अलिबागची संपूर्ण सफर

अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. रायगड जिल्ह्याचा संपूर्ण कारभार अलिबाग मधून चालतो.अलिबागला सुंदर आणि रमणीय समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे विविध रमणीय बीच तयार झालेले आहेत.

भरतीच्या वेळी समुद्रकिनारा बंद असतो, त्यामुळे भरती-ओहोटीची वेळ पाहूनच किनाऱ्यावर जावे लागते.

अलिबाग बीच: Alibag beach:

अलिबाग हा मुख्य समुद्रकिनारा आहे. तेथील समुद्रकिनारा हा सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यां पैकी एक आहे. तेथून जवळच कुलाबा किल्ला आहे. हा किल्ला जलदुर्ग या श्रेणीमध्ये येतो. या बीचवरून कुलाबा किल्ल्याचे अतिशय रमणीय दृश्य दिसते. तेथे पर्यटकांसाठी विविध जलक्रीडा आणि मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत.

कुलाबा जलदुर्ग :

अलिबाग या बीचवरून बोटीने कुलाबा किल्ल्यावर जाण्याची सुविधा आहे. ही एक उत्तम सागरी सफरच म्हणावी लागेल.

समुद्रकिनाऱ्यावरून बोटीने एक छोटीशी सफर तुम्हाला या लोकप्रिय किल्ल्यावर घेऊन जाईल जिथे इतिहासात अनेक लढाया झाल्या आहेत.

किहीम बीच: Kihim beach:

किहीम गावात वसलेला हा बीच उत्कृष्ट सौंदर्यासाठी ओळखला जातो. इथे शांत आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा नारळाच्या झाडांनी, हिरव्या पानांनी आणि रानफुलांनी व्यापलेला आहे. 

अतिशय सुरक्षित असा हा बीच आहे. किहीम बीच हा महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक मानला जातो. हा बीच अद्वितीय आणि रंगीबेरंगी सीशेलने भरलेल्या पांढऱ्या वाळूच्या स्वच्छ चादरीने व्यापलेला आहे.

अलिबाग पासून किहिम हे अंतर बारा किलोमीटर इतके आहे.

नागाव बीच: Nagav beach:

नागाव बीच हे ठिकाण अलिबाग पासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे. नागाव बीचचा समुद्रकिनारा हा साधारण तीन किलोमीटर इतका विस्तीर्ण आहे. येथील समुद्रकिनारा हा सुरूच्या झाडांनी व्यापलेला आहे. त्यामुळे हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.

पर्यटक येथे जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, बंपर राईड, बनाना बोट राईड, बोटिंग आणि पोहणे यांचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. 

या ठिकाणावरून सूर्यास्ताचे अतिशय विहंगम दृश्य पाहायला मिळते. त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी होते.

नागाव बीच येथून मुरुड बीच, अक्षी बीच, किहिम बीच, मांडवा बीच, अलिबाग बीच आणि काशीद बीच सारख्या आसपासच्या अनेक समुद्रकिनाऱ्यांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथून वेगवेगळे बीचवर जाता येते.

नागावातील भिमेश्वर व श्री विष्णू मंदिर हे पाहण्यासारखे आहे. शिवाय उंच उंच दीपमाळा देखील आहेत.

येथे पर्यटकांसाठी विविध जलक्रीडा आणि मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत. तिथे अनेक छोटे छोटे हॉटेल्स आहेत.

अलिबाग पासून नागाव हे 30 किलोमीटर इतके दूर आहे.

आक्षी बीच: Akshi beach:

अलिबागच्या जवळच अक्षय बीच आहे तेथे शांत आणि निसर्गरम्य परिसर आहे. विस्तीर्ण असा समुद्रकिनारा असून हा समुद्रकिनारा सुरूच्या झाडांनी व्यापलेला आहे. सुरुची आकर्षक वनसंपदा तिथे आहे.

अतिशय पुरातन अशा चालुक्य राजाच्या काळातील दीपमाळा येथे आहेत.अक्षी हे शिलाहार राजा केशी देव यांचा एक मराठीतील शिलालेख सापडला आहे. या शिल्पाला गधेगळ असे म्हणतात.

हा शिलालेख कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथील शिलालेखा पेक्षाही 100 वर्ष जुना आहे.

नारळाची झाडे:

येथील समुद्रकिनारा हा नारळाच्या झाडांनी व्यापलेला आहे. हे अतिशय निसर्गरम्य असे ठिकाण आहे. येथील समुद्राची वाळू ही सोनेरी रंगाची आहे. समुद्रकिनाऱ्या भोवती असलेले नारळाची झाडे आणि विस्तीर्ण सागर किनारा, सोनेरी वाळू आणि अथांग लाटा यामुळे पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात.

पक्ष्यांचे नंदनवन:

हा बीच पक्षी निरीक्षकांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथे विविध प्रकारचे स्थलांतरित पक्षी आणि स्थानिक पक्षी आढळतात. 

पक्षांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा हे ठिकाण अतिशय उपयुक्त आहे. पक्षी निरीक्षण करण्याचा छंद असलेले पर्यटक सुद्धा या ठिकाणी भेट देत असतात.

वरसोली बीच: Varsoli beach:

स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा आहे.

मांडवा बीच: Mandava beach:

हा एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे, जिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

मांडवा बीचवर मराठी आणि हिंदी चित्रपटांची नेहमी शूटिंग होत असते.

अलिबाग पासून मांडव हे अंतर सुमारे 12 किलोमीटर इतके दूर आहे.

चौल बीच: Chaul beach:

हा एक शांत आणि कमी गर्दीचा समुद्रकिनारा आहे. चौल ही शिलाहार राजांची राजधानी होती.

कुलाबा किल्ला: Kulaba Fort:

हा किल्ला जलदुर्ग या प्रकारात येतो. हा जलदुर्ग समुद्राच्या किनाऱ्यालगतच पण किनाऱ्यापासून दोन किलोमीटर अंतरावर, अरबी समुद्रामध्ये आहे. हा किल्ला समुद्र सपाटीस समतोल आहे. 

परंतु ज्यावेळेस समुद्राला भरती येते त्यावेळेस जलदुर्गच्या बुरजापर्यंत पाण्याच्या लाटा उसळतात. परंतु समुद्राचे पाणी मात्र आत येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधण्यात घेतला. परंतु त्यांच्या मृत्यूमुळे किल्ला अर्धवट राहिला. 

पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी सन १६८१ मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण केला.प्रसिद्ध असे कान्होजी आंग्रे यांचे आरमार याच किल्ल्यावर होते. त्यांचे समाधी स्थान याच किल्ल्यावर आहे.

किल्ल्यामधील विहिरीचे पाणी मात्र अगदीच गोड आणि चवदार आहे.

 

खांदेरी किल्ला: Khanderi Fort:

हा एक ऐतिहासिक भव्य जलदुर्ग आहे, जो समुद्रात बांधलेला आहे. थळ पासून या किल्ल्यावर बोटीने जावे लागते.

कनकेश्वर मंदिर: 

कनकेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध शिव मंदिर आहे, हे मंदिर टेकडीवर वसलेले आहे. अलिबाग पासून हे मंदिर 13 किलोमीटर इतके लांब आहे. 
श्री. परशुरामाने निर्माण केलेल्या उंच टेकडीवर हे मंदिर वसलेले असून अतिशय सुंदर असे मंदिरावर कोरीव काम केले आहे. या शिवलिंगावर सतत गंगेचा प्रवाह वाहत असतो.
मंदिरापर्यंत वर टेकडीवर जायला साडेसातशे पायऱ्या चढून वर जावे लागते.

विक्रम विनायक मंदिर (बिर्ला मंदिर):

अलिबाग पासून हे मंदिर अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. हे एक सुंदर मंदिर आहे, जे पर्यटकांना आकर्षित करते. हे मंदिर रेवदंड्या जवळील बिर्ला समूहाने संगमरवर दगडामध्ये बांधले आहे.

हे मंदिर भगवान विष्णू आणि त्यांची पत्नी देवी लक्ष्मीला समर्पित आहे. बिर्ला मंदिर अलिबाग हे एक स्थापत्यकलेचे चमत्कार आहे.

दत्त मंदिर: 

हे एक प्रसिद्ध मंदिर आहे.

चुंबकीय वेधशाळा: 

अलिबाग येथील ही एक प्रसिद्ध वेधशाळा आहे.कोणत्याही प्रकारचे चुंबकीय गुणधर्म नसलेल्या पोरबंदर स्टोन या दगडातून या इमारतींची निर्मिती करण्यात आली आहे. 

ही वेधशाळा आता इंटरमॅग्नेट या आंतरराष्ट्रीय प्रणालीचा एक भाग आहे. येथे घेतली गेलेली मोजमापे या प्रणालीशी सामायिक करण्यात येतात. 

भारतीय नौदल आणि वायुदलाच्यासाठीही इथल्या चुंबकीय मापनांचा उपयोग केला जातो. 

डीआय फ्लक्स मॅग्नेटोमीटर, ओव्हर हाउसर इफेक्ट प्रोटॉन स्केलर मॅग्ने टोमीटर, जेम सिस्टीम, टाईप जीएसएम ९०, प्रोटॉन प्रिसिशन मॅग्नेटोमीटर अशा विविध मोजणी यंत्रांनी ही वेधशाळा सुसज्ज आहे.

या वेधशाळेजवळ एक छोटे संग्रहालय देखील आहे. हे संग्रहालय पर्यटकांसाठी पाहण्यास उपलब्ध आहे.

परंतु आतील वेधशाळेत जाण्यासाठी पूर्व परवानगी घ्यावी लागते.

रायगड बाजार: 

अलिबाग येथे स्थानिक वस्तू आणि खाद्यपदार्थ मिळतात. 

अलिबागला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यादरम्यानचा काळ चांगला असतो, कारण हवामान आल्हाददायक असते. स्थळ ओवायशेत प्रकल्पामुळे या शहराची प्रचंड गतीने वाढ झालेली आहे. 

श्री.शशांक काठे यांचे खडूपासून निर्माण केलेले शिल्पाचे अनोखे संग्रहालय या ठिकाणी आहे.

सासवने:

अलिबागच्या जवळच सासवणे गाव आहे. या सासवने गावात शिल्पकार करमरकरांच्या शिल्पाकृतींचे संग्रहालय आहे. करमरकरांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये आणि पहिल्या मजल्यावर ही शिल्पकला साकारली आहे. दीडशे ते दोनशे शिल्पे येथे पाहायला मिळतात.

यामध्ये पशुपक्षी, प्राणी, माणसांची शिल्पे  इतकी अप्रतिम आहेत की ती पाहून आपण होतो. त्यामधील प्लेमेंट्स, शेफर्ड बॉय, मोर,आई आणि मूल व म्हैस ही शिल्पे अगदीच जिवंत भासतात.

सी फुड :

अलिबाग हे सी फूड प्रेमींसाठी स्वर्ग आहे. पोम्फ्रेट, सुरमई, कोळंबी, लॉबस्टर इत्यादी येथील मासे खुप चविष्ट आहेत.

रस्त्याच्या कडेला असलेल्या खाण्याच्या ठिकाणांनाही भेट द्या. कारण तिथेही उत्कृष्ट पद्धतीने माशांचे विविध प्रकार बनवले जातात.

लेखक :- रामदास तळपे.




डिगू तात्या

श्रावण महिना चालू आहे. कामानिमित्त आपण दूर शहरात राहत आहोत. परंतु आजही कधी कधी गावाकडील भारलेल्या दिवसांची आठवण येते. आणि मन भूतकाळात रमून जातं.

श्रावण महिना चालू झालेला असायचा. अनेक गावांमधून धार्मिक लोक वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथांचे पारायण करायचे. कुणी राम विजय, कुणी पांडव प्रताप, कुणी नवनाथ तर कोणी हरी विजय भक्ती विजय इत्यादी ग्रंथांचे पारायण करायचे.

रोज संध्याकाळी प्रत्येक अध्यायाचे पारायण होईल. लोक पारायण ऐकायला गर्दी करत.

पारायण संपल्यानंतर ग्रंथांची समाप्ती होत असे. आमच्या घरीही श्री नवनाथ ग्रंथांचे पारायण होत असे. त्यावेळी भागातील शिरगाव येथे असलेले प्रसिद्ध ब्राह्मण डीगु तात्या हे अनेकांना माहीत असतील. 

डीगु तात्या हे एकटेच मारुतीच्या मंदिरात राहायचे. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या वर असल्यामुळे त्यांना खाली काही दिसत नव्हते.असे असतानाही ते स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे. 

शिरगाव येथील किंवा पंचक्रोशीतील लोक इतर कामात मदत करायचे. शिरगाव येथे दूध घातल्यावर लोक मारुतीच्या मंदिरात डीगू तात्या यांच्याकडे गांजा ओढत बसत असत.

डीगु तात्यांना दिसत नसले तरी त्यांना श्री सत्य नारायणाचे सर्व अध्याय तोंडपाठ येत असत. ते सर्व प्रकारचे अभिषेक करत.अभिषेकाचे सर्व मंत्र त्यांना तोंडपाठ असत.

उंच शिडशिडीत बांधा, डोक्यावर बारीक केलेले पांढरे केस, लफेबाज धोतर, शिरगावात असतील तर अंगात बंडी किंवा बनियन घालत नसत. फक्त धोतर हाच त्यांचा वेश होता. परंतु बाहेर जर कधी जाणे झाले तर मात्र ते पेरण घालत असत.

सर्व भाग डिगू ब्राह्मणाला तात्या म्हणत असत. सर्व भाग त्यांची काळजी घेई. श्री सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी पारायण समाप्तीच्या वेळी डीगु तात्या यांना आठ दिवस आधीच आमंत्रण दिलेले असे. कधी कधी एकाच वेळी अनेक पूजा असत. भागातील सर्व लोकांना डीगू तात्या हेच ब्राह्मण पूजेसाठी हवे असत. परंतु सर्व ठिकाणी डीगू तात्यांना ते शक्य होत नसे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत असे.

सत्यनारायण पूजा

पारायण समाप्तीच्या दिवशी एक वेगळाच उत्साह प्रत्येकामध्ये ओसंडून वाहत असे. कुणी नदीचे पाणी आणायला जात असे, तर कुणी केळीचे खुंट आणायला जात असत. बेल आणायला अगदी नायफड किंवा खरोशी येथे जात असत. काहीजण पूजेचा बाजार आणण्यासाठी डेहणे येथे जात असत. 

घरातील मुली चाफ्याची, मोगऱ्याची, झेंडूची फुले आणून त्याच्या माळा बनवत असत. सर्व घर अगदी उत्साहाने फुलून गेलेले असे.

पूजेच्या दिवशी अगदी सकाळी सकाळी लोक नदीचे पाणी घेऊन येताना डीगू तात्याला घेऊन येत असत. घरी आल्यावर यजमान असलेला माणूस डीगु तात्यांची सर्वतोपरी काळजी घ्यायचा. 

गांजा आणि चिलीम यांची तजवीज केलेली असे. डीगू तात्या कधीही एकटे गांजा ओढत नसत. प्रत्येक गावात गांजा ओढणारे दोन तीन जण असतच. मग ते लोक आणि डिगू तात्या यांचा गांजा ओढण्याचा कार्यक्रम चालू होई.

पूजेच्या वेळी मात्र काहीही दिसत नसलेले डिगू तात्या पूजेची उत्तम मांडणी करत असत. त्यांनी पूजेची मांडणी केलेली पाहून लोकांना पूजेचे सार्थक केल्याचे समाधान मिळे. 

पूजा सुरू झाल्यावर डीगु तात्यांच्या मुखातून संस्कृत मधले मंत्र अगदी स्पष्टपणे फाड फाड बाहेर पडत. गणपती पूजन, दीप पूजन, घंटा पूजन व शंक पूजन केल्यावर मुख्य पूजेला सुरुवात होत असे. नवग्रहाचे मंत्रोपचार, कुलदेवतेचे मंत्रोपचार, ग्रामदेवता,ग्रहदेवता यांचे मंत्रोपचाराने घरचे वातावरण प्रसन्न होई. 

त्यानंतर श्री. सत्यनारायण महापूजा सुरू होई. नवीन कपडे घातलेले यजमान आणि त्यांची अर्धांगी पूजा करण्यासाठी बसत. दिगू तात्या त्यांच्याकडून काही मंत्र वदवून घेत असत. त्यांच्या मागे मंत्र म्हणताना यजमानांची तारांबळ होत असे.

महापूजा झाल्यानंतर डिगू तात्या श्री सत्यनारायणाचे अध्याय वाचण्यासाठी सुरुवात करत. सर्व अध्याय त्यांना तोंडपाठ असल्यामुळे ते बिन पोथीचे अध्याय धडाधड तोंडपाठ म्हणत.

तीन अध्याय वाचल्यावर डिगू तात्या पूजेसाठी आलेल्या लोकांना बुक्का लावण्यासाठी सांगत असत. कुणीतरी लहान मुलगा पोथी ऐकण्यासाठी आलेल्या लोकांना बुक्का लावत असे. बुक्का लावत असलेल्या पोराला आपण फार मोठे काम करत आहोत. याचे समाधान वाटत असे.

डिगू तात्यांना सर्व देवांच्या आरत्या तोंडपाठ असत. आरती झाल्यावर श्री.सत्यनारायणाचा प्रसाद सर्वांना वाटला जाई. त्यानंतर लोकांच्या जेवणासाठी पंगती बसत असत.

पूजेचे काम झाल्यावर डिगू तात्या हास्य उश्य करत. एका कोपऱ्यात जाऊन बसत असत. त्यानंतर त्यांना जेवायला वाढले जाई. घरामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक असे. तर बाहेर आलेल्या लोकांसाठी आमटी भात व शाकभाजी हे जेवण असे. लोक दोन दोन तीन तीन वाढ्या भात खात असत. पूजेचे जेवण हे अप्रतिमच असे. भात आमटी व शाकबाजी यांची आजही मला आठवण येते 

जेवणावेळी संपल्यानंतर तेथेच अंगणात भजनाला सुरुवात होई. इकडे दिगू तात्या आणि दोन-चार जण यांचा गांजा ओढण्याचा कार्यक्रम सुरू होई. 

त्या काळात भागातील लोक डिगू तात्या यांना देवाचा दर्जा देत होते. सर्व लोक डिगू तात्यांची आत्मीयतेने काळजी घेत असत. त्यांना सर्वतोपरी मदत करत असत. काही लोक दररोज जाऊन त्यांच्या चरणाचे दर्शन घेत असत. डिगू तात्या इतका मानसन्मान भागात कुणालाच मिळाला नसेल.

डिगू तात्या यांना दिसत नसले तरी भागातील सर्व लोकना ते ओळखत असत. लोकांच्या नुसत्या आवाजावरून ते नावानिशी बोलायचे. इतकी डीगु तात्या कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांना कोणताच गर्व,अभिमान नव्हता. ते सर्वांशी अगदी प्रेमाने बोलत असत. कधीही ते कुणाचा राग करत नसत. किंवा त्यांना कधी कुणी रागावलेले देखील पाहिले नाही.जेवणाबाबत देखील त्यांची काहीच तक्रार नसायची.देईल ते खायचे.अर्थात हे कुठे बाहेर पूजेसाठी गेले तर.अन्यथा ते स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे.

दगडू भराडी 

डिगू तात्या प्रामाणेच शिरगाव येथे दगडू भराडी हे अनेकांना माहीत असतील. कमी उंचीचे, कृश शरीर असलेले अगदीच किडकिडीत असे हे दगडू भराडी होते. अगदी जुना असा पांढरा पायजमा, त्यावर कोणत्याही रंगाचे शर्ट, डोक्यात मळकट परंतु धुतलेली टोपी, काखामध्ये पिशवी व उजव्या हातात डमरू आणि पायात वहाणा असा त्यांचा वेश होता.

दगडू भराडी हे शिरगांव येथे अगदी गवताच्या झोपडीत बायको आणि मुलींसह राहत असत. त्यांना तीन मुली होत्या. परिस्थिती अगदी गरिबीची होती. केवळ ते लोकांच्या आधारावर जगत होते. शिरगाव येथील लोकांनी त्यांना खूप आधार दिला होता. त्यांनी शेळ्या आणि कोंबड्या पाळलेले होत्या. त्यावर त्यांची गुजराण चालू होती.

भागातील प्रत्येक गावात जाण्यासाठी दगडू भराडी यांचे वार ठरलेले असत. अगदी सकाळी सकाळी दगडू भराडी गावात येत असत.गावात गेल्यावर प्रत्येकाच्या दारात जाऊन ते खंडोबाचे किंवा देवीचे गाणे म्हणत असत. त्यासोबत ते डमरू वाजवत. गाणी म्हणून झाल्यावर सौभाग्यवती स्त्रिया त्यांना सुपातून थोडे तांदूळ देत असत. तांदूळ पिशवीत घेऊन दगडू भराडी पुढच्या घराच्या दारात जात असत.

गावात लग्नकार्य झाल्यावर भरड घालण्याचे काम दगडू भराडी करत असत. त्यासाठीची सर्व तयारी दगडू भराडी करत असत. भरड घालण्याची मांडणी ही सत्यनारायणाच्या पूजेसारखीच असे. परंतु थोडी वेगळी पद्धत होती. भरडा साठी पूजेवर जसे जोडीने बसायचे असते. तसेच भरड घालण्यासाठी देखील.

भराड घालण्याचे काम सुरू झाल्यावर दगडू भराडी भोरगिरी पासून ते राजगुरुनगर पर्यंत असलेल्या गावातील देवांना गाण्यांमधून भराडा साठी आमंत्रण देत असत. त्यावेळी कोणत्या गावात कोणता देव आहे हे आम्हाला कळे.

त्या काळात प्रत्येक गावात प्रचंड माणुसकी होती. एकमेकांचा एकमेकांना आधार होता. लोक प्रत्येकाचा आदर करायचे. अनाथ आणि एकाकी असलेल्या लोकांना अगदी कुटुंबातील असल्यासारखे मदत करायचे. त्यावेळी पैसा नव्हता. परंतु माणुसकी ठासून भरलेली होती. त्यामुळे पैसा नसतानाही लोक आनंदाने जगत होती. कुणीही कशाचीही काळजी करत नव्हते.

 रामदास तळपे 



बारा बलुतेदारांचा समग्र इतिहास

स्वतंत्र पूर्व काळात खेडेगावांना अनन्य साधारण महत्त्व होते. भारतातले प्रत्येक खेडेगाव हे स्वयंपूर्ण होते. गावातल्या गरजा गावातच भागत असत. पूर्वीची समाज व्यवस्था अतिशय श्रेष्ठ व उत्तम दर्जाची होती.

गावागावांमध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहायचे. व समाज व्यवस्थेने नेमून दिलेले काम चोख पार पडत असायचे. बलुतीदार पद्धत ही गावचा कणा होती.

प्रत्येक छोट्या गावात सुतार, लोहार, न्हावी, चांभार या समाजाचे लोक असायचेच. त्यांना मुख्य बलुतेदार म्हणायचे. परंतु गावे जर मोठी असतील तर त्यामध्ये पाणभरी कोळी, तेली, तांबोळी, कुंभार,महार, परीट, गुरव व मातंग असे विविध समाजाचे लोक राहत असत. त्यांनाच बारा बलुतेदार असेही म्हणत असत.
शिवाय गावामध्ये कोष्टी, साळी, वाणी, असे अनेक जाती-धर्माचे लोक राहत असत.

बलुतेदारी पद्धत:

बलुतेदारी पद्धत ही एक प्रकारची वस्तुविनिमय प्रणाली होती. यात, बलुतेदार त्यांची कामे करत असत आणि त्या बदल्यात त्यांना शेतकरी धान्याच्या किंवा इतर वस्तूंच्या स्वरूपात मोबदला देत असत. यालाच बलूतेदारीं पद्धत असे म्हटले जाते.

बलुतेदारीचे महत्त्व:

बलुतेदारी पद्धत, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग होती. यामुळे, प्रत्येक व्यक्तीला त्यांची गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवा मिळत होत्या. व गावातल्या गरजा गावातच भागवल्या जात होत्या. प्रत्येक गाव हे स्वयंपूर्ण होते.

या बलुतेदारांमध्ये उच्च जाती सुद्धा अस्तित्वात होत्या. त्यापैकी सुतार आणि सोनार या जाती ब्राह्मणांच्या खालोखाल समजल्या जात असत.ब्रह्मणा नंतर कोण श्रेष्ठ यावरून सोनार आणि सुतारांच्या लढाया झाल्याची उदाहरणे आहेत.

परंतु 1857 मध्ये इंग्रजांचा भारतामध्ये प्रवेश झाला. त्यावेळी अनेक शोध लागत होते. त्यातच इंग्रजांनी भारतात नवनवीन कारखाने सुरू केले. त्यामुळे कामगारांची मोठ्या प्रमाणात बचत झाली.

कारखान्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तू विक्रीला उपलब्ध झाल्या. घाऊक स्वरूपात माल उपलब्ध होऊ लागला. इंग्रज सरकारने नवनवीन नाणी आणि नोटा चलनात आणल्या. त्यामुळे 
धान्या ऐवजी पैशाला महत्त्व आले. लोक पैसे देऊन वस्तू विकत घेऊ लागले.

कारखान्यामुळे अनेक व्यवसाय, धंदे बंद पडत चालले. ग्रामीण भागातील बलुतेदार पद्धत ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली व्यवस्था मोडून पडली. अनेक लोक बेरोजगार झाले.

परंतु तरीही अजून काही गावागावांमध्ये बलुतेदारी ही पद्धत अजूनही टिकून आहे हे ही विशेष.

सुतार:

गावात सर्वात जास्त महत्त्व हे जर कुणाला असेल तर ते सुतारांना होते. प्रत्येक गावात शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणात होता. आणि या शेतकऱ्यांचा आणि सुतारांचा  सर्वात जास्त संपर्क असायचा. तो म्हणजे शेतकऱ्यांची हत्यारे तयार करणे आणि त्यांची दुरुस्ती करणे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना पाभार, कुळव, नांगर, रुमणे, जुगाड, इत्यादी सर्व प्रकारच्या साहित्यांची गरज भासत असे हया सर्व गरजा सुतार पुरवत असत. म्हणून सुतारांना सर्वात जास्त बलूते मिळत असे. हे बलुते धान्य स्वरूपात मिळत असे.

गावच्या लोकसंख्येनुसार धान्यरूपी बलुते मिळत असल्यामुळे सुतार लोक गरजेपुरते धान्य ठेवून उर्वरित धान्य मोठ्या गावातील बाजारपेठेत विकत असत. त्यामुळे त्यांच्याकडे नगदी पैसे सुद्धा उपलब्ध असतात.
गावोगावी अनेक सुतारांना जमिनी होत्या. काही सुतार हे जमीनदार सुद्धा होते. अजूनही काही गावात सुतारांना जमिनी आहेत. या जमिनी त्यांनी सांप्रतच्या  काळात विकत घेतलेले होत्या.

शेतकऱ्यांचे अवजारे दुरुस्तीचे काम झाल्यानंतर सुतारांकडे वेळच वेळ असे. त्यावेळी ते नवीन घराचे लाकडी काम, मंदिरांचे लाकडी काम, खटार गाड्या तयार करणे, विविध कला कसुरीच्या वस्तू तयार करणे, लाकडी पेटी, टेबल खुर्च्या, लाकडी कपाट, भिंतीमधील अलमारी, हांडे ठेवायची घडवंची, भांडी ठेवण्याची मांडणी अशा इतरही वस्तू ते बनवून त्याची ते स्वतंत्र मजुरी घेत असत. पूर्वी लोक विविध देवांच्या लाकडांच्या विशेषतः चंदनाच्या सुंदर आणि सुबक मूर्ती सुद्धा बनवत असत.
अनेक सुतार हे सावकारकी सुद्धा करत होते.
जगाची निर्मिती केलेल्या विश्वकर्माला ते आपला देव मानतात. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातील सर्व देवतांच्या ते पूजाअर्चा करतात. विठ्ठलाची ते निसिम भक्त आहेत.

सुतारांची हत्यारे :

सुतारांकडे करवत, वाकस, रंधा, किंकरी, पटाशी, हातोडा, गिरमिट इत्यादी हत्यारे असत.

ब्राह्मणांच्या नंतर सुतार हे सर्वश्रेष्ठ समजत असल्याने प्रत्येकाच्या गळ्यात तुळशीच्या माळा असत. त्यावेळी ते कोणताही मांसाहार करत नसत. सुतार यांच्या अनेक उपजाती आहेत. त्यापैकी पांचाळ सुतार ही उपजात प्रसिद्ध आहे.

सुगीच्या दिवसात शेतकऱ्यांकडून सुताराला पोते भर भात व एक भाताचा भारा आणि रब्बी हंगामात जे कडधान्य पिकेल त्यापैकी शेर दोन शेर धान्य बलुते म्हणून द्यावे लागत असे.

सुतारांची घरे ही गावातील इतर घरांपेक्षा छोटी असत. त्यामुळे सुतारांची घरे चटकन ओळखता येत. सन 1970 पर्यंत सुतारांची लग्न घराच्या आड्याखाली होत असत. इतर सर्व प्रथा परंपरा या हिंदू धर्माप्रमाणेच सुरू होत्या.

 न्हावी:

सुतारा नंतर बलुतेदारीमध्ये नंबर लागायचा तो न्हव्याचा. न्हावी हे गावातील लोकांचे हजामतीचे काम करत असत. त्याबद्दल त्यांना धान्यरूपात बलुती दिले जाई. सुतारा नंतर सर्वात जास्त बलुते हे न्हव्यांना दिले जात असे. सहा पायल्या भात व सुगीच्या हंगामात दोन शेर कडधान्य देण्यात येत असे.

त्याशिवाय त्यांना लहान मुलांचे जावळ काढणे व लग्नकार्यात नवरदेवाची चूच करणे (दाढी करणे) हा लग्न समारंभातील महत्त्वाचा धार्मिक विधी होता. यासाठी त्यांना पैसे रुपी विडा द्यावा लागत असे. हा विडा प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे असायचा.

शिवाय दशक्रियेच्या वेळी नदीवर भावकीची हजामत करावी लागायची.
त्यासाठी सुद्धा त्यांना पैसे रुपी विडा द्यावा लागायचा.
हजामतीचे वार हे ठरलेले असत. प्रत्येकाच्या दारात पोते अंथरून त्यावर बसून हजामत केली जात असे.

धोपटी व त्यातील साहित्य :

नाव्ह्याकडे एक चामड्ड्याची पिशवी असायची. त्या पिशवीला धोपटी असे म्हणत. या धोपटीमध्ये न्हाव्याचे साहित्य असायचे. वेगवेगळ्या दोन लोखंडी कात्री, वस्तरे, घोड्यांच्या केसापासून बनवलेला ब्रश, वस्तऱ्यांना धार लावायचा दगड, केसांना आणि दाढीला पाणी लावण्यासाठी छोटी वाटी, साबू, वेगवेगळे  कंगावे, छोटा आरसा इत्यादी साहित्य असायचे. 
अनेक न्हावी हे सांप्रतकाळात वतनदार देखील होते. इंग्रज काळात त्यांना गावागावांमधून जमिनी वतन म्हणून दिलेल्या होत्या. या जमिनींना नावठिका असे म्हणत. अजूनही काही गावात या जमिनींना नावठिका असेच म्हणले जाते.

त्यावेळी न्हावी देखील मिळालेले बलुते रुपी धान्य स्वतःसाठी ठेवून उर्वरित धान्य ते मोठ्या गावच्या बाजारपेठेत विकत असत. शिवाय त्यांच्याकडे त्यावेळी अनेक सुगंधित तेले असायची. केस काळे करण्याच्या मेहंदी असायची. 

गावातील श्रीमंत लोकांसाठी ही सेवा पुरवावी लागे. त्याबद्दल त्यांना वेगळे पैसे द्यावे लागत असत. त्यामुळे न्हावी समाज हा देखील त्यावेळी बऱ्यापैकी श्रीमंत होता. काही न्हावी हे सावकारी देखील करत असत. 

अनेकांकडे येण्या जाण्यासाठी घोडे असत. त्यावर बसून ते गावातील वाड्या वस्तीमध्ये हजामतीसाठी जात असत.

जीवा महाला :
शिवाजी महाराजांचे मावळे जिवा महाला व शिवा कशािद हे दोघेही न्हावी होते. छत्रपती शिवाजी महाराजानी प्रताप गडाच्या पायथ्याशी अफझलखानास मारल्यावर खानाच्या 'सय्यद बंडा' या रक्षकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा जोरदार वार केला.

तेव्हा जिवा महालाने दांडपट्टीच्या एका घावात सय्यद बंडाला यम सदनाला पाठवले. व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले.

संत सेना महाराज न्हावी:

प्रसिद्ध संत सेना महाराज हे न्हावी होते. ते विठ्ठलाचे परमभक्त होते. त्याने अनेक 110 अभंग व गवळणी लिहिलेल्या आहेत. त्यापैकी खालील अभंग.

आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ।।

विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ।।
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ।।
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ।।

मुंबईस पहिले हेअर कटिंग सलून लोणकर व बडनेरकर यांनी काढले. नंदन कालेलकर हा लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात सलून काढणारा पहिला 'न्हावी' होय.

चांभार :

न्हाव्या नंतर बलुतेदारांमध्ये तिसरा नंबर हा चांभाराचा असे. चांभाराला गावातील लोकांची पायताणे दुरुस्त करण्याचे काम करावे लागे. यामध्ये वहाणा, चेपल्या, बुट इत्यादी दुरुस्ती करण्याचे काम करावे लागे.

चांभाराकडे आरी, रापी, वहणा शिवायचा दाभन, चामड्याचा दोरा, कमावलेले चामडे, छोट्या चुका, वाहनाचे चामडे नरम करण्यासाठी ते पाण्यात ठेवावे लागे. त्यासाठी पाणी साठवण्याचे लाकडी छोटे कुंड, लोखंडी स्टॅन्ड इत्यादी साहित्य चांभाराकडे असायचे.

चांभाराचेही वार ठरलेले असायचे. त्या विशिष्ट वारी येऊन पायताणांची दुरुस्ती होत असे.
यासाठी चांभाराला न्हाव्याच्या खालोखाल चार पायली धान्य व सुगीच्या वेळी पसाभर कडधान्य बलुते म्हणून दिले जाई.
शेतकऱ्यांच्या बैलांना बडवण्याचे काम सुद्धा चांभाराला करावे लागे. शिवाय जनावरांच्या पायाच्या खुरातील काटे सुद्धा चांभार काढत असे. त्यासाठी मात्र त्याला काही पैसे द्यावे लागत असत.
काही चांभार लोक नवीन चपला तयार करून ते रोख पैसे घेऊन विकत असत.

संत रोहिदास हे त्यांच्या समाजातील संत विठ्ठलाचे निसिम भक्त होते. त्यांचे अनेक अभंग आजही प्रसिद्ध आहेत.

लोहार :
प्रत्येक गावात लोहार हा घटक सुद्धा बलुतेदारीचा प्रमुख कणा होता.

गावामध्ये लोहराचे एक घर असायचे. त्याच्या दारात मोठा चामड्याचा भाता असायचा. पुढे एक दांडा असायचा. हा दांडा हलवल्यावर भात्याच्या चुली जवळील नळीमधून हवा बाहेर पडायची. व तेथे ठेवलेल्या कोळशा मधून ज्वाला बाहेर पडायच्या.

सुगीच्या दिवसापूर्वी गावातील शेतकऱ्यांच्या कोयते, विळे आणि कुऱ्हाडीना धार लावून देण्याची प्रमुख काम लोहाराला करावे लागत असे.
त्याचप्रमाणे शेतीच्या लोखंडी साखळीला जोड लावून देणे, खटार गाडीच्या धावा बसवून देणे, टिकाव, फावडे, पहारी, कुडावने शेवटण्याचे काम लोहाराला करावे लागत असे.
सुगीच्या दिवसापूर्वी लोहाराच्या दारात शेतकऱ्यांची खूपच वर्दळ असायची.

लोहाराला सुद्धा चार पायली धान्य आणि शेरभर कडधान्य बलुते म्हणून देण्याची पद्धत होती. 
खटार गाडीच्या धावा बसवण्याचे काम, तसेच नवीन विळे, कोयते, कुऱ्हाडी बनवून तो स्वतंत्र पैसे घेऊन विकत असे.
लोहार जमातीचे महत्व:

लोहार समाजाने भारतीय संस्कृतीत नेहमीच एक महत्त्वाचा घटक म्हणून काम केले आहे. त्यांनी समाजाला आवश्यक असलेल्या अनेक वस्तू तयार केल्या आहेत. भाता,ऐरण, घन, हातोडी, सांडशी, टाकी, छन्नी अशी हत्यारे असायची.
उदाहरणे:
लोहार समाजाने बनवलेल्या वस्तू: विळे, कोयते, कुदळी, पहारी, भांडी, दरवाजे, खिडक्या, इत्यादी. 
लोहारांचा सुद्धा देव विश्वकर्माच मानला जातो.
पोटजाती:
लोहार समाजात अनेक पोटजाती आहेत, जसे की गाडी लोहार, पांचाळ, नालबंदी, घिसाडी. 

लोहार समाजापुढील आव्हाने:

लोहार समाज महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेला आहे, विशेषतः ग्रामीण भागात. 

आधुनिक काळात औद्योगिकीकरणामुळे लोहार समाजाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. अनेकजण आता हा व्यवसाय सोडून इतर कामे करत आहेत. 

संरक्षण:
लोहार समाजाला त्यांच्या परंपरागत व्यवसायासोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून टिकून राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

मोठमोठ्या गावांमध्ये मात्र परिस्थिती वेगळी असे. तिथे अनेक जमीनदार, श्रीमंत लोक राहायचे. त्यामुळे त्यांना सेवा देण्याची गरज भासायची. त्यासाठी अजून काही बलुतेदार मोठ्या गावांमध्ये असायचे.


कुंभार:
कुंभार समाज फार प्राचीन काळापासून आहे. ऋग्वेदातही त्यांचा उल्लेख आढळतो. अगदी सिंधू संस्कृतीमध्ये अनेक गाडगी, मडकी सापडली. ती कुंभारानीच बनवली होती. याचा अर्थ कुंभार ही जमात किती जुनी आहे याचा बोध होतो.

कुंभार हे सुद्धा 12 बलुतेदारंपैकी एक होते. वर्षाकाठी ते गावातील लोकांना गाडगी, मडकी, संक्रातीची सुगड, बैलपोळ्याला मातीचे बैल,चुली इत्यादी सेवा पुरवत असत. त्याबद्दल त्यांना बलूते म्हणून धान्य देण्याची प्रथा होती.

त्यावेळी गावागावांमध्ये मोठमोठ्या पाणपोई असत. या पाणपोई म्हणजेच मोठमोठे रांजण. हे रांजण गावातील चौकात चौथर्‍यावर घट्ट पुरलेले असत. गावात येणारे अनोळखी लोक ऐपतीप्रमाणे त्यात नाणी टाकून पाणपोईचे पाणी पीत असत. हे रांजण सुद्धा कुंभारांना पुरवावे लागत.

प्रत्येक मोठया गावामध्ये कुंभार अळी असे. प्रत्येक कुंभाराकडे अनेक गाढवे असत. या गाढवावरून माती वाहण्याचे प्रमुख काम करावे लागे. त्या मातीपासून ते वेगवेगळ्या मातीच्या वस्तू बनवत असत.
त्यावेळी काही गावांमध्ये रस्ते नसत. त्यामुळे बाजाराचे साहित्य गावातील बाजारपेठेपर्यंत आणण्याचे काम कुंभाराची गाढवे करत असत. त्याबद्दल कुंभारांना मजुरी मिळे. शिवाय अनेक कुंभारांच्या वीटभट्टी असत.
त्या वेळच्या विटा ह्या खूपच लहान होत्या. परंतु अद्यापही या विटांचे बांधकाम मजबूत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

अनेक कुंभारांकडे इमारतींसाठी चुना बनवण्याचे घाणे होते. गावाच्या बाहेर हे दगडी घाणे असतात. यामध्ये विशिष्ट प्रकारची वाळू भरडून बारीक करावी लागे. व त्यापासून चुना निघत असे. हा चुना अतिशय पक्का असा होता. अजूनही आपल्याला चुन्याच्या भिंती पाहायला मिळतात.
या चुन्याचा उपयोग इमारती, शेताचे बांध, पाण्यावरच्या मोटांचे थारोळे, विहिरी, इंग्रज काळातील रस्त्यावरील पूल इत्यादींसाठी हा चुना वापरत असत.

त्यावेळी अनेक कुणबी लोक भाद्रपद चतुर्थीला गणपती बसवत. या गणपतीच्या मूर्ती पुरवण्याचे काम सुद्धा कुंभारांना करावे लागे. परंतु त्यावेळी गणपतींना रंग काम करण्याची पद्धत नव्हती. फक्त मूर्ती बनवून त्याची पूजा होत असे. हे गणपती वितभर इतक्या उंचीचे असत.
त्यामुळे बलुतेदारांमध्ये कुंभार सुद्धा बऱ्यापैकी सधन होते.

पोट जाती:
कुंभार समाजात खुंटकटी आणि प्रजापती अशा दोन मुख्य पोटजाती आहेत. 

देवता:
कुंभार समाजाच्या काही प्रमुख देवतांमध्ये पांचानेपीर, भवानी, सांगई, सीतला, आणि हर्दिया यांचा समावेश होतो. 

संत:
संत गोरा कुंभार हे कुंभार समाजातील एक महत्वाचे संत मानले जातात. ते वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते.
कुंभाराचे लाकडी चाक आपणा सर्वांना माहीतच असेल या चाकावरच कुंभार मातीच्या गोळ्याला विविध आकार देऊन वस्तू बनवत असे.


तेली:
प्रमुख मोठ्या गावामध्ये तेली समाजाचे लोक राहत असत. त्यांना तिळवण तेली असे म्हणत.
गावातील ह्या तेल्याकडे मोठ्या दगडातील गोल गरगरीत असा दगडी घाणा असायचा. त्या घाण्याच्या कडेकडेने सहा इंच खोल व सहा इंच लांब असा गोल पाट असायचा. त्यावर मोठी दगडी तळी असायची. या पाटामध्ये शेंगदाणे, खुरासनी, सूर्यफुलाच्या बिया, किंवा इतर तेलबिया ठेवून ही दगडाची तळी बैलाच्या सहाय्याने सतत फिरवायची. सतत तळी फिरवल्याने या बिया मधून तेल बाहेर पडायचे.
प्रत्येक शेतकऱ्यांकडे त्यावेळी भुईमूग, खुरसणी, सूर्यफूल, इत्यादी तेलबियाची शेती केली जात असे. त्यामुळे तेली लोकांना वर्षाकाठी धान्यरूपाने बलुते मिळायचे. शिवाय तेल बियांचा हा चोथा तेली लोक पेंड म्हणून विकत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे मिळत असत.

सामाजिक रचना:
तेली समाजात विविध सामाजिक आणि धार्मिक परंपरा आहेत.
संघटना:
तिळवण तेली समाजाच्या पुणे, अकोला आणि इतर ठिकाणी सामाजिक संघटना आहेत. या संघटना समाजाच्या हितसंबंधांचे रक्षण करतात आणि विविध कार्यक्रम, वधू वर मेळावे इत्यादी आयोजित करतात,  

विवाह:
तिळवण तेली समाज विवाह आणि नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करतो. ते विवाह जुळवण्यासाठी वधू-वर मेळावे आयोजित करतात.

संत परंपरा:
या समाजात संत कबीर आणि संत संताजी जगनाडे महाराज यांचा प्रभाव आहे. 

महापुरुष:
महाराणा प्रताप आणि भामाशाह यांना ते आपले महापुरुष मानतात.

भगवान श्री शनेश्वराची तेली समाज पूजा अर्चा करतात. आजही अनेक मंदिरामध्ये तेली समाज हाच श्री शनेश्वराचा पुजारी आहे.

तांबोळी:

त्यावेळी मोठमोठ्या गावांमध्ये तांबोळी ही जमात सुद्धा बलुतेदार म्हणून अस्तित्वात होती.
त्यावेळी अनेक धार्मिक सण, वृत्तवैकल्य, पूजा, उत्सव, यात्रा, चतुर्मास इत्यादी धार्मिक कार्यासाठी नागिलींच्या पानांची मोठ्या प्रमाणात गरज भासायची. त्याचप्रमाणे अनेक सण समारंभात, लग्नकार्यांत विड्याची पाने खाण्याची प्रथा होती.
त्यासाठी विड्याची पाणी पुरवण्याचे काम हे तांबोळी यांना करावे लागत असे.
यासाठी त्यांना वर्षभरातून एकदा धान्यरूपाने बलुते द्यावे लागत असे.

मोठ्या गावांमध्ये तांबोळी समाजाच्या पानपट्टी देखील असायच्या. शिवाय ते धार्मिक कार्यात, लग्नकार्यात, यात्रा जत्रांमध्ये ताशा वाजवण्याचे काम करत असत. त्यासाठी त्यांना ठराविक पैसे मिळत असत.
तांबोळी समाज हा हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजात पाहायला मिळतो.

पाणभरी कोळी:

पानभरी कोळी हे लोक मोठ्या गावांमध्ये असत. त्यावेळी चौका चौकात अनेक पानपोई असत. या पानपोई मध्ये दररोज ताजे पाणी भरून ठेवण्याचे काम पानभरी कोळी यांना करावे लागे.
 
शिवाय लग्न कार्यामध्ये संपूर्ण लग्न होईपर्यंत ज्या घरात लग्न आहे तिथे पाणी भरण्याचे काम हे पाणभरी कोळी यांना करावे लागे.
यासाठी वर्षाकाठी त्यांना धान्य स्वरूपात बलुते द्यावी लागत असे.

प्रसिद्ध लोकप्रिय मराठी अभिनेते दादा कोंडके हे याच समाजाचे. ज्यांनी दीर्घकाळ महाराष्ट्र हास्यसागरात बुडवला.

गुरव:

त्या काळात अनेक गावागावांमध्ये शंकरांची मंदिरे होती. शंकराची दररोज पूजा अर्चा करण्याचे काम गुरुवाना करावे लागे. त्याचप्रमाणे मंदिराची संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी ही सुद्धा गुरवाची होती.

त्याचप्रमाणे लग्नकार्यात आलेल्या वऱ्हाडी लोकांसाठी किंवा इतर धार्मिक कार्यक्रमासाठी पानांच्या पत्रावळी तयार करण्याचे काम सुद्धा गुरुवाना करावे लागत असे. त्यासाठी पहाटे उठून रानात जाऊन त्यांना पळसाची, वडाची, किंवा चांद्याची पाने तोडून आणावी लागत असत. 
संध्याकाळी लवकर जेवण उरकून गुरवांचे सर्व कुटुंब पत्रावळी तयार करण्यासाठी बसलेले असे.

गुरुवांना सुद्धा अनेक गावागावांमध्ये इंग्रज काळात जमिनी दिलेल्या होत्या. त्यामुळे अनेक गुरव हे शेती सुद्धा करायचे, जनावरे पाळायचे. काही गुरव हे सावकार देखील होते.
संत काशिबा महाराज आराध्य दैवत :

संत श्रेष्ठ काशीबा महाराज गुरव हे गुरव समाजाचे आराध्य दैवत असून काशीबा महाराजांना ते आराध्य दैवत मानतात.

भगवान शंकराचे पुजारी म्हणून गुरव समाजाला मान आहे. शंकराची पूजा गुरुवानीच करावी असे वेदांमध्ये सांगितले आहे.
अनेक गुरव समाजातील लोक गावातील नाटकांमध्ये भाग घेत असत.

महार : (बाबासाहेबांनी धम्मदीक्षा देण्याच्या पूर्वीचे)
पूर्वी प्रत्येक गावात महार समाजाचे लोक राहत असत. ते गावात जर कुणाचा मृत्यू झाला तर त्या माणसाच्या नातेवाईकांना सांगावा देण्याचे काम करत असत.

त्याचप्रमाणे गावातील मेलेले जनावर दूर ओढून नेण्याचे काम ते करत असत.
त्यावेळी हा समाज खूपच उपेक्षित होता.
त्यांना सुद्धा वर्षाकाठी बलूते देण्याची पद्धत होती.

त्यांच्याकडे शेती असल्यामुळे ते शेती करत असत. बैल, म्हशी गाय, गुरे पाळत असत. त्यांना इंग्रज काळात इंग्रजांनी शेतजमिनी सुद्धा दिलेल्या होत्या. त्याला महार वतन, हडकी हाडवळा असे म्हटले जाई. 

परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध दीक्षा दिल्याने त्यांनी नवबौद्ध हा धर्म स्वीकारला. आणि हे सर्व बंद केले. आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यात सामाजिक सुधारणा झाल्या. 

अजूनही उपेक्षित असलेल्या समाजावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कृपा छत्र आढळ आहे. धम्म परिवर्तन करणारे व उपेक्षितांना समाजाच्या बरोबरीने वागायला भाग पाडणारे आंबेडकर हे परमेश्वरच मानले जातात.

मातंग :
गावा गावामध्ये विविध कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या संदर्भात दवंडी देण्याचे काम मांग करत असत.

त्याशिवाय चर्मकार समाजातील लोकांना मदत करण्याचे काम देखील ते करत असत.

दर महिन्याच्या अमावस्येला त्यांच्या स्त्रिया गावातील घराघरांमध्ये येऊन ताजे अन्न घेऊन जात असत. ही एक धार्मिक प्रथा होती.

त्याशिवाय दसरा आणि दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी प्रत्येक घराघरांमध्ये झाडू देण्याचे काम सुद्धा हे लोक करत असत. त्याबद्दल त्यांना वर्षाकाठी धान्य स्वरूपात बलुते द्यावे लागत असे.

प्रसिद्ध ग्रामीण कथाकार आणि समाज सुधारक प्रसिद्ध शाहीर असे अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे होते. परंतु त्यांनी संपूर्ण वंचित असलेल्या समाजासाठी लढा दिला. आणि वंचित समाज प्रसिद्धीच्या झोतात आणला. 

महाराष्ट्र शासनाने त्यांना अनेक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अण्णाभाऊ साठे महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा एक अंगीकृत उपक्रम आहे. ज्यामध्ये वंचित समाजाला योजनेचा लाभ मिळतो.

त्याशिवाय ते तमाशामध्ये हलगी किंवा डफ वाजवण्याचे काम सुद्धा करत असत
प्रसिद्ध अभिनेत्री उषा चव्हाण या मातंग समाजाच्या आहेत.

परीट :
परीट (किंवा धोबी) हा बारा 
बलुतेदारां पैकी एक आहे. एकूण बलुते दारांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकाच्या बलुते दारांत गणला जातो. ह्या समाजात खंडोबा, मरीआई, येडाबाई, भवानी देवी, भैरोबा, म्हसोबा या दैवतांची पूजा मोठ्या प्रमाणात होते. 

परीट हा एक मेहनती बलुतेदार आहे. त्याला वर्षभर काम असायचे. परीट समाज हा आक्रमक क्षत्रिय लढवय्या व रांगडा समाज आहे.

कुस्ती खेळण्यात हा समाज पटाईत होता. धोबीपछाड हा डाव परटानीच शोधला आहे. 

घरोघरीचे कपडे गोळा करून त्यांवर बिब्याच्या तेलाने खुणा करून आणि ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे परटाचे काम. 

विशेषतः कुणब्यांच्या व गावातील इतर लोकांचे घरी, लग्नाच्या व सोयर सुतकाच्या वेळी कपडे धुण्याचे व कपड्यांना इस्त्री करण्याचे काम परीट करीत असे. यासोबतच लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चांदवा (चादरी) धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा परटाकडे होती.
संत शिरोमणी स्वच्छतेचे दूत म्हणजेच संत गाडगेबाबा हे परीट समाजाचे होते.

परीट समाजातील मराठी चित्रपट कलाकार:

संध्या शांताराम:

संध्या हया एक प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या पत्नी होत्या. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा झनक झनक पायल बाजे, पिंजरा येथे चित्रपट प्रसिद्ध आहेत.

सई लोकूर:
सई लोकूर हया एक अभिनेत्री आणि मॉडेल आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

तेजस्विनी सरकार:
त्या एक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सायली संजीव:
त्या एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे, आणि त्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत.
 
याशिवाय, अनेक कलाकार या समाजातले आहेत, जे चित्रपटांमध्ये काम करतात, पण त्यांची ओळख परीट समाजातील कलाकार म्हणून फारशी समोर येत नाही.

शहरीकरण आणि यांत्रिक धुलाईच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक परीट व्यवसायावर परिणाम झाला आहे, पण तरीही समाज नवीन बदल स्वीकारून पुढे वाटचाल करत आहे 

याशिवाय सोनार, कोष्टी, साळी, रंगारी, जोशी, पटवारी यांनाही बलूते दार म्हणून समजले जात होते. परंतु ते तितकेसे खरे नाही. 

बलुतेदारी ही प्रथा भारतीय ग्राम संस्कृतीचा आदर्श कणा होती. त्या काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक प्रकारचे धान्य, फळभाज्या, पालेभाज्या पिकत असत. शेतकरी हे सर्व स्वतःसाठी ठेवून उर्वरित बलुतेदारांना देत असत. व त्या बदल्यात ते विविध प्रकारच्या सेवा त्यांच्याकडून घेत असत.

त्याचप्रमाणे बलूतेदारी करताना काही सेवा ह्या पैसे देऊन करायला लागत असत. त्यामुळे बलुतेदारी आणि पैसे असे दोनही पर्याय बलूतेदाराना उपलब्ध होते.

त्यामुळे दैनंदिन आयुष्य जगायला व चरितार्थ चालायला त्यामुळे मदत होत होती. असा उत्तम समन्वय भारतीय बलुतेदारी पद्धतीमध्ये असल्यामुळे अनेक गावे स्वयंपूर्ण अशी होती. गावातल्या गरजा गावातच भागल्या जात होत्या. सर्व समाजाशी एकमेकाविषयी आपुलकीचे संबंध होते. त्यामध्ये प्रेम, आपुलकी जिव्हाळा होता. 

त्यामुळेच बलुतेदारी पद्धत ही शतकानुशतके टिकून राहिली. आजही काही ठिकाणी बलूते दारी पद्धती अस्तित्वात आहे.

लेखक:- रामदास तळपे.
  





  

    



 

ग्रामीण भागातल्या लोककला

मनुष्य फार पुर्वी पासुन कलेची जोपासना करत आलाय. कला ही सर्व भागात विखुरलेली होती. ग्रामीण भाग तर तेव्हा कलेचा अविष्कार होता.गावागावात कलेचा वारसा जपनारे कलेचे भोक्ते होते.

एकतारी भजने:

फार पुर्वी गावांगावांत एकतारी भजन असायचे. ढोलकी, वीणा, टाळ व चिपळ्या ही वाद्य असायची.जोडीला ज्ञानोबा,तुकोबांचे अभंग असत. एकतारी भजन एकटा मणुष्य सुद्धा करता असे.विणा व हातात चिपळ्या असल्या की झाले सुरु.

चिपळ्या :

चिपळीचे मुख्यत: दोन भाग असतात, एक भाग जो साधारणत: जाडा असतो तो अंगठयामध्ये घालतात आणि दुसरा, उरलेल्या चार बोटांनी धरतात आणि दोन्ही भागांचे एकमेकांवर आघात केल्यावर त्यातील पातळ झांजांमुळे एक मधुर नाद उत्पन्न होतो.

संध्याकाळी जेवणे झाली की लोक भजन म्हनायला बसत. त्यांचे भजन ऐकुन लांबलांबुन भजनाची आवड असणारे लोक अंधार तुडवीत भजनाला येत असत.

त्यानंतर काळ बदलला.एकतारी भजन मागे पडले.व त्याची जागा संगीत भजनाने घेतली.

संगीत भजन:

एकतारी भजनापेक्षा संगीत भजनात अभंगाच्या वेगळ्या चाली,जोडीला उडत्या चालीच्या गवळणी हा काव्य प्रकार पुढे आला.शिवाय एकतारीमधील वीणा जाऊन तीच्या जागी पायपेटी आली. त्यामुळे संगीत भजन फारच प्रभावी होऊ लागले..

आलंका पुरी ssssss पुण्य भुमी पवित्र.ssss एकदा म्हणायला सुरूवात झाली की ऐकतांना अंगावर रोमांच उभे रहात.पहिला अभंग रूप पहाता लोचनीने सुरूवात व्हायची..प्रत्येक भजनात या अभंगाची चाल अगदी वेगळी असायची..या अभंगावरून हे भजनाचा रागरंग कसा आहे हे कळायचे.

१) रूप पहाता लोचनी

२) येई श्याम सुंदरा...

३) पिंपळाच्या पारी नामा भजन करी

४) जयजय शंभो तु महादेवा

५) इंद्र पडली भगा चंद्र झाला काळा पहा ते रावणा..

६) पांडुरंग उभा वाळवंटी असे अनेक मधुर चालीचे अभंग ऐकून मन प्रसन्न होई.

अभंग संपले की गवळणी सुरू व्हायच्या.गवळणीच्या वेगवेगळ्या ऊडत्या चाली...कधीकधी हिंदी सिनेमांच्या गाण्यावरील चालीवरून गायल्या जात.

गवळणी चालू झाल्यावार झोपेची धुंदी उतरून गवळणी ऐकल्यावर मन फुलून जाई. रात्री केव्हातरी भैरवीने भजन संपत असे...त्यानंतर पितळीतुन चहा दिला जाई.

ग्रामीण भागातील प्रत्येक गावात भजन हे सामाजीक/ अध्यात्मिक व मन रमवण्याचे उत्तम साधन होते. गायक, वादकांची कदर केली जात असे.

धर्मा तळपे, चिंधू खाडे, बुधा खाडे, चंद्रकांत मोहन, नाथाबुवा तळपे अशा अनेक मान्वरांची नावे घेता येतील. गावोगावी होणाऱ्या सत्यनारायण महापुजा,सप्ताह व यात्रांना रात्री भजनाचा कार्यक्रम हा हमखास ठरलेलेलाअसायचा.

यात्रा, सत्यनारायण पुजा असल्यावर अगदी सकाळी शिवाजी महाराजांचा पोवाडा किंवा प्रल्हाद शिंदे यांची ऐक सत्य नारायणाची कथा,गेला हरी कुण्या गावा ,जाते लाडाची लेक आज सासरी अशी गाणी ऐकायला मिळत.परतु त्यानंतर मात्र कालपरत्वे बदल होऊनत्या ऐवजी दादा कोंडके यांची वर ढगाला लागली कळं, अशी गाणी वाजू लागली. त्यानंतर हिंदी गाणी वाजू लागली.

लेझीम व ढोल पथके:

भजना प्रमाणेच ठराविक गावांमध्ये लेझीम व ढोल पथक होते.यामध्ये सोळशे वाडीचे ढोल व लेझीम पथक नामांकित होते. बबन खाडे हे त्यांचे प्रमुख होते. ढोल व लेझीम पथकात अनेक वेगवेगळे खेळाचे प्रकार असत.ते पहाताना मोठी गंमत वाटे.

असेच ढोल व लेझीमपथक मंदोशी याही गावात होते.विष्णू पांडू तळपे हे पथक प्रमुख होते.

संगीत कलानाट्य  व भारुड मंडळ:

अनेक गावांमध्ये संगीत कलानाट्य भारूडे व तमाशे देखील होते. नायफडची नाव्हाचीवाडी, सरेवाडी, टोकावडे, भोमाळे, धामणगाव, पोखरी, कानसे माळवाडी, खरवली, देवतोरणे व पवळेवाडी येथील भारूडे त्या काळात फारच प्रसिद्ध होती. शिवाय या भारूडांना यात्रेच्या हंगामात प्रचंड मागणी असायची.

उगलेवाडी (कारकुडी) मंदोशी, जावळेवाडी, भिवेगाव व साकुर्डी यांचे तमाशे प्रसिद्ध होते. यासाठी चिंधू वनघरे, बापू साबळे, शंकर अहिलू तळपे, विष्णू हुरसाळे, भिमाजी गोडे, दुलाजी गोडे,नारायण तळपे, शंकर गवारी, बबन गोडे, मारूती भोकटे, विठ्ठल उगले यांचे योगदान मोठे होते.

पुर्वी गावामध्ये अनेक कलावंत असत. त्यापैकी 

कासम तांबोळी :

कासम तांबोळी उंची लहान पण किर्ती महान असे ताशावादक होते.कासमभाई असा काही ताशा वाजवत की नुसते ऐकतच रहावे.

दगडू भराडी: 

दगडू भराडी हे शिरगाव येथे रहात असत. सोमवार, मंगळवार व गुरूवारी गावोगावी जाऊन दारोदारी डमरू वाजवून खंडोबा व देवीची गाणी म्हणत असत. सुवासीनी त्यांना वाटीभर तांदुळ देत. दगडु भराडी यांनी डमरू वाजवून म्हटलेली गाणी अजुनही कानात रूंजी घालतात. अगदी सकाळी सकाळी प्रत्येकाच्या दारात दगडु भराड्याने म्हटलेल्या गाण्यांनी गावात वेगळीच प्रसन्नता वाटत असे.

बापू गायकवाड :

बापू गायकवाड हे डेहथील रहिवासी होते.बापुंची डफावरची थाप अशी काही असायची की बस्स...जबरदस्त .डफ वाजवावा तो फक्त बापूनीच.त्यांच्या डफाची थाप अनेकांच्या ध्यानात असेल हे मात्र नक्की.

विठू नांगरे :

मोरोशीच्या विठू नांगरे या अवलियाला ओळखत नसेल असे भागात कुणी असेल असे वाटत नाही.विठू नांगरे हे कलेचे सम्राट होते.कोणतेही पात्र विठू नांगरे अगदी सहजतेने व लिलया करत.त्यांचे समई नृत्य, नृत्य करत असताना डोक्यावर भात शिजवने व मयूरनृत्य हे नृत्य प्रकार फार प्रसिद्ध होते.

सुदाम बारवेकर :

सुदाम बारवेकर हे श्रावण महिन्यात लावलेले रामविजय, नवनाथ ग्रंथ अशा काही मधुरवाणीने वाचत की नुसते ऐकतच रहावे.शिवाय लग्नातील मंगलाष्टका ते उत्तम म्हणत.

तुकाराम भोकटे (गुरूजी) 

भोकटे गुरूजींचे अगदी सहज समजेल असे साधे सोपे दृष्टांत देऊन केलेले प्रवचन अगदी ऐकत रहावे असे वाटते.आपल्या प्रवचनातुन कसे वागावे.व कसे वागू नये हे अगदी सहजपणे सुंदरपणे पटवुन देत असतात.

वामन महाराज जढर :

वामन महाराज जढर यांनी त्यांच्या कन्या अमृता व नमृता यांना बालपणीच अध्यात्माचे बाळकडू पाजून प्रवचन व किर्तनरूपी सेवेत पारंगत केले आहे.अमृता व नमृता यांची प्रवचने व किर्तने ऐकून जगण्यासाठी नवी दिशा मिळते.

अंकुश शिंदे व दत्तू मोरमारे:

किर्तनकाराला उत्तम साथ देणारे अंकुश शिंदे व दत्तू मोरमारे ही जोडी उदयाला आली. किर्तनकाराला अतिशय सुंदर साथ ते आजही देत असतात.

भारमळ महाराज: 

नायफड गावचे भारमळ महाराज हे सुद्धा खुप छान पद्धतीने प्रवचन व किर्तनरूपी सेवा करता आहे.त्यांचे प्रवचन व किर्तनात एक वेगळाच गोडवा अनुभवायला मिळतो.

सागर महाराज शिर्के: 

सागर महाराजांच्या रसाळवाणीने भागाचे नाव अगदी लहान वयात मिडियाच्या माध्यमातून घराघरात पोहचवले आहे.

दिंडी:

भागाला आध्यात्माची आवड असल्यामुळे कै. दुलाजीबाबा तिटकारे यांनी सुरु केलेली भिमाशंकर ते आळंदी पायी दिंडी अद्यापही चालूच आहे.आळंदी येथे भव्य धर्मशाळा बांधण्यात आली आहे.या साठी समाजाचे फार मोठे योगदान लाभले आहे.

यासाठी विठ्ठल ढवळा वनघरे,दत्ता खाडे, गोपाळ हुरसाळे, सुनील भालेराव यांचेही योगदान मोठी आहे.

ताफा : सनई चौघडे

पुर्वी यांत्रा,लग्न आदी मंगल कार्यासाठी सनई,चौघडा यांना खुप मागणी होती.ताफ्यामध्ये दोन सनई वादक, चौघडा, ताशा,ढोलकी व धोटा अशी वाद्य असत. मंदोशी,भोरगीरी येथे ताफे होते. 

मंदोशीचा ताफा खेड,आंबेगाव व मावळ तालुक्यात फार प्रसिद्ध होता.श्री.नामदेव रोकडे यांची सनई व कचर रोकडे आणि, बबन आहिरे यांचा ताशा यांची जुगलबंदी पहायला गर्दी होई. सनई,चौघड्याचे महत्त्व अद्यापही टिकून आहे. 

नयफड गावात मुक्ताबाई मंदिराजवळ बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नामांकित ताफ्यांच्या स्पर्धा असत. बैलांची मिरवणूक झाल्यावर स्पर्धाना सुरवात होत असे. स्पर्धा पाहायला प्रचंड गर्दी होत असे. दिवस बुडेपर्यंत स्पर्धा चालत.

बेंजोपार्टी :

ताफ्याचे महत्त्व हळुहळू कमी होऊ लागले. सन १९९१ साली पाभे गावात प्रथमच बेंजो आला.बुलबुल हे एका हातात ब्लेडचे पान तारेवार घासुन व दुसऱ्या हाताने बुलबुलवरील तारेच्याच बटनावर पेटीसारखे वाजवायचे वाद्य होते.याची वायर पुढे लाऊड स्पिकरच्या कर्णांना जोडली जायची व्यवस्था होती.त्यामधून बुलबुलवर वाजवलेल्या गाण्यांचा सुंदर व स्वच्छ आवाज यायचा.या बरोबरच ताशा,कच्ची,ढोल ही वाद्ये होती.

बेंजोपार्टीच्या काळात मराठी व हिंदी गाण्याच्या बुलबुल म्युझिक कँसेट्स निघाल्या.त्यावर इतर वाद्य वाजवली जाऊ लागली.

त्याकाळात बेंजो हा प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला.लग्न करायचे असेल तर बेंजो पाहिजेच. हा प्रकार रूढ झाला. बेंजोमुळे बारा वाजता संपणा-या वराती पहाटे पाच वाजेपर्यंत संपण्याचे नाव घेईनात.

वरातीची जागा झिंगाट डान्सने घेतली. वरातीचा खर्च १०० पटीनी वाढला. वरातीत दारू, ताडी, बिअर, हातभट्टीच्या बाटल्या तरूण पिढी रिचवू लागली.अगदी पंधरा सोळा वर्षाची पोरं दारू पिताना दिसू लागली.नंतर पुढे वेगळीच पिढी उदयाला येऊ लागली.

पुढे बेंजोचे महत्त्व सुद्धा हळुहळू कमी झाले व त्याऐवजी आता D.J. आला.माणसांची जागा यंत्राने घेतली.

रामदास तळपे 



गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस