प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे

प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे 

महादेव गोपाळे हे कळमोडी गावचे सुपुत्र. अवघ्या जगप्रसिद्ध  रांगोळीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना आजपर्यंत विविध पुरस्काराने गौरवले आहे.

प्रारंभिक जीवन 

महादेव गोपाळे हे कळमोडी गावचे रहिवासी. लहानपणापासून त्यांना उपजतच कलेची आवड होती. तिसरी चौथीला असताना ते मातीचे गणपती, मातीचे बैल,मातीची भांडीकुंडी बनवायचे आणि यातूनच कलेचा जन्म झाला.

महादेव यांच्या घरची परिस्थिती जेमतेमच म्हणावी लागेल. शेतकरी कुटुंब असल्या मुळे अपसुकच जनावरे आली.छोट्या महादेव यांना शाळेबरोबर दुपारनंतर गुरे राखण्याचे काम करावे लागायचे.शेतीची कामे करावी लागत. हे करत असताना महादेव यांची उपजत असलेले कला बाहेर डोकावत असे. शेणाच्या गोवऱ्या करताना सुद्धा त्या सुंदरच झाल्या पाहिजेत असा त्यांचा कटाक्ष असे.

कळमोडी गाव हे अतिशय ग्रामीण व दुर्गम भागातील गाव. त्यावेळी चालायला नीट रस्ते नव्हते. गाड्या तर दूरची गोष्ट. राजगुरुनगर पासून 30 किलोमीटर अंतरावर असलेले गाव. त्यावेळेस एसटीचे सोय सुद्धा नव्हती.पायीच प्रवास करावा लागत असे. 

त्यांना तिसरी चौथीला असताना एक शिक्षक होते त्यांना चित्र काढण्याचा छंद होता.उपजतच कलेची आवड असलेल्या महादेव गोपाळे यांना हे शिक्षक म्हणजे दुधात साखर. त्यांच्याकडून थोडेफार शिकायला मिळाले.

कलेची जोपासना 

छोटा महादेव कागदावर चित्र काढू लागला. या चित्राला रंग दिले तर हे चित्र खूपच उठावदार होईल व सुंदर सुद्धा. परंतु त्यावेळी रंग कुठे होते? परंतु छोटा महादेव खूपच उत्साही मुलगा होता. त्याने कोळसा पाण्यात घासून  काळा रंग तयार केला. 

रानभेंडीतील फुलातील मागच्या बोंडातील पिवळा द्रव काढून तो पिवळा रंग म्हणून वापर केला.घेवड्याच्या पानाच्या रसापासून हिरवा रंग तयार केला.

गेरूपासून तांबडा रंग तयार केला. पूर्वी गावाला लोक निळ पावडर वापरत असत. त्यापासून निळा रंग तयार केला.आणि त्याने काढलेल्या चित्राला रंग भरले.आणि हे चित्र इतके उठावदार झाले की महादेव स्वतःवर खुश झाला. गावातील सर्व लोकांना हे चित्र खूप आवडले. अशाप्रकारे महादेव यांच्या कलेचा जन्म झाला.

पुढील शिक्षण

त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण कळमोडी या गावी झाले.पुढील शिक्षणासाठी त्यांना वाडा या गावात जावे लागले. रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर विद्यालय वाडा या शाळेतील इयत्ता नववीला दाखल झाले.वाडा ही खेड तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठी बाजारपेठ होती.

वाडा या गावात शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु राहण्याची सोय नव्हती.त्यामुळे गोपाळे यांना वाडा ते कळमोडी असा 14 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागे. दररोज शाळेत व शाळा सुटल्यानंतर घरी यावे लागे. उन्हाळ्यामध्ये पायाला चटके बसत. परंतु चप्पल नसल्यामुळे झाडाची पाने तळपायाला बांधून प्रवास करावा लागे. त्या काळात सर्व लोकांची अशीच सर्वसाधारण परिस्थिती असायची.

पावसाळ्यात तर त्यांचे खूप हाल होत असत. दिवसभर त्यांचे कपडे ओले असायचे.ते सांगतात या आजन वयात एकदा त्यांनी पैसे नसतानाही मिसळ व पाव खाल्ले. त्याबद्दल त्यांना हॉटेल मालकाकडून मार मिळाला.

कशासाठी? पोटासाठी

वाडा गावात त्यांनी आठवी आणि नववी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे  कुटुंबाला हातभार लावला पाहिजे या जाणिवेतून त्यांनी मुंबई गाठली. मुंबईला गेल्यावर दूध केंद्रात पहाटे उठून दूध पोचवण्याचे काम केले. आणि रात्रपाळी दहावी केली.

दहावी झाल्यानंतर रोजी रोटी साठी काहीतरी केले पाहिजे, गावाकडील असलेल्या आई-वडिलांना मदत केली पाहिजे त्यामुळे काहीतरी पर्यायी नोकरी करणे अतिशय आवश्यक होते. त्याचवेळी प्रसिद्ध चित्रकार श्रीकांत घोंगडे यांच्याशी त्यांची ओळख झाली.आणि महादेव यांची लहानपणी असलेल्या कलेला चालना मिळाली. घोंगडे यांनी त्यांना कलेबद्दल खूप काही शिकवले.

अपमानाचे शल्य 

मुंबईमध्ये चाळीत राहत असताना एकदा ते एका चाळीतील खोलीमध्ये खिडकीतून टीव्ही पाहत असताना मालकाने ते पाहिले आणि त्यांच्या कानशिलात लगावली. त्यावेळी दूरदर्शन हे एकच वाहिनी होती. झालेला अपमान गिळून टाकण्याशिवाय गोपाळ यांच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. गरिबीचे ते एक विदारक चित्रच होते.

कलेला वाव मिळाला.

त्यावेळी सिनेमांची पोस्टर ही हाताने बनवली जात व रंगवली जात. 1980 साली ते सिनेमांची पोस्टरचे पेंटिंग व कलर काम करू लागले. त्यावेळी त्यांना तुटपुंजा मोबदला मिळायचा.

बाळकृष्ण आर्ट दादर व श्रीकांत धोंगडे यांचे चित्रपट पोस्टर बनविन्या साठी असिस्टंट म्हणुन काम केलं.रांगोळी व पोस्टर पेंटींग करण्यासाठी स्वित्सर्झलॅंन्ड येथे प्रात्याक्षिक केलं

चित्रपट पोस्टर,माफीचा साक्षीदार,अरे संसार संसार,देवता,सुन माझी लक्ष्मी,चटक चांदणी,शापीत,भालु,राघु मैना,लक्ष्मीची पाऊले अशा अनेक चित्रपटांचे पोस्टर बनविन्याची कामे केली..हिरो, हमजोली, तोहफा, हिम्मतवाला, अशा अनेक हिंदी चित्रपटांचे पोस्टर बनवले.

हे पोस्टर बनवत असताना त्यांच्या हिताचिंतकाने त्यांना रेल्वेमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याचे सांगितले. रेल्वे मध्ये तांत्रिक विभागात भरती निघाली होती.गोपाळे यांनी अर्ज दाखल केला.आणि काही कालावधीतच त्यांना नोकरीवर हजर होण्याचा आदेश आला.आणि अशा तऱ्हेने पोटापाण्याचा विषय संपला.

रांगोळीतील कलेतील चंचू प्रवेश 

तो काळ मुंबईतील अनेक शहरांत रंगावली प्रदर्शन भरण्याचा होता. घाटकोपरमधील भाजी गल्लीत दर वर्षी "प्रवीण वैद्य" हे रांगोळी प्रदर्शन भरवीत असत. त्याने महादेव इतके प्रभावित झाले की, दररोज कामावरून घरी आल्यावर ते रांगोळी काढू लागले व नंतर त्यात निष्णांत बनले.

रेखाटलेल्या रांगोळी चित्रांचे नमुने त्यांनी वैद्य यांना दाखविले.त्यांनीही महादेव यांच्या रांगोळी चित्रांची प्रशंसा केली आणि त्यांना प्रदर्शनामध्ये संधी दिली.रांगोळीच्या विविध कला त्यांनी आत्मसात केल्या. 

त्यांना रांगोळी काढण्यासाठी आमंत्रित करण्यात येऊ लागले. मुंबईमध्ये हळूहळू त्यांचे नाव नावारुपाला आले. त्यांनी प्रसिद्ध रमाधाम खोपोली येथे बाळासाहेब,व मीनाताई ठाकरे यांची रांगोळी काढली आहे.


या संधीचे सोने करत महादेव यांनी आपल्या आयुष्यात यशाचे रंग भरले. रांगोळीचा सराव आणि गुरुस्थानी असलेल्या वैद्य यांचे मार्गदर्शन घेऊन स्वत:ची अशी वेगळी शैली महादेव यांनी निर्माण केली. 

महाराष्ट्रभर रांगोळी प्रदर्शनात सहभाग घेऊन अनेक बक्षिसे पटकावली.रांगोळीतून साकारणारे पोर्ट्रेट इतके हुबेहुब वाटे की, ती व्यक्तीच आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे इतके सजीव.गोपाळे हे रांगोळी चित्रात अक्षरश: जीव ओततात,

याबद्दल त्यांची रांगोळी चित्रे पाहणार्‍या कुणाचेही दुमत होऊ शकत नाही.पोर्ट्रेट ही त्यांची खासियत असली, तरी त्यांच्या सामाजिक जाणिवा इतक्या प्रगल्भ आहेत की, त्या त्यांच्या रांगोळी चित्रांतूनही उमटतात. कला हे माध्यम समाजप्रबोधनासाठी प्रभावी ठरू शकते, म्हणून गोपाळे यांनी पोर्ट्रेटबरोबरच समाजदर्शन व सामाजिक संदेश देणार्‍या रांगोळ्या रेखाटल्या. 

हुंडाबंदी, दारूबंदी, गुटखाबंदी, स्त्रीभ्रूण हत्या, बालमजुरी, 26/11 दहशतवादी हल्ला, एस.टी. डेपो, रेल्वे स्थानक यांची, तसेच अनेक सामाजिक, राजकीय व कलाक्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची रांगोळी चित्रे त्यांनी रेखाटली

नेहरू सेंटर आर्ट गॅलरी येथील दिनांक 24 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीत आयोजित समूह चित्र प्रदर्शनात चित्रकार महादेव गोपाळे यांनी काढलेली व्यक्तिचित्रे खूप गाजली. 

त्यांनी राजकीय पुढारी,गायक, चित्रपट सृष्टीतील कलावंत यांची व्यक्तिचित्रे आता पर्यंत अनेक काढली आहेत. पण या प्रदर्शनात प्रदर्शित संत गाडगेबाबा, भीमसेन जोशी, राष्ट्रपती अब्दुल कलाम, भाऊराव पाटील,रतन टाटा यांची व्यक्तिचित्रे त्यांनी  कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक  रंगविली. 

ही चित्रे पाहण्यासाठी चित्र रसिकांनी खूप गर्दी केली आणि त्यांचे कौतुक केले. त्यांत कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक माध्यमाचा वापर करून या चित्रांतून व्यक्ती, स्थान यांसोबतच अलंकरण, पेहराव यांचाही त्यांचा विशेष अभ्यास त्यांनी दाखविला.

वारकरी व्यक्तिचित्र ,तसेच चुलीवर घावणे बनविण्यात व्यस्त  असणार्‍या स्त्री चित्रात याचा प्रत्यय येतो. त्यांनी बिंदू आणि तिरप्या रेषांच्यासाहाय्याने वेगवान फटकाऱ्यांनी काढलेली ही चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 

त्यांची रंगावली चित्रे पुस्तकात प्रसिद्ध आहेत.अशी विविध प्रकारची व्यक्तिचित्रे त्यांच्यातील समर्थ कलावंताची साक्ष देतात असे वाटते .असे त्यांच्या विषयी उद्गार प्रसिद्ध चित्रकार आणि क्युरेटर ज्यांनी चाळीसहून अधिक विविध बाल आणि तरुण  चित्रकारांची चित्र प्रदर्शने आयोजित केले आहेत.

चुलीवर घावणे बनविण्यात व्यस्त असणार्‍या स्त्री चित्रास त्यांना एस.पी. मेमोरियल ट्रस्ट, मुंबई पुरस्कृत थोर चित्रकार डॉ. एस.एम. पंडित यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेला पुरस्कार देण्यात आला. 

त्यांच्या कार्याची दखल जगाने सुद्धा घेतले आहे. रांगोळी कलेत सतत ४० कार्य केल्यामुळे भारत वल्ड रेकॉड केलं आहे. गिनीज वल्ड सहभाग प्रमाण प्रत्र व मेडल मिळाले. हा बहुमान त्यांचा नसून सर्व महाराष्ट्राचा आहे.

श्री गोपाळे यांची गाव असलेल्या कळमोडी येथे दरवर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी यात्रा भरते.श्री रामाच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर खूप मोठी श्रीरामाची रांगोळी काढली जाते.

यासाठी दोन दिवस आधीच तयारी करावी लागते. अगदी परिसर स्वच्छ करण्यापासूनची ते रांगोळी काढेपर्यंत ची सर्व तयारी महादेव गोपाळे यांनी करावी लागते. ते आनंदाने हे सर्व प्रत्येक वर्षी करत असतात. त्यांच्या गावावर त्यांचे निस्सीम प्रेम आहे. श्री रामावर भक्ती आहे.

अपमानाची परतफेड 

त्यांना ज्या हॉटेल आत मिसळ साठी पैसे दिले नाही म्हणून मार खावा लागला त्याच हॉटेल मालकाने प्रसिद्ध रांगोळी कार म्हणून त्यांचा त्याच हॉटेलमध्ये सत्कार केला.

तसेच ज्या खोली मालकाने त्यांना दूरदर्शन पाहण्यापासून रोखले व कानशिलात मारली त्याच महादेव गोपाळे यांची मुलाखत पुढे दूरदर्शनवर समाजाला पाहायला मिळाली. हा नियतीचा न्यायच म्हणावा लागेल.

श्री गोपाळे यांनी त्यांच्या आईच्या स्मृतिप्रतीर्थ शिवाजीनगर पुणे येथे बालगंधर्व रंग मंदिरात त्यांच्या पेंटिंग प्रदर्शन भरवले होते. यामध्ये गोपाळे साहेबांच्या संपूर्ण कला प्रवासाचा पेंटिंगच्या सहाय्यानेआढावा घेण्यात आला होता.यातून त्यांच्या आई विषयीची श्रद्धा दिसून येते.

परमेश्वराचा वरदहस्त

महाराष्ट्राच्या अतिशय दुर्गम अशा खेडेगावात कलेची कोणतेही पार्श्वभूमी नसताना श्री महादेव गोपाळे यांना परमेश्वराने कलेची उपजत देणगी दिली आहे. परमेश्वराचा वरद हस्त असल्यामुळेच ते हे सर्व काही करू शकले. हे नाकारता येत नाही.

भारताच्या राष्ट्रपतींनी घेतली होती दखल.

देहू येथे भरलेल्या रांगोळी प्रदर्शनामध्ये महादेव गोपाळे यांनी साकारलेल्या रांगोळीचे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी उत्स्फूर्त दात देऊन गोपाळे यांचे कौतुक केले होते.

महादेव गोपाळे रेल्वे सेवेमधून सेवानिवृत्त झाले आहेत. भावी पिढीतील होतकरू तरुणांना ती मार्गदर्शन करत असतात. राजगुरुनगर मध्ये ते थोड्याच दिवसात प्रत्येक महिन्याला नियमित कार्यशाळा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळा घेतल्यावर होतकरू तरुण-तरुणींना यामुळे वाव मिळणार आहे. त्यांच्या कलेला प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे यांच्या निमित्ताने परिसस्पर्श लाभेल यातील मात्र शंका नाही.

श्री गोपाळे म्हणतात मी जरी सेवानिवृत्त झालो असलो. तरी माझ्यातील कला अद्यापही निवृत्त झालेली नाही.कलेचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कलेच्या माध्यमातून आनंद द्विगुणीत होत आहे ही परमेश्वराचीच कृपा म्हणावी लागेल.

पत्नी सौ. मंगल यांचा यशात सिंहाचा वाटा 

या सर्व जीवन प्रवासामध्ये त्यांच्या पत्नी सौ. मंगल यांनी त्यांना उत्तम प्रकारे साथ दिली. व सतत प्रोत्साहन दिले, त्यामुळेच हा प्रवास करू शकलो म्हणूनच त्यांच्या या यशात त्यांच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे असेही ते कृतज्ञते पूर्वक म्हणतात.

लेखक :- रामदास तळपे 
























































छत्री, इरले, रेनकोट व गम बुट


जून महिना सुरू होताच आकाशात ढग जमायला सुरुवात व्हायची. त्याच दरम्यान जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा देखील सुरू व्हायच्या. नवीन वर्ग, नवीन कपडे, नवीन वह्या पुस्तके या आनंदात सर्व विद्यार्थी असायचे.

हळूहळू पाऊस सुरू व्हायला सुरुवात व्हायची. आणि मग आठवण यायची ती छत्रीची. नवीन छत्री घेण्यासाठी एकच हट्ट करायचे, छत्री घेतली नाही म्हणून रुसवे फुगवे व्हायचे. काही लोक पावसाळा संपल्यावर व्यवस्थित बांधून ठेवलेल्या छत्र्या झटकून बाहेर काढायचे. व वापरायला सुरुवात करायचे. 

तर काहीजणांच्या गलथान पणामुळे म्हणा किंवा छत्र्या व्यवस्थित न ठेवल्यामुळे तुटून, मोडून, फाटून जायच्या. काहींचा दांडा मोडलेला असायचा, तर काहींच्या तारा तुटलेल्या असायच्या, काहींचा खटका आत गेलेला असायचा, तर काहींचे कापड छत्रीच्या तळाशी फाटलेले असायचे.

पंचक्रोशीतील मोठ्या गावात बाजाराच्या दिवशी गल्लीत एका रस्त्याच्या कडेला झाडाखाली जुन्या छत्र्या दुरुस्तीचे दुकान थाटलेले असायचे. एका मोठ्या पोत्यावर अनेक जुन्या छत्र्या, नवीन दांडे, नवीन व जुन्या छत्रीच्या तारा, क्लिपा, घोडे (छत्री उघडण्याचे बटण ),चकत्या, छोटे खिळे, बारीक तारेचे गुंडाळे, त्याच बरोबर छोटया ब्याटऱ्या, ब्लब,असे विविध जुन्या व नव्या वस्तू हरीने मांडलेल्या असत.

छत्री दुरुस्ती करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडालेली असे. तेथे अनेक लोक ताटकळत आपली छत्री दुरुस्त होण्याची वाट पाहत उभे राहात असत.

कुणाच्या छत्रीचा दांडा मोडलेला असे, तर कुणाच्या छत्रीच्या तारा मोडलेल्या असत. कुणाच्या छत्रीचा घोडा आत गेलेला असायचा तर कुणाच्या छत्रीचे कापड छत्रीच्या मुळाशी फाटलेले असायचे. छत्री दुरुस्त करणारा कारागीर सफाईदारपणे व एकाग्रतेने छत्र्या दुरुस्त करायचा.

कुणाच्या छत्रीच्या एक दोन तारा कांडाळलेल्या असायच्या. कारागीर हळूच त्या मोडलेल्या तारा काढायचा. आणि त्या ठिकाणी नवीन तारा बसवायचा. काही छत्र्या उघडण्याचा घोडा छत्रीच्या दांड्यामध्ये गेलेला असायचा. कारागीर सफाईदारपणे त्याच्याकडील हत्यारांच्या सहाय्याने मोडलेला घोडा बाहेर काढायचा आणि छत्रीला नवीन घोडा बसवायचा.

कधी कधी छत्रीचे कापड तळाच्या भागात फाटलेले असायचे. छत्रीचे कापड छत्री पासून वेगळे करून बाहेर काढले जायचे. कात्रीच्या सहाय्याने फाटलेले कापड कापून त्या ठिकाणी नवीन कापड बसवून काळ्या धाग्याने व्यवस्थितपणे शिवले जायचे. कधी कधी छत्रीचे मूळ कापड, व नवीन दिलेल्या कापडाचा जोड यामध्ये जमीन आसमानाचा फरक असायचा. त्यामुळे ही छत्री वापरायला मुले का कू करायची.

काही लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे जुन्या छत्र्यांना नवीन दांडे बसवायचे, तर कधी जुनेच दुरुस्त करून घ्यायचे.

छत्री दुरुस्त केल्यावर एक दोनदा उघड झाप करून छत्री बरोबर नीट केली आहे ना... याची कारागीर खात्री करून घ्यायचा. व गिर्‍हाईकाच्या हातात द्यायचा. चार दोन रुपये मिळालेला मोबदला पत्र्याच्या छोट्या पेटी टाकायचा. त्या चिल्लर नाण्यांचा खळखन आवाज यायचा.

त्यावेळी तिथे अनेक संवाद व्हायचे. खालीलपैकी एक संवाद 

मुलगा :- बाबा, मला नवीन छत्री पाहिजे. 

सगळे मुलांकडे नवीन छत्री आहेत. मीच जुनी छत्री रिपेअर करून का वापरायची?

बाबा  :- आता आपली छत्री घेण्या इतकी ऐपत नाही बाळा.आता हीच वापर. पुढच्या वर्षी बघू . 

मुलगा :- मी नाही मग शाळेत जाणार.. मला नको ही छत्री जुनी आहे. शिवाय तिला ठिगळ दिले आहे.

तेथील एक माणूस :- बाळा, बाबांचं ऐकावं जरा.. परिस्थिती कठीण आहे. ते म्हणतात ना पुढल्या वर्षी नवीन घेऊ मग वापर वर्षभर ही.

बाकीचे तिथे असणारे सुद्धा मुलाला समजायचे.

त्यावेळी छत्री म्हणजे एक मांजरपाट काळ्या कापडाची सिंगल तारांची छत्री असे. पावसाने भिजल्यावर ही छत्री खूप जड व्हायची. ती वाळायची सुद्धा लवकर नाही.

त्यानंतरच्या काळात डबल तारांच्या टेरीकोट छत्र्या बाजारात आल्या. या छत्र्यांना खटक्याची छत्री सुद्धा म्हणत असत. ही छत्री वापरायला खूपच सुलभ होती. शिवाय पावसाने भिजूनही जड देखील होत नसे. पाऊस उघडल्यावर झटकन वाळत असे.परंतु ही छत्री सिंगल छत्रीपेक्षा महाग असायची.

हळूहळू साध्या छत्र्या लोक वापरीनासे झाले. आणि मग ह्या छत्र्या बाजारातून हद्दपार झाल्या.

त्यावेळी नवीन छत्री घेतली की ती हरवायची जास्त भीती असे. नवीन छत्री व रंगीत कलरने स्वतःचे नाव व पत्ता टाकायची पद्धत होती. छत्रीवर नाव टाकायचे पेंटर पाच रुपये घ्यायचा. 

पाऊस चालू झाल्यावर छत्री घेऊन दुसरीकडे जायचे. व एखाद्याच्या किंवा पाहुण्यांच्या घरी गेल्यावर त्याच्या दरवाजा जवळ छत्री लटकावयाची. आणि आत जायचे.

घरी जायच्या वेळी पाऊस उघडलेला असायचा. त्यामुळे छत्री घ्यायचे ध्यानातच राहायचे नाही. तसेच पुढे जायचे. अर्धा किलोमीटर चालून गेल्यावर पावसाची सर यायची. आणि मग त्यावेळी छत्रीची आठवण व्हायची. पुन्हा पाहुण्यांच्या घरी जायची वेळ यायची.

कधी कधी छत्री एस टी मध्ये, आगगाडी मध्ये, हॉटेलात विसरली जायची. घरी आल्यावर खूप पश्चाताप व्हायचा. खूप हळूहळू व्हायची. परंतु ईलाज नसायचा. 

मुंबई वाले चाकरमानी पावसाळ्यात गावाला यायचे तेव्हा त्यांच्याकडे छोटी बंदूक छत्री असायची. ही छत्री घडी घालून पिशवीत ठेवता येण्याजोगी होती. परंतु अतिशय नाजूक.. या छत्रीचे आम्हा मुलांना खूप आकर्षण वाटायचे. परंतु गावाकडे खूपच पाऊस असल्यामुळे व वेडेवाकडे जोरदार वारे वाहत असल्यामुळे या छत्रीचा टिकाऊ लागणार नाही हे माहीत असल्यामुळे या छत्र्या बाजारात विक्रीस नसत. असंत फक्त मोठ्या आणि लांब छत्र्या. या छत्रीचा खटका दाबताच छत्री आपोआप उघडायची. याचा उपयोग आम्ही मांजर घाबरवण्यासाठी करायचो.

छत्र्या हरवू नयेत, किंवा त्या हरवल्या की सापडाव्यात किंवा त्या चोरून नेऊ नयेत म्हणून छत्रीवर नाव टाकण्याची पद्धत होती. वेगवेगळ्या रंगांमध्ये छत्रीच्या कापडावर स्वतःचे संपूर्ण नाव व पत्ता लिहिण्याची पद्धत होती. त्यावेळी मोबाईल नंबर नव्हते नाहीतर ते सुद्धा लिहिले असते. छत्रीवर नाव टाकण्याचे पेंटर पाच रुपये घ्यायचा.

इरले:

त्यावेळी पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेतातील काम करण्यासाठी इरल्यांची सुद्धा खूपच गरज भासायची. इरली ही बांबूच्या छोट्या छोट्या काड्या पासून पासून तयार करत असत. त्यासाठी प्रत्येक गावात कारागीर असत. अगदी सकाळी सकाळी त्यांचा इरले बनवण्याचा उद्योग चालू आहे. 

त्यावेळी पायली दोन पायली धान्य देऊन कारागीर लोकांना इरली करून देत असे. इरल्याचा बांबू पासून साठा बनवल्यावर त्यावर वाळलेली पळसाची पाने हरीने लावून दोरीने सुबक घराघरांच्या नक्षीदारपणे बांधली जात असे. नवीन इरली दिसायला अतिशय सुंदर असत. ही इरली अतिशय उबदार असत. परंतु खूपच जड असत.

दरवर्षी कोकणातील लोक पळसाच्या पानाचे पुडके इरल्याला लावण्यासाठी विकायला घेऊन यायचे.

पुढे काळ बदलला, लोक इरल्याच्या साठ्याला पळसाच्या पाना ऐवजी कागद बांधू लागली. त्यामुळे इरली ही वापरायला सुलभ व हालकी वाटू लागली. परंतु त्यामध्ये उबदार पण नव्हता. 

घोंगडी 

त्या वेळी लोक शेतीची कामे करण्यासाठी पावसाळ्यात घोंगडीचा सर्रास उपयोग करत असत. व आताही करतात परंतु प्रमाण फार कमी झाले आहे. प्रत्येकाकडे घोंगडी ही असायचीच.शक्यतो घोंगडी ही गुरे राखणाऱ्या गुराख्यांकडे असायची. घोंगडी चा उपयोग पाहुण्यांना बसण्यासाठी सुद्धा व्हायचा.घोंगडीवर बसल्यावर खूपच उबदार वाटायचे. पूर्व लोक झोपण्यासाठी घोंगडी खाली आंतरत्व त्यावर झोपत असत. आरोग्य शास्त्र सांगतं, घोंगडीवर सहा महिने झोपल्यावर डायबिटीस आपोआप कमी होतो.

रेनकोट:

पावसाळ्यात रेनकोट सुद्धा तुरळक लोकांकडेच असायचा. त्या काळात रेनकोट ही ओबडधोबड होते. 

नंतरच्या काळात रेनकोटच्या अनेक व्हरायटी बाजारात उपलब्ध झाल्या. वेगवेगळ्या रंगीत रेनकोटांनी बाजारपेठ 

फुलून जायची. वेगवेगळ्या रंगाच्या छत्र्या देखील बाजारात आलेले असायच्या.

नवीन छत्री घेतली की कारण नसताना घराबाहेर फिरून यायची हुक्की यायची.उद्देश हाच असायचा की आपण घेतलेली नवीन छत्री.. आपल्या मित्रांना दाखवता येईल.

रेनकोटचे तर विचारूच नका. घरामध्ये बसलो असता बाहेर पावसाची एखादी जोरदार सर आली की. रेनकोट घालून बाहेर फिरायला जायची तयारी करायची. रेनकोट घालून बाहेर जाणार तोच पाऊस उघडलेला असायचा. 

कधी कधी रेनकोट न घालताच बाहेर गेलो की पावसाची एकच जोरदार सर यायची. पूर्ण पाऊस अंगावर घेताना रेनकोटची आठवण यायची. परंतु रेनकोट आणायला आपण विसरलो आहोत हे आठवून स्वतःचे स्वतःला वाईट वाटायचे.

चप्पल:

पावसाळ्यात चेपल्यांचे तर विचारूच नका. चेपल्या जर चामड्याच्या असतील. तर वाळता वाळायच्या नाहीत. त्यासाठी लोक पावसाळ्यापूर्वी प्लॅस्टिकच्या किंवा बाटाच्या चेपल्या घेत असत.काही लोक अगदीच अनभिज्ञ असत. पावसाळा आल्यावरच मग त्यांना चेपल्यांची आठवण होई. परंतु काही लोक अगदीच भरभर गाळातून चालत जाताना एक वेगळाच फटफट आवाज येत असे. त्यांना पाण्याचा आणि गाळाचा अंदाज येत नसे आणि पाठीमागून गाळ त्यांच्या अंगावर अगदी डोक्यापर्यंत उडायचा. हे घरी गेल्यावर कपडे काढून  बघितल्यावरच कळत असे. किंवा पाठीमागून चालणारा एखादा माणूस सांगायचा.तेव्हा कळायचे.

गमबूट

काही लोक पावसाळ्यात काळ्या रंगाचे पायाच्या पोटऱ्यापर्यंत असलेले गमबूट किंवा बाटाचे बूट वापरत. बूट हे काळे, पिवळे,तपकिरी,लाल रंगाचे असे. परंतु गमबुट मात्र काळ्या रंगाचे असायचे.गमबुट हे रानात, गवतातून किंवा गुरांकडे जाताना वापरत असत.परंतु गम बूट हे वापरायला जरा कटकटीचे होते.गम बूट घातल्यावर जोरात चालता येत नसे.

एकदा तर एकाच्या गमबुटात साप वेटोळे घालून बसलेला होता. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे हा गमबूट घालायला गेला. तर त्याच्या पायाला काहीतरी गिळगिळीत लागले. बूट उलटे करून आपटले तर त्यातून साप बाहेर पडला..तर असे हे गमबुट.

रामदास तळपे

निसर्गातील डॉक्टर


निसर्गातील डॉक्टर 

जेव्हा कावळा आजारी पडतो.तो मुंग्यांच्या वरुळाला ला भेट देतो. ऐकायला विचित्र वाटतंय का? खरंतर हा निसर्गाच्या सर्वात आकर्षक उपचार विधींपैकी एक आहे. 

जेव्हा कावळ्याला स्वतःला आजारी असल्याचे जाणवते, तेव्हा तो जाणूनबुजून मुंग्यांचे वारूळ शोधतो, त्याचे पंख पसरतो आणि पूर्णपणे स्थिर राहतो - मुंग्यांच्या पिसांमध्ये घुसण्याची वाट पाहत. पण का? 

कारण मुंग्या फॉर्मिक ॲसिड  सोडतात - एक नैसर्गिक अँटीसेप्टिक जो पक्ष्यांच्या पंखांमध्ये लपलेले बॅक्टेरिया, बुरशी आणि परजीवी मारतो. 

या वर्तनाला "मुंग्यांना डॉक्टर" म्हणतात, आणि हे केवळ कावळ्यांमध्येच नाही तर अनेक पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये दिसून आले आहे. औषध नाही. पशुवैद्य नाही. फक्त शुद्ध अंतःप्रेरणा आणि निसर्गाची अंगभूत फार्मसी. 

नैसर्गिक जग बुद्धिमान, स्वयं-उपचार प्रणालींनी भरलेले आहे याची एक उज्ज्वल आठवण... आपल्याला फक्त थांबून लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.


सुभाष जठार यांची कविता...

कोण आहे तु 

तोच पाऊस वादळ, वारा !

तुझ्या पुढे बघ काहीच नाही !!

तीच वीज. नभ काळे भोर !

नजरे पुढे तुझ्या काहीच नाही !!

गुलाब. चाफा. जुई. मोगरा !

तुझ्यापुढे तर काहीच नाही !!

तोच श्वास ओल्या मातीचा !

तुझ्या गंधापुढे तर काहीच नाही !! 

तीच सरिता. तोच सागर!!

तुझ्या अश्रू पुढे बघ काहीच नाही!!

खळ खळणारे झरे बापुडे!

तुझ्या हास्या पुढे पण काहीच नाही!!

लव लवणारी गवत. पालवी!

तुझ्या पुढे तर काहीच नाही!!

भिरभीरणाऱ्या तुझ्या केसुवांची!

यांना कसलीच चाहूल नाही!!

स्वभावातील मिठास तुझ्या त्या!

त्यांना साधी माहित नाही!!

ऊस. शर्करा. आणि मधाला!

तुझा गोडवा ठाऊक नाही!!

आहे अशी तु एक वेगळी!

अजून कुणाल ठाऊक नाही!!

मला सोडूनी. बाकी कुणाला!

तुझी तुलाच तु माहित नाही !!

कवी सुभाष जठार (धुओली तालुका खेड जि पुणे) 




.

भारतीय गुप्तहेर अजित डोवाल....

 

भारतीय गुप्तहेर अजित डोवाल....

अजित डोवाल हे भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर  आहेत.भारताच्या रॉ आणि एकूणच गुप्तचर संघटनेच्या गेली 50 वर्षाच्या इतिहासाचे ते साक्षीदार आहेत.त्यांनी सिक्कीम, मिझोराम मध्ये पाकिस्तान मध्ये आणि लंडन मध्ये देशासाठी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत.

या संस्थेचे मुख्य कार्य म्हणजे परदेशातील गुप्त माहिती गोळा करणे, दहशतवादविरोधी कार्य करणे, आणि भारतीय धोरणकर्त्यांना सल्ला देणे.

रॉची स्थापना 1968 मध्ये झाली.1962 च्या चीन-भारत युद्ध आणि 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान गुप्तचर अपयशामुळे या संस्थेची आवश्यकता भासली.

रॉ ही भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे.ती गुप्तचर माहिती गोळा करणे, दहशतवाद रोखणे, आणि परदेशी संबंध सुधारणे यांसारख्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये व्यस्त आहे. 

रॉ ही भारतीय गुप्तचर संघटना श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी निर्माण केली. रॉ ही संघटना त्यावेळी पाकिस्तान व बाहेरची उपद्रवी राष्ट्र काय करतात याची इंत्यभूत माहिती घेऊन त्यावर पुढील योग्य ते निर्णय काय घेतले पाहिजेत याचा आराखडा तयार करत असत. त्यासाठी या संघटनेला योग्य ती आर्थिक मदत केली जात असे.

परंतु पुढील काळात इंदिराजींचे सरकार जाऊन मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले. त्यांचा असा समज होता की रॉ ही संघटना इंदिरा गांधी यांनी विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केली आहे. त्यामुळे त्यांनी रॉ या संघटनेचे पंख छाटून त्यांचा निधी कमी केला.जवळजवळ रॉ ही संघटना बंदच पडली.

त्यामुळे रॉ या संघटनेचे कामकाज ठप्प झाले. त्याचवेळी पाकिस्तानमध्ये चीनच्या मदतीने अण्वस्त्र बनवण्याचा कार्यक्रम सुरू होता. मोरारजी देसाई यांनी जर या संघटनेचे पंख छाटले नसते आणि या संघटनेला आर्थिक बळ दिले असते किंवा हा कार्यक्रम पुढे तसाच राबवला असता तर पाकिस्तानचा अवस्त्र बनवण्याचा कार्यक्रम भारताने हाणून पाडला असता.व आज जे काही पाकिस्तान कडे अवस्त्र आहे ते नसते.

अजित डोवाल यांनी एका कार्यक्रमात सांगितलं होतं. ते पाकिस्तान मध्ये गुप्त माहिती मिळवण्यासाठी गेले होते, तेव्हा तेथे अनेक गोष्टी घडायच्या. काही प्रसंग त्यांच्या जीवावर बेतणारेही झाले.

पाकिस्तान मध्ये असताना त्यांना एका माणसाने बरोबर ओळखलं होतं. आणि ते चांगलेच फसले होते. सन 1981 ते 1987 अशी सहा वर्ष अजित डोवाल हे पाकिस्तान मध्ये अधिकृतरित्या होते. भारताच्या रॉ ह्या गुप्तचर संघटनेसाठी काम करीत होते. 

परंतु त्या आधी 1977 साली गुप्तचर संघटनेसाठी गुप्तहेर म्हणून काम करीत असताना पाकिस्तान मधील रावळपिंडी या शहरा जवळील "कहूता" या गावी पाकिस्तान अवस्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यासाठी पाकिस्तानने E. R. L. इंजिनीयर रिसर्च लॅब संस्था स्थापन केली होती.आणि याचीच माहिती मिळवण्यासाठी अजित डोवाल सक्रिय होते. त्यासाठी अजित डोवल यांना वेगवेगळे वेश परिधान करावे लागत असत. व सतत वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत असे. व फिरावे लागत असे. त्यासाठी त्यांनी मुस्लिम वेश परिधान केला होता.

एकदा लाहोर मध्ये असताना एका मशिदीमध्ये त्यांच्या कामासाठी ते गेले होते. मशिदी मधून बाहेर येताना त्यांना असे जाणवले की बाहेर एका कट्ट्यावर बसलेला एक मुस्लिम मौलवी एकसारखा माझ्याकडे पाहत आहे व मला सतत निरखत आहे.अजित डोवल यांना थोडंसं अस्वस्थ वाटलं. तेवढ्यात त्या मौलवीने डोवाल यांना जवळ बोलावलं.आणि विचारलं तुम्ही मुस्लिम नाहीत तर तुम्ही हिंदू आहात. यावर अजित डोवाल म्हणाले मी हिंदू नाही मी मुस्लिम आहे.

त्यावर तो मुस्लिम मौलवी म्हणाला..

तुम्ही खोटं सांगता. तुम्ही खरोखर हिंदूच आहात.

तो मुस्लिम मौलवी दोवाल यांना म्हणाला तुम्ही माझ्याबरोबर चला, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय.

अजित डोवाल हे अतिशय हिमती व्यक्तिमत्व होते. म्हणून तर त्यांना भारताने या कामगिरीवर पाठवलं होतं.

अजित डोवाल त्या मुस्लिम मौलवी बरोबर चालू लागले. कारण त्याशिवाय त्यांचे पुढे कोणताही पर्याय शिल्लक नव्हता.

लाहोर मधील चार-पाच गल्ल्या चालून झाल्यावर एका छोट्याशा चाळीमध्ये खोली असलेल्या घरात ते दोघे गेले.

ते दोघे जमिनीवर बसले कारण तेथे त्यांच्याकडे खुर्ची नव्हती. मौलवी डोवल यांना म्हणाले. तुम्ही मुस्लिम नसून हिंदू आहात हे मी लगेच ओळखले कारण तुमच्या कानाच्या पाळीला छोटेसे छिद्र आहे.आणि ते केवळ हिंदूंचेच असते.

अजित डोवाल हे अतिशय हुशार होते. ते म्हणाले आमच्याकडे काही भागात कानाला छिद्र असते. पूर्वी मी हिंदूच होतो परंतु नंतर मुस्लिम बनलो आहे.

यावर तो मौलवी म्हणाला नाही... अजूनही तुम्ही हिंदूच आहात..

अजित डोवाल यांना शेवटी मान्य करावेच लागले. ते म्हणाले होय अजूनही मी हिंदू आहे. परंतु तुम्हाला कसं कळलं?

यावर तो मौलवी म्हणाला.. मीही हिंदूच आहे. असे म्हणून ते रडू लागले.

माझं संपूर्ण कुटुंब या पाकिस्तानी लोकांनी मारून टाकलं. मी कसातरी त्यांच्या तावडीतून वाचलो.आणि पर्याय नसल्यामुळे मी मुस्लिम वेश धारण करून मौलवी बनलो.आता वेगवेगळ्या मशीदी पुढे बसून मी माझा उदरनिर्वाह करत आहे.ज्यावेळी तुझ्यासारखे मुस्लिम वेश धारण करणारे लोक भेटतात.तेव्हा मी त्यांना बरोबर ओळखतो.आणि मला खूप आनंद होतो.

त्या मौलवीने त्याची छोटीशी पत्र्याची पेटी उघडली आणि आत मध्ये असलेला भगवान शंकराचा व दुर्गादेवीचा छोटा फोटो मला दाखवला.मी भक्ती भावाने त्या फोटोला वंदन केले.

त्या मौलवीने सांगितले. मी अजूनही गुप्तपणे माझा धर्म बदललेला नाही. मी अजूनही या देवांची रोज पूजा करत आहे. त्याने डोवल यांना सांगितले. तू लवकरात लवकर या कानाची छिद्रे बुजवून टाक. कारण दुसरे कुणी जर ओळखलं तर तू चांगलाच अडचणीत येशील. असे म्हणून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

डोवाल यांनी मी कोण आहे हे त्या मौलवीला सांगू शकले नाहीत. कारण त्यांना तशी परवानगी नव्हती.

पुढे अनेक वर्ष पाकिस्तान मध्ये राहिले त्यांना त्या माणसाला खूप काही मदत करावी असे वाटायचे. परंतु त्यांना त्यासाठी काहीही करता आले नाही. याबद्दल त्यांना वाईट वाटते.

डोवाल यांना गुप्तहेराची कामगिरी बजावत असताना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले, अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. परंतु देशासाठी त्यांनी हे सर्व सहन केले.

रामदास तळपे 

गावाकडचे दिवस बालमित्र मच्छिंद्र

मच्छिंद्र हा माझा बालमित्र. लहानपणा पासून जेव्हा कळायला लागले अगदी तेव्हापासूनचा. त्याचे जर नाव जरी मच्छिंद्रनाथ असले तरी सारा गाव त्याला मच...

विठू नांगरे कलंदर माणूस