार्थिव गावात आणले. 

त्या दिवशी कोणत्याही गुरांख्यानी गुरे सोडली नाही. कोणीही अन्न पाण्याला शिवले नाही. आपल्यातला एक साथीदार गेला याचे त्यांना खुप दुःख झाले होते. 

मागील काही घडामोडी सगळ्या चित्रपट रूपाने त्यांना दिसत होत्या. जगू गेला परंतु एक गुरांख्यांचे जीवन सगळ्या मानव जातीला लक्षात राहील असेच जगला हे मात्र श्याम विसरायला तयार नव्हता.

लेखक :- बाळासाहेब मेदगे, औदर

संपर्क:-  90045 64645




आठवणीतले दिवस बबन न्हावी

बबन न्हावी

बबन न्हावी हे आमच्या गावात केव्हा आले हे मला निटसं आठवत नाही. परंतू त्यांचं कुटुंब कै.देवजी बांगर यांच्या गुरांच्या गोठ्यात रहात होते हे मात्र पक्के आठवते. बबन न्हावी त्यांची पत्नी विमल वाहिनी आणि मुलगा गजानन असा त्यांचा परिवार होता.

त्यावेळी अनेक गावात बलुतेदार असायचे. आमच्या गावात तेव्हा न्हावी नसल्यामुळे केस कापण्यासाठी शेजारच्या गावामध्ये जावे लागायचे. 

त्याचवेळी वाळद येथे राहणारे बबन न्हावी हे आमच्या गावात बलूतेदारीने न्हावी काम करण्यास तयार झाले. कारण ते तिघे भाऊ होते. आणि वाळद गावात दोघेजण आसपासचे काम बलूतेदारीने करत असत. परंतु एक जण मात्र रिकामा बसत असे.

आमच्या गावातील आमचे आजोबा बुधाजी तळपे यांनी बबन दादाला मंदोशीला येऊन बलूतेदारीने काम करण्यासाठी प्रवृत्त केले. आणि ते तयार झाले.

त्यांची राहण्याची व्यवस्था देवजी बांगर यांच्या गुरांच्या गोठ्यात केली. जेव्हा बबनदाचे कुटुंब तेथे रहायला आले त्याच्या आधी देवजी बांगर सोमाना येथील त्यांच्या शेतातील नव्या घरात जनावरांसह वास्तव्यास गेले होते. त्यांनी या गोठ्याची पावसाळ्या पुर्वी कोणतीच डागडुजी केली नव्हती. 

जेव्हा बबन न्हावी तेथे रहायला आले तेव्हा त्यांचे खुप हाल झाले. पश्चिम भागात धुवाधार पडणारा पाऊस, आणि ठिकठिकाणी गळनारा गोठा यामुळे थोडीशीच कोरडी जागा शिल्लक राहायची. सगळीकडे पाणीच पाणी व्हायचे.

अशा या अतिशय गैरसोयीच्या ठिकाणी हे कुटुंब वास्तव्य करत होते. वस्तू, कपडे लत्ता, धान्यधुन्य भिजुन जात होते. 

त्यांचे हे दैन्य कै. बुधाजी तळपे यांना पहावले नाही. त्यांनी बबन न्हावी यांच्या कुटुंबाचे होणारे हाल सविस्तर कै. देवजी बांगर यांना सांगीतले. 

देवजी बांगर यांना हे ऐकुन खुप वाईट वाटले. ते स्वतः बुधाजी तळपे यांच्या बरोबर गावात आले आणि कसलाही विचार न करता व कोणताही मोबदला न घेता बबन न्हावी यांना त्यांचे गावातील सुस्थीतीतील कौलारू घर तात्काळ राहण्यासाठी उपलब्ध करून दिले.

इतका दानशुरपणा आताच्या जमान्यात शक्य नाही.

देवजी बांगर यांच्या जुन्या कौलारू घरात राहायला आल्यावर बबन न्हावी यांच्या बायकोने (विमल वहिनी) छानपैकी घराच्या भिंती शेणामातीने सारवल्या. घरावर कौले असल्यामुळे गळण्याचा प्रश्नच नव्हता. शिवाय हे घर प्रशस्त असुन आमच्या शेजारीच होते. तर दुस-या बाजुला चिमाजी सुतार यांचे घर होते.

सर्व लोक त्यांना बबनदा म्हणत. तर या बबनदाच्या दारात रोज लोक केस कापण्यासाठी येत असत. त्या ठिकाणी लोकांच्या पुष्कळ गप्पा रंगत. गप्पा मारत असताना बबनदांचा तोंडाचा पट्टा व हातातील वस्तरा किंवा कात्री सफाईदारपणे चालत असे. त्यांच्या गप्पा ऐकायला मोठी मजा वाटे.

त्याकाळी लोक शक्यतो टक्कल किंवा बारीक कटींग करत असत. लोकांच्या डोक्यावर सफासफ फिरणारा वस्तरा किंवा कात्री पाहताना मोठी गम्मत वाटे.

त्याकाळी ग्रामीण भागात ब्लेड हा प्रकारच नव्हता. वस्ता-याची धार पडल्यावर बबनदा जवळच्या कातड्यावर आणि छोट्याश्या सहाणेवर घासुन वस्ता-याला धार लावी. हे ही पहाताना सुद्धा मोठी मौज वाटे.

बबन दादांच्या हजामतीचा इतका वेग होता की बबन दादांनी दोन जणांची हजामत करून तिसऱ्याच्या डोक्यावर पाणी लावे पर्यंत दुसरा न्हावी एक हजामत करत असे.

त्यावेळी पोत्यावर बसून हजामत केली जात असे. बबन दादांना हजामत करताना डोके सारखे इकडून तिकडे केलेले आवडत नसे. तसे केल्यावर ते डोक्याला एकदम जोरदार हिसका द्यायचे. आणि पाठीत जोरदार रट्टा मारायचे.

ते कटिंग करायला बसण्या आधी आम्हा मुलांना नाक शिंकरून येण्यास सांगायचे. 

कितीही नाक शिंकरले तरी कटिंग करताना खाली वाकल्यावर नाकातून शेंबड्याचा गठ्ठ्या खाली येऊ बघायचा कितीही वर ओढण्याचा प्रयत्न केला तरी तो बहाद्दर खाली खालीच जात असे. त्यामुळे नाकात सारखी वळवळ व्हायची. आणि यामुळे शरीराची सारखी हालचाल होत असे. 

आणि हेच बबन दादाला आवडत नसे. मग बबन दादा जोरदार पाठीत रट्टा ओढत असे. बेन पाच मिनिट सुद्धा न्याहार बसत नाही. बसतो का न्याहार ? परत जर हालचाल केली तर अजून रट्टे ओढील.

त्यामुळे बबन दादा कडे हजामत करायला आम्ही खूपच घाबरत असायचो. परंतु लवकरच गजानन कटिंग करायला शिकला आणि आमची एकदाची बबन दादाच्या जाचातून  सुटका झाली. 

लोक बबनदाला भात निघाल्यावर (सुगीच्या दिवसात) धान्यरूपात बलुते देत. हे बलुतं शक्यतो खळ्यावर दिले जात असे. बलुतं जमा करण्याचे काम हे विमल वहिनी करत असे. बलुतं गोळा करताना खुप अंधार पडे. परंतु शिवारातील सर्व पायवाटा विमल वहिनींच्या पायाखालच्या झाल्या होत्या. 

या खळ्यावरून त्या खळ्यावर धान्य गोळा करताना त्या माऊलीला खुप परिश्रम पडे. शिवाय घरचे काम, रानात जाऊन सारपण व वाळलेले शेण जमा करून घरी आणने हे काम विमल वहिनींकडे असे.

विमल वहिनी ही माझ्या आईच्या वयाची असल्यामुळे त्या दोघींची चांगली मैत्री होती. विमल वहिनींचे घर अतिशय टापटिप असे. भांडी स्वच्छ व लखलखीत असत. त्यांचा मुलगा गजानन हा आमच्या सर्व मुलांचा लाडका मित्र होता. त्याच्या बरोबर आम्ही सणावाराला एकमेकांकडे जेवत असू. शिवाय नेहमी कालवणाची देवाणघेवाण चालू असे.

बबनदा शिकले सवरलेले ले होते. पांढराशुभ्र लेंगा, पैरण व गांधी टोपी हा त्यांचा पेहराव होता.

बबनदा यांना नाटकांची खुप आवड होती. त्यांनी पुर्वी अनेक नाटकामध्ये भुमीका केल्या होत्या. शिवाय त्यांना अध्यात्मची देखील खूप आवड होती. 

शिवाय त्यांना पुस्तके वाचनाची सुद्धा प्रचंड आवड होती. त्याकाळात ते मुन्शी प्रेमचंद, बाबा कदम, पु.ल.देशपांडे, हरिवंशराय बच्चन यांची पुस्तके व कविता वाचत असत. त्यांचेकडुन माझे बाबा पुस्तके वाचण्यासाठी आणत असत. त्या पैकी कटी पतंग हे गुलशन नंदा यांचे पुस्तक मला चांगले आठवतेय. परंतू ते हिंदीत असल्यामुळे समजत नसे.

बबनदादा यांच्याकडे तोता मैना, गुलबकावली, अकबर बिरबल, तेनाली राम, अशी अनेक पुस्तके होती. या पुस्तकावर मध्ये सुरस अशा कथा असायच्या. कदाचित तिथूनच वाचनाची गोडी लागले असावी.

बबनदाला धार्मिक आवड सुद्धा होती. मंदोशी सारख्या खेडवळ गावात पहिल्यांदा त्यांच्या घरात हरिपाठ सुरू केला. 

संध्याकाळी सात वाजता गावातील सर्व तरूण मुले हरिपाठासाठी बबनदाच्या घरी जमत. ज्ञानदेव तळपे हे पखवाज वाजवत. बाकीचे टाळ वाजवत. 

आता गावात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह असतो. परंतू हरिभक्तीची मुहर्तमेढ ही बबनदांनी १९७९ साली रोवली आहे हे लोकांच्या ध्यानीमनी सुद्धा नाही.

श्रावण महिन्यात बबनदाच्या घरी हरिविजय,नवनाथ हया ग्रंथाचे पारायण असे. आम्ही ग्रंथाचे पारायण ऐकायला वडिलांबरोबर त्यांच्या घरी जात असू. ग्रंथ वाचण्याचे काम माझे वडील व बबनदा करत. तर त्याचा मराठीत अर्थ कै.बुधाजी तळपे समजून सांगत असत. ग्रंथ समाप्तीला मोठी मजा असे.

विमल वहिनीच्या बहिणीची मुले श्री.रामदास माठे (मा.सभापती पं.स. खेड) कधीतरी येत. परंतू त्यांचे बंधू श्री.लक्ष्मण माठे हे माझा डेहण्याचा मेव्हणा श्री.शंकर वनघरे याच्याबरोबर नेहमी मंदोशीला येत असे. त्यांना जळणासाठी सरपण पुरवण्याचे कामही विमल वहिनी करत असे.

बबनदाचा मुलगा गजानन हा माझ्या पेक्षा दोन वर्ग पुढे होता. मी. राघुजी आंबवणे, कै.मच्छिंद्र तळपे व कै.मारूती तळपे अशी आमची घनिष्ठ मैत्री होती. आम्ही दिवसभर एकत्र असत.

गजानन उत्तम चित्रकार होता. तो खुप छान चित्र काढायचा. विशेशतः गणपती आणि छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज यांचे उत्तम चित्र गजानन काढत असे. 

परंतु त्या काळात आमच्याकडे रंग नसत. गजानन कोळशापासुन काळा रंग, घेवड्याच्या पाना पासुन हिरवा रंग, रानभेंडीच्या फुलाच्या खालची गुठळी फोडून त्यातील पिवळा द्रव रंग म्हणुन वापरायचा. गेरू पासुन लाल रंग तयार करायचा. अर्थात हे सर्व गजाननच करायचा.

दहीहंडी, विटीदांडू, तिसका, चिपा, गोट्या, दडालपी,भारूड (नाटक)ओढ्यावर पोहणे इत्यादी खेळ आम्ही देहभान विसरून करत असत.

शिवाय पावसाळ्यात खुप पाऊस आल्यावर अंगणाततील वाहत जाणारे पाणी छोटा बांध घालुन आम्ही आडवायचो. जास्त पाणी साठल्यावर मधोमध फोडून द्यायचो. हे पाणी भरधाव वेगाने ज्ञानू तळपे यांच्या घरा पुढून पुढे जायचे. हे भरधाव वेगाने वाहत जाणाऱ्या पाण्यामध्येेे कगदाच्या बोटी व होड्या सोडणे आणि पाणी बघत राहणे  या सारखा आनंद नसे.

एकदा बबनदा रात्री प्रवास करत असताना त्यांच्या पायाच्या बोटाला सर्पदंश झाला. काही दिवसातच हळूहळू पायाची बोटे निकामी झाली. तेव्हापासून त्यांच्या एका पायात त्यांनी स्वतः बनवलेले कातडी बुट व एका पायात कोल्हापूरी वाहण असे. हातात काठी, काखेत कातडी बँग (धोपटी) अडकवून प्रवास करत असे.

त्याकाळात संपुर्ण गावचे बलुतं त्यांच्याकडे असल्यामुळे सराईला त्यांना धान्यरूपाने भरपुर बलुतं मिळत असे. काही तांदूळ विकून वर्षभराचा किराणा व कपडालत्ता इत्यादी संसारोपयोगी वस्तूंची ते बेगमी करत असत. 

परंतू सन १९८४ साली बबनदांनी अचानक त्यांच्या मुळगावी म्हणजे वाळद येथे जाण्याचा निर्णय घेतला, हे गजाननने आम्हाला सांगितले तेव्हा मला व राघुजी आंबवणे यांना अतीव दुःख झाले. गावातील सर्व लोकांनी वाळदला न जाण्याचा त्यांना सल्ला दिला. परंतू बबनदाचा निर्णय ठाम होते.

नाईलाजास्तव गावातील बरेच लोक,मी व राघूजी गजानन व त्यांच्या कुटुंबाला सोडवण्यासाठी शिरगाव पर्यंत गेलो होतो. गजाननआम्हाला सोडून जाणार याचे फार दुःख आम्हाला होत होते. 

इतक्यात एस.टी.आली आणि गजानन व त्याच्या कुटुंबाला आमच्या पासुन हिरावून धुरळा उडवीत दुर निघून गेली. राघूजी व मी ओक्साबोक्सी रडू लागलो आणि जड अंतकरणाने घरी परतलो.

गजानन पुढे फार जास्त शिकला नाही. सुरूवातीला राजगुरूनगर येथे केश कर्तनालयात नोकरी केली. 

नंतर त्यांने गावात स्वतःचे केशकर्तनालय उघडले आहे. गजानन आता केव्हातरी भेटतो. आहो जाहो व साहेब, साहेब बोलतो. मला ते आवडत नाही. 

मी त्याच्यामध्ये लहानपणीचा गजानन शोधू लागतो. माझा लहानपणीचा संवगडी. विवीध खेळ खेळणारा गजानन,. सुंदर चित्रे काढणारा गजानन,सणावाराला घरी जेवायला बोलवायला येणारा गजानन, सख्ख्या भावापेक्षा प्रेम करणारा गजानन.

परंतू आता गजानन दिसतो आहो जाहो करणारा. साहेब, साहेब म्हणनारा.त्याला कितीही बोललो तरी तो त्याचा हेका काही सोडत नाही.

गजाननचा मुलगा आता प्रवचन आणि कीर्तन करतो. 

गजाननचा धाकटा भाऊ नवनाथ यांचा मुलगा सुद्धा प्रवचन आणि कीर्तन करतो. नवनाथ देखील चाकण येथे त्यांच्या नाभिक व्यवसायात कार्यरत आहे. नवनाथ सुद्धा कुठल्यातरी नाभिक संघटनेचा पदाधिकारी आहे. आणि विशेष म्हणजे विमल वाहिनी हया नवनाथ कडे असतात.

लेखक :- रामदास तळपे


नवनाथ गायकवाड यांचा लग्न कार्यात फेटे बांधण्याचा व्यवसाय आहे.






गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस