सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल.

काशिनाथ हे आमच्या सबंध गावातील आदर्शवत व्यक्तीमत्व होते. गावात पुर्वी काशिनाथच्या शब्दाला खुप मान होता.व त्याच्या विषयी लोकांना आदर होता.

गावात कोणाचेही, कसलेही काम असो. लोक सल्ला घेण्यासाठीअथवा मदतीसाठी काशिनाथकडे धाव घेत. काशिनाथही त्यांना कधीच नाही म्हणत नसे.

गावात रात्री कोणत्यांना कोणत्या कारणास्तव मिटींग असे. एकेकजण बैठकीला येऊ लागे. परंतू अद्याप काशिनाथ आलेला नसे. लोक व जेष्ठ मंडळी काशिनाथची वाट पहात. प्रसंगी जेष्ठ मंडळी त्याला मिटिंगला येण्यासाठी एखाद्याला बोलवायला पिटाळत.

काशिनाथला मिटिंगला बोलावण्यासाठी मी कित्येक वेळा त्याच्या घरी गेलेलो आहे. त्यावेळी मला मोठे झाल्यावर गावात काशिनाथसारखे व्यक्तीमत्व व्हावे असे वाटत असे.

त्यावेळी मी दहावीत असेल. तेव्हा मी लहान मुलांमध्ये व माझ्या समकक्ष मुलांमध्ये खेळत व बागडत असे. एके दिवशी काशिनाथ मला येऊन म्हणाला रामभाऊ तु आता मोठा झालाय. मोठ्या माणसांमध्ये येऊन बसत जा. लहान पोरासोरांत खेळणे कमी कर. त्याचा हा सल्ला मी तात्काळ आमलात आणला.

मी जेव्हा आकरावीला राजगुरूनगरला प्रवेश घेतला तेव्हा मला काँलेजला जाण्यासाठी व्ववस्थीत असे कपडे नव्हते. हे जेव्हा काशिनाथच्या लक्षात आले तेव्हा तात्काळ त्याने त्याचा नविन ड्रेस मला देऊन टाकला.

गावात दुध डेअरी व्हावी, अशी तेव्हा अनेकांची इच्छा होती. त्यासाठी सगळ्यात मोठे योगदान काशिनाथचे होते. 

त्यावेळी काशिनाथच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण ग्रामस्थ धुओली येथे तत्कालीन सोसायटी मँनेजर श्री.चिंतामण जठार यांचे घरी गेलो. तेथे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून प्रत्येक सभासद ११ रूपये या प्रमाणे शेअर्स जमा केले.

अनेकांचे शेअर्स काशिनाथने स्वतः भरले, व श्री.काळभैरवनाथ दुध उत्पादक संस्थेची मुहार्तमेढ तेथेच रोवली गेली. 

सर्व ग्रामस्थांची इच्छा अशी होती की या डेअरीचे चेअरमनपद काशिनाथने स्विकारावे...परंतू काशिनाथने या पदासाठी नम्रपणे नकार दिला. पुढे महिनाभरातच श्री.काळभैरवनाथ डेअरी सुरू झाली. याचे संपुर्ण श्रेय काशिनाथ कडेच जाते.

काशिनाथ मुळे गावगाड्याच्या मुख्य प्रवाहात मी ओढला गेलो. आणि सामाजिक, राजकीय कार्याचा भाग बनलो. काशिनाथचा प्रत्येक सल्ला हा अभ्यासपुर्वक असे व तो भविष्यात तंतोतंत खरा ठरायचा.

गावात कोणाचे लग्न जमवायचे असो, लग्नाचे नियोजन असो, गावातील भांडण तंटा मिटवायचा असो, रूसवा फुगवा काढायचा असो, कोणाला मोठ्या दवाखान्यात न्यायचे असो,किंवा कोणतेही काम असो, काशिनाथ स्वतःच्या कामावर पाणी सोडून ही लोकांची कामे आवडीने करायचा. अद्यापही ही त्याची परंपरा चालू आहे.

पुर्वी लोक सशाची, डुकरांची शिकार करायचे. डुकराची पारध कोणत्या रानात करायची. वाघुरी (जाळे) कोठे लावायच्या. पारध कोठून काढायची याचे संपुर्ण नियोजन काशिनाथ लिलया करायचा. 

त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सकाळी लवकर रानाजवळ असलेल्या शेतात जाऊन काशिनाथ तेथे ससा येत असल्याचा माग काढे. सशाच्या लहान मोठ्या लेंड्यावरून ससा किती मोठा आहे याचा अचुक अंदाज काढे. 

त्याप्रमाणे संध्याकाळी दिवस बुडाल्यावर आम्ही त्याच्या बरोबर वाघुरी, करंड्या व घोंगड्या घेऊन रानातली वाट चालू लागायचो. वाघुरी कोठे मांडायच्या याचे संपुर्ण नियोजन काशिनाथ कडे असे. वाघुरी मांडून झाल्यावर प्रत्येकजण लहान झुडपाच्या जवळ घोंगडी पांघरूण बसायचा.

ससा आल्यावर वाघुरीच्या दिशेने ससा कसा पळवायचा व वाघुरीत पाडायचा हे काशिनाथ अचुक अंदाज व तितकीच चपळता दाखवत लिलया करायाचा.

पुर्वी मी काशिनाथ बरोबर मोहरी (कड्या कपारीत असलेले मधमाशांचे पोळे) काढण्यासाठी पहाटेच जायचो. पहाटे रानात जाताना एक वेगळाच गारवा व रानातील झाडांचा फुलांचा सुंगध दरवळत रहायचा. व मन मन प्रसन्न होऊन प्रफुल्लीत व्हायचे.

कोवळ्या उन्हाच्या तिरपेच्या सहाय्याने मधमाशी कोठे जाते हे तो अचुक ओळखायचा. व बरोबर आम्ही तेथे पोहचायचो.

एकदा आम्ही काशिनाथच्या मार्गदर्शना खाली व त्याच्या नियोजनानुसार झाडावरील आग्या मोहळ अगदी सुरक्षित पणे काढले होते.

एकदा असेच संध्याकाळी मी, काशिनाथ व धोंडू विष्णू तळपे सशाच्या शिकारीला गेलो. वाघुरी लावून सशाची वाट पाहत बसलो. रात्र असल्यामुळे काहीच दिसत नव्हते. आणि अचानक वाघुरीच्या करंड्या पडल्याचा आवाज झाला. वाघुरीत ससा पडला म्हणून काशिनाथ व धोंडू वाघुरीच्या दिशेने धावले. वाघुरीतला ससा काशिनाथ पकडणार तेवढ्यात वाघुरीत पडलेले रान मांजर जोरात त्याच्या अंगावर फिसकारले. तसाच काशिनाथ मागे सरला. 

अरे! रामभाऊ बॅटरी आण. वाघुरीत दुसरेच काहीतरी आहे. मी बॅटरी घेऊन गेलो तर वाघुरीत रानमांजर होते. त्याला वाघरीतून काढायचे कसे हा प्रश्न होता. तेवढ्यात धोंडू एक मोठा दगड घेऊन आला. आणि मांजराच्या डोक्यात टाकला. मांजर जागच्या जागी गप्पगार झाले. आणि हेच मांजर आम्ही कंबळ वाघ (कातकरी) यांना दिले.

लेव्ही बसलेय याचा फायदा घेऊन भाताची चोरटी ने-आण करणाऱ्यांची काशिनाथने एकदा अशीच पाचावर धारण बसविली.

होमगार्डचे खाकी कपडे घालून मी, धोंडू तळपे, अशोक सुतार, मारुती तळपे आणि काशिनाथ जढर नेहमीसारखे शिकारीला गेलो होतो. 

सावज हेरण्यासाठी काशिनाथ हातातील पॉवरबाज बॅटरी रानात चारीकडं फेकीत होता. त्या प्रकाशझोतात पोत्यांनी शिगोशिग भरलेली एक बैलगाडी आली. चोरटा भात व्यापार करणाऱ्या त्या गाडीतील व्यापाऱ्यांना वाटलं आपल्यावर ही पोलिसांची धाड आली. त्यांनी बैलांची मुस्कटं वळती केली आणि मागचा पुढचा विचार न करता दात ओठ खात बैल पिटाळायला सुरुवात केली.

क्षणात एक भयानक आवाज त्या शांत रानात उठला. दहा-वीस हात खोल असलेल्या एका दरीत बैल गाडीसह कोसळले होते. आम्ही दरडीत उतरून अगोदर जुपन्या ढिल्या करून बैलांना मोकळं केलं. 

सगळ्यांच्या मदतीनं गाडी दरडीबाहेर काढली. इकडं तिकडं विखुरलेली भाताची पोती पुन्हा गाडीत चढविली. बैलांना पाणी पाजून हुशार केलं. आम्हा शिकाऱ्यांचा तांडा घेऊन काशिनाथ गाडीत चढला. कासरे आपल्या हातात धरीत त्यानं ती भरलेली बैलगाडी सरळ गावात आणली.

बैल कुणाचे आहेत हे आम्ही ओळखलं होतं. त्या चोरट्याच्या दारात सरळ गाडी लावून काशिनाथने ललकारी दिली‚ अबे ओ बब्या बाहेर ये ! शिकार आव्या है रे! बबनराव बाहेर आला आणि आपली बैलं आणि गाडी बघताना त्याचा चेहरा खेटरानं मालिश केल्यासारखा झाला.

आयुष्यात मी काशिनाथ बरोबर खुप फिरलो कधी पायी तर कधी मोटारसायकवर तर कधी कारने.

एकदा आम्ही हिरडे गोळा करण्यासाठी पायीपायी पाभे, भोमाळे, खरपुड मार्गे तांबडेवाडीला गेलो. तेथे आम्ही पोहचलो २.३० वा. नंतर आम्हाला खुप भुक लागली. आता काय करायचे, असा विचार आला. आम्ही डोंगरावर होतो.

काशिनाथ म्हणाला काळजी करू नको. एक काम करू. 

खाली गाव आहे. तेथे लग्न आहे. कारण स्पिकरवरून लग्नाच्या गाण्यांचा, व आहेर पुकारल्याचा आवाज योतोय.

आपण खाली गावात जाऊ.

मी म्हटले अरे! तो अनोळखी गाव आपली तेथे ओळख ना पाळख कशाला तेथे जायचे त्या पेक्षा आपण घरी जाऊया.

काशिनाथ म्हणाला. 

नाही आपण जाऊच. त्याच्या पुढे काय बोलनार ? गेलो.

मला वाटते ते औंढे गाव असावे. तेथे गेलो तर सर्व लोक अनोळखी. कुणीच आमच्या ओळखीचे दिसेना. शिवाय लग्नाला अजुन खुप वेळ होता. तेव्हा लग्न झाल्यावर जेवण असायचे. 

आता काय करायचे. असा प्रश्न निर्माण झाला. इतक्यात आम्हाला आमच्याच गावातील श्री.शांताराम मोहन भेटले. ते आम्हाला पाहून अश्चर्यचकित झाले. ते त्यांच्या बहिनीच्या मुलीच्या लग्नाला आले होते. त्यांना सर्व हकिकत सांगीतल्यावर त्यांनी आम्हाला लगीनघरात नेऊन जेवायला वाढले. आम्ही भात आमटी व शाकभाजी व बुंदीवर ताव मारला. 

जेवण केल्यावर मग मात्र आम्ही परत घरच्या ओढीने चालू लागलो. 

काशिनाथ जढर एके दिवशी माझ्या कडे

आला व मला म्हणाला. रामभाऊ आज रात्री माझ्या बरोबर झोपायला रानात आमच्या गोठ्यावर यावे लागेल मी विचारले का रे ? 

तो म्हणाला अरे दादा व वहिनी लग्नाला गेले आहेत. ते येनार नाहीत व गोठ्यावर गायी बैल व म्हशी आहेत. तेव्हा जावं लागेल. मी त्याला होकार दिला.

रात्री आम्ही दोघे रानातील गोठ्यावर झोपायला गेलो. रात्री तेथे शांत झोप लागली. सकाळी अगदी पहाटेच जाग आली. नंतर झोप काही येईना.

चला बाहेर लगवीला जाऊ असा विचार करून काशिनाथला उठवले. आम्ही बाहेर आलो. नुकतेच उजाडत होते. गार वारा सुटला होता.

आमच्या गोठ्याच्या पुढे एक मोठा कडयासारखा डोंगर होता. तेथुन गावात येण्यासाठी पाउलवाट होती. ती वाट वळणावळणाची होती.आम्ही तेथेच लगवीला उभे होतो. 

मी अचानक वर समोर असलेल्या कड्याकडे पाहिले. तेथील पाउलवाटेने एक नउवारी लुगडे नेसलेली व डोक्यावर गाठोडे असलेली बाई चालली होती. मी काशिनाथला दाखविले.

तो म्हणाला अरे! ही तर चिंधाबाई आहे. आमच्या गावातील एक बाई जवळच असलेल्या नायफड या गावात दिली होती.आम्हाला वाटले तिच आहे. 

काशिनाथ म्हणाला 

अरे! ही इतक्या सकाळी कशाला आली असेल ? 

ही उठली असेल तरी कधी ? आणि निघाली असेल कधी ? 

कारण नायफड ते आमचे मंदोशी गाव सुमारे ५ कि.मी. असेल. 

शिवाय रानातून व डोंगरातून येणारी वाट.असे आम्ही बोलत होतो. चिंधाबाई वळणवळणाने असलेल्या पाउलवाटेने चालत होती. ती ज्या वळणावर आली, तेथे मोठे झाड होते. तेथे जवळच मोठा दगड होता.

आम्ही पहात असताना अचानक त्या झाडाचा कडकड आवाज झाला आणि झाड उन्मळून त्या बाईच्या अंगावर पडले. त्या बरोबर ते झाड व तो मोठा दगड खाली घरंगळत आला. एकच मोठा आवाज झाला. चिंधाबाईचे काय झाले असेल या विचारांनी आम्ही सुन्न झालो.

नंतर लगेचच गावात जाउन ही खबर लोकांना दिली. सर्व जण घटना घडली तेथे आलो. तर त्या ठिकाणी झाड, चिंधाबाई व दगड या पैकी काहीही दिसले नाही. लोकांनी आम्हांला वेडयात काढले. तुम्हाला भास झाला असेल असे म्हणून निघुन गेले.

परंतु एक कळले नाही. एकाच वेळी दोघांना कसा भास झाला. नव्हे ते भुतच होते याची पक्की खात्री झाली.

विशेष म्हणजे चिंधाबाई अजुनही हयात आहे

काशिनाथच्या कामाचे मुल्यमापन करायचे झाल्यास योग्य नियोजन, अचुक अंदाज, योग्य मार्गदर्शन, सतत दुस-याला मदत करण्याची भावना,कार्यतत्परता,अजातशत्रू इत्यादी गुण त्याच्याकडे होते व आजही आहेत.

परंतु येवढा गुणसंपन्न माणुस असुनही काशिनाथ नियतीच्या फेऱ्यात अडकला. मद्याच्या नशेत हरवून बसला. कोणत्याही प्रकारजी त्याच्यावर जबाबदारी नसताना, कोणताही दबाव, कर्ज, नसताना काशिनाथ नशेच्या आहारी गेलाय. हा नियतीचाच भोग म्हणावा लागेल.

खुपदा सांगुनही त्याच्यावर काहीच फरक पडत नाही. गावात अनेक गट-तट झाले परंतु काशिनाथ बद्दल सर्वांनाच आस्था व अपुलकी राहीली. कोणच त्याला वाईट बोलू शकले नाही. मग तो कोणत्याही गटात असो. गावातील सर्वांनाच वाटते की काशिनाथचे व्यसन सुटुन त्याने पुर्वी प्रमाणेच कार्य करत रहावे. व आपला भविष्यकाळ उज्वल करावा. अद्यापही वेळ गेलेली नाही हेच या लेखातुन सांगण्याचा मुख्य उद्देश.

रामदास तळपे 

गावाकडच्या पोहण्याच्या आठवणी

पूर्वी गावाकडे सर्वात जास्त आनंद कशाचा असायचा तर पोहणे. पोहणे म्हणजे सगळ्यांचा जीव की प्राण. पोहण्यासारखा आनंद दुसरा कोणताच नसे.

मी यावेळी साधारण दुसरीला असेल.  एकदा असेच मी माझ्या चुलत भाऊ गोटयाभाई बरोबर आंघोळीच्या डोहावर गेलो असता तेथे बरीच मुले ओढ्यामध्ये पोहत होती. परंतु मला पोहता येत नसल्यामुळे मी तसाच ओढ्याच्या काठावर बसून त्यांचे पोहणे पाहत होतो.

माझ्याच वयाचा दगडू जढर हा ओढ्यामध्ये अतिशय खोल पाणी असलेल्या ठिकाणी पोहत होता. ते पाहून मला सुद्धा पोहावेसे वाटले.

प्रथम मला माझ्या भावाने उथळ पाण्यामध्ये सोडले. मी तिथेच डुबुक डुबुक करत असे. परंतु खोल पाण्यात जाण्याची मला खूपच भीती वाटायची. तरीही दररोज मी मित्रांबरोबर ओढ्यावर पोहायला जात असे. हळूहळू दगडू जढर याने मला पोहायला शिकवले. त्यानंतर मात्र मग मी उत्तम पोहायला शिकलो. 

पावसाळ्यात आमच्या ओढ्याला खूप मोठा पूर यायचा.अगदी रस्त्याला पाणी लागायचे. ओढ्यातून पलीकडे जाणे दुरापास्त व्हायचे. रात्रंदिवस पावसाची मुसळ धार चालायची. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे ओढे,नाले ओसांडून ताल सोडून वाहत असायचे. रात्री त्यांच्या आवाजाने भीती वाटायची. गावात जर पाणी घुसले तर? अशा विचाराने मनात धस्स व्हायचं.

दुसऱ्या दिवशी अगदी सकाळी सारा गाव पूर पाहण्यासाठी ओढ्याच्या काठावर जमा व्हायचे. त्यात मी सुद्धा असायचो. वरून तुफान पाऊस पडत असायचा.

दर पाच दहा मिनिटांनी ओढ्याचापुर सतत वाढत असायचा. ओढ्याच्या पुराबरोबर मोठमोठे ओंडके वाहत यायचे.

पलीकडे आमच्या गावातील दामू मोहन हे काच्या करून या महापुरात उडी मारण्यासाठी सज्ज असायचे. अनेक लोक त्यांना महापुरात उडी मारू नको असे विनंती करून सांगायचे. तरीही दामू मोहन हे आपल्या भूमिकेवर ठाम असायचे.

आणि अशाच एका क्षणी ते प्रचंड पूर आलेल्या महापुरात उडी मारायचे. आणि दिसेनासे व्हायचे. सगळ्यांच्या हृदयात धडकी भरायची. लोक श्वास रोखून बघत राहायचे. अचानक दूर कुठेतरी दामू मोहन यांचे डोके दिसायचे. आणि परत महापुरात गडप व्हायचे. सर्व लोक देवाचा धावा करायचे. आणि ओढ्याच्या काठाकाठाने पळत पुढे जात राहायचे.

आणि अचानक दामू मोहन त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी ओढ्याच्या अलीकडे पोहोत पोहोत यायचे. त्यांना पाहिल्यावर लोक एकच जल्लोष करायचे. दामू मोहन हे आमच्या गावात महापुरात पोहण्यासाठी खूपच प्रसिद्ध होते. 

मात्र एकदा दामू मोहन हे महापुरात असताना भोवऱ्यात अडकले. पाण्यातील भोवरा म्हणजे पाण्याच्या प्रवाहातून निर्माण होणारी एक गोलाकार फिरणारी स्थिती. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा पाणी एखाद्या ठिकाणी वेगाने फिरू लागतं आणि एखाद्या चक्रासारखं दिसायला लागतं, तेव्हा त्याला भोवरा म्हणतात.

भोवऱ्याच्या मध्यभागी पाण्याचा दाब खूप कमी असतो. या कमी दाबामुळे भोवऱ्याच्या केंद्रात एक पोकळी किंवा गडगडासारखं दिसतं. या पोकळीमुळेच एखादी वस्तू भोवऱ्याच्या मध्यभागी ओढली जाते. भोवऱ्याचा वेग बाहेरच्या कडेपेक्षा मध्यभागी जास्त असतो. त्यामुळे भोवऱ्याच्या जवळची कोणतीही वस्तू वेगाने आत खेचली जाते. 

अशाप्रकारे भोवऱ्यात अडकल्यामुळे त्यांना बाहेर पडणे मुश्किल झाले. केवळ परमेश्वर कृपेमुळे आणि तिरक्या पद्धतीने पोहल्यामुळे आणि त्याचवेळी भोवऱ्याचा प्रवाह बदलल्यामुळे हे महाशय बाहेर आले. त्यानंतर पुन्हा मात्र त्यांनी कधीही महापुरात उडी मारली नाही.

24 जुलै 1976 चा दिवस. त्यादिवशी प्रचंड पाऊस झाला होता. भीमा नदीला प्रचंड महापूर आलेला. भात शेतीची अवनी चालू होती. परंतु पाऊसच इतका भयानक होता की अवनीची कामे सुद्धा खोळंबली होती. अनेक लोक पलीकडे मोरोशी गावच्या बाजूला अडकले होते. त्यांना इकडे धुओली गावच्या बाजूला यायचे होते. परंतु महापुरा मुळे ते शक्य नव्हते.

आणि अशातच महादेव जठार हे महापुरात उडी मारून पलीकडे यायला निघाले. त्यांना अनेक लोकांनी खूप अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काही ऐकायला तयार नव्हते. कारण ते पट्टीचे पोहणारे होते. लोकांनी सांगूनही त्यांनी त्यांचे ना ऐकता महापुरात उडी घेतली आणि थोड्याच वेळात दिसेनासे झाले.

महापुराच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे भोवऱ्यातून त्यांची काही सुटका झाली नाही. सुटका झाली ती त्यांचे प्राण घेऊनच. पुढे धामणगाव जवळ त्यांचे प्रेत पाण्याच्या कडेला लागले. तर असा हा महापूर आणि असे पोहणे जीवावर बेतले.

ओढ्यामध्ये होत असताना आमचा सगळ्यात आवडता खेळ म्हणजे शिवाशिवी. चार-पाच मुले पोहायला असायची. त्यापैकी एकावर राज्य असायचे. राज्य असलेल्या मुलाने पाण्यामध्ये सूर मारून कोणत्याही एका मुलाला शिवायचे म्हणजे त्याच्यावर राज्य.

राज्य असलेल्या मुलाला इतर मुले शिऊ द्यायची नाही. शिवायला आल्याबरोबर इतर मुले सूर मारून दुसरीकडे पोहोच जात असत त्यामुळे शिवायला आलेल्या मुलाचे पंचायत होत असे.

या शिवाशिवीच्या खेळामध्ये किती वेळ जात असे आम्हाला समजत नसे. पोरे अजून ओढ्यावरून का आली नाहीत म्हणून एखाद्याचा बाप किंवा आई ओढ्यावर दाखल होई. आणि येथेच्छ मार खावा लागे.

ओढ्याप्रमाणे विहिरीवर सुद्धा पोहणे हा एक आनंददायी क्षण असायचे. विहिरीच्या कठड्यावरून हात पायामध्ये अडकवून पाठीवर जोरात पाण्यात पडायचे. त्यामुळे विहिरीतील पाणी विहिरीच्या बाहेर सडा शिंपल्यागत पाडायचे. विहिरीमध्ये मोठमोठ्या लाटा तयार व्हायच्या. आणि या लाटावर पोहणे अतिशय सुखद वाटायचे. 

आमचा त्या वेळी हा प्रकार मोठा आवडता होता. संजय सुतार, दत्ता आंबवणे, आणि मी विहिरीमध्ये लाटा तयार करण्यात माहीर होतो. पोहता न येणाऱ्या मुलांना ही लाटा पाहण्यात मोठा आनंद वाटायचा. ती मुले केवळ लाटा पाहण्यासाठी विहिरीवर येत असत.

दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत तसेच शनिवार आणि रविवार आम्ही सदानकदा ओढ्यावर किंवा विहिरीमध्ये पोहत असायचो. 

सुभाष भोकटे (विस्तार अधिकारी) आणि मी गाडीची हवा भरलेली ट्यूब मुक्या कातकऱ्या कडून तीन रुपये भाड्याने घेऊन त्यावर बसून आम्ही धरणातील पाण्यामध्ये सफर करायचो. 

ट्यूब वर बसून नदीच्या अथांग धरणातील पाण्यात बसून सफर करणे हे अतिशय आल्हाददायक असे. परंतु बॅलन्स सांभाळणे हेही तितकीच महत्त्वाची असायचे. 

थोडा जरी बॅलन्स  ढळला की दोघांमधील एक किंवा कधीकधी दोघेही ट्यूब वरून डायरेक्ट धरणाच्या पाण्यात पडायचो. व ट्यूब आमच्यापासून दूर जायची. मग पोहोत पोहोच जाऊन आम्ही ट्यूबवर बसायची धडपड करायचो. नंतर नंतर मात्र आम्ही ट्यूबवर शांत बसण्याची कला आत्मसात केली.  

मी माझ्या आयुष्यात ओढ्यावर, नदीमध्ये आणि विहिरीमध्ये खुपदा पोहलो आहे. पोहणे हा लहानपणी आम्हा मुलांचा आवडता छंद होता. सुट्टीच्या दिवशी दिवसभर आम्ही पाच- सातजण ओढ्यावर (आंघोळीचा डोह), बोर्डाची किंवा चिखाळीच्या विहीरीवर पोहण्यासाठी असायचो. पोहून डोळे लाल व्हायचे. परंतू पोहणे मात्र चालूच असायचे.

मी नववीत असताना दिवाळीच्या सुट्टीत विहीरीवर पोहायला गेलो होतो. माझ्या बरोबर माझे मित्र पण होते. विहीरीच्या कठड्यावरून उडी मारून विहिरीच्या तळाशी जाऊन पुरावा म्हणुन दगड, माती किंवा जे काय असेल ते वर आणुन दाखवायचे असे ठरले. 

प्रत्येक जण कठड्यावरून उडी मारून विहिरीच्या तळाशी जाऊन जे मिळेल ते आणुन दाखवू लागला. मी पण कठड्या वरून विहिरीत एकदम सरळ उडी मारली. परंतु हातपाय न हालवल्यामुळे मी विहिरीच्या एका कोपऱ्यात भिंतीजवळ खाली जोरात गेलो. खाली खोल रुतुन बसलेल्या एका मोठ्या दगडाच्या कपारीत माझा डावा पाय अडकुन बसला. 

मी पाय बाहेर काढायचा खुप प्रयत्न करून सुद्धा पाय काही निघेना. पाण्याच्या तळाशी असल्यामुळे श्वास कोंडत चालला. मी अजुन वर का येत नाही म्हणून बरेच जण पळून गेले. व एकच मित्र माझी वाट पाहु लागला. 

माझा पाय काढण्याचा खटाटोप चालुच होता.पाय काही निघेना. श्वास बंद झाल्यावर नाकातोंडात पाणी जाऊन आपण मरणार हे स्पष्ट दिसू लागले. परंतू तशाही स्थितीत मृत्यूच्या दाढेतुन कसे सुटायचे याचे विचारचक्र वेगाने फिरू लागले.

मृत्यू माझ्यापासून काही सेकंद दुर होता. आणि अचानक दुसरा पाय मी सरळ केला. पायाला विहिरीची भिंत लागली. आणि क्षणातच मी उजवा पाय भिंतीला लाऊन डावा पाय जो दगडाच्या फटीत अडकला होता सर्व बळ एकवटून जोरात मागे खेचला आणि एका झटक्यात पाय फटीतून बाहेर निघाला.

पाय बाहेर निघाल्या बरोबर मी विहीरीच्या तळातुन वर आलो. विहीरीतुन बाहेर आल्यावर डाव्या पायाच्या घोट्याच्या दोन्ही बाजुने खरचटल्यामुळे रक्त वाहत होते. परंतु त्याचे मला काहीच वाटत नव्हते. फक्त आपण जिवंत बाहेर आलो याचेच समाधान वाटत होते.त्यामुळे एक क्षण सुद्धा अतिशय महत्त्वपुर्ण असतो हे सिद्ध झाले.

रामदास तळपे (मंदोशी)

गावाकडच्या जेवणावळी

गावाकडे पूर्वी अनेक श्रद्धा अंधश्रद्धा असत. अनेक गावांमध्ये काही ठराविक लोकांच्या अंगात यायचे. अनेक आजारी पाजारी लोक त्यांच्याकडे अंगारे धुपारे करण्यासाठी जात असत.

त्यावेळेस अशा अंगात वारे येणाऱ्या लोकांची फारच चलती असायची. त्यांना गावात खूपच मान सन्मान असायचा. त्यांची शेतीची कामे बिनबोभाट होत असत.

जशी त्यावेळेस त्यांची चलती होती तशीच आमची ही खाण्याची पिण्याची चंगळ असायची.

अंगात वारे आणणारे लोक हमखास एखाद्या वरून बोकड, कोंबडा किंवा मेंढा यांचा उतारा द्यायला लावायचे. तसेच सटवाईला, देवाला, वीराला किंवा शेतातील थडग्याला कोंबडा देण्याची रीत असायची. 

लग्नकार्याला जावळ, देवकार्य यासाठी खास बोकडाची व्यवस्था केलेली असायची. शिवाय वारे आणणारे लोक सोबतीला असायचेच.

त्यामुळे ग्रामीण भागात अशा जेवणावळीसाठी मी आणि माझा चुलत भाऊ मारुती हमखास जात असू. त्यावरून माझी आई आणि आमची चुलती तुळशीआई आम्हाला खूपच शिव्या देत असायच्या. परंतु आम्ही काही त्यांचे ऐकायचो नाही.

अशा जेवणावळीसाठी फारच थोडे लोक असत. त्यामुळे मटणाची कमतरता नसे. थोडक्यात खाण्यापिण्याची चांगली चंगळ होती.

एकदा असेच आम्ही खास आमंत्रणा वरून मोरोशी येथे जेवायला गेलो होतो. शक्यतो हा कार्यक्रम रात्री होत असायचा. जेवण हे रानात असायचे. 

आम्ही तिथे पोचलो तेव्हा भात शिजून झाला होता. मटन तीन दगड मांडलेल्या चुलीवर डेंगी मध्ये शिजत होते. थोड्याच वेळात पंगती बसणार होत्या. 

आणि अचानक एक जास्त दारू पिलेला माणूस तेथे आला आणि डेंगी मधील मटन शिजले आहे की नाही हे पाहण्यासाठी डेंगी मधील असलेला कलथा पकडून जोरा जोराने हलवू लागला. तेवढ्यात खालचा दगड सटकला आणि डेंग एका बाजूला कलंडली. 

डेंगी मधला बराचसा रस्सा खाली सांडला. कसेतरी आम्ही दोन-चार जणांनी डेंग सरळ केली. एक जणांचा राग इतका अनावर झाला की त्याने फडाफड दारुड्याच्या मुस्कटात लगावल्या.

आता ह्या समाजासाठी काय करायचे हा मोठा प्रश्न उभा राहिला. सर्व लोक विचार चक्रात बुडाले. परंतु आमचा भाऊ मारुतीचा अनुभव दांडगा होता. 

तो म्हणाला. काही काळजी करू नका आपण बरोबर करू.

तात्काळ दुसरी एक तीन दगडाची चूल तयार केली. दोन मोठे पातेली भरून पाणी गरम केले. आणि परत एकदा मसाला कांदा, मिरची पावडर यांची फोडणी देऊन डेंगीतले मटन त्यात टाकले. आणि एक उकळी आल्यानंतर हे गरम पाणी ओतले.

त्यानंतर मग आम्ही सर्वजण जेवलो. मोरोशी गावच्या लोकांनी आमच्या मारुतीची खूपच तारीफ केली. 

पाव्हणं तुम्ही होते म्हणून आम्ही जेवलो बर का! असे प्रशस्तीपत्रक दिले.

एकदा आमच्या गावात एका माणसाच्या शेतामध्ये भूत होते. आणि हे भूत त्या माणसाला खूप त्रास द्यायचे. घरातील माणसे सतत आजारी पडायची. त्यामुळे एका भगताने त्याला सांगितले की हे भूत आपण आपल्या गावच्या हद्दीतून बाहेर पाठवू यासाठी तुम्हाला मेंढ्याचा बळी द्यावा लागेल.

गावातला माणूस या गोष्टीला तयार झाला. दिवस ठरला वार ठरला. दिवस बुडताच आम्ही आमच्या गावच्या हद्दीच्या बाहेर म्हणजे नायफड गावच्या हद्दीत निघालो. गावातील दहा पंधरा माणसे होतीच. एकाच्या हातात मेंढा, एका जवळ पाण्याचा हंडा, एका जवळ तांदूळ आणि मसाले, एका जवळ इतर भांडी, आणि विशेष म्हणजे एका जवळ भूत..

आता हे भूत कसे होते? तर एका तांबड्या फडक्यात एक तीन धारी लिंबू बांधलेले होते. त्याला पाच-पन्नास टाचण्या खोचलेल्या होत्या. व त्यासोबत एक छोटा दगड होता. दगडाला भरपूर शेंदूर फासला होता. आणि हे सर्व फडक्यात बांधून एक माणूस काठीला बांधून चालला होता.

आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा पूर्ण अंधार झाला होता. पायाखाली काहीच दिसत नव्हते. रातकिड्यांची किरकिर  नुकतीच चालू झाली होती.

आम्ही तिथे गेल्यावर लगेच भगताच्या अंगात आले. काठीला लाल फडक्यात बांधलेले भूत भगताच्या समोर ठेवले. त्यानंतर त्या लिंबाच्या आणि दगडाच्या समोर मेंढ्याचा बळी दिला.

भागताने भुताला खूप शिवीगाळ केली. आता या हद्दीतून पुन्हा आमच्या हद्दीत यायचे नाही अशी तंबी दिली.

त्यानंतर पुढील कार्यक्रम सुरू झाला. परंतु आमच्या जवळील पाणी संपले. काही लोक सोबत आणलेले हंडे घेऊन पाणी आणण्यासाठी रानात असलेल्या झुरीला गेले. आणि अंधारात चाचपडत कसेतरी पाणी आणले.

जेवण तयार झाले तेव्हा खूपच उशीर झाला होता. आम्हाला सपाटून भुका लागल्या होत्या. पंधरा-वीस लोक असल्यामुळे खूपच मटन होते त्यामुळे खाण्याची चंगळ होती.

जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण घरी आलो. परंतु दुसऱ्या दिवशी उजाडल्यावर आमच्या गावात खूपच गोंगाट ऐकायला आला. आम्ही तिथे गेल्यावर नायफड गावची बरेच लोक तिथे आले होते. व तुमचे भूत आमच्या हद्दीत का सोडले? याचा विचारत होते.

प्रसंग मोठा बाका उभा राहिला होता. आता काय होईल याचा आम्ही अंदाज बांधत असतानाच बघताना याच्यावर मार्ग काढला. 

आता जे भूत आहे ते अमुक अमुक यांच्या हद्दीत आहे, परंतु आपण असे करू हे भूत आपण फॉरेस्टच्या हद्दीत घालू. 

कारण त्या माणसाच्या हद्दीलगत फॉरेस्टचे रान होते. परंतु आता परत एकदा पहिल्यासारखाच मेंढ्याचा बळी द्यावा लागेल? काय करायचं बोला?

यावरून खर्च कोण करणार यावरून परत वादावादी झाली. पुढचा खर्च कोणी केलं हे माहित नाही परंतु पुढच्या वेळी सुद्धा आम्ही जेवायला तेथे गेलो होतो हे निश्चित. असे प्रसंग गावाकडे नेहमीच घडत असतात.

एकदा असेच आमच्या वरच्या वाडीच्या माणसाला एका भगताने दुसऱ्या गावच्या हद्दीत बोकड कापण्याचा उतारा सांगितला. त्याप्रमाणे तयारी सुद्धा करण्यात आली.

एके दिवशी या माणसाने दुसऱ्या गावच्या हद्दीत बोकड कापला. व तेथे सर्व कार्यक्रम केल्यावर बोकडाचे मटण परत आमच्या गावच्या हद्दीत आणले व तेथील पेटवून जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला.

परंतु थोड्याच दिवसात हा माणूस आजारी पडला. आणि एके दिवशी इहलोक सोडून परलोकवासी झाला. सर्व लोक त्याला दुसऱ्या गावचे हद्दीतून बोकडाचे मटण आणून आपल्या हद्दीत शिजवून खाल्ले त्यामुळे हा प्रकार घडला असे म्हणू लागले.

एकदा असेच आम्ही एका ठिकाणी रानात जेवायला गेलो होतो. जेवण बनवणारे सुरुवातीपासूनच थोडी थोडी अधून मधून दारू पीत होते. जेवायला बरीच लोक आले होते.

एकदाचे जेवण झाल्यावर वाढण्याचे काम सुरू झाले. जेवण बनवणारेच वाढण्याचे काम करत होते. त्यांचे सतत वाढण्याचे काम सुरू होते. ते येवढे दारू पिलेले होते की, त्यांनी सर्व जेवण आलेल्या लोकांना वाढून टाकले. 

त्यांच्या स्वतःसाठी काहीच जेवण शिल्लक राहिले नाही. शेवटी त्यांना उपाशीच घरी यावे लागले व घरी आल्यावर बेसन भात खावा लागला.

पूर्वी गावात अनेक नवविवाहित स्त्रियांना मावलाया लागायच्या. एखादी नवविवाहित तरुणी अगदी खारकासारखी वाळुन जायची. सतत कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असायची. शक्यतो हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे हा आजार होत असावा.

स्त्रीच्या अंगात वारे आल्यावर एक साथ खूप वेळ घुमत राहायचे. हे वारे कधीही रात्री आपण रात्री दिवसाढवळ्या येत असेल. अगदी स्वयंपाक करताना सुद्धा वारे येई. त्यावेळी घरातल्या माणसांची चांगलीच पळापळ होत असे.

अशावेळी लोक लोक, गावात किंवा पंचक्रोशीत असणाऱ्या भगतीनीकडे जात असत. त्यावेळी अनेक गावामध्ये भगताप्रमाणेच भगतीनी देखील असत. भगतीन त्यांना या बाईला मावलयांनी पछाडले आहे असे सांगत असे.

ओढ्याच्या कडेला असलेल्या उंच दगडाच्या खोबनीत या मावलाया बसलेल्या असायच्या. काही आजारी स्त्रियांच्या अंगात वारे यायचे. हे वारे म्हणजेच मावलया असायच्या. 

त्यांना महानैवद्य म्हणून एका मोठ्या टोपलीत किंवा पाटीमध्ये पुरणपोळ्या, कुरडया,पापड्या,भजी,शेव पापडी, सारभात, फळे, नारळ, फुलांच्या वेण्या, गजरे, नऊवारी हिरवे लुगडे व चोळीचा खण आणि अगरबत्ती व पूजेचे साहित्य घेऊन गावातील स्रिया व इतर पाहुणे रावळे मावलाया असलेल्या ओढ्याच्या ठिकाणी जात असत. तेथे नैवेद्य अर्पण करून मग लोकांच्या जेवनावळी सुरू होत. हा कार्यक्रम साधारण दुपारी होत असे. 

असे हे जेवणाचे प्रकार गावाकडे सतत कुठे ना कुठेतरी असत. परंतु आता हे प्रकार कमी झाले आहेत.

रामदास तळपे (मंदोशी)

 



मंदोशी गावचे बारवेकर सुतार

पूर्वीपासून सुतार हा ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य घटक राहिला आहे. शेती, शेतकरी आणि सुतार हे समीकरणच म्हणावे लागेल.

आमच्या मंदोशी गावात बारवेकर सुतार खुप पूर्वीपासून म्हणजे सण 1846 पासुन वास्तव्य करून आहेत.आता सध्या त्यांची सहावी पिढी कार्यरत आहे.

सखाराम बारवेकर हे जुन्या लोकांना आठवतात. ते गावच्या शेतकऱ्यांना शेतीची औजारे बनउन देत. त्या बदल्यात त्यांना धान्यच्या स्वरूपात मोबदला मिळे. त्यालाच बलुते असे म्हटले जाई.

पावसाळा सुरु होण्या पूर्वी लोक सुताराकडून नांगर, हळस,जुकाड,रूमने, पेटारी, पाभर, लोड, कुळव अशा अनेक वस्तू सुताराकडून बनउन घेत असत. त्यामुळे मे, आणि जुन महिनात सुटरांच्या दारात लोकांचो सकाळ पासुन ते संध्याकाळ पर्यंत वर्दळ असे.

वरील दोन महिने सोडले तर सुताराला काही काम नसे. मंदोशी गाव मोठा असल्यामुळे सुताराला खंडी दोन खंडी धान्य जमा होई. एखाद्या मोठ्या तालेवार शेतकऱ्यांइतके ते धान्य असे. 

बरेचसे धान्य सुतार वाड्याच्या बाजारात विकत असे.शिवाय उर्वरित काळात सुतार घरांची बांधकामे करत असे.त्यामुळे सुताराला या कामाच्या मोबदल्यात पैसे मिळत असे. त्यामुळे त्याकाळात सुतार हा समाज साधन कुटुंब म्हणून ओळखला जात असे.

आमच्या गावावर बारवेकर सुतार घराचे खुप उपकार आहेत. पूर्वी प्रत्येक गावात ग्रामदेवतेची मंदिरे असत. पण ही मंदिरे अगदी साधी गवती छप्पराची असत. सन 1925 साली श्री. कालभैरवनाथ मंदिर दगडी चौथरा, डबरी वंधकाम व वर कौले असे बांधकाम करायचे ग्रामस्थानी ठरवले. त्यावेळी सखाराम सुतारांनी हे काम तीन थरांचा दगडी चौथारा त्यावर दगडी बांधकाम असे अतिशय सुंदर बांधकाम केले. 

हे मंदिर मला स्पष्ट आठवते. त्यानंतर हेच मंदिर पुन्हा सन 1983 साली नव्याने बांधण्यात आले. पूर्वीचे मंदिर ओबढघोबड डबरात होते. परंतू सखाराम सुतार यांचे नातू दत्तात्रय बारवेकर, सुदाम बारवेकर  व सोपान बारवेकर यांनी संपूर्ण दगडी काम हे घडीव स्वरूपात करण्याचे ठरवले. 

दगड घडवण्याचे काम हे तीन बंधू जवळजवळ दोन वर्ष करीत होते. पूर्वीचा मूळ चौथरा तसाच ठेवून घडीव दगडी बांधकामात पुढे सुसज्ज अशा गच्चीसह अतिशय सुंदर असे बांधकाम त्यांनी 1985 मध्ये पूर्ण केले.

हे बांधकाम पश्चिम भागात पाहण्यासारखे होते. त्यावेळी असे बांधकाम कुठेच नव्हते. ही आमच्या गावच्या सुतारांची अप्रतिम कला होती.

त्यानंतर पुन्हा सन 2014 मध्ये मंदिराचे बांधकाम करण्याचे ठरवले. व त्याप्रमाणे बांधकाम झाले देखील. परंतु आजही सखाराम सुतार यांनी बांधलेला मूळ चौथरा व दत्तात्रेय सुदाम व सोपान बारवेकर यांनी घडीव दगडाच्या बांधलेल्या भिंती तशाच ठेवून वर कळसाचे काम करण्यात आले आहे. म्हणजेच मंदिराचा चौथारा व दगडी भिंती आजही ऐतिहासिक वास्तुकलेची साक्ष देतात. ही कला सखाराम सुतार आणि त्यांच्या नातवांची आहे.

सन 2014 मध्ये बांधलेले हे काम सुद्धा गावाने बारवेकर कुटुंबांना देण्याची तयारी दर्शवली होती. त्याप्रमाणे बैठका सुद्धा घेण्यात आल्या. परंतु बारवेकर कुटुंब हे गावापासून खूपच अलिप्त राहिल्याने त्यांना हे काम मिळाले नाही.

सखाराम सुतार यांचे पुत्र कै.श्री विष्णू बारवेकर हे सुद्धा उत्तम पद्धतीने काम करायचे. विष्णू बारवेकर हा माणूस अतिशय साधा होता. मध्यम व सडपातळ  बांधा, साधी राहणी, धोतर,पैरण, गळ्यात उपरणे व टोपी असा त्यांचा वेश होता. त्यांनी सुद्धा गावची खूप सेवा केली.

विष्णू बारवेकर यांना कोऱ्या नोटा जमवण्याचा छंद होता. त्या काळात एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये, वीस रुपये व 100 रुपये अशा त्या नोटा होत्या. विष्णू बारवेकर नोटांना कधीही घडी घालत नसत. या  कोऱ्या नोटा कागदी पिशवी अतिशय काळजीपूर्वक ठेवत. कुणाकडे कोरी नोट दिसली की ती हक्काने मागून घेत असत. मी त्यांना अनेक वेळा कोऱ्या नोटा दिलेल्या होत्या.

मी कधीकधी जाताना त्यांना दिसलो की ते माझी फार अस्थेंने माझी विचारपूस करत. मला घराकडे बोलवत. पेटीत जपून ठेवलेली कागदी पिशवी माझ्यापुढे आणून ठेवत व सोडून त्यातील कोऱ्या नोटा बाहेर काढत व माझ्याकडे देत असत.

रामजी! एवढ्या नोटा मोज बघू. किती आहेत मला सांग?

मी त्यांच्या सर्व नोटा मोजून त्याचा हिशोब त्यांना सांगत असे. या सर्व कोऱ्या नोटा काळजीपूर्वक पिशवीत ठेवून ती पिशवी पेटीत ठेवून देत असत.

विष्णू बारवेकर हे एकदा पाऊस सुरू झाला की शक्यतो घराच्या बाहेर निघत नसत. चिखलातून तर ते कधीच जात नसत. त्यांना पाण्या पावसाची चिखलाची खूप भीती वाटे. कधी कधी मी त्यांना दिसलो की ते मला हमखास बोलवून घेत असत.ख्याली खुशाली विचारत असत. माझ्याबरोबर भरपूर गप्पा मारत. त्यामुळे त्यांचे आणि माझे संबंध खूप चांगले होते. माझ्यावर तर त्यांचा खूपच विश्वास असायचा.

विष्णू बारवेकर यांचा मुलगा म्हणजे श्री सुदाम बारवेकर. सुदाम बारवेकर हे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र होते. सुदाम बारवेकर म्हणजे अतिशय कलाकार माणूस. त्यांच्या उमेदीच्या काळात माझ्या वडिलांनी सागाचा पलंग, सागाचे कपाट,टेबल व खुर्ची, सागाच्या पेट्या, लिहिण्याचा स्टूल, बसण्याचा स्टूल असे अनेक साहित्य बनवून घेतले होते.

सुदाम बारवेकर म्हणजे कलाकारित परफेक्ट माणूस. गावची बलुतेदारी करून त्यांनी या कलाक्षेत्रात त्या काळात खूपच सुंदर सुंदर अशी घरे बांधली, लाकडी फर्निचरच्या वस्तू बनवल्या. मंदिराची सुंदर अशी बांधकामे केली.

सुदाम बारवेकर यांचा आवाज हा अतिशय दैवी म्हणावा लागेल. श्रावण महिन्यात त्या काळात लोक श्री.नवनाथ, भक्ती विजय, राम विजय,पांडव प्रताप या अध्ययांचे पारायण करत. हे अध्याय वाचावे तर सुदाम बारवेकर यांनीच. 

सुदाम बारवेकर यांनी एकदा का अध्ययांच्या ओव्या वाचायला सुरुवात केली की एखादे उत्तम सुरावट असलेले  गाणे जसे आपण ऐकतो तसे लोक मन लावून ऐकत असत. सुदाम बारवेकर अध्याय वाचायला असतील तर अध्याय ऐकण्यासाठी लोकांची त्या काळात प्रचंड गर्दी होत असे.

सुदाम बारवेकर हे लग्नातील मंगलाष्टका सुद्धा अतिशय भारदस्त आवाजात म्हणत असत. त्यांच्या या मंगलाष्टका ऐकल्यावर अंगातून रोमांच उभे राहत. 

लोक विचारत कुठला माणूस आहे हा? त्यावर बाकीचे काही लोक सांगत, मंदोशीचे सुदाम बारवेकर आहेत ते.

त्यावर लोक म्हणत. काय सुंदर आवाज आहे या माणसाचा..

सुदाम बारवेकर हे  भजनात उत्तम अभंग सुद्धा म्हणायचे. काही काळ त्यांनी व धर्मा बुधाजी तळपे आणि चंद्रकांत मोहन यांनी मंदोशी गावचे नाव खेड आंबेगाव,जुन्नर आणि मावळ या  तालुक्यामध्ये अजरामर केले.

सुदाम बारवेकर यांनी भजनामध्ये पंडित भीमसेन जोशी, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे यांची गायकी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे लोकप्रिय अभंग स्वतः म्हणून ते अभंग मंदोशी गावच्या भजनात लोकप्रिय केले.

सुदाम बारवेकर हे 1995 ते 2000 या काळात शिरगाव मंदोशी या ग्रामपंचायतचे सदस्य देखील होते. 

सुदाम बारवेकर यांचा भाचा श्री.कैलास सुतार हे कुडे खुर्द या गावचे. ते सुद्धा काही काळ मंदोशीला असत. कैलास सुतार हे अतिशय उत्तम कलाकार होते. परंतु त्यांना त्याप्रमाणे साथ न मिळाल्यामुळे त्यांची कला विशेष बहरली  नाही. कैलास सुतार यांना आधुनिकतेची खूपच आवड होती. आणि त्याप्रमाणे कला जोपासली पाहिजे अशी त्यांची इच्छा असायची. परंतु आमचे गाव पडले अतिशय दुर्गम असे खेडेगाव. कैलासच्या नवीन कल्पनांचे खेडवळ लोक टिंगल, टवाळी करत.

कैलास सुतार यांनी मंदोशी गावच्या यात्रेत आलेल्या तमाशामध्ये दिवाना या चित्रपटातील गाणी फक्त पुरुष गायकांचा आवाज एडिट  करून व स्त्री कलाकाराचा आवाज व म्युझिक तसेच ठेवून स्वतःच्या आवाजात म्हणून सादर केली. त्यामुळे तमाशातील लोक सुद्धा अचिंबित झाले. ही किमया फक्त कैलास स्वतःच करू जाणे. 

1990 च्या दशकात अतिशय खेडेगाव असलेल्या दुर्गम भागात राहून सुद्धा एडिटिंगची कल्पना वास्तवात कैलास सुतार कसा करू शकला हे कोडेच आहे. ही त्यांच्या बुद्धीची किमयाच म्हणावी लागेल.

सुदाम बारवेकर यांच्याकडे त्या काळात लाऊड स्पीकर होता. सुदाम बारवेकर यांच्या घरावर दोन बाजूला दोन मोठी लाऊड स्पीकरची कर्ण कायमस्वरूपी लावलेली असत. 

रोज सकाळी सहा वाजता स्पीकरवर अभंग वाणी,श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले लोकप्रिय अभंग, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे यांच्या आजारावर गायकीने लोकप्रिय झालेले अभंग त्या काळात आम्ही ऐकत असु. तर संध्याकाळी सहा वाजता बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन स्पीकरवर ऐकायला मिळे. त्यामुळे अनेक लोकांना भक्तिमार्गाची गोडी लागली.

त्या काळात भाताची पिठाची गिरणी गावात नसल्यामुळे आम्हा सर्व लोकांना धुओली किंवा डेहणे येथे जावे लागे. डोक्यावर भाताची किंवा दळणाची ओझी घेऊन आम्ही धुओली किंवा डेहणे जात असू.परंतू लवकरच श्री.सुदाम वारवेकर यांनी त्यांच्या घरात भाताची व पिठाची गिरणी सुरू केली. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या मिटली.

पुढे श्री सुदाम बारवेकर गावापासून का काय माहित ? परंतु अलिप्त राहू लागले. गावच्या कोणत्याच कार्यक्रमात ते भाग घेत नाहीत.

आजही त्यांच्या आजोबांनी, वडिलांनी त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी केलेले कार्य गाव विसरलेला नाही. त्यांची कला आजही कलेच्या माध्यमातून चिरंतन टिकून आह

रामदास तळपे

आमच्या बैलांची गोष्ट

आज खेडे गावामध्ये ट्रॅक्टरला अनन्य साधारण महत्त्व आले आहे. शेतीची सर्व कामे आज ट्रॅक्टरने केले जातात. परंतु पूर्वी गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल जोडी असायचीच. काही मोठ्या शेतकऱ्यांकडे तर चार चार बैल जोड्या असायच्या. 

त्यावेळी सर्व लोक शेतीवर अवलंबून असायचे. पुणे मुंबईला असलेले गावचे लोक सुद्धा अवनी, येटाळणी व इतर शेतीच्या कामासाठी मुद्दामहुन सुट्टी काढून गावाला यायचे. व गावच्या भावाला मदतीचा हात द्यायचे.  

त्यावेळी प्रत्येक कुटुंबाकडे बैल जोडी असायची आणि ज्याच्याकडे नसायची त्या कुटुंबाला आपल्याकडे काही नसले तरी चालेल परंतु बैल जोडी असायलाच पाहिजे. हे त्यावेळी प्रत्येकाचे स्वप्न होते. 

पूर्वी गावामध्ये प्रत्येकाकडे आठ-दहा गावठी गाया असायच्या. बैल असायचे. काही काही लोकांकडे तर पंधरा-वीस गायी असायच्या. गावात जनावर नाही असा एकही माणूस आढळत नव्हता.

आमच्याकडे देखील पूर्वी बैल जोडी नव्हती. आपल्या घरी बैल जोडी असायला पाहिजे हे आमच्या नानाचे स्वप्न होते. परंतु घरी 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळे बैल जोडी घेता येत नव्हती. त्यावेळी माझी आजी आणि माझा चुलता धोंडू तळपे हे बैल नसल्यामुळे कुडवण्याने शेती करायचे.

सन 1973 च्या जानेवारी महिन्यात माझे वडील शिक्षक म्हणून रुजू झाले. आणि हळूहळू घरच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत चालली. प्रथम आपल्याला शेतीसाठी बैल पाहिजेत या विचाराने वडिलांनी आमच्या गावातीलच श्री विष्णू गोमा तळपे यांच्याकडून राजा नावाचा गोऱ्हा विकत घेतला. हा राजा बैल पावणे सहाशे रुपयाला विकत घेतला होता.

विष्णू गोमा तळपे  यांना बैलांची मोठी हौस होती व अजूनही आहे. त्यांच्या गाईला गोऱ्हा झाला की विष्णू तळपे यांना खूप आनंद होत असे. मग ते त्या वासराची खूप काळजी घेत. नेहमीच ते जनावरां साठी हिरव्या चाऱ्याची व्यवस्था करत. ऐन उन्हाळ्यात जेव्हा हिरवा चारा वाळून जाई तेव्हा ते अगदी कडे कपारीतून जिथे हिरवे गवत आहे तिथून ते आपल्या जनावरांसाठी आणत असत. उन्हाळ्यात देखील हिरवे गवत पाहून लोक चकित होत.

वासरू थोडे मोठे झाल्यावर त्यांची मुले दगडू दादा, धोंडू व मारती त्या गोऱ्ह्याला दुसऱ्या बैलाबरोबर कढवानाला जुंपत असत. कडवानावर थोडा जड दगड ठेवला जाई. सुरुवातीला गोऱ्हा इकडे तिकडे पळण्याचा खूप प्रयत्न करायचा. कढवान व दगड उलटे पालटे व्हायचे. कधी कधी हाता पायाला मार लागायचा. परंतु बैलाला शिकवायची प्रतिज्ञाच या तिघांनी केलेली असायची. 

दररोज दुपारनंतर या तिघांचे बैलाला शिकवण्याचे काम सुरू होत असे.  

तर आमच्या वडिलांनी विष्णू गोमा तळपे यांच्याकडून राजा हा गोऱ्हा विकत घेतला होता. त्यावेळी मंचर येथे बैलांचा मोठा बाजार भरत असे. मंचर येथे जाऊन वडिलांनी व नानांनी पारा नावाचा बैल विकत आणला. हा बैल आठशे रुपयाला आणला होता. या बैलाला आम्ही पाखऱ्या असे म्हणत असू.

राजा आणि पाखऱ्या या बैलांची जोडी काही जमली नाही कारण राजा हा गोऱ्हा होता तर पाखऱ्या हा मोठा बैल. त्यामुळे शेतीची नांगरणी करताना अडचण येत असे. मग आमच्या वडिलांनी आणि नानांनी राजा बैल म्हसा येथे रुपये 600 ला विकला.

नवीन बैल घेण्यासाठी खूप प्रयत्न करूनही बैल मिळाला नाही. त्यामुळे मग वडिलांनी आमचे आजोबा (आईचे वडील) लुमा ठोकळ यांच्याकडून हिरा नावाचा बैल विकत घेतला. हिरा व पाखऱ्या या बैलांची जोडी छान जमली. परंतु पुढे प्रॉब्लेम असा झाला की हिरा बैलाचा पुढचा पाय आपोआपच सांध्यातून निखळत असे. व थोडे प्रयत्न केल्यावर तो परत बसायचा.

दुसऱ्याच वर्षी वडिलांनी व नानाने ही बैल जोडी विकण्याचे ठरवले. त्यावेळी बैलांना खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था केली व बैल तयार केले. म्हशाच्या बैल बाजाराला बैल घेऊन जायच्या आधी मंचर वरून आठशे रुपयाला आणलेला पाखऱ्या बैल आमच्याच गावातील चिंधु धोंडू तळपे व सिताराम दुलाजी तळपे यांनी तेराशे रुपयाला विकत घेतला. व म्हसा येथे सोळाशे रुपयाला विकला. 

गावातच बैल विकला गेल्यामुळे दुसरा बैल विकण्याचे रद्द केले व त्यालाच दुसरा जोडी बैल घेण्याचे ठरवले. डेहणे येथे  धोंडीभाऊ सुतार हे बैल विकणार आहेत हे कळल्यावर आमच्या वडिलांनी त्यांच्याकडून थैमण्या या नावाचा बैल विकत आणला. थैमण्या हा माझा अत्यंत आवडता बैल होता. थैमण्या हा रंगाने काळा होता आणि ठिकठिकाणी पांढरे मोठमोठे ठिपके त्यावर होते.

थैमण्या हा खूपच गरीब बैल होता. मी त्याच्या पोटाखालून जात येत असे. परंतु हा बैल खूपच वयस्कर होता. त्यामुळे पुढच्या वर्षी हे दोन्ही बैल विकण्यात आले.

थैमण्या हा म्हसा येथे अठराशे रुपयाला विकला. आणि दुसरा बैल हिरा हा शिरगावच्या किसन लांघी कोतवाल यांना 1200 रुपयाला विकला.

दोन्ही बैल विकल्यामुळे बैल जोडी विकत घेणे अतिशय आवश्यक होते.

त्यानंतर आमच्या वडिलांनी आणि नानाने म्हसा येथून नारायण जठार धुओली यांच्याकडून बैल जोडी विकत घेतली. एका बैलाचे नाव गुलब्या तर दुसऱ्या बैलाचे नाव पैठण्या असे होते. हे दोन्ही बैल तांबूस रंगाचे होते. त्यातील गुलब्या हा बैल लहान मुलांवर धावत असे. तर पैठण्या हा अतिशय गरीब बैल होता.

ही बैल जोडी आमच्या नानाने जवळजवळ दोन-तीन वर्ष वापरली. परंतु गुलब्या बैल हा लहान मुलावर धावत असल्यामुळे गुलब्या बैल विकण्याचा निर्णय घेतला. व म्हशाच्या यात्रेमध्ये हा बैल विकला.

त्यानंतर आमच्या वडिलांनी गावातीलच मोतीराम मोहन यांच्याकडून हौशा नावाचा बैल विकत घेतला. हा बैल रंगाने काळा होता.

ही बैल जोडी सुद्धा आमच्या नानाने जवळजवळ दोन वर्ष वापरली. त्यानंतर हे दोन्ही बैल म्हशाच्या बाजारात विकण्यात आले. 

आणि मग म्हशाच्या बाजारातूनच पंधराशे रुपयाला बबन्या नावाचा बैल विकत घेतला. व दुसरा पुतळा नावाचा बैल वांजळे गावच्या लक्ष्मण सोळसे यांच्याकडून सोळाशे रुपयाला विकत घेतला. आमच्या गोठ्यात ही बैलजोडी दीर्घकाळ राहिली. बबन्या बैलावर आमच्या घरातील सगळेच खूप प्रेम करायचे. बबन्या बैलाला देखील घरच्या माणसांचा खूपच लळा लागला होता.

आमच्या घराचे वेगळी झाल्यानंतर पुतळा बैल आमच्याकडे आला व बबन्या बैल आमच्या नानाकडे गेला पुढे काही दिवसांनी आमच्या नानांनी हा बैल म्हसा येथील बाजारात तीन हजार रुपयाला विकला. त्यावेळी सर्वात जास्त दुःख आम्हाला झाले होते.

बबन्या व पुतळा ही बैल जोडी सुद्धा खूप वर्ष आमच्याकडे होती. पुतळा बैल विकून डेहणे येथील श्री नामदेव कशाळे यांच्याकडून पक्षा नावाचा बैल एकवीसशे रुपयाला विकत घेतला. ही आमची शेवटचीच बैल जोडी असावी.

त्यानंतर वडिलांनी डेहणे येथील हरिश्चंद्र कोरडे यांच्याकडून मच्या आणि जेल्या नावाचे दोन खिल्लारी बैल ( गाड्याचे) केवळ हौसे खातर विकत घेतले होते. ते केवळ गाड्याचे बैल होते. सन 1989 साली माझ्या नानाने आमच्या चुलत भावाच्या (गोटयाभाई) लग्नाला खटार गाडीला हे बैल जुपले. व त्यामध्ये लग्नाचे नवरदेवा सह वऱ्हाड बसवले. शिरगावच्या खिंडीमध्ये वऱ्हाड गेल्यावर बैल जे उधळले की ज्याला म्हणतात ते.

खटार गाडी मधील सर्व वऱ्हाडाच्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी खटार गाडीतून उड्या मारल्या. व आपला जीव वाचवला. नंतर ही खटार गाडी सटवाई मंदिराच्या पुढे जाऊन लोकांनी पकडली.

त्यानंतर मच्या हा बैल आमच्याच गावातील गंगाराम हुरसाळे यांना विकला व जेल्या बैल आमच्याच गावातील जयराम आंबेकर गुरुजी यांना विकला.

सन 1992 रोजी वडिलांचे निधन झाल्यावर परत मात्र कधीही बैल घेतले नाही किंवा घेण्याचा प्रसंग आला नाही.

वेगळे झाल्यावर आमच्या नानांनी बरेच बैल घेतले व विकले.

त्यावेळी बैल म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण होता. आता जसे लोक गाड्या, मोटरसायकली घेतात तसेच त्यावेळी लोक बैल घ्यायचे. एकच बैल ते सतत वापरत नसत. हा बैल विकून लगेच दुसरा घ्यायचा. तो विकून लगेच तिसरा घ्यायचा असे रहाटगाडगे सतत चालू असायचे.

बैलाच्या शिंगांना त्यावेळी विशेष महत्त्व होते. बैलांची शिंगे टोकदार असली पाहिजेत. बैलाला जास्त कांबळ (गळ्याखालचा भाग) नसली पाहिजे. वशिंद, बैलाचे दात, बैलाची चाल इत्यादी सर्व पारख करूनच बैल विकत घेतले जात असत.

गावात एखाद्या माणसाने बैल विकत घेतल्यावर गावातील अनेक लोकांची तिथे गर्दी जमत असे. काही जण त्यावेळी बैलांमध्ये आनेक उणीवा काढत असत. बैलाच्या किमतीवरून सुद्धा चर्चा झडत.

दरवर्षी कोकणा मधून बैलाची शिंगे फोडण्यासाठी माणूस येत असे. तो बैलाची शिंगे टोकदार बनवून देत असे. अनेक लोक त्याच्याकडून बैलाची शिंगे टोकदार करून घेत असत.

एखाद्या छोट्या झाडाला बैल बांधला जाई दोन-चार जण बैलाचे मुंडके घट्ट पकडत. त्यानंतर हा शिंगे टोकदार करणारा माणूस त्याच्याकडील कानशीने बैलाची शिंगे लाकडासारखी घोळत राही. त्यामधून खूप रक्त येत असे. मला हा प्रकार अजिबात आवडत नसायचा.

बैलाची शिंगे टोकदार झाल्यावर त्यावर लोक वेगवेगळे झाडपाल्याचे औषध बैलाच्या शिंगाला चोळायचे. परंतु दोन-चार दिवसातच बैलाच्या शिंगांच्या जखमा बर्‍या व्हायच्या. त्यानंतर बैल मात्र मोठे रुबाबदार व डौलदार दिसायचे.

बैलाची शिंगे जशी टोकदार करत तसेच बैल बडवण्याचा कार्यक्रम सुद्धा अतिशय आघोरी होता.

बैलाची वय त्याच्या दातावरून ठरत असे. दुस,चौसा, गोरा, भादवा असे प्रकार होते. त्यावेळी खिल्लारी बैल हे अतिशय महाग असायचे. त्यामुळे हे बैल लोक विकत घेत नसत. गावठी बैलच अनेक लोकांकडे असायचे.

त्यावेळी गावातील ठराविक लोकांकडे बैलगाड्या असायच्या. या बैलगाड्यातून लोक शेतीसाठी शेणखत वाहने, जनावरांसाठी पेंढा, वाळलेल्या गवताच्या पेंढ्या, सरपण, भाताची पोती, पाण्याची पिंपे, यात्रा, लग्न व देवदर्शन इत्यादी कामासाठी बैलगाडीचा स्तरास उपयोग होत असे. लग्नाचा नवरदेव वऱ्हाड बैलगाडीतून जात असे. त्यासाठी बैल गाडी अतिशय छान सजवली जायची. बैलाच्या अंगावर झोली बांधल्या जात.

आमच्या वडिलांनी सुद्धा भिवेगावच्या पांडुरंग वनघरे यांच्याकडून बैलगाडी विकत आणली होती. या बैलगाडी मध्ये मी रात्री अंगणात झोपत असे. ही बैलगाडी चालवण्याचा आनंद सुद्धा मी अनेक वेळा घ्यायचो.

मी लहान असताना माझे आजोबा आईचे वडील लुमा ठोकळ यांनी दुधासाठी एक गाय दिली होती. या गायीचे नाव सारंगी असे होते. सारंगी गाय खूपच गरीब होती. व ती चांगले दूधही देत असे. ही गाय खूप वर्ष आमच्याकडे होती.

परंतु त्यावेळी जनावरांना खरकुताची साथ यायची. जनावरांच्या पायातील खुरामध्ये छोटे छोटे किडे पाडायचे. त्यावेळी आता सारखी औषधी उपलब्ध नसायची. आमची आजी व मी रानातून कुंभा या वनस्पतीची पाने आणत असू. ती दगडावर वाटून त्याचा रस व लगदा गायीच्या पायाच्या खुरामध्ये घालत असू.

परंतु थोड्याच दिवसात पावसाळा सुरू झाला. व खरकुत या आजाराने जास्त जोर धरला. आम्ही सकाळी पाहायचं त्यावेळी गोठ्यामध्ये सगळीकडे खरकुताचे किडे दिसायचे. आणि अशातच एके दिवशी आमची गाय आम्हाला सोडून गेली.

त्यानंतर आमच्या वडिलांनी डेहणे येथील श्री तुकाराम कोरडे यांच्याकडून एक गाय विकत आणली.

त्यावेळी मी दुसरीला होतो. श्रावण महिना होता. आम्ही सर्व मुले शाळेत होतो. वेळ साधरण दुपारनंतर साडेचारची असेल, गुरुजी पाढे शिकवत होते आणि अचानक कुणीतरी शाळेत सांगायला आले की की आमच्या घरी गाय आणली आहे. मला खूप आनंद झाला.

काही मुलांनी गाय पाहण्यासाठी गुरुजींची परवानगी मागितली. तनपुरे गुरुजीं सह आम्ही मुले आमच्या वडिलांनी नवीन आणलेली गाय पाहण्यासाठी गेलो. तर काय अंगणात पांढरीशुभ्र गाय उभी होती, तिच्याबरोबर छोटे वासरू होते. चार-पाच लोक उभे होते. आई गाईची पुजा करून औक्षण करीत होती. तेवढ्यात आम्ही तेथे गेलो.

माणसे गप्पा मारत होती. सर्वांना माझ्या हस्ते गुळ वाटप करण्यात आला. गुळ वाटल्यावर बाकीची मुले शाळेत गेली. मी तेथेच थांबलो. त्यानंतर मोठ्या माणसांना चहापाणी झाला घरातील सर्वांना त्यावेळी खूपच आनंद झाला होता. घरात दूध दूभते आले होते.

त्यावेळी गावात "चाहूर"  हा एक परावलीचा शब्द होता. चाहूर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात गावातील सर्व बैल जोड्या घेऊन त्या शेतकऱ्याच्या शेताची दुरुस्ती करावयाची. त्या बदल्यात तो शेतकरी दोन वेळचे जेवण व ठराविक रक्कम द्यायचा. यालाच चाहूर असे म्हणत असत.

कुणाचा पावसाळ्यात बांध गेला असेल. कुणाच्या शेतात जास्त माती धुवून आलेली असेल. किंवा कोणाला नवीन भाताची खाचरे तयार करायची असतील. तर अगदी सकाळी सकाळी आपापली बैल घेऊन अशा शेतकऱ्यांच्या शेतात घेऊन जावयाचे.

संध्याकाळपर्यंत शेतीची कामे करायची. वीस बावीस बैल जोड्या असत. चाहूल असेल त्या दिवशी घरातील बाया माणसाची खूपच धावपळ असे. दिवसभर त्यांना खूप काम असायचे. 

शेतातील माणसांना दुपारचे जेवण म्हणजे नाचणीच्या किंवा तांदळाच्या भाकरी, मसुराची आमटी, कांद्याच्या फोडी, पापड हा बेत असायचा. त्यासाठी शेजारच्या बाया मदतीला यायच्या.

भल्या पहाटेपासून स्वयंपाकाची तयारी करावी लागायची. तेव्हा कुठे दुपारचे जेवण तयार व्हायचे.

दुपारी गर्द झाडीच्या छायेत जेवण झाल्यानंतर थंडगार पाणी पिऊन लोक वामकुक्षी घेत असत. तर सावलीमध्ये बांधलेल्या बैलांना वैरण काडी केली जात असे.

दोन-चार अति उत्साही लोक जवळच्याच रानात जाऊन आंब्यावर चढून पिवळे धमक पाड घेऊन येत असत. पाटी दोन पाट्या पिवळे धमक पाड खाण्यासाठी लोक त्यावर तुटून पडत.

आंबे खाऊन झाल्यावर पुन्हा शेतीचे काम सुरू होई.

संध्याकाळी पुरणपोळीचे जेवण असे. लोक चावडीच्या दारात बसून गप्पा मारत असत व जेवणाची वाट पाहत असत. जेवणाचे एकदा बोलावणे आले की लोक सार पोळीवर तुटून पडत. एक एक माणूस पाच पाच सहा पोळ्या खात असे. 

त्यावेळी कोणताही कार्यक्रम असो जेवण म्हणजे पुरणपोळी हा सर्रास लोकप्रिय प्रकार होता. मुलगी बघण्याचा कार्यक्रम, पाहुणे आल्यावर, शेतीच्या कामानिमित्त, यात्रा, सण व उत्सव, लग्न कार्य या सर्वांसाठी पुरणपोळी हा बेत ठरलेला असे.

आता मात्र पुरणपोळ्या हा प्रकार बंद होत चालला आहे. त्यावेळी चाहूर हा प्रकार अतिशय लोकप्रिय होता. अख्या गावाची औते एकच शेतकऱ्याकडे जात असत. एकच शेतकऱ्याच्या शेतामध्ये 25, 30 बैल जोड्या पाहून बैलांचा बाजार भरला आहे की काय असे वाटत असे. चाहूर हा एकमेकांना मदत करण्यासाठीचा प्रकार होता. परंतु आता चाहूर हा शब्द मदत करणे सोडाच परंतु ऐकायला देखील मिळत नाही. आताच्या पिढीला त्याचा शब्दही समजणार नाही.

परंतु त्यानंतर मात्र काळ बदलला पुरणपोळीची जागा चिकन,मटण आणि दारूने घेतली. दिवसाढवळ्या सुद्धा दारू पिऊन मगच शेतीच्या कामाला लोक सुरुवात करू लागले.

चाहूर या शब्दासारखाच दुसरा प्रकार म्हणजे "इर्जिक" होय. या प्रकारामध्ये गावातील ठराविक लोक एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी मदत करत असत. त्या बदल्यात तो शेतकरी मदत करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन वेळचे जेवण देत असे. संध्याकाळचा स्वयंपाक मात्र पुरणपोळीचा असे. थोडक्यात इर्जिक प्रकार म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला विनामोबदला केलेली मदत.

आता तर हे सर्वच बंद झाले आहे. कारण कुणाकडेच बैल नाहीत. ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.

रामदास तळपे 


शाई व पेन

शाळेत असताना ज्या साहित्याची खूपच मदत झाली आणि प्रसंगी त्रास खूपच झाला अश्या गोष्टी म्हणजे शाई व शाईपेन. अक्षर चांगलं येतं या गैरसमजातून तसेच हुशार विद्यार्थी वापरतात म्हणून खरं तर याचा वापर करायचो आम्ही. शेवट पर्यंत अक्षर सुधारले नाही हा भाग वेगळा.

साधारण पाचवी पासून पाचवीलाच पुजलेला हा शाई पेन आता फारसा दिसत नाही, परंतु ८० च्या दशकात याची खूप चलती होती.

त्यावेळी पन्नास पैश्याची निब व २-३ रुपयचा शाईपेन दुकानात मिळे. त्यावेळेस किराणा दुकान म्हणजे लोकल मॉलच. किराणा कापड शालोपयोगी वस्तू इतकंच काय लग्नाचं वाण सामान व मयताचं सामान ते ही ऊधारीवर सहज उपलब्ध होणारं हक्काच ठिकाण म्हणजे किराणा दुकान. 

त्यामुळे वह्या कंपास पुस्तके शाईपेन, बॉल (पॉईंट) पेन, शाई, रिफीलच्या चाराण्याच्या कांड्या, जॉटर रिफील किराणा दुकानात सहज उपलब्ध होत असे. 

स्टेशनरीचे स्वतंत्र दुकान असते हे माहित नव्हते आम्हा बालकांना.

एकदा घरी शाईची अख्खी बाटली वडिलांनी आणलेली, पण आमच्या कुशल हाताळणीमुळे महिनाभर सुद्धा टिकली नाही. 😅 नेमकी कोणी फोडली याचा शोधही लागला नाही. परिणाम एकच झाला. किराणा दुकानदाराला पाच पैसे देऊन पेनात शाई भरुन घेण्याची उज्वल परंपरा पुन्हा सुरु झाली.

शाई पेन वापरायची हौस व अक्कल यामध्ये काहीतरी अंतर असते किंवा असावे हे आम्हास अर्थातच मान्य नव्हते. सर सांगतात म्हणून आम्ही शाईपेन वापरायचो.

वडिलांनी निब असणारे शाई पेन आणून दिले की निब रुळावी (नवीन सुनेला जसे सासरचे रुळवतात) त्याहून अधिक मायेने आम्ही त्या निबला रुळवायचो.त्या निबला उमटवण्यासाठी तिच्यावर अत्याचारही खूप करायचो.

म्हणून आम्ही दिसेल त्या वहीवर लेखनाचा सराव करायचो. आपले संपुर्ण नाव वहीच्या समोरील पृष्ठांवर तर लिहायचोच. पण मध्ये शेवटीही टाकायचो.

शाईपेन त्यावेळचे तांत्रिकदृष्टया परिपूर्ण नसत. म्हणजे शाई भरताना व प्रत्यक्षात लिहिताना शाई पेनाशी फारकत व आमच्याशी जवळीक साधण्याचा हमखास प्रयत्न करायची. त्यामुळे अंगठा तर्जनी व मध्यमा यापैकी कोणत्या तरी वा सर्वच बोटाबरोबर हमखास व रोजच रंगपंचमी खेळे.

त्यावेळेस शाई एकतर साधारणतः निळी (सर्व छटा मिळून) व काळी या दोनच रंगात उपलब्ध असे. सुटया स्वरूपात हिरवी लाल जांभळी शाई अजिबात मिळत नसे. 

ती कमतरता नंतर विविध रंगांच्या स्केचपेनने भरून काढली.पण लोचा असा की ते रंगीत स्केच एकटे यायला घाबरत क्रेयॉन कांड्या असोत की स्केच पेन पूर्ण सेटच खरेदी करावा लागे. ज्यासाठी घरचे अनुदान देताना नेहमी खळखळ करत.

आमचे स्केच पेनचे खेळ म्हणजे खोलून आतली रिफील चेक करणे सुकली आहे असे वाटल्यास पाणी टाकणे. ते करताना हात गिरबडून घेणे. 

अंदाज चुकून पाणी जास्त टाकले गेले मूळ शाई खालून वाहून गेल्यावर तोच गिरबडलेला हात कपाळावर मारून घेणे.

स्केचपेन मध्ये कांडी टाकून त्याचे बॉल पेन मध्ये रुपांतर करणे. यात रिफील कांडी थोडी कट करावी लागत असे. नेमकी कट झालेली नसेल तर लिहिताना कांडीचे टोक आत गायब होई मग त्यावर उपाय काय तर नळीच्या मागच्या टोकाला कागदाचा बारीक बोळा टाकून कांडीचे कायम बाहेर राहील अशी व्यवस्था करायची. 

पण बऱ्याचदा मागची बाजू हवाबंद होऊन कांडी काम करायचे थांबवी मग बाहेर काढून मागून फूक मारून पुन्हा तिला लिहायला तयार करावं लागे. अशा बऱ्याच गमती जमती सुरु असत.

त्यावेळच्या वह्या ह्या शाईपेन वापराकरिता अजिबात सुसह्य नसत. त्यांचे शाईशी व निबशी काय वाकडे होते देव जाणे. पण कागदाचा धागा वा तशाच प्रकारचा भाग हमखास निबमध्ये अडके. त्यामुळे शब्द कागदावर कसेतरी उमटत किंवा कॅलोग्राफी प्रमाणे उमटत. 

त्यातही एखाद्याच शब्दास ठळक रूप देत. बऱ्याचदा टायटल साधे तर इतर लिखान बोल्ड स्वरूपात येई. काही वेळा पुढील सगळेच काही शब्द बोल्ड तर काही सामान्य उमटत. 

आम्ही निबची साफसफाई जमेल तशी करायचो पण त्या नादात निबच्या दोन टोकांपैकी एक हमखास तुटे. व ते वहीवर अक्षरे उमटवण्यास असहकार्य करी. तरीही बळजबरी केल्यास उरलेले दुसरे टोक ही मोडे व आमचा खोळंबा होई. 

सर डिक्टेशन देताना लिहिण्याची कितीही भारी Acting केली तरी सरांच्या बाकामधल्या राऊंडला ती उघडकीस येऊन एखादा रट्टा चुकी नसतानाही बसे. कारण सरांचा आमच्यापेक्षा निबवर जास्त भरोसा.

तूच काहीतरी उद्योग (आताच्या भाषेत उंगल्या) केले असणार म्हणून निब मोडली असा पुराव्याशिवाय सर निष्कर्ष काढून मोकळे होत. 

पण घरी जाताना खिशात पैसे नसल्याने व दुकानदार आम्हास ऊधार द्यायला तयार नसल्याने तसेच घरी यावे लागे. 

दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना निब घेऊन शाळेत गेलो तरी गृहपाठ अपूर्ण म्हणून पुन्हा उत्तरपूजा ठरलेली.

खराब क्वॉलीटीमुळे वहीवर एकाच पृष्ठांवर लिहिले की ते पाठीमागे स्पष्ट उमटे. त्यामुळे Affidavit प्रमाणे एकाच पृष्ठावर लिहिण्याचा प्रसंग वारंवार येई . . 

ह्या शाई पेनाची निब मुद्दामच उघडी ठेवून जर पुढील बाकावरील विद्यार्थी मागे टेकला तर त्याचा मांजरपाटाचा शर्ट हमखास रंगे त्यावरून पुन्हा भांडणे मारामाऱ्या होत असत. 

अशा गंमती जमती होत असल्यतरी शाई पेनाने लिहायची आवड होती निदान दहावीपर्यंत तरी. नंतर बॉलपेन व जेलपेन यांचा जमाना आला. शाईपेनाचे अस्तित्व धोक्यात आले. पण जुन्या आठवणी अजूनही ताज्याच आहेत 

विवेक देशमुख


आदिवासी क्रांतिकारक होनाजी केंगले

थोर क्रांतिकारक होनाजी केंगले यांचा जन्म १८३५ साली जांभोरी ता.आंबेगांव जि.पुणे येथै भरपुर शेतीभाती व दुधदुभते असलेल्या सधन अशा कुटुंबात झाला.

घरी दुधदुभते असल्यामुळे होनाजीचे शरिर चांगलेच मजबुत व पिळदार होते.त्यांनी खेड,आंबेगांव, जुन्नर व अकोले भागात अनेक नामांकित कुस्त्या केल्या होत्या. 

त्यामुळे होनाजीचे नाव सगळीकडेच चांगलेच दुमदुमत होते. आणि याचाच रोष त्यांच्या चुलतभावांना होता.

त्यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी सावकारांनी बळकावल्या होत्या. सावकार आदिवासी समाजावर प्रचंड जुलूम जबरदस्ती करत होते.

होनाजीच्या चुलत भावांनी खोट्या गुन्ह्याखाली होनाजीला अटक करायला भाग पाडले. आणि होनाजींच्या मनात तेथेच अन्यायाविरूद्ध लढण्याचे बीज रोवले गेले.

सन १८५६ साली भयानक असा दुष्काळ पडला होता. लोकांनी वेळेवर पेरण्या करूनही पाऊस वेळेवर पडला नाही. सुरूवातीला पावसाचे वातावरण तयार व्हायचे. 

आकाशात काळे ढग जमायचे. आता थोड्याच वेळात जोरदार पाऊस होणार असे वाटायचे. परंतू थोड्याच वेळात भ्रमनिरास व्हायचा. आभाळातील ढग विरळ व्हायचे. पाऊस काही पडायचा नाही. जुन गेला जुलै महिना संपायला आला. परंतू पावसाचा एक टिपुस देखील पडला नाही.

आँगाष्ट महिन्यात तर चक्क कडक ऊन पडू लागले. दिवसामागून दिवस जात होते. पाऊस काही पडत नव्हता. घरातील अन्नधान्य केव्हाच संपले होते. चारापाणी नसल्यामुळे जनावरांनी केव्हाच माना टाकल्या होत्या.

त्यावेळी इंग्रजांचे राज्य असल्यामुळे माणसे जगवण्यासाठी ज्या काही उपाययोजना सरकार करत होते. त्या अत्यंत तुटपुंज्या होत्या.

दुर अरण्यात, रानावनात व डोंगरद-यामध्ये राहणाऱ्या आदिवासी महादेव कोळी, ठाकर समाजाच्या लोकांकडे सरकारचे साफ दुर्लक्ष होते.

गुरे ढोरे तर केव्हाच पशुपक्ष्यांच्या भक्षस्थानी पडली होती. लोक आपल्या कुटुंबाचा जीव मोठ्या मुश्कीलीने जगवत होते.

सुरूवातीला लोक भाताच्या कोंड्यात पिठ घालून भाकरी करून आपल्या कडील धान्य पुरवत. परंतू काही दिवसांनी घरातील धान्य देखील संपले. उपासमार होऊ लागली. लोक जंगलातील कंदमुळे, झाडाची पाने खाऊन दिवस ढकलू लागली. अनेक लहानमुले,म्हातारी माणसे भुकेमुळे मेली.

आदिवासी समाजापुढे कुटुंबातील माणसे जगतील कशी हा मुख्य प्रश्न होता. मुलाबाळांचे उपासमारीमुळे होणारे हाल लोकांना उघड्या डोळ्यांनी पहावत नव्हते. त्यामुळे अनेक लोकांनी आपल्या जमिनी आंबेगांव, घोडेगाव, जुन्नर, राजुर येथील सधन असलेल्या मारवाडी, गुजर, मुसलमान, तेली, ब्राम्हण आणि लिंगायत यांचेकडे गहाण ठेवुन त्याबदल्यात काही पैसे घेऊन धनधान्य खरेदी केले.

ते धान्य काही दिवसच पुरले.नंतर पुन्हा उपासमार सुरू झाली.

उन्हाळा सुरू झाला. जंगलातील अनेक आंब्यांच्या झाडांना मोहर आला. लोकांच्या जगण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. लोक आंबे, करवंदे, आवळे व जांभळे खाऊन आपली भुक भागवू लागली व आजचे मरण उद्यावर ढकलू लागले.

थोड्याच दिवसात जुन महिना सुरू झाला.आकाशात ढग जमू लागले. व नियमित पाऊस पडू लागला.

शेतक-यांना जमीन गहान ठेऊन घेतलेल्या सावकांरानी बी बियाणे दिले.

या वर्षी खुप पाऊस पडला शेते पीकांनी तरारून गेली. शेतकरी खुश झाला.

परंतू पिके निघताच सावकारांच्या झुंडीच्या झुंडी गावागावात येऊन पिकलेले धान्य घेऊन जाऊ लागले. हाता तोंडचा घास सावकारांनी नेला. शिवाय २०० ते ३०० पट कर्जाचे व्याज शेतकऱ्यांच्या माथी मारले.

दरवर्षी सावकार धनधान्य, हिरडा, डिंक, गवताच्या पेंढ्या व फळे घेऊन जाऊ लागले. तरीही त्यांचे कर्ज फिटत नव्हते.

काही दिवसांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीनी सावकांरानी स्वतःच्या नावावर करून घेतल्या. अशा प्रकारे आपल्याच शेतामध्ये आपल्यावरच मजूर म्हणून काम करण्याची नामुष्की आदिवासी व इतर शेतक-यांवर आली होती. या पेक्षा दुष्काळ बरा असे लोक म्हणू लागले.

कष्ट करणारा एक आणि त्याच्या कष्टावर फुकट जगनारा दुसरा असा नवा वर्ग निर्माण झाला. या दुष्टचक्रात सापडल्या मुळे महादेव कोळी जमातीचे दिवसेंदिवस हाल वाढत गेले. 

हा सर्व प्रकार ह्दय पिळवटुन टाकनारा होता. हा आत्याचार हा जुलुम संपुर्ण आदिवासी समाज मोठ्या जुलुमाने सहन करत होता.

हा अत्याचार हा जुलुम होनाजीला सहन होईना. आता सावकारांविरूद्ध काहीतरी करायला हवे. असे होनाजी लोकांना बोलू लागले.

आणि अशातच होनाजीच्या चुलत भावांनी हा सर्व प्रकार जुन्नर येथे जाऊन पोलीस स्टेशनला जाऊन सांगीतले. आणि होनाजीला खोट्या गुन्ह्याखाली अटक करायला भाग पाडले. होनाजींच्या मनात तेथेच अन्यायाविरूद्ध लढण्याचे बीज रोवले गेले.

यातुनच क्रांतीची ज्वाला भडकली ती होनाजी केंगले यांच्यात. त्यांना हा तोंड दाबुन बुक्यांचा मार सहन होईना.

होनाजींनी आजुबाजूचे तरूण गोळा केले. त्यांच्यामध्ये क्रांतीची ठिणगी पेटवली. आणि याच ठिणगीचे पुढे मशालीमध्ये रूपांतर झाले.

लोक होनाजीच्या नेतृत्वाखाली बंडामध्ये सामील झाले. समाज यांना 'बंडकरी' म्हणुन ओळखु लागला.

होनाजी आणि त्यांच्या सहका-यांनी प्रथमतः सावकारांच्या वाड्यांवर रात्री हल्ला करून त्यांच्या ताब्यातील बळकावलेल्या जमीनींचे दस्त ताब्यात घेतले. व मिळेल तशी लुट करू लागले. नंतर हे सर्व बळकावलेल्या आदिवासी समाजाच्या जमीनींचे दस्त अक्षरशः जाळून टाकले. मिळालेल्या लुटीतुन बंदुका व दारूगोळा खरेदी केला. व उर्वरीत लुटीतील पैसे गोरगरीब लोकांना वाटू लागले.

होनाजी केंगले यांनी सावकारांच्या कृष्णकृत्याविरूद्ध लोकजागृतीचे हे लोण त्यांनी भिमाशंकर पासुन शिरूर पर्यंत, खेड, आंबेगाव, जुन्नर घोटी, इगतपुरी, राजुर, नाशिकचा काही भाग, कोकणचा कर्जत, खांडस, सरळगाव, टोकावडे, मुरबाड पर्यंत पसरवले. व बंडाचे निशाण फडकवले.

त्यांचे नाव सगळीकडे दुमदुमू लागले. 

याच वेळी इंग्रजाविरूद्ध प्रसिद्ध असा १८५७ चा राष्ट्रीय ऊठाव सुरू झाला होता. देश इंग्रजांविरूद्ध पेटुन उठला होता. 

या उठावामध्ये होनाजीने उडी घेतली. हा उठाव दुर्दैवाने अयशस्वी झाला. अनेक स्वातंत्र्यवीरांना अटक झाली. १० मार्च १८५८ रोजी होनाजीला पकडण्यात आले. होनाजीला अतीदुर अशा अंदमानातील तुरूंगात ठेवले. होनाजीला पुढे १० वर्षाची सक्त मजुरीची काळ्यापाण्याची शिक्षा झाली.

दहा वर्षाची शिक्षा भोगल्यावर एप्रिल १८६८ रोजी होनाजी पुन्हा गावी जांभोरीला आले. गावी आल्यावर सर्वांना आनंद झाला. होनाजी गेल्यावर सुद्धा सावकांराविरूद्ध लढा मंदगतीने का होईना चालूच होता.

होनाजीने पुढे या लढ्याची सुत्रे हाती घेतली. आणि सावकारांविरूद्धचा लढा अधिक तिव्र केला.

होनाजी आणि त्यांच्या सहका-यांनी अहमदनगर, नाशिक, जुन्नर, आंबेगांव, घोडेगाव, ओतुर, येथे छापे टाकले व प्रचंड लुट केली. अत्याचार करणाऱ्या सावकारांची तलावारींनी नाके कापुन त्यांची घरेदारे पेटवुन दिली.

त्यांच्या या भितीने सावकांरानी इंग्रज सरकारचा आश्रय घेतला. होनाजी केंगले व त्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठी सरकारी कुमुक मागवली गेली.

ब्रिटिश सरकारने होन्या भागोजी केंगले मृत किंवा जिवंत पकडण्यासाठी १०,०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्याचे पोस्टर्स मोस्ट वॉन्टेड म्हणून ठिकठिकाणी लावले. आणि त्यांच्या बंडातील इतरांना २०० ते ६०० रुपयांचे इनाम लावले.

पण याचा काहीही परिणाम झाला नाही.

म्हणून १८७४ मध्ये ब्रिटिश सरकारने होनाजीच्या अटकेसाठी कर्नल स्कॉट आणि मिस्टर डब्ल्यूएफ सिंक्लेअरसीएस यांच्या नेतृत्वाखाली १७५ सशस्त्र विशेष पोलिस दल तैनात केले. परंतु विशेष पोलिस दल देखील अयशस्वी झाले. होनाजी त्यांच्या टोळीसह निसटले.

होनाजी कोकणातील नांदगाव येथे येत असल्याची पक्की खबर मेजर एच. डँनियलला मिळाली.

होनाजीना पकडायचे असेल तर फितुरीनेच पकडले पाहिजे हे मेजर डँनियलने ओळखले. आणि त्याने त्याचे काही साध्या वेशातील हेर नांदगावला पाठवले. दिमतीला सैन्य व फौजफाटा होताच.

होनाजी ज्यांच्या घरी जातात त्यांच्या घरातील जनाबाई मेंगाळ नावाच्या स्रीला पैशाचे अमिश दाखवून फितुर केले.

जवळजवळ तीन आठवड्यांनी होनाजी नांदगाव येथे मेंगाळ यांच्या घरी आले. आणि लगेचच ही बातमी जनाबाईने हेरगीरीवर असणाऱ्याला सांगीतली. थोड्याच वेळात तेथील मेंगाळाच्या घराला पोलीसांनी वेढा घातला. व १५ आँगष्ट १८७६ साली नांदगाव येथे होनाजीला पकडण्यात आले.

दुसऱ्या दिवशी ही बातमी वा-यासारखी सर्वदुर पसरली. लोक हळहळले. गरीब लोकांना अतीव दुःख झाले. आपला कैवारी व तारणहार पकडला गेल्याचे दुःख लोकांच्या जिव्हारी लागले.

होनाजीला पकडल्यावर पुण्याला आनले. त्याच्यावर सावकारांना लुटने, गहान खते जाळने, सरकारी मालमत्तेचे नुकसान करने, दरोडा घालने असे आरोप ठेवले.

पुढे हा खटला सहा महिने चालला. व होनाजीला सन १८७६ साली फाशीची शिक्षा फर्मावण्यात आली. व ठाणे येथील तुरूंगात फाशी देण्यात आले.

थोर आदिवासी क्रांतिकारक    

होन्या भागोजी केंगले यांचे स्मारक त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे जांभोरीमध्ये व्हावे, अशी इच्छा तमाम आदिवासी बांधवांची असताना शासनाने हे स्मारक दुर्लक्षितच ठेवले आहे.

या स्मारकासाठी हेमंत काळू केंगले व मारुती धोंडू केंगले व माजी उपआयुक्त लक्ष्मण डामसे यांनी पुढाकार घेऊन २००२ मध्ये कर्ज काढून जांभोरी येथे छोटेसे स्मारक उभारले आहे. शासनाने यामध्ये दुरुस्ती करून भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी होन्या केंगले स्मारक समितीचे अध्यक्ष हेमंत केंगले यांनी केली आहे. 

सन १८५५ ते १८७६ मध्ये क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या समकालीन असणारा आंबेगाव जांभोरी येथील होन्या भागोजी केंगले हे क्रांतिकारक होते. 

होन्या केंगले यांचे नाव बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील बसस्थानकाला देण्यात यावे अशीही मागणी आहे. या पैकी पंचायत समिती आंबेगांव (घोडेगाव) येथील ध्वजस्तंभावर होनाजी केंगले यांचे नाव कोरण्यात आले आहे.

केंगले यांनी सावकार आणि ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांचा बंदोबस्त त्यांनी केला. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र चळवळ उभी केली आणि त्यांच्या अटकेसाठी ब्रिटिशांनी मोठे बक्षीस जाहीर केले होते. 

होनाजी केंगले यांच्या कामामुळे स्थानिक लोकांमध्ये त्यांना आदराचे स्थान होते.आणि आहे. त्यांच्या कार्याची दखल इतिहासाने फारशी घेतली नाही, परंतु त्यांच्या शौर्यामुळे ते आजही स्मरणात आहेत.

रामदास तळपे 

सच्चा मित्र काशिनाथ जढर

गावातील एकमेव विश्वासू व्यक्तीमत्व कोणते असेल तर ते म्हणजे काशिनाथ जढर. हे गावातील एखादे लहान मुलसुद्धा सांगेल. काशिनाथ हे आमच्या सबंध गावात...

विठू नांगरे कलंदर माणूस