का? काय माहित पण सुंदरबाईला पाहताच प्रत्येक माणसाला सुंदरबाई एक आधारस्तंभ असल्याचं वाटतं.
प्रत्येक घरात एखादा तरी वृद्ध माणूस असावा व त्याचा प्रचंड आधार आपल्याला असावा त्याप्रमाणेच संपूर्ण गावाला सुंदरबाई या आधारवड आहेत. त्यांचे संपूर्ण गावांमध्ये कुणाबरोबरही शत्रुत्व नाही. हे एक विशेष. मराठा समाजातील ते असूनही सर्व समाजाशी त्यांची तितकेच जवळचे नाते आहे. त्या काही लोकांच्या मावशी, आत्या, मामी, आजी लागत असल्या तरी सर्वजण त्यांना सुंदरबाई या नावानेच हाक मारतात.
मंदोशी गावचे मुलकी पाटील कै. शिवराम मानाजी मोहन यांच्या सुंदरबाई हया कन्या आहेत.
सुंदर बाईचा जन्म साधारण 1952 चा. लहानपणी अभ्यासात त्या अतिशय हुशार म्हणजे सातवीपर्यंत प्रथम क्रमांक हा ठरलेला होता.
परंतु त्याकाळी ग्रामीण भागात जास्त शिकलेले बहुदा चालत नव्हते. त्यामुळे हुशार असूनही पुढील शिक्षण सुंदरबाईला घेता आले नाही.
पुढे त्यांचे लग्न देवराम बांगर यांच्याशी झाले. देवराम बांगर हे सुरुवातीला मुंबईला होते. परंतु त्यांच्या कंपनीला आग लागल्यामुळे ते गावी येऊन सासरवाडीला म्हणजेच सुंदरबाईच्या माहेरी राहू लागले.
सन 1983 मध्ये महाराष्ट्र शासनाने एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत अंगणवाडीची स्थापना केली आणि प्रथम सुंदरबाईला अंगणवाडी सेविका म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
जरी सुंदरबाई अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असल्या तरी गावातील एक सुशिक्षित स्त्री, एक समाजसेविका, म्हणून लोक त्यांच्याकडे आतापर्यंत पाहत आले आहेत.
गावात कोणतेही धार्मिक कार्य, लग्नकार्य, असेल तर सर्वात पुढे सुंदरबाई असतात. सढळ हाताने त्या धार्मिक कार्याला देणगी देतात. त्यांचा मोठा सहभाग असतो.
गावात कोणतीही दुःखद घटना घडली तर सुंदरबाई सर्वात आधी सांत्वनाला धावून जाणार. सांत्वनपर चार गोष्टी समजावून सांगणार त्यामुळे त्यांच्या नुसत्या येण्याने मोठा धीर येतो व दुःख हलके होते हे सांगायला नलागे.
त्या काळात पश्चिम भागात हातभट्टी दारूचे बरेच धंदे नव्यानेच अस्तित्वात येत होते.त्यापैकी गमाशेठ यांनी अत्यंत विचारपूर्वक अत्याधुनिक असा हातभट्टी व्यवसाय सुरू केला होता. जमिनीमध्ये दारू साठवण्याची अंतर्गत रचना केली होती. त्यामुळे पोलिसांना जंग जंग पछाडूनही काहीच हाती लागत नव्हते. तिथून छट्या छोट्या धंदेवाल्यांना होलसेल रेटच्या भावाने दारू विक्री करण्यासाठी पाठवली जात असे. त्यांची दारू त्यावेळी भोसरी पर्यंत जात असे.
19 91 - 92 मध्ये सुंदरबाईच्या नेतृत्वाखाली भागातील सर्व महिला एकत्र आल्या. त्यामध्ये डेहणे पासून भोरगिरी पर्यंत महिलांचा सहभाग होता. जवळजवळ दोनशे तीनशे महिला एकत्र येऊन प्रत्येक दारू धंद्या वर धाडी टाकून दारू विक्री बंद केली. अगदी गामा शेठ यांचा सुद्धा दारू विक्रीचा धंदा बंद केला. हे आंदोलन तेव्हा प्रचंड यशस्वी झाली होती. त्यावेळी महिलांची रुद्र रूप पाहून सर्वच दारू धंद्यावाल्यांनी महिलांची प्रचंड दहशत घेतली होती.
या आंदोलनामध्ये सुंदरबाई यांचा मोठा सहभाग होता.
सुंदरबाई यांनी गावात महिला मंडळाची स्थापना देखील केली होती. त्या माध्यमातून छोटासा महिलांचा फंड उभा केला होता. त्या माध्यमातून स्थानिक महिलांच्या गरजा भागवल्या जात असत.
पूर्वी पाऊस वेळेवर जर पडला नाही तर त्या काळात देव कोंडण्याची पद्धत होती.
सर्व महिलांनी सकाळी आवरून प्रत्येकीने पाण्याचा हंडा भरून शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराला पाण्याचा अभिषेक करायचा. त्यावेळी गाभाऱ्यातील पाणी बाहेर जाण्याचा झरोका बंद करायचा. व महादेवाची पिंड पाण्याने पूर्ण बुडून जाईल अशी व्यवस्था करायची.
एक प्रकारचा हा जल अभिषेकच असायचा. त्यावेळी वेगवेगळी पाऊस पडण्याची गाणी म्हटली जायची.
एक असाच प्रसंग.
मला आठवते, माझ्या लहानपणी एकदा भातरोपांसाठी पेरणी केल्यावर अशीच एकदा पाऊसाने ओढ दिली होती. शेतकरी वर्ग मोठया जिद्दीने पोराबाळांसह घागर,कळशी,हांडा यांच्या सहाय्याने रोपे जगवत होता. त्यामध्ये मी सुद्धा होतो.
परंतू तो एक केविलवाना प्रयत्न होता.पाऊस काही पडत नव्हता.पाऊस असता तर सर्व भागाची आवणी (लावणी) केव्हाच झाली असती.
आणि एके दिवशी सुंदरबाई यांनी धुओली, वांजाळे, शिरगाव व मंदोशी या चार गावच्या महिलांना एकत्र केले. आणि निर्णय घेतला की सर्वांनी घागरी भरून पाणी आणायच्या व सुळ्याचा महादेव कोंडायचा.(चार गावच्या हद्दीत उंच डोंगरावर शंकराचे जागृत देवस्थान)
ठरल्या प्रमाणे सकाळी सर्व गावच्या महिला जंगलातील उंच डोंगर असलेल्या महादेव मंदिराकडे घागरीत पाणी घेऊन निघाल्या. त्यात आम्ही मुलेही होतो. सकाळीच पाऊसाचे वातावरण तयार झाले होते.
अगदी सकाळी जंगलातुन चालताना मजा वाटत होती. पक्षी गात होते.मध्येच एखादा ससा आम्हाला पाहुन वायू वेगाने पळत होता.आम्ही आम्ही उभा डोंगर चढून वर चालत होतो. घामाच्या धारा अंगातुन वाहत होत्या.
असेच चालत वर उंच डोंगरावर पोहचलो. आणि थंडगार हवेची झुळुक लागायला सुरूवात झाली.आणि क्षणात मन टवटवीत झाले.
थोडयाफार फरकाने वांजळे, धुओली, शिरगाव व मंदोशी या गावच्या महिला जमा झाल्या.सुळ्याच्या महादेवाची यथासांग पुजा करण्यात आली. देवाचे न्हाणीद्वार बंद करण्यात आले.आणि प्रत्येक महिला तिने आणलेली घागर महादेवाच्या पिंडीवर रिती करू लागली.
चार गावच्या महिलांच्या पाण्याने महादेवाची पिंड बुडुन गेली. त्यानंतर सर्व महिला मंदिराबाहेर फेर धरून महादेवाला पाऊस पाडण्यासाठी विवीध गाण्यांच्या माध्यमातून साकडे घालू लागल्या. हे दृश्य आझ्या आयुष्यातील सर्वात विलोभनीय दृष्य आहे.बराच वेळ त्यांची विवीध नाचगाण्यांच्या माध्यमातून देवाकडे पाऊस पाडण्याविषयी आळवणी चालू होती.या सर्व महिलांना एकत्र आणण्याचे काम आमच्या गावातील आदरणीय मातृतुल्य सौ.सुंदरबाई देवराम बांगर आंगणवाडी सेवीका यांनी केले होते.
आणि काय अश्चर्य थोडयाच वेळात टपटप पाऊसाचे थेंब पडायला लागले. आणि थोड्याच वेळात जोरदार सरी कोसळायला लागल्या. सर्व भिजुन चिंब झाले. जोरदार पाऊस पडु लागला प्रत्येक महिला व मुले देवाचे दर्शन घेऊन वाट फुटेल तशी घराकडे परतु लागली.
👉🏻 हेही वाचा मंदोशी गावचे मोहन घराणे
पाऊस पडतच होता. एव्हाना ओढ्या नाल्यांना पुर आला.
जिकडे तिकडे पाणीच पाणीच खळखळणारे झरे !
झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे!...दिसु लागले.
आम्ही पाउलवाटेने चाललो होतो.पाऊस आम्हाला त्याच्या जोरदार सरींमुळे झोडपत होता. खाली गावात ओढ्याला मोठा पुर आला होता.व त्या पुरात जंगलातील ओंडके वाहत येत होते. मोठ्या लांटामध्ये हे ओंडके अचानक गायब व्हायचे व थोड्याच वेळात दुर कोठेतरी अचानक दिसायचे.
आता सुंदरबाई वयोवृद्ध झाल्या आहेत. मोहन वाडीत रस्त्यावरच त्यांचे घर आहे. दारातच त्या बसलेल्या असतात. जेव्हा आम्ही जातो तेव्हा सुंदर बाईशी आदरपूर्वक चार शब्द बोलतो. त्यामुळे मन हलके होते.
✍️ माझा हा लेख मूळतः marathishrushti वर देखील प्रकाशित झाला आहे. लेखक: रामदास तळपे.
चित्र सौजन्य :- इंजिनीयर अरुण मोहन मंदोशी.
लेखक :- रामदास तळपे (ग्रामीण संस्कृती)



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा