Translate

घटस्फोट एक शोकांतिका

घटस्फोट झाल्या नंतर दहा वर्षांनी ते दोघे एका लग्नात भेटले. नीरजने निशाला एकटच बसलेलं पाहिलं आणि तिच्या जवळ जाऊन खुर्चीवर बसला. बराच वेळ दोघे एकमेकांकडे पाहूनही जणू काही न पाहिल्यासारखे करत राहिले. सात वर्षे त्यांनी एकत्र घालवली होती. भांडणं तर होतीच, पण काही गोड आठवणीही मनात घर करून बसल्या होत्या.

img src="..." alt=" पती-पत्नी ">
शेवटी नीरजनेच बोलायला सुरुवात केली... "कशी आहेस?"

निशा थोड्या अभिमानाने म्हणाली... "मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला नऊ वर्ष झाली. दोन मुलं आहेत."

नीरजने तिच्या चेहऱ्याकडे नीट पाहिले. ती पूर्वीपेक्षा खूप बारीक दिसत होती, चेहऱ्यावर आधीसारखी चमक नव्हती. अंगावर महागडे कपडेही नव्हते. त्याला आठवले, जेव्हा ती त्याच्यासोबत होती तेव्हा किती सुंदर दिसायची. नीरज तिच्याकडे पाहत होता तेव्हा निशाने नजर चुकवली. मग स्वतःला सावरत ती म्हणाली.. "तू कसा आहेस? आणि आपला बंटी कसा आहे?"

नीरजही थोड्या गर्वाने म्हणाला... "मीसुद्धा मजेत आहे. दुसऱ्या लग्नाला सहा वर्ष झाली. एक मुलगी आहे. आणि आपला बंटी आता नववीत गेला आहे. माझी पत्नीही खूप चांगली आहे. आम्ही दोघे खूप आनंदी आहोत."

हे ऐकून निशाच्या मनात जळफळाट झाला, पण तिने चेहऱ्यावर ते उमटू दिलं नाही. तिने नीरजकडे नीट पाहिलं. जणू चाळीसाव्या वर्षीच तो म्हातारा वाटत होता. केसांवर पूर्ण पांढरेपणा झळकत होता. वरून रंग लावलेला दिसत होता, पण मुळाशी पांढरे केस स्पष्ट दिसत होते. पोटसुद्धा खूप वाढल होत.

दोघे बराच वेळ शांत बसले. लग्नाच्या सोहळ्यात ते दिवसभर जवळपास होते, पण आणखी बोलणं झालं नाही.

निघायच्या वेळी नीरज निशाजवळ आला आणि म्हणाला, "एक गोष्ट सांगू का?"

निशा म्हणाली, "काय?"

नीरज उदासपणे म्हणाला, "आयुष्य खरं तर तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतो. आता तर फक्त दिवस ढकलतोय."

हे ऐकून निशाच्या मनात आनंद आणि वेदना एकत्र उसळून आल्या. जणू गळ्यात काहीतरी अडकलं. अश्रू आवरत ती म्हणाली, "मीही पश्चात्ताप करतेय. एक दारुडा आणि वाईट माणूस पडलाय वाट्याला. रडत रडत दिवस काढतेय."

नीरजने डोळ्यात आलेले पाणी लपवण्यासाठी चेहरा वळवला आणि म्हणाला, "आपण दोघे मूर्ख होतो. छोट्या छोट्या गोष्टींना मोठं करून वेगळे झालो. आज तुला एवढंच सांगायचंय की तू खूप चांगली आहेस. तुझ्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणींत दिवस काढतोय."

हे ऐकून निशा रडू लागली. रडत रडत ती म्हणाली, "मीसुद्धा त्याच आठवणींवर जगतेय." एवढं म्हणून तिने पर्स उचलली आणि निघून गेली.

साठ-सत्तरीच्या काळात अपवादानेच घटस्फोट होत असत. त्या काळात नवरा-बायकोच्या कुरबुरी होत नव्हत्या का? रुसवे-फुगवे, क्वचित मारहाण ही होत असे, पण काडीमोड होण्यासाठी ही कारणे पुरेशी नसत.

गेल्या दहा बारा वर्षात मात्र परिस्थिती फारच बिकट झालेली दिसत आहे. घटस्फोटाचे प्रमाण काळजी करण्याइतपत वाढले आहे. काही लग्ने तर हळद निघायच्या आत फिस्कटताना दिसताना मात्र हळहळ होऊ लागली आहे. 

प्रेमाच्या आणाभाका घेऊन, लग्नाआधी तीन चार वर्षे एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेली प्रेमविवाह झालेली जोडपी लग्नानंतर वर्ष दोन वर्षात फारकत घेतात, हे पाहून फार मोठी चूक संस्कृतीच्या जडणघडणीत होताना दिसते आहे. त्याने मन विषण्ण होतंय.

पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धतीचा आता ऱ्हास होताना दिसत आहे.प्रायव्हसी या गोंडस नावाखाली समाजात मोठ्या प्रमाणात विभक्त होताना दिसत आहे. आताच्या पिढीला फक्त नवरा आणि बायको पाहिजे असते. परंतु त्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात मतभेद होताना दिसतात.

छोट्या छोट्या कारणावरून स्वतःचा इगो प्रॉब्लेम सुरू होतो. आणि किरकोळ भांडणाचे रूपांतर पुढे घटस्फोटामध्ये होते. पूर्वी मतभेद किंवा किरकोळ भांडणे झाली तर घरातील मोठी माणसे एकत्र बसून मिटवत असत.

परंतु आता मोठ्या माणसांना नवीन पिढीने दूर लोटले असल्यामुळे त्यांना आता काही कळत नाही या नावाखाली जानकर व्यक्तीचे कुणी ऐकताना दिसत नाही. तरुण वयात ईगो प्रॉब्लेम जागृत होऊन भविष्यात मात्र एका ओसाड आणि उजाड आयुष्याला तोंड द्यावे लागत आहे. हे सर्व पाश्चात्य  संस्कृतीचे अनुकरणच म्हणावे लागेल.

परंतु पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. याची जाणीव मात्र तरुण पिढीला अद्यापही आलेले नाही. तरुण पिढी शिकली म्हणजे फार मोठी शहाणी झाली असे नाही. शिक्षण आणि अनुभव यामध्ये सुद्धा जमीन आसमानाचा फरक आहे. मोठ्यांचे अनुभव कामास येतात. हे उच्चशिक्षित झालेल्या लोकांना कसे कळणार?   

घटस्फोट झालेल्या काही जोडप्यांचा अभ्यास करताना ठराविक मुद्दे सर्वच बाबतीत समान दिसले, ते इथे मुद्दाम देत नाही, कारण त्यावर मतमतांतरे होऊन गैरसमज होण्याची शक्यता अधिक आहे. एक मुद्दा मात्र मी लिहिणारच, तो म्हणजे मुलीच्या संसारात मुलीच्या आईची अवाजवी लुडबुड. 

आजच्या मोबाईलच्या जमान्यात मुलीला दर दोनतीन तासांनी फोन करून तिच्याकडून तिच्या घरची बारीकसारीक माहिती घेऊन तिला नको ते उपदेश व  सल्ले देऊन, तिला तिच्या सासरच्या माणसांपासून तोडण्याचे काम फार शिताफीने घडत आहे, याची जाणीव वा खंत मुलीच्या आईला नसणे, ही बाब सर्व मुद्द्यांच्या केंद्रस्थानी आहे. 

आता हे सर्व पाहिल्यावर मुली-मुलांचे स्थळ शोधण्यास सुरवात करण्याआधीच 

मुलामुलींनी एकमेकांना पसंत केल्यावर, किव्वा अगदी प्रेमविवाह होणार असला तरीही त्या दोघांनी तसेच दोघांच्या आई वडिलांनी समुपदेशन करवून घ्यावे, त्यातून भविष्यात होणाऱ्या अनेक समस्यांचे आधीच निराकरण होईल,जेणेकरून विकोपाला जाणाऱ्या भांडणाचे मूळ कापले जाईल. 

यातील अनेक भांडणे, रुसवे फुगवे हे केवळ गैरसमजुतीनेच घडलेले असतात, हेच या दोन्ही कुटुंबांच्या लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते. तोपर्यंत वेळ निघून जाते व परतीचे दरवाजे बंद झालेले असतात.

आजकाल घटस्फोट घेण्याआधी कोर्टात न्यायाधीश समुपदेशन करण्यास सांगतात, पण यात एक टक्का सुद्धा यश येत नाही, कारण भांडण आधीच विकोपाला गेलेले असते, त्यात दोन्ही बाजूनी एकमेकांवर खोटेनाटे आरोप केलेले असतात ज्यातून दोन्ही बाजूची मने कलुषित झालेली असल्यानेच समुपदेशन हा केवळ फार्स ठरतो. 

थोडक्यात काय तर खरे समुपदेशन लग्नाच्या आधी दोन्ही बाजू एकमेकांचे कोडकौतुक करत असताना झाल्यास एकमेकांना समजून घेण्यास सोपे होते. तसेच भविष्यात समजा काही मतभेद उद्भवल्यास त्यांचे निराकरण दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार करून काडीमोड होण्याची वेळ येणारच नाही याची दक्षता घेता येते.

समुपदेशन ही आता काळाची गरज झाली आहे ते घेणे हा कमीपणा न समजता तसेच आम्ही समजूतदार आहोतच, आम्हाला सर्व समजते या फाजील आत्मविश्वासात न राहून न जाणो पण येणाऱ्या संकटाचा सामना करण्याची तयारी करणे हीच खरी व्यवहार्यता आहे हे सर्व पालक तसेच नवदांपत्याने होणे अत्यंत गरजेचे आहे.

रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)


1 टिप्पणी:

  1. तळपे साहेब वास्तविकता मांडली लेखात मांडलेले मुद्दे जर पाळले तर घटस्फोट होणार नाही

    उत्तर द्याहटवा

आदिवासींचा डॉक्टर, समाजसेवेचा ध्यास : डॉ. राहुल जोशी

काही माणसे आपल्या पदामुळे मोठी होतात, तर काही आपल्या कार्यामुळे लोकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करतात. डॉ. राहुल जोशी हे दुसऱ्या प्रकारात...