शंकर दादा



शंकर वनघरे  हा माझ्या आत्याचा मुलगा. माझ्यापेक्षा जवळजवळ दहा वर्षांनी मोठा.परंतु लहानपणापासून मोठा वात्रट होता.आई-वडिलांचा एकुलता एक असल्यामुळे अति लाडामुळे तो शाळा शिकला नाही.

लहानपणी तो शिकायला आमच्याकडे होता.एकदा अचानक तो गायब झाला.त्याला सगळीकडे शोधून पाहिले परंतु तो काही सापडला नाही.तेव्हा सहज आडात पडला की काय बघायला लोकांनी जेव्हा आडात शोध घेतला तेव्हा तो आडात अगदी तळाशी बसून होता.आडात अगदी कमी पाणी होते म्हणून नशीब.त्याला लोकांनी आडातून बाहेर काढले.आणि उगाच नसती आफत नको म्हणून माझ्या वडिलांनी त्याची रवानगी त्याच्या गावी केली.

एकदा त्याने सातवीच्या वार्षिक परीक्षेच्या वेळी मराठीचे पेपर मध्ये प्रश्नाचे उत्तर म्हणून त्यावेळी फेमस झालेली गाणे जवा नवीन पोपट हा हे लिहिले होते आणि नापास झालो होता.त्याने त्याच्या सातवी नापासच्या दाखल्यावर नापासच्या पुढील ना ब्लेडने खोडून पास असे भासवले होते.

आठवीत सतत तीनदा नापास झाल्यावर त्याला आमच्या वडिलांनी म्हशी घेऊन दिल्या होत्या.रोज नदीकाठी म्हशी चारायला न्यायाच्या.म्हशीबरोबर नदीत डुंबायचे.दुध पिऊन व्यायाम करायचा.असा शंकर दादाचा नित्यक्रम झाला होता.

शंकर दादा रोज रात्री लोकांच्या शेतातील कोवळी मक्याचे ताटवे उपटून आपल्या म्हशीना आणायचा.त्यासाठी रोज तो वेगवेगळ्या शेतात जायचा.मला त्याला रात्री अपरात्री सोबत जावे लागायचे.

आमच्या मामाने म्हणजेच त्याच्या वडिलांनी पूर्वी पैलवानकी  केली असल्यामुळे शंकरदादा भागातील एक नामांकित पैलवान व्हावा असे त्यांना वाटत होते.आणि लवकरच त्यांचे स्वप्न शंकरदादाने पूर्ण केले.शंकरदादा भागातील एक नामांकित पैलवान झाला.भागातील यात्रा मधून तो अनेक कुस्त्या निकाली करायचा.दोन मिनिटात समोरचा पैलवान चितपट व्हायचा.असे अनेक डाव शंकर दादाकडे होते.

शंकर दादा पहाटे व्यायाम करायचा.त्यामुळे नाईलाजाने मला देखील पहाटे उठावे लागे व इच्छा नसताना देखील  त्याच्याबरोबर जोर बैठका काढाव्या लागत.

मी लहान असताना एकदा त्याच्याबरोबर म्हशीकडे कडे गेलो होतो. नदीच्या कडेला असलेल्या निवडुंगाला लालसर फळे आले होती. ती लालसर फळे शंकर दादांनी तोडली व त्यातील मला एक दिले.आम्ही दोघांनीही ती फळे खाल्ली. परंतु त्या फळाचे काटे माझ्या संपूर्ण जिभेला टोचले. व मी रडू लागलो. शंकर दादांनी मग माझ्या जिभेवरचे सर्व काटे हळूहळू काढून टाकले. परंतु त्या फळाची उग्र दर्प असलेली गोडसर चव अजूनही माझ्या मनात आहे.

शंकरदादाला पत्ते खेळण्याचा मोठा नाद होता.त्यासाठी तो कधीकधी माझ्याकडे पैसे मागायचा.मी काय बधत नाही असे त्याच्या लक्षात आल्यावर तो दहा रुपये दे संध्याकाळी वीस रुपये देतो असे आमिष दाखवायचा.शेवटी मला पैसे द्यावे लागायचे.पत्यात पैसे जिंकले की मला तो वीस रुपये द्यायचा. परंतु कधीकधी माझ्याकडले आहेत तेही पैसे जायचे.मग मात्र मी सावध व्हायचो. व शक्यतो त्याला पैसे द्यायला टाळायचो.

सन 1992-93 ला मी दहावीला असताना इतिहास व भूगोलचे सर आम्हाला खूपच गृहपाठ देत असत. गृहपाठ लिहून न आणल्यास अगदी वीस वीस छढ्या देत असत.माझ्या दृष्टीने इतिहास व भूगोल हे अतिशय सोपे विषय असल्याने मी दुसरे विषयांना अभ्यासासाठी प्राधान्य देत असे. माझी इतिहास व भूगोलचे गृहपाठ लिहून देण्यासाठी शंकर दादा धावून येत असे. त्याचे अक्षर सुंदर होते. परंतु त्याला डोके कमी होते. मी त्याला गाईडवर  खुणा केलेली प्रश्न व त्याचे उत्तरे वहीवर लिहायला सांगायचो. तो मन लावून सगळे गृहपाठ पूर्ण करायचा. त्या बदल्यात मी त्याला पत्ते खेळण्यासाठी दहा रुपये द्यायचो.

एकदा तो बटाटयांच्या काढणीसाठी सातगाव पठारला गेला होता.सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत तो बटाटे काढायचा.त्यावेळी त्याला चाळीस रुपये रोज मिळायचा.वीस पंचवीस दिवस काम करून शंकर दादा घरी आला.

त्यानंतर दोन दिवसांनी आम्ही आंघोळीसाठी नदीवर चाललो असता वाटेत एक कातकरी भेटला. त्याच्याबरोबर अजून एक कातकरी होता.तो शंकर दादाला बोलला.दादा हा कातकरी आमच्याकडे पाहुणा आला आहे. त्याला कोकणात जायचं आहे.त्याच्या घरी मॅटर झाला आहे.त्याला पैशाची अत्यंत गरज आहे.त्यामुळे तो त्याच्याकडली चैन विकणार आहे. दोन तोळ्याची चैन आहे.पाच हजार रुपये म्हणतोय तो. बघ घ्यायची आहे का तुला? कातकऱ्यांनी त्याच्या हातात चैन दिली.शंकर दादाजी चल बी चल सुरू झाली. शंकर दादा बोलला घेतले असते रे चैन, पण माझ्याकडे एवढे पैसे नाहीत कातकरी बोलला किती आहे तुझ्याकडे?

नऊशे रुपये आहेत शंकर दादा बोलला.

पाहूणा कातकरी बोलला. दोन हजार रुपये दे आणि चेन घेऊन टाक.त्याचवेळी माझ्या मनात शंका आली. ही चैन एक तर चोरीची असली पाहिजे. नाहीतर डुप्लिकेट.

मी शंकर दादाला बोललो. दादा नको आपल्याला चैन.चल उशीर झालाय.

शंकर दादा बोलला 900 रुपयाला द्यायचे असेल तर बघ. लगेच नऊशे रुपये रोख आणून देतो. माझ्याकडे तेवढेच आहेत.

पाहुणा कातकरी बोलला.दोन हजार रुपयाला घे.आता 900 दे व बाकीचे 1100 मी नंतर आल्यावर घेईन. मी शंकर दादाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्याने माझे ऐकले नाही. लगेच घरी जाऊन त्याने 900 रुपये आणले. आणि कातकऱ्याला दिले व चेन घेतली.चैन गळ्यात घालून तो चालू लागला. तो एकदम खुशीत होता. त्याचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता. परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही.

आठच दिवसात चैनीचा रंग बदलला. पिवळी धमक असलेली चेन आता काळपट दिसू लागली. म्हणून आम्ही तज्ञ लोकांकडे जाऊन चैन तपासून घ्यायला गेलो त्यावेळी त्यांनी सांगितले अरे ही चैन बाजारी आहे.वीस पंचवीस रुपयाची आहे.त्यावेळी शंकर दादाच्या पायाखालची वाळू सरकली.तो एकच बोलू लागला. पैसे गेल्याचे दुःख नाही रे.परंतु वीस पंचवीस दिवस मी रोज सकाळी नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत बटाटे काढायचो. ते कष्ट माझ्या डोळ्यापुढे येते.असे म्हणून तो दुःखी झाला.मी त्याला बोललो.आता दुःख होऊन काय उपयोग ? मी तुला पहिलेच सांगितले होते. परंतु तुला हाव नडली त्याला मी काय करणार.

शंकर दादाला लोकांची टिंगल करायची खूपच सवय होती. तो कोणत्याही माणसाची टिंगल करायचा. एकदा त्याने आम्हाला उघड आव्हान दिले. मी कुणाची ही टिंगल करू शकतो. एकदा तेथील जिल्हा परिषद सदस्य यांची तू टिंगल करू शकतो का ? असे आम्ही त्याला विचारले. तर तो लगेच तयार झाला. परंतु त्या बदल्यात तुम्ही काय देणार? असा आम्हाला त्याने प्रश्न केला.

तुला अब्बास सेठच्या हॉटेलात मिसळ खायला घालीन.आणि टिंगल नाही केली तर तू आम्हाला मिसळ खायला घालायची अशी आम्ही पैज लावली.दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच जिल्हा परिषद सदस्य असलेले कै.नानासाहेब कशाळे अब्बास शेठच्या हॉटेलला चहा पिण्यासाठी आले.त्यांच्याबरोबर अनेक स्थानिक लोक होते.शंकर दादा आणि आम्ही तिथे गेलो.लगेच शंकर दादाने नानासाहेब कशाळे यांची टिंगल सुरू केली. त्यांनी पण खिलाडू वृत्तीने हसून दाद दिली.तेव्हा मात्र आम्हाला शंकर दादाला मिसळ खायला घालावी लागली. असा हा शंकर दादा.

शंकर दादा आणि मी त्यांच्या अंगणात असलेल्या खटार गाडीत झोपायचो.एकदा आम्ही खटार गाडीत आकाशाकडे तोंड करून झोपलो असता आकाशातून एक पेटलेला उल्का आमच्या दिशेने अत्यंत वेगाने खाली कोसळू लागला.आम्ही दोघेही घाबरून गेलो. शक्यतो उल्का आकाशातच पेटतो व नष्ट होतो.परंतु हा पेटलेला उल्का आमच्या बाजूलाच येऊन पडला. लागलीच आम्ही दोघे उल्का पडला होता त्या ठिकाणी गेलो. तो लालबुंद दगड हळूहळू  थंड झाला.अजूनही तो उल्का शंकर दादाकडे आहे.

असाच एकदा गावाला असाताना माझा मित्र आजारी पडला होता.भगताने त्याला खुप मोठे भुत लागले असुन हे भुत उतरावे लागेल व रोगी बरा झाल्यावर  उतारा म्हणुन एक बोकडाचा बळी द्यावा लागेल असे सांगीतले.परंतू एवढा खर्च आवाक्याबाहेर असल्याने मित्राचे वडिल चालढकल करू लागले.भगत सारखाच येऊन त्यांना सांगू लागला.ते भुत माझ्याकडे येऊन सतत मला तु सांगीतलेल्या प्रमाणे रोगी बरा झाला आहे.आता बोकडाचा बळी लवकर द्या.नाहीतर  तुझ्याकडेच पहातो.असे म्हणत आहे.तुम्ही ताबडतोब तयारी करा नाहीतर पुढे मी जबाबदार राहणार नाही.

मित्राचे वडिल सुशिक्षित असुनही हादरले.लगेच एका शुक्रवारी गावच्या हद्दीच्या बाहेर मध्यरात्री बोकडचा बळी देण्याचा कार्यक्रम ठरला.त्या प्रमाणे तयारी करण्यात आली.या कार्यक्रमाला माझ्यासारखेच अनेक उत्साही लोक जेवणासाठी आले होते.बाहेर गावचे अनेक नातेवाईक व त्यांचे मित्र जेवणासाठी आले होते.बोकडाच्या मानाने जेवायला आलेली गर्दी पाहुन आपल्याला आता अर्धपोटी रहावे लागते की काय अशी मला शंका आली.मी शंकरदादाला बोलुन दाखवली.तो म्हणाला अजिबात काळजी करू नको मी आहे.कारण तो खुप वेळा असल्या कार्यक्रमांना जाऊन आला होता.

ठरल्या प्रमाणे सर्व तयारी झाली.भगताच्या अंगात देव संचारला. तो सांगेल तो विधी करण्यात आला.पळसाच्या मोठया पानावर नुसत्याच भरपुर मटणाचा नैवेद्य भुतासाठी थोडया अंतरावर भगताने सांगीतलेल्या ठिकाणी ठेवण्यात आला. नैवेद्य ठेवायला अर्थात श्री शंकर वनघरे गेला होता. विशेष म्हणजे हा नैवेद्य थोडयावेळाने परत आणुन भगताने खायचा असतो. इकडे विधी चालुच होता.भगताला नविन धोतर,नेहरूशर्ट,टोपी व उपरने व रोख एक हजार रूपये देण्यात आले.हा कार्यक्रम चालू असताना शंकर रावने भुताला दाखवलेला नैवेद्य उचलुन आणला.व थोडया अंतरावर आम्ही दोघांनी जाऊन त्याचा यथेच्छ आस्वाद घेतला.व परत गर्दीत येऊन मिसळलो.रात्र बरीच झाली होती.विधी संपला सर्वजण जेवायला बसलो.भगतासाठी भुताला दाखवलेला नैवद्य आनायला सांगीतला.तेथे अर्थातच नैवेद्य नव्हता.खरोखरच भुताने प्रत्यक्ष येऊन नैवद्य खाल्ला अशी भगताने सगळ्या जमलेल्या लोकांना सांगीतले.भुत फार जालीम होते.ते सतत माझ्याकडे जेवण मागत होते.पाहिलत ना तुम्ही?प्रत्यक्ष .झाली ना तुमची खात्री? असे म्हणुन भविष्यात अशीच सावज मिळविण्यासाठी स्वत:ची जाहीरात करून घेतली.आणि पुढे हाच भगत पश्चिम भागात नावारूपाला आला. डाँक्टर पेक्षा पेशन्टची गर्दी याच्याकडे होऊ लागली.(त्या काळात एवढी प्रचंड अंधश्रद्धा होतो की भुताचा नैवेद्य खाणे  दुरच पण ठराविक ठिकाणी असलेल्या भुताचे नाव जरी काढले तरी अंगावर काटा यायचा.तेव्हा एवढी हिम्मत आम्ही दोघे सोडुन कुणाच्यातच नव्हती.विशेष म्हणजे तेव्हा मी दहावीला होतो.

शंकर दादा वयाने एवढा मोठा झाला आहे. तरीसुद्धा त्याचा पोरकटपणा अजून कायम आहे. एकदा त्याच्या गावातील एका दुकानदाराचे घर जळून खाक झाले होते.माणुसकीच्या दृष्टिकोनातून मी शंकर दादा बरोबर त्यांच्या जळालेल्या घरी गेलो. घर पूर्ण जळून खाक झाले होते.घरातील बरेच साहित्य जळले होते.दगडाच्या भिंती सुद्धा धुराने काळ्या कुट्ट झाल्या होत्या. जळालेल्या घराचा मालक आणि मी घराची पाहणी करत होतो. आणि अशावेळी शंकर दादा खाली अर्धवट जळालेले शेंगदाणे गोळा करीत होता. त्याने बरेच शेंगदाणे गोळा करून एकेक खायला सुरुवात केली. आम्हाला म्हणाला देखील शेंगदाणे खूप खरपूस आहेत बर का. अशावेळी आम्ही दोघांनीही कपाळावर हात मारून घेतला. दुकानदार बोलला अरे शंकर माझे एवढे नुकसान झाले आहे आणि तु खुशाल शेंगदाणे खातो. तुला काही लाज लज्जा आहे की नाही. यावर शंकर दादा बोलला.आप्पा झाले ते झाले.

तुला नुकसान भरपाई भेटेल की. यासाठी आम्ही प्रयत्न करू काळजी करू नको.आणि इतकेच नव्हे तर शंकर दादाने त्यांना नुकसान भरपाई देखील मिळवून दिली होती.

शंकर दादाने आयुष्यात कधीच काम केले नाही. केवळ म्हशी सांभाळणे, नदीवर पोहणे, मासे पकडणे, शेळ्या मेंढ्या विकत घेऊन त्या चाकणच्या बाजारात जाऊन विकणे. म्हशींची खरेदी विक्री करणे एवढेच तो आयुष्यात काम करू शकला. त्याने कधीही कुठल्याही गोष्टीचे टेन्शन घेतले नाही. कोणत्याही दुःखद प्रसंगामुळे आणि संकटामुळे तो हातबल झाला नाही.

एकदा मी त्याच्याकडे खूप रात्र झाल्यामुळे  मुक्कामाला राहिलो होतो. रात्री जेवण करून आम्ही ओटीवर झोपलो. परंतु त्याच्या दारात चार-पाच कुत्री येऊन भुंकू लागत. आम्हाला काही झोप येत नसे. मग आम्ही दरवाजा उघडून त्या कुत्र्यांना दूरवर हाकलत असु. आम्ही अंथरुणावर येऊन झोपलो ना झोपलो तो परत ती कुत्री दारात येऊन ओरडत असत.त्यामुळे आम्हा दोघांनाही झोप काही येत नव्हती. तो म्हणाला अरे आजच असं झालय. तू आला म्हणून की काय ? त्यानंतर आम्हाला केव्हातरी डोळा लागला तोच दरवाजाचा खडखडाट ऐकू आला. शंकरदादा ने दरवाजा उघडला तर बाहेर बाळू कोरडे उभा होता. तो म्हणाला 

शंकर अरे आजी वारली..तू एक काम कर. मंदोशीला नातेवाईकांकडे जा व त्यांना निरोप दे. तोपर्यंत आम्ही तयारी करतो. बाकीची माणसे नातेवाईकांना बोलवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतो. आम्ही दोघेही उजाडल्यावर मंदोशीला गेलो.

शंकर दादाचे एका मुलीचे लग्न झाले असून एक मुलगी परदेशात नोकरी निमित्त आहे.. व एक मुलगा चाकण एमआयडीसी मध्ये कामाला आहे. आजही शंकरदादा जेव्हा भेट होईल तेव्हा कडकडून मिठी मारून भेटतो. व जुन्या आठवणीत रमून जातो .



ब.सा.ठोकळ गुरुजी


ब.सा.ठोकळ  गुरुजी (व्यक्तीचित्र)

बबन सावळेराम तथा ब.सा.ठोकळ हे लोकप्रिय व उत्तुंग असे व्यक्तिमत्व होते. सुशिक्षित लोकांत ते ब.सा.ठोकळ होते. तर सर्व सामान्य लोक त्यांना "बहिणू मास्तर" म्हणत असत

काळा सावळा वर्ण, उंच व धीप्पाड शरीरयष्टी, हसतमुख असा चेहरा निळ दिलेले परीट घडीचे पांढरे शुभ्र धोतर व पैरण, डोक्यात थोडीशी तिरकी घातलेली गांधी टोपी पायात कोल्हापुरी वाहणा असा त्यांचा भारदस्त वेश होता.ब. सा. हे अतिशय प्रेमळ असे व्यक्तिमत्व होते.

ब. सा. यांचा जन्म साधारणपणे 1936 सालचा चा होता. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात  नायफड सरेवाडी  या आदिवासी दुर्गम गावात त्यांचा जन्म झाला.अतिशय गरीब व हालाखीची परिस्थिती असूनही त्यावेळी शिक्षणाचा गंध नसतानाही ते सातवी पर्यंत शिकले. या सातवीला (आताची S. S.C.) त्यावेळी व्ह.फा. म्हणत. (Varnaculur final) 

व्ह. फा. झाल्यावर पुढे शिक्षक होता येत असे. झालेही तसेच. ब. सा. शिक्षक झाले. खामुंडी ता.जुन्नर येथे त्यांची पहिली नियुक्ती झाली.1965 च्या आसपास ते खामुंडी गावी शाळा मास्तर म्हणून रुजू झाले.तेथे ते 13 वर्ष होते. तेथे ते विदयार्थ्यांना ज्ञानार्जनाचे कार्य करत असताना ज्युनियर पी. टी.सी. झाले. नंतर पुढे ते  सीनियर पी.टी.सी. देखील झाले.(आताचे डी. एड.) त्या काळात अपवादानेच लोक ज्युनियर पिटीसी किंवा सीनियर पिटीसी व्हायचे. त्यामुळे त्यांना मुख्याध्यापक पदाची संधी मिळत नसे. परंतु ब.सा. यांना मात्र मुख्याध्यापक पदाची संधी मिळाली. आणि तीही त्यांच्या नायफड या गावात.

त्या काळात नायफड येथे सातवीपर्यंत शाळा होती. शंभर दोनशे मुले. दहा ते अकरा शिक्षकांचा स्टाफ  आणि त्यांचे मुख्याध्यापक ब.सा.ठोकळ हे होते.

सडेतोड व परखड  बोलणे, गुणग्राहकता, रुबाबदार व्यक्तिमत्व, समोरच्याकडून काम करून घेण्याची हातोटी, आदरयुक्त दरारा, प्रेमळ वाणी, मुद्द्याला धरून बोलणे ही ब.सां. च्या अंगी असलेले उपजत गुण होते.

वाडीत त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्याचप्रमाणे आदरयुक्त दरारा देखील.वाडीत कोणाचेही कोणतेही काम असो.पहिला सल्ला घ्यायला लोक ब.सां.कडे येत असत.

सरेवाडी नायफड हे त्यांचे जन्मगाव. सन 1994 ला ते शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यावर  त्यांनी वस्तीची मिटिंग घेतली.आपल्या वस्तीत मंदिर नाही. रस्ता नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. यासाठी काहीतरी करणे अत्यंत आवश्यक आहे.लोकांना त्यांचे विचार पटले.सरेवाडी हे एका उंच डोंगरावर वसलेली वाडी.

कोणत्याही प्रकारचे रस्ते नाहीत.पायवाटेने डोंगर चढून वर जायचे. त्या काळात सरेवाडीला साधी सायकल सुद्धा जात नव्हती. मुख्य रस्त्यापासून सरेवाडी हे साधारण तीन ते चार किलोमीटर आंतर असेल. शिवाय डोंगर वाटेने एखादा किल्ला चढून जावा तसेच जायचे. 

आणि अशा परिस्थितीत सरेवाडीच्या ग्रामस्थांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.आणि तोही ब.सा.यांच्या नेतृत्वाखाली. त्या काळात सरेवाडी ची लोक आठवड्यातून दोन वेळा जंगलात शिकारीला जात असत. नेहमीच त्यांचा मांसाहार ठरलेला.आणि अशातच विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर बांधायचा निर्णय म्हणजे साधीसुधे काम नव्हते.तेथील लोकांच्या मनात परमार्थ बिंबविण्याचे काम खऱ्या अर्थाने ब.सा. यांनी केले.

मंदिरासाठी लोक वर्गणी काढून पैशाची जमवाजमव केली. दगडविटा सिमेंट वाळू लोखंड व पत्रा इत्यादी साहित्य लोकांनी अक्षरशा डोक्यावर वाहून चार किलोमीटर डोंगरावर असलेल्या सरेवाडी येथे आणले. तन-मन-धन अर्पण लोक काम करीत होते.अल्पावधीतच  मंदिराचे काम पूर्ण झाले. विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. होम हवन, जेवणाच्या पंगती,भजन व किर्तन यांनी सरेवाडी दुमदुमून गेली. कधीही सरेवाडीला न फिरकनाऱ्या लोकांचे तसेच परमार्थिक लोकांचे आणि नातेवाईकांचे पाय सरेवाडी ला लागू लागले.याची संपूर्ण श्रेय ब.सा.आणि सरेवाडीच्या ग्रामस्थांना द्यावे लागेल.प्रचंड एकजूट, एक विचार, कामावर असलेली निष्ठा, सरेवाडीच्या  ग्रामस्थांनी जगाला दाखवून दिली.

सरेवाडीला महिन्याच्या दोन्ही एकादशींना हरिपाठ, हरी किर्तन,अन्नप्रसाद व हरिजागर होऊ लागला. त्यानिमित्ताने नातेवाईक व परमार्थिक लोकांचे जाणे येणे वाढू लागले. यासाठी त्यांना हरिभक्त परायण  कै.श्री.डवणे महाराज यांनी खूप साथ दिली. सरेवाडी चे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात घेतले जाऊ लागले.

ब.सा. हे माझे सख्खे चुलत आजोबा होते.माझ्या बहिणीचे लग्न होते.त्यावेळी गावामध्ये दोन गट होते. एका गटातील लोक बोलायचे दुसऱ्या गटाला लग्नाला बोलावू नका. नाहीतर आम्ही येणार नाही. माझे सर्वांबरोबर संबंध चांगले होते. त्यामुळे सर्वांना लग्नकार्याला बोलवने मला क्रमप्राप्त होते. लग्नाच्या वऱ्हाडाचे संपूर्ण जेवण व आलेल्या पाहुण्यांचे आदर सत्कार मानपान गावातले लोक करत असत.

त्या काळात  लग्नाचे संपूर्ण नियोजन गाव पातळीवर होत असे. अशातच आमचे घरी पहिलेच लग्नकार्य. त्यातच वडील निर्वातलेले. अशावेळी काय भूमिका घ्यावी.याचे प्रचंड दडपण  माझ्या मनावर पडले होते.आणि अशातच मला आठवण झाली माझे आजोबा ब.सा.यांची. मी तात्काळ असा मित्र काशिनाथ जढर यांना घेऊन सरेवाडीला गेलो. ब.सा. आजोबा यांना माझी समस्या सांगितली. त्यांनी अजिबात काळजी करू नको.लग्नाच्या दिवशी सकाळी आठ वाजेपासून ते लग्न लागेपर्यंत संपूर्ण सरेवाडी येथील बायका मुलांसह सर्वाना तुमच्या गावी हजर करतो. सर्व लग्नकार्य आम्ही वहिवाटून नेऊ.अजिबात काळजी करू नको.परंतु लग्नकार्याला संपूर्ण गावाला बोलवणे कर. कुणालाही चुकवू नको.लग्नकार्य हे वारंवार होत नसते.मतभेद हे काही दिवसांनी मिटतीलही. परंतु लग्नाला न बोलावल्याची रुख रुख कायम राहील असे मला सांगितले. त्यामुळे माझ्यावर असलेल्या दबाव एका क्षणात  निघून गेला.

लग्नाच्या दिवशी खरोखरच सकाळी सरेवाडीतील संपूर्ण ग्रामस्थ हजर होते.जेवण बनवण्यासाठी तांदूळ व इतर साहित्य आम्ही जमा करत असतानाच गावातले दोन्ही गटाचे लोक तेथे दाखल झाले.आणि म्हणू लागले. लग्नाचे सर्व नियोजन आम्ही करू.पाहुण्यांना कशाला सांगता.असे म्हणून  गावकऱ्यांनी लग्नाच्या नियोजनाची सर्व संपूर्ण सूत्रे हाती घेतली. त्यानिमित्ताने गावातील दोन्ही गट एकत्र आले ही किमया केवळ ब.सा.ठोकळ यांची होती.

 त्यांच्या मुलीचे म्हणजेच माझ्या मावशीचे लग्न ठरले होते.धामणखेल ता.जुन्नर येथील नवरदेव. तेव्हा मला त्यांनी बोलावून घेतले. तुझी मावशी धामणखेल येथे दिली आहे. तेव्हा तेथील  त्यांचे घरदार, शेतीवाडी बघून ये. असं मला आदेश दिला. मी बोललो, बाबा हे काम मोठया मोठ्या माणसाचे.तुम्हीच चार दोन मोठी माणसे पाठवा व त्यांना बघून यायला सांगा. यावर ते म्हणाले ते काही नाही! यासाठी तूच जाऊन ये.जोडीला काशिनाथ जडर याला घेऊन जा. यावर मग मी काय बोलणार? 

त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून मी व काशिनाथ धामणखेल येथे जाऊन आलो.तेथील लोकांनी आमचे चांगले स्वागत केले. ठरल्याप्रमाणे सर्व घरदार, शेतजमीन इत्यादींची  इंत्यभूत माहिती काढून आलो.मावशीच्या लग्नाच्या वेळी लग्नाच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवलेली होती.

ते आजारी असताना दर पंधरा दिवसांनी ते मला भेटायला बोलवत. मी ही शक्य तेव्हा त्यांना भेटायला जात असे. अनेक गप्पागोष्टी होत. मी गेल्यावर त्यांना बरे वाटे. परंतु पुढे त्यांचा आजार बळावला. आणि एके दिवशी  ब.सा. आजोबा गेल्याची बातमी येऊन थडकली.ते ऐकून मी सुन्न झालो. मी ऐकतो आहे हे स्वप्न तर नाही ना. असे विचार मनात येऊन गेले. क्षणभर डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखे वाटले.

त्यांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांची परमार्थिक सेवा, समाजाच्या कामासाठी कायम धावून जाणे,सतत हसतमुख चेहरा, अडचणीत असलेल्या माणसाला कायम धीर देण्याची क्षमता, काम करून घेण्याची पद्धत हे सर्व आठवणीने मन उचंबळून आले. अशी माणसे पुन्हा होणे नाही. हे ही तितकेच खरे.


 

अशोक सुतार

अशोक सुतार', हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेला कलंदर माणुस. अशोक माझ्या पेक्षा चार वर्षांनी मोठा.शिवाय माझ्या शेजारीच लागुन त्याचे घर आहे. त्यामुळे त्याला मी  लहानपणापासून अतिशय जवळून ओळखतो.

अशोक हा लहानपणा पासून कुशाग्र बुद्धी असलेला, अत्यंत  हुशार मुलगा होता.त्याचा चौथी पर्यत कायम पहिला क्रमांक यायचा.त्याचे वडील लोहारकाम व सुतारकाम करायचे.शिवाय मामा टेलरिंग काम करायचे.त्यामुळे अशोक या तीनही कलांमध्ये लहानपणापासून पारंगत होता.

कब्बडी, कुस्ती व क्रिकेट मध्ये अशोकचा हात कुणी धरू शकत नव्हते. 

त्यावेळी भागात सर्व गावांमध्ये चौथी पर्यंतच शाळा असल्यामुळे पश्चिम भागातील मुलांना पुढील शिक्षणासाठी डेहणे येथे जावे लागत असे.तेव्हा गावातील सर्व शाळकरी मुलांना protection (संरक्षण) पुरवण्याचे काम अशोक करायचा. गावातील एखाद्या मुलाशी कुणी बाहेरच्या गावच्या मुलाने मारामारी केली.. व अशोकला नंतर कळले तर अशोक त्या मुलाला चांगलाच चोप देत असे.त्यामुळे आमच्या गावातील मुलांमुलीकडे वाकड्या नजरेने कुणी पहात नसे. एवढा अशोकचा त्यावेळी वचक होता.

अशोकला खालच्या वर्गातील मुले अशोकदादा' म्हणत असत. अशोक वरच्या वर्गात असल्याने परिक्षेच्या वेळी त्याच्या पुढे मागे खालच्या वर्गातील गावातील कुणीतरी मुलगा/मुलगीचा क्रमांक यायचा.तेव्हा अशोक पर्यवेक्षक बाहेर गेल्यावर पटकन त्या मुला /मुलीला तेवढ्या वेळात उत्तरे सांगायचा. 

तो काळ क्रिकेट या खेळाने भारलेला काळ होता.प्रत्येकाच्या मनात क्रिकेट या खेळाने "गारूड" केलं  होतं. सुनिल गावस्कर, रवी शास्री,कपीलदेव,व्यंकटेश प्रसाद, संजय मांजरेकर यांचा सुवर्णकाळ होता.अशोकच्या मामाकडे तेव्हा रेडिओ असायचा. त्याकाळी टि.व्ही.नव्हता. तेव्हा वन डे मँच हा प्रकार नसायचा.टेस्ट मँच खेळली जायची. ही मँच तीन दिवस चालायची.गावातील सर्व तरूण पोरं अशोकच्या दारात  काँमेंट्री ऐकायला जमत असत.यातुनच गावात क्रिकेटचे बीज रोवले गेले.

अशोकचे मामा बाळू सुतार हे लाकडाची छान बँट बनवून द्यायचे.

श्री. नामदेव शंकर तळपे यांच्या नेतृत्वाखाली श्री. काळभैरवनाथ क्रिकेट संघाची स्थापना झाली.अशोक सुतार डावखुरा फलंदाज सेहवाग सारखी स्फोटक फलंदाजी करायचा.त्याला उत्तम साथ (The wall) श्री.चंद्रकांत वाघमारे (बत्या) करायचा.तेव्हा सामने हे आँल आऊट असयचे.ही जोडी लवकर आऊट होत नसे.जोडीला श्री.चिमण जढर उत्कृष्ट बँट्समन व बाँलर,धोनी सारखा हेलीकँप्टर शाँट्स मारायचा..व धावगती वेगाने पुढे न्यायचा परंतू लवकर बाद व्हायचा. श्री.वामन जढर, श्री.मारूती आंबवणे (विकेट किपर) श्री.सोपान तळपे व कैलास सुतार (कुडे गाव) मध्यमगती गोलंदाज श्री.किसन आंभवणे कै.अहिलू (गोट्याभाई) श्री.कांताराम तळपे हे ब-यापैकी खेळाडू होते.तर श्री.नामदेव तळपे,मध्यम गती गोलंदाजी करत असे, श्री.धोंडू विष्णू तळपे हा शोएब अख्तर सारखी सुपरफास्ट गोलंदाजी करायचा.भलेभले फलंदाज त्याला भ्यायचे. तर चीमन जढर फास्टर गोलंदाजी करायचा.सोपान तळपे हा ही मध्यमगती गोलंदाज होता.

परंतू अशोक सुतार हा एकमेव असा फलंदाज होता की संपुर्ण मँच फिरवायचा.आणि मंदोशीचा विजय सुकर करायचा.त्या

 काळात सन १९८४ ते १९८८ मध्ये घोटवडी येथे तृतीय क्रमांक,डेहणे येथे चतुर्थ क्रमांक टोकावडे येथे तृतीय क्रमांक तर  कारकुडी येथे द्वितीय क्रमांक मंदोशी संघाने पटकावला होता.या चारही क्रिकेट स्पर्धा मध्ये अशोक सुतारने कमालीची बँटींग करून संघाला सामने जिंकून दिले होते. त्यामुळे गावातील सर्व ज्यांना क्रिकेट मधले ओ की ठो कळत नाही अशा सर्व अबालवृद्ध व माता भगीनींना संघाबद्दल प्रचंड अभिमान वाटायचा.गावातील लोक कौतुक करायचे.बाहेरगावी सामणे असले की गावचे लोक सामने पहायला पोरांबरोबर जात असत.

सन १९८५ साली मंदोशी गावाने श्री.नामदेव तळपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नावठिका (मंदोशी) येथे फेब्रुवारी महिन्यात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. तेव्हा जवळजवळ १४ संघ दाखल झाले होते.या स्पर्धा तीन दिवस चालल्या होत्या. तेव्हा तेथे कै.देवराम तळपे यांनी बेसन लाडू व भजीचे दुकान लावलेले मला चांगले आठवते.शिवाय बर्फाच्या गारेगारी विकणारे पाच सहा सायकल स्वार दाखल होतेच.

स्पर्धेमध्ये व्यत्यय निर्माण करणाऱ्या टोकावडे गावच्या एक जणाला श्री.लक्ष्मण बाळू हुरसाळे यांनी चोप दिल्याने प्रचंड दहशत निर्माण झाली होती.त्या धसक्यानेच पुढील स्पर्धा सुरळीतपणे पार पडल्या होत्या. 

टोकावडे व कारकुडी संघाला हरवुन..मंदोशीचा संघ सेमी फायनल मध्ये गेला होता.नंतर सेमी फायनल मध्ये खरोशी संघाला धुळ चारली होती.प्रथम क्रमांक डेहणे दुसरा क्रमांक मंदोशी तीसरा क्रमांक तेरूंगण तर चौथा क्रमांक खरोशीचा आला होता.

खरोशी संघा बरोबर प्रथम गोलंदाजी करताना मंदोशी संघाने टिच्चून गोलंदाजी केली होती.श्री.धोंडू तळपे २ षटकात १५ धावा देऊन तब्बल तीन फलंदाज बाद केले होते.श्री. चीमन जढर यांनी दोन षटकात १६ धावा देऊन  दोन फलंदाज बाद केले होते.श्री,नामदेव तळपे यांनी दोन षटकात १४ धावा देऊन दोन फलंदाज बाद केले होते.तर श्री.सोपान तळपे यांनी दोन षटकात १९ धावा देऊन १ फलंदाज बाद केला होता. अशा प्रकारे आठ षटकांच्या या खेळात आवांतर धावासह ७३ धावा व ८ फलंदाज बाद झाले होते.

तर फलंदाजी करताना अशोक सुतार याने शेवट पर्यंत आउट न होता..३४ धावा केल्या होत्या. श्री.चंद्रकांत वाघमारे याने २१ धावा करून तो सातव्या षटकात बाद झाला होता.त्या नंतर आलेल्या श्री.चीमन जढर यांनी एका षटकात दोन षटकार व एक चौकाराच्या सहाय्याने १९ धावा करून मंदोशी संघाला दुसरा क्रमांक मिळवून दिला होता.या वेळी  मंदोशी ग्रामस्थांनी प्रचंड जल्लोष केला होता.

(या स्पर्धेची स्कोअर वही अजूनही मी जपुन ठेवलेली आहे.)*

विशेष म्हणजे अशोक सुतार हा उत्कृष्ट कुस्तीपटू देखील होता. लांग,बांगडी,पट,ढुंगनी,उपट ह्या डावात तो तरबेज असायचा. सलामीला खेळताना डोळ्याची पात लवते न लवते तोच लांग मारून प्रतिस्पर्धी पैलवान जमीनीवर उताना पडलेला दिसे.

अशोक सुतारची कुस्ती दोन मिनिटाच्या आत चितपट होत असे.प्रतिस्पर्धी पैलवानाला देखील आपण इतक्या लगेच कसे चितपट झालो हा भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे. आखाड्यात एकच जल्लोष पहायला मिळे.अशोक वर बक्षिसांची खैरात होई.अनेक पदके, सन्मानचिन्ह,वस्तू रोख रक्कम त्याला मिळाली.भागात एक नावाजलेला पैलवान म्हणुन त्याची गणना होऊ लागली,मंदोशी गावचे नाव अधीच श्री.बारकू तळपे, कै.खेमा तळपे कै.हरिभाऊ आंबवणे, श्री,विष्णू पांडू तळपे, श्री.विष्णू गोमा तळपे,श्री.कुशाबा आंबेकर,श्री.होनाजी मोसे, श्री,हरिभाऊ हुरसाळे यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते.त्या ध्वजाला पताका लावण्याचे काम अशोकने केले..गावचे नाव उज्वल केले.अतिशय सन्मानाची व प्रतिष्ठेची शेवटची कुस्ती त्याच्यावर लावली जायची.व तोही या संधीचे सोने करत असे.त्यावेळी त्याला गावातील/ भागातील लोकांचे अलोट प्रेम मिळाले,अमाप प्रसिद्धी मिळाली.

अशोकच्या नशिबाने त्याला लहान वयातच हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळाली..असे असतानाही यात्रेच्या हंगामात त्याची कुस्ती बहरतच होती. क्रिकेटच्या खेळात त्याची बँट तळपतच होती..त्यावेळी तो प्रसिद्धीच्या व लोकप्रियतेच्या शिखरावर होता.त्याच्या पुढे आम्ही तेव्हा पालापाचोळा होतो..    

से असतानाही त्याने कधीच माज केला नाही.गर्व,अभिमान बाळगला नाही..नाहीतर थोड्याशा प्रसिद्धीने अर्ध्या हाळकुंडाने पिवळे होणारे कितीतरी जण समाजात असतात.

एकदा गावात जातीयवादाची केस झाली होती.पुणे ग्रामीण चे एस.पी.साहेब गावात आले होते.त्यांनी दोनही पार्ट्यांना एकत्र बोलावुन घेतले..हे प्रकरण मिटवण्यासाठी अशोकने अत्यंत महत्वपुर्ण भुमीका बजावली होती.तेव्हा स्वतः एस.पी. साहेबांनी त्याचे अभिनंदन  केले होते.

परंतू नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.मुबईला गेल्यावर वाईट मित्रांच्या संगतीमीळे अशोक नशेच्या आहारी गेला...पुढे त्याची कंपनीही गुजरातला गेली..कंपनीने अनेक जणांना थोडेफार पैसे देऊन घरी पाठवले.त्यात अशोकही होता.

घरी आल्यावर अशोक घरे बांधण्याची कामे करू लागला. उत्तम कामामुळे त्याला घराची कामे मिळू लागली.त्याचे तेथेही नाव झाले.परंतू येथेही दारूने त्याचा पिच्छा सोडला नाही.दारू पासुन परावृत्त करण्यासाठी खुप लोकांनी प्रयत्न केले.परंतु तो बधला नाही.पुढे तो पुर्णपणे व्यसनाधीन झाला.लोक त्याला काम देईनात.मदत करीनात. या मुळे घरी सर्वांची उपासमार होऊ लागली.शेवटी त्याच्या पत्नीने ऊदरनिर्वाहासाठी राजगुरूनगर गाठले.अशोकही तिकडे गेला.मी त्याला खुप समजावून सांगीतले.त्याला मी दहा- बारा हजार रूपायाची हत्यारे विकत घेऊन दिली..काही दिवस त्याने चांगले काम केले..परंतू थोड्या दिवसातच तो पुन्हा दारू पिऊ लागला यामुळे त्याचे जवळचे नातेवाईक मित्र त्याला सोडून गेले. त्याला लोक टाळू लागले.ओळखीचा जो भेटेल त्याच्याकडे तो पैसे मागु लागला.लोक त्याला अर्थीक मदत करायला कचरू लागले.त्याची सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळाली..

आता कधीतरी अशोक दिसतो..हाडाची काडे झालेला अशोक...झोकांड्या खात रस्त्याने चाललेला अशोक...मळकी जीर्ण झालेली कपडे घातलेला अशोक ....तो बोलताना येणारा.प्रचंड उग्र दर्प..

त्याला पाहून मन सुन्न होते..काळीज चिरते.अगदीच गलबलून येते..मदत करायची इच्छा असुनही मदत करता येत नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल...😥😥


सुगीचे दिवस

 नवरात्रामध्ये भातशेती फुलो-यात असते.त्यानंतर शिवारातुन बांधावरून सकाळी किंवा दुपारनंतर फेरफटका मारताना एक वेगळीच मजा असते.वारा भणभणत असतो.त्या वा-याबरोबर भाताचा सुंदर  सुवास दरवळत रहातो.शिवारामध्ये अनेक जातीचे भातपीक लावलेले असते.परंतू प्रत्येक खाचराच्या बांधावरून चालताना वा-याबरोबर सुंदर असा सुगंध येत रहातो.जणू त्या खाचरातील भात पीक आपल्या अस्तीत्वाची जाणीव करून देत असते.

आता भाताच्या अनेक जाती उपलब्ध आहेत.अनेक संकरित जाती विकसित झाल्या आहेत.या जातीचे पीक भरपुर येते.प्रत्येक तांदळाची एक वेगळीच चव चाखायला मिळते.परंतु अस्सल गावरान तांदूळाचा भात खाण्यात जी मजा आहे ती मात्र कशातच नाही.

पुर्वी भाताचे अनेक देशी वाण होते.खडक्या, कोळंब, तामकुडा, तांबडा रायभोग,कमवत्या,जीर, इंद्रायणी असे ते वाण होते.पीक कमी परंतू चव मात्र अप्रतिम.भात जर शिजत असेल तर त्याचा दरवळ बाहेर अंगणभर येत असे.परंतू आता संकरित वाण आल्याने गावठी वाण कमी झाले आहेत.

भात कापणीचा हंगाम सुरू व्हायच्या आधी लोक आपापल्या  विळ्यांना लोहराकडुन धार लावून घेत.आमच्या शेजारीच चीमण लोहराचा भाता असे.सकाळी सात वाजल्या पासुन पंचक्रोशीतील लोकांची विळ्यांना धार लावण्यासाठी मोठी गर्दी व्हायची.संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम चालू असायचे.

गावातील वयोवृद्ध लोक भाताचे भारे बांधण्यासाठी भाताच्या  पेंढ्यांचेच आळे (दो-या) वळायचे.शिवाय भात साठवण्याच्या कणगी खाली बुडाला आधार म्हणुन पेंढ्याचीच गोल चुंबळ विणायचे.काही लोक नविन कणगी तयार करायचे तर स्रीया जुन्या रिकाम्या कणगी शेणाने सारवुन वाळवुन ठेवायच्या.ही सर्व तयारी आधीच करावी लागे.

भात कापणी

भात कापणीची जय्यत तयारी सुरू व्हायची.अगदी सकाळीच भात खाचरात जाऊन भाताचे पीक कापायला सुरूवात करायची.सुरूवातीला भात कापायला मजा वाटायची.नंतर मात्र डोक्यावरचे ऊन व सारखे वाकल्यामुळे कंटाळा यायचा.परंतू पाथ मागे राहता कामा नये या जाणीवेतुन भात कापायलाच लागले.आमच्याकडे भात कापणीला *येटाळणी* म्हणतात. 

अंधार पडे पर्यत भात कापायचे.नंतर घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करायची.दिवसमर भात कापल्यामुळे अंग अंबून जायचे.अंघोळ करताना अंगावर गरम पाणी घेतल्यावर स्वर्गीय आनंद व्हायचा.

जेवण झाल्यावर मात्र लगेच अंथरूणावर पडायचे.लगेचच  झोप लागायची.दुसऱ्या दिवशी मात्र उठुशीच वाटायचे नाही.सर्व अंग ठसठस करायचे.या कुशीवरून त्या कुशीवर होता येत नसायचे.परंतू नाईलाजाने उठावेच लागे.

पुन्हा सर्व आवरून पुन्हा शेतात भात कापायला जायचे.भात कापायला खाली वाकता येत नसे.इतके अंग दुखायचे.परंतू बळेच खाली वाकुन भात कापायला लागायचे.

भात कापताना अनेक विषयावर गप्पा मारत भात कापायचे. विळ्याने कुणाची बोटे कापायची.तरोट्याचा किंवा टणटणीचा पाला वाटुन त्याचा रस बोटावर पिळायचा.काथाडीने बोट बांधायचे.मग पुन्हा काम सुरू करायचे.खाचरात पाणी असेल तर मात्र खाचरात आळाशा करता येत नाहीत.सर्व भात खाचराबाहेर काढताना खुप त्रास व्हायचा.

दुसऱ्या दिवशी अंग बसल्यामुळे कालच्या इतके अंग दुखायचे नाही..

भाताची येटाळणी केल्यावर दुपारी मस्तपैकी नदीत किंवा ओढ्याच्या पाण्यात मनसोक्त पोहायचे.मासे पकडायचे.

पुर्वी ठराविक ठिकाणीच खळी असायची.एका खळ्यावर चार- पाच लोकांची भात झोडणी चालायची.एका एका खळ्यावर महिनाभर काम चालायचे.भात झोडणी झाल्यावर नाचणी. नाचणी सावा किंवा वरई,खुरासणी,हुलगा इत्यादी.धान्य असायची.परंतू आता मात्र भात सोडले तर सर्वच जवळजवळ बंद झाले आहे.

खळे

खळे तयार करताना सुद्धा मजा यायची.पहिल्या दिवशी खळ्यावर जाऊन पाच फावडी मारायची.नंतर दुसऱ्या दिवशी खळ्यावरचे सर्व गवत फावड्याने काढायचे.खड्डे भरून घ्यायचे.खळ्याच्या मध्यभागी तिवडा रोवायचा.खळ्यात पाणी मारायचे.नंतर शेण, पाण्यात कालवुन खळ्यात पसरायचे.निरगुडीच्या डहाळ्यांनी सारवायचे.झाले खळे तयार..याला शेणकाला म्हणतात.दुस-या दिवशीही अशाच पद्धतीने शेणकाला करायचा.

कापलेल्या भाताच्या आळाशा जमा करून भारे बांधायचे.हे भारे खळ्यावर घेऊन यायचे.खळ्याच्या एका बाजुला भारे उतरायचे.खळ्यात तिवड्याला लाकडी घडवंची बांधायची.

भात झोडणी

गावातील पाच दहा जण एकत्र येऊन कधी दिवसा तर कधी रात्री भात झोडतात.पुर्वी दिवसाच भात झोडायची कामे व्हायची.परंतू आता खळी राहीलेली नाहीत.खाचरातच ताडपत्री अंथरून त्यावर भात झोडतात.पुर्वी खळ्यात लोक चप्पल घालत नसत.परंतू ताडपत्रीने पाय भाजत असल्यामुळे चप्पल घालूनच भात झोडायला लागते.परंतू खळ्याची मजा ताडपत्रीला नाही.

खळ्यात धान्य असल्यामुळे रात्री खळ्यात मुक्काम करावा लागे.बरोबर दोघे तीघे मित्र किंवा जेष्ठ माणसे असत.संध्याकाळी खळ्यात झोपल्यावर गार वारा व वर आकाशाचे छत,त्यामध्ये चांदण्या,उगवता किंवा अस्ताला गेलेला चंद्र पहायला मजा वाटे.आकाशात ध्रूव तारा,तिकांड,बाज,ती चोरून नेऊ पहाणारे चोर,असे चांदण्यांचे प्रकार पहाताना व त्याबद्दल जेष्ठांकडुन माहीती ऐकायला मोठे कुतुहल वाटे.

सकाळी भात झोडायला पाच- सात गडी असत.प्रत्येकाकडे रस्सी असे.रस्सीच्या सहाय्याने भात झोडायला सुरूवात करत.पहिले दोन ठोके भाताच्या राशीवर मारून उरलेले ठोके लाकडी घडवंचीवर मारत.एकच खणाखणी होई.भाताचे भारे पटापट कमी होत.

खळ्यात भात झोडल्यावर बराच कचरा होई.याला *गळंदा* म्हणतात.हा गळंदा गोळा कराण्याचे काम एखादा वयस्कर माणुस करत असे.

दुपार पर्यंत भात झोडुन झालेले असे.खळ्यात भाताची रास तयार असे.चांगले पीक आल्यावर भाताची भलीमोठी रास तयार होई.शेतक-याच्या चेहऱ्यावर  समाधान झळकत असे.घराकडुन गुळाभाताचा नैवेद्य आणुन धान्याच्या राशीला व शेताला दाखवायचा.भाताच्या राशीत सकाळी ठेवलेला नारळ फोडायचा.नंतर गुळाभाताचा नैवेद्य व नारळाच्या खोब-याचा तुकडा पानावर खायचा..हे खाताना खुप मजा यायची.

दुपार नंतर सुपाच्या पाठीमागे कोरड्या राखेने  गुणाकाराच्या रेघा मारायच्या.व भात उपनायाला सुरूवात करायची.हे काम तज्ञ माणुस करायचा.वारा नसल्यावर वारा यायची वाट पहायला लागायची..त्या दुरदृष्टीनेच जेथे वारा असतो अशा ठिकाणी खळी तयार केलेली असत.

भात उपणुन झाल्यावर पोत्यात भरले जायचे.तो पर्यंत आंधार झालेला असे.या भातांची बाचकी घरी घेऊन आंधारातुन जाताना नाकीनऊ येत.

काही शेतकऱ्यांच्या खळ्यात भाताच्या राशीला कोंबडा कापायची प्रथा आसायची.संध्याकाळी खळ्यावर कोंबड्याचा पातळ रस्सा व भात खायला मोठी मजा यायची.भरपुर भात व तितकाच गरम रस्साअसायचा.काही जण खाऊन झाल्यावर नुसताच गरम रस्सा पीत असत.

 हरभरा 

भाताची झोडणी झाल्यावर ओल असलेले शेत नांगरून हरभरा,मसुर किंवा गहू पेरत.चांगले पीक येई.या पीकाचे रान डुकरांपासुन संरक्षण करण्यासाठी लोक शेतात मांडव करत.त्या मांडवावर रात्री झोपायचे.काहीजण जमीणीवर त्रिकोणी खोपटे करून त्यामध्ये झोपत.मांडवाच्यावार झोपायला मजा येई.आजुबाजुंच्या शेतकऱ्यांच्या आरोळ्यांनी शिवार दुमदुमुन जात असे.मांडवावर मेंढी कोट खेळत.नंतर पत्र्याचा डबा वाजवायचा..किंवा दिवाळीतले शिल्लक रोज एक दोन फटाके वाजवायचे..मोठीच गम्मत असे.

हारभरा भरल्यावर एखादा शेतकरी शेतात हुळा खायला येण्याचे आवातन देई.आम्ही चारपाच जण शेतात जात असू.खळ्यात काटक्या व गवत पेटवून त्यावर मस्त घाट्यांनी भरलेला हरभरा भाजला जात असे.हरभरा भाजुन झाल्यावर आग विझवुन तेथेच बसून गप्पा गोष्टी करत हरभ-याचा हुळा आम्ही फस्त करत.कधीकधी हभभरा समजुन एखादा गरम खडा तोंडात जाई.जीभ भाजे.परंतू चार पाच मित्रांबरोबर हरभ-याचा/वाटाण्याचा किंवा गव्हाचा हुळा खाताना मोठी मौज वाटत असे.हुळा खाऊन झाल्यावर एव्हाना आंधार पडू लागलेला असे.

असे ते भारलेले दिवस होते.हे दिवस मी पाहिले व अनुभवलेही. हे मोठेच भाग्य म्हणावे लागेल.

 सर्व चित्रे google वरून साभार 


भागीत गुरूजी


१९ जुन १९८६ साली श्री.पंढरीनाथ भागीत गुरुजी मंदोशी गावच्या शाळेत हजर झाले. तत्पुर्वी शाळेची अवस्था अतिशय वाईट होती. जवळ जवळ वर्षभर शाळेत शिक्षकच नव्हते.

हुरसाळे वाडीचे कै.विठ्ठल मोरमारे गुरुजी त्यांची शाळा करुन दुपारी दोन तास शाळा उघडायचे.असे सतत वर्षभर चालले होते. त्याकाळात पुर्णवेळ शिक्षक नसल्याने खुप मुलांचे अतोनात  शैक्षणिक नुकसान झाले.

आम्ही चौथीला असतांना जुन महिना असावा. पाऊस पडायला सुरूवात झाली होती. ओढे नाले ओसांडुन वाहत होते. शाळा बंद असल्यामुळे पोरं मासे,खेकडे पकडणे, गुरे संभाळणे ही कामे करत होती.

आणि एक दिवस अचानकच सकाळी १०.१५ वा.शाळेची घंटा घणघणली. सर्व मुलांमाणसांना अश्चर्याचा धक्का बसला. कुणीतरी सांगितले नविन मास्तर आलेत. सर्वच लोकांना व मुलांना कोण नविन गुरूजी आलेत हे पाहण्याच्या उत्सुकते पोटी शाळेकडे आपापल्या मुलांना घेऊन शाळेकडे चालू लागले.

शाळेत गेल्यावर पहातो तर पांढरा शुभ्र कडक इस्त्री असलेला लेंगा,पैरण व टोपी गळ्यात मफलर असलेले गुरूजी आम्हाला दिसले. लोकांना गुरूजीनीच ओळख करून दिली.

मी श्री.पंढरीनाथ भागीत गुरूजी.इथे जवळच असलेल्या भोमाळे गावचा आहे. यापुर्वी कहू येथे होतो. आजच बदलीने या शाळेवर हजर झालो आहे.

तेव्हा उद्या पासुन सर्वांनी आपापल्या मुलांना शाळेत पाठवायचे. कुणीही मुलांना घरी ठेवायचे नाही. अशी लोकांना सक्त ताकीदच देऊन टाकली.तीही कडक शब्दांत.

दुसऱ्या दिवशी नियमित पणे शाळा भरली. साफसफाई झाल्यावर प्रार्थना सुरू झाली. नंतर राष्ट्रगीत झाले.

यापुर्वी आम्ही कधीच प्रार्थना किंवा राष्ट्रगीत म्हटलेले नव्हते. त्यामुळे शाळेत एक नविनच उत्साह जाणवत होता..

गुरूजींची शिकवण्याची पद्धत खासच होती. शिवाय शाळा सुटायच्या आधी अर्धा तास उजळणी, पाढे, कविता गुरूजींच्या मागे मोठ्याने म्हणताना मजा येत असे..नंतर हे सर्व मुलेच स्वतःहुन म्हणू लागली.

शाळेला जोडुनच पाठीमागे व शाळेच्या उजव्या बाजुला लोकांनी गुरे बांधण्यासाठी व पेंढा ठेवण्यासाठी पडव्या बांधलेल्या होत्या..गुरूजींनी सबंधितांना बोलावुन त्या पडव्या काढुन टाकायला सांगीतलंं.

यावर त्यांनी गुरूजी पडव्या काढल्या तर आम्ही गुरे कुठे बांधू? राहुद्या त्यांचा शाळेला काय त्रास आहे का?असे म्हणून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला..परंतू गुरूजींनी कडक भाषेत त्यांना ताकीद दिली.

दोन दिवसात पडव्या काढल्या नाहीत तर मला वर कळवायला लागेल! बघा मग ? ही मात्रा सबंधितांवर लागू झाली आणि त्यांनी लगेचच पडव्या काढायला सुरूवात केली.त्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील त्यांना मदत केली.

तेव्हा शाळेच्या उजव्या बाजुला व पाठी मागे मोठ मोठे उकिरडे होते. गुरूजींनी व विद्यार्थ्यांनी पाठीमागे रस्त्याच्या खाली मोठा चर खोदुन त्यामध्ये कचरा साठवण्याची व्यवस्था केली. बराचासा कचरा जाळून टाकला. या साठी ग्रामस्थांनी सुद्धा मदत केली.

भागीत गुरुजी आले तेव्हा शाळेची अतिशय वाईट स्थिती झाली होती एका बाजूला शाळेची भिंत ढासळली होती तर पुढील बाजूच्या खिडक्या तुटल्या होत्या शिवाय दरवाजाही तुटलेला होता त्यामुळे शाळेमध्ये कुत्री- मांजरे वास्तव्यास होती. त्यांनी बरीचशी जमीन उकरली होती.

त्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून थोडेफार पैसे जमा केले. श्री.दुंदा बांगर यांनी पडलेली भिंत दुरुस्त करून दिली. श्री.कांताराम तळपे यांनी खिडक्या व दरवाजा दुरुस्त करून दिला. सौ.अनुसयाबाई शकर जढर(पारधी) यांनी शाळेच्या आतुन व बाहेरूनच्या भिंती, शेणा- मातीने लिंपून शेण व राखेने सारवून काढल्या. त्यासाठी त्यांना दहा रुपये मजुरी दिल्याचे मला स्पष्ट आठवते. 

हे सर्व झाल्यावर शाळेला छान पैकी रंग देऊन वर छताला रंगीबेरंगी पताका लावण्यात आल्या. शाळेला कुलूपाची सोय केली.

यापूर्वी शाळेला कुलूप नसायचे, त्यामुळे शाळेत इतर वेळी पत्त्यांचा डाव चालायचा. कुत्री - मांजरे आत जायची. शाळा कुलुप बंद झाल्यावर हे सर्व बंद झाले. अशा प्रकारे भागीत गुरुजीनी शाळेला नवचैतन्य दिले,

काळी परिपाठाला होणाऱ्या प्रार्थना राष्ट्रगीत व प्रतिज्ञा कविता, भक्तीगीते, भावगीते, समुहगीते यामुळे शाळेला नवचैतन्य आले. लोकही कौतुकाने हे सर्व ऐकायला बाहेर थांबत असत.

भागीत गुरूजी ज्यावेळी गावात प्रवेश करत असत किंवा लांबुन दिसत.तेव्हा खेळत असलेल्या मुलांची त्रेधातिरपट उडत असे.तात्काळ मुले हातपाय धुऊन दप्तर घेऊन शाळेचा रस्ता पकडत.स्वच्छ गणवेश,दररोज अंघोळ,बारीक केस,नखे काढलेली असलीच पाहीजे असा गुरूजींचा आदेशच असे. 

भागीत गुरुजींच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे बाहेर गावचे विद्यार्थी देखील मंदोशीच्या शाळेत दाखल होऊ लागले. त्यामुळे शाळेचा पट १२ वरून ३०च्या दरम्यान झाला. पर्यायाने दुसऱ्या शिक्षकांची नियुक्ती झाली.

सन १९९३ मध्ये भागीत गुरुजींनी इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यासाठी तेव्हाचे तत्कालीन उपसरपंच कै.शंकरराव हुरसाळे यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व प्रयत्नातून पाचवीचा वर्ग मंदोशी गावात सुरू झाला. 

त्याबरोबर अजून एक शिक्षकांची नियुक्ती झाली.आता गावात भागीत गुरुजी, सुनील हांडे गुरुजी, कै. मुक्ताजी मदगे आणि शिवराम सुपे गुरुजी असे तीन शिक्षकआले. नंतर श्री,संजय नाईकरे आले.

पुढच्या वर्षी सहावीचा वर्ग मंजूर झाला. श्री संजय नाईकरे हे अजून एक शिक्षक हजर झाले. त्यानंतर सातवीचा वर्ग अशा प्रकारे इयत्ता सातवी पर्यंत शाळा मंदोशी गावात सुरू झाली. 

शाळेचे वर्ग वाढत असताना शाळेला वर्गखोल्या देखील मंजूर झाल्या.आणि शाळेला एकूण सहा शिक्षक मिळाले. यासाठी भागीत गुरुजींचे परिश्रम व योगदान हे अतिशय महत्त्वाचे होते. 

याच काळात अनेक विद्यार्थी तयार झाले. अनेकांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या लागल्या तर अनेक जण चांगल्या पदावर पोहोचले. 

मंदोशी गावचा शाळेचा पट १५३ वर पोहोचला तेव्हा बीट पातळीवर व केंद्र पातळीवर होणाऱ्या अनेक शालेय स्पर्धा मंदोशी गावात होत असत.

बाहेर गावचे विद्यार्थी व शिक्षक,गावचे विद्यार्थी व शिक्षक यांना जेवणाची व्यवस्था मंदोशी गावाकडुन असायची. त्यामुळे अनेक बाबींसाठी शाळेला गावानेही भरपुर सहकार्य केले.

पुर्वी शाळेत एक दोन तुकडे झालेला व तसाच जोडलेला फळा होता.शाळेचे दप्तर ठेवण्यासाठी एक छोटी लाकडी पेटी होती.पाय तुटलेला एक टेबल व खुर्ची होती.बस्स इतकेच काय ते साहित्य होते परंतू नंतर याच काळात नविन शाळेचे बांधकाम झाले.

नविन वर्गखोल्या,नविन कपाटे,टेबल खुर्च्या, नवीन बेंच, वाचनालया साठी नविन पुस्तके, टिव्ही, टेपरेकॉर्डर, स्पिकर सेट, खेळाचे साहित्य, भजनाचे साहित्य, बँड, ढोल, तुतारी,मुलांना नविन दप्तर, गणवेश, पाठ्यपुस्तके, स्काँलरशिप, विद्यावेतन मोफत दुध वाटप असे कितीतरी साहित्य व योजना आल्या. भागीत गुरूजींच्या काळात या छोट्या शाळेचे वटवृक्षात रूपांतर झाले.

केंद्र पातळी,बीट पातळी,तालुका पातळी वर शाळेचा भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक आला.तसेच जिल्हा पातळीवर देखील शाळेचा तृतीय क्रमांक आला. यासाठी कै,मुक्ता मदगे गुरूजी,प्रसिद्ध हर्मोनियम वादक श्री.धर्मा बुधाजी तळपे यांचे मोलाचे योगदान लाभले.

भागीत गुरूजीं विषयी सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या मनात आदराची भावना होती.भागीत गुरूजी मंदोशी गावात सहकुटुंब तब्बल २२ वर्ष राहीले..ते गावचा एक घटक होते. 

गावातील प्रत्येक सामाजीक कार्यात ते भाग घेत. यात्रेला ते भरघोस देणगी देत. लोकांच्या सुखदुःखात भाग घेत.गावात वादविवाद झाल्यावर दोनही बाजुच्या लोकांना चार समजुतीच्या गोष्टी सांगत. प्रसंगी अर्थीक मदत देखील करत.

त्यांच्या काळात १२विद्यार्थी असलेला पट १५३ वर जाऊन पोहचला.व शिवाय एका शिक्षकाचे सहा शिक्षक झाले.शाळेला कै.मारूती मोरमारे, गुरूजी,श्री.शंकरराव विरणक,गुरूजी ,श्री.माळी गुरूजी असे पात्र मुख्याध्यापक लाभले. परंतू भागीत गुरूजींचे महत्त्व यत्किंचितही कमी झाले नाही.

श्री.पंढरीनाथ भागीत,श्री.सुनिल हांडे, श्री.संजय नाईकरे व कै.मुक्ता मदगे गुरूजी, किसन म्हातारबा तळपे यांनी ख-या अर्थाने विद्यार्थी घडवले. आज ते विद्यार्थी समाजाचा एक घटक बनुन चांगल्या प्रकारचे जीवन जगत आहेत. याचे श्रेय या सर्वांना दिले पाहिजे.

सन 2009 मध्ये त्यांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाली. व ते जि प प्राथमीक शाळा साबुर्डी येथे हजर झाले. तेथेही त्यांनी चांगल्या प्रकारे विद्यार्जानाचे काम केले.

एप्रिल 2023 मध्ये त्यांना विस्तार अधिकारी या पदावर अत्यंत अल्प काळासाठी पदोन्नती मिळाली. आणि लगेच जून 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.

आता भागीत गुरूजी कधीतरी भेटतात. मग आम्ही अवार्जुन वेळ काढुन गावातल्या मागील घटनांना ऊजाळा देतो.ते दिवस आठवतो. 

समाधानाची भावना आमच्या दोघांच्याही मनात तयार होते. "कालाय तस्मैय नमः"अशा या गुणसंपन्न शिक्षकाला भावी आयुष्य सुखसमृद्धीचे व आरोग्य संपन्न जावो ही सदिच्छा...








लेखक - रामदास तळपे ग्रामीण संस्कृती

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस