दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा..असे म्हटले जायचे...ते तंतोतंत खरे होते.पण ते कधी? तेव्हा.
आता सगळ्याच सणांचे महत्त्व कमी झाले आहे. पुर्वी प्रत्येक सणाला अनन्यसाधारण महत्त्व होते. प्रत्येक सणाचा बाज वेगळा होता.जो तो सण साजरा करण्याची सणाची गम्मतच न्यारी. ढंग वेगळा व आनंदही वेगळाच. दसरा हा सणही एक वेगळाच आनंद देऊन जायचा.
पुर्वी वेळेवर पाऊस पडायचा. बैलपोळ्या नंतर पाऊस पडायचा बंद व्हायचा.
बैलपोळ्या नंतर ठराविक चार- पाच शेतक-यांची हळवी जात असलेली पिके काढायला यायची. आणि अशातच यायचा दसरा सण.
ग्रामीण भागात दस-याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. दस-याला हमखास पुण्या- मुंबईवरून चाकरमानी आई वडीलांना गावातील लोकांना व नातेवाईकांना भेटायला हमखास येत असत. सकाळ पासुन नातेवाईकांची गर्दी गावात भेटण्यासाठी होत असे. प्रत्येक गावात हेच चित्र असे.
सकाळपासुन प्रत्येक सासुरवाशीन आई वडील,नातेवाईक यांना भेटण्यासाठी परत त्याच दिवशी फिरून यायच्या बोलीवर निघायच्या तयारीला लागायच्या. माहेरी जाताना एखाद्या फडक्यात दोन-चार भाकरीचे पीठ,गुळाचा खडा नेण्याची पध्दत होती. आता सारख्या तेव्हा गाड्या-घोड्या नव्हत्या. सगळीकडे पायी प्रवास असे.
आपली लेक व नातवंडे येणार म्हणुन सासुरवाशिनीची आई सकाळ पासून स्वयंपाकाला लागे. डांगरभोपळ्याचे भोकाचे वडे व गुळवणी, काकडीची पीसोळी, रव्याचा गोड शीरा किंवा गुळ व शेंगदाण्याच्या पीठाच्या पोळ्या हा मेणू असे.
लवकरच मुलगी माहेराला येई. सर्वांना भेटून चार सुख-दुखाच्या गोष्टी सांगीतल्या जात दिवस मावळतीकडे झुकल्यावर आपल्याला पुन्हा सासरी जायचे आहे याची जाणिव होई. चार घास गोडाधोडाचे खाल्यावर माहेवाशीन ससरच्या दिशेने निघे. तिच्या डोक्यावर पीठ व गुळ असलेले गाठोडे असे. त्याच्या जोडीला एखादा डांगरभोपळा, हातभर लांबीची काकडी असे. घरी येऊन परत तीला स्वयपाक करावा लागे.
गावात सकाळची नित्याची कामे पुर्ण झाल्यावर लहान मुले झेंडूची फुले आणुन त्याचे तोरण घराला बांधले जाई. उर्वरीत माळा देवासाठी असत.
पुरूष मंडळी घरातील सर्व हत्यारे व औजारे नदीवर किंवा ओढ्यावर घेऊन जात. या सर्व वस्तू चांगल्या घासुन, पुसून पाण्यात स्वच्छ धुतल्या जात. मोठ्या मानसांबरोबर लहान मुले सुद्धा जात. पाण्यात मस्तपैकी पोहत राहत.
सर्व हत्यारे घरी आणुन एका कोप-यात पोत्यावर ठेवली जात. प्रत्येक वस्तूला हळद,कुंकू लावुन फुले वाहीली जात. जमेल तशी पुजा करत. जोडीला लहान मुलांची पाठ्यपुस्तके सुद्धा असत.
दुपारनंतर सर्व गावकरी एकत्र जमत. शिलंगनाचे सोने आणन्यासाठीची तयारी सुरू होई. एकजणाच्या गळ्यात ढोल असे. तर एक दोघांकडे कोयता असे.गावातील लहानमोठे लोक,पोरे टोरे शिलंगनाचे सोने आणन्यासाठी रानात जात. आपट्याच्या झाडाजवळ जाऊन त्याची पुजा करून लहान फांद्या कोयत्याने छाटल्या जात. प्रत्येकाकडे आपट्याच्या एकदोन छोट्या फांद्या दिल्या जात.
ढोल वाजवत सर्वांचा घोळका गावच्या ग्रामदैवताकडे जात असे. सर्व देवांना सोने देऊन दंडवत घालून दर्शन घेऊन मगच गावात जायचे. आणलेल्या आपट्याच्या फांद्या हत्यारे पुजेसाठी ठेवली असत तेथे ठेवल्या जात.
इकडे प्रत्येकाच्या घरात डांगर भोपळ्याचे भोकाचे वडे किंवा काकडीचे पीसोळे हा मेणू सर्रास असायचाच. त्यांचा खमंग सुवास नाकातोंडात दरवळायचा.
डांगर भोपळा कापून त्याच्या फोडी करून तो शिजवला जातो. शिजवल्यावर त्याचा गर त्यातील पाणी काढून तांदळाच्या पिठात गुळ घालून एकत्रित मिस्रण तयार केले जाते. त्याचे छोटे छोटे वडे करून ते तेलात तळले जातात. काकडीची पिसोळी करण्याची पद्धत वेगळी असते.
काकडीचा गर काढुन तांदळाच्या पिठात गुळ वेलची व हळद, मिठ घालून मिस्रण तयार केले जाते. हे मिस्रण हळदीच्या पानावर थापून त्यावर दुसरे हळदीचे पान ठेऊन वाफेवर शिजवून तयार केले जाते. हे सर्व पदार्थ फक्त दसरा व दिवाळी या सणांनाच असत. इतर वेळेला नाही.
लाडू,करंज्या हे पदार्थ खुप नंतर गावाकडे आले. भोकाचे वडे व पिसोळी यांची चव अजुनही जुन्या लोकांच्या जीभेवर असेल.
संध्याकाळी जेवणे होत. एकमेकांना जेवणाचे आमंत्रण दिले जाई. लोकही प्रेमाने आमंत्रण स्विकारून एकेक जण चार - पाच घरांमध्ये जेवण करत.
सकाळ पासुन गाव नातेवाईक, आप्तेष्ट व सगेसोयरे, वाड्या वस्त्यातील लोक, बाया बापड्या, पोरे बाळे यांच्या गर्दीने फुलुन जाई. एकमेकांना भेटायला गर्दी होई.
आमच्याकडे सुद्धा हुरसाळेवाडीचे सर्वलोक भेटण्यासाठी व शिलंगनाचे सोने देण्यासाठी मोहनवाडीत येत.
नंतर दोन्ही वस्त्यांतील लोक मंदोशी गावात येत. सोने देऊन झाल्यावर सर्वजण मंदोशी गावच्या थोडे दुर असलेल्या जावळेवाडीला जात.
तेव्हा संपुर्ण गाव व सर्व वाड्यावस्त्यातील लोक दस-याच्च्या दिवशी जावळेवाडीला जात असत. शिलंगनाचे सोने देउन झाल्यावर जेवणाचा आग्रह केला जाई. तो पर्यत रात्रीचे आकरा वाजत. नंतर सर्व लोक आपापल्या घरी जात.
असा तो काळ होता. एकत्र कुटुंबपध्दती होती. संपुर्ण गाव एकविचाराने रहायचा. एकमेकाबद्दल आदर होता. प्रेमभावना होती.
परंतू हळुहळू लोक कामानिमीत्त शहरात गेले. शहरातील संस्कृती गावात आली. एकत्र कुटुंबपद्धती जाऊन विभक्त कुटुंबपद्धती आली. एकमेकांविषयी आदर व प्रेम कमी झाले. लोकांकडे पैसा आला.
पुर्वी कधीतरी सणावाराला केले जाणा-या पदार्थापेक्षा चांगले पदार्थ दररोज घरात केले जाऊ लागले. हाँटेल व ढाबा संस्कृती आली. बाहेर खाण्याची चटक लागली. लोकांकडे मोटारसायकल, कार आल्या.
पुर्वी नातेवाइकांच्या घरी मुक्काम करणारे लोक मोटारसायकल, कार आल्याने उभ्या उभ्या भेटुन थांबायला वेळ नसल्याचे सांगुन चहा घेऊन आल्या पाऊली जाऊ लागले.
आता तर मोबाईल आले. पुर्वी साधे मोबाइल होते. तेव्हा लोक नांतेवाईकांना, मित्रांना न भेटता मोबाईलवरून फोन करून शुभेच्छा देऊ लागले.
त्यानंतर काळ बदलला. लोकाकडे अँड्राव्ह्यूड स्मार्ट फोन आले. आता लोक फक्त शुभेच्छा असलेले मेसेज फाँरवर्ड करायचे काम करू लागले. याबाबत लोकांना विचारले असता अहो! वेळच मिळत नाही. काय करणार असे उत्तर मिळते.
शेवटी शेवटी काय? कालाय तस्मय नमः
सर्वांना दस-याच्या हर्दिक शुभेच्छा ...
रामदास तळपे.( ग्रामीण संस्कृती )

हुबेहुब वर्णन केल आहे सर....अप्रतीम.
उत्तर द्याहटवा